Tag Archive for: चेतना

विचारशलाका ३५

स्व व वस्तुमात्रांविषयीची जाणीव आणि शक्ती व तिचे सामर्थ्य या दोन घटकांनी ‘चेतना’ बनलेली असते.

जाणीव ही पहिली आवश्यक गोष्ट आहे, तुम्ही योग्य चेतना राखून वस्तुंबाबत जाणीव बाळगली पाहिजे; योग्य प्रकारे, त्यांना त्यांच्यातील सत्याद्वारे जाणून घेतले पाहिजे. पण त्यासाठी केवळ जाणीव असणे पुरेसे नाही. तर चेतना प्रभावी ठरण्यासाठी संकल्प आणि शक्ती असणे आवश्यक आहे.

कोणता बदल होणे आवश्यक आहे, काय निघून जायला हवे, त्याच्या जागी काय यायला हवे, याबाबतीत कदाचित एखाद्याला पूर्ण जाणीव असू शकेल, मात्र तसा बदल घडवून आणण्यास तो असमर्थ असू शकेल. किंवा दुसऱ्या एखाद्याकडे इच्छाशक्ती असू शकेल परंतु, योग्य जाणिवेच्या अभावी ती इच्छाशक्ती योग्य ठिकाणी आणि योग्य रीतीने कशी वापरायची हे समजण्यास तो असमर्थ असू शकेल.

तुम्ही आंतरात्मिक चेतनेमध्ये (Psychic Consciousness) असण्याचा उपयोग असा असतो की, तुमच्याकडे योग्य ती जाणीव असते आणि तुमची इच्छा ही ‘श्रीमाताजीं’च्या इच्छेशी सुसंगत असल्याने, तुम्ही योग्य ते परिवर्तन घडून यावे म्हणून ‘श्रीमाताजींच्या शक्ती’ला आवाहन करू शकता.

पण मन आणि प्राण यांमध्येच ज्या व्यक्ती जगत असतात, अशा व्यक्ती मात्र हे करू शकत नाहीत; अशा व्यक्तींना बरेचदा वैयक्तिक प्रयत्न करणे भाग पडते. तसेच त्यांच्यामधील मनाची व प्राणाची जाणीव, त्यांची इच्छा, त्यांची शक्ती या गोष्टी परस्परांहून विभक्त असतात आणि अपूर्ण असतात; त्यामुळे केलेले कार्यही सदोष असते व ते निर्णायकदेखील नसते. केवळ अतिमानसामध्येच (supermind) ‘जाणीव’, ‘संकल्प’, ‘शक्ती’ या नेहमीच एकत्वाने कार्यरत असतात आणि म्हणून त्या स्वाभाविकपणेच अधिक परिणामकारक असतात.

– श्रीअरविंद [CWSA 28 : 24-25]

विचारशलाका ३३

 

चेतना ही अस्तित्वामध्ये सहजस्वाभाविकपणे असणारी एक वस्तुस्थिती आहे. पृष्ठवर्ती भागामध्ये क्रियाशील नसताना जेव्हा ती शांत, गतिविहिन असते तेव्हाही ती तेथेच असते. वरवर पाहता ती दिसत नाही, किंवा बाह्य गोष्टींवर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही, त्यांच्याविषयी ती जागृत नाही असे वाटत असले तरीही ती तेथेच असते; अंतरंगामध्ये ती अंतर्मुख पद्धतीने, क्रियाशील किंवा निष्क्रिय स्वरूपात असते; तिचे अस्तित्वच नाही असे आपल्याला वाटत असते; किंवा आपल्याला तिचे अस्तित्व अगदी अचेतन किंवा निर्जीव असे भासत असते तरीही ही चेतना तेथेच असते.

*

चेतना म्हणजे केवळ स्वत:बद्दलची किंवा वस्तुमात्रांबाबतची जाणीव शक्ती नव्हे; तर ती एक गतिमान आणि क्रियाशील ऊर्जा असते किंवा तिच्याकडे गतिमान आणि क्रियाशील ऊर्जा असते. ती तिच्या स्वत:च्या प्रतिक्रिया ठरवू शकते किंवा या प्रतिक्रियांपासून स्वत:ला वेगळी ठेवू शकते; ती शक्तींना फक्त प्रतिसादच देते असे नाही, तर ती या शक्ती निर्माण करू शकते किंवा स्वत:मधून शक्तींना बाहेरही काढू शकते. चेतना म्हणजे फक्त ‘चित’ नाही, तर ती ‘चित्शक्ती’देखील असते.

चेतना आणि मन या गोष्टी अभिन्न आहेत, असे सहसा मानले जाते; पण मानसिक चेतना ही अशी एक निव्वळ मानवी कक्षा आहे की, त्या कक्षेपलीकडील चेतनेच्या सर्व संभाव्य श्रेणींना ती कवळून घेऊ शकत नाही. मानवाला जे दिसू शकते किंवा ऐकू येते अशा श्रेणींच्या वर आणि खालीसुद्धा अनेक श्रेणी असतात; त्या श्रेणी मानवाला अदृश्य किंवा अश्राव्य असतात. मानवाची दृष्टी रंगांच्या किंवा त्याची श्रवणशक्ती ध्वनींच्या सर्व श्रेणी कवळू शकत नाही; मानवी चेतनेचेदेखील असेच असते.

मानवी कक्षेच्या वर आणि खालीदेखील चेतनेच्या अनेक श्रेणी आहेत; त्यांच्याशी सामान्य मानवाचा संपर्क नसतो आणि त्यामुळे त्या श्रेणी त्याला एकतर अचेतन (unconscious), अधोमानसिक (submental) किंवा अधिमानसिक (overmental), अतिमानसिक (supramental) अशा वाटतात.

– श्रीअरविंद [CWSA 28 : 15-16]

विचारशलाका ३२

 

मूलत: सर्व प्रकारचे योग म्हणजे आपली चेतना उन्नत करणे किंवा अधिक सखोल करणे होय. असे केल्याने आपली चेतना ही, आपल्या सामान्य चेतनेच्या आणि आपल्या सामान्य ‘प्रकृती’च्या अतीत असणाऱ्या गोष्टींसाठी सक्षम होऊ शकेल.

आपल्या आंतरिक सखोलतेशी, आपल्या वर असणाऱ्या उत्तुंगतेशी, आपल्या अतीत असणाऱ्या व्यापकतेशी ‘संपर्क साधणे’ म्हणजे योग. त्यांच्या महान प्रभावाप्रत, महान अस्तित्वांप्रत, त्यांच्या हालचालीबाबत ‘खुले असणे’ किंवा आपल्या पृष्ठवर्ती चेतनेमध्ये आणि आपल्या अस्तित्वामध्ये त्यांचा ‘स्वीकार करणे’ म्हणजे योग; किंवा योग म्हणजे उत्तुंगतेप्रत आरोहण असते, आणि आपल्या कक्षांच्या अतीत असणाऱ्या व्यापकतेमध्ये, आंतरिक सखोलतेमध्ये ‘प्रवेश करणे’ असते. ज्यामुळे आपल्या बाह्य अस्तित्वाचे परिवर्तन होईल, आपल्या अस्तित्वाला तो आत्मा कवळून घेईल आणि त्या आत्म्याचे सुशासन आपल्या बाह्य अस्तित्वावरदेखील चालू लागेल.

आपण ज्या ‘सद्वस्तु’चा शोध घेऊ इच्छितो ती आपल्या पृष्ठभागावर नसते किंवा जर ती ‘सद्वस्तू’ तिथे असलीच तर ती अवगुंठित (Concealed) असते. आपल्या आवाक्यात असलेल्या चेतनेपेक्षा अधिक गहनतर, उच्चतर किंवा व्यापकतर चेतनाच तेथे पोहोचू शकते, त्या ‘सद्वस्तु’ला स्पर्श करू शकते, त्या ‘सद्वस्तु’चे ज्ञान करून घेऊ शकते आणि त्या ‘सद्वस्तु’ला प्राप्त करून घेऊ शकते. आपण आपल्या सामान्य चेतनेच्या आतमध्ये, तेथे काय आहे हे शोधण्यासाठी, बुडी मारली तरी त्या ‘सद्वस्तु’च्या केवळ अंशभागामध्येच आपला प्रवेश होतो.

– श्रीअरविंद [CWSA 12 : 327-328]

विचारशलाका ३१

 

साधक : व्यक्ती जेव्हा झोपलेली असते तेव्हा तिची चेतना ही जागेपणी असलेल्या चेतनेपेक्षा कशा प्रकारे वेगळी असते?

श्रीमाताजी : ती भिन्न असल्याचे तुमच्या कधी लक्षात आले नाही का? तुमची शारीर चेतना (physical consciousness) किंवा तुमची सूक्ष्म शारीर चेतना (subtle physical consciousness), तुमची प्राणिक चेतना (vital consciousness) किंवा तुमच्यामधील कनिष्ठ किंवा उच्चतर प्राणिक चेतना, तुमची आंतरात्मिक चेतना (psychic consciousness), तुमची मानसिक चेतना (mental consciousness), या सगळ्या एकमेकींपासून पूर्णत: भिन्न असतात.

म्हणून जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा तुमच्यात एक चेतना असते आणि जेव्हा तुम्ही जागे असता तेव्हा वेगळीच चेतना तुमच्यात असते. तुम्ही जागे असता तेव्हा गोष्टी तुमच्या बाहेर प्रक्षेपित झालेल्या तुम्ही पाहता, तर निद्रावस्थेत त्याच गोष्टी तुम्ही अंतरंगात पाहता. म्हणजे जागे असताना, तुम्हाला जणू बाहेर धाडण्यात आलेले असते आणि तुम्ही त्याकडे समोरून पाहता आणि निद्रावस्थेत तुम्ही स्वत:कडेच आंतरिक आरशामध्ये पाहता. व्यक्तीने चेतनांच्या स्थितीमध्ये फरक करायला शिकले पाहिजे अन्यथा व्यक्ती कायमच गोंधळलेली राहील.

वास्तविक, ही योगमार्गावरील पहिली पायरी आहे, ही धाग्याची सुरुवात आहे. जर व्यक्तीने हा धागा शेवटपर्यंत पकडून ठेवला नाही तर, व्यक्ती वाट चुकण्याची शक्यता असते. तेव्हा तो धागा शेवटपर्यंत पकडून ठेवणे अत्यंत आवश्यक असते.

– श्रीमाताजी [CWM 07 : 131]

विचारशलाका ३०

 

चेतना आणि ज्या माध्यमांमधून चेतना व्यक्त होते ती साधने या दोन गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत.

त्या साधनांचा विचार करुया : मानसिक अस्तित्वामधून ‘विचार’ निर्माण होतात, भावनिक अस्तित्वामधून ‘भावना’ निर्माण होतात, प्राणिक अस्तित्वामधून ‘कार्यकारी शक्ती’ निर्माण होते आणि शारीरिक अस्तित्व ‘प्रत्यक्ष कृती’ करते.

प्रतिभावान माणसाला काहीही दिले तरी, त्यापासून तो काहीतरी सुंदर असे बनवून दाखवेल कारण तो प्रतिभाशाली असतो. पण त्याच प्रतिभावंताला तुम्ही एक परिपूर्ण असे साधन द्या, तो त्यापासून काहीतरी अद्भुत असे करून दाखवेल. एखादा महान पियानोवादक अगदी खराब झालेल्या पियानोमधूनसुद्धा काहीतरी उत्तम संगीत निर्माण करेल पण त्याला जुळवलेला, उत्तम असा पियानो द्या, तो त्यापासून अधिकच सुंदर असे काही संगीत निर्माण करेल. या दोन्ही बाबतीत चेतना एकसारखीच असते पण तिच्या अभिव्यक्तीसाठी चांगल्या साधनाची आवश्यकता असते. – अगदी त्याचप्रमाणे मानसिक, प्राणिक, आंतरात्मिक आणि शारीरिक क्षमता असलेल्या देहाची साधन म्हणून आवश्यकता असते.

– श्रीमाताजी [CWM 04 : 40]

विचारशलाका २४

 

साधक : आध्यात्मिक अनुभव म्हणजे काय…?

श्रीमाताजी : आध्यात्मिक अनुभव ही एक अशी गोष्ट असते की, ज्यामुळे तुम्ही नेहमी ज्या चेतनेमध्ये (consciousness) वावरत असता त्यापेक्षा अधिक उच्च अशा चेतनेशी तुमचा संपर्क येतो. तुमची स्वत:विषयी काहीतरी एक भावना असते, भले मग कदाचित तुम्हाला त्याची जाणीवही नसेल, पण ती तुमची सामान्य स्थिती असते. पण तुम्हाला जर एकाएकी तुमच्या अंतरंगातील काही वेगळ्या आणि अधिक उच्च अशा चेतनेची जाणीव झाली तर – भले मग ती काही का असेना – तो एक ‘आध्यात्मिक अनुभव’ असेल. (अशा वेळी) तुम्ही मानसिक कल्पनेद्वारे त्याची मांडणी कराल किंवा करणारही नाही; तुम्ही ते स्वत:लाच स्पष्ट करून सांगाल किंवा सांगणारही नाही, ती जाणीव टिकून राहील किंवा राहणारही नाही; ती उत्स्फूर्त असू शकते. पण जेव्हा चेतनेमधील हा मूलभूत फरक तुम्हाला जाणवतो तेव्हा, त्याचा परिणाम म्हणून, अधिक उच्च, अधिक सुस्पष्ट, अधिक विशुद्ध असे काहीतरी तुम्हाला जाणवते तेव्हा त्याला ‘आध्यात्मिक अनुभव’ असे म्हणता येते.

– श्रीमाताजी [CWM 06 : 432]

विचारशलाका १०

साधक : आम्ही आमची चेतना विशाल कशी करावी?

श्रीमाताजी : चेतना विशाल करण्याचे अनेक मार्ग आहेत. सर्वात सोपा मार्ग म्हणजे, कोणत्यातरी विशाल गोष्टीशी तादात्म्य पावणे. उदाहरणार्थ, अगदी संकुचित व मर्यादित असा एखादा विचार, एखादी इच्छा, चेतना यामध्ये तुम्ही पूर्णपणे बंदिस्त झाले आहात असे जेव्हा तुम्हाला वाटते, आणि जणुकाही एखाद्या कवचात तुम्ही कोंडले गेले आहात असे जेव्हा तुम्हाला वाटते, अशा वेळी जर कोणत्या तरी विशाल गोष्टीबद्दल विचार करण्यास तुम्ही सुरुवात केलीत तर तुमची चेतना तुम्ही काहीशी विशाल करू शकाल…

उदाहरणार्थ, महासागराच्या पाण्याचा अफाट विस्तार. तुम्ही जर खरोखरच अशा महासागराचा विचार करू लागलात आणि तो सर्व बाजूंनी किती दूर, दूरवर पसरला आहे असा विचार केलात तर, तुमच्या मानाने तो इतका विशाल, इतका अथांग असतो की, तुम्हाला त्याचा किनारा दिसू शकत नाही, तुमची दृष्टी त्याच्या कोणत्याच टोकापर्यंत पोहोचू शकत नाही, मागे नाही, पुढे नाही, उजवीकडे नाही, डावीकडे नाही… तो विशाल, खूप विशाल, खूप खूप विशाल आहे… असा विचार तुम्ही केलात, तर तुम्हाला असे जाणवू लागते की, आपण अशा महासागरावर तरंगत आहोत की, ज्याला कोणतीच मर्यादा नाही. अशी कल्पना करणे सोपे आहे. असे केले म्हणजे तुमची चेतना तुम्ही काहीशी विशाल करू शकाल.

काहीजण आकाशाकडे पाहायला लागतात आणि नंतर ते त्या तारकांच्या मधल्या अवकाशाची कल्पना करतात… त्या अनंत विस्तारामध्ये पृथ्वी अगदी एखाद्या ठिपक्याप्रमाणे आहे आणि तुम्ही तर या पृथ्वीवर त्याहूनही लहानशा ठिपक्याप्रमाणे, मुंगीपेक्षाही लहानशा ठिपक्याप्रमाणे आहात असे तुम्हाला वाटते. अशा आकाशाकडे पाहता पाहता तुम्हाला असे वाटू लागते की, आपण या अनंत अवकाशात, तारका, ग्रह यांच्या मधील अवकाशात तरंगत आहोत. पुढे पुढे जाण्यासाठी तुम्ही अधिकाधिक विशाल होत जाता. काही जण अशा रीतीने विशाल होण्यात यशस्वी होतात.

– श्रीमाताजी [CWM 06 : 344-345]

विचारशलाका – ०२

‘योग’ हे असे एक साधन आहे की, ज्याद्वारे आपल्याला, बहिर्वर्ती आणि व्यक्त चेतनेकडून आंतरिक आणि सत्य चेतनेप्रत घेऊन जाण्यात येते आणि त्याद्वारे आंतरिक साधनेच्या माध्यमातून आपण वस्तुमात्रांमागील ‘सत्या’शी एकत्व पावण्याप्रत येऊन पोहोचतो.

योग-चेतना (Yogic Consciousness) बाह्य व्यक्त विश्वाच्या ज्ञानाकडे दुर्लक्ष करते, असे नाही तर उलट, ती त्या विश्वाकडे अंतर्दृष्टीने पाहते. ती विश्वाकडे बाह्य दृष्टीने पाहत नाही किंवा त्याचा बाह्य अनुभवही घेत नाही तर ती आंतरिक सखोल, महत्तर, सत्यतर चेतनेच्या प्रकाशात बाह्य विश्वाला त्याचे योग्य ते मूल्य प्रदान करते, त्यात परिवर्तन घडविते. आणि त्याला सद्वस्तुचा ‘कायदा’ लागू करते; प्राणिमात्रांच्या ‘अज्ञानी’ कायद्याच्या जागी ईश्वरी ‘संकल्प’ आणि ‘ज्ञाना’चा नियम प्रस्थापित करते.

चेतनेमधील (Consciousness) बदल हाच योगप्रक्रियेचा समग्र अर्थ होय.

– श्रीअरविंद [CWSA 12 : 327]

विचारशलाका – ०१

जेव्हा आपली चेतना बदलेल तेव्हा परिवर्तन म्हणजे काय ते आपल्याला कळेल.

*

‘परिवर्तन’ म्हणजे नक्की काय?…

द्वेषाचे परिवर्तन सुसंवादामध्ये

मत्सराचे परिवर्तन औदार्यामध्ये

अज्ञानाचे परिवर्तन ज्ञानामध्ये

अंधकाराचे परिवर्तन प्रकाशामध्ये

असत्याचे परिवर्तन सत्यामध्ये

दुष्टपणाचे परिवर्तन चांगुलपणामध्ये

युद्धाचे परिवर्तन शांतीमध्ये

भीतीचे परिवर्तन निर्भयतेमध्ये

अनिश्चिततेचे परिवर्तन निश्चिततेमध्ये

संशयाचे परिवर्तन श्रद्धेमध्ये

गोंधळाचे परिवर्तन व्यवस्थेमध्ये

पराभवाचे परिवर्तन विजयामध्ये.

– श्रीमाताजी [CWM 15 : 223]

आध्यात्मिकता ४५

(चेतना विशाल कशी करावी, या प्रश्नावर उत्तर देताना श्रीमाताजींनी आधी काही मार्ग सांगितले आणि त्या आता येथे त्याचा बौद्धिक मार्ग सांगत आहेत…)

तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टीचा कंटाळा आलेला असतो, तुम्हाला एखादी गोष्ट वेदनादायी किंवा अगदी असुखद वाटत असते, अशा वेळी जर तुम्ही काळाच्या (time) अनंततेचा आणि अवकाशाच्या (space) असीमतेचा विचार करायला सुरुवात केलीत, आजवर जे काही घडून गेले आहे आणि येथून पुढे जे घडणार आहे, त्याचा तुम्ही विचार केलात आणि आत्ताचा क्षण हा अनंत काळामधील खरोखरच एका उच्छ्वासाइतकाच आहे असा तुम्ही विचार केलात तर, काळाच्या अनंततेमध्ये असणाऱ्या या एका एवढ्याशा क्षणामुळे अस्वस्थ होणे हे तुम्हाला अगदीच हास्यास्पद वाटू लागेल. …खरोखरच, काळाच्या अनंततेमध्ये एका क्षणाचे मोल ते काय? खरोखरच व्यक्तीला हे प्रत्यक्षात उतरवता आले तर….

डोळ्यांसमोर दृश्य उभे करा, ज्या इवल्याशा पृथ्वीवर आपण वावरत असतो, ते आपण म्हणजे एक किती किरकोळ व्यक्ती आहोत, आणि त्यामध्ये चेतनेचा हा एक चिमुकला क्षण, जो आत्ता तुम्हाला त्रासदायक ठरतो आहे किंवा तुम्हाला तो असुखद वाटत आहे तो डोळ्यांसमोर आणा. वास्तविक, हा क्षण तुमच्या अस्तित्वाचा देखील एक अगदी छोटासा क्षण आहे. आणि खुद्द तुम्हीसुद्धा यापूर्वी अनेक जीवयोनींमधून येथवर आलेला असता आणि यापुढेही अनेक गोष्टी घडायच्या असतात. तेव्हा ज्या गोष्टी आत्ता तुमच्यावर एवढा परिणाम करत आहेत त्या अजून दहा वर्षांनी तुम्ही कदाचित पूर्णपणे विसरून गेला असाल किंवा जरी अगदी त्या आठवल्याच तर तुम्ही स्वतःच म्हणाल की, “मी या गोष्टीला इतके महत्त्व का दिले होते बरे?”

तुम्हाला खरोखरच जाणवू लागते… आपल्या जीवनाला, स्वतःला आणि आपल्याबाबतीत जे घडते आहे त्याला इतके महत्त्व देणे, हे किती हास्यास्पद आहे हे तुम्हाला जाणवू लागते. आणि तुम्ही जर ही गोष्ट अगदी सुयोग्य रीतीने केलीत तर, अगदी तीन मिनिटांच्या अवधीमध्ये, सारे दुःख नाहीसे होईल. इतकेच काय पण एखादी अगदी तीव्र वेदनासुद्धा या पद्धतीने नाहीशी होईल. आत्ता सांगितले त्याप्रमाणे एकाग्रता करायची आणि स्वतःला अनंताच्या आणि काळाच्या पटलावर ठेवायचे. सारे काही निघून जाते. आणि व्यक्ती शुद्ध होऊन बाहेर पडते. ही गोष्ट योग्य पद्धतीने कशी करायची हे माहीत असेल तर, व्यक्ती सर्व आसक्तीपासून, आणि अगदी निरतिशय दुःखामधून, सर्व गोष्टींमधून अशा पद्धतीने बाहेर पडू शकते. ही पद्धत तुम्हाला तुमच्या क्षुद्र अहंकारामधूनसुद्धा त्वरित बाहेर काढते.

– श्रीमाताजी [CWM 06 : 345-346]