Tag Archive for: कृतज्ञता

कृतज्ञता – १३

आपल्या अस्तित्वाची प्रत्येक कृती, प्रत्येक क्षण म्हणजे त्या ‘शाश्वता’प्रत सातत्यपूर्वक चाललेले श्रद्धायुक्त आत्मदान असले पाहिजे. आपल्या साऱ्या कृती, मग त्या अगदी महान, असामान्य आणि उदात्त असल्या काय, नाहीतर अगदी किरकोळ, अगदी सर्वसामान्य आणि क्षुल्लक असल्या काय, त्या साऱ्या कृती या ‘आत्मनिवेदित कृती’ (consecrated acts) म्हणून सादर केल्या पाहिजेत. आपल्या व्यक्तिगत प्रकृतीने अशा एकमेव चेतनेमध्ये निवास केला पाहिजे की, जिच्या साऱ्या आंतरिक आणि बाह्य गतिविधी या आपल्या अहंकाराहून श्रेष्ठ आणि आपल्या अतीत असणाऱ्या ‘कोणत्या तरी गोष्टीप्रत’ अर्पित केलेल्या असतील. आपण काय प्रदान करतो किंवा आपण ते कोणाला प्रदान करतो या गोष्टी फारशा महत्त्वाच्या नाहीत, तर त्या गोष्टी आपण सर्व जीवजातामध्ये अंतर्हित असणाऱ्या एकमेव ईश्वरी अस्तित्वालाच अर्पण करत आहोत, ही चेतना आपल्या कृतीमध्ये असली पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 111)

कृतज्ञता – १२

(श्रीअरविंद येथे यज्ञबुद्धीने केलेल्या अर्पणाबद्दल सांगत आहेत.) हे अर्पण कोणा व्यक्तींना केलेले असेल, ‘ईश्वरी शक्तीं’ना केलेले असेल, ते ‘विश्वात्मक ईश्वरा’ला केलेले असेल किंवा विश्वातीत असणाऱ्या ‘परमेश्वरा’ला केलेले असेल. त्याचप्रमाणे अर्पण केलेली वस्तू म्हणजे एखादे पान असेल, फुल असेल, पाणी असेल, मुठभर धान्य असेल, अन्नधान्य असेल, किंवा आपल्यापाशी जे जे काही आहे त्या सर्वाचे अर्पण असेल, अगदी सर्वस्वाचे अर्पण असेल. स्वीकारणारे कोणीही असू दे, अर्पण म्हणून दिलेली वस्तू कोणतीही असू दे, अगदी नजीकच्या स्वीकारकर्त्याने जरी ती गोष्ट अव्हेरली किंवा दुर्लक्षित केली तरीही, त्या गोष्टीचे ग्रहण करणारा आणि तिचा स्वीकार करणारा, वस्तुमात्रामध्ये ‘शाश्वत’ रूपाने वसणारा ‘परमेश्वर’च असतो. विश्वाच्या अतीत असणारा जो परमेश्वर, तो येथेसुद्धा आहे, मग तो भले कितीही परिवेष्टित (veiled) का असेना, तो आपल्यामध्ये आहे, या विश्वामध्ये आहे आणि विश्वाच्या घडामोडीमध्येसुद्धा तो आहे. तो येथे सर्वसाक्षी ‘साक्षीदार’ या नात्याने उपस्थित आहे आणि तोच आपल्या सर्व कर्मांचा ‘ग्रहणकर्ता’ आणि आपल्या सर्व कर्मांचा गुप्त ‘स्वामी’ आहे. आपल्या साऱ्या कृती, आपले सारे प्रयत्न, इतकेच काय पण आपली पापं आणि आपले अडखळणे, आपले दुःखकष्ट, आपले संघर्ष या साऱ्या गोष्टी जाणते-अजाणतेपणे, ज्ञात-अज्ञातपणे, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे, अंतिमतः त्या ‘एका ईश्वरा’कडूनच संचालित होतात. त्याच्या अगणित रूपांद्वारे सारे काही ईश्वराभिमुखच झालेले असते आणि त्या असंख्य रूपांच्या माध्यमातून सारे काही त्या ‘सर्वव्यापी’ असलेल्या एकमेवाद्वितीय परमेश्वरालाच अर्पण होत असते. आपण कोणत्याही रूपाच्या माध्यमातून, कोणत्याही भावाने त्याच्याकडे गेलो तरीही, त्या त्या रूपाच्या माध्यमातून, आणि त्या त्या भावाने तो ईश्वरच आपल्या यज्ञाचा स्वीकार करतो.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 110)

कृतज्ञता – ११

कृतघ्नता ही एक अशी गोष्ट आहे की, जी मला नेहमीच अतिशय वेदनादायक वाटत आली आहे. कृतघ्नता अस्तित्वातच कशी राहू शकते हे मला वेदनादायक वाटते. माझ्या जीवनात बघितलेल्या सर्व गोष्टींपैकी ही एक अशी गोष्ट आहे की जी सर्वाधिक असह्य अशी आहे. ‘ईश्वरा’बद्दलची ही एक प्रकारची विखारी कटुता आहे.

…कृतघ्नता ही ‘मना’च्या बरोबरीने उदयाला आली. प्राण्यांमध्ये ती आढळत नाही. आणि म्हणूनच मला प्राण्यांमध्ये एक प्रकारचा गोडवा जाणवतो, अगदी जे अतिशय क्रूर समजले जातात त्यांच्यामध्येसुद्धा तो गोडवा असतो, जो मनुष्यामध्ये नसतो.

आणि तरीही सर्व गतिविधींमध्ये, कदाचित सर्वाधिक आनंद देणारी – अहंकाराने न डागाळलेला असा निष्कलंक, निर्भेळ आनंद देणारी एक गोष्ट म्हणजे ‘उत्स्फूर्त कृतज्ञता’.

ती काहीतरी एक खास अशी गोष्ट असते. ते प्रेम नसते, ते आत्मार्पणही नसते… तो एक अतीव ‘परिपूर्ण’ असा आनंद असतो, अगदी परिपूर्ण आनंद. त्याच्यासारखे तेच असे ज्याला म्हणता येईल असे ते एक खास स्पंदन असते. ती एक अशी गोष्ट असते की जी तुम्हाला व्यापक बनवते, ती तुम्हाला भारून टाकते, ती अतिशय उत्कट असते.

मानवी चेतनेच्या आवाक्यात असणाऱ्या सर्व गतिविधींपैकी, ही खरोखरच एक अशी गोष्ट आहे की, जी तुम्हाला तुमच्या अहंकारापासून सर्वांत जास्त बाहेर खेचून काढते.

आणि जेव्हा ही कृतज्ञता निर्हेतुक असते तेव्हा, कृतज्ञतेच्या त्या स्पंदनामुळे अनेक मोठे अडथळे क्षणार्धात नाहीसे होऊ शकतात.

– श्रीमाताजी
(Conversations with a disciple: December 21, 1963)

कृतज्ञता – १०

काही जण असे असतात की, ज्यांच्यामध्ये उपजतच कृतज्ञतेची एक शक्ती असते; या समग्र जीवनाच्या पाठीमागे एक आश्चर्यकारक गोष्ट दडलेली आहे अशी त्यांची समजूत असते, आणि त्या गोष्टीप्रत, आत्मीयतेने, भक्तीने, आनंदाने प्रतिक्रिया देण्याची, प्रतिसाद देण्याची एक उत्कट गरज त्यांना भासते. अगदी छोट्यात छोट्या अशा गोष्टीमागे, जीवनातील अगदी लहानशा घटनेमागे, ज्यांना त्या ईश्वराची अनंत ‘कृपा’ किंवा सार्वभौम सौंदर्य जाणवते अशा लोकांमध्ये त्या ईश्वराप्रत एक प्रकारची कृतज्ञतेची भावना असते.

मला अशी काही माणसं माहीत आहेत की, ज्यांना फारसे काही ज्ञान नव्हते, म्हणजे ते फार शिकलेले होते असे नाही, त्यांची मने अगदीच सर्वसाधारण म्हणता येतील अशी होती परंतु त्यांच्याकडे ही आत्मीयतेची, कृतज्ञतेची क्षमता होती; ज्यामुळे ते सर्व काही देऊ करण्यास तयार असत, ज्यामुळे त्यांना समज येत असे आणि ते कृतज्ञ असत.

अशा व्यक्तींचा, त्यांच्या अंतरात्म्याशी वारंवार संपर्क (Psychic contact) होत असे, तो जवळजवळ नेहमीचाच झाल्यासारखा असे. त्या व्यक्ती जेवढ्या प्रमाणात सक्षम असत, जेवढ्या प्रमाणात सजग असत (अगदी खूप सजग असेसुद्धा नाही, थोड्याशा सजग असल्या तरीसुद्धा) तेवढ्या प्रमाणात त्यांचे उन्नयन झाल्यासारखे, त्यांना कोणीतरी उचलून घेतल्याचे, काहीतरी साहाय्य मिळाल्याचे अशा व्यक्तींना जाणवत असे.

कृतज्ञतेची ही भावना तुम्हाला तुमच्या क्षुद्र आणि त्रासदायक अशा अहंकारातून बाहेर काढत असते. …स्वत:च्या चैत्य पुरुषामध्ये वसलेल्या ‘ईश्वरा’च्या संपर्कात येण्यासाठीची ही अतिशय शक्तिशाली तरफ (lever) आहे. चैत्य पुरुषाशी जोडणारा एक खात्रीशीर धागा म्हणून ती कार्य करते.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 418-419)

कृतज्ञता – ०९

‘ईश्वरा’कडून जी ‘कृपा’ प्राप्त झालेली असते त्याबद्दलची स्नेहार्द्र जाणीव म्हणजे कृतज्ञता.

‘ईश्वरा’ने आजवर तुमच्यासाठी जे केले आहे आणि तो आजही तुमच्यासाठी जे करत आहे त्याची एक विनम्र जाणीव म्हणजे कृतज्ञता.

कृतज्ञता म्हणजे ‘ईश्वरा’प्रति दायित्वाची अशी एक उत्स्फूर्त भावना असते की जी तुम्हाला – ‘ईश्वर’ तुमच्यासाठी जे काही करत आहे त्याला तुम्ही अपात्र ठरू नये म्हणून – सर्वोत्तम तेच करायला भाग पाडते.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 154)

कृतज्ञता – ०७

प्रश्न : माझ्या मनात नेहमीच असा विचार येतो की, माताजी मी तुमच्यापाशी माझी कृतज्ञता कशी व्यक्त करू?

श्रीमाताजी : माझ्याप्रति तशी (कृतज्ञता व्यक्त करण्याची) तसदी कोणीच घेत नाही. जेव्हा कधी एखादी अडचण येते, एखादा अडथळा येतो, किंवा एखादा आघात होतो तेव्हा लगेच माझ्यापाशी प्रार्थना केली जाते, मदतीची अशी याचना केली जाते की, “कृपा करून मला वाचवा. कृपा करून मला संरक्षण द्या.” किंवा अडचणींवर मात करण्याच्या हेतुनेसुद्धा अशी विनवणी केली जाते की, “माताजी, आम्हाला साहाय्य करा, आमचे संरक्षण करण्यासाठी तुमच्या हातांचा आधार द्या. तुमचा करुणावर्षाव आमच्यावर होऊ द्या. आमच्यावर दया करा.”

आणि मग जेव्हा ईश्वरी ‘कृपे’ने तिचे कार्य पूर्ण केलेले असते… मी त्यांच्यासाठी ज्या हजारो गोष्टी सातत्याने करत असते त्याबद्दल ते कधीच कृतज्ञतेचा एक शब्दही उच्चारात नाहीत. मी जेव्हा त्यांचे रक्षण करते, किंवा त्यांच्यासाठी एखाद्या अडचणीवर मात करते, त्यानंतर मात्र एकही शब्द नसतो… ईश्वरी ‘कृपे’ ने जेव्हा त्यांच्यासाठी सारे काही केलेले असते म्हणजे त्यांना वाचविलेले असते, त्यांचे संरक्षण केलेले असते आणि सर्व अडचणींवर मात केलेली असते तेव्हा खालून कृतज्ञतेचा एक शब्दही ईश्वरी ‘कृपे’ बाबत उच्चारला जात नाही. त्यांना लगेचच विसर पडलेला असतो. ज्या प्रचंड ईश्वरी शक्तीने त्यांना संकटातून बाहेर खेचून काढले, त्या शक्तीविना ते कसे काय वाचू शकले असते किंवा ते कसे काय सुरक्षित राहू शकले असते, शांत कसे राहू शकले असते? पण याने त्यांना काहीच फरक पडत नाही. त्यांना पूर्ण विसर पडलेला असतो आणि त्यांच्यावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नसतो, ज्या महान अद्भुत अपूर्व गोष्टीने त्यांना वाचविलेले असते, त्याची त्यांना साधी आठवणदेखील नसते. कृतज्ञतेचा दृष्टिकोन खरोखर अगदी दुर्लक्षित आहे, कृतज्ञतेची कृती या जगात शोधण्यात अर्थ नाही. किमान हे मात्र नक्की की, कृतज्ञता ही अगदी दुर्मिळ गोष्ट आहे.

– श्रीमाताजी
(The Supreme : 59-60)

कृतज्ञता – ०६

‘कृतज्ञता’ ही एक आंतरात्मिक भावना आहे आणि जे जे काही आंतरात्मिक असते ते आत्म्याला विकसित होण्यासाठी साहाय्य करते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहता भावनांमध्ये गैर असे काही नाही. फक्त एवढेच की त्या भावना (अध्यात्म) मार्गावरील बंधन ठरता कामा नयेत.

– श्रीअरविंद
(SABCL 24 : 1768)

कृतज्ञता – ०५

कृतज्ञतेचे प्रकार :

‘ईश्वरी कृपे’च्या तपशीलांविषयी आपल्यामध्ये जागरूकता निर्माण करणारी जी कृतज्ञता असते ती म्हणजे ‘तपशीलवार कृतज्ञता’.

जिच्याद्वारे आपले संपूर्ण अस्तित्व, स्वतःला पूर्ण विश्वासानिशी, त्या ‘प्रभू’पाशी समर्पित करते, ती असते ‘परिपूर्ण कृतज्ञता’.

मनाची अशी कृतज्ञता की जिच्यामुळे मन प्रगती करू शकते ती म्हणजे ‘मानसिक कृतज्ञता’

– श्रीमाताजी
(CWM 14 : 154)

कृतज्ञता – ०४

करुणा आणि कृतज्ञता हे मूलत: चैत्य गुण आहेत. चैत्य पुरुष जेव्हा सक्रिय जीवनामध्ये भाग घेऊ लागतो तेव्हाच चेतनेमध्ये हे गुण प्रकट होऊ लागतात. वास्तविक हे गुण सामर्थ्यशक्तीवर आधारित असतात परंतु, मन व प्राणाला हे गुण म्हणजे दुबळेपणा आहे असे वाटते. कारण ते मनाच्या आणि प्राणाच्या आवेगांना स्वैरपणे प्रकट होण्यापासून रोखतात.

पुरेसे शिक्षित नसलेले मन, हे बहुधा नेहमीच प्राणाचे साथीदार असते आणि शारीर प्रकृतीचे गुलाम असते आणि अशा मनाचे कायदे प्राणाच्या व शरीराच्या अर्धजागृत यंत्रणेमध्ये इतके काही बळकट असतात की, त्यांना करुणा आणि कृतज्ञता या गुणांचा अर्थच नेमकेपणाने समजत नाही. जेव्हा मन प्रथमत: चैत्य हालचालींविषयी जागृत होऊ लागते तेव्हा स्वत:च्या अज्ञानामुळे त्या हालचालींचा ते पार विपर्यास करून टाकते आणि करुणेचे रूपांतर दया किंवा कणव यांमध्ये करून टाकते किंवा फार फार तर त्याचे रूपांतर भूतदयेमध्ये करते. कृतज्ञतेचे रूपांतर परतफेडीच्या इच्छेमध्ये करते…

जेव्हा व्यक्तीमध्ये चैत्य जाणीव ही पूर्णपणे प्रभावी झालेली असते तेव्हाच फक्त ज्या ज्या कोणाला मदतीची गरज भासते, त्या व्यक्तींविषयी तिला करुणा वाटते; मग ती मदत कोणत्याही क्षेत्रातली का असेना. तसेच ज्या कोणत्या गोष्टीमधून ईश्वरी अस्तित्वाची आणि कृपेची अभिव्यक्ती होते अशा सर्व गोष्टींविषयी, मग त्या गोष्टी कोणत्याही रूपामध्ये असू देत, त्या जर त्यांच्या अगदी मूळरूपात आणि तेजोमय शुद्धतेने अभिव्यक्त होत असतील तर, कोणत्याही मेहेरबानीचा लवलेशही नसलेली अमिश्रित अशी करुणा किंवा न्यूनगंडाची कोणतीही भावना नसलेली अशी कृतज्ञता, (चैत्य जाणीव प्रभावी झालेल्या व्यक्तीमध्ये) आढळून येते.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 277)

कृतज्ञता – ०३

(‘ईश्वरी साक्षात्कारा’साठी जीवन समर्पित करण्याचा निश्चय) या निश्चयाशी निष्ठा राखायची असेल तर व्यक्तीने प्रामाणिक, एकनिष्ठ, विनम्र आणि आत्मनिवेदनाप्रत (consecration) कृतज्ञ असले पाहिजे, कारण हे गुण सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी अनिवार्य आहेत आणि एक स्थिर आणि वेगवान प्रगती ही प्रकृतीच्या उत्क्रांतिमय प्रगतीच्या वेगाचे अनुसरण करण्यासाठी अनिवार्य असते. हे गुण नसतील तर कधीकधी व्यक्तीमध्ये प्रगतीचा आभास निर्माण होऊ शकेल पण तो केवळ बाह्य दिखावाच असेल, ते एक ढोंग असेल आणि पहिल्या वेळीच तो डोलारा कोलमडून पडेल.

‘प्रामाणिक’ असण्यासाठी, अस्तित्वाचे सारे भाग हे ईश्वराविषयीच्या अभीप्सेमध्ये (Aspiration) संघटित झाले पाहिजेत – एक भाग आस बाळगत आहे आणि इतर भाग नकार देत आहेत किंवा अभीप्सेशी प्रामाणिक राहण्याबाबत बंडखोरी करत आहेत, असे असता कामा नये – ईश्वर हा प्रसिद्धीसाठी किंवा नावलौकिकासाठी किंवा प्रतिष्ठेसाठी किंवा सत्तेसाठी, शक्तीसाठी किंवा बढाईच्या समाधानासाठी नव्हे तर, ईश्वर हा ‘ईश्वरा’साठीच हवा असला पाहिजे, आत्मनिवेदनाबाबत अस्तित्वाच्या साऱ्या घटकांनी एकनिष्ठ आणि स्थिर असले पाहिजे म्हणजे एक दिवस श्रद्धा बाळगली आणि दुसऱ्या दिवशी, आपल्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत त्यामुळे श्रद्धा गमावली आणि सर्व प्रकारच्या शंकाकुशंकांनी मनात घर केले, असे होता कामा नये. शंका म्हणजे व्यक्तीने ज्यामध्ये रममाण व्हावे असा एखादा खेळ नाही; तर ते एक असे विष आहे की, जे आत्म्याला कणाकणाने क्षीण करत नेते.

आपण कोण आहोत याचे व्यक्तीला अचूक भान असणे आणि आपल्याला कितीही गोष्टी साध्य झालेल्या असल्या तरीही ‘आपण काय असले पाहिजे’ अशी ईश्वराची आपल्याकडून अपेक्षा आहे, तिच्या परिपूर्तीच्या तुलनेत, आपल्याला साध्य झालेल्या गोष्टी व्यवहारतः अगदी नगण्य आहेत, हे कधीही न विसरणे तसेच, ईश्वराचे व त्याच्या मार्गांचे मूल्यमापन करण्यासाठी आपण अक्षम असतो, याची पुरेपूर खात्री असणे म्हणजे ‘विनम्र’ असणे होय.

एखादी व्यक्ती जशी आहे तशी, म्हणजे तिचे अज्ञान, तिचे समज-गैरसमज, तिचा अहंकार, त्या व्यक्तीचा विरोध, त्या व्यक्तीची बंडखोरी अशा गोष्टी असूनदेखील, परमेश्वराची अद्भुत कृपा त्या व्यक्तीला तिच्या ईश्वरी उद्दिष्टाप्रत अगदी जवळच्या मार्गाने घेऊन जात असते. या अद्भुत कृपेचे कधीही विस्मरण होऊ न देणे म्हणजे ‘कृतज्ञ’ असणे होय.

– श्रीमाताजी
(The Aims And Ideals of The Sri Aurobindo Ashram : 16-17)