Tag Archive for: कर्म

कर्म आराधना – १९

केवळ एक सर्वसाधारण दृष्टिकोन असून चालणार नाही तर, प्रत्येक कर्मच ‘दिव्य माते’ला अर्पण केले पाहिजे म्हणजे मग तो दृष्टिकोन सदासर्वदा जिवंत राहील.

काम करत असताना त्या वेळामध्ये ध्यान करता कामा नये, कारण त्यामुळे कामामधून लक्ष निघून जाईल, परंतु ज्याच्याप्रत तुम्ही ते कर्म अर्पण करणार आहात त्या ‘एकमेवाद्वितीय’ ईश्वराचे स्मरण मात्र तुमच्यामध्ये कायम असले पाहिजे.

ही केवळ एक पहिली प्रक्रिया आहे; कारण, पृष्ठवर्ती मन (surface mind) जेव्हा कर्म करत असते तेव्हा, ‘ईश्वरी उपस्थिती’च्या संवेदनेवर तुमच्या अंतरंगातील शांत अस्तित्व एकाग्र असल्याची सातत्यपूर्ण जाणीव जर तुम्हाला असेल, किंवा दिव्य ‘माते’ची शक्तीच कार्य करत आहे आणि तुम्ही केवळ एक माध्यम आहात किंवा एक साधन आहात अशी जाणीव जर तुम्हाला नेहमीच होऊ लागली तर मग, ईश-स्मरणाच्या जागी, ‘योग’साक्षात्कार आपोआपच नित्य घडू लागेल, कर्मामध्ये दिव्य ऐक्य होण्यास सुरुवात होईल.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 247)

कर्म आराधना – १८

(भगवद्गीता ही प्राणिक इच्छांवर मानसिक नियंत्रणाचा नियम सांगून थांबत नाही, तर ती अमर्त्य आत्म्याची अचलता प्रतिपादित करते.)

सर्व परिणामांबाबत, सर्व प्रतिक्रियांबाबत, सर्व घटनांबाबत ‘मनाची आणि हृदयाची संपूर्ण समता’ ही कसोटी असल्याचे भगवद्गीता सांगते. सद्भाग्य असो वा दुर्भाग्य, सन्मान असो वा अपमान, कीर्ती असो वा दुष्कीर्ती, जय असो वा पराभव, सुखद असोत किंवा दुःखद घटना, या गोष्टी आपल्याला हादरवून टाकत नसतील, इतकेच नव्हे तर त्याचा स्पर्शही जर आपल्याला होत नसेल, भावभावनांपासून आपण मुक्त असू, मज्जागत प्रतिक्रियांपासून आपण मुक्त असू, मानसिक दृष्ट्या आपण मुक्त असू, अस्वस्थ न होता वा आपल्या प्रकृतीमध्ये कोणतेही स्पंदन उत्पन्न होऊ न देता जर आपण त्याला प्रतिसाद देत असू, तर मग ‘गीता’ आपल्याला जिचा निर्देश करते ती संपूर्ण मुक्ती आपल्याला लाभलेली आहे, असा त्याचा अर्थ होतो, अन्यथा नाही. (आपली) अगदी बारीकशीही प्रतिक्रिया ही साधना अपूर्ण असल्याचे द्योतक आहे आणि आपल्यामधील काही भाग अज्ञान आणि बंध हा त्यांचा धर्म आहे असे मानत असल्याचे तसेच, तो भाग अजूनही जुन्या प्रकृतीलाच चिकटून असल्याचे द्योतक आहे. आपला आत्म-जय हा अजूनही आंशिक रीतीनेच साध्य झाला आहे आणि आपल्या प्रकृतीच्या भूमीमधील एखादा अल्पसा कण, किंवा एखादा भाग किंवा काही प्रदेश हा अजूनही अपूर्ण आहे वा अ-वास्तव आहे, याचे ते निदर्शक आहे. आणि अपूर्णतेचा तो छोटासा कण आपल्या ‘योगा’ची सारी सिद्धी मातीमोल करू शकतो.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 103)

कर्म आराधना – १७

आपल्या प्रयत्नासाठी काही अटी आहेत आणि त्या अटी एका आदर्शाकडे निर्देश करतात. हा आदर्श पुढील सूत्रांत व्यक्त करता येईल.

‘ईश्वरा’त राहावे, अहंभावात राहू नये; लहानशा, अहंभावी जाणिवेत राहून नव्हे; तर ‘सर्वात्मक व सर्वातीत’ पुरुषाच्या चेतनेत राहून, विशाल पायावर ठामपणे सुस्थिर होऊन जीवन जगावे.

सर्व प्रसंगी व सर्व जिवांशी पूर्ण समत्वबुद्धीने वागावे; आपले स्वत:बरोबर आणि आपले ‘ईश्वरा’बरोबर जसे वर्तन असते त्याप्रमाणे, आपण इतरांकडे पाहावे व त्यांना जाणून घ्यावे. आपल्या स्वत:मध्ये इतर सर्वांना पाहावे व सर्वांना ‘ईश्वरा’मध्ये पाहावे; आणि ‘ईश्वर’ सर्वांमध्ये आहे, आपणही इतर सर्वांमध्ये आहोत, ही जाणीव बाळगावी.

अहंभावात राहून नव्हे; तर ‘ईश्वरा’त निमग्न राहून कर्म करावे. आणि या ठिकाणी पहिली गोष्ट ही ध्यानात ठेवावी ती अशी की, वैयक्तिक गरजा वा वैयक्तिक आदर्शाकडे लक्ष ठेवून कृतीची निवड करायची नाही; तर आपल्या ऊर्ध्वस्थित असणारे असे जे जिवंत सर्वोच्च ‘सत्य’ आहे त्याची आज्ञा असेल त्यानुसार कृतीची निवड करायची. दुसरी गोष्ट, आपल्या आध्यात्मिक चेतनेची बैठक पुरेशी तयार झाली म्हणजे मग, आपल्या स्वत:च्या स्वतंत्र इच्छेने वा विचाराने, कृती करायची नाही; तर आपल्या पलीकडे असलेल्या ईश्वरी ‘इच्छे’चे मार्गदर्शन आणि प्रेरणा यांच्या प्रभावाने जी कृती आपल्या हातून घडेल, वाढेल अशा पद्धतीने ती अधिकाधिक प्रमाणात घडू द्यायची, वाढू द्यायची. आणि शेवटी या साधनेचा श्रेष्ठ परिणाम : आपण स्वतःला उन्नत करून ‘ईश्वरी शक्ती’शी एकरूप व्हायचे; ज्ञान, शक्ती, जाणीव, कृती आणि अस्तित्वाचा आनंद या सर्व बाबतीत आपण ईश्वरी शक्तीशी एकरूप व्हावयाचे; आपली क्रियाशीलता मृत्युवश मानवी वासनेने, प्राणिक प्रेरणेने, भ्रामक मानसिक ‘स्वतंत्र’ इच्छेने प्रेरित व शासित होत नसून, ती अमृत आत्मानंद आणि अनंत आत्मज्ञान यांच्या प्रेरणेने, स्वच्छ ज्ञानाच्या प्रकाशात योजली जात आहे आणि विकसित होत आहे, ही जाणीव व भावना आपल्या ठिकाणी स्थिर करायची. कारण ही अशी कृती असते की जी, प्राकृतिक मनुष्य हा दिव्य ‘आत्म्या’च्या आणि शाश्वत ‘चैतन्या’च्या जाणीवपूर्वकपणे आधीन झाल्याने आणि दिव्य ‘आत्म्या’मध्ये आणि शाश्वत ‘चैतन्या’मध्ये विलीन झाल्याने घडून येते; हेच ‘चैतन्य’ विश्व-‘प्रकृती’ला मार्गदर्शन करत असते आणि ते कायमच तिच्या अतीत असते.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 101)

कर्म आराधना – १६

अज्ञान आणि अहंभावातून केलेल्या कृतीला, जी कृती अहंकाराच्या समाधानासाठी आणि राजसिक इच्छेच्या प्रेरणेपोटी केली जाते त्या कृतीला मी ‘कर्म’ असे संबोधत नाही. अज्ञानाचा जणू शिक्काच असणाऱ्या अहंकार, राजसिकता आणि इच्छावासना यांपासून सुटका करून घेण्याचा संकल्प असल्याखेरीज ‘कर्मयोग’ घडूच शकत नाही.

परोपकार किंवा मानवतेची सेवा किंवा तत्सम अनेकानेक गोष्टी – नैतिक किंवा आदर्शवादी अशा इतर सर्व गोष्टी – ज्या गोष्टी या कार्याच्या गहनतर सत्याला पर्यायी आहेत, असे मानवी मन मानते, ते सुद्धा माझ्या दृष्टीने ‘कर्म’ या संज्ञेला पात्र ठरत नाही.

जी कृती ‘ईश्वरा’ साठी केली जाते, जी ‘ईश्वरा’शी अधिकाधिक एकत्व पावून केली जाते आणि अन्य कशासाठीही नाही तर, केवळ ‘ईश्वरा’साठीच केली जाते अशा कृतीला मी ‘कर्म’ असे संबोधतो. साहजिकच, ही गोष्ट प्रारंभी तितकीशी सोपी नसते; गहन चिंतन आणि प्रदीप्त ज्ञान यांच्यापेक्षा ते काही कमी सोपे नसते, किंबहुना खरेखुरे प्रेम आणि भक्ती या गोष्टी अधिक सोप्या असतात. पण त्या इतर गोष्टींप्रमाणेच (कर्म) या गोष्टीची सुरुवात देखील तुम्ही सुयोग्य वृत्ती आणि दृष्टिकोन बाळगून केली पाहिजे, तुमच्यामधील सुयोग्य इच्छेनिशी ही गोष्ट करण्यास तुम्ही प्रारंभ केला पाहिजे, अन्य गोष्टी त्यानंतर घडून येतील.

अशा वृत्तीने केलेले ‘कर्म’ हे भक्ती किंवा ध्यान यांच्याइतकेच प्रभावी ठरू शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 216-217)

कर्म आराधना – १५

कौशल्यपूर्ण हात, स्वच्छ दृष्टी, एकाग्र अवधान, अथक चिकाटी या गोष्टी व्यक्तीपाशी असताना व्यक्ती जे काही करेल ते उत्कृष्टच असेल.
*
कौशल्यपूर्ण हात, काटेकोर काळजी, टिकून राहणारे अवधान या गोष्टी ज्या व्यक्तीकडे असतील ती व्यक्ती ‘जडभौतिका’ला ‘चैतन्या’च्या आज्ञा पाळण्यास भाग पाडते.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 308)

कर्म आराधना – १४

एका नवीन गोष्टीच्या उभारणीसाठी आधीची गोष्ट मोडावी लागणे हे काही चांगले धोरण नव्हे. जे समर्पित झालेले आहेत आणि जे ‘ईश्वरा’साठी कार्य करू इच्छितात त्यांनी धीर धरला पाहिजे आणि गोष्टी योग्य क्षणी व योग्य पद्धतीने करण्यासाठी, वाट कशी पाहावी हे त्यांनी जाणून घेतले पाहिजे.
*
एखादे कार्य हाती घ्यायचे आणि ते तसेच अर्धवट सोडून द्यायचे आणि पुन्हा एखादे नवीन कार्य करायला लागायचे, ही काही तितकीशी हितकर सवय नाही.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 306)

कर्म आराधना – १३

कर्मामध्ये सुव्यवस्था आणि सुमेळ असला पाहिजे. वरकरणी पाहता जी गोष्ट अगदीच सामान्य वाटते ती गोष्टसुद्धा अगदी परिपूर्ण पूर्णतेने, स्वच्छतेच्या, सौंदर्याच्या, सुमेळाच्या भावनेने आणि व्यवस्थितपणाने केली पाहिजे.
*
कर्मामध्ये ‘परिपूर्णते’ची आस बाळगणे ही खरी आध्यात्मिकता.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 305-306)

कर्म आराधना – १२

‘ईश्वरी शक्ती’प्रत स्वतःला अधिकाधिक खुले करा म्हणजे मग तुमचे कर्म हळूहळू परिपूर्णत्वाच्या दिशेने प्रगत होत राहील.
*
‘ईश्वरा’च्या कार्याचे एक परिपूर्ण साधन बनण्यासाठी आपण सातत्याने आस बाळगूया.
*
कर्मातील परिपूर्णत्व हाच तुमचा आदर्श असला पाहिजे, असे झाले तर तुम्ही ‘ईश्वरा’चे सच्चे साधन बनाल याविषयी खात्री बाळगा.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 304)

कर्म आराधना – ११

प्रश्न : साधना आणि मनाच्या शांतीसाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

श्रीमाताजी : १) कर्म हे साधना म्हणून करा. तुमच्या सर्वोच्च क्षमतेनिशी तुम्ही जे कर्म केले असेल, ते ‘ईश्वरा’ला अर्पण करा आणि कर्मफल ‘ईश्वरा’वर सोपवा.

२) तुमचा मेंदू शक्य तेवढा शांत ठेवून, तुमच्या मस्तकाच्या ऊर्ध्वदिशेस सचेत होण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर यामध्ये यशस्वी झालात आणि त्याच अवस्थेमध्ये कर्म केलेत तर, ते कर्म परिपूर्ण होईल.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 301)

कर्म आराधना – ०९

प्रार्थना केल्याप्रमाणे आपण कर्म करूया, कारण खरोखरच, कर्म ही शरीराने केलेली ‘ईश्वरा’ची सर्वोत्तम प्रार्थनाच असते.
*
‘ईश्वरा’साठी कर्म करणे ही, देहाद्वारे केलेली प्रार्थनाच असते.
*
व्यक्ती ध्यानाच्या माध्यमातून प्रगत होऊ शकते, परंतु व्यक्तीला सोपविण्यात आलेले कर्म, तिने योग्य वृत्तीने केले तर त्याद्वारे व्यक्ती दसपटीने अधिक प्रगत होऊ शकते.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 299)