Tag Archive for: कर्मयोग

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – २८

कर्मयोग

 

ज्ञानासाठी, प्रेमासाठी किंवा कर्मासाठी ईश्वराशी सायुज्य म्हणजे ‘योग’ होय. योगी, माणसाच्या अंतरंगात असणाऱ्या आणि माणसाच्या बाहेर असणाऱ्या सर्वज्ञ व सर्वशक्तिमान ईश्वराशी स्वतःचा थेट संपर्क साधतो. तो त्या अनंताशी जोडलेला असतो; या विश्वामध्ये ईश्वराचे सामर्थ्य ओतण्याचा तो एक स्रोत बनतो. मग तो शांत परोपकाराच्या भूमिकेद्वारे असेल किंवा सक्रिय उपकाराच्या भूमिकेद्वारे असेल. जेव्हा एखादा मनुष्य स्वतःची व्यक्तिगत दलदल सोडून, इतरांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन, इतरांसाठी जगू लागतो; जेव्हा तो सुयोग्य रीतीने आणि प्रेम व उत्साहाने कर्म करू लागतो; मात्र परिणामांची चिंता सोडून देतो, तो विजयासाठी उत्सुक नसतो किंवा पराजयाची भीतीही बाळगत नाही; जेव्हा तो त्याची सारी कर्मे ईश्वरार्पण करतो आणि प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती दिव्यत्वाच्या वेदीवर अर्पण करतो; जेव्हा तो भीती आणि द्वेष, घृणा आणि किळस, आसक्ती यांपासून मुक्त होतो आणि प्रकृतीच्या शक्तींप्रमाणे, कोणतीही घाईगडबड न करता, अविश्रांतपणे, अपरिहार्यपणे, परिपूर्णपणे कर्म करतो; जेव्हा तो, ‘मी म्हणजे देह आहे’, ‘मी म्हणजे हृदय आहे’ किंवा ‘मी म्हणजे मन आहे’ किंवा ‘मी म्हणजे या तिन्हींची गोळाबेरीज आहे’; या विचारांच्या तो वर उठतो आणि जेव्हा तो स्वतःच्या, खऱ्या ‘स्व’ चा शोध घेतो; जेव्हा त्याला स्वतःच्या अमर्त्यतेची आणि मृत्युच्या अवास्तवतेची जाण येते; जेव्हा त्याला ज्ञानाच्या आगमनाची अनुभूती येते आणि जेव्हा मी स्वतः निष्क्रिय आहे, आणि ती दिव्य शक्ती माझ्या मनाच्या द्वारे, माझ्या वाणीच्या द्वारे, माझ्या इंद्रियांच्या द्वारे, आणि माझ्या सर्व अवयवांद्वारे अप्रतिहत रीतीने कार्य करत आहे; अशी जाण त्याला येते; अशा रीतीने, सर्वांचा स्वामी, मानवतेचा साहाय्यक आणि सखा असणाऱ्या ईश्वराप्रत तो मनुष्य स्वतः जे काही आहे, तो स्वतः जे काही करतो ते आणि त्याच्यापाशी जे काही आहे, अशा सर्व गोष्टींचा, जेव्हा तो परित्याग करतो तेव्हा मग, तो कायमस्वरूपी त्या ईश्वरामध्ये निवास करू लागतो आणि मग अशा तऱ्हेने दुःख, अस्वस्थता किंवा मिथ्या क्षोभ यांची त्याला बाधा होत नाही. हाच योग होय.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 11)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – २७

कर्मयोग

 

कर्ममार्ग, प्रत्येक मानवी कर्म परमेश्वराच्या इच्छेला समर्पित करावे, हे ध्येय समोर ठेवतो. या मार्गाचा आरंभ, आपल्या कर्मामागे असणारा अहंभावप्रधान हेतू सर्वथा टाकून देणे, स्वार्थी हेतूने कोणतेही कर्म न करणे, सांसारिक फळासाठी कोणतेही कर्म न करणे, या गोष्टींपासून होतो. या त्यागामुळे, कर्ममार्ग हा आपले मन व आपली इच्छा अशा प्रकारे शुद्ध करू शकतो की त्यामुळे, महान विश्वशक्ती हीच आपल्या सर्व कर्मांची खरी कर्ती आहे, ही जाणीव आपल्याला सहजपणे होऊ लागते. या शक्तीचा स्वामी ईश्वर हा या कर्मांचा खरा स्वामी व नेता आहे; व्यक्ती हा केवळ एक मुखवटा आहे; व्यक्ती ही सबब आहे; या शक्तीचे ती एक साधन आहे किंवा अधिक सकारात्मकपणे सांगावयाचे झाले तर, व्यक्ती हे कर्माचे व सांसारिक संबंधाचे जाणीवयुक्त केंद्र आहे, ही जाणीव आपल्याला सहजपणे होऊ लागते. कर्मयोगी कर्माची निवड व त्याची दिशा अधिकाधिक जाणीवपुर:सर ईश्वराच्या इच्छेवर आणि विश्वशक्तीवर सोपवितो. आपले कर्म व आपल्या कर्माची फळे शेवटी ईश्वराला व त्याच्या विश्वशक्तीला समर्पित करण्यात येतात. आपला आत्मा दृश्यांच्या कैदेत असतो तो मुक्त व्हावा; आपला आत्मा प्रापंचिक व्यापारांच्या प्रतिक्रियांच्या बंधनात असतो, तो त्या बंधनातून मुक्त व्हावा, हा या समर्पणाच्या मागचा हेतू असतो. भक्तिमार्ग व ज्ञानमार्ग यांच्याप्रमाणे कर्ममार्गही नामरूपात्मक अस्तित्वातून मुक्त होऊन, परमात्म्यात विलीन होण्यासाठी वापरला जातो. परंतु येथेही हा विलिनीकरणाचा परिणाम अपरिहार्य आहे, असे मात्र नाही. भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्गाप्रमाणेच या मार्गाची परिणती ही, सर्व शक्तींच्या ठायी, सर्व घटनांमध्ये, सर्व कृतींमध्ये, ईश्वराचे दर्शन घडण्यात होऊ शकते; वैश्विक कार्यामध्ये असा कर्मयोगी आत्मा मुक्तपणाने आणि अनहंकारी पद्धतीने सहभागी होऊ शकतो. कर्मयोगाचे याप्रमाणे आचरण केले तर, हा योग सर्व मानवी इच्छा व सर्व कर्म यांचे उन्नतीकरण करून, त्यांना दिव्य पातळीवर नेऊ शकेल; त्यांचे आध्यात्मिकीकरण करू शकेल; मुक्ती, सामर्थ्य आणि पूर्णत्व यासाठी मानव विश्वभर जे परिश्रम करत आहे, त्याचे समर्थन याद्वारे करता येईल.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 39-40)

योगांची चढती शिडी

 

भारतांत अद्यापहि ज्या प्रमुख योगशाखा प्रचलित आहेत त्यांच्या विशिष्ट संकीर्ण प्रक्रिया बाजूस ठेवून त्यांच्या केंद्रवर्ती तत्त्वावर जर आम्ही जोर दिला, तर त्यांची एक चढती शिडी होते असे आम्हांस दिसते. या शिडीची अगदी खालची पायरी शरीर आहे, आणि वैयक्तिक आत्मा व विश्वातीत विश्वरूप आत्मा यांचा प्रत्यक्ष संबंध घडविणारा योग ही या शिडीची सर्वात वरची पायरी आहे.

हठयोग हा शरीर व प्राणकार्ये ही पूर्णत्व आणि साक्षात्काराची साधने म्हणून पसंत करतो; स्थूल शरीर हे हठयोगाचे कार्यक्षेत्र आहे. राजयोग हा भिन्न अंगांनी युक्त असलेले आपले मनोमय अस्तित्व उत्थापन-साधन म्हणून निवडतो; तो सूक्ष्म शरीरावर आपले लक्ष केंद्रित करतो.

कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग हा त्रिमार्ग मनोमय पुरुषाची इच्छाशक्ति, हृदय (भावनाशक्ति) किंवा बुद्धिशक्ति घेऊन आरंभ करतो, आणि या शक्तींचे रूपांतर घडवून मोक्षद सत्य (liberating Truth), आनंद व अनंतता या आध्यात्मिक जीवनाच्या अंगभूत गोष्टी प्राप्त करून घेतो. व्यक्तिशरीरांतील मानवी-पुरुष (आत्मा) आणि प्रत्येक शरीरांत राहणारा सर्व नामरूपांच्या अतीत असणारा दिव्य-पुरुष (आत्मा) यांजमध्ये प्रत्यक्ष व्यवहार घडविणे ही या त्रिमार्गाची पद्धत आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 33)

आम्ही जे कार्य आमच्या डोळ्यांसमोर ठेवले आहे ते केवळ यांत्रिक नाही तर नैतिक आणि आध्यात्मिक आहे. केवळ शासनाच्या प्रकारामध्ये बदल घडविणे हेच आमचे उद्दिष्ट नसून राष्ट्रबांधणी हे आमचे उद्दिष्ट आहे. राजकारण हा या कामाचा एक भाग आहे, पण केवळ अंशभागच !

केवळ राजकारण, केवळ सामाजिक प्रश्न, केवळ धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य वा केवळ विज्ञान यांना आम्ही स्वत:ला वाहून घेता कामा नये तर या सर्वांचा समावेश आम्ही ज्या एका तत्त्वामध्ये करतो, जो आमच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचा धर्म आहे, राष्ट्रधर्म आहे, जो आमच्या दृष्टीने वैश्विक देखील आहे, त्याला आम्ही समर्पित झाले पाहिजे.

जीवनाचा एक थोर कायदा आहे, मानवी उत्क्रांतीचे एक महान तत्त्व आहे; आध्यात्मिक ज्ञान आणि अनुभूतीचा देह आहे की ज्याचे संरक्षण करणे, ज्याचे जितेजागते उदाहरण बनणे आणि ज्याचा प्रचार करणे हे भारताचे आजवरचे नियत कार्य राहिले आहे. हा शाश्वत धर्म आहे. परकीय प्रभावांच्या दडपणाखाली येऊन भारताने केवळ धर्माचा बांधा, आराखडाच मोठ्या प्रमाणात गमावला आहे असे नाही तर त्या परकीय प्रभावांच्या दडपणामुळे भारताने ह्या धर्माचे जिवंत सत्यत्वच गमावले आहे.

जर हा भारताचा धर्म आचरणात आणला गेला नाही तर हा धर्म, धर्मच नव्हे. तो जीवनाच्या कोणत्या तरी एका भागात उपयोगात आणून पुरेसे नाही तर, तो जीवनाच्या सर्वांगांत उपयोगात आणला पाहिजे. त्याचा आत्मा आपल्यामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या राजकारणामध्ये, आपल्या साहित्यामध्ये, आपल्या विज्ञानामध्ये, आपल्या व्यक्तिभूत चारित्र्यामध्ये, आपल्या आत्मीयतांमध्ये, आपल्या आशाआकांक्षामध्ये प्रविष्ट व्हायला पाहिजे.

ह्या धर्माचे मर्म जाणून घेणे, त्याची सत्य म्हणून अनुभूती घेणे, तो ज्या उच्च भावनांप्रत उन्नत होत आहे त्या भावना अनुभवणे आणि त्या जीवनामध्ये अभिव्यक्त करणे व प्रत्यक्षात उतरविणे म्हणजे आमच्या दृष्टीने कर्मयोग होय.

आम्ही असे मानतो की, योगसाधनेला मानवी जीवनाचे ध्येय बनविण्यासाठी भारताची उन्नती होत आहे. योगामुळेच भारताला स्वातंत्र्य, एकता आणि महानता प्राप्त करून घेण्यासाठी बळ मिळणार आहे, आणि ते सारे टिकवून ठेवण्यासाठीचे बळदेखील भारताला या योगामुळेच मिळणार आहे. आमच्या नजरेला आध्यात्मिक क्रांती दिसत आहे आणि भौतिक ही केवळ त्याची छाया आणि प्रतिक्रिया आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 08 : 24-28)