Posts

साधनेची मुळाक्षरे – २०

शारीरिक किंवा भौतिक स्तरावर ‘ईश्वर’ स्वतःला सौंदर्याद्वारे अभिव्यक्त करतो; मानसिक स्तरावर ज्ञानाद्वारे, प्राणिक स्तरावर शक्तिद्वारे, आणि आंतरात्मिक स्तरावर प्रेमाद्वारे तो स्वतःला अभिव्यक्त करतो.

आपण जेव्हा पुरेसे उन्नत होतो तेव्हा हे चारही पैलू एकाच चेतनेमध्ये, प्रेम, तेजस्विता, शक्तिमानता, सौंदर्य या साऱ्यांनी परिपूर्ण, सर्वांना सामावून घेत, सर्वांमध्ये व्याप्त अशा रीतीने, परस्परांशी संयुक्त होतात, असा शोध आपल्याला लागतो.

वैश्विक लीलेला समाधानी करण्यासाठीच ही चेतना स्वतःला आविष्करणाच्या विविध स्तरांवर वा पैलूंमध्ये विभाजित करते.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 06)

विचार शलाका – २५

(‘पूर्णयोग’ साध्य करायचा असेल तर व्यक्तीने कोणती गोष्ट नीट समजून घ्यायला हवी, ती गोष्ट श्रीमाताजी येथे सांगत आहेत. एखाद्या व्यक्तीची ईश्वरविषयक जी काही संकल्पना असते, ती म्हणजेच केवळ ईश्वर नाही, तर इतरांच्या त्याच्याविषयीच्या ज्या काही संकल्पना असतील त्या संकल्पनांनुसार देखील ईश्वर असू शकतो, आणि कोणाच्याच संकल्पनेत बसू शकणार नाही असाही तो असू शकतो, हे व्यक्तीने समजून घेतले पाहिजे असे श्रीमाताजी सांगत आहेत. त्या पुढे म्हणतात..)

सहजस्फूर्तपणे किंवा ईश्वराबाबत पुसटशीही जाणीव नसताना देखील, लोक त्यांच्या त्यांच्या संकल्पनेला साजेसे ‘ईश्वरा’ने असावे असा आग्रह धरतात. विचार न करताच अगदी उत्स्फूर्तपणे ते तुम्हाला सांगतात, “हा ईश्वर आहे, हा ईश्वर नाही!’ वास्तविक, ईश्वराबद्दल ते असे कितीसे जाणत असतात?

… “दिव्यत्व म्हणजे काय?” असे तुम्ही त्यांना विचारले तर मात्र उत्तर देणे त्यांना कठीण जाते, त्यांना काहीच माहीत नसते. …एखाद्या व्यक्तीला जाण जेवढी कमी, तेवढी ती व्यक्ती एखाद्या गोष्टीविषयी अधिक मतं बनविते, हे निखालस सत्य आहे. आणि जेवढी एखाद्या व्यक्तीला जाण अधिक, तेवढी ती मतप्रदर्शन कमी करते. आणि पुढे पुढे तर एक वेळ अशी येते की, जेव्हा व्यक्ती निरीक्षण करू लागते पण कोणतेही मत बनविणे तिला अशक्य होऊन बसते. व्यक्ती गोष्टी पाहू शकते, त्या जशा आहेत अगदी तशा त्या पाहू शकते, त्यांच्यातील परस्परसंबंध ती पाहू शकते, त्यांच्या त्यांच्या जागी ठेवून त्या गोष्टी ती पाहू शकते, त्या सद्यस्थितीत जिथे आहेत आणि जिथे त्या असायला पाहिजेत यातील फरक व्यक्तीला उमगतो. – या दोहोंमधील ही तफावत ही जगातील एक फार मोठी अव्यवस्था आहे हे सुद्धा अशा व्यक्तीला दिसते – पण ती व्यक्ती त्यावर टिप्पणी करत नाही, ती फक्त निरीक्षण करते.

आणि एक क्षण असा येतो की जेव्हा, “हा ईश्वर आहे आणि तो ईश्वर नाही” असे म्हणणे देखील त्या व्यक्तीला अवघड जाते. कारण, खरे सांगायचे तर, एक काळ असा येतो की, तिच्या दृष्टीला संपूर्ण विश्वच अशा समग्रपणे, सर्वंकष रीतीने दिसू लागते की तिला हे कळून चुकते की, येथे कशालाही धक्का न पोहोचू देता, येथील एकही गोष्ट या विश्वापासून वेगळी काढता येणे अशक्य आहे.

आणि अजून एकदोन पावले पुढे गेल्यावर व्यक्तीला निश्चितपणे असे कळते की, ‘ईश्वर-विरोधी’ वाटल्यामुळे आपल्याला ज्याचा धक्का बसला होता, ती गोष्ट केवळ तिच्या योग्य जागी नाही इतकेच. प्रत्येक गोष्ट अगदी तिच्या अचूक जागीच असली पाहिजे. तसेच, या आविष्कृत झालेल्या विश्वामध्ये सातत्याने नवनवीन तत्त्वांची, घटकांची भर घातली जात असते, त्या घटकांच्या सुसंवादी प्रगतिशील अशा व्यवस्थेमध्ये जेणेकरून तिचा प्रवेश होणे शक्य होईल, इतपत ती गोष्ट लवचिक, घडणसुलभ (plastic) देखील असली पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 01-02)

विचार शलाका – २४

शरीराकडे ते जणू प्रेत आहे असे समजून पाहाणे, हे संन्यासवाद्यांचे लक्षण आहे. हा निर्वाणाचा मार्ग आहे. ही संकल्पना ऐहिक जीवनाच्या संकल्पनेशी मिळतीजुळती नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद असला पाहिजे, चैतन्यामध्ये जेवढा आनंद आहे तेवढाच तो शरीरामध्येही असला पाहिजे. देह हा चैतन्याने बनलेला असतो, त्यामुळे देह हा देखील ‘ईश्वरा’चेच रूप आहे. मी या विश्वातील सर्व वस्तुमात्रांमध्ये ‘ईश्वरा’ला पाहतो. येथील सर्व काही हे ‘ब्रह्म’च आहे, ‘वासुदेव’, ‘ईश्वर’ हाच सर्व काही आहे, (सर्वम् इदम् ब्रह्म, वासुदेवं सर्वमिति) ही दृष्टी वैश्विक आनंद मिळवून देते. आनंदाच्या सघन लहरी अगदी शरीरामधूनही उठत राहतात. या अवस्थेत, आध्यात्मिक भावनेने भरलेले असतानासुद्धा, व्यक्ती हे ऐहिक जीवन, वैवाहिक जीवन जगू शकते. प्रत्येक कृतीमध्ये व्यक्तीला दिव्यत्वाचा आनंददायी आत्माविष्कार आढळतो.

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 367)

विचार शलाका – ०५

पूर्वीच्या योगांच्या तुलनेत ‘पूर्णयोग’ नवीन आहे : व्यक्तीने केवळ स्वतःसाठी, स्वतःपुरता ईश्वराचा साक्षात्कार करून व्यक्तिगत सिद्धी प्राप्त करून घ्यावी हे येथे उद्दिष्ट नाही. व्यक्तीने केवळ अति-वैश्विक उपलब्धीच नव्हे तर येथील पृथ्वीचेतनेसाठी, वैश्विक अशी काही प्राप्ती करून घ्यावी हेही येथे अपेक्षित आहे. आजवर या पृथ्वी-चेतनेमध्ये, अगदी आध्यात्मिक जीवनामध्येसुद्धा सक्रिय नसलेली किंवा सुसंघटित नसलेली अतिमानसिक (supramental) चेतनेची शक्ती आणणे आणि ती शक्ती सुसंघटित करणे आणि ती थेटपणे सक्रिय होईल हे पाहणे, ही गोष्टसुद्धा साध्य करून घ्यायची आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 400)

ईश्वरी कृपा – २६

‘ईश्वर’ आणि तुमच्यामध्ये तुम्ही इतर कोणाही व्यक्तिला, कोणत्याही कल्पनेला, कोणत्याही गोष्टीला का येऊ देता? तुम्ही जेव्हा पूर्ण अभीप्सायुक्त असता, आनंदात असता तेव्हा इतर कोणतीच गोष्ट महत्त्वाची नाही; ईश्वर आणि तुमची अभीप्सा या व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीला महत्त्व देता कामा नये. एखाद्या व्यक्तिला जर ‘ईश्वर’ त्वरेने, संपूर्णतः, समग्रतेने मिळावा असे वाटत असेल, तर त्या व्यक्तीची मनोभूमिका संपूर्ण, सर्वसमावेशक असावयास हवी. तोच त्याचा एकमेव उद्दिष्टबिंदू असायला हवा आणि त्यामध्ये इतर कोणत्याही गोष्टीचा हस्तक्षेप असता कामा नये.

‘ईश्वर’ कसा असावा, त्याने कसे वागावे, त्याने कसे वागता कामा नये, या संबंधीच्या मानसिक कल्पनांना काहीही किंमत नाही, उलट त्या मानसिक कल्पना म्हणजे मार्गातील धोंडच ठरतात. एक ‘ईश्वर’च केवळ महत्त्वाचा आहे. जेव्हा तुमची चेतना ‘ईश्वरा’ला कवळून घेते, तेव्हाच खऱ्या अर्थाने ‘ईश्वर’ काय आहे हे तुम्हाला समजते, त्या आधी नाही. कृष्ण हा कृष्ण आहे, त्यामुळे त्याने काय केले, काय केले नाही याला मग अशी व्यक्ती महत्त्व देत नाही तर ती व्यक्ती ‘त्याला’ पाहते, ‘त्याला’ भेटते; त्याचा ‘प्रकाश’, त्याची ‘उपस्थिती’, त्याचे ‘प्रेम’, त्याचा ‘आनंद’ हाच काय तो तिच्यासाठी महत्त्वाचा ठरतो. आध्यात्मिक अभीप्सेबाबतीत नेहमी हे असेच असते – हा आध्यात्मिक जीवनाचा नियम आहे.

कोणत्याही मानसिक कल्पना किंवा प्राणिक चढउतार यांच्यावर वेळ वाया घालवू नका – ते ढग पळवून लावा. जी एकमेव आवश्यक गोष्ट आहे त्यावरच तुमचे लक्ष केंद्रित करा.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 56)

जेव्हा तुम्ही योगमार्गाकडे वळता तेव्हा, तुमच्या सर्व मानसिक रचना आणि तुमचे सर्व प्राणिक मनोरे कोलमडून पडले तरी चालतील, अशी स्वत:ची तयारी ठेवली पाहिजे. तुमच्या श्रद्धेखेरीज तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीचा आधार नाही, अशा निराधार अवस्थेत हवेत लटकत राहण्याची तुमची तयारी असली पाहिजे. तुम्ही तुमचा भूतकालीन ‘स्व’ आणि त्याला चिकटून असलेले सर्व काही पूर्णांशाने विसरले पाहिजे, तुमच्या चेतनेमधून त्या उपटून फेकून दिल्या पाहिजेत आणि सर्व प्रकारच्या बंधनांपासून मुक्त अशा स्थितीत नव्याने जन्माला आले पाहिजे. तुम्ही काय होतात ह्याचा विचार करू नका, पण तुम्हाला काय व्हायचे आहे, त्याच अभीप्सेचा विचार करा; जे तुम्ही प्रत्यक्षात उतरवू पाहत आहात त्याच्यामध्येच तुम्ही असले पाहिजे. तुमच्या मृत भूतकाळाकडे पाठ फिरवा आणि भविष्याकडे पाहा. ईश्वर हाच तुमचा धर्म, ईश्वर हाच तुमचा देश, ईश्वर हेच तुमचे कुटुंब.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 82-84)

प्रश्न : प्रत्येकातील चैत्य पुरुष (Psychic Being) नेहमी शुद्धच असतो का? की, तो शुद्ध करावा लागतो?
श्रीमाताजी : अस्तित्वामधील चैत्य पुरुष हा नेहमीच अतिशय शुद्ध असतो, कारण अस्तित्वाचा हा एक असा भाग आहे की, जो ईश्वराच्या संपर्कात असतो आणि अस्तित्वाचे सत्य तो अभिव्यक्त करत असतो. परंतु हा चैत्य पुरुष म्हणजे व्यक्तिच्या अस्तित्वाच्या अंधकारातील एक ठिणगी असू शकते किंवा तो जागृत, पूर्ण विकसित व स्वतंत्र असा प्रकाशमय पुरुष असू शकतो. या दोहोंच्या दरम्यान अनेक श्रेणी असतात.

प्रश्न : तो सहसा झाकलेलाच असतो का?
श्रीमाताजी : बाह्यवर्ती जाणीव (Outer consciousness) ही त्याच्या संपर्कात असत नाही, कारण ती आतमध्ये वळलेली असण्याऐवजी, बाहेरच्या दिशेला वळलेली असते कारण ती बाह्य गोंगाट, हालचाली या साऱ्यांमध्ये जगत असते. अंतरंगामध्ये पाहण्याऐवजी, अस्तित्वाच्या तळाशी पाहण्याऐवजी आणि आंतरिक प्रेरणांचे ऐकण्याऐवजी, ती जाणीव बाह्यामध्ये जे काही पाहते, जे काही करते, जे काही बोलते त्या साऱ्या गोष्टींमध्येच वावरत असते.

प्रश्न : चैत्य पुरुषाकडे कोणती शक्ती असते का?
श्रीमाताजी : सहसा, जीवाला मार्गदर्शन करणारा चैत्य पुरुषच तर असतो. व्यक्तीला त्याविषयी काहीच माहीत नसते कारण व्यक्ती त्याविषयी जागृत नसते, परंतु चैत्य पुरुषच सहसा जीवाला मार्गदर्शन करत असतो. जर का व्यक्ती सावध राहिली तर, व्यक्तीला त्याची जाण येते. परंतु बहुसंख्य लोकांना त्याची पुसटशी देखील कल्पना नसते.

उदाहरणार्थ, त्यांनी काहीतरी करावयाचे ठरविलेले असते, अर्थात त्यांच्या बाह्यवर्ती अज्ञानापोटीच, काहीतरी करावयाचे ठरविलेले असते आणि सारे काही असे घडत जाते की, जे करायचे ठरविले होते त्याऐवजी ते काहीतरी भलतेच करून बसतात आणि मग ते चिडतात, त्रागा करता, दैवाला दोष देत, संताप व्यक्त करत राहतात (ते ज्याच्या त्याच्या भावना व श्रद्धा यांवर अवलंबून असते.) ते म्हणत राहतात, प्रकृती दुष्ट आहे, किंवा नियती निर्दयी आहे किंवा मग देवच अन्यायी आहे किंवा…असेच काहीही. (ते ज्याच्या त्याच्या समजुतींवर अवलंबून असते.) खरंतर, बरेचदा तीच परिस्थिती त्यांच्या आंतरिक विकासासाठी अत्यंत अनुकूल अशी असते.

तुम्हाला आरामदायी जीवन हवे आहे, पैसा हवा आहे, कुलदीपक अशी मुलेबाळे हवी आहेत, त्या साऱ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून मला मदत कर, असे जर तुम्ही तुमच्या चैत्य पुरुषाला सांगाल तर तो तुम्हाला त्यात साहाय्य करणार नाही, हे उघडच आहे. परंतु जेणेकरून, ईश्वराशी एकरूप होण्याची निकड तुमच्या जाणिवेमध्ये उत्पन्न व्हावी, असे काहीतरी तुमच्यामध्ये जागृत होईल, अशी परिस्थिती मात्र तो तुमच्यासाठी निर्माण करेल.

तुम्ही आखलेल्या चांगल्याचांगल्या योजना जर यशस्वी झाल्या, तर तुमच्या बाह्य अज्ञानाचे, तुमच्या मूर्ख क्षुल्लक महत्त्वाकांक्षांचे आणि तुमच्या ध्येयहीन कृतींचे आवरण अधिकाधिक घट्ट होत जाईल अशी शक्यता असते. परंतु जेव्हा तुम्हाला मोठा धक्का बसतो, ज्याची तुम्ही अभिलाषा बाळगली होती ते पद तुम्हाला नाकारले जाते, तुमच्या योजना छिन्नविछिन्न होऊन जातात, जेव्हा तुम्ही पूर्णपणे विफल झालेले असता तेव्हा, कधीकधी ही प्रतिकूलताच तुमच्यासाठी अधिक सत्य आणि अधिक सखोल अशा कोणत्यातरी गोष्टींची दारे खुली करून देते.

आणि मग नंतर कधीतरी, जेव्हा तुम्ही थोडेसे जागृत असता आणि मागे वळून पाहू लागता तेव्हा, तुम्ही थोडेसे जरी प्रामाणिक असाल तर तुम्ही म्हणता, “खरंच की ! तेव्हा माझे म्हणणं बरोबर नव्हते – प्रकृती किंवा ईश्वरी कृपा किंवा माझा चैत्य पुरुष ह्यांचेच बरोबर होते, त्यांनीच हे सारे घडवून आणले आहे.” तो चैत्य पुरुषच असतो की, ज्याने हे सारे घडवून आणलेले असते.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 393-394)

भविष्यात होणाऱ्या बदलांमध्ये हिंदु समाजाने नवीन विश्वात्मक मानदंडाच्या प्रस्थापनेसाठी पुढाकार घ्यावयास हवा. हिंदु असल्यामुळे आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या माध्यमातूनच आपण तो शोध घेण्याचा प्रयत्न करावयास हवा.

आपला स्वत:चा असा एक मानदंड आहे की, जो एकाचवेळी विश्वात्मक आहे आणि व्यक्तिगत असाही आहे. शाश्वत धर्म, हा नेहमीच भारताचा आधार राहिलेला आहे; तो चिरस्थायी असून भारतामध्ये अंगभूत आहे; अशा परिवर्तनशील आणि बहुरूप धारण करणाऱ्या गोष्टीला आपण हिंदुधर्म म्हणतो.

जिथे तुम्ही एखाद्या खडकामध्ये रुतून बसणाऱ्या शिंपल्यासारखे चिकटून राहता, तो धर्म असत नाही; धर्म म्हणजे काय हे समजून न घेता, न पाहता त्यात उडी मारणे हाही धर्म असू शकत नाही.

शाश्वत धर्म म्हणजे आपल्या आंतरिक जीवनामध्ये आणि आपल्या बाह्य अस्तित्वामध्ये, तसेच व्यक्तीप्रमाणेच समाजातदेखील ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे होय. ‘एशा धर्म: सनातन:।’

…..ईश्वर जो मूलतः सच्चिदानंद आहे, त्याचे आविष्करण म्हणजे सत्य, प्रेम, शक्ती होय. जे काही सत्याला आणि वस्तुतत्त्वाला धरून आहे, सुसंगत आहे, ज्या कोणत्या गोष्टीमुळे माणसांमधील प्रेम वाढीस लागते, ज्या कोणत्या गोष्टीमुळे व्यक्तीमध्ये, राष्ट्रामध्ये, वंशामध्ये सामर्थ्य निर्माण होते त्या गोष्टी दैवी होत, हा आहे शाश्वत धर्म आणि हे हिंदु शास्त्र आहे.

एवढे मात्र लक्षात घ्यायला हवे की, ईश्वर हा त्रिमुखी सुमेळ आहे, तो एकमुखी नाही. आपल्या प्रेमाने आपल्याला दुबळे, अंध वा अविवेकी बनविता उपयोगी नाही; आपल्या शक्तिसामर्थ्याने आपल्याला कठोर व कोपिष्ट बनविता कामा नये; आपल्या तत्त्वांनी आपल्याला धर्मांध वा भावविवश बनविता कामा नये.

आपण शांतपणे, धीराने, नि:पक्षपातीपणे विचार करूया; आपण पूर्णपणे, तीव्रतेने पण विवेकीपणे प्रेम करूया; आपण सामर्थ्य, उमदेपणा आणि शक्तीनिशी कार्य करूया. असे करूनसुद्धा जर का आपल्याकडून चुका घडल्याच, तरीही ईश्वर मात्र चूक करत नाही. आपण ठरवितो आणि कृती करतो; ईश्वर त्याचे फळ ठरवितो आणि तो जे काही ठरवितो ते कल्याणकारीच असते.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 53-54)

पूर्णयोगाच्या साधकाची ईश्वरप्राप्तीसाठीची जी धडपड चालू असते त्या कक्षेतून, स्वत:च्या जीवनामध्ये तसेच स्वत:च्या अस्तित्वाच्या व विश्वात्मक पुरुषाच्या सर्व गतीविधींद्वारे ईश्वराला भेटणे हेही समाविष्ट असेल. निसर्ग व जीवन हे त्याच्यासाठी ईश्वराला भेटण्याचे संकेतस्थळही असेल आणि त्याचबरोबर ते त्याच्यासाठी त्या ईश्वराचे प्रकटीकरणदेखील असेल.

बौद्धिक, कलात्मक व गतियुक्त व्यवहार, विज्ञान, तत्त्वज्ञान, जीवन, विचार, कला आणि कर्म या गोष्टी ईश्वराच्या अनुमतीने चालतात आणि त्यामध्ये अधिक खोल गर्भितार्थ दडला असल्याचे त्याच्या लक्षात येते. ह्या साऱ्या माध्यमांमधून अभिव्यक्त होणाऱ्या ईश्वराचे तो स्पष्ट दर्शन घेऊ शकतो आणि त्या साऱ्यामध्ये असणाऱ्या ईश्वराचा आनंद त्याला लाभतो म्हणूनच तो त्यांच्या प्राप्तीसाठी धडपड करतो. हा साधक या गोष्टींच्या बाह्य रूपांविषयी आसक्ती धरणार नाही; कारण आसक्ती ही आनंदाच्या मार्गातील धोंड असते. त्याला असा एक शुद्ध, समर्थ आणि परिपूर्ण आनंद मिळत असतो, की ज्या आनंदामध्ये सर्वकाही समाविष्ट असते परंतु तो आनंद दुसऱ्या कशावरच अवलंबून नसतो. आणि त्याला त्या सर्वांमध्ये त्याच्या प्रियकराच्या म्हणजे ईश्वराच्या प्रतिमा, त्याची प्रतीके, त्याचे अस्तित्व, त्याच्या खुणा, त्याच्या कृती सापडतात. केवळ कलेसाठीच कलेची साधना करू पाहणाऱ्या सामान्य मनाला कदापिही मिळणार नाही वा त्याची कल्पनादेखील ते करू शकणार नाही असा व एवढा आनंद या भक्ताला त्या गोष्टींमधून होतो. ते सर्व काही आणि त्याहूनही अधिकचे असे सर्व काही हे त्याच्यासाठी पूर्णयोगाचा आणि समावेशनाचा मार्ग ठरतो.

प्रेम ही ह्या आनंदाची सर्वत्रगत शक्ती असते. आणि त्या प्रेमाचा आनंद जे विशिष्ट रूप धारण करतो ती असते, सौंदर्याची दृष्टी !

ईश्वराचा प्रेमिक हा विश्वाचा प्रेमी असतो आणि तो ‘सर्व-आनंदमया’ला आणि ‘सर्व-सौन्दर्यमया’ला प्रेमाने कवळतो. जेव्हा वैश्विक प्रेम हे साधकाच्या हृदयाचा ताबा घेते तेव्हा, ईश्वराने त्याला कवेत घेतले आहे ह्याची ती निर्णायक खूण असते. आणि जेव्हा साधकाला सर्वत्र सर्व-सौंदर्य पाहण्याची दृष्टी येते आणि सदा सर्वकाळ आनंदाने त्याला कवळून घेतले आहे असा त्याला अनुभव येत राहतो, तेव्हा साधकाने ईश्वराला कवेत घेतले आहे ह्याची ती निर्णायक खूण असते. प्रेमाची परिपूर्ती ऐक्यामध्ये होणे आणि परस्परांनी परस्परांना कवळून घेणे ही एकाच वेळी सर्वोच्च अशी अवस्था पण असते आणि तेव्हाच त्या प्रेमाची तीव्रताही अत्युच्च पातळीवर जाऊन पोहोचलेली असते. आणि हेच ऐक्यातील परमानंदाचे अधिष्ठान असते.

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 591-592)

आम्ही जो ईश्वर पूजतो तो केवळ दूरची विश्वातीत वस्तू नाही, तर तो अर्धवट झाकलेला प्रकट ईश्वर आहे; तो आमच्याजवळ, या आमच्या जगात येथे आत्ता उपस्थित आहे.

जीवन हे ईश्वराच्या अभिव्यक्तीचे असे क्षेत्र आहे की, जे अजून पूर्णतेस गेलेले नाही. येथे जीवनात, पृथ्वीवर, या शरीरात – ‘इहैव’ असा उपनिषदांचा आग्रह आहे – आम्हाला ईश्वरावरील पडदा दूर करून त्याला प्रकट करावयाचे आहे. त्याचा सर्वातीत मोठेपणा, प्रकाश आणि माधुर्य या गोष्टी आमच्या जाणिवेला येथे वास्तव वाटतील असे करावयाचे आहे. तो आम्हाला आमच्या जाणिवेत आमचा म्हणून आणावयाचा आहे आणि त्या प्रमाणात व्यक्त करावयाचा आहे.

सर्वथा परिवर्तित करता यावे यासाठी आम्ही जीवन, आज जसे आहे तसे स्वीकारावयाचे आहे; असा स्वीकार केल्याने आमच्या संघर्षामध्ये अधिक भर पडेल; पण त्या संघर्षापासून, अडचणींपासून पळ काढण्यास आम्हाला मनाई आहे.

या अडचणीमुळे आम्हाला जे विशेष परिश्रम होतात त्या परिश्रमांची खास भरपाई आम्हाला पुढे लाभते, ही त्यात समाधानाची गोष्ट आहे. आमचा पूर्णयोगाचा मार्ग वाकडातिकडा व खडकाळ असतो आणि मार्ग चालण्याचे परिश्रम नको इतके त्रासदायक व गोंधळ उडवणारे असतात.

तरीपण काही मार्ग चालून झाल्यावर, आमचा मार्ग पुष्कळ सुकर होतो. कारण एकदा आमची मने केंद्रभूत दर्शनावर, दृश्यावर ठामपणे स्थिरावली आणि आमची इच्छाशक्ती आमच्या एकमेव साध्यासाठी परिश्रम करण्यास तयार झाली, म्हणजे मग जीवन आम्हाला मदत करू लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 74)