Tag Archive for: ईश्वरी कृपा

विचार शलाका – ०५

प्रश्न : आजारपण येणार असे वाटत असेल तर, व्यक्तीने ते कशा प्रकारे थोपवावे?

श्रीमाताजी : सर्वप्रथम, तुम्हाला आणि तुमच्या शरीरातील कोणालाच ते हवे असता कामा नये. आपण आजारीच पडता कामा नये, अशी तुमच्यामध्ये अतिशय प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे. ही पहिली अट आहे.

दुसरी अट अशी की, प्रकाशाला, साम्यावस्थेच्या प्रकाशाला, शांतीच्या, स्थिरतेच्या आणि समतोलाच्या प्रकाशाला आवाहन करून, तो प्रकाश शरीरातील पेशींपर्यंत पोहोचविला पहिजे. पेशी भयभीत होऊ नयेत म्हणून, त्यांचे प्रशासन केले पाहिजे; ही सुद्धा आणखी एक अट आहे.

तुम्ही आजारपणाला आकर्षित करता कामा नये किंवा त्याने घाबरून देखील जाता कामा नये. आजारपणाच्या भीतीमुळे ते नको असेही तुम्हाला वाटता कामा नये. ‘ईश्वरी कृपे’ची शक्ती तुमचे प्रत्येक गोष्टीपासून संरक्षण करेल याविषयी, तुम्हाला पूर्ण विश्वास आणि धीरयुक्त खात्री असली पाहिजे. त्यानंतर तुम्ही कोणत्यातरी दुसऱ्या गोष्टीचा विचार करा, त्या आजारपणाचा विचार करणे पूर्णपणे सोडून द्या.

जेव्हा तुम्ही या दोन गोष्टी केलेल्या असतील, म्हणजे, एकतर तुमच्या इच्छेनिशी तुम्ही आजारपणाला नकार दिला असेल आणि देहपेशींमधील भीतीचा पूर्णपणे निरास होईल असा विश्वास त्या पेशींमध्ये ओतला असेल आणि नंतर आजारपणाविषयी यत्किंचितही विचार न करता, तो अस्तित्वात आहे ह्याचा जराही विचार न करता, दुसऱ्या कोणत्यातरी गोष्टीमध्ये स्वतःला पूर्णपणे गुंतवून घेतले असेल तर, अगदी संसर्गजन्य रोग झालेल्या लोकांच्या जरी तुम्ही संपर्कात आलात, तरीही तो आजार तुम्हाला होणार नाही.

पण हे कसे करावयाचे हे तुम्हाला माहीत हवे – अनेक जण म्हणतात, “मी काही घाबरलेलो नाहीये.” अशा वेळी, त्या माणसाच्या मनामध्ये भीती नसते, त्याचे मन घाबरलेले नसते, ते कणखर असते, ते घाबरलेले नसते, पण त्याच्या शरीराचा मात्र थरकाप उडालेला असतो आणि त्याला मात्र ते माहीतच नसते, कारण ही भयकंपितता त्याच्या शरीराच्या पेशींमध्ये असते. त्याचे शरीर प्रचंड चिंतेने थरकापत असते आणि त्यातूनच आजारपणाला निमंत्रण मिळते. आणि अशा वेळीच, व्यक्तिने पूर्ण शांतीची स्थिरता व शक्ती आणि ‘ईश्वरी कृपा’ यांवर संपूर्ण श्रद्धा ठेवली पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWA 07 : 142-143)

साधनेची मुळाक्षरे – १९

(श्रीमाताजींनी अगोदर शारीरिक आरोग्य, शरीराची स्वास्थ्यकारक वृत्ती, शरीराची जडणघडण याविषयी विवेचन केले आहे आणि त्यानंतर आरोग्य आणि ईश्वरी कृपा यासंबंधी त्या विवेचन करत आहेत.)

व्यक्तीच्या अंतरंगात जर ‘ईश्वरी कृपे’विषयी अशी श्रद्धा असेल की, ईश्वरी कृपा माझ्याकडे पाहत आहे आणि काहीही झाले तरी ईश्वरी कृपा आहेच, आणि ती माझ्यावर लक्ष ठेवून आहे तर, (व्यक्ती अशी श्रद्धा नेहमीच, आयुष्यभर बाळगू शकते) तिच्या साहाय्याने व्यक्ती कोणत्याही संकटामधून पार होऊ शकते, या श्रद्धेच्या साहाय्याने सर्व अडचणींना सामोरे जाऊ शकते, अशा व्यक्तीला काहीच विचलित करू शकत नाही कारण तिच्यापाशी श्रद्धा असते आणि ईश्वरी कृपादेखील तिच्यासोबत असते. ती अनंतपटीने शक्तिशाली, अधिक सचेत, अधिक चिरकाळ टिकणारी अशी शक्ती आहे; तुमची शारीरिक ठेवण कशी आहे, तिची अवस्था काय आहे यावर ती शक्ती अवलंबून नसते; ती ईश्वरी कृपेखेरीज अन्य कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नसते आणि म्हणून ती ‘सत्या’वरच विसंबून असते आणि मग तिला कोणतीही गोष्ट विचलित करू शकत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 297)

साधनेची मुळाक्षरे – १६

जे कोणी दुःखकष्ट सहन करत आहेत, त्यांना हीच गोष्ट सांगायला हवी की, सारे दुःखकष्ट याच गोष्टीचे निदर्शक आहेत की, तुमचे समर्पण परिपूर्ण नाही. आणि मग, जेव्हा तुम्हाला कधीतरी एकदम धक्का बसतो, तेव्हा, “अरेरे, हे खूपच वाईट आहे” किंवा ‘’ही परिस्थिती खूपच कठीण आहे,’’ असे म्हणण्याऐवजी जर तुम्ही असे म्हणालात की, ”माझे समर्पण परिपूर्ण झालेले नाही;” तर ते योग्य आहे.

आणि मग ‘ईश्वरी दिव्यकृपा’ तुम्हाला साहाय्य करत आहे, मार्गदर्शन करत आहे असे तुम्हाला जाणवते आणि तुम्ही वाटचाल करू लागता. आणि मग एके दिवशी तुम्ही अशा शांतीमध्ये उदय पावता की ज्या शांतीचा भंग कोणतीच गोष्ट करू शकत नाही. ‘दिव्य कृपे’बद्दलच्या पूर्ण विश्वासामधून जे हास्य उमलते, तशाच हसतमुखाने तुम्ही साऱ्या विरोधी शक्तींना, विरोधी गतिविधींना, आघातांना, गैरसमजांना, दुरिच्छांना सामोरे जाता. आणि या साऱ्यातून बाहेर पडण्याचा तोच एकमेव मार्ग आहे. दुसरा कोणता मार्गच नाही.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 398-399)

ईश्वरी कृपा – ३३

ज्यांनी ईश्वराप्रत आत्मदान केले आहे, अशा व्यक्तींना जी जी अडचण सामोरी येते, ती प्रत्येक अडचण म्हणजे त्यांच्यासाठी एका नव्या प्रगतीचे आश्वासन असते आणि त्यामुळे ती ‘ईश्वरी कृपे’ने दिलेली भेटवस्तू आहे, अशा रितीने त्यांनी तिचा स्वीकार केला पाहिजे.

*

केवळ ईश्वराची ‘कृपा’च शांती, सुख, शक्ती, प्रकाश, ज्ञान, आनंद आणि प्रेम या गोष्टी त्यांच्या साररूपात आणि त्यांच्या सत्यरूपात प्रदान करू शकते.

*

आपण ईश्वरी ‘कृपे’साठी प्रार्थना केली पाहिजे – कारण ईश्वरी ‘न्याय’ जर इथे आविष्कृत व्हायचा झाला तर, त्याच्या समोर टिकून राहू शकतील असे फारच थोडेजण असतील.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 96, 85, 83)

ईश्वरी कृपा – ३२

तुम्ही जर अगदी प्रामाणिक अभीप्सेने आध्यात्मिक जीवनाकडे वळला असाल तर, कधीकधी असुखद गोष्टींचा तुमच्यावर जणू भडिमार होतो. उदाहरणार्थ, तुमच्या अगदी जवळच्या मित्रांशी तुमचे भांडण होते, तुमचे कुटुंबीय तुम्हाला घराबाहेर हाकलून देतात, तुम्ही जे प्राप्त करून घेतले आहे असे तुम्हाला वाटत असते ते तुम्ही गमावून बसता इ. इ.

मला असा एक माणूस माहीत आहे की, जो फार मोठी अभीप्सा बाळगून भारतामध्ये आला होता. ज्ञानप्राप्तीसाठीचे आणि योगसाधनेबाबतचे खूप काळ प्रयत्न करून झाल्यावर मग तो भारतात आला होता.

ही खूप पूर्वीची गोष्ट आहे. त्या काळी लोक साखळी असलेले घड्याळ वापरत असत. तर, ह्या सद्गृहस्थाला त्याच्या आजीने एक सोन्याची पेन्सिल दिलेली होती, त्याच्या दृष्टीने ती जगातील सर्वात मौल्यवान वस्तू होती. ती पेन्सिल त्या साखळीला अडकविलेली होती. जेव्हा तो बंदरावर – पाँडिचेरी किंवा भारतात कोणत्यातरी बंदरावर किंवा मला वाटते, कोलंबोला उतरला – त्या काळी प्रवाशांना, जहाजातून छोट्या बोटींमध्ये आणि मग त्या बोटींद्वारे किनाऱ्यावर आणून सोडत असत. त्यामुळे ह्या सद्गृहस्थाला जहाजाच्या मार्गिकेवरून बोटीमध्ये उडी मारावी लागली. त्याची पायरी चुकली, त्याने कसाबसा तोल सांभाळला, पण त्या धावपळीमध्ये ती सोन्याची पेन्सिल सरळ खाली समुद्रात पडली आणि पार तळाशीच गेली. प्रथम तो काहीसा उद्विग्न झाला, पण नंतर त्याने स्वत:लाच समजावले, “ठीक आहे, हा तर भारताचा प्रभाव दिसतो आहे – मी माझ्या आसक्तीपासून मुक्त झालो आहे.”…

जे खूप प्रामाणिक आहेत त्यांच्याबाबतीत अशा घटना घडून येतात. मूलत: अडचणी, संकटांचे पर्वत हे प्रामाणिक लोकांसाठीच असतात. जे प्रामाणिक नसतात त्यांना खूप सुंदर, विलोभनीय रंगांच्या गोष्टी भुरळ पाडण्यासाठी मिळत जातात, परंतु, सरतेशेवटी त्यांना कळून चुकते की ते चुकले आहेत. पण ज्या कोणाला खूप अडीअडचणी, संकटे येतात त्यांवरून हे सिद्ध होते की, ते प्रामाणिकपणाच्या एका विशिष्ट पातळीपर्यंत येऊन पोहोचले आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 157)

ईश्वरी कृपा – ३१

प्रकाश आणि सत्य या गोष्टी असतील अशा परिस्थितीतच परम ‘कृपा’ तिचे कार्य करेल; मिथ्यत्व आणि अज्ञान यांनी तिच्यावर लादलेल्या परिस्थितीत, त्यांच्या अटींनुसार ती कार्य करणार नाही. कारण मिथ्यत्वाच्या मागण्यांपुढे जर तिला नमते घ्यावे लागले तर, तिचा स्वतःचा हेतुच विफल झाल्यासारखे होईल.

…अस्तित्वाचा एखादा भाग समर्पित आहे पण दुसरा भाग स्वतःला समर्पणाविना तसाच राखू इच्छित असेल, स्वतःच्याच पद्धतीने चालत असेल किंवा स्वतःच्या अटी लादत असेल तर, असे जेव्हा जेव्हा घडते त्या त्या प्रत्येक वेळी, तुम्ही स्वतःच ‘ईश्वरी कृपे’ला तुमच्यापासून दूर लोटत असता.

तुम्ही जर तुमच्या इच्छा, अहंकारी मागण्या आणि प्राणिक आग्रह तुमच्या भक्तिच्या आणि समर्पणाच्या आड लपवून ठेवत असाल; खऱ्या अभीप्सेच्या जागी तुम्ही या गोष्टी ठेवत असाल किंवा त्या गोष्टी अभीप्सेमध्ये मिसळत असाल आणि त्या गोष्टी ‘दिव्य शक्ती’वर लादण्याचा प्रयत्न करत असाल तर, ‘ईश्वरी कृपे’ने तुमचे रूपांतरण घडवून आणावे म्हणून तिला आवाहन करणे व्यर्थ आहे.

तुम्ही सत्याप्रत एका बाजूने स्वतःला खुले करत असाल किंवा तुमच्यामधील एखादा घटक सत्याप्रत खुला करत असाल आणि दुसऱ्या बाजूने सातत्याने विरोधी शक्तींना दारे खुली करत असाल, तर ‘ईश्वरी कृपा’ तुमच्या सन्निध राहील, ही अपेक्षा करणे फोल आहे. तुम्हाला जर तुमच्या मंदिरामध्ये ईश्वराच्या जिवंत ‘अस्तित्वा’ची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर तुम्ही ते मंदिर स्वच्छ राखणेच पाहिजे.

जेव्हा जेव्हा ‘ईश्वरी शक्ती’ हस्तक्षेप करते आणि सत्य घेऊन येते, तेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही जर त्या सत्याकडे पाठ फिरवलीत आणि ज्या मिथ्यत्वाला घालवून दिले होते त्याला पुन्हा आमंत्रित केलेत तर, तुम्हाला अंतर दिल्याबद्दल ईश्वरी कृपेला तुम्ही दोष देता कामा नये, तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छेच्या खोटेपणाला आणि तुमच्या स्वतःच्या समर्पणाच्या अपूर्णतेला दोष दिला पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 03)

ईश्वरी कृपा – ३०

ईश्वराने स्वतःचे आविष्करण केलेच पाहिजे म्हणून त्याला आवाहन करण्याचा व्यक्तीला कोणताही अधिकार नाही; ते आविष्करण केवळ चेतनेच्या आध्यात्मिक किंवा आंतरात्मिक अवस्थेला प्रतिसाद म्हणून होऊ शकते किंवा योग्य प्रकारे केलेल्या दीर्घकालीन साधनेला दिलेला प्रतिसाद म्हणून होऊ शकते; किंवा जर ते आविष्करण त्यापूर्वी किंवा कोणत्याही दृश्य कारणाविना घडून येत असेल तर ती ‘ईश्वरी कृपा’ असते; परंतु व्यक्ती या ‘ईश्वरी कृपे’ची मागणी करू शकत नाही किंवा तिच्यावर सक्ती करू शकत नाही; ‘ईश्वरी कृपा’ ही व्यक्तीच्या अस्तित्वाचे एक मुक्त-पुष्प बनून, दिव्य चेतनेमधून उत्स्फूर्तपणे उसळून वर येते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 473)

ईश्वरी कृपा – २९

(ईश्वराची अनुभूती आल्याशिवाय मी त्याची भक्ती करू शकत नाही, असा दृष्टिकोन स्वीकारलेल्या एका साधकाला श्रीअरविंदांनी लिहिलेल्या पत्रातील हा अंशभाग…)

…आणि मग तुम्ही पुन्हा असे म्हणाल की, “मी भक्ती करेन किंवा करणार नाही पण मला मात्र तो हवा आहे, मला तो नेहमीच हवाहवासा वाटतो आणि आता तर तो मला अधिकच हवाहवासा वाटू लागला आहे आणि तरी मला काहीच मिळत नाही.’ पण इच्छा असणे म्हणजेच सारे काही झाले असे नाही. आत्ता कुठे तुमच्या लक्षात येऊ लागले आहे की, त्यासाठी हृदयाची शुद्धी वगैरे सारख्या काही अटींची पूर्तता करावी लागते. तुमचा सिद्धान्त असा असतो की, “मला जेव्हा ‘देव’ हवा असेल, तेव्हा ‘देवा’ने माझ्यासाठी आविष्कृत झालेच पाहिजे, माझ्यापाशी यायलाच हवे, अगदीच काही नाही तरी किमान मला त्याने ओझरते दर्शन तरी दिले पाहिजे, किंवा एखादा खराखुरा सघन अनुभव द्यायला पाहिजे, मला कळणार नाहीत किंवा मी ज्याला किंमत देत नाही अशा संदिग्ध गोष्टी मला नकोत. ‘देवाच्या कृपे’ने माझ्या हाकेला उत्तर दिलेच पाहिजे, माझी पात्रता असो वा नसो, त्याने उत्तर दिलेच पाहिजे अन्यथा ‘कृपा’ वगैरे काही अस्तित्वातच नाही.” काही विशेष बाबींमध्ये ‘देवाची कृपा’ खरोखरच असे करेलदेखील, पण ‘केलेच पाहिजे, दिलेच पाहिजे’ ही अशी हक्काची भाषा कोठून आली ? आणि मग जर ‘देव’ तसेच करेल तर ती ‘देवाची कृपा’ असणार नाही, तर ते मग, ‘देवा’चे कर्तव्य, देवावरील बंधन किंवा करार किंवा तह होऊन बसेल. ईश्वर तुमच्या हृदयामध्ये डोकावतो आणि योग्य क्षण आला आहे असे जाणवले की त्या क्षणी, पडदा बाजूला करून टाकतो.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 468)

ईश्वरी कृपा – २८

व्यक्ती परिश्रम करण्यासाठी आणि तपस्येसाठी जर तयार नसेल, तसेच तिचे मनावर व प्राणावर जर नियंत्रण नसेल तर, अशी व्यक्ती मोठ्या आध्यात्मिक लाभाची अपेक्षा बाळगू शकणार नाही – कारण मन व प्राण स्वतःची सत्ता दीर्घकाळ टिकून राहावी म्हणून, तसेच त्यांना त्यांच्या आवडीनिवडी लादता याव्यात म्हणून विविध युक्त्याप्रयुक्त्या आणि निमित्तं शोधत राहणार; आणि आत्म्याची व चैतन्याची खुली माध्यमे आणि आज्ञाधारक साधने बनण्याची वेळ जेव्हा त्यांच्यावर येईल तेव्हा, तो दिवस दूर लोटण्यासाठी म्हणून मन व प्राण विविध युक्त्याप्रयुक्त्या आणि निमित्तं शोधत राहणार. ‘ईश्वरी कृपा’ कधीकधी गैरवाजवी किंवा वरकरणी गैरवाजवी परिणामदेखील घडवून आणते पण व्यक्ती हक्क म्हणून किंवा अधिकार म्हणून ‘ईश्वरी कृपे’ची मागणी करू शकत नाही, कारण जर तसे झाले तर मग ती ‘ईश्वरी कृपा’ असणार नाही. व्यक्तीने केवळ उच्चरवात हाक देण्याचा अवकाश की, लगेच त्याला प्रतिसाद मिळालाच पाहिजे, असा दावा व्यक्ती करू शकत नाही, हे तुम्ही पाहिले आहे. आणि तसेच माझ्या हेही पाहण्यात आले, ‘ईश्वरी कृपे’ने हस्तक्षेप करण्यापूर्वी नकळतपणे खरंच खूप दीर्घकाळ तयारी चाललेली असते, हे माझ्या नेहमीच लक्षात आले आहे; आणि तो हस्तक्षेप झाल्यानंतरही, जे काही प्राप्त झाले आहे ते सांभाळून ठेवण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी व्यक्तीला – इतर बाबींबाबत करावे लागते तसे याबाबतीतही – जोपर्यंत पूर्ण सिद्धी प्राप्त होत नाही तोपर्यंत, पुष्कळ काम करावे लागते. अर्थातच त्यानंतर परिश्रम संपुष्टात येतात आणि मग व्यक्तीला खात्रीशीरपणे ती गोष्ट प्राप्त झालेली असते. आणि त्यामुळे या ना त्या प्रकारची तपस्या ही आवश्यकच असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 173)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

ईश्वरी कृपा – २७

‘ईश्वरी-कृपे’विना काहीच केले जाऊ शकत नाही, परंतु ती ‘कृपा’ पूर्णतः अभिव्यक्त व्हायची असेल तर, साधकाने स्वतःची सिद्धता करणे आवश्यक असते. साऱ्याच गोष्टी जर ‘ईश्वरी’ हस्तक्षेपावर अवलंबून असत्या तर, मनुष्य एक कळसूत्री बाहुली बनून राहिला असता आणि मग साधनेचा काही उपयोगच झाला नसता! आणि मग ना कोणत्या अटी, ना कोणते वस्तुंचे नियम, आणि त्यामुळे ना कोणते जग… केवळ ‘ईश्वर’ त्याच्या सुखासाठी वस्तुंशी खेळत आहे, असे झाले असते. अंतिमतः साऱ्याच गोष्टी ‘ईश्वरी’ वैश्विक कार्यामुळेच होतात, असे निःशंकपणे म्हणता येते, पण हे सारे व्यक्तींच्या माध्यमातून घडत असते, हे ईश्वरी वैश्विक कार्य शक्तींच्या माध्यमातून, ‘प्रकृति’च्या नियमांनुसार घडत असते. ‘ईश्वरा’चा विशेष हस्तक्षेप असू शकतो आणि असतो देखील पण साऱ्याच गोष्टी काही या विशेष हस्तक्षेपामुळे घडून येत नाहीत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 171)