Tag Archive for: ईश्वरी कृपा

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २६

‘ईश्वरी कृपा’ आणि ‘ईश्वरी शक्ती’ (साधकाच्या बाबतीत) सर्व काही करू शकते, पण ते ती साधकाच्या पूर्ण सहमतीनेच (assent) करू शकते. अशी पूर्ण सहमती द्यायला शिकणे हाच साधनेचा समग्र अर्थ आहे. अशा सहमतीसाठी मनामधील कल्पना, प्राणामधील इच्छावासना किंवा शारीरिक चेतनेमधील जडत्वामुळे, तामसिकतेमुळे कदाचित वेळ लागेल परंतु, या गोष्टी दूर केल्याच पाहिजेत आणि ते शक्य असते. ईश्वरी शक्तीने कार्य करावे यासाठी तिला आवाहन केल्याने आणि ईश्वरी शक्तीच्या साहाय्याने त्या गोष्टी दूर करता येऊ शकतात.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 171)

नैराश्यापासून सुटका – २१

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

प्राणिक निराशेच्या कोणत्याही लहरीला तुमच्यामध्ये शिरकाव करू देऊ नका आणि खिन्न मनोदशेला तर अजिबातच थारा देऊ नका. बाह्य व्यक्तिमत्त्वाबाबत बोलायचे झाले तर, केवळ तुमच्यामध्येच नव्हे, तर प्रत्येकामध्येच, हाताळण्यास अतिशय अवघड असा एक पशु नेहमी दडलेला असतो. त्याला धीराने आणि शांत व प्रसन्न चिकाटीनेच हाताळले पाहिजे. त्याच्या प्रतिकाराने कधीच निराश होऊ नका, कारण त्यामुळे तो हळवा व उद्विग्न होतो आणि हाताळायला अधिकच अवघड होऊन बसतो; अन्यथा तो हतोत्साहित होतो. (तेव्हा निराश न होता) त्याला स्वच्छ सूर्यप्रकाशाचा दिलासा द्या, त्याच्यावर तुमच्या अविचलतेचे दडपण येईल असे पाहा आणि मग एक दिवस तो ‘ईश्वरी कृपे‌’प्रत पूर्णपणे खुला झाला असल्याचे तुम्हाला आढळून येईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 187)

नैराश्यापासून सुटका – ०६

आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये सामर्थ्याला (strength) निश्चितच एक मूल्य असते, पण आध्यात्मिक साक्षात्कार हा केवळ सामर्थ्यामुळेच होऊ शकतो आणि तो अन्य कोणत्याच मार्गामुळे होऊ शकत नाही, असे म्हणणे ही खूपच अतिशयोक्ती ठरेल.

‘ईश्वरी कृपा’ ही काही एखादी काल्पनिक गोष्ट नाही, तर ती अनुभवास येणारी आध्यात्मिक वस्तुस्थिती आहे. विद्वान आणि सामर्थ्यवान व्यक्ती ज्यांना अगदी नगण्य समजतात अशा अनेक जणांना ‘ईश्वरी कृपे‌’मुळे आध्यात्मिक साक्षात्कार झालेला आहे. अशिक्षित असताना आणि कोणतीही मानसिक शक्ती किंवा प्रशिक्षण नसताना, व्यक्तित्वामध्ये (तुम्ही म्हणता तसे त्यांच्यापाशी) कोणतेही ‘सामर्थ्य’ नसताना किंवा संकल्पशक्ती नसताना देखील, त्यांनी (फक्त आणि फक्त) अभीप्साच बाळगली होती आणि त्यांना एकाएकी, अगदी अल्पावधीतच आध्यात्मिक साक्षात्कार झाला होता; कारण त्यांच्यापाशी श्रद्धा होती किंवा ते प्रामाणिक होते.

ही जी तथ्यं आहेत, ती आध्यात्मिक इतिहासातील तथ्यं आहेत आणि ती तथ्यं अगदी सार्वत्रिक आध्यात्मिक अनुभवाचा भाग आहेत. असे असूनही या गोष्टी काल्पनिक आहेत असे समजून, त्यांच्या बाबतीत एवढा उहापोह का केला जातो, त्यांच्या बाबतीत इतके युक्तिवाद का केले जातात, किंवा या गोष्टी नाकारल्या का जातात हेच मला कळत नाही.

सामर्थ्य, जर आध्यात्मिक असेल तर, त्यामध्ये आध्यात्मिक साक्षात्काराची शक्ती असते; (पण) त्याहूनही अधिक शक्ती प्रामाणिकपणामध्ये असते; आणि सर्वाधिक शक्ती ‘ईश्वरी कृपे‌’मध्ये असते. कितीही वेळ लागला आणि कितीही अडचणी आल्या तरी, एखादी व्यक्ती जर प्रामाणिक असेल तर ती या सगळ्यामधून पार होतेच, हे मी असंख्य वेळा सांगितले आहे. मी अनेकवेळा ईश्वरी कृपे‌विषयीदेखील बोललो आहे. “शोक करू नकोस; मी तुला सर्व पापांमधून आणि अनिष्ट गोष्टींपासून मुक्त करेन,” (अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्ष्ययिष्यामि मा शुच:) हे ‘गीते‌’मधील वचन मी अनेकवेळा उद्धृत केले आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 172)

नैराश्यापासून सुटका – ०२

तुम्ही कधीच एकाकी नसता, हे कधीही विसरू नका. ‘ईश्वर’ तुमच्या सोबत असून तो तुम्हाला साहाय्य करत आहे, मार्गदर्शन करत आहे. ‘तो’ असा सोबती आहे की जो कधीच साथसंगत सोडत नाही; ‘तो’ असा मित्र आहे, ज्याचे प्रेम तुम्हाला सामर्थ्यवान बनविते आणि समाधान देते. तुम्हाला जितका जास्त एकाकीपणा जाणवेल, तेवढे तुम्ही त्या ईश्वराच्या तेजोमय उपस्थितीची जाणीव होण्यासाठी अधिक तयार व्हाल. श्रद्धा बाळगा, ‘तो’ तुमच्यासाठी सारेकाही करेल.
*
जेव्हा परिस्थिती वाईटाहून अधिक वाईट होत आहे असे वाटते, तत्क्षणी, आपण श्रद्धेची परमोच्च कृती केली पाहिजे आणि ‘ईश्वरी कृपा’ आपल्याला कधीच अंतर देणार नाही, हे आपण जाणून असले पाहिजे. अरूणोदयापूर्वीच्या घटिका या नेहमीच सर्वाधिक अंधकारमय असतात. स्वातंत्र्य जवळ येण्यापूर्वीची गुलामी ही सर्वात जास्त वेदनादायी असते. परंतु श्रद्धायुक्त अंतःकरणामध्ये आशेची चिरंतन ज्योत तेवत असते आणि ती निराशेला जागाच ठेवत नाही.

– श्रीमाताजी (CWM 14 : 09), (CWM 15 : 177)

विचारशलाका १४

असे पाहा की, जगाच्या सध्याच्या अवस्थेमध्ये परिस्थिती नेहमीच कठीण असते. संपूर्ण जग संघर्ष व कलहाच्या स्थितीत आहे; प्रकट होऊ पाहणाऱ्या सत्य व प्रकाश यांच्या शक्ती आणि (दुसरीकडे) त्यांना विरोध करणाऱ्या अशा सर्व शक्ती की, ज्या बदलू इच्छित नाही, ज्या हटवादी झालेल्या आणि जाण्यास नकार देणाऱ्या भूतकाळातील भागाचे प्रतिनिधित्व करतात, यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. स्वाभाविकपणेच, प्रत्येक व्यक्तीला तशाच प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागते आणि तिला स्वत:ला स्वत:च्या अडचणी जाणवत असतात.

तुमच्याकरता केवळ एकच मार्ग आहे. तो म्हणजे समग्र, संपूर्ण विनाशर्त समर्पण. म्हणजे तुमच्या कृती, तुमची कर्मे, तुमच्या आशा-आकांक्षा यांचे समर्पण तर करायचेच, पण त्याचबरोबर तुमच्या भावभावनांचेसुद्धा समर्पण करायचे, म्हणजे तुम्ही जे काही करता, तुम्ही जे काही आहात ते ते सारे केवळ ‘ईश्वरा’साठीच असले पाहिजे, असे मला म्हणायचे आहे. आणि असे केल्यामुळे, तुमच्या सभोवती असणाऱ्या मानवी प्रतिक्रियांच्या तुम्ही अतीत झाला असल्याचे तुम्हाला जाणवते – केवळ अतीत झाल्याचेच जाणवते असे नव्हे तर, ‘ईश्वरी कृपे’च्या तटबंदीमुळे त्या मानवी प्रतिक्रियांपासून तुमचे संरक्षण होत असल्याचेही तुम्हाला जाणवते.

एकदा का तुमच्यामधील इच्छा नाहीशा झाल्या, आसक्ती उरली नाही, मनुष्यमात्रांकडून – मग ते कोणीही असोत – कोणत्याही प्रकारचे बक्षीस मिळावे ही अपेक्षा तुम्ही सोडून दिलीत आणि ‘ईश्वरा’कडून मिळणारी व कधीही व्यर्थ न जाणारी बक्षिसी हीच एकमेव मिळविण्यासारखी गोष्ट आहे हे तुम्हाला समजले – एकदा का तुम्ही सर्व बाह्य व्यक्ती व वस्तू यांविषयीची आसक्ती सोडून दिलीत की मग ‘ईश्वरा’ची ‘उपस्थिती’, त्याची ‘शक्ती’, तुमच्या सोबत सदैव असणारी त्याची ‘कृपा’ तुम्हाला तुमच्या हृदयात लगेचच जाणवू लागते.

आणि दुसरा काहीच उपाय नाही. प्रत्येकासाठी अगदी निरपवादपणे हाच एकमेव उपाय आहे. जे जे कोणी दु:ख भोगतात त्यांना एकच गोष्ट सांगितली पाहिजे की, दु:ख असणे हे ‘समर्पण’ परिपूर्ण नसल्याचे चिन्ह आहे. त्यानंतर पुढे जेव्हा कधी तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा ‘आघात’ जाणवतो तेव्हा त्यावेळी मग “छे! किती वाईट आहे हे” किंवा परिस्थिती किती कठीण आहे” असे तुम्ही म्हणत नाही. तर आता तुम्ही म्हणता, “माझेच समर्पण अजून परिपूर्ण झालेले नसेल.” आणि मग तुम्हाला ती ‘ईश्वरी कृपा’ जाणवते, जी तुम्हाला मदत करते, मार्गदर्शन करते आणि तुम्ही प्रगत होऊ लागता. आणि एक दिवस तुम्ही अशा शांतीमध्ये प्रवेश करता जी कशानेही क्षुब्ध होऊ शकणार नाही. सर्व विरोधी शक्तींना, विरोधी क्रियांना, आक्रमणांना, गैरसमजुतींना, दुर्वासनांना तुम्ही अशा स्मितहास्याने उत्तर देता जे ‘ईश्वरी कृपे’वरील पूर्ण विश्वासाने येत असते आणि तोच एक बाहेर पडण्याचा मार्ग आहे, दुसरा मार्गच नाही.

हे जग संघर्ष, दु:खभोग, अडचणी, ताणतणाव यांनी बनलेले आहे. ते अजूनही बदललेले नाही, ते बदलण्यासाठी काही काळ लागेल. पण प्रत्येकामध्ये या सगळ्यातून बाहेर पडण्याची क्षमता असते. तुम्ही जर ‘परमोच्च कृपे’च्या अस्तित्वावर विसंबून राहिलात, तर तोच केवळ एकमेव मार्ग आहे.

– श्रीमाताजी [CWM 15 : 398-399]

व्यक्तीच्या अंतरंगात ईश्वरी कृपेविषयी जर अशी श्रद्धा असेल की, ‘ईश्वरी कृपा’ माझ्याकडे लक्ष ठेवून आहे आणि काहीही झाले तरी ईश्वरी कृपा आहेच, आणि ती माझ्यावर लक्ष ठेवून आहे तर, तिच्या साहाय्याने व्यक्ती कोणत्याही संकटामधून पार होऊ शकते, व्यक्ती अशी श्रद्धा नेहमीच, आयुष्यभर बाळगू शकते. या श्रद्धेच्या साहाय्याने व्यक्ती सर्व अडचणींना सामोरी जाऊ शकते, अशा व्यक्तीला कोणतीही गोष्ट विचलित करू शकत नाही कारण तिच्यापाशी श्रद्धा असते आणि ईश्वरी कृपादेखील तिच्यासोबत असते.

श्रद्धा अनंतपटीने शक्तिशाली, अधिक सचेत, दीर्घायू अशी शक्ती असते; …ती ईश्वरी कृपेखेरीज अन्य कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नसते आणि म्हणून ती ‘सत्या’वरच विसंबून असते आणि त्यामुळे तिला कोणतीही गोष्ट विचलित करू शकत नाही.

– श्रीमाताजी [CWM 05 : 297]

कृतज्ञता – १४

प्रश्न : ‘ईश्वरी कृपा’ कृतज्ञतापूर्वक स्वीकारण्याचा मार्ग कोणता?

श्रीमाताजी : सर्वप्रथम तुम्हाला त्याची आवश्यकता जाणवली पाहिजे.

हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे त्या ईश्वरी कृपेविना तुम्ही असाहाय्य आहात याची जाणीव करून देणारी, एक विशिष्ट अशी आंतरिक विनम्रता असणे आवश्यक आहे. खरोखरच, तुम्ही त्याविना अपूर्ण आणि शक्तिहीन असता. सुरुवात करायची तर ही पहिली गोष्ट आहे. ही पहिली अट आहे…

…आणि मग, ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही सापडलेले असता, त्या परिस्थितीतून केवळ ती ईश्वरी कृपाच तुम्हाला तारू शकते, तीच तुम्हाला उपाय सुचवू शकते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी लागणारे सामर्थ्यदेखील तीच देऊ शकते, फक्त ईश्वरी ‘कृपा’च हे सारे करू शकते, अशी जाणीव जर तुम्हाला झाली तर, अगदी स्वाभाविकपणे तुमच्यामध्ये एक उत्कट आस निर्माण होते, चेतना खुलेपणात अभिव्यक्त झालेली असते. तुम्ही जर धावा कराल, आस बाळगाल आणि प्रतिसाद मिळावा अशी आशा बाळगाल तर, अगदी स्वाभाविकपणे तुम्ही त्या ईश्वरी ‘कृपे’प्रत खुले होता.

आणि नंतर ईश्वरी ‘कृपा’ तुम्हाला जो प्रतिसाद देते, त्याकडे तुम्ही अगदी बारकाईने लक्ष दिले पाहिजे, ती ‘कृपा’ तुम्हाला तुमच्या त्रासामधून बाहेर काढते, ती तुमच्या समस्येवर उपाय सुचविते किंवा तुमच्या अडचणीमधून बाहेर पडण्यास तुम्हाला साहाय्य करते. पण एकदा का तुमची त्या त्रासापासून सुटका झाली आणि तुम्ही त्या अडचणीमधून बाहेर आलात तर, तुम्हाला त्यातून बाहेर काढणारी ‘ईश्वरी कृपा’च होती, हे तुम्ही विसरता कामा नये; तुम्हीच स्वतःला त्या परिस्थितीतून बाहेर काढले आहे, असे समजता कामा नये. हा खरोखरच, महत्त्वाचा मुद्दा आहे. अडचण दूर झाली की, लगेचच बहुसंख्य लोक असे म्हणतात, “त्या अडचणीतून मी स्वतःला कसे बाहेर काढले, माझे मलाच माहीत.”

तर हे सारे असे असते. आणि नंतर तुम्ही कडीकोयंडा लावून दरवाजा बंद करून टाकता आणि त्यानंतर मग तुम्ही काहीही ग्रहण करू शकत नाही. तुमच्या अशा प्रकारच्या आंतरिक मूर्खपणापासून स्वतःला बाहेर काढण्यासाठी तुम्ही स्वतः काहीच करू शकत नाही, याची तुम्हाला पुन्हा एकदा जाणीव व्हावी म्हणून, पुन्हा एखादा तीव्र झटका, एखादी भयानक अडचण आवश्यक होऊन बसते. कारण आपण शक्तिहीन आहोत याची जाणीव जेव्हा तुमच्यामध्ये वाढू लागते तेव्हाच, तुम्ही थोडेसे खुले आणि लवचीक होऊ लागता. कारण, तुम्ही जे काही करता ते तुमच्या स्वतःच्या कौशल्यावर आणि तुमच्या स्वतःच्या क्षमतांवर अवलंबून आहे असे जोपर्यंत तुम्हाला वाटत असते तोपर्यंत, तुम्ही एकच दरवाजा बंद करता असे नाही, तर खरोखरच तुम्ही एकापाठोपाठ अनेक दरवाजे बंद करत असता, अगदी कडीकोयंडे लावून ते बंद करत असता. तुम्ही जणू काही एखाद्या गढीमध्ये स्वतःला बंद करून घेता आणि मग त्यामध्ये कोणत्याच गोष्टीचा प्रवेश होऊ शकत नाही. ही मोठीच उणीव आहे, व्यक्ती चटकन साऱ्या गोष्टी विसरून जाते. स्वाभाविकपणे ती स्वतःच्याच क्षमतांवर समाधानी राहते.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 322-323)

कृतज्ञता – १४

प्रश्न : ‘ईश्वरी कृपा’ कृतज्ञतापूर्वक स्वीकारण्याचा मार्ग कोणता?

श्रीमाताजी : सर्वप्रथम तुम्हाला त्याची आवश्यकता जाणवली पाहिजे. हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे त्या ईश्वरी कृपेविना तुम्ही असाहाय्य आहात याची जाणीव करून देणारी, एक विशिष्ट अशी आंतरिक विनम्रता असणे आवश्यक आहे. खरोखरच, तुम्ही त्याविना अपूर्ण आणि शक्तिहीन असता. सुरुवात करायची झाली तर ही पहिली गोष्ट आहे.

ही पहिली अट आहे. आणि मग, ज्या परिस्थितिमध्ये तुम्ही सापडलेले असता, त्या परिस्थितितून केवळ ती ईश्वरी कृपाच तुम्हाला तारू शकते, तीच तुम्हाला उपाय सुचवू शकते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी लागणारे सामर्थ्यदेखील तीच देऊ शकते, फक्त ईश्वरी ‘कृपा’च हे सारे करू शकते, अशी जाणीव जर तुम्हाला झाली तर, अगदी स्वाभाविकपणे तुमच्यामध्ये एक उत्कट आस निर्माण होते, चेतना खुलेपणात अभिव्यक्त झालेली असते. तुम्ही जर धावा कराल, आस बाळगाल आणि प्रतिसाद मिळावा अशी आशा बाळगाल तर, अगदी स्वाभाविकपणे तुम्ही त्या ईश्वरी ‘कृपे’प्रत खुले होता.

आणि नंतर ईश्वरी ‘कृपा’ तुम्हाला जो प्रतिसाद देते, त्याकडे तुम्ही अगदी बारकाईने लक्ष दिले पाहिजे, ती ‘कृपा’ तुम्हाला तुमच्या त्रासामधून बाहेर काढते, ती तुमच्या समस्येवर उपाय सुचविते किंवा तुमच्या अडचणीमधून बाहेर पडण्यास तुम्हाला साहाय्य करते. पण एकदा का तुमची त्या त्रासापासून सुटका झाली आणि तुम्ही त्या अडचणीमधून बाहेर आलात तर, तुम्हाला त्यातून बाहेर काढणारी ‘ईश्वरी कृपा’ होती, हे तुम्ही विसरता कामा नये; तुम्हीच स्वतःला त्या परिस्थितितून बाहेर काढले आहे, असे समजता कामा नये. हा खरोखरच, महत्त्वाचा मुद्दा आहे. अडचण दूर झाली की, लगेचच बहुतेकजण असे म्हणतात, “त्या अडचणीतून मी मला कसे बाहेर काढले, माझे मलाच माहीत.”

तर हे सारे असे असते.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 322-323)

विचार शलाका – ३३

 

“खरोखर, ‘ईश्वर’च साऱ्या करुणेचा मूळस्रोत असतो, जर तुम्ही पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका करत राहिला नाहीत तर, तुमच्या साऱ्या चुका नाहीशा करण्याचे सामर्थ्य त्याच्यापाशीच असते; खऱ्या साक्षात्काराचा मार्ग खुला करणारा ‘ईश्वर’च असतो.”

 

श्रीमाताजींचे हे विधान इ. स. १९६१ मध्ये जेव्हा प्रथम प्रकाशित झाले तेव्हा, या विधानावर भाष्य करताना श्रीमाताजी म्हणाल्या की, ”व्यक्ती जोवर त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा करत राहते तोपर्यंत त्या चुका नाहीशा होऊ शकत नाहीत, कारण व्यक्ती प्रत्येक क्षणाला त्या चुका नव्याने करत असते. जेव्हा एखादी व्यक्ती चूक करते, मग ती गंभीर असो किंवा नसो, त्या चुकीचे तिच्या जीवनात काही परिणाम होतातच, ते ‘कर्म’ संपुष्टात आणावेच लागते, पण व्यक्ती जर त्या ‘ईश्वरी कृपे’ कडे वळेल तर त्या ‘कृपे’मध्ये, ते परिणाम नष्ट करण्याची शक्ती असते; पण यासाठी व्यक्तीने त्याच त्या चुकीची पुनरावृत्ती करता कामा नये. व्यक्ती त्याच त्याच मूर्खपणाच्या गोष्टी अनंत काळ करत राहील आणि ‘ईश्वरी कृपा’देखील त्याच्या परिणामांचा निरास अनंत काळ करत राहील, असे व्यक्तीने कदापिही समजता कामा नये, कारण हे असे घडत नसते.

 

भूतकाळ पूर्णपणे स्वच्छ केला जाऊ शकतो; त्याचा भविष्यावर कोणताही परिणाम होणार नाही इतका तो विशुद्ध केला जाऊ शकतो; परंतु व्यक्तीने तिची भूतकालीन अवस्था पुन्हा कायमस्वरूपी वर्तमानात ओढता कामा नये, या एकाच अटीवर हे होऊ शकते; तुम्ही स्वत: तुमच्यातील वाईट स्पंदनांना थांबविले पाहिजे, तुम्ही तेच ते स्पंदन पुन्हा पुन्हा अनंत काळ निर्माण करत राहता कामा नये.”

 

– श्रीमाताजी

(CWM 09 : 58)

विचार शलाका – ११

आपण कोणीच नाही, आपण काहीच करू शकत नाही, आपले अस्तित्वच नाही, आपण काहीच नाही, दिव्य ‘चेतना’ आणि दिव्य ‘कृपा’ यांच्याविना कोणते अस्तित्वच नाही हे खोलवर कळण्यासाठी आयुष्यात कितीतरी टक्केटोणपे खावे लागतात. आणि ज्या क्षणी माणसाला हे उमगते, त्या क्षणीच सारे दुःखभोग संपून जातात, त्याचवेळी साऱ्या अडचणी दूर होतात. एखाद्याला जेव्हा हे पूर्णार्थाने कळते आणि विरोध करणारे काहीच शिल्लक रहात नाही… पण त्या क्षणापर्यंतच… तो क्षण यायलाच खूप वेळ लागतो. …हे न विसरण्याइतकी जर एखादी व्यक्ती भाग्यवान असेल तर ती या मार्गावर वेगाने पुढे जाऊ शकते.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 323-324)