Posts

साधना, योग आणि रूपांतरण – २२७

सर्वसाधारणपणे आपण अज्ञानामध्ये जीवन जगत असतो आणि आपल्याला ‘ईश्वर’ काय आहे हे माहीत नसते. सामान्य प्रकृतीच्या शक्ती या अ-दिव्य शक्ती असतात कारण त्या अहंकार, इच्छावासना आणि अचेतनेचा जणू एक पडदाच विणतात की, ज्यामुळे ‘ईश्वर’ आपल्यापासून झाकलेला राहतो. जी चेतना, ‘ईश्वर’ काय आहे ते जाणते आणि त्यामध्ये जाणीवपूर्वक निवास करते, अशा उच्चतर आणि गहन, सखोल चेतनेमध्ये आपला प्रवेश व्हायचा असेल तर, कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींपासून आपली सुटका झाली पाहिजे आणि ‘दिव्य शक्ती’च्या कृतीसाठी आपण स्वतःला खुले केले पाहिजे; म्हणजे मग ती ‘दिव्य शक्ती’ आपल्या चेतनेचे ‘दिव्य प्रकृती’मध्ये रूपांतरण घडवून आणेल.

‘दिव्यत्वा’च्या या संकल्पनेपासून आपण प्रारंभ केला पाहिजे; त्याच्या सत्याचा साक्षात्कार चेतनेच्या विकसनातून आणि तिच्या परिवर्तनामधूनच होणे शक्य आहे.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 07-08)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१६)

चेतनेच्या दोन अवस्था असतात; त्यांपैकी कोणत्याही एका अवस्थेमध्ये व्यक्ती जीवन जगू शकते. एक अवस्था असते ती म्हणजे जीवनलीलेच्या वर राहून तिला नियंत्रित करणारी ‘उच्चतर चेतना’. तिला ‘जीवात्मा’, ‘आत्मा’, ‘ईश्वर’ अशा विविध नावांनी संबोधण्यात येते. दुसरी अवस्था असते ती म्हणजे, माणसं ज्या चेतनेमध्ये जगत असतात ती ‘सामान्य चेतना.’ ही चेतना काहीशी वरवरची असते आणि ती जीवनलीलेसाठी ‘आत्म्या’ चे एक साधन म्हणून उपयोगात आणली जाते.

सामान्य चेतनेमध्ये राहून कृती करणारी, जीवन जगणारी माणसं मनाच्या सामान्य आंदोलनांनी संपूर्णपणे संचालित केली जातात आणि ती साहजिकच दुःख, सुख व काळजी, इच्छावासना आणि तत्सम सर्व गोष्टींच्या, म्हणजे ज्या गोष्टींनी हे सर्वसामान्य जीवन बनलेले असते, त्या गोष्टींच्या आधीन असतात. त्यांना मानसिक शांती आणि आनंद मिळू शकतो, पण ती शांती आणि तो आनंद कधीच चिरस्थायी किंवा सुरक्षित असू शकत नाही.

प्रकाश, शांती, शक्ती आणि परमानंद या सर्व गोष्टी म्हणजे ‘आध्यात्मिक चेतना.’ एखादी व्यक्ती जर संपूर्णपणे अशा चेतनेमध्येच राहू शकली तर काही प्रश्नच नाही; स्वाभाविकपणे आणि सुरक्षितपणे या सर्व गोष्टी तिला लाभतात. पण एखादी व्यक्ती अंशत: जरी त्यामध्ये राहू शकली किंवा व्यक्तीने स्वतःला सातत्यपूर्वक त्या चेतनेप्रत खुले ठेवले, तर जीवनातील धक्क्यांमधून सुरक्षितरित्या बाहेर पडण्यासाठी पुरेशा प्रमाणात आध्यात्मिक प्रकाश, शांती, सामर्थ्य आणि आनंद या गोष्टी तिला प्राप्त होतात. या आध्यात्मिक चेतनेला खुले झाल्याचा परिणाम म्हणून त्या व्यक्तीला काय प्राप्त होणार आहे हे ती व्यक्ती कशाचा शोध घेत आहे, यावर अवलंबून असते; व्यक्ती जर शांतीच्या शोधात असेल तर तिला शांती लाभते; व्यक्तीला जर प्रकाश वा ज्ञान हवे असेल तर ती महान प्रकाशामध्ये जीवन जगू लागते आणि सामान्य माणसाचे मन मिळवू शकेल त्यापेक्षा कितीतरी अधिक सखोल व अधिक सत्य असे ज्ञान तिला प्राप्त होते. व्यक्ती जर शक्ती वा सामर्थ्य मिळवू इच्छित असेल तर व्यक्तीला आंतरिक जीवनासाठी आध्यात्मिक सामर्थ्य किंवा बाह्य कार्य व कृती यांचे नियमन करणारी ‘योगिक’ शक्ती प्राप्त होते; अशा व्यक्तीला जर आनंद हवा असेल तर, सामान्य मानवी जीवन देऊ शकते अशा हर्ष व आनंदापेक्षा कितीतरी अधिक महान अशा परमानंदामध्ये ती व्यक्ती प्रविष्ट होते.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 440-441)

तुम्ही जेव्हा योगमार्गाकडे वळता तेव्हा, तुमच्या सर्व मानसिक रचना आणि तुमचे सर्व प्राणिक मनोरे कोलमडून पडले तरी चालतील अशी स्वत:ची तयारी ठेवली पाहिजे. तुमच्या श्रद्धेखेरीज तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीचा आधार नाही अशा निराधार अवस्थेत हवेत लोंबकळत राहण्याची तुमची तयारी असली पाहिजे. तुम्ही तुमचा भूतकालीन ‘स्व’ आणि त्याला चिकटून असलेले सर्व काही पूर्णांशाने विसरले पाहिजे, तुमच्या चेतनेमधून त्या गोष्टी तुम्ही बाहेर काढून टाकल्या पाहिजेत आणि सर्व प्रकारच्या बंधनांपासून मुक्त अशा स्थितीत नव्याने जन्माला आले पाहिजे.

तुम्ही काय होतात याचा विचार करू नका, तर तुम्ही काय बनण्याची इच्छा बाळगता त्याचाच विचार करा; तुम्ही जे प्रत्यक्षात अनुभवू इच्छित आहात त्या विचारांमध्येच तुम्ही असले पाहिजे. तुमच्या मृत भूतकाळाकडे पाठ फिरवा आणि थेट भविष्याकडे पाहा. ‘ईश्वर’ हाच तुमचा धर्म, ईश्वर हाच तुमचा देश, ईश्वर हेच तुमचे कुटुंब.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 83-84)

श्रीअरविंद : निर्भरतेची वृत्ती हे परिपूर्ण साधनेचे महान रहस्य आहे. कोणतीही परिस्थिती असली तरी किंवा कोणतीही अडचण आली तरी, ईश्वरावर विसंबून राहणे म्हणजे ‘निर्भर’ असणे. जेव्हा सारे काही सुरळीत चालू असते तेव्हा ‘निर्भर’ असणे याला विशेष काही अर्थ नाही.

साधक : जेव्हा प्राणाचा क्षोभ होतो तेव्हा हे निर्भर असणे मी कायम कसे टिकवून ठेवू ? नकार देऊन ? की अलिप्त राहून ?

श्रीअरविंद : प्रथम अलिप्तता, नंतर अलिप्ततेसहित नकार.

साधक : पण जेव्हा आतूनच एक प्रकारचा असमाधानाचा सूक्ष्मसा ताण जाणवत असतो तेव्हा मी स्वतःला अलिप्त कसे ठेवू?

श्रीअरविंद : त्या असमाधानापासून अलिप्त होऊन. …स्वतःमधील जो ‘साक्षी’ आहे त्याने मागे उभे राहणे आणि येणाऱ्या स्पंदनांकडे ती स्वतःची (आपल्या आत्म्याची स्पंदने) आहेत असे समजण्यास नकार देणे, ती स्पंदने म्हणजे आपल्या गतकालीन प्रकृतीची सवय आहे किंवा सार्वत्रिक प्रकृतीचे आपल्यावर झालेले आक्रमण आहे, अशा रीतीने त्यांच्याकडे पाहाणे. असे समजून त्यांना हाताळणे म्हणजे अलिप्त होणे. हे अवघड आहे असे वाटू शकते पण व्यक्ती चिकाटीने प्रयत्न करत राहिली तर तिला ते चांगल्या रीतीने साध्य होते.

– [Nirodbaran’s Correspondence with Sri Aurobindo, Vol. II : 650-657]

श्रीमाताजी : मी तुम्हाला काय सांगितले ते लक्षात असू दे. ‘मी’चा शोध घेण्यासाठी कष्ट घ्या. तुमच्यासमोर जो मार्ग मी आखून दिला आहे त्यावर मार्गक्रमण करा. या कार्याइतके अन्य कोणतेच कार्य महत्त्वाचे नाही. याच्याशी तुलना करता इतर कोणतेच कार्य इतके महत्त्वाचे नाही. ‘ईश्वरा’चा शोध घ्यायचा. हेच जीवन आहे, हेच ध्येय आहे, हाच आनंदठेवा आहे. ‘ईश्वरा’वर निस्सीम ‘प्रेम’ करा जेणेकरून ‘तो’ नेहमीच तुमच्यासोबत राहील. सर्व कार्याचा कर्ता-करविता ‘तो’च असू द्यावा. ‘तो’ तुमच्यासोबत कर्म करतो. ‘तो’ तुमच्याबरोबर धडपड करतो, प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. ‘तो’ प्रत्येक पावलागणिक तुम्हाला मार्गदर्शन करतो. फक्त ‘ईश्वर’च.

– [The Supreme by Mona Sarkar : 97]

व्यक्तीमधील ‘आत्मा’ आणि वैश्विक ‘आत्मा’ हे एकच आहेत; प्रत्येक विश्वामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक वस्तुमध्ये, प्रत्येक कणामध्ये दिव्य अस्तित्व आहे आणि त्याचे आविष्करण करणे हे माणसाचे जीवितकार्य आहे. ते कार्य करण्यासाठी व्यक्तीला आधी त्याच्या अंतरंगात असणाऱ्या या ‘ईश्वरी अस्तित्वा’ची जाणीव झाली पाहिजे. …एकदा का ही सखोल चेतना प्राप्त करून घेतली की मग मात्र आपली भूमिकाच बदलून जाते. त्यामुळे आपले आकलन व्यापक होते, आपल्यामध्ये करूणेचा उदय होतो.

– श्रीमाताजी [CWM 02 : 41-42]

व्यक्तीमध्ये जर ‘ईश्वरा’चे अस्तित्व नसते, व्यक्तीच्या गाभ्यामध्ये जर ‘ईश्वरा’चे अस्तित्वच नसते, तर व्यक्तीला ‘ईश्वरा’ची जाणीव कधीच होऊ शकली नसती, ती एक अशक्यप्राय गोष्ट ठरली असती. …तुमच्या अंतरंगामध्ये ‘ईश्वर’ आहे आणि तुम्ही ‘ईश्वरा’मध्ये आहात, हे ज्या क्षणी तुम्हाला या किंवा त्या मार्गाने आकलन होते, जाणवते, किंवा जाणवायला सुरूवात होते, आणि जेव्हा तुम्ही ते मान्य करता, तेव्हा तुमचे दार साक्षात्काराच्या दिशेने किंचितसे खुले होते, किलकिले होते. नंतर कधीतरी मग अभीप्सा निर्माण झाली, ‘ईश्वरा’ला जाणून घेण्याची आणि ‘ईश्वर’च बनण्याची तीव्र निकड निर्माण झाली तर त्यामुळे, म्हणजे त्या तीव्र निकडीमुळे, ते किलकिले झालेले दार, व्यक्तीचा आतपर्यंत शिरकाव होईल इतके खुले होते. आणि एकदा का व्यक्तीचा आत शिरकाव झाला की, व्यक्तीला ‘आपण कोण आहोत’ याची जाणीव होते.

– श्रीमाताजी [CWM 07 : 236]

साधनेची मुळाक्षरे – २३

(श्रीअरविंद The Mother या ग्रंथामध्ये श्रीमाताजींचे स्वरूप उलगडवून दाखवीत आहेत, त्या ग्रंथातील हा अंशभाग…)

त्या एकमेवाद्वितीय आद्य विश्वातीत ‘शक्ती’चे – ‘श्रीमाताजीं’चे स्थान सर्व विश्वांच्या वर असते आणि त्या स्वतःमध्ये ‘परम ईश्वरा’ची शाश्वत चेतना बाळगून असतात. त्या एकट्या, परम ‘शक्ती’ आणि अनिर्वचनीय अशी ‘उपस्थिती’ स्वतःमध्ये साठवून असतात; जी ‘सत्यं’ आविष्कृत होणे आवश्यकच आहेत अशा ‘सत्यां’ना त्यांनी साद घातलेली असते; अशी सत्यं त्यांनी स्वतःमध्ये सामावून घेतलेली असतात; श्रीमाताजींच्या अनंत चेतनेच्या प्रकाशामध्ये गुप्त असणारी अशी जी सत्यं असतात, ती ‘सत्यं’ ‘परमरहस्या’मधून त्या खाली आणतात आणि श्रीमाताजी स्वत:च्या सर्वसामर्थ्यवान शक्तीमध्ये व असीम जीवनामध्ये आणि विश्वगत शरीरामध्ये, त्या सत्यांना शक्तिरूप प्रदान करतात. ‘परमेश्वर’ श्रीमाताजींमध्ये शाश्वत ‘सच्चिदानंद’ म्हणून कायमस्वरूपी आविष्कृत झालेला आहे; श्रीमाताजींद्वारे तो विश्वांमध्ये ‘ईश्वर-शक्ती’ या एका आणि दुहेरी चेतनेमध्ये आणि ‘पुरुष-प्रकृती’ या दुहेरी ‘तत्त्वां’द्वारे आविष्कृत झालेला आहे; श्रीमाताजींद्वारे त्याने ‘विश्वां’मध्ये आणि विविध ‘स्तरां’वर, ‘देवदेवता’ आणि त्यांच्या ‘शक्ती’ यांच्या माध्यमातून मूर्तरूप धारण केले आहे; आणि ज्ञात तसेच अज्ञात विश्वांमधील सर्वकाही त्यांच्याचमुळे साकार झाले आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 14-15)

साधनेची मुळाक्षरे – २२

एकमेव ‘ईश्वर’च सत्य आहे – उर्वरित सर्व मिथ्या आहे. आणि असे असूनसुद्धा ‘ईश्वर’च सर्वत्र आहे – संतांमध्ये आणि पापी व्यक्तीमध्ये सुद्धा तो विद्यमान आहे.

*

एकमेव ‘ईश्वर’च सत्य आहे – उर्वरित सर्व भ्रम आहे. आणि असे असूनसुद्धा ‘ईश्वर’च सर्वत्र व्यापलेला आहे – ऋषीमुनींमध्ये आणि अज्ञानी व्यक्तीमध्ये सुद्धा तो विद्यमान आहे.

*

एकमेव ‘ईश्वर’च प्रेम आहे – उर्वरित सर्व गोष्टी म्हणजे स्वार्थी भावुकता आहे. परंतु ‘ईश्वरी’ प्रेम हे सर्वत्र आणि सर्व वस्तुमात्रांमध्ये विद्यमान आहे.

– श्रीमाताजी
(White Roses : 37-38)

साधनेची मुळाक्षरे – २१

एक गोष्ट अगदी एक क्षणभरसुद्धा विसरू नका की, हे सारे त्या परमेश्वराने निर्माण केले आहे, ‘त्या’ने ते स्वतःमधूनच निर्माण केलेले आहे. ‘तो’ या साऱ्यांमध्ये फक्त उपस्थितच आहे असे नाही तर, ‘तो’ स्वतःच हे सारेकाही आहे. केवळ अभिव्यक्ती आणि आविष्करण यामध्ये एवढाच काय तो फरक आहे.

तुम्ही ही गोष्ट विसरलात तर, सर्वकाही गमावून बसाल.

*

साधक : ‘ईश्वर’ सर्व वस्तुमात्रांमध्येच, म्हणजे अगदी कचरापेटीमध्ये देखील असतो का?

श्रीमाताजी : हे संपूर्ण विश्व ‘ईश्वरा’चे आविष्करण आहे, परंतु या आविष्करणाचा प्रारंभ उगमाशी असलेल्या अगदी अचेतनतेपासून होतो आणि तेथून ते या चेतनेप्रत हळूहळू उन्नत होत राहते.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 05)