Tag Archive for: अतिमानस

शारीरिक परिवर्तन

…तुमच्या शरीराची घडण कशी झाली? सर्व अवयव, सर्व कार्ये यांची घडण ही अगदी प्राण्यांच्या पद्धतीने झाली. तुम्ही पूर्णतः अवलंबून असता : तुमचे हृदय सेकंदाच्या हजाराव्या भागाइतका वेळ जरी बंद पडले तरी सगळे संपते, तुम्ही मरण पावता. सर्व गोष्टी चालू असतात आणि त्या आपोआप चालू असतात, तुमच्या जागृत इच्छेविना चालू असतात (आणि ते चांगलेच आहे, कारण जर तुम्हाला या साऱ्या कारभारावर देखरेख करावी लागली असती तर, तो सारा कारभार केव्हाच चुकीच्या दिशेने गेला असता.) तेव्हा सारे काही चालू असते. प्रत्येक गोष्ट आवश्यक असते कारण प्रत्येक गोष्ट त्याच पद्धतीने सुनियोजित करण्यात आली आहे. इंद्रियाशिवाय तुम्ही कार्य करू शकत नाही, निदान पूर्णतः तरी करू शकत नाही; त्याचे प्रतिनिधित्व करणारे असे तुमच्यामध्ये काहीतरी असावे लागते.

रूपांतरामध्ये हे अध्याहृत आहे की, या सगळ्या पूर्णत: शारीरिक व्यवस्थेची जागा ही ठरावीक प्रकारच्या विविध स्पंदनांनी युक्त अशा शक्तिसंचयाच्या व्यवस्थेने घेतली जाईल; प्रत्येक इंद्रिय-अवयवाची जागा, जागृत इच्छाशक्तिद्वारे संचालित होणाऱ्या आणि उच्चतर प्रांतामधून, वरून येणाऱ्या प्रक्रियेने जिला दिशा मिळत असते अशा एका जागृत शक्तिकेंद्राने घेतली जाईल. तेव्हा मग पोट, हृदय या गोष्टीच असणार नाहीत, रक्ताभिसरण नाही, फुफ्फुसे नाहीत… या साऱ्या गोष्टी नाहीशा होतील. हे सर्व इंद्रिय-अवयव ज्याचे प्रतीक असतात त्या गोष्टींचे प्रतिनिधित्व या स्पंदनांच्या पूर्ण संचाद्वारे केले जाईल आणि हे संच त्या अवयवांची जागा घेतील. कारण हे इंद्रिय-अवयव म्हणजे शक्तिकेंद्रांची केवळ भौतिक प्रतीके असतात; त्यांना मूलभूत अशी वास्तविकता नसते; तर या गोष्टी विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या शक्तिकेंद्रांना एक विशिष्ट रूप किंवा एक आधार पुरवितात. तेव्हा मग हे रूपांतरित शरीर या खऱ्या शक्तिकेंद्रांमार्फत कार्य करू लागेल. त्यामुळे, प्राण्यांच्या शरीरामध्ये ज्याप्रमाणे इंद्रिय-अवयव हे शक्तिकेंद्रांची प्रतीके म्हणून विकसित झाले होते, त्या प्रतीकात्मक प्रतिनिधींच्या मार्फत कार्य करण्याची गरज रूपांतरित शरीराला आता उरणार नाही.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 58-59)

अमर्त्यत्व समजून घेताना

अमर्त्यत्व या शब्दाबद्दल काही गैरसमज आहेत आणि हे समज काही नवीन नाहीत; हे गैरसमज वारंवार होताना आढळतात. अमर्त्यत्वाविषयी जेव्हा कोणी बोलतो तेव्हा बहुतेक सगळ्यांना शरीराचे अस्तित्व अनंत काळ टिकून राहणार असे वाटते.

पहिली गोष्ट म्हणजे, शरीर अनंत काळपर्यंत तेव्हाच टिकून राहू शकते जेव्हा, त्याला त्याच्या अमर्त्य आत्म्याविषयी पूर्ण जाणीव होते आणि ते त्या आत्म्याशी एकत्व पावते, शरीर त्याच्याशी इतके तादात्म्य पावते की, शरीरालासुद्धा आत्म्यासमान क्षमता प्राप्त होते, सातत्यपूर्ण रूपांतरणाचे तसेच गुण प्राप्त होतात ज्यामुळे शरीरसुद्धा वैश्विक गतिविधीचे अनुसरण करण्याइतपत सक्षम होते. शरीर जर टिकून राहायचे असेल तर त्यासाठी ही अगदी पूर्णपणे अनिवार्य अशी गोष्ट आहे. कारण शरीर हे कठीण (rigid) असते, कारण ते गतिविधींचे अनुसरण करत नाही, वैश्विक उत्क्रांतीशी सातत्याने तादात्म्य पावण्यासाठी स्वतःमध्ये जे त्वरेने रूपांतरण घडवून आणले पाहिजे तसे ते करू शकत नाही, त्याचे विघटन होते आणि ते नष्ट होते. त्याचा अडेलतट्टूपणा, त्याचे काठिण्य, त्याची स्वतःचे रूपांतरण करण्याची अक्षमता या गोष्टींमुळेच त्याचा विनाश आवश्यक होऊन बसतो, त्यामुळे त्याचे मूलद्रव्य (substance) हे भौतिक मूलद्रव्यांच्या सर्वसाधारण प्रांतामध्ये परत जाऊन मिसळू शकते; ज्यामुळे त्या शरीराची पुन्हा नव्या रूपांमध्ये पुनर्घडण होऊ शकते आणि अशा प्रकारे ते पुढील प्रगती करायला सक्षम होते. पण सहसा, जेव्हा कोणी अमर्त्यत्वाविषयी बोलतो, तेव्हा माणसं शारीरिक अमर्त्यत्वाचाच विचार करतात – ते अजूनपर्यंत साध्य झालेले नाही, हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही.

शारीरिक अमर्त्यत्व शक्य आहे असे श्रीअरविंद सांगतात आणि ते असेही सांगतात की, असे अमर्त्यत्व घडून येईल; परंतु ते त्यासाठी एक अट घालतात, ती अशी की, त्यासाठी शरीराचे अतिमानसिकीकरण (supramentalised) झाले पाहिजे, त्याच्यामध्ये अतिमानसिक जिवाचे काही गुण तरी असले पाहिजेत, विकासानुगामित्व (plasticity) आणि सातत्यपूर्ण रूपांतर हे ते गुण आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 28-29)

शारीरिक अमर्त्यत्वाचे सार

चेतनेमधील परिवर्तन ही आवश्यक गोष्ट आहे आणि त्याशिवाय कोणतीही शारीरिक सिद्धी मिळणे शक्य नाही. शरीर जर आहे तसेच राहिले, ते जर मृत्युचे, रोगाचे, क्षय, वेदना, अचेतनता आणि अज्ञानाच्या साऱ्या परिणामांचे गुलाम बनून राहिले, तर अतिमानसिक परिवर्तनाचे पूर्णत्व शक्य नाही. ह्या गोष्टी जर राहणारच असतील तर अतिमानसाच्या अवतरणाची (Descent of the Supramental) काहीच आवश्यकता नाही कारण ईश्वराबरोबर मानसिक व आध्यात्मिकरित्या एकत्व साध्य करण्यासाठी आवश्यक असे चेतनेमधील परिवर्तन घडण्यासाठी, केवळ अधिमानस (The Overmind) पुरेसे आहे, इतकेच काय उच्च मन (The Higher Mind) देखील पुरेसे आहे. मन, प्राण आणि शरीर यांच्यामध्ये ‘सत्या’चे गतिशील कार्य घडून येण्यासाठी अतिमानसिक अवतरण आवश्यक आहे. याचा अंतिम परिणाम म्हणून देहामधून अचेतनता नाहीशी होणे अंतर्भूत असेल; असे शरीर मग ऱ्हास आणि आजाराच्या अधीन राहणार नाही. ज्या सर्वसामान्य प्रक्रियांमुळे मृत्यु ओढवतो त्या प्रक्रियांच्याही अधीन शरीर राहणार नाही, असा याचा अर्थ होतो. शरीरामध्ये परिवर्तन घडवून आणायचे झाले तर, त्या शरीरामध्ये निवास करणाऱ्या रहिवाशाची तशी इच्छा असली पाहिजे. हे शारीरिक अमर्त्यत्वाचे सार असेल.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 310)

प्रकृतीमध्ये खडकाकडून वनस्पतीकडे, वनस्पतीकडून पशुकडे, पशूकडून मानवाकडे, अशाप्रकारे आरोहण करणारा क्रमविकास आहे. आजवर ज्ञात असलेल्या या विकासक्रमानुसार, सध्यातरी मानव हा सर्वात वरच्या पायरीवर आहे असे दिसून येते. अर्थातच, त्यामुळे आपण या विश्वातील विकासाचा अंतिम टप्पा असून, आपल्यापेक्षा उच्चतर असे या पृथ्वीतलावर काहीही असणे शक्य नाही, असा मनुष्याचा समज झाला आहे. आणि हाच त्याचा फार मोठा गैरसमज आहे. त्याच्या भौतिक प्रकृतीच्या दृष्टीने तो आजही जवळजवळ पूर्णपणे पशुच आहे; विचार करणारा आणि बोलणारा पशू आहे इतकेच. परंतु त्याच्या भौतिक सवयी आणि सहज स्वाभाविक प्रवृत्ती पाहता तो अजूनही प्राणिदशेतच आहे. अर्थातच अशा अपूर्ण निर्मितीत प्रकृती संतुष्ट असू शकत नाही हे निश्चित. प्रकृती एक नवीन प्रजाती बनविण्याच्या प्रयत्नांत आहे. पशूच्या दृष्टीने जसा मानव,त्याप्रमाणे मानवाच्या दृष्टीने ती प्रजाती असेल. ती प्रजाती बाह्य आकाराने मानवसदृशच असेल; तरीपण तिची जाणीव मनाहून कितीतरी उच्च स्तरावरची असेल आणि ती प्रजाती अज्ञानाच्या दास्यत्वातून पूर्णपणे मुक्त झालेली असेल.

मानवाला हे सत्य अवगत करून देण्यासाठी श्रीअरविंद या पृथ्वीतलावर आले. मानसिक जाणिवेमध्ये जगणारा मानव हा केवळ एक संक्रमणशील जीव आहे; परंतु एक नवी चेतना, सत्य-चेतना प्राप्त करून घेण्याची क्षमता असणारा आणि एक पूर्णतया सुसंवादपूर्ण, कल्याणकारी, सुंदर, आनंदी आणि पूर्ण जाणीवयुक्त जीवन जगण्याची क्षमता असणारा असा तो जीव आहे, असे त्यांनी मानवाला सांगितले. ही सत्यचेतना, जिला ते ‘अतिमानस’ (SupraMental consciousness) असे संबोधत असत, ती चेतना स्वत:मध्ये प्रस्थापित करण्यासाठी, आणि त्यांच्या भोवती जमलेल्या साधकांना देखील त्या चेतनेची अनुभूती यावी म्हणून साहाय्य करण्यासाठी, श्रीअरविंदांनी या पृथ्वीतलावर त्यांचा संपूर्ण आयुष्यभराचा वेळ देऊ केला.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 116)

एकत्व – ०२

 

आपण जर एखाद्या धार्मिक संघटनेचे उदाहरण घेतले – तर त्या संघाचे प्रतीक म्हणजे मठासारख्या वास्तुरचना, एकसमान पोषाख, एकसमान उपक्रम, एकसमान हालचालीसुद्धा असतात. मी अधिक स्पष्ट करून सांगते. प्रत्येकजण एकसारखाच गणवेश परिधान करेल, प्रत्येक जण सकाळी ठरावीक वेळीच उठेल, एकसारख्याच प्रकारचे अन्नग्रहण करेल, एकत्रितपणे येऊन समानच प्रार्थना करतील इ. ह्याला एक सर्वसाधारण अशी एकसमानता म्हणता येईल. आणि साहजिकपणेच, आंतरिकदृष्ट्या तेथे जाणिवांचा गोंधळ आढळून येतो, कारण प्रत्येक जण त्याच्या त्याच्या पद्धतीने वागत असतो. ही अशी एकरूपता जी विश्वास आणि विशिष्ट मतप्रणालीवर आधारित असते ती, सर्वस्वी ‘आभासी एकरूपता’ असते.

माणसांमध्ये ही अशी सामूहिकता नेहमी पाहावयास मिळते. समूहाने एकत्र यायचे, संबंधित राहायचे, एखाद्या समान आदर्शाभोवती, समान कृतीभोवती, समान साक्षात्काराभोवती एकसंघ राहावयाचे पण हे सारे काहीशा कृत्रिम पद्धतीने चालते. याउलट, श्रीअरविंद येथे खराखुरा समुदाय काय असतो ते सांगत आहेत – त्याला त्यांनी ‘विज्ञान वा अतिमानसिक समुदाय’ असे म्हटले आहे – असा हा समुदाय त्यातील प्रत्येक घटकाच्या आंतरिक साक्षात्काराच्या पायावरच उभा राहू शकतो. त्यातील प्रत्येक घटक हा त्या समुदायातील इतर घटकांबरोबरच्या खऱ्याखुऱ्या, मूर्त अशा एकात्मतेसाठी, एकरूपतेसाठी झटत असतो. म्हणजे असे की, समुदायातील इतर सर्व घटकांशी या ना त्या प्रकारे एखादा घटक जोडला गेलेला आहे, असे नव्हे; तर, त्यातील प्रत्येक घटक हा इतरांशी आंतरिकरित्या, सगळेजण म्हणजे जणू एकच आहेत ह्या पद्धतीने जोडलेला असतो. प्रत्येक व्यक्तीसाठी इतर घटक हे जणूकाही त्याच्या स्वतःच्या शरीराप्रमाणेच असतील, केवळ मानसिकरित्या, कृत्रिमपणाने नाही तर, एका आंतरिक साक्षात्काराद्वारा, चेतनेच्या वास्तविकतेच्या द्वारे देखील ते तसेच असतील.

म्हणजे, ही अतिमानसिक सामुदायिकता प्रत्यक्षात उतरविण्याची आशा बाळगण्यापूर्वी, आधी प्रत्येक व्यक्तीने विज्ञानमय अस्तित्व बनावयास हवे किंवा किमान ते बनण्याकडे वाटचाल तरी केली पाहिजे. हे तर उघडच आहे की, व्यक्तिगत कार्य हे आधी पुढे गेले पाहिजे आणि सामुदायिक कार्याने त्याचे अनुसरण केले पाहिजे. परंतु प्रत्यक्षात असे होते की, कोणत्याही अमुक एखाद्या इच्छेच्या हस्तक्षेपाविनाही, सहजगत्या, व्यक्तिगत प्रगती ही समुहाच्या अवस्थेमुळे नियंत्रित केली जाते, रोखली जाते. व्यक्ती आणि समाज ह्यांच्यामध्ये परस्परावलंबित्व असते आणि व्यक्तीने कितीही प्रयत्न केला तरीही, व्यक्ती त्यापासून स्वतःला मुक्त करू शकत नाही. आणि अगदी एखाद्या व्यक्तीने, ह्या पूर्णयोगात जरी स्वतःला पार्थिव आणि मानवी जाणिवेच्या स्थितीच्या अतीत होऊन, मुक्त होण्याचा प्रयत्न केला तरीही, किमान अवचेतनेमध्ये तरी, ती व्यक्ती समूहाच्या स्थितीमुळे बांधली जाते, समूहाची स्थिती एखाद्या रोधकाप्रमाणे काम करते आणि खरंतर ती मागे खेचते. व्यक्तीने कितीही वेगाने जाण्याचा प्रयत्न केला तरी, सर्व आसक्ती आणि जबाबदाऱ्यांचे ओझे टाकून देण्याचा प्रयत्न केला तरी, अगदी काहीही असले तरीसुद्धा, अगदी एखादी व्यक्ती शिखरस्थानी असली तरीसुद्धा आणि उत्क्रांतीच्या वाटचालीमध्ये ती सर्वात पुढे असली तरीसुद्धा, सर्वांच्या साक्षात्कारावर, या पृथ्वीनिवासी समुदायाच्या स्थितीवर त्याचा साक्षात्कार अवलंबून असतो. आणि यामुळे खरोखरच व्यक्ती मागे खेचली जाते. इतकी मागे खेचली जाते की, जे घडवून आणायचे आहे ते प्रत्यक्षात येण्यासाठी, या पृथ्वीची तयारी होण्यासाठी, कधीकधी व्यक्तीला शतकानुशतके देखील थांबावे लागते.

म्हणूनच श्रीअरविंद असे म्हणतात, दुहेरी प्रक्रिया आवश्यक आहे. व्यक्तीच्या प्रगतीचे आणि साक्षात्काराचे प्रयत्न हे समग्र समुहाच्या उत्थानाच्या प्रयत्नांच्या हातात हात घालून चालले पाहिजेत, कारण व्यक्तीच्या महत्तर प्रगतीसाठी ते आवश्यक आहे. त्याला सामुहिक प्रगती असे म्हणता येईल, ह्या प्रगतीमुळे व्यक्तीला अजून एक पाऊल पुढे टाकणे शक्य होईल.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 141-42)

प्रकृतीमध्ये मूलतः चेतनेची उत्क्रांती आकाराला येत आहे, या पृथ्वीवर आध्यात्मिक विकसन होत आहे, हेच जर का या जडभौतिकामध्ये आपल्या (मनुष्याच्या) जन्म घेण्याचे गुप्त सत्य असेल तर, आज आहे तसा मनुष्य हा या उत्क्रांतीचा अखेरचा टप्पा असू शकणार नाही. कारण तो आत्म्याचा अगदी अपूर्ण आविष्कार आहे. आणि मनदेखील खूपच मर्यादित रूप आहे; व ते केवळ साधनभूत आहे. चेतनेची केवळ एक मधली पायरी म्हणजे मन आहे. त्यामुळेच मनोमय जीव (मनुष्य) हा केवळ संक्रमणशील जीवच असू शकतो.

आणि जर का मनुष्य अशा रीतीने स्वतःच्या मनोमयतेच्या अतीत जाण्यास अक्षम असेल तर, त्याला बाजूला सारून, अतिमानस आणि अतिमानव आविष्कृत झालेच पाहिजेत आणि त्यांनी या सृष्टीचे नेतृत्व केलेच पाहिजे.

परंतु मनाच्या अतीत असणाऱ्या अशा गोष्टीप्रत खुले होण्याची जर मनाचीच क्षमता असेल तर मग मनुष्याने स्वतःच अतिमानस आणि अतिमानत्वापर्यंत जाऊन का पोहोचू नये? किंवा किमान त्याने प्रकृतीमध्ये आविष्कृत होणारे आत्म्याचे जे महान तत्त्व आहे त्या उत्क्रांतीला आपली मनोमयता, आपला प्राण, आपले शरीर स्वाधीन का करू नये?

– श्रीअरविंद
(CWSA 21-22 : 879)

(उदयाला येऊ घातलेल्या अतिमानवाच्या आगमनाच्या तयारीविषयी जपानमधील स्त्रियांसमोर, श्रीमाताजी बोलत आहेत. गर्भवती स्त्रियांनी कसा दृष्टिकोन बाळगला पाहिजे, हे त्या सांगत आहेत.)

अतिमानव जन्माला यावयाचा आहे आणि तो स्त्रीच्या उदरातूनच जन्माला येणार, हे निर्विवाद सत्य आहे; पण म्हणून या सत्याविषयी केवळ अभिमान बाळगणे पुरेसे नाही; तर त्याचा अर्थ काय, हे आपण नीट समजून घेतले पाहिजे. त्यामधून आपल्यावर काय जबाबदारी येते, ह्याचे आपल्याला भान असले पाहिजे आणि आपल्यावर जे कार्य सोपविण्यात आले आहे, ते आपण अत्यंत जीव तोडून करावयास शिकले पाहिजे.

सध्याच्या विश्वव्यापक कार्यामध्ये आपल्या वाट्याला आलेले हे सर्वाधिक महत्त्वाचे कार्य आहे. यासाठी आपण सर्वप्रथम हे जाणून घेणे गरजेचे आहे की, सद्यकालीन गोंधळाचे आणि अंधकाराचे, प्रकाश आणि सुसंवादामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची माध्यमे कोणती असतील ? आणि किमान हे ढोबळमानाने तरी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

…एका नवीनच आध्यात्मिक प्रकाशाचे, आपल्याला आजवर अज्ञात असलेल्या कोणत्यातरी दिव्य शक्तीचे या पृथ्वीवर आविष्करण होणार आहे; ईश्वरासंबंधीचा एक सर्वस्वी नवीन विचार, या विश्वामध्ये अवतरणार आहे आणि इथे एक नवीनच आकार जन्माला येणार आहे. आणि इथेच आपण, ‘खऱ्याखुऱ्या मातृत्वाची आपली जबाबदारी’ या आपल्या आरंभीच्या मुद्द्याकडे येतो.

कारण या नवीन आकारातूनच, पृथ्वीची सद्यकालीन स्थिती परिवर्तित करण्यासाठी, सक्षम असणारी आध्यात्मिक शक्ती आविष्कृत होणार आहे. हा नवीन आकार, हे नवीन रूप एक स्त्री घडविणार नाही तर दुसरे कोण?

… ज्यांच्याविषयी आपण ऐकलेले असते, वा ज्यांच्याविषयी आपल्याला माहिती असते, अशा कितीही का थोर व्यक्ती असेनात, त्यांच्यासारख्या किंवा त्यांच्याही पेक्षा थोर, अधिक विख्यात, सिद्ध आणि प्रतिभावान अशी व्यक्ती वा मानव घडविणे हे आता पुरेसे नाही; तर, जी परमोच्च शक्यता आजवरच्या मानवाची सर्व परिमाणं आणि वैशिष्ट्य ओलांडून, अतिमानवाला जन्म देणार आहे; त्या परमोच्च शक्यतेच्या संपर्कात येण्यासाठी, आपण आपल्या मनाने, आपल्या विचाराच्या आणि इच्छेच्या सातत्यपूर्ण अभीप्सेद्वारे, धडपडले पाहिजे.

काहीतरी पूर्णत: नवीन, आजवर कल्पनाही केली नव्हती, असे काही नवेच निर्माण करण्याची एक आस या प्रकृतीला पुन्हा एकवार लागली आहे आणि तिच्यामधील ह्या आवेगालाच आपण प्रतिसाद दिला पाहिजे आणि तिचे आज्ञापालन केले पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 160-161)

श्रीमाताजी : अतिमानस चेतनेला मानवी चेतनेमध्ये प्रवेश करून, स्वत:चे आविष्करण करता येणे शक्य व्हावे, ह्यासाठी मानवी चेतनेची अपेक्षित अशी अवस्था, एक दिवस निश्चितपणे येईल. मानव वंश तयार होण्यासाठी जसा प्रचंड काळ लागला होता, त्याप्रमाणेच हा नवीन वंश तयार होण्यासाठीदेखील खूप काळ लागण्याची शक्यता आहे. आणि हे क्रमाक्रमानेच घडून येणार आहे. पण मी म्हटले होते त्याप्रमाणे, जेव्हा घडायचे असेल तेव्हा ते घडेलच… एक वेळ असते, जेव्हा हे घडून येते, जेव्हा ते अवतरण घडून येते, जेव्हा संयोजन घडून येते, जेव्हा हे तादात्म्य घडून येते. कदाचित हे निमिषार्धातही घडून येते. एक क्षण असतो, जेव्हा हे घडते. नंतर मात्र कदाचित खूप, खूप, खूप वेळ जावा लागतो. एका रात्रीमध्ये जिकडे तिकडे अतिमानव प्रकट झालेले एखाद्याला दिसू शकतील, अशी कल्पना कोणी करता कामा नये. आणि ते असे असणारही नाही. मी म्हटले त्याप्रमाणे, ज्यांनी स्वत:ला पूर्णत: झोकून दिले आहे, ज्यांनी सर्वांसाठी सर्व प्रकारचा धोका पत्करला आहे, त्यांनाच हे कळू शकेल. केवळ त्यांनाच हे समजू शकेल; जेव्हा हे घडून येईल तेव्हा ते त्यांना ज्ञात होईल.

प्रश्न : म्हणजे, इतरांना ते दिसूही शकणार नाही?

श्रीमाताजी : इतरांना त्याची साधी जाणीवसुद्धा नसेल. काय घडले आहे ते जाणून न घेता, ते त्यांचे स्वत:चे मूढ जीवन तसेच चालू ठेवतील.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 328-329)

या जगताच्या दृश्यमानतेच्या पाठीमागे अस्तित्वाची आणि चेतनेची एक वास्तविकता आहे; सर्व गोष्टींमागे एकच शाश्वत आत्मा आहे, अशी शिकवण ज्या प्राचीन ऋषीमुनींची आहे, त्या ऋषीमुनींच्या शिकवणुकीपासून श्रीअरविंदांच्या शिकवणुकीचा प्रारंभ होतो. सर्व अस्तित्वं वस्तुतः त्या ‘एका’ आत्म्यात, चैतन्यात संघटित आहेत पण चेतनेच्या विशिष्ट विलगीकरणामुळे तसेच स्वत:च्या खऱ्याखुऱ्या आत्म्याविषयी आणि मन, प्राण, देह यांतील वास्तविकतेविषयी असलेल्या अज्ञानामुळे ती अस्तित्वं विभागली गेली आहेत. एका विशिष्ट अशा मानसिक शिस्तीद्वारे हा विभक्त जाणिवेचा पडदा दूर करणे आणि खऱ्याखुऱ्या आत्म्याची, स्वत:मधील व सर्वांमधील दिव्यत्वाची जाणीव होणे शक्य आहे. Read more

प्रकृतीमध्ये खडकाकडून वनस्पतीकडे, वनस्पतीकडून पशुकडे, पशूकडून मानवाकडे, अशाप्रकारे आरोहण करणारा क्रमविकास आहे. आजवर ज्ञात असलेल्या या विकासक्रमानुसार, सध्यातरी मानव हा सर्वात वरच्या पायरीवर आहे असे दिसून येते. अर्थातच, त्यामुळे आपण या विश्वातील विकासाचा अंतिम टप्पा असून, आपल्यापेक्षा उच्चतर असे या पृथ्वीतलावर काहीही असणे शक्य नाही, असा मनुष्याचा समज झाला आहे. आणि हाच त्याचा फार मोठा गैरसमज आहे. त्याच्या भौतिक प्रकृतीच्या दृष्टीने तो आजही जवळजवळ पूर्णपणे पशुच आहे; विचार करणारा आणि बोलणारा पशू आहे इतकेच. परंतु त्याच्या भौतिक सवयी आणि सहज स्वाभाविक प्रवृत्ती पाहता तो अजूनही प्राणिदशेतच आहे. अर्थातच अशा अपूर्ण निर्मितीत प्रकृती संतुष्ट असू शकत नाही हे निश्चित. प्रकृती एक नवीन प्रजाती बनविण्याच्या प्रयत्नांत आहे. पशूच्या दृष्टीने जसा मानव, त्याप्रमाणे मानवाच्या दृष्टीने ती प्रजाती असेल. ती प्रजाती बाह्य आकाराने मानवसदृशच असेल; तरीपण तिची जाणीव मनाहून कितीतरी उच्च स्तरावरची असेल आणि ती प्रजाती अज्ञानाच्या दास्यत्वातून पूर्णपणे मुक्त झालेली असेल. Read more