Tag Archive for: अतिमानस

आत्मसाक्षात्कार – २८

(मागील भागावरून पुढे…)

(आत्मसाक्षात्कार २४ ते २८ हे भाग एकत्रित वाचल्यास श्रीअरविंद प्रणीत ‘दिव्य अतिमानव’ ही संकल्पना अधिक चांगल्या रितीने समजेल, असा विश्वास वाटतो.)

अतिमानस (Supermind) म्हणजे अतिमानव; त्यासाठी मनाच्या अतीत होणे ही अनिवार्य अट आहे.

अतिमानव होणे म्हणजे दिव्य जीवन जगणे, देव बनणे. कारण देव-देवता या ईश्वराच्या शक्ती असतात. तुम्ही मानववंशामधील ईश्वराची शक्ती बनून राहा.

दिव्य अस्तित्वामध्ये वसती करून जीवन जगणे आणि आत्म्याच्या चेतनेला व परमानंदाला, आत्म्याच्या संकल्पशक्तीला व ज्ञानाला तुमचा ताबा घेऊ देणे आणि त्यांना तुमच्या समवेत व तुमच्या माध्यमातून लीला करू देणे, हा त्याचा अर्थ आहे.

हे तुमच्या अस्तित्वाचे सर्वोच्च रूपांतरण असते. स्वत:मध्ये ईश्वराचा शोध घेणे आणि स्वत:च्या सर्व गोष्टींमध्ये त्याला प्रकट करणे हे सर्वोच्च रूपांतरण असते. त्याच्या अस्तित्वामध्ये जीवन जगा, त्याच्या प्रकाशाने उजळून निघा, त्याच्या शक्तीसहित कृती करा, त्याच्या परमानंदामध्ये न्हाऊन निघा. तुम्ही तो अग्नी व्हा, तो सूर्य व्हा, आणि तो महासागर व्हा. तुम्ही तो आनंद, ती महत्ता आणि ते सौंदर्य बना.

यांपैकी अंशभाग जरी तुम्ही प्रत्यक्षात जीवनामध्ये उतरवू शकलात तर, तुम्ही अतिमानवतेच्या (supermanhood) पहिल्या काही पायऱ्या गाठल्याप्रमाणे होईल.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 152)

‘आत्मसाक्षात्कार’ ही मालिका येथे समाप्त होत आहे. धन्यवाद!!

आत्मसाक्षात्कार – २७

(मागील भागावरून पुढे…)

उठा, (जागे व्हा आणि) स्वतःच्या अतीत जा, तुमचे स्वत:चे मूळ स्वरूप प्राप्त करून घ्या. तुम्ही माणूस आहात आणि माणसाची समग्र प्रकृतीच अशी असते की, त्याने स्वत:पेक्षा अधिकतर व्हावे. एकेकाळी जो मानवामधील पशु-मानव (animal man) होता, तो आता त्याहूनही वरच्या श्रेणीत प्रविष्ट झाला आहे. तो विचारवंत आहे, कारागीर आहे, तो सौंदर्योपासक आहे. पण त्याने आता विचारवंतापेक्षाही अधिक असे काही बनले पाहिजे; तो आता ज्ञानद्रष्टा झाला पाहिजे. त्याने आता कारागीरापेक्षा अधिक काही बनले पाहिजे; तो निर्माणकर्ता आणि त्याच्या निर्मितीचा स्वामी झाला पाहिजे. त्याने आता केवळ सौंदर्योपासक न राहता, अधिक काही बनले पाहिजे; कारण तो सर्व सौंदर्य आणि सर्व आनंद यांचा आस्वाद घेऊ शकतो.

मनुष्य हा शरीरधारी असल्यामुळे, तो त्याचे अमर्त्य सत्त्व (substance) मिळविण्यासाठी धडपडतो; तो प्राणमय जीव असल्यामुळे, तो अमर्त्य जीवनासाठी आणि त्याच्या अस्तित्वाच्या अनंत सामर्थ्यासाठी धडपडतो; तो मनोमय जीव असल्यामुळे आणि त्याच्याकडील ज्ञान आंशिक असल्यामुळे, तो संपूर्ण प्रकाश आणि शुद्ध दृष्टी यांच्या प्राप्तीसाठी धडपडतो.

हे सर्व प्राप्त करून घेणे म्हणजे अतिमानव बनणे; कारण तसे बनणे म्हणजे मनामधून अतिमानसाकडे उन्नत होणे. त्याला ‘दिव्य मन’ किंवा ‘दिव्य ज्ञान’ किंवा ‘अतिमानस’ काहीही नाव द्या; ते दिव्य संकल्पाची आणि दिव्य चेतनेची शक्ती व प्रकाश असतात. चैतन्याने (Spirit) अतिमानसाच्या माध्यमातून पाहिले आणि त्याने या जगतांमध्ये (worlds) स्वत:ची निर्मिती केली, अतिमानसाच्याद्वारे ते चैतन्य त्या जगतांमध्ये निवास करते आणि त्यांचे शासन करते. त्याच्यामुळेच ते स्वराट आणि सम्राट, म्हणजे अनुक्रमे स्व-सत्ताधीश आणि सर्व-सत्ताधीश आहे. (क्रमश:)

श्रीअरविंद (CWSA 12 : 151-152)

आत्मसाक्षात्कार – २३

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

निश्चितच, ‘अधिमानस’ (Overmind) किंवा ‘अतिमानसा’च्या (Supermind) विकसनाच्या कितीतरी आधी ‘चैतन्या’चा (Spirit) साक्षात्कार होतो. प्रत्येक काळातल्या शेकडो साधकांना आजवर उच्चतर मनाच्या पातळीवर आत्मसाक्षात्कार झालेला आहे पण म्हणून त्यांना अतिमानसिक साक्षात्कार झाला आहे असे नाही. व्यक्तीला ‘आत्म्या’चा किंवा ‘चैतन्या’चा किंवा ‘ईश्वरा’चा मानसिक, प्राणिक किंवा अगदी शारीरिक पातळीवरही ‘आंशिक’ साक्षात्कार (partial realisations) होऊ शकतो मात्र व्यक्ती जेव्हा मनुष्याच्या सामान्य मानसिक पातळीच्या वर उच्चतर आणि विशालतर मनामध्ये उन्नत होते तेव्हा, ‘आत्मा’ त्याच्या सर्व सचेत व्यापकतेनिशी प्रकट व्हायला सुरुवात होते.

‘आत्म्या’च्या या व्यापकतेमध्ये संपूर्णतया प्रवेश केल्यामुळे, मानसिक कृती विराम पावणे शक्य होते आणि व्यक्तीला आंतरिक नीरवता लाभते. आणि मग त्यानंतर, व्यक्ती कोणत्याही प्रकारची कृती करत असली तरी तिच्यामधील ही आंतरिक नीरवता तशीच टिकून राहते; व्यक्ती अंतरंगांतून शांत-नीरव राहते. साधनभूत अस्तित्वामध्ये कृती चालू राहते आणि या कृतीच्या अंमलबजावणीसाठी — मग ती कृती मानसिक असो, प्राणिक असो किंवा शारीरिक असो — त्या कृतीसाठी आवश्यक असणारे सर्व संकेत, आत्म्याच्या या सारभूत शांतीला आणि स्थिरतेला धक्का न पोहोचवता, उच्चतर स्त्रोतापासून मिळत राहतात.

मात्र वर वर्णन केलेल्या अवस्थेपेक्षा ‘अधिमानसिक’ आणि ‘अतिमानसिक’ अवस्था या अधिक उच्च स्तरावरील असतात. व्यक्तीला त्यांचे आकलन व्हायला हवे असेल तर, तिला आधी आत्म-साक्षात्कार झालेला असला पाहिजे; आध्यात्मिकीकरण झालेल्या मनाची व हृदयाची पूर्ण कृती तिच्या ठिकाणी होत असली पाहिजे; तिच्या ठिकाणी अंतरात्म्याबाबतची जागृती झालेली असली पाहिजे; बंदिस्त असलेल्या चेतनेची मुक्ती, तसेच आधाराचे शुद्धीकरण व त्याचे पूर्णतया उन्मीलन (opening) झालेले असले पाहिजे. त्यामुळे मुक्त झालेल्या प्रकृतीमध्ये, प्रथम उपरोक्त अधिष्ठान निर्माण करण्याचा प्रयत्न करा.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 413)

साधना, योग आणि रूपांतरण – २३५

व्यक्ती आणि तिचे घटक यांच्या व्यवस्थेमध्ये एकाचवेळी दोन प्रणाली कार्यरत असतात. त्यातील एक केंद्रानुगामी असते. या प्रणालीमध्ये वर्तुळांची किंवा कोशांची एक मालिका असते, आणि तिच्या केंद्रस्थानी अंतरात्मा असतो. दुसरी प्रणाली ऊर्ध्व-अधर (vertical) अशी असते. म्हणजे यामध्ये आरोहण आणि अवरोहण असते, पायऱ्या-पायऱ्यांची एक शिडी असावी तशी ती असते. मनुष्याकडून ‘ईश्वरा’कडे होत जाणाऱ्या संक्रमणामध्ये, एकावर एक रचलेल्या स्तरांची जणू ही मालिकाच असते आणि त्यामध्ये अधिमानस (Overmind) व अतिमानस (Supermind) हे महत्त्वाचे टप्पे असतात.

हे संक्रमण घडून यायचे असेल तर आणि त्याच वेळी ते रूपांतरण देखील ठरावे असेही अपेक्षित असेल तर त्यासाठी, केवळ एकच मार्ग असतो. प्रथम, अंतर्मुखी परिवर्तन झाले पाहिजे, व्यक्तीने आंतरतम असणाऱ्या चैत्य पुरुषाचा (psychic being) शोध घेण्यासाठी अंतरंगात शिरले पाहिजे आणि त्यास अग्रस्थानी आणले पाहिजे. आणि त्याचवेळी प्रकृतीचे आंतरिक मन, आंतरिक प्राण व आंतरिक शरीराचे घटक उघड केले पाहिजेत. नंतर, आरोहणाची प्रक्रिया केली पाहिजे. म्हणजे ऊर्ध्वगामी परिवर्तनाची एक मालिकाच तेथे असली पाहिजे आणि निम्न स्तरावरील घटकांचे परिवर्तन करण्यासाठी चेतनेने पुन्हा खाली उतरून आले पाहिजे. व्यक्तीने जेव्हा अंतर्मुखी परिवर्तन घडवून आणलेले असते तेव्हा समग्र कनिष्ठ प्रकृती दिव्य परिवर्तनासाठी सुसज्ज व्हावी यासाठी व्यक्ती त्या प्रकृतीचे आंतरात्मिकीकरण घडवते. ऊर्ध्वगामी होत असताना, व्यक्ती मानवी मनाच्या अतीत जाते आणि आरोहणाच्या प्रत्येक टप्प्यावर व्यक्तीचे एका नवीन चेतनेमध्ये परिवर्तन होते आणि त्याचवेळी या नवीन चेतनेचा व्यक्तीच्या समग्र प्रकृतीमध्ये संचार होतो.

अशा रीतीने जेव्हा आपण बुद्धीच्या पलीकडे आरोहण करत, प्रकाशित उच्च मनाच्या (illuminated higher mind) माध्यमातून अंतःस्फूर्त (intuitive) चेतनेमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण सर्व गोष्टींकडे बौद्धिक श्रेणीतून नाही किंवा बुद्धी या साधनाच्या माध्यमाद्वारे नाही तर अधिक महान अशा अंतःस्फूर्त उंचीवरून आणि अंतःस्फूर्तिमय झालेल्या इच्छा, भावभावना, संवेदना आणि शारीरिक संपर्काच्या माध्यमाद्वारे पाहू लागतो. म्हणून, अंतःस्फूर्त मनाकडून त्यापेक्षाही महान असलेल्या अधिमानसिक उंचीवर जाताना, एक नवीन परिवर्तन होते आणि आपण प्रत्येक गोष्ट अधिमानसिक चेतनेमधून आणि अधिमानसिक विचार, दृष्टी, इच्छा, भावना, संवेदना, शक्तीक्रीडा आणि संपर्काने प्रभावित झालेल्या मन, हृदय, प्राण आणि शरीर यांच्याद्वारे पाहू लागतो, अनुभवू लागतो. परंतु अंतिम परिवर्तन हे अतिमानसिक असते, कारण एकदा का आपण तेथे पोहोचलो, एकदा का प्रकृतीचे अतिमानसिकीकरण झाले की मग आपण ‘अज्ञान’दशेच्या पलीकडे जाऊन पोहोचलेलो असतो आणि मग चेतनेचे परिवर्तन गरजेचे राहत नाही. अर्थात त्यापुढेही दिव्य प्रगती, किंबहुना अनंत विकसन होणे अजूनही शक्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 84-85)

साधना, योग आणि रूपांतरण – २१५

स्थितप्रज्ञ असणे याचा अर्थ व्यक्तीचे केवळ विचारी मन (thinking mind) आत्म-साक्षात्कारामधील आध्यात्मिक चेतनेमध्ये सुस्थिर असणे असा होतो. त्यामुळे प्रकृतीच्या अन्य घटकांचे ‘रूपांतरण’ होईलच असे काही आवश्यक नाही. उच्चतर चेतनेचा ‘प्रकाश’ आणि तिची ‘शक्ती’ खाली उतरविणे; चैत्य अस्तित्व (psychic) आणि मन, प्राण व शरीराची केंद्र खुली होणे; आंतरात्मिक आणि उच्चतर चेतनेच्या कार्याला प्रकृतीने संमती देणे आणि तिच्याप्रत स्वीकारशील रीतीने खुले होणे; आणि सरतेशेवटी प्रकृतीने अतिमानसाप्रत खुले होणे, या साऱ्या ‘रूपांतरणा’साठी आवश्यक असणाऱ्या अटी असतात.

उच्चतर चेतना (higher consciousness) ही अशी एक गोष्ट असते की जी मनुष्याच्या मन, प्राण आणि शरीर यांच्या ऊर्ध्वस्थित असते. ती संपूर्णपणे आध्यात्मिक स्वरूपाची असते. ती प्राप्त करून घेणे याचा अर्थ एवढाच की, व्यक्ती तेथे इच्छेनुसार जाण्यास सक्षम असते किंवा व्यक्ती तिच्या चेतनेच्या कोणत्यातरी एखाद्या घटकानिशी तेथे निवास करू शकते आणि त्या दरम्यान तिचे इतर घटक मात्र जुन्या पद्धतीनेच कार्यरत असतात. समग्र अस्तित्व जेव्हा अंतरात्म्याच्या साच्यामध्ये ओतले जाते (remoulded) तेव्हा ‘आंतरात्मिक रूपांतरण’ (psychic transformation) घडून येते. समग्र अस्तित्वाचे जेव्हा आध्यात्मिकीकरण केले जाते तेव्हा ‘आध्यात्मिक रूपांतरण’ (spiritual transformation) घडून येते. आणि समग्र अस्तित्वाचे जेव्हा अतिमानसिकीकरण केले जाते तेव्हा ‘अतिमानसिक रूपांतरण’ (supramental transformation) घडून येते. व्यक्ती केवळ उच्चतर चेतनेविषयी जागरूक झाली किंवा सामान्य मर्यादित अर्थाने व्यक्तीने ती उच्चतर चेतना प्राप्त करून घेतली म्हणून या सर्व गोष्टी, आपोआप घडून येतात, असे होत नाही.

अर्थात शरीर हे त्याचे अधिष्ठान असते. शरीर, प्राण आणि मन व त्याच्या उच्चतर पातळ्या या सर्वांचा समावेश कनिष्ठ गोलार्धामध्ये होतो. आत्म-सुसूत्रीकरणाचे (self-formulation) साधन असणारे ‘अतिमानस’ (Supermind) आणि ‘दिव्य’ सत्-चित्-आनंद यांचा समावेश ऊर्ध्व गोलार्धामध्ये होतो. कनिष्ठ आणि ऊर्ध्व या दोन गोलार्धाच्या मधोमध ‘अधिमानस’ (Overmind) असते. ‘अधिमानस’ हे कनिष्ठ गोलार्धाच्या शिखरस्थानी असते. अधिमानस हा या दोन्ही गोलार्धातील मध्यावधी किंवा संक्रमणकारी स्तर असतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 331-332)

साधना, योग आणि रूपांतरण – १९५

उत्तरार्ध

मनुष्य स्वतःच्या प्रयत्नांनी मनुष्यत्वाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. मनोमय जीव, अन्य शक्तीच्या साहाय्याविना, स्वत:च्या शक्तीद्वारे स्वतःचे अतिमानसिक चैतन्यामध्ये परिवर्तन करू शकत नाही. मानवी धारकपात्राचे (receptacle) दैवीकरण केवळ ‘दिव्य प्रकृती’च्या अवतरणामुळेच होऊ शकते.

कारण आपल्या मन, प्राण आणि शरीर या गोष्टी त्यांच्या स्वत:च्या मर्यादांनी बांधल्या गेलेल्या असतात आणि त्या कितीही उन्नत झाल्या किंवा कितीही विस्तृत झाल्या तरीही त्या त्यांच्या प्राकृतिक सीमा ओलांडून वर जाऊ शकत नाहीत किंवा त्या सीमांच्या पलीकडे त्या विस्तारित देखील होऊ शकत नाहीत. परंतु असे असूनसुद्धा, मनोमय मनुष्य स्वतःच्या पलीकडे असणाऱ्या अतिमानसिक ‘प्रकाश’, ‘सत्य’ आणि ‘शक्ती’ यांच्याप्रत उन्मुख होऊ शकतो. आणि त्यांनी आपल्यामध्ये कार्य करावे आणि मन जे करू शकणार नाही ते त्यांनी करावे यासाठी तो त्यांना आवाहन करू शकतो. मन जरी स्वप्रयत्नाने, मनाच्या अतीत जे आहे ते होऊ शकत नसले तरी, अतिमानस अवतरित होऊन, मनाचे स्वत:च्या द्रव्यामध्ये रूपांतरण घडवू शकते.

मनुष्याने आपल्या विवेकशील सहमतीने आणि जागरूक समर्पणाने, अतिमानसिक ‘शक्ती’ला जर तिच्या स्वतःच्या गहन व सूक्ष्म अंतदृष्टीनुसार आणि लवचीक अंतःशक्तीनुसार कार्य करण्यास मुभा दिली तर, ती अतिमानसिक ‘शक्ती’, संथपणाने किंवा वेगाने, आपल्या सद्यकालीन अर्ध-परिपूर्ण प्रकृतीचे दिव्य ‘रूपांतरण’ घडवून आणेल.

या अवतरणामध्ये, या कार्यामध्ये धोका होण्याची आणि आपत्तीजनक पतन होण्याची शक्यता असते. अवतरित होणाऱ्या शक्तीचा जर मानवी मनाने किंवा प्राणिक इच्छेने ताबा घेतला आणि स्वतःच्या संकुचित व चुकीच्या कल्पनांनी किंवा सदोष व अहंकारी आवेगांनी त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न केला, (आणि हे काही प्रमाणात अटळसुद्धा असते;) तर जोपर्यंत कनिष्ठ मर्त्य प्रकृती ही महत्तर अशा अमर्त्य प्रकृतीच्या मार्गापैकी थोडाफार भाग तरी आत्मसात करत नाही, तोपर्यंत धडपडणे, किंवा विचलित होणे, कठीण आणि वरकरणी पाहता, दुर्लंघ्य वाटणारे अडथळे येणे, आघात होणे, दुःखभोग सहन करावे लागणे यांपासून सुटका नसते; एवढेच नव्हे तर संपूर्ण पतन होणे किंवा मृत्युमुखी पडणे याचीदेखील शक्यता असते. जेव्हा मन, प्राण आणि शरीर ‘ईश्वरा’प्रत जाणीवपूर्वक समर्पित व्हायला शिकतात, तेव्हाच फक्त ‘योगमार्ग’ सोपा, सरळ, जलद आणि सुरक्षित बनू शकतो.

आणि हे समर्पण आणि उन्मुखता ही फक्त ‘ईश्वरा’प्रतच असली पाहिजे, ती अन्य कोणाप्रत असता कामा नये. कारण आपले अंधकारमय मन आणि आपल्यामधील अशुद्ध प्राणशक्ती या गोष्टी, अ-दैवी आणि विरोधी शक्तींना समर्पित होण्याची शक्यता असते. एवढेच काय, पण चुकून त्या विरोधी शक्तींनाच ते ‘दैवी शक्ती’ समजण्याचीदेखील शक्यता असते. अन्य कोणतीच चूक याच्या इतकी घातक असू शकणार नाही. त्यामुळे आपले समर्पण हे अंध असता कामा नये, तसेच ते कोणत्याही प्रभावाप्रत किंवा सर्वच प्रभावांप्रत जडसुस्त निष्क्रियतेने शरणागती पत्करत आहे असेही असता कामा नये; तर ते समर्पण प्रामाणिक, सचेत, दक्ष आणि त्या एकमेवाद्वितीय आणि सर्वोच्चाप्रति एकनिष्ठ असले पाहिजे.

कितीही कठीण असले तरीही, ईश्वराप्रत आणि ‘दिव्य माते’प्रत आत्म-समर्पण, हेच आपले एकमात्र प्रभावशाली साधन असले पाहिजे आणि तेच आपले एकमेव कायमसाठीचे आश्रयस्थान असले पाहिजे. दिव्य मातेप्रति आत्मसमर्पण याचा अर्थ असा की, आपली प्रकृती तिच्या हातामधील एक साधन झाले पाहिजे, आणि आपला आत्मा हा त्या दिव्य मातेच्या कुशीमधील बालक झाले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 170-171)

साधना, योग आणि रूपांतरण – १७९

अतिमानसामध्ये ‘ईश्वरा’शी चेतनायुक्त ऐक्य आणि प्रकृतीचे रूपांतर हे पूर्णयोगाचे ध्येय आहे. सर्वसाधारण योगमार्ग हे ‘मना’कडून वैश्विक ‘नीरवते’च्या एखाद्या निर्गुण स्थितीमध्ये थेट निघून जातात आणि त्याद्वारे, ऊर्ध्वमुख होत, ‘सर्वोच्च’ स्थितीमध्ये विलय पावण्याचा प्रयत्न करतात. मनाच्या अतीत होणे आणि जे केवळ स्थितिमान स्थिरच आहे असे नाही, तर जे गतिमानही आहे अशा ‘सच्चिदानंदा’च्या ‘दिव्य सत्या’मध्ये प्रविष्ट होणे आणि समग्र व्यक्तित्व हे त्या ‘सत्या’मध्ये उन्नत करणे हे ‘पूर्णयोगा’चे उद्दिष्ट आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 412)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (११)

(आश्रमात राहणाऱ्या एका साधकामधील कनिष्ठ प्राणिक प्रकृती ही ईश्वरी शक्तीच्या प्रभावाला विरोध करत आहे. कधीकधी ईश्वरी-इच्छेचे रूप घेऊन स्वत:च्या प्राणिक इच्छा-वासनांची पूर्ती करू पाहत आहे. आपली घुसमट होत आहे, आपण अडकून पडलो आहोत असे त्या साधकाला वाटत आहे. तेव्हा श्रीअरविंद त्याला त्यामधून बाहेर पडण्याचा उपाय सांगतात, आणि नंतर त्याला पूर्णयोगाचे उद्दिष्ट काय आणि आपण आश्रमात कशासाठी आहोत, हे स्पष्ट करत आहेत.)

येथे (श्रीअरविंद आश्रमात) जर कोणत्या एकमेव कृतीला स्थान असेल ती कृती म्हणजे ते अतिमानस, ते दिव्य ‘सत्य’ या पृथ्वीतलावर उतरवणे ही होय. ते दिव्य ‘सत्य’ केवळ मनामध्ये आणि प्राणामध्येच नाही तर, शरीरामध्ये आणि अगदी ‘जडभौतिका’मध्ये देखील उतरवायचे आहे. अहंच्या फैलावण्यावरील सर्व ‘मर्यादा’ काढून टाकणे किंवा त्याला मुक्त वाव देणे आणि मानवी मनाच्या संकल्पनांच्या परिपूर्तीसाठी किंवा अहं-केंद्रित प्राण-शक्तीच्या इच्छा-वासनांच्या पूर्तीसाठी अमर्याद वाव देणे हे आपले उद्दिष्ट नाही. आपण कोणीच येथे ‘आपल्याला जे वाटते ते करण्यासाठी’ आलेलो नाही, किंवा आपल्याला जे करावेसे वाटते ते ज्या जगामध्ये करता येईल असे जग निर्माण करण्यासाठीसुद्धा आपण येथे आलेलो नाही. तर ‘ईश्वराच्या इच्छे’नुसार वागण्यासाठी आपण इथे आलो आहोत. तसेच ज्या जगामध्ये, ‘ईश्वरी इच्छा’ ही तिचे सत्य – मानवी अज्ञानाने विरूप न होता किंवा प्राणिक इच्छेमुळे विकृत न होता, किंवा चुकीच्या पद्धतीने त्याचे आकलन न होता – आविष्कृत करू शकेल अशा एका जगाची निर्मिती करण्यासाठी आपण इथे आहोत.

अतिमानस योगाच्या साधकाने जे कार्य करायचे आहे ते काही त्याचे स्वतःचे कार्य नव्हे, की जिथे तो त्याच्या स्वतःच्या अटी लादू शकेल; तर हे ‘ईश्वरी’ कार्य आहे आणि ते कार्य ‘ईश्वरा’ने नेमून दिलेल्या अटींनुसारच केले गेले पाहिजे. आपला योग हा आपल्यासाठी नाही तर तो ‘ईश्वरा’साठी आहे. आपल्याला आपले स्वतःचे वैयक्तिक आविष्करण करण्यासाठी धडपडायचे नाही; किंवा सर्व मर्यादांमधून, सर्व बंधनांमधून मुक्त झालेल्या वैयक्तिक अहंच्या आविष्करणासाठी देखील धडपडायचे नाही, तर आपले सारे प्रयत्न हे ‘ईश्वरा’च्या आविष्करणासाठी असले पाहिजेत.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 161-162)

 

मन, प्राण, शरीर ह्यांची अनंत भूमंडळे गळून पडतात आणि साधकाचा ऊर्ध्वगामी प्रवास सुरु होतो. मानवी जीवनाचा सर्व पसारा हळूहळू धूसर होत जातो आणि असा साधक मानवी भूमंडळातील एका अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचलेला असतो. आता पुढे काय ?

विश्व-प्रकृतीचा विचार करता, आजवरची वाटचाल शरीर, प्राण हे टप्पे ओलांडून मनापर्यंत येऊन पोहोचली आहे. मनाच्या पलीकडे जाण्याचे आजवर झालेले प्रयत्न, हे धूमकेतूसारखे चमकून गेलेले आहेत. कालौघात काही संतसत्पुरुषांचे झालेले प्रकटीकरण म्हणजे विश्व-प्रकृतिद्वारे केले गेलेले हे असेच प्रयत्न आहेत. परंतु आता प्रकृतीच निवडक मानवांच्या माध्यमातून, मनाच्या पलीकडच्या टप्प्यावर जाण्याच्या तयारीत आहे. देश, भाषा, प्रांत, धर्म, जात, वंश यांच्या संकुचित सीमा भेदून, मनाच्या पलीकडे जाऊ पाहणारे या पृथ्वीवरील काही मोजके मानव, या पुढील प्रवासासाठी निघण्याच्या तयारीत, एका उच्चतर प्रतलावर एकत्र आले आहेत.

या उच्चतर प्रतलाला अधिष्ठान आहे ते आद्यशक्तीचे, अदितीचे ! तिच्या अधिष्ठानावर स्थित होऊन, श्रीअरविंद नामक विभूती-अवताराने, या मोजक्या मानवांचे प्रतिनिधी बनून, ‘मन ते अतिमानस’ ही वाटचाल, आपल्या समर्थ बाहूंवर पेलली आहे.

मनाच्या अतीत जाण्याचा प्रयत्न करू पाहणारी व्यक्ती ही जणू स्फटिकवत आहे. त्याच्या खालच्या गोलार्धात आहेत, व्यक्तीचे शरीर, प्राण व मन. ते त्या व्यक्तीचे आधार आहेत. ह्या आधाराला आधार आहे तो श्रीअरविंदांचा आणि त्यांनी स्वतःच्या जीवनात जे साध्य करून घेतले, त्या आध्यात्मिक संपदेचा !

‘मन ते अतिमानस’ ह्या वरच्या गोलार्धात वाटचाल करण्यासाठी साधकाला साहाय्यभूत होणार आहे ‘अभीप्सा’ (Aspiration towards Divine). व्यक्तीच्या अंतःकरणातून, किंबहुना तिच्या समग्र अस्तित्वातून ऊर्ध्वमुख होणारी अभीप्सा किरण रूपाने वर वर जात आहे. ‘अतिमानस’रूपी सूर्याकडून येणारा एक प्रकाशकिरण त्या व्यक्तीचे समग्र अस्तित्व भेदून आरपार जात आहे. ऊर्ध्वमुख अभीप्सा आणि अधोमुख अतिमानसरूपी प्रकाशकिरण परस्परांमध्ये मिसळून व्यक्तीचे समग्र अस्तित्व दिव्य प्रकाशाने उजळून निघत आहे. आणि त्या प्रकाशाच्या उजळण्याने आसमंत प्रकाशमान होत आहे.

अशा व्यक्तींचे समुदाय, हे मानवजातीला मनाकडून अतिमानसाकडे घेऊन जाणाऱ्या वाटचालीतील अग्रणी असणार आहेत.

*

या पृथ्वीवर अतिमानसाचे अवतरण झाले असल्याची स्पष्ट अनुभूती श्रीमाताजींना ज्या दिवशी आली तो दिवस म्हणजे दि.२९ फेब्रुवारी १९५६. हा दिवस ‘अतिमानस अवतरण दिन’ म्हणून साजरा केला जातो.

(श्रीमाताजींचे प्रतीक आणि त्यावर श्रीअरविंदांच्या प्रतीकाने तोललेला स्फटिक ही रचना, ऑरोविल येथे मातृमंदिरातील ध्यानमंदिराच्या केंद्रस्थानी आहे.)

विचारशलाका ३५

स्व व वस्तुमात्रांविषयीची जाणीव आणि शक्ती व तिचे सामर्थ्य या दोन घटकांनी ‘चेतना’ बनलेली असते.

जाणीव ही पहिली आवश्यक गोष्ट आहे, तुम्ही योग्य चेतना राखून वस्तुंबाबत जाणीव बाळगली पाहिजे; योग्य प्रकारे, त्यांना त्यांच्यातील सत्याद्वारे जाणून घेतले पाहिजे. पण त्यासाठी केवळ जाणीव असणे पुरेसे नाही. तर चेतना प्रभावी ठरण्यासाठी संकल्प आणि शक्ती असणे आवश्यक आहे.

कोणता बदल होणे आवश्यक आहे, काय निघून जायला हवे, त्याच्या जागी काय यायला हवे, याबाबतीत कदाचित एखाद्याला पूर्ण जाणीव असू शकेल, मात्र तसा बदल घडवून आणण्यास तो असमर्थ असू शकेल. किंवा दुसऱ्या एखाद्याकडे इच्छाशक्ती असू शकेल परंतु, योग्य जाणिवेच्या अभावी ती इच्छाशक्ती योग्य ठिकाणी आणि योग्य रीतीने कशी वापरायची हे समजण्यास तो असमर्थ असू शकेल.

तुम्ही आंतरात्मिक चेतनेमध्ये (Psychic Consciousness) असण्याचा उपयोग असा असतो की, तुमच्याकडे योग्य ती जाणीव असते आणि तुमची इच्छा ही ‘श्रीमाताजीं’च्या इच्छेशी सुसंगत असल्याने, तुम्ही योग्य ते परिवर्तन घडून यावे म्हणून ‘श्रीमाताजींच्या शक्ती’ला आवाहन करू शकता.

पण मन आणि प्राण यांमध्येच ज्या व्यक्ती जगत असतात, अशा व्यक्ती मात्र हे करू शकत नाहीत; अशा व्यक्तींना बरेचदा वैयक्तिक प्रयत्न करणे भाग पडते. तसेच त्यांच्यामधील मनाची व प्राणाची जाणीव, त्यांची इच्छा, त्यांची शक्ती या गोष्टी परस्परांहून विभक्त असतात आणि अपूर्ण असतात; त्यामुळे केलेले कार्यही सदोष असते व ते निर्णायकदेखील नसते. केवळ अतिमानसामध्येच (supermind) ‘जाणीव’, ‘संकल्प’, ‘शक्ती’ या नेहमीच एकत्वाने कार्यरत असतात आणि म्हणून त्या स्वाभाविकपणेच अधिक परिणामकारक असतात.

– श्रीअरविंद [CWSA 28 : 24-25]