Tag Archive for: अडचणी

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०२

योगाच्या ध्येयाप्रत पोहोचणे नेहमीच कठीण असते, पण पूर्णयोग हा इतर कोणत्याही योगांपेक्षा अधिक दुस्तर आहे. आणि ज्यांना या योगाची हाक आलेली आहे, ज्यांच्याजवळ प्रत्येक गोष्टीला व प्रत्येक जोखमीला तोंड देण्याची क्षमता, इच्छाशक्ती आहे, अगदी अपयशाचा धोका पत्करण्याचीदेखील ज्यांची तयारी आहे; आणि पूर्णपणे निःस्वार्थीपणा, इच्छाविरहितता व समर्पण यांजकडे प्रगत होण्याचा ज्यांचा संकल्प आहे अशा व्यक्तींसाठीच पूर्णयोग आहे.

*

(योगमार्गासाठी एखाद्या व्यक्तीची) तयारी असणे, याचा मला अभिप्रेत असलेला अर्थ ‘क्षमता’ असा नसून ‘इच्छाशक्ती’ असा आहे. सर्व अडचणींना तोंड देऊन, त्यावर मात करण्याची आंतरिक इच्छा जर व्यक्तीकडे असेल, तर या मार्गाचा अवलंब करता येईल; मग त्यासाठी किती काळ लागतो हे तितकेसे महत्त्वाचे नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 27)

नैराश्यापासून सुटका – ४०

जीवन आणि त्यातील अडचणींना धीराने आणि खंबीरपणे तोंड देण्याचे धैर्य ज्याच्याकडे नाही, अशा व्यक्तीला साधनेमधील त्याहून अधिक खडतर अशा आंतरिक अडचणींमधून पार होणे शक्य होणार नाही. जीवन आणि त्याच्या अग्निपरीक्षा यांना शांत, अविचल मनाने, धीराने आणि ईश्वरी शक्ती‌वरील संपूर्ण विश्वासाने सामोरे जाता आले पाहिजे; हा पूर्णयोगाच्या साधनेमधील पहिला धडा आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 111)

नैराश्यापासून सुटका – २७

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

ईश्वर जर अस्तित्वात आहे आणि त्याने जर तुम्हाला या मार्गासाठी हाक दिलेली आहे (आणि ती हाक आलेली आहे हे स्पष्ट दिसत आहे), तर मग या सगळ्या पाठीमागे निश्चितपणे ‘ईश्वरी मार्गदर्शन‌’ असले पाहिजे आणि सर्व प्रकारच्या अडीअडचणी असतानासुद्धा तुम्ही त्यांमधून पार व्हाल आणि या मार्गावर खात्रीपूर्वक येऊन पोहोचाल, अशी श्रद्धा तुम्ही विकसित करणे आवश्यक आहे. आणि ती तर्क व सामान्य जाणीव (common sense) यांच्याशी मिळतीजुळती देखील असेल.

तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार नाही अशा सूचना देणाऱ्या विरोधी आवाजांकडे लक्ष देऊ नका; किंवा त्यांना प्रतिसाद देणाऱ्या अधीर, घाईगडबड करणाऱ्या प्राणिक आवाजांकडेदेखील लक्ष देऊ नका. पुष्कळ अडचणी असल्यामुळे यश मिळण्याची काही शक्यता दिसत नाही, या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. तसेच ईश्वराने आत्तापर्यंत त्याचे अस्तित्व तुम्हाला जाणवू दिले नाही, त्यामुळे तो पुढेही स्वतःला कधीच प्रकट करणार नाही, अशा समजुतीवर मुळीच विश्वास ठेवू नका. ज्यांनी ज्यांनी आपले मन अतिशय महान व अवघड अशा एखाद्या ध्येयावर केंद्रित केलेले असते, त्यांची अशी भूमिका असते की, “मला यश मिळेपर्यंत मी वाटचाल करतच राहीन. मग भले कितीही अडचणी आल्या तरी, मी यशस्वी होईनच होईन.” अशीच तुमची भूमिका असू दे.

ईश्वरावर श्रद्धा असणाऱ्या मनुष्याच्या जोडीला आणखी एक गोष्ट असते, ती अशी की, “ईश्वर अस्तित्वात आहे, तो आहेच आणि जर तो अस्तित्वात आहे तर, मग मी त्याचे जे अनुसरण करत आहे, त्यामध्ये मला कधीही अपयश येऊच शकणार नाही. मला जोपर्यंत त्याचा शोध लागत नाही, तोपर्यंत कितीही दुःख वा संकटे आली तरी, त्यांवर मात करून, मी वाटचाल करतच राहीन.”

– श्रीअरविंद (CWSA 29 : 94)

नैराश्यापासून सुटका – ०४

 

अडचणींना सामोरे गेलेच पाहिजे आणि जेवढ्या आनंदाने तुम्ही त्या अडचणींना सामोरे जाल, तेवढ्या लवकर तुम्ही त्यांच्यावर मात करू शकाल. ”अमुक एक गोष्ट मी केलीच पाहिजे आणि ती मी करीनच,” असा दृढ संकल्प कायम राखणे हा यशाचा मूलमंत्र, हा विजयाचा निर्धार तुम्ही केला पाहिजे. हे अशक्य वाटते आहे का? अशक्य अशी कोणती गोष्टच मुळात अस्तित्वात नसते. अडचणी असू शकतात, गोष्टींना वेळ लागू शकतो, पण अशक्य असे काहीच नसते. व्यक्तीने एखादी गोष्ट करण्याचा एकदा का दृढ निश्चय केला की, आज ना उद्या ती शक्य होते.

 

– श्रीअरविंद (CWSA 29 : 116)

साधना, योग आणि रूपांतरण – ३११

रूपांतरण

(रूपांतरण प्रक्रिया कशी स्वारस्यपूर्ण असते व त्यादरम्यान व्यक्तीला स्वत:विषयी कसे नवनवे शोध लागतात, हे आपण कालच्या भागात समजावून घेतले.)

उदाहरणादाखल, एका अगदी साध्याशा निश्चयाचा विचार करू या. (तो वरवर पाहता साधासा आहे.) “मी पुन्हा कधीही खोटं बोलणार नाही,” असे तुम्ही ठरविता. आणि अचानकपणे, तुम्हाला माहीतही नसते की तुम्ही खोटं का आणि कसे बोललात; पण तुम्ही अनाहूतपणे खोटं बोलता आणि बोलणं झाल्यानंतर मग ते तुमच्या लक्षात येते. तुम्ही म्हणता, “पण हे काही बरोबर नाही. मी जे आत्ता काही बोललो ते बरोबर नाही. मला काही तरी वेगळेच म्हणायचे होते.” मग तुम्ही शोध घेता. “हे असे कसे काय घडले? मी असा कसा विचार केला आणि मी असे कसे काय बोललो? माझ्या तोंडातून हे उद्गार कोणी काढले? मला असे बोलण्यास कोणी भाग पाडलं?…” असा खूप शोध तुम्ही घेता. अशा वेळी तुम्ही स्वतःच्या वागण्याचे समर्थन करता आणि म्हणता की, “ते उद्गार माझे नव्हते, ते बाहेरून आले होते” किंवा “ती गोष्ट अनाहूतपणे झाली होती, तो एक निसटता क्षण होता.” आणि नंतर मग तुम्ही त्याचा विचारही करत नाही. आणि मग पुन्हा पुढच्या वेळी तीच गोष्ट घडते.

त्या ऐवजी तुम्ही जर शोध घेतलात, “तुमच्यामधील जो कोणी खोटं बोलत आहे त्याचा हेतू काय असेल?” आणि मग तुम्ही शोध घेतच राहता, आणि मग तुम्हाला तुमच्यामध्येच एका कोपऱ्यात असे काहीतरी दडलेले आढळते की जे स्वतःला पुढे दामटू पाहात असते, किंवा ते त्याचा दृष्टिकोन ठामपणे रेटू इच्छित असते. (अनेकानेक कारणं सांगता येऊ शकतात.) लोकांचे तुमच्याविषयी मत चांगले झाले पाहिजे आणि तुम्ही कोणीतरी महत्त्वाची व्यक्ती आहात असे त्यांना वाटले पाहिजे, म्हणून तुम्ही वस्तुतः जसे आहात त्याच्यापेक्षा तुम्ही काहीसे वेगळे असल्याचे ते भासवत असते. आणि तो तुमच्यामधील खोटं बोलण्यास प्रवृत्त झालेला घटक असतो. तुमच्या सक्रिय चेतनेमधून नाही, तर तुमच्या चेतनेच्या पाठीमागे जे दडून बसले होते त्याने तुम्हाला खोटं बोलण्यास भाग पाडलेले असते. तुम्ही जेव्हा सजग नसता तेव्हा मग तो घटक तुमचे तोंड, तुमची जीभ वापरतो आणि तुमच्या तोंडातून ते वदवून घेतो. आणि अशा रीतीने तुमच्या तोंडातून खोटं बाहेर पडते.

मी तुम्हाला हे एक उदाहरण दिले. अशी लाखो उदाहरणं आहेत आणि हे सारे मोठे रोचक असते. आणि व्यक्तीला स्वतःच्या अंतरंगामध्ये या सगळ्याचा शोध लागतो, आणि ती प्रामाणिकपणे म्हणते, “मला यामध्ये बदल केलाच पाहिजे,” तेव्हा तिला असे आढळते की, आता तिला एक प्रकारची आंतरिक स्वच्छ दृष्टी प्राप्त झालेली आहे. आणि मग इतरांमध्येसुद्धा कसे, काय चाललेले असते याविषयी ती हळूहळू सजग होऊ लागते आणि त्यांनी जसे वागावे असे या व्यक्तीला वाटत असते तसे जरी समोरची व्यक्ती वागली नाही तरीही आता त्याचा व्यक्तीला राग येत नाही. उलट गोष्टी कशा घडतात ते व्यक्तीला कळायला लागते; अमुक एक व्यक्ती ‘अशी का आहे’, ‘प्रतिक्रिया कशा तयार होतात’ हे आता व्यक्तीला उमगू लागते. आणि या ज्ञानामुळे व्यक्ती आता (रागराग करत नाही) तर नुसतेच स्मित करते. आता ती व्यक्ती कठोरपणे निष्कर्ष काढत नाही, तर आता व्यक्ती स्वतःमधील आणि इतरांमधील अडचणी दिव्य चेतनेला अर्पण करते. त्या अडचणींच्या अभिव्यक्तीचे केंद्र कोणते का असेना, त्यामध्ये रूपांतरण घडून यावे यासाठी व्यक्ती त्या गोष्टी दिव्य चेतनेला अर्पण करते.

– श्रीमाताजी (CWM 04 : 333-334)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०८)

(१९३७ च्या सुमारास एक साधक पूर्णयोगाची साधना अंगीकारु इच्छित होता, त्यासाठी तो आश्रमात राहू इच्छित होता. श्रीअरविंद यांनी आपल्या बुद्धीच्या आधारे स्वत:चे आध्यात्मिकीकरण करून घेतले आहे तसेच त्यांनी बुद्धिपूर्वक स्वत:चे दिव्यत्वात रुपांतर करून घेतले आहे, असे त्याचे म्हणणे होते. या विचाराने भारावलेला तो साधक ‘पूर्णयोगा’कडे वळू इच्छित होता. श्रीअरविंद यांनी त्याला त्याच्या इच्छेनुसार तीन महिने आश्रमात राहण्याची परवानगी एका पत्राद्वारे कळवली. मात्र त्याच पत्रात त्यांनी त्याला त्याच्या वरील विचारातील फोलपण दाखवून दिले. बुद्धीच्या आधारे नव्हे, तर तिच्या अतीत होऊन, मनाच्या पूर्ण शांत, निर्विचार अवस्थेत उच्चतर चेतनेचे अवतरण झाले आणि माझे आध्यात्मिकीकरण झाले, असे त्यांनी त्याला लिहिले आहे. त्या साधकाच्या निमित्ताने, ‘पूर्णयोगा’ची साधना कोण करू शकतो यावर श्रीअरविंद यांनी प्रकाश टाकला आहे. त्या पत्रातील हा अंशभाग…)

….मानवी प्रकृती आज जशी आहे तशा त्या प्रकृतीचे पूर्णत्व हे या योगाचे (पूर्णयोगाचे) तत्त्व नाही, तर व्यक्तीच्या सर्व घटकांचे आंतरिक चेतनेच्या कार्याच्या माध्यमातून, आणि नंतर त्या घटकांवर कार्य करणाऱ्या उच्चतर चेतनेच्या कार्याच्या माध्यमातून, आंतरात्मिक आणि आध्यात्मिक रूपांतरण (psychic and spiritual transformation) करणे, त्या घटकांच्या साऱ्या जुन्या गतिविधी टाकून देणे किंवा त्यांचे त्या उच्चतर चेतनेने जणू स्वतःचीच प्रतिमा असावी अशा पद्धतीने परिवर्तन घडविणे आणि अशा प्रकारे कनिष्ठ प्रकृतीचे उच्चतर प्रकृतीमध्ये रूपांतरण करणे, हे या योगाचे (पूर्णयोगाचे) तत्त्व आहे.

….ही सावकाश चालणारी आणि अवघड प्रक्रिया आहे; मार्ग लांबचा आहे आणि अगदी आवश्यक अशा पायाभूत गोष्टी सुस्थिर करणे हे सुद्धा खूप कठीण आहे. विद्यमान असलेली जुनी प्रकृती विरोध करत राहते आणि अडथळे निर्माण करत राहते आणि एका पाठोपाठ एक अडचणी येत राहतात आणि त्यांच्यावर मात केली जात नाही तोवर त्या पुन्हापुन्हा येत राहतात. आणि म्हणूनच, (पूर्णयोगाच्या) या मार्गावरून वाटचाल करण्याचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, व्यक्तीने खात्री करून घेतली पाहिजे की, आपल्याला ज्या मार्गाची हाक आली आहे तो मार्ग हाच आहे का?

– श्रीअरविंद (CWSA 35 : 585-586)

विचारशलाका १८

 

एकदा का तुम्ही आंतरिक रूपांतरणाच्या दृष्टीने चांगला प्रारंभ केला आणि जर तुम्ही जिवाच्या मुळाशी अवचेतनेपर्यंत (subconscient) प्रवास केलात तर – जे तुमच्यामध्ये तुमच्या पालकांकडून, अनुवंशिकतेतून आलेले असते – ते तुम्हाला दिसू लागते. बहुतांशी या सर्वच अडचणी तेथे आधीपासूनच असतात, जन्मानंतरच्या पहिल्या काही वर्षांमध्ये ज्यांची भर पडते अशा गोष्टी फारच थोड्या असतात.

 

आणि अशा गोष्टी कोणत्याही आकस्मिक क्षणीदेखील घडू शकतात; जर तुम्ही वाईट संगतीमध्ये राहिलात, वाईट पुस्तके वाचलीत, तर ते विष तुमच्यामध्ये शिरेल; अशावेळी या गोष्टींचे अवचेतनामध्ये खोलवर उमटलेले ठसे आणि तुमच्या वाईट सवयी यांच्या विरुद्ध तुम्हाला झगडावे लागते.

 

उदाहरणार्थ, असे काही लोक असतात की ज्यांना खोटे बोलल्याशिवाय तोंडच उघडता येत नाही; ते नेहमीच तसे जाणीवपूर्वक करतात असेही नाही (तसे असेल तर ते जास्तच घातक असते.) किंवा असे काही लोक असतात की, जे इतरांच्या संपर्कात आल्यावर भांडल्याशिवाय राहूच शकत नाहीत, अशा गोष्टी त्यांच्या अवचेतनेमध्ये खोलवर रुजलेल्या असतात.

 

तुम्ही जेव्हा सदिच्छा बाळगता, तेव्हा तुम्ही बाह्यत: या सर्व गोष्टी टाळण्याचा, शक्य असेल तर त्या दुरुस्त करण्याचा हरप्रकारे प्रयत्न करता, त्यावर तुम्ही काम करता, त्यांच्याशी मुकाबला करता; आणि मग तुम्हाला अशी जाणीव होते की, या गोष्टी वारंवार वर येत आहेत, जो भाग तुमच्या नियंत्रणावाचून सुटलेला आहे अशा भागातून त्या वर येत आहेत.

 

पण जर का तुम्ही तुमच्या अवचेतनेमध्ये प्रवेश केलात, तुमच्या चेतनेला त्यामध्ये प्रवेश करू दिलात आणि काळजीपूर्वक पाहू लागलात तर मग तुम्हाला हळूहळू तुमच्या अडचणींचे मूळ, उगम कोठे आहे त्याचा शोध लागतो; तुमचे आईवडील, आजी आजोबा कसे होते हे आता तुम्हाला कळू लागते आणि जेव्हा एखाद्या विशिष्ट क्षणी तुम्ही स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नाही, तेव्हा तुम्हाला कळते, ”मी असा आहे कारण ते तसे होते.”

 

तुमच्याकडे लक्ष ठेवून असणारा, तुमची मार्गावर तयारी करून घेणारा असा पुरेसा जागृत चैत्य पुरुष (psychic being) जर तुमच्यामध्ये असेल तर तो तुमच्याकडे तुम्हाला साहाय्यक ठरतील अशा गोष्टी, माणसे, पुस्तके, परिस्थिती खेचून आणू शकतो. कोणा परोपकारी, कृपाळू इच्छेमुळेच जणू घडले असावेत असे छोटे छोटे योगायोग घडून येतात आणि तुम्हाला निर्णय घेण्यासाठी आणि तुम्हाला योग्य दिशेला वळविण्यासाठी एखादा संकेत, कोणती तरी मदत, एखादा आधार पुरविण्यात येतो.

 

पण एकदा का तुम्ही निर्णय घेतला, तुमच्या जिवाचे सत्य शोधून काढायचे एकदा का तुम्ही ठरविलेत, तुम्ही त्या मार्गावरून प्रामाणिकपणे वाटचाल करायला सुरुवात केलीत तर, तुमच्या प्रगतीसाठी मदत व्हावी म्हणून जणू (अज्ञातात) कोणीतरी, सगळेमिळून सर्वकाही घडवत आहेत असे तुम्हाला वाटू लागते. आणि तुम्ही जर काळजीपूर्वक निरीक्षण केलेत तर हळूहळू तुमच्या अडचणींचे मूळदेखील तुम्हाला दिसू लागते : “अरे! हा दोष माझ्या वडिलांमध्ये होता तर’’, “अरेच्चा, ही तर माझ्या आईची सवय आहे’’; “खरंच, माझी आजी अशी होती’’, “माझे आजोबाही असे होते;” असे तुम्हाला जाणवू लागते. किंवा मग तुम्ही लहान असताना जिने तुमची काळजी घेतली होती अशी कोणी तुमची आया असेल, किंवा तुम्ही ज्यांच्याबरोबर खेळलात, बागडलात ती तुमची बहीणभावंडे असतील, तुमचे मित्रमैत्रिणी असतील, यांच्यात किंवा त्यांच्यात काहीतरी असलेले तुम्हाला तुमच्यामध्ये सापडेल.

 

तुम्ही जर प्रामाणिक राहिलात तर या सगळ्या गोष्टी तुम्ही शांतपणे पार करू शकता, असे तुम्हाला आढळून येईल. आणि कालांतराने ज्या बंधांनिशी तुम्ही जन्माला आला होतात ते सारे बंध, त्या बेड्या तुम्ही तोडून टाकाल आणि तुमच्या मार्गावरून तुम्ही अगदी मुक्तपणे पुढे जाल. तुम्हाला जर तुमचे व्यक्तिमत्त्व बदलायचे असेल तर तुम्ही हे केलेच पाहिजे.

 

– श्रीमाताजी [CWM 04 : 261-262]

व्यक्तीच्या अंतरंगात ईश्वरी कृपेविषयी जर अशी श्रद्धा असेल की, ‘ईश्वरी कृपा’ माझ्याकडे लक्ष ठेवून आहे आणि काहीही झाले तरी ईश्वरी कृपा आहेच, आणि ती माझ्यावर लक्ष ठेवून आहे तर, तिच्या साहाय्याने व्यक्ती कोणत्याही संकटामधून पार होऊ शकते, व्यक्ती अशी श्रद्धा नेहमीच, आयुष्यभर बाळगू शकते. या श्रद्धेच्या साहाय्याने व्यक्ती सर्व अडचणींना सामोरी जाऊ शकते, अशा व्यक्तीला कोणतीही गोष्ट विचलित करू शकत नाही कारण तिच्यापाशी श्रद्धा असते आणि ईश्वरी कृपादेखील तिच्यासोबत असते.

श्रद्धा अनंतपटीने शक्तिशाली, अधिक सचेत, दीर्घायू अशी शक्ती असते; …ती ईश्वरी कृपेखेरीज अन्य कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नसते आणि म्हणून ती ‘सत्या’वरच विसंबून असते आणि त्यामुळे तिला कोणतीही गोष्ट विचलित करू शकत नाही.

– श्रीमाताजी [CWM 05 : 297]

कर्म आराधना – ५२

साधकासाठी बाह्य संघर्ष, अडचणी, संकटे या गोष्टी म्हणजे अहंकार आणि रजोगुणात्मक इच्छा यांच्यावर मात करण्याची आणि नि:शेष समर्पण साध्य करून घेण्याची केवळ साधने असतात. व्यक्ती जोपर्यंत यशावर भर देत असते तोपर्यंत ती व्यक्ती अंशतः का होईना पण अहंकारासाठी कर्म करत असते; आणि ते दाखवून देण्यासाठी तसेच पूर्ण समता यावी म्हणून अडीअडचणी आणि बाह्य अपयश या गोष्टी येत राहतात. विजय-शक्ती प्राप्त करून घेऊच नये, असा याचा अर्थ नाही; परंतु केवळ नजीकच्या कार्यातील यश हीच काही सर्वस्वी महत्त्वाची गोष्ट नाही; ग्रहण करण्याची क्षमता आणि एक महत्तर, अधिक महत्तर सुयोग्य दृष्टी प्रक्षेपित करण्याची क्षमता आणि आंतरिक ‘शक्ती’चे विकसन याच गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत. आणि हे सारे अतिशय शांतपणे आणि धीराने, नजीकच्या विजयामुळे उत्तेजित न होता किंवा अपयशाने खचून न जाता केले पाहिजे.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 241-242]

विचार शलाका – १६

श्रीमाताजी : हे जग संघर्ष, दुःखभोग, अडचणी, ताणतणाव यांचे बनलेले आहे. ते अजूनही बदललेले नाही, ते बदलण्यासाठी काही काळ लागेल. आणि प्रत्येकाला या सगळ्यांतून बाहेर पडण्याची संधी उपलब्ध असते. जर तुम्ही ‘परमोच्च कृपे’च्या सान्निध्यावर विसंबून राहिलात, तिच्यासमोर नतमस्तक झालात तर तोच एकमेव मार्ग आहे…

प्रश्न : पण हे असे सामर्थ्य कोठे मिळवायचे ?

श्रीमाताजी : तुमच्याच अंतरंगात. ‘दैवी सान्निध्य’ तुमच्या आतच आहे. तुम्ही त्याचा शोध बाहेर घेता; अंतरंगात पाहा. ते तुमच्या आतच आहे. तेथे ‘त्या’चे सान्निध्य आहे. तुम्हाला सामर्थ्य मिळण्यासाठी इतरांकडून प्रशंसा हवी असते – तुम्हाला त्यातून ते सामर्थ्य कधीही मिळणार नाही. सामर्थ्य तुमच्या आतच आहे. तुम्हाला जर ते सामर्थ्य हवे असेल तर, तुम्हाला जे सर्वोच्च उद्दिष्ट, सर्वोच्च प्रकाश, सर्वोच्च ज्ञान, सर्वोच्च प्रेम वाटते, त्यांविषयी तुम्ही अभीप्सा बाळगली पाहिजे. पण ते तुमच्या आतच आहे – अन्यथा तुम्ही त्याच्याशी कधीच संपर्क साधू शकणार नाही. तुम्ही जर अंतरंगात पुरेसे खोलवर गेलात तर नेहमीच सरळ वर जाणाऱ्या प्रज्ज्वलित ज्योतीप्रमाणे तेथे तुम्हाला ‘त्या’चे अस्तित्व गवसेल.

आणि असे समजू नका की, हे खूप अवघड आहे. ते अवघड आहे कारण तुमची दृष्टी कायम बाह्याकडेच वळलेली असते आणि त्यामुळे तुम्हाला ‘त्या’च्या सान्निध्याची जाणीव होत नाही.

पण जर आधारासाठी, साहाय्यासाठी तुम्ही बाहेरच्या ऐवजी अंतरंगांत लक्ष केंद्रित केलेत आणि – प्रत्येक क्षणी काय करायला हवे, त्याचा मार्ग कोणता, हे जाणण्यासाठी अंतरंगांतील सर्वोच्च ज्ञानावर एकाग्रता केलीत व प्रार्थना केलीत; आणि तुम्ही जे काही आहात व तुम्ही जे काही करता, ते सर्व तुम्ही पूर्णत्वप्राप्तीसाठी समर्पित केलेत, तर तुम्हाला तेथे अंतरंगातच, आधार असल्याचे आणि तो तुम्हाला कायमच साहाय्य व मार्गदर्शन करीत असल्याचे जाणवेल.

आणि जर काही अडचण आलीच तर तिच्याशी दोन हात करण्यापेक्षा; तिला हाताळण्यासाठी – सर्व वाईट इच्छा, सर्व गैरसमजुती आणि सर्व अनिष्ट प्रतिक्रिया यांना हाताळण्यासाठी; तुम्ही त्या अडचणीला परम प्रज्ञेकडे सुपूर्द करा. जर तुम्ही पूर्णपणे समर्पित झालात, तर तो तुमच्या चिंतेचा विषय उरतच नाही; तो त्या ‘परमेश्वरा’चा विषय बनतो, जो स्वत:च तो विषय हाती घेतो आणि त्याचे काय करायचे ते इतर कोणाहीपेक्षा तोच अधिक चांगल्या रीतीने जाणत असतो. यातून बाहेर पडण्याचा हाच एकमेव मार्ग आहे, केवळ हाच मार्ग आहे.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 399-400)