Tag Archive for: साधना

सामान्यत: म्हणजे सर्वसामान्य जीवनामध्ये, व्यक्तीचा चैत्य पुरुषाशी संबंध हा जवळपास नसल्यासारखाच असतो. सर्वसामान्य जीवनामध्ये ज्याचा चैत्य पुरुषाशी जागृत संपर्क आहे, अगदी क्षणभरापुरता का असेना, पण ज्याचा असा संपर्क आहे अशी व्यक्ती लाखांमध्ये एकसुद्धा सापडत नाही.

चैत्य पुरुष हा आतून कार्य करू शकतो, पण बाह्य व्यक्तित्वाच्या दृष्टीने, ते कार्य तो इतका अदृश्यपणे आणि इतक्या नकळतपणे करतो की, जणू चैत्य पुरुष त्यांच्या दृष्टीने अस्तित्वातच नसतो. बहुतांशी उदाहरणांमध्ये, अगदी खूप मोठ्या प्रमाणावर, जवळपास सर्वच उदाहरणांमध्ये तो जणू सुप्त असतो, अजिबात सक्रिय नसतो.

स्वत:च्या चैत्य पुरुषाशी जागृत संपर्क प्रस्थापित करणे, हे एखाद्या व्यक्तीला पुष्कळ साधनेमधून आणि खूपशा चिवट प्रयत्नांमधूनच शक्य होते. स्वाभाविकपणेच, अशीही काही अपवादात्मक उदाहरणे असतात – परंतु ती खरोखरच अगदी अपवादात्मक असतात आणि ती इतकी कमी असतात की, ती हाताच्या बोटांवर मोजता येण्याजोगी असतात – जिथे चैत्य पुरुषाची पूर्णत: घडण झालेली आहे, जो मुक्त आहे, जो स्वत:चा स्वामी आहे, आणि ज्याने स्वतःचे कार्य पूर्ण करण्यासाठी मानवी देहामध्ये या पृथ्वीवर परतून यायचा निर्णय घेतलेला आहे, अशी उदाहरणे अगदीच अपवादात्मक असतात. आणि अशा उदाहरणांच्या बाबतीत, जरी त्या व्यक्तीने जाणिवपूर्वकपणे साधना केली नाही तरीही, चैत्य पुरुष इतका शक्तिशाली असू शकतो की, तो कमीअधिक जाणिवयुक्त नाते प्रस्थापित करू शकतो.

परंतु अशी उदाहरणे इतकी अद्वितीय असतात, इतकी दुर्मिळ असतात की, त्या अपवादात्मक उदाहरणांनी नियमच सिद्ध होतो. बाकी सर्वच बाबतीत, सर्वच उदाहरणांमध्ये, चैत्य पुरुषाची जाणीव होण्यासाठी खूप खूप सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असते.

सहसा असे मानण्यात येते की, व्यक्तीला जर ते तीस वर्षात साध्य करता आले, तीस वर्ष सातत्यपूर्ण प्रयत्नांनी हं, जर ते करता आले तर ती व्यक्ती अत्यंत भाग्यवान गणली जाते. आणि जर असे घडले तर तेही लवकरच घडले, असे म्हणावे लागेल. पण हे सुद्धा इतके दुर्मिळ आहे की, एखादा लगेचच म्हणतो की, “तो कोणीतरी असामान्य माणूस दिसतोय.” जे फार मोठे योगी असतात, ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे, जे कमी अधिक दिव्य जीव मानले जातात, त्यांच्याबाबतीत हे असे घडते.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 269)

(मनामध्ये यंत्रवतपणे विचारांचा जो गदारोळ चालू असतो, त्याविषयीचे विवेचन केल्यानंतर श्रीमाताजी पुढे सांगत आहेत)

तुमच्यावर आक्रमकपणे चालून येणाऱ्या असंबद्ध विचारांच्या पूराला, त्यांत वस्तुनिष्ठता आणण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने, पद्धतशीरपणे जर का तुम्ही दूर अंतरावर ठेवू शकलात तर, एक नवीनच बाब तुमच्या लक्षात येईल.

तुमच्या असे निदर्शनास येईल की, तुमच्यामधील काही विचार हे इतर विचारांपेक्षा अधिक प्रभावी आहेत, अधिक चिवट आहेत, ते विचार सामाजिक दृष्ट्या उपयुक्त, रीतीपरंपरांशी, नीतिनियमांशी आणि तसेच ह्या पृथ्वीचे आणि मनुष्यमात्राचे नियमन करणाऱ्या कायद्यांशीही संबंधित आहेत. ती तुमची त्या विषयांवरील मतं असतात किंवा तसा तुमचा दावा असतो आणि त्या नुसार वागण्याचा तुम्ही प्रयत्न करत असता.

तुमच्या त्या संकल्पनांपैकी एखाद्या संकल्पनेकडे पाहा, तुम्हाला जी जास्त परिचयाची आहे तिच्याकडे पाहा, अगदी काळजीपूर्वक पाहा, एकाग्र व्हा, अगदी पूर्ण प्रामाणिकपणे चिंतन करा, सर्व प्रकारचे पूर्वग्रह शक्य तितके बाजूला ठेवा आणि स्वत:ला विचारा की, या विषयावर तुमचे अमुक एक मत का आहे आणि तमुक एक मत का नाही.

प्रत्येक वेळी उत्तर बहुधा एकच असेल किंवा त्यासारखेच असेल कारण तुमच्या भोवतालच्या परिघात ते मत बहुधा प्रचलित असते आणि ते मत असणे हे चांगले मानले जाते आणि त्यामुळे अनायसे अनेकविध मतभेद, संघर्ष, टिकाटिप्पणी यांपासून तुमची सुटका होते. किंवा मग ते तुमच्या आईचे किंवा वडिलांचे मत असते, त्या विचारांनी तुमचे बालपण घडविलेले असते. किंवा ते मत म्हणजे, तुमच्या तरुणपणी तुम्ही घेतलेल्या धार्मिक म्हणा किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाचा तो स्वाभाविक परिणाम असतो. तो विचार तुमचा स्वत:चा विचार नसतो.

कारण, एखादा विचार तुमचा ‘स्वत:चा’ आहे असे म्हणण्यासाठी, तुमच्या जीवनादरम्यान निरीक्षण, अनुभव वा अनुमानातून, किंवा, अगदी सखोल चिंतनमननातून तयार झालेल्या तुमच्या तर्कशुद्ध विचारविश्वाचा तो एक भाग बनावा लागतो.

मनामध्ये व्यवस्था आणणे

आपल्यामध्ये सदिच्छा आहे आणि पूर्णतया प्रामाणिक असण्याचा आपला प्रयत्न आहे, म्हणजे आपल्या विचारांनुसारच आपल्या कृती असाव्यात असा आपला प्रयत्न आहे. त्यामुळे आपल्याला आता हे पटले आहे की, बाहेरून येणाऱ्या मनाच्या दंडकांनुसार आपण कृती करतो; ते दंडक आपण हेतुपुर:सर किंवा जाणीवपूर्वकतेने स्वीकारतो असेही नाही, तर आपल्या जडणघडणीमुळे, शिक्षणामुळे आपल्या नकळत पुन्हा पुन्हा आपण त्यांच्याकडे ओढले जातो, आणि त्या सगळ्यांपेक्षाही सामूहिक सूचनेचा आपल्यावर जबर पगडा असतो; ती सूचना इतकी शक्तिशाली, प्रभावी असते की, तिच्यापासून स्वत:चा बचाव करण्यामध्ये फारच कमी लोक यशस्वी होतात.

आपण प्राप्त करून घेऊ इच्छितो त्या मानसिक पृथगात्मतेपासून (Mental individuality) आपण किती दूर आहोत! आपल्या गतकाळातील इतिहासाने निश्चित केलेली, आणि आपल्या समकालीनांची अंध आणि अनिर्बंध इच्छा ज्यांवर लादली जाते अशी उत्पादने आपण आहोत. हे खूपच दयनीय असे दृश्य आहे… पण आपण खचून जायला नको ; जेवढा जास्त गंभीर आजार आणि उपाय शोधायची निकड जेवढी जास्त, तेवढ्या प्रमाणात आपण अधिक उत्साहाने त्याच्याशी संघर्ष केला पाहिजे.

पद्धत नेहमी एकच असणार : चिंतन, चिंतन आणि चिंतन.

आपण त्या साऱ्या संकल्पना, कल्पना एकापाठोपाठ एक विचारात घेतल्या पाहिजेत आणि आपल्या सर्वसाधारण जाणिवेला, आपल्या तर्कबुद्धीला, समतेच्या सर्वोच्च जाणिवेला स्मरून आपण त्यांचे विश्लेषण केले पाहिजे; आपण आजवर प्राप्त करून घेतलेले ज्ञान आणि अनुभवांचे संचित यांच्या तराजूमध्ये त्यांचे मूल्यमापन केले पाहिजे आणि मग त्यांची एकमेकांबरोबर संगती जुळविली पाहिजे, त्यांच्यामध्ये सुसंवाद प्रस्थापित केला पाहिजे. हे काम नेहमीच अवघड असते कारण अगदी परस्परविसंगत अशा कल्पना आपल्या मनामध्ये शेजारीशेजारी राहू देण्याची खेदजनक प्रवृत्ती आपल्यामध्ये असते.

त्या सर्व कल्पना आपण त्यांच्या योग्य जागी ठेवल्या पाहिजेत, आपल्या आंतरिक कक्षामध्ये सुव्यवस्था निर्माण केली पाहिजे. आणि ज्याप्रमाणे आपण आपल्या घरातील खोल्या आवरतो, नीटनेटक्या राखतो त्याप्रमाणे हे काम आपण दररोज केले पाहिजे. कारण मला वाटते, जशी आपण घराची काळजी घेतो किमान तेवढीतरी काळजी आपण आपल्या मनाची घेतली पाहिजे. पण पुन्हा एकदा लक्षात घ्या की, हे कर्म खरेखुरे परिणामकारक होण्यासाठी, मनाची सर्वोच्च, अतीव शांत, अत्यंत प्राजंळ अशी स्थिती आपलीशी व्हावी यासाठी ती कायम टिकवून ठेवण्याची धडपड केली पाहिजे.

ज्या विचारांचे आपण निरीक्षण, विश्लेषण, वर्गीकरण करू इच्छितो ते विचार आपल्यातील आंतरिक प्रकाशाने उजळून निघावेत म्हणून आपण पारदर्शक बनूया. आपल्या स्वत:च्या अगदी क्षुल्लक आवडीनिवडी आणि क्षुद्र वैयक्तिक सोयीसुविधा यांच्या वर उठण्याइतपत आपण नि:पक्षपाती आणि धैर्यशाली बनूया. या विचारांकडे आपण केवळ विचार म्हणूनच, कोणत्याही पूर्वग्रहाविना बघूया.

थोडे थोडे करून, जर वर्गीकरणाच्या या कामात आपण चिकाटी बाळगली तर आपल्या मनांमध्ये प्रकाश आणि सुव्यवस्था घर करून राहतील. पण आपण हे विसरता कामा नये की, आपण भविष्यात प्रत्यक्षात आणू इच्छितो त्याच्या तुलनेत, ही व्यवस्था म्हणजे व्यवस्था नसून सावळा गोंधळच आहे. कालांतराने आपण जो प्रकाश ग्रहण करू शकू त्या प्रकाशाच्या तुलनेत, हा प्रकाश म्हणजे प्रकाश नसून काळोखच आहे.
जीवन हे सतत उत्क्रांत होत आहे; जर का आपण एक जिवंत मानसिकता इच्छित असू तर आपण अविरतपणे प्रगत होत राहिलेच पाहिजे.

हे फक्त प्राथमिक काम आहे. ज्ञानाच्या अनंत स्रोतांशी ज्यायोगे आपला संबंध प्रस्थापित होऊ शकेल अशा खऱ्या विचारांपासून आपण अनंत योजने दूर आहोत.

आपल्या विचारांवर व्यक्तिपर नियंत्रण ठेवता यावे म्हणून आपल्याला द्यावयाच्या क्रमशः प्रशिक्षणातील हे काही थोडेसे प्रयोग आहेत. कारण ज्या कोणाला ध्यान करावयाचे आहे त्याच्यासाठी मानसिक कृतीवर नियंत्रण हे अगदी अनिवार्य आहे.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 25-26)

(श्रीमाताजी जाणीव विशाल कशी करावी ह्या संबंधीचे मार्गदर्शन करत आहेत..)
अजून एक मार्ग आहे. तो म्हणजे पृथ्वीवरील सर्व गोष्टींशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणे. उदाहरणार्थ, जेव्हा एखाद्या गोष्टीविषयीचा तुमचा दृष्टिकोन संकुचित असतो आणि दुसऱ्यांचा दृष्टिकोन आणि त्यांची धारणा यामुळे तुम्ही दुखावले जाता, तेव्हा तुम्ही तुमची जाणीव बदलून ती दुसऱ्याच्या ठिकाणी केंद्रित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि इतरांच्या विचार करण्याच्या भिन्नभिन्न पद्धतींशी एकरूप होण्याचा हळूहळू प्रयत्न केला पाहिजे.

पण हा मार्ग… काहीसा धोक्याचा आहे. कारण दुसऱ्यांच्या विचारांशी आणि इच्छांशी एकरूप होणे म्हणजे त्यांच्या ढीगभर मूर्खपणाशी व वाईट इच्छांशी एकरूप होण्यासारखे आहे. (श्रीमाताजी हसतात.) आणि त्याचे असे काही परिणाम होऊ शकतात की, जे तितकेसे इष्ट नसतात. तरीसुद्धा काही लोक हे सहजपणे करत असतात. उदाहरणार्थ, ज्यावेळी त्यांचा दुसऱ्यांशी मतभेद होतो, तेव्हा ते आपली जाणीव विशाल करण्यासाठी दुसऱ्यांच्या ठिकाणी आपण आहोत असे समजण्याचा प्रयत्न करतात आणि त्या गोष्टींकडे स्वत:च्या दृष्टिकोनातून नव्हे, तर दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून पाहाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची जाणीव विशाल होते; पण मी आधी सांगितलेल्या पद्धतींमुळे जाणीव जेवढी विशाल होते, तेवढी ती या पद्धतीमुळे होत नाही. त्या पद्धती अधिक निरुपद्रवी असतात. त्या पद्धतींनी तुम्हाला काही अपाय होत नाही, तर त्यांचा तुम्हाला लाभच अधिक होतो. त्या पद्धती तुम्हाला अधिक शांत करतात.

जाणीव व्यापक करण्याचे बौद्धिक मार्गही बरेच आहेत. जेव्हा तुम्ही कशाने तरी कंटाळला असाल, जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला दुःखदायक किंवा अत्यंत अप्रिय वाटत असेल, तेव्हा जर तुम्ही कालाच्या अनंततेचा किंवा अवकाशाच्या असीमतेचा विचार करायला लागलात, जे काही आत्तापर्यंत घडून गेलेले आहे व जे काही पुढे घडणार आहे त्या सगळ्याचा विचार करायला लागलात आणि अनंत काळातील हा क्षण म्हणजे जणू काही ‘आला क्षण, गेला क्षण’ असा आहे हे जर तुम्हाला जाणवले तर मग या अनंत काळाच्या तुलनेत, अशा एखाद्या गोष्टीने अस्वस्थ होणे हे तुम्हाला अगदीच किरकोळ, हास्यास्पद वाटू लागते. अशी गोष्ट इतकी नगण्य ठरते की, तिची जाणीव होण्याइतका सुद्धा वेळ नसतो, तिला काही स्थान नसते, महत्त्व नसते कारण खरोखर अनंत काळाच्या अनंततेमध्ये एक क्षण तो काय?… तुमच्या जर हे लक्षात येऊ शकले आणि ते जर तुम्ही डोळ्यासमोर आणू शकलात, तुम्ही जर असे चित्र रंगवू शकलात की, आपण किती लहानशी व्यक्ती आहोत, आपण ज्या पृथ्वीवर आहोत ती सुद्धा किती लहान आहे आणि जाणिवेतील एक क्षण, जो तुम्हाला आत्ता दुखावतो आहे किंवा अप्रिय वाटतो आहे, तो सुद्धा तुमच्या जीवनातील एक लहानसा क्षण आहे; तसेच तुम्ही पूर्वी काय काय होतात आणि पुढे काय काय व्हाल ते आणि आत्ता जी गोष्ट तुमच्या मनावर परिणाम करत आहे ती, कदाचित दहा वर्षानंतर तुम्ही पूर्णपणे विसरूनही जाल किंवा तुम्हाला त्याची आठवण झाली तर तुम्ही म्हणाल, ‘मी त्या गोष्टीला इतके महत्त्व कसे दिले?”… हे सगळे मुळात जर तुम्हाला जाणवू शकले आणि नंतर तुम्हाला तुमच्या खुज्या व्यक्तित्वाची जाणीव झाली तर.. आणि हे व्यक्तित्वसुद्धा कसे? तर अनंत काळांतील जणू एखादा क्षण. नाही नाही, क्षणाइतकेही नाही, कळणारही नाही इतका क्षणाचाही अंशभाग म्हणावे असे तुमचे व्यक्तित्व आहे, ह्याची जाणीव तुम्हाला झाली तर?

जर तुम्हाला अशीही जाणीव झाली की, हे सबंध जग यापूर्वीही आविष्कृत झाले आहे आणि यापुढेही अनंत काळपर्यंत आविष्कृत होत राहणार आहे; समोर, पाठीमागे, सर्व बाजूंनी… तर तुम्हाला एकदम असे वाटू लागेल की तुमच्या बाबतीत जे काय घडले आहे, त्याला इतके महत्त्व देणे हे किती हास्यास्पद आहे!… खरोखरीच तुम्हाला असे वाटू लागेल, की तुम्ही तुमच्या स्वत:ला, तुमच्या जीवनाला आणि तुमच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टींना जे महत्त्व देत आहात ते किती असमंजसपणाचे आहे.

जर तुम्ही असे योग्य प्रकारे केलेत तर केवळ तीन मिनिटांच्या अवधीत सर्व अप्रियपणा एकदम झटकला जाईल, अगदी खोलवर गेलेले दुःख देखील झटकून टाकता येईल. अशा रीतीने फक्त एकाग्रता करायला पाहिजे, आपण अनंतत्वात आणि शाश्वततेत आहोत अशी कल्पना केली पाहिजे. तर मग सर्वकाही निघून जाईल. त्यातून तुम्ही स्वच्छ होऊन बाहेर पडाल. हे सर्व योग्य रीतीने कसे करायचे हे जर तुम्हाला कळले तर तुम्ही सर्व आसक्तीपासून मुक्त होऊ शकाल, एवढेच नव्हे तर, मी सांगते की, अगदी खोलवर गेलेल्या दु:खापासूनसुद्धा तुम्ही मुक्त होऊ शकाल आणि त्यामुळे तुम्ही लगेच तुमच्या क्षुद्र अहंकारातूनही बाहेर याल.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 344-346)

प्रश्न : श्रीमाताजी, आम्ही आमची जाणीव व्यापक कशी करावी?

श्रीमाताजी : जाणीव व्यापक करण्याचे अनेक मार्ग आहेत. सर्वात सोपा मार्ग म्हणजे, कोणत्यातरी व्यापक, विशाल गोष्टीशी स्वत:ला एकरूप करणे. उदाहरणार्थ, अगदी संकुचित व मर्यादित असा एखादा विचार, एखादी इच्छा, जाणीव यांत तुम्ही पूर्णपणे बंदिस्त झाले आहात असे जेव्हा तुम्हाला वाटते, आणि जणुकाही एखाद्या कवचात तुम्ही कोंडले गेले आहात असे जेव्हा तुम्हाला वाटते, अशा वेळी जर कोणत्या तरी विशाल गोष्टीबद्दल विचार करण्यास तुम्ही सुरुवात केलीत तर तुमची जाणीव तुम्ही काहीशी व्यापक करू शकाल…

उदाहरणार्थ, महासागराच्या पाण्याचा अफाट विस्तार. तुम्ही जर खरोखरच अशा महासागराचा विचार करू लागलात आणि तो किती दूर दूर दूर दूरवर, सर्व बाजूंनी असा पसरला आहे असा विचार केलात तर, तुमच्या मानाने तो इतका विशाल, इतका अथांग आहे, की तुम्हाला त्याचा किनारा दिसू शकत नाही, तुमची दृष्टी त्याच्या कोणत्याच टोकापर्यंत पोहोचू शकत नाही, मागे नाही, पुढे नाही, उजव्या बाजूला नाही, डाव्या बाजूला नाही… तो विशाल, खूप विशाल, खूप खूप विशाल आहे… तुम्ही असा विचार केलात, तर तुम्हाला असे वाटू लागते, की आपण अशा महासागरावर तरंगत आहोत की, ज्याला कोणती मर्यादाच नाही. अशी कल्पना करणे सोपे आहे. असे केले म्हणजे तुमची जाणीव तुम्ही काहीशी व्यापक करू शकाल.

काहीजण आकाशाकडे पाहायला लागतात आणि नंतर ते त्या तारकांच्या मधल्या अवकाशाची कल्पना करतात… त्या अनंत विस्तारामध्ये पृथ्वी अगदी एखाद्या ठिपक्याप्रमाणे आहे आणि तुम्ही तर या पृथ्वीवर त्याहूनही लहानशा ठिपक्याप्रमाणे, मुंगीपेक्षाही लहानशा ठिपक्याप्रमाणे आहात असे तुम्हाला वाटते. अशा आकाशाकडे पाहता पाहता तुम्हाला असे वाटू लागते की, आपण या अनंत अवकाशात, तारका, ग्रह यांच्या मधील अवकाशात तरंगत आहोत. पुढे पुढे जाण्यासाठी तुम्ही अधिकाधिक विशाल होत जाता. काही जण अशा रीतीने व्यापक होण्यात यशस्वी होतात.
(उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी
(CWM 06 : 344-45)

एखादा पाण्याचा कालवा असावा तसे आपण असतो. मुक्तपणे प्रवाहित करण्यासाठी आपल्याला जे मिळाले आहे ते प्रवाहित करण्यास आपण संमती दिली नाही तर ते कुंठित होऊन जाते; ते मिळेनासेदेखील होते. एवढेच नाही, तर त्यात जे जे भरलेले आहे तेही बिघडून जाते.

यापेक्षा जर, प्राणिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक शक्तींचा ओघ आपण मुक्तपणे वाहू दिला; स्वत:ला व्यक्तिनिरपेक्ष बनवीत, आपल्या किरकोळ व्यक्तित्वाने त्या महान वैश्विक प्रवाहाशी स्वत:ला कसे जोडून घ्यावयाचे हे जर त्याला माहीत झाले तर, आपण जे काही देतो ते आपल्याकडे हजारपटीने परत येते.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 102)

जर तुम्हाला साधना करावयाची असेल तर, साहजिकच थोडा वेळ तरी तुम्ही निरपेक्ष, नि:स्वार्थी कामासाठी, म्हणजेच फक्त स्वत:साठीच नसलेल्या कामासाठी दिला पाहिजे. अभ्यास करणे तर चांगलेच; त्याची अत्यंत गरजदेखील आहे, एवढेच नव्हे तर ते अनिवार्यसुद्धा आहे. मगाशी मी सांगितले त्याप्रमाणे, तुम्ही लहानपणीच काही गोष्टी शिकल्या पाहिजेत; नाहीतर मोठेपणी त्या साधणे अधिकच कठीण होते.

असे एक वय असते की जेव्हा या अभ्यासाचा एक भक्कम पाया तयार झालेला असतो, मग अशा वेळी तुमचा स्वत:चा असा कोणताही हेतू ज्यामध्ये नाही असे काहीतरी तुम्ही केले पाहिजे. कारण जर एखादी व्यक्ती स्वत:मध्येच मग्न राहत असेल तर ती जणूकाही एखाद्या कवचात बंदिस्त झाल्याप्रमाणे होते आणि तेव्हा ती वैश्विक शक्तींना खुली होऊ शकत नाही.

एखादी लहानशी नि:स्वार्थी कृती, अहंकारविरहित एखादी छोटीशी कृती ही व्यक्तीच्या क्षुद्र व अतिशय खुज्या अशा व्यक्तिमत्त्वापलीकडील आगळ्यावेगळ्या अशा गोष्टींसाठीची दालने व्यक्तीला खुली करून देते. व्यक्ती सामान्यत: स्वत:ला एका कवचात बंदिस्त करून घेते आणि जेव्हा एखादा धक्का तिला बसतो किंवा काही संघर्ष होतो तेव्हाच त्या व्यक्तीला इतर कवचांची जाणीव होते.

परंतु सर्वांच्यामध्ये प्रवाहित असलेल्या एका महान शक्तीची जाणीव होणे, मानवी जीवनाच्या व विश्वातील प्रत्येक जीवाच्या परस्परावलंबी स्वरूपाची जाणीव होणे ही एक दुर्मिळ बाब आहे आणि साधनेतील अपरिहार्य अशा अवस्थांपैकी ही एक अवस्था आहे.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 153)

प्रश्न : योग करण्याची पात्रता येण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे?

श्रीमाताजी : प्रथमतः आपण जागृत झालो पाहिजे. आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या अगदीच अल्प अंशाची जाणीव असते. उरलेला बहुतेक सर्व भाग आपल्याला अज्ञात असतो. आपण त्याविषयी अजागृत असतो. या अजागृतीमुळेच आपण आपल्या असंस्कारित प्रकृतीला चिकटून राहतो आणि या अजागृतीमुळेच प्रकृतीमध्ये काही बदल किंवा रूपांतरण घडून आणण्यामध्ये अडसर निर्माण होतो. या अजागृतीच्या माध्यमातूनच अदिव्य शक्ती आपणामध्ये प्रवेश करतात आणि आपल्याला त्यांचे गुलाम बनवून टाकतात.

तुम्ही स्वत:विषयी जागृत झाले पाहिजे, तुमची प्रकृती व तुमच्यामध्ये निर्माण होणारी आंदोलने यांविषयी तुम्ही जागृत झाले पाहिजे. तुम्ही काही गोष्टी का करता व कशा करता, त्याविषयी तुमच्या भावना कशा प्रकारच्या आहेत व त्या तशा का आहेत, त्या गोष्टीसंबंधी तुमचे विचार काय आहेत व ते तसे का आहेत ह्याचे ज्ञान तुम्ही करून घेतले पाहिजे. जे हेतु व ज्या उर्मी, ज्या प्रकट वा अप्रकट शक्ती तुम्हाला कृतिप्रवण करतात त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत.

सारांश असा की, तुम्ही आपल्या अस्तित्वरूपी यंत्राचे भाग सुटे सुटे करून निरखून पारखून पाहिले पाहिजेत. अशा रीतीने तुम्ही एकदा का जागृत झालात की, तुम्हाला वस्तुस्थिती ओळखता येईल, तिचे पृथक्करण करता येईल. तुम्हाला खाली खेचणाऱ्या शक्ती कोणत्या व तुम्हाला साह्यभूत होणाऱ्या शक्ती कोणत्या, हे तुम्हाला ओळखता येईल. योग्य काय नि अयोग्य काय, सत्य काय नि असत्य काय, दिव्य काय नि अदिव्य काय हे एकदा का तुम्हाला समजू लागले की जे योग्य, सत्य, दिव्य असेल त्याला धरूनच तुम्ही अगदी काटेकोरपणे आचरण केले पाहिजे.

म्हणजेच जे योग्य व दिव्य त्याचा निश्चयपूर्वक स्वीकार करून, तद्विरोधी सर्वांचा त्याग केला पाहिजे. पदोपदी हे द्वंद्व तुमच्यापुढे उभे राहील आणि पदोपदी तुम्हाला निवड करावी लागेल. तुम्हाला धीर धरावा लागेल, चिकाटीने व सावधगिरीने प्रयत्न करावा लागेल. जणू डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागेल. संतसत्पुरुष सांगतात त्याप्रमाणे, दिव्यत्वाच्या विरोधी असणाऱ्या अदिव्याला कोणतीच संधी मिळू नये यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी अदिव्याला नकार दिला पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 01-02)

“पूर्णत्वप्राप्तीसाठी पहिली पायरी म्हणजे स्वत:विषयी जागृत होणे. आपल्या अस्तित्वाचे भिन्न भिन्न भाग व त्या प्रत्येकाची निरनिराळी कार्ये यांविषयी जागृत होणे. हे भाग एकमेकांपासून अलगपणे पाहण्यास तुम्ही शिकले पाहिजे; तेव्हाच तुम्हाला तुमच्या ठिकाणी घडणाऱ्या क्रिया व तुम्हाला कृतिप्रवण करणारे अनेक आवेग, प्रतिक्रिया आणि परस्परविरोधी इच्छा यांचा उगम कोठे आहे हे स्पष्टपणे सापडू शकेल… या क्रियांचे विशेष काळजीपूर्वक निरीक्षण करून, त्यांना उच्चतम ध्येय-न्यायासनासमोर आणून, आपण त्याने दिलेला निर्णय मानण्याची मनापासून खरी इच्छा बाळगली असेल, तरच आपल्यामधील अप्रमादशील विवेकशक्ती जागृत होण्याची आशा आपण बाळगू शकू.” श्रीमाताजींनी ‘जीवनाचे शास्त्र’ या लेखमालिकेमध्ये वरील विचार मांडले होते.

त्यावर भाष्य करताना त्या म्हणतात – आपल्यामधील ह्या आंतरिक हालचालींचा कोठे, कसा उगम होतो यासंबंधी आपल्याला स्पष्ट कल्पना आली पाहिजे. कारण आपल्या अस्तित्वामध्ये परस्परविरोधी प्रवृत्ती असतात. काही प्रवृत्ती तुम्हाला एका बाजूस खेचतात, दुसऱ्या प्रवृत्ती तुम्हाला दुसऱ्या बाजूस खेचतात आणि त्यामुळे जीवनामध्ये सगळा गोंधळ माजतो.

तुम्ही स्वत:चे नीट निरीक्षण केलेत तर असे दिसून येईल की, अस्वस्थ होण्याजोगे तुमच्याकडून काही घडले तर, लगेचच तुमच्या त्या कृतीचे समर्थन करण्यासाठी मन अनुकूल कारणे देऊ लागते. हे मन कोणत्याही गोष्टीला मुलामा देण्यासाठी तयारच असते. आणि त्यामुळेच अशा परिस्थितीमध्ये स्वत:ला जाणणे कठीण होऊन बसते. मनोमय अस्तित्वाच्या या छोट्या छोट्या खोटेपणाकडे स्पष्टपणे पाहण्यासाठी आणि स्वत:ला खऱ्या अर्थाने जाणण्यासाठी व्यक्ती पूर्ण प्रामाणिकच असावी लागते.

सबंध दिवसातील तुमच्या हालचाली, क्रियाप्रतिक्रिया तुम्ही एकामागून एक यंत्रवत अखंडपणे नुसत्या न्याहाळत बसलात, तर त्याने तुमची प्रगती होऊ शकणार नाही. या निरीक्षणातून तुम्हाला प्रगती करून घ्यावयाची असेल, तर तुमच्या अंतरंगांतील असे काहीतरी, असा एखादा उत्तम भाग तुम्ही शोधून काढला पाहिजे की, जो प्रकाशयुक्त असेल, सदिच्छायुक्त असेल आणि प्रगतीसाठी अत्यंत उत्सुक असेल; आणि त्यामुळे त्याच्या प्रकाशात तुम्ही स्वत:ला तपासू शकाल. तो प्रकाशयुक्त भाग समोर ठेवून, चित्रपटात जशी एकामागून एक चित्रे सरकतात, त्याप्रमाणे दिवसभरातील तुमच्या सर्व कृती, सर्व भावना, सर्व आवेग, उर्मी, विचार त्याच्या समोरून सरकत जाऊ देत. त्यानंतर त्यामध्ये सुसंगती लावण्याचा प्रयत्न करा; म्हणजेच असे पाहा की, अमुक एका गोष्टीनंतरच दुसरी गोष्ट का घडली?

तुमच्यासमोरील प्रकाशमय पडद्याकडे निरखून पाहा. काही गोष्टी त्याच्या समोरून जातात, सहज सरळ जातात. दुसऱ्या काही गोष्टींची थोडीशी छाया पडते आणि काही गोष्टी अशा असतात की, त्यांची अतिशय काळीकुट्ट आणि आपल्याला आवडणार नाही अशी छाया पडते. तुम्ही या बाबतीत अत्यंत प्रामाणिक, प्रांजळ असले पाहिजे. एखादा खेळ खेळत असल्याप्रमाणे अगदी प्रामाणिकपणे हे काम करा.

”अमुक परिस्थितीमध्ये मी अशी एक कृती केली, माझ्या मनात अशा अशा भावना होत्या, मी अमुक एका रीतीने त्यावेळी विचार केला. खरेतर, माझे ध्येय आहे आत्मज्ञान आणि आत्मप्रभुत्व! पण आत्ता माझी कृती या ध्येयाला धरून होती की नाही?” असा विचार करा. जर ती कृती तुमच्या ध्येयाला धरून घडली असेल, तर त्या प्रकाशमय पडद्यावर तिची काळी छाया पडणार नाही; ती कृती पारदर्शक असेल. मग त्या कृतीविषयी चिंता करण्याचे तुम्हाला कारण नाही.

ती कृती तुमच्या ध्येयाशी सुसंगत नसेल तर मात्र तिची छाया पडेल. मग तुम्ही विचार करा – “का बरे ही अशी छाया पडली? आत्मज्ञान आणि आत्मप्रभुत्व यांविषयीच्या माझ्या संकल्पाच्या विरोधी असे या कृतीमध्ये काय होते?” बहुतेक वेळा तिचा संबंध अचेतनेशी, बेसावधपणाशी असल्याचे तुम्हाला आढळून येईल. तेव्हा मग आपण केलेल्या बेसावध गोष्टींमध्ये तिची नोंद करा आणि ठरवा की, पुढच्या वेळेस अशी एखादी गोष्ट करण्यापूर्वीच मी सावध राहण्याचा प्रयत्न करीन.

इतर काही बाबतीत तुम्हाला असे आढळून येईल की, ज्याची छाया पडली ती गोष्ट म्हणजे तुमचा क्षुद्र घृणास्पद अहंकार होता, अगदी काळा; आणि तुमची कृती, तुमचे विचार विकृत करावयास तो आला होता. नंतर हा अहंकार तुम्ही तुमच्या प्रकाशकेंद्रासमोर ठेवा आणि स्वत:ला विचारा, ‘मला अशी कृती, असे विचार करावयास लावण्यास, ह्या अहंकाराला काय बरे अधिकार आहे?’

त्यासंबंधीचे कोणतेही विसंगत असे समर्थन ग्राह्य न मानता, तुम्ही शोध घेतला पाहिजे आणि मग तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचा एक असा भाग एका कोपऱ्यामध्ये दिसेल की, जो विचार करत असतो, म्हणत असतो, “नाही, नाही, मला इतर काहीही चालेल पण हे मात्र नाही.”

तुम्हाला असे स्पष्ट दिसेल की, तो भाग म्हणजे क्षुद्र अभिमान, आत्मप्रीती असते. कुठेतरी दडून असलेली अहंकाराची एक छुपी भावना असते, अशा शेकडो गोष्टी असतात.

या सर्व गोष्टी तुमच्या ध्येयप्रकाशात बघा. ”ह्या अमुक एका वृत्तीची जोपासना करणे हे माझ्या आत्मशोधाशी, ध्येयप्राप्तीशी मिळतेजुळते आहे का? मी हा काळा कोपरा प्रकाशासमोर ठेवीत आहे. प्रकाश त्यामध्ये शिरून तो काळा भाग नाहीसा होईपर्यंत मी हे करणार आहे.” तुम्ही हे केल्यानंतर खरोखरी हे नाटक संपते. मात्र तुमच्या सबंध दिवसाचे नाटक एवढ्याने संपत नाही, हे तर स्पष्टच आहे. कारण त्या प्रकाशासमोरून तुम्हाला आणखी कित्येक गोष्टी न्यावयाच्या राहिलेल्या असतात.

मात्र हा खेळ, तुम्ही पुढे चालू ठेवलात आणि अत्यंत मनःपूर्वकतेने तुम्ही हा खेळ पुन्हा पुन्हा खेळत राहिलात तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते की, त्यानंतर सहा महिन्यांनी तुम्ही तुम्हालाच ओळखू शकणार नाही. तुम्ही स्वत:शीच म्हणाल, ”काय? मी अशी होते? अवघडच होते माझे सारे.”

– श्रीमाताजी
(CWM 04 : 38-39)

आपली मने आणि हृदये, आपले सर्व विचार, आपल्या सर्व कृती या ईश्वराने पूर्णत: व्यापल्या जाव्यात आणि त्या ‘त्याच्या’ महान अशा तेजोमयतेने प्रकाशमान व्हाव्यात या हेतूने एक उत्कट अभीप्सा बाळगून, पूर्ण प्रामाणिकता बाळगून, शुभसंकल्प करत, रोज स्वत:ला सत्यसूर्याप्रत, परमप्रकाशाप्रत, या विश्वाच्या उगमाप्रत आणि विश्वाच्या बौद्धिक जीवनाप्रत उन्नत करण्याचा एक निश्चय आपण सर्वांनी केला पाहिजे असे मला वाटते.

तेव्हाच खऱ्या अर्थाने गतकाळातील थोर सत्पुरुषाच्या उपदेशाचे अनुसरण करण्याचा लाभ आणि अधिकार आपण प्राप्त करून घेऊ शकू. त्यांनी असे सांगितले आहे की : ”तुमची हृदये करूणेने भरून जाऊ देत, आणि त्यानंतर, दुःखपीडेने छिन्नविछिन्न झालेल्या या जगाकडे वळा, प्रशिक्षक व्हा, आणि जिथे कोठे अज्ञानांधकार सत्ता गाजवीत असेल तेथे प्रकाशदीप पेटवा.”

– श्रीमाताजी
(CWM 02 : 29)

आपल्या अंतरंगातील देवता कधीही सक्ती करत नाही. कोणतीही मागणी करत नाही किंवा भयदेखील दाखवीत नाही; ती स्वत:चेच आत्मदान करते, प्राणिमात्र आणि वस्तुजात यांच्या हृदयांमध्ये ती दडून बसते; आणि ती स्वत:चेच विस्मरण करविते.

ती कोणाला दोष देत नाही, की गुणदोषांचे मापन करत बसत नाही. कोणास शाप देत नाही की कोणाची निंदाही करत नाही. तर ती कोणत्याही प्रतिबंधाविना पूर्णत्व आणण्याचे कार्य अथकपणे करत राहते; कानउघडणी न करता सुधारणा घडवून आणण्याचे, उतावीळपणा न करता प्रोत्साहित करत राहण्याचे कार्य अथकपणे करत राहते. व्यक्तीच्या ग्रहणशीलतेनुसार प्रत्येकाला वैभवसंपन्न करण्यासाठी ती अथकपणे झटत राहते.

ती माऊली आहे. तिच्या प्रेमरूपी फळांकरवी ती भरणपोषण करते; सांभाळ करते आणि रक्षण करते; सल्ला देते व सांत्वन करते; कारण ती सर्वकाही जाणते, ती सर्वकाही सहन करू शकते, ती सर्वांच्या चुका पदरात घेते व क्षमा करते; सर्वांविषयी आशा बाळगते आणि सर्वांना सर्व गोष्टींसाठी सुसज्ज करते.

तिने सर्वकाही तिच्या स्वत:मध्येच धारण केलेले असल्यामुळे, जी सर्वांसाठी असू शकत नाही अशी कोणतीच गोष्ट तिच्या मालकीची नसते. तिची सत्ता सर्वत्रांवर चालत असल्यामुळेच ती सर्वांची सेवकही असते. याच कारणासाठी लहान अथवा थोर, जे कोणी तिच्या बरोबर सत्ताधीश होण्याची किंवा तिच्यामधील देवपद मिळविण्याची इच्छा करतात, ते तिच्याप्रमाणे सर्व बांधवांचे सेवक बनून जातात; जुलमी सत्ताधीश बनत नाहीत.

सेवकाची ही विनम्र भूमिका खरोखर किती सुंदर आहे! सर्वांच्या अंतर्यामी असलेल्या परमेशाचे संदेशदूत होणे आणि सर्व वस्तूंना जीवन देणाऱ्या दिव्य प्रेमाची अभिव्यक्ती करणे हे ज्यांचे जीवितकार्य आहे त्या सर्वांचीच अशा प्रकारची सेवकाची भूमिका असते.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 42-43)