Tag Archive for: साधना

साधनेमध्ये होणाऱ्या प्राणिक प्रेरणांच्या भेसळीतून जेव्हा साधक मुक्त होईल आणि तो जेव्हा श्रीमाताजींप्रत साधेसुधे आणि प्रामाणिक आत्मार्पण करू शकेल, तेव्हाच त्या साधकातील चैत्य पुरुष पूर्णत: खुला होईल.

जर त्यामध्ये कोणतेही अहंकारी वळण वा प्रेरणेची अप्रामाणिकता असेल, प्राणिक मागण्यांच्या दबावाखाली येऊन जर योगसाधना केली जात असेल, किंवा पूर्णपणे वा अंशत: कोणत्यातरी आध्यात्मिक वा इतर आकांक्षा पूर्ण करण्यासाठी साधना केली जात असेल; अभिमान, प्रौढी, किंवा सत्तापिपासा, पद मिळविण्यासाठी किंवा इतरांवर प्रभाव पडावा म्हणून किंवा योगिक शक्तीच्या साहाय्याने कोणतीतरी प्राणिक इच्छा भागवण्याची उर्मी म्हणून साधना केली जात असेल तर, चैत्य (Psychic) हे मुक्त होणार नाही, किंवा ते जर मुक्त झालेच तर अंशत:च होईल किंवा कधीकधीच होईल किंवा परत बंदिस्त होऊन जाईल कारण ते प्राणिक कृतींनी झाकले जाईल; चैत्य अग्नी प्राणिक धुरामुळे घुसमटून, विझून जातो.

तसेच, जर योगसाधनेमध्ये मन अग्रस्थान घेत असेल आणि आंतरात्म्याला मागे ठेवत असेल किंवा भक्ती वा साधनेतील इतर क्रिया ह्या चैत्य रूप धारण करण्याऐवजी अधिक प्राणिक बनत असतील, तर तशीच अ-क्षमता निर्माण होते.

शुद्धता, साधीसुधी प्रामाणिकता आणि कोणत्याही ढोंगाविना वा मागणीविना, भेसळयुक्त नसलेले अनंहकारी आत्मार्पण ह्या चैत्य पुरुषाच्या पूर्ण प्रकटीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या अटी आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 30: 349)

चैत्य पुरुषाला पुढे आणण्याची मान्यताप्राप्त अशी कोणतीही पद्धत नसते. ते अभीप्सेवर, श्रद्धेच्या, भक्तीच्या वाढीवर, मानसिक, प्राणिक अहंकार व त्याच्या गतिविधींची पकड कमी होण्यावर अवलंबून असते. अशा प्रकारे जर विकास होत राहिला तर, एका विवक्षित क्षणी चैत्य पुरुष आणि उर्वरित इतर प्राकृतिक घटक यांमधील पडदा पातळ पातळ होत जातो आणि तो फाटायला सुरुवात होते आणि मग चैत्य पुरुष हा अधिकाधिक दृश्य, सक्रिय बनायला लागतो आणि मग तो ताबा घेतो. कधीकधी तर तो अचानकच पुढे येऊ शकतो, परंतु या बाबतीत एकच एक असा कोणताच नियम नाही.

*

सदोदित प्रेम आणि अभीप्सा यांच्या माध्यमातून चैत्य पुरुष पुढे येतो किंवा मन व प्राण हे वरून होणाऱ्या अवतरणाने आणि शक्तीच्या कार्यामुळे सुसज्ज झाले असतील तर, तेव्हाही तो पुढे येतो.

*

हृदयामध्ये वरून होणाऱ्या गतिशील अवतरणामुळे, चैत्य पुरुष पुढे येण्यास साहाय्य होते पण हे नेहमीच आपोआप घडते असे नाही – एवढेच की, त्यामुळे चैत्य पुरुषासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते.

*

चैत्य पुरुष पुढे आणावयाचा असेल तर, स्वार्थीपणा आणि मागण्या (ज्या प्राणिक भावनांचा आधार असतात त्या) हद्दपार झाल्या पाहिजेत – किमान, त्या स्वीकारता तरी कामा नयेत.

*

भूतकाळात घडून गेलेल्या किंवा वर्तमानामध्ये घडणाऱ्या कृत्यांपासून मुक्तता करून घेण्याची आणि चैत्य व आध्यात्मिक चेतनेमध्ये जीवन जगण्याची जर एखाद्या व्यक्तीची खरीखुरी प्रामाणिक इच्छा असेल तर, भूतकाळात घडलेल्या वा वर्तमानात घडणाऱ्या कोणत्याही गोष्टी, चैत्य पुरुषाला अग्रभागी येण्यापासून रोखू शकत नाहीत.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 361)

तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती अशी की, अंधारा काळ हा अपरिहार्य आहे. जेव्हा तुमच्यातील चैत्य सक्रिय असतो तेव्हा कोणत्याही स्पष्ट कारणाविना तुम्हाला एक प्रकारचा आनंद जाणवतो. तो काही काळ तसाच टिकून राहतो आणि परत कोणत्यातरी मानसिक किंवा प्राणिक प्रतिक्रिया उमटतात आणि परत मग तुम्ही त्याच त्या अंधारात जाऊन पडता. हे काही काळ चालत राहणार.

हळूहळू प्रकाशमान दिवस हे अधिकाधिक काळ टिकून राहू शकतील आणि बऱ्याच कालावधीनंतर कधीतरी मग अंधारा काळ येईल आणि तो सुद्धा कमी काळासाठी येईल. अंतिमत: जोवर तो अंधारा काळ पूर्णपणे नाहीसा होत नाही, तोपर्यंत हे असे चालत राहील. तोपर्यंत तुम्ही हे लक्षात ठेवावयास हवे की, ढगांमागे सूर्य दडलेला असतोच, तेव्हा तुम्ही काळजी करण्याचे काही कारण नाही.

तुमच्याकडे एखाद्या बालकाप्रमाणे विश्वास असावयास हवा – हा विश्वास की, कोणीतरी तुमची काळजी घेणारे आहे आणि त्यामुळे तुम्ही त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहू शकता.

– श्रीमाताजी

*

जेव्हा अहं-केंद्रितता ही मोठ्या प्रमाणात नाहीशी झालेली असते, तसेच श्रीमाताजींप्रत उत्कट भक्ती असते तेव्हा, चैत्य केंद्र थेट खुले होणे हे अधिक सहजसोपे असते. एक प्रकारची आध्यात्मिक विनम्रता आणि समर्पणाची, विसंबून असल्याची भावना ही आवश्यक असते.

– श्रीअरविंद

*

इच्छावासनांचा परित्याग केल्यामुळे, जेव्हा त्या इच्छावासना व्यक्तीचे विचार, भावभावना, कृती यांचे शासन करेनाशा होतात तेव्हा, आणि पूर्ण प्रामाणिकतेनिशी आत्मार्पण करण्याविषयीची एक स्थिर अशी अभीप्सा व्यक्तीमध्ये उदित होते तेव्हा, कालांतराने चैत्य पुरुष सहसा आपणहूनच खुला होतो.

– श्रीअरविंद
(CWM 14 : 247), (CWSA 32 : 163), (CWSA 30 : 349)

सातत्यपूर्ण व प्रामाणिक अभीप्सा आणि केवळ ईश्वराभिमुख होण्याची इच्छा – ही चैत्य पुरुषाला पुढे आणण्याची सर्वाधिक उत्तम साधने आहेत, हे श्रीअरविंदांचे वचन लक्षात घ्या.

जेव्हा तुम्ही मोकळे असाल आणि कोणतीही व्यवधाने नसतील अशी दिवसातील कोणतीही एक वेळ निश्चित करा; शांतपणे बसा आणि चैत्य पुरुषाशी संपर्क साधायचा आहे अशी अभीप्सा (Aspiration towards Divine) उरी बाळगून चैत्य पुरुषाचा विचार करा. जरी तुम्हाला त्यात ताबडतोब यश आले नाही तरी नाउमेद होऊ नका, एक ना एक दिवस तुम्हाला यश नक्की मिळणार आहे.

– श्रीमाताजी
(CWM 17 : 363)

चैत्य शिक्षणाचा आरंभबिंदू असा की, तुमच्यामध्येच अशा कशाचा तरी शोध घ्यावयाचा की, जे तुमच्या शरीराच्या किंवा तुमच्या जीवनातील परिस्थितीहून स्व-तंत्र असेल; तुम्हाला देण्यात आलेल्या मानसिक घडणीतून त्याचा जन्म झालेला नसेल; तुमची भाषा, तुमच्या प्रथापरंपरा, सवयी, तुमचा देश, युग ह्या सर्वांपासून ते निरपेक्ष, स्व-तंत्र असे असेल.

ज्या युगामध्ये तुम्ही राहता, ज्या देशामध्ये तुमचा जन्म झाला आहे, तुम्ही ज्या वातावरणामध्ये राहता तेथील प्रथापरंपरा, चालीरिती, सवयी, तुम्ही जी भाषा बोलता ती भाषा या साऱ्यांच्या सापेक्ष नसणाऱ्या ह्या गोष्टीचा; तुमची घडण ज्या मानसिक ठेवणीमधून झाली त्यामधून जिचा उदय झालेला नाही अशी, तुमचे शरीर आणि तुमच्या जीवनातील परिस्थिती यांच्या सापेक्ष नसलेली, स्व-तंत्र अशी, तुमच्या अस्तित्वामध्येच दडलेली जी एक गोष्ट आहे, त्या गोष्टीचा शोध घ्यावयाचा हा या चैत्य शिक्षणाचा (Psychic Education) आरंभबिंदू आहे.

तुमच्या अस्तित्वाच्या आत खोलवर अशी एक गोष्ट आहे की, जी स्वत:मध्ये विश्वव्यापकता, अमर्याद विस्तार, अखंड सातत्याची एक भावना बाळगून आहे, त्या गोष्टीचा शोध तुम्ही घ्यावयास हवा.

त्यानंतर तुम्ही स्वत:ला विकेंद्रित करता, विस्तृत करता, व्यापक करता; तुम्ही सर्व वस्तुमात्रांमध्ये आणि सर्व जीवांमध्ये जगू लागता; एकमेकांना परस्परांपासून विभिन्न करणारे सारे बांध ढासळून पडतात. तुम्ही त्यांच्या विचारांनी विचार करू लागता, त्यांच्या संवेदनांनी स्पंदित होता, त्यांच्या भावभावना तुम्हाला संवेदित होतात, तुम्ही त्यांचे जीवन जगू लागता. आजवर जे जड, अक्रिय वाटत होते ते एकदम जिवंत होऊन जाते, दगडसुद्धा जणु जिवंत होतात, वनस्पतींना संवेदना होतात, त्या इच्छा बाळगतात, त्यांना सुख-दुःख होते, कमीअधिक अस्फुट परंतु स्पष्ट आणि बोलक्या अशा भाषेत प्राणी बोलू लागतात; कालातीत किंवा मर्यादातीत अशा एका अद्भुत चेतनेमध्ये प्रत्येक गोष्ट जिवंत होऊन जाते.

चैत्य साक्षात्काराचा हा केवळ एक पैलू आहे, अजून पुष्कळ पैलू आहेत. तुमच्या अहंकाराचे अडथळे भेदण्यासाठी, तुमच्या बाह्य व्यक्तिमत्त्वाच्या भिंती पाडण्यासाठी, तुमच्या प्रतिक्रियांच्या वीर्यहीनतेच्या, आणि तुमच्या इच्छाशक्तीच्या अक्षमतेच्या साऱ्या मर्यादा भेदण्यासाठी ह्या साऱ्या गोष्टी तुम्हाला साहाय्यभूत होतात.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 32-33)

आत्मज्ञान आणि आत्मनियंत्रण यासाठी जी साधना करणे आवश्यक आहे; त्या साधनेचा आरंभबिंदू म्हणजे ‘चैत्य साधना’ होय. आपल्यामधील आपल्या अस्तित्वाच्या सर्वोच्च सत्याचे स्थान असलेल्या मनोवैज्ञानिक केंद्राला आपण ‘चैत्य’ असे म्हणतो. ते केंद्र, या सर्वोच्च सत्याला जाणून घेऊ शकते आणि त्या सत्याला ते गतिशील, कृतिप्रवण करू शकते. त्यामुळे या चैत्य अस्तित्वाविषयी जागृत होणे हे खूप महत्त्वाचे आहे. ते अस्तित्व हे जोवर आपल्यासाठी एक जिवंत असे वास्तव बनत नाही आणि आपण त्याच्याशी एकरूप होत नाही तोपर्यंत, त्या अस्तित्वावर लक्ष एकाग्र करणे, हे खूप महत्त्वाचे असते. त्याच्या आकलनासाठी आणि अंतिमत: त्याच्याशी तादात्म्य प्राप्त करून घेण्यासाठी अनेकविध पद्धती विविध काळामध्ये आणि विविध ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी काही पद्धती मनोवैज्ञानिक आहेत, काही धार्मिक आहेत तर काही अगदी यांत्रिक आहेत.

प्रत्यक्षात, प्रत्येक व्यक्तीने तिला सर्वाधिक योग्य असणारी पद्धत शोधून काढावयास हवी आणि जर व्यक्तीकडे अगदी तळमळीची, अविचल अशी अभीप्सा (Aspiration towards Divine) असेल, सातत्यपूर्ण व गतिशील इच्छा असेल तर, व्यक्तीला त्या ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी मदत म्हणून कोणता ना कोणता तरी मार्ग निश्चितच सापडतो – बाह्यत: पाहता वाचन व अभ्यास, आणि आंतरिकदृष्टीने पाहता एकाग्रता, ध्यान, साक्षात्कार आणि अनुभूती या त्या पद्धती आहेत.

परंतु एक गोष्ट मात्र अनिवार्य आहे; ती म्हणजे शोध घेण्याची आणि साक्षात्कार करून घेण्याची अनिवार इच्छा. त्याचा शोध आणि साक्षात्कार हा आपल्या जीवाचा अगदी मूलभूत असा एकाग्रतेचा विषय असला पाहिजे, हा असा किमती मोती आहे की जो, आपण कोणतीही किंमत देऊन प्राप्त करून घ्यायलाच हवा. तुम्ही काहीही करत असलात, तुम्ही कोणत्याही उद्योगात, कामात व्यग्र असलात तरीही, तुमच्या जीवाचे सत्य शोधून काढणे आणि त्याच्याशी एकत्व पावणे ही गोष्ट तुमच्यामध्ये नेहमीच जिवंत असली पाहिजे; तुम्हाला जे काही जाणवते, तुम्ही जो काही विचार करता, तुम्ही ज्या कोणत्या कृती करता त्या पाठीमागे कायम तोच ध्यास असला पाहिजे.

आंतरिक शोधाच्या ह्या मोहिमेला पूरक म्हणून, मनाच्या विकसनाकडे दुर्लक्ष न करणे हेसुद्धा हिताचे ठरते. कारण हे मनरूपी साधन खूप साहाय्यकारी ठरू शकते किंवा तितकेच ते मार्गातील मोठी धोंडदेखील ठरू शकते. स्वाभाविक स्थितीत असताना मानवी मनाची दृष्टी नेहमीच संकुचित असते, त्याची समज मर्यादित असते, ते त्याच्या संकल्पनांच्या बाबतीत खूप हटवादी असते आणि म्हणून त्याला व्यापक करण्यासाठी, त्याला अधिक लवचीक आणि अधिक सखोल करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असते. त्यामुळे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचे शक्य तेवढे सर्व दृष्टिकोन विचारात घेतले गेले पाहिजेत.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 4-5)

प्रश्न : आत्मा व्यक्तिभूत होतो आणि क्रमश: चैत्य पुरुषामध्ये रूपांतरित होतो. त्याच्या जलद विकसनासाठी सुयोग्य स्थिती कोणती?

श्रीमाताजी : आत्मा जे प्रगतिशील व्यक्तिरूप धारण करतो त्यामधून चैत्य पुरुष निर्माण होतो, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.

कारण आत्मा स्वयमेवच परम ईश्वराचा एक असा भाग असतो की, जो अपरिवर्तनीय आणि शाश्वत असा असतो. चैत्य पुरुष हा प्रगतिशील आणि अमर्त्य असतो.

आत्म-ज्ञानाच्या, आत्म-नियमनाच्या, आत्म-प्रभुत्वाच्या सर्वच पद्धती चांगल्या असतात. जी पद्धत तुमच्या प्रकृतीशी मिळतीजुळती आहे आणि जी सहज स्वाभाविकरितीने तुमच्यापाशी आलेली आहे, अशी पद्धत तुम्ही निवडली पाहिजे. आणि एकदा का ती पद्धत तुम्ही निवडली की, मग मात्र कितीही अडचणी आल्या, कितीही अडथळे आले तरी, तुम्ही त्यापासून न ढळता प्रयत्न करत राहिले पाहिजे, तुमची बौद्धिक इच्छाशक्ती तिथे उपयोगात आणली पाहिजे. हे एक असे दीर्घकालीन आणि बारकाव्याने करावयाचे काम आहे की, जे अगदी प्रामाणिकपणानेच हाती घेतले पाहिजे आणि चढत्या वाढत्या प्रामाणिकपणाने, इमानेइतबारे आणि समग्रतेने ते चालू ठेवले पाहिजे. सोपे मार्ग बहुधा कोठेच घेऊन जात नाहीत.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 246-247)

प्रश्न : चैत्य पुरुष जागृत करण्याची प्रभावी साधना कोणती?

श्रीमाताजी : तो जागृतच आहे; तो टक्क जागा आहे. आणि तो जागा आहे, एवढेच नाही तर, तो सक्रिय आहे, एवढेच की, तुम्हाला त्याची जाणीव नाही. तुम्हाला तो संवेदित होत नसल्यामुळे तुम्हाला तो झोपला आहे असे वाटते.

मूलत: ह्या चैत्य पुरुषाची आंतरिक इच्छा जर मानवामध्ये नसती तर, मला वाटते मनुष्यमात्र हा अगदीच निराश, मंद झाला असता, तो जवळजवळ प्राण्यासारखेच जीवन जगला असता. अभीप्सेची प्रत्येक चमक ही त्या चैत्य प्रभावाची अभिव्यक्ती असते. जर चैत्याचे अस्तित्वच नसते, चैत्याचा प्रभाव नसता तर, माणसामध्ये प्रगतीची जाणीव किंवा प्रगतीची इच्छाच कधी निर्माण झाली नसती.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 165)

सामान्यत: म्हणजे सर्वसामान्य जीवनामध्ये, व्यक्तीचा चैत्य पुरुषाशी संबंध हा जवळपास नसल्यासारखाच असतो. सर्वसामान्य जीवनामध्ये ज्याचा चैत्य पुरुषाशी जागृत संपर्क आहे, अगदी क्षणभरापुरता का असेना, पण ज्याचा असा संपर्क आहे अशी व्यक्ती लाखांमध्ये एकसुद्धा सापडत नाही.

चैत्य पुरुष हा आतून कार्य करू शकतो, पण बाह्य व्यक्तित्वाच्या दृष्टीने, ते कार्य तो इतका अदृश्यपणे आणि इतक्या नकळतपणे करतो की, जणू चैत्य पुरुष त्यांच्या दृष्टीने अस्तित्वातच नसतो. बहुतांशी उदाहरणांमध्ये, अगदी खूप मोठ्या प्रमाणावर, जवळपास सर्वच उदाहरणांमध्ये तो जणू सुप्त असतो, अजिबात सक्रिय नसतो.

स्वत:च्या चैत्य पुरुषाशी जागृत संपर्क प्रस्थापित करणे, हे एखाद्या व्यक्तीला पुष्कळ साधनेमधून आणि खूपशा चिवट प्रयत्नांमधूनच शक्य होते. स्वाभाविकपणेच, अशीही काही अपवादात्मक उदाहरणे असतात – परंतु ती खरोखरच अगदी अपवादात्मक असतात आणि ती इतकी कमी असतात की, ती हाताच्या बोटांवर मोजता येण्याजोगी असतात – जिथे चैत्य पुरुषाची पूर्णत: घडण झालेली आहे, जो मुक्त आहे, जो स्वत:चा स्वामी आहे, आणि ज्याने स्वतःचे कार्य पूर्ण करण्यासाठी मानवी देहामध्ये या पृथ्वीवर परतून यायचा निर्णय घेतलेला आहे, अशी उदाहरणे अगदीच अपवादात्मक असतात. आणि अशा उदाहरणांच्या बाबतीत, जरी त्या व्यक्तीने जाणिवपूर्वकपणे साधना केली नाही तरीही, चैत्य पुरुष इतका शक्तिशाली असू शकतो की, तो कमीअधिक जाणिवयुक्त नाते प्रस्थापित करू शकतो.

परंतु अशी उदाहरणे इतकी अद्वितीय असतात, इतकी दुर्मिळ असतात की, त्या अपवादात्मक उदाहरणांनी नियमच सिद्ध होतो. बाकी सर्वच बाबतीत, सर्वच उदाहरणांमध्ये, चैत्य पुरुषाची जाणीव होण्यासाठी खूप खूप सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असते.

सहसा असे मानण्यात येते की, व्यक्तीला जर ते तीस वर्षात साध्य करता आले, तीस वर्ष सातत्यपूर्ण प्रयत्नांनी हं, जर ते करता आले तर ती व्यक्ती अत्यंत भाग्यवान गणली जाते. आणि जर असे घडले तर तेही लवकरच घडले, असे म्हणावे लागेल. पण हे सुद्धा इतके दुर्मिळ आहे की, एखादा लगेचच म्हणतो की, “तो कोणीतरी असामान्य माणूस दिसतोय.” जे फार मोठे योगी असतात, ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे, जे कमी अधिक दिव्य जीव मानले जातात, त्यांच्याबाबतीत हे असे घडते.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 269)

(मनामध्ये यंत्रवतपणे विचारांचा जो गदारोळ चालू असतो, त्याविषयीचे विवेचन केल्यानंतर श्रीमाताजी पुढे सांगत आहेत)

तुमच्यावर आक्रमकपणे चालून येणाऱ्या असंबद्ध विचारांच्या पूराला, त्यांत वस्तुनिष्ठता आणण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने, पद्धतशीरपणे जर का तुम्ही दूर अंतरावर ठेवू शकलात तर, एक नवीनच बाब तुमच्या लक्षात येईल.

तुमच्या असे निदर्शनास येईल की, तुमच्यामधील काही विचार हे इतर विचारांपेक्षा अधिक प्रभावी आहेत, अधिक चिवट आहेत, ते विचार सामाजिक दृष्ट्या उपयुक्त, रीतीपरंपरांशी, नीतिनियमांशी आणि तसेच ह्या पृथ्वीचे आणि मनुष्यमात्राचे नियमन करणाऱ्या कायद्यांशीही संबंधित आहेत. ती तुमची त्या विषयांवरील मतं असतात किंवा तसा तुमचा दावा असतो आणि त्या नुसार वागण्याचा तुम्ही प्रयत्न करत असता.

तुमच्या त्या संकल्पनांपैकी एखाद्या संकल्पनेकडे पाहा, तुम्हाला जी जास्त परिचयाची आहे तिच्याकडे पाहा, अगदी काळजीपूर्वक पाहा, एकाग्र व्हा, अगदी पूर्ण प्रामाणिकपणे चिंतन करा, सर्व प्रकारचे पूर्वग्रह शक्य तितके बाजूला ठेवा आणि स्वत:ला विचारा की, या विषयावर तुमचे अमुक एक मत का आहे आणि तमुक एक मत का नाही.

प्रत्येक वेळी उत्तर बहुधा एकच असेल किंवा त्यासारखेच असेल कारण तुमच्या भोवतालच्या परिघात ते मत बहुधा प्रचलित असते आणि ते मत असणे हे चांगले मानले जाते आणि त्यामुळे अनायसे अनेकविध मतभेद, संघर्ष, टिकाटिप्पणी यांपासून तुमची सुटका होते. किंवा मग ते तुमच्या आईचे किंवा वडिलांचे मत असते, त्या विचारांनी तुमचे बालपण घडविलेले असते. किंवा ते मत म्हणजे, तुमच्या तरुणपणी तुम्ही घेतलेल्या धार्मिक म्हणा किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाचा तो स्वाभाविक परिणाम असतो. तो विचार तुमचा स्वत:चा विचार नसतो.

कारण, एखादा विचार तुमचा ‘स्वत:चा’ आहे असे म्हणण्यासाठी, तुमच्या जीवनादरम्यान निरीक्षण, अनुभव वा अनुमानातून, किंवा, अगदी सखोल चिंतनमननातून तयार झालेल्या तुमच्या तर्कशुद्ध विचारविश्वाचा तो एक भाग बनावा लागतो.

मनामध्ये व्यवस्था आणणे

आपल्यामध्ये सदिच्छा आहे आणि पूर्णतया प्रामाणिक असण्याचा आपला प्रयत्न आहे, म्हणजे आपल्या विचारांनुसारच आपल्या कृती असाव्यात असा आपला प्रयत्न आहे. त्यामुळे आपल्याला आता हे पटले आहे की, बाहेरून येणाऱ्या मनाच्या दंडकांनुसार आपण कृती करतो; ते दंडक आपण हेतुपुर:सर किंवा जाणीवपूर्वकतेने स्वीकारतो असेही नाही, तर आपल्या जडणघडणीमुळे, शिक्षणामुळे आपल्या नकळत पुन्हा पुन्हा आपण त्यांच्याकडे ओढले जातो, आणि त्या सगळ्यांपेक्षाही सामूहिक सूचनेचा आपल्यावर जबर पगडा असतो; ती सूचना इतकी शक्तिशाली, प्रभावी असते की, तिच्यापासून स्वत:चा बचाव करण्यामध्ये फारच कमी लोक यशस्वी होतात.

आपण प्राप्त करून घेऊ इच्छितो त्या मानसिक पृथगात्मतेपासून (Mental individuality) आपण किती दूर आहोत! आपल्या गतकाळातील इतिहासाने निश्चित केलेली, आणि आपल्या समकालीनांची अंध आणि अनिर्बंध इच्छा ज्यांवर लादली जाते अशी उत्पादने आपण आहोत. हे खूपच दयनीय असे दृश्य आहे… पण आपण खचून जायला नको ; जेवढा जास्त गंभीर आजार आणि उपाय शोधायची निकड जेवढी जास्त, तेवढ्या प्रमाणात आपण अधिक उत्साहाने त्याच्याशी संघर्ष केला पाहिजे.

पद्धत नेहमी एकच असणार : चिंतन, चिंतन आणि चिंतन.

आपण त्या साऱ्या संकल्पना, कल्पना एकापाठोपाठ एक विचारात घेतल्या पाहिजेत आणि आपल्या सर्वसाधारण जाणिवेला, आपल्या तर्कबुद्धीला, समतेच्या सर्वोच्च जाणिवेला स्मरून आपण त्यांचे विश्लेषण केले पाहिजे; आपण आजवर प्राप्त करून घेतलेले ज्ञान आणि अनुभवांचे संचित यांच्या तराजूमध्ये त्यांचे मूल्यमापन केले पाहिजे आणि मग त्यांची एकमेकांबरोबर संगती जुळविली पाहिजे, त्यांच्यामध्ये सुसंवाद प्रस्थापित केला पाहिजे. हे काम नेहमीच अवघड असते कारण अगदी परस्परविसंगत अशा कल्पना आपल्या मनामध्ये शेजारीशेजारी राहू देण्याची खेदजनक प्रवृत्ती आपल्यामध्ये असते.

त्या सर्व कल्पना आपण त्यांच्या योग्य जागी ठेवल्या पाहिजेत, आपल्या आंतरिक कक्षामध्ये सुव्यवस्था निर्माण केली पाहिजे. आणि ज्याप्रमाणे आपण आपल्या घरातील खोल्या आवरतो, नीटनेटक्या राखतो त्याप्रमाणे हे काम आपण दररोज केले पाहिजे. कारण मला वाटते, जशी आपण घराची काळजी घेतो किमान तेवढीतरी काळजी आपण आपल्या मनाची घेतली पाहिजे. पण पुन्हा एकदा लक्षात घ्या की, हे कर्म खरेखुरे परिणामकारक होण्यासाठी, मनाची सर्वोच्च, अतीव शांत, अत्यंत प्राजंळ अशी स्थिती आपलीशी व्हावी यासाठी ती कायम टिकवून ठेवण्याची धडपड केली पाहिजे.

ज्या विचारांचे आपण निरीक्षण, विश्लेषण, वर्गीकरण करू इच्छितो ते विचार आपल्यातील आंतरिक प्रकाशाने उजळून निघावेत म्हणून आपण पारदर्शक बनूया. आपल्या स्वत:च्या अगदी क्षुल्लक आवडीनिवडी आणि क्षुद्र वैयक्तिक सोयीसुविधा यांच्या वर उठण्याइतपत आपण नि:पक्षपाती आणि धैर्यशाली बनूया. या विचारांकडे आपण केवळ विचार म्हणूनच, कोणत्याही पूर्वग्रहाविना बघूया.

थोडे थोडे करून, जर वर्गीकरणाच्या या कामात आपण चिकाटी बाळगली तर आपल्या मनांमध्ये प्रकाश आणि सुव्यवस्था घर करून राहतील. पण आपण हे विसरता कामा नये की, आपण भविष्यात प्रत्यक्षात आणू इच्छितो त्याच्या तुलनेत, ही व्यवस्था म्हणजे व्यवस्था नसून सावळा गोंधळच आहे. कालांतराने आपण जो प्रकाश ग्रहण करू शकू त्या प्रकाशाच्या तुलनेत, हा प्रकाश म्हणजे प्रकाश नसून काळोखच आहे.
जीवन हे सतत उत्क्रांत होत आहे; जर का आपण एक जिवंत मानसिकता इच्छित असू तर आपण अविरतपणे प्रगत होत राहिलेच पाहिजे.

हे फक्त प्राथमिक काम आहे. ज्ञानाच्या अनंत स्रोतांशी ज्यायोगे आपला संबंध प्रस्थापित होऊ शकेल अशा खऱ्या विचारांपासून आपण अनंत योजने दूर आहोत.

आपल्या विचारांवर व्यक्तिपर नियंत्रण ठेवता यावे म्हणून आपल्याला द्यावयाच्या क्रमशः प्रशिक्षणातील हे काही थोडेसे प्रयोग आहेत. कारण ज्या कोणाला ध्यान करावयाचे आहे त्याच्यासाठी मानसिक कृतीवर नियंत्रण हे अगदी अनिवार्य आहे.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 25-26)