Tag Archive for: साधना

“सत्य-प्रकाशाला बळाने खाली खेचायचा प्रयत्न करणे हे खचितच चुकीचे आहे. अतिमानस ही अट्टहासाने खाली खेचण्याची गोष्ट नाही. योग्य वेळ येईल तेव्हा, ते स्वत:हून आपलेआपणच खुले होईल; पण हे घडून येण्यापूर्वी, पुष्कळ काही करावे लागेल आणि ते मात्र धीराने व कोणतीही घाईगडबड न करता करावे लागेल.” – श्रीअरविंद

प्रश्न : माताजी, असे येथे का म्हटले आहे? “खाली ओढणे, खेचणे” ही अनेक जणांची प्रवृत्ती असते का?

श्रीमाताजी : माणसं घाईत असतात आणि त्यांना लगेचच फळ हवे असते. आणि मग, त्यांना असे वाटायला लागते की, त्यांनी अतिमानस खाली उतरविले आहे – वास्तविक, त्यांनी एखादे छोटे प्राणिक अस्तित्व खाली खेचलेले असते, जे त्यांना वाकुल्या दाखवत असते आणि अंतत: त्याचे पर्यवसान त्यांना वेडाबावळा, मूर्ख बनविण्यात होते. बहुतेक वेळा, शंभरपैकी नव्व्याण्णव वेळा हेच घडते. असे प्राणिक व्यक्तित्व, एखादे प्राणिक अस्तित्व हा मोठा खेळ खेळते; प्रकाशाचा चकाचक, दिखाऊ असा खेळ उभा करते. आणि तो बिचारा, ज्याने त्या अस्तित्वाला खेचले होते तो त्या चकचकीत प्रकाशाने दिपून जातो आणि म्हणतो, “हे काय, हेच ते अतिमानस!” आणि तो खड्ड्यात जाऊन पडतो.

जेव्हा तुम्हाला खरंच ईश्वराचा, सत्य-प्रकाशाचा स्पर्श झालेला असतो, त्याचे थोडेसे जरी दर्शन झालेले असते, त्या सत्य प्रकाशाशी तुमचा संबंध निर्माण झालेला असतो, तेव्हाच तुम्ही तो प्रकाश, प्राणिक प्रकाशाहून वेगळेपणाने ओळखू शकता आणि तेव्हाच तुम्हाला तो चकाकणारा प्रकाश कसा कृत्रिम आहे, हे समजू शकते. जणू काही तो रंगमंचावरील कृत्रिम प्रकाशाचा खेळ आहे हे कळू शकते. परंतु तसे नसेल, तर मात्र, इतरेजन त्याने दिपून जातात, कारण तो प्रकाश तसा दिपवणाराच असतो, ‘अद्भुत’ असतो आणि मग त्या प्रकाशामुळे ते फसतात. पण, जेव्हा तुम्ही सत्यप्रकाश पाहिलेला असतो, त्या सत्याशी तुमचा संबंध प्रस्थापित झालेला असतो, तेव्हा तुम्ही त्याकडे फक्त पाहता, आणि हसता. ती भोंदूगिरी असते, फसवेगिरी असते, पण ती फसवेगिरी आहे हे ओळखण्यासाठी सुद्धा, तुम्हाला सत्य काय आहे ते ज्ञात असावे लागते.

मूलत: प्रत्येक गोष्टीबाबत हे असेच असते. अशा प्रकारचे खेळ ज्याच्यावर चालू असतात, असा ‘प्राण’ हा जणू काही महारंगमंचच असतो – तो खूप आकर्षक, डोळे दिपवणारा, फसवा असतो. परंतु, जेव्हा तुम्हाला ‘सद्वस्तु’ काय ते माहीत असते, तेव्हाच तुम्हाला चटकन जाणवते, कोणत्याही तर्काविना, उत्स्फूर्तपणे जाणवते आणि तेव्हा तुम्ही म्हणता, “नाही, मला ते नको आहे.”

जेव्हा तुम्ही खेचता, शंभरातील नव्व्याण्णव वेळा तरी हेच घडते….लाखातूनच एखाद्या बाबतीत असे घडते की, त्याने खरंच सद्वस्तु खाली खेचलेली असते – पण तेव्हा हे सिद्ध होते की, तो तयार झालेला होता. अन्यथा नेहमीच, तुम्ही जे खेचता ते प्राणिक अस्तित्व असते, वरवरचे असे काहीतरी, ते त्या वस्तुचे रंगमंचीय रूप असते, ती सद्वस्तु नव्हे.

खेचणे ही अहंमन्य प्रतिक्रिया आहे. ते अभीप्सेचे विकृत रूप होय. खऱ्या अभीप्सेमध्ये देणे, आत्मदान समाविष्ट असते तर खेचण्यामध्ये, ओढण्यामध्ये स्वत:साठी काहीतरी मागणी असते. अगदी तुमच्या मनामध्ये कितीही विशाल अशी आकांक्षा का असेना – अगदी पृथ्वीएवढी, ब्रह्मांडाएवढी का असेना, तिचा काहीच उपयोग नाही, कारण अशी आकांक्षा म्हणजे केवळ मानसिक क्रियाव्यवहार!

– श्रीमाताजी
(CWM 11 :22-23)

प्रश्न : एखाद्याला जर कोणत्या एका गोष्टीची माहिती हवी असेल, किंवा कोणाला मार्गदर्शन हवे असेल किंवा इतर काही, तर त्याच्या त्याच्या गरजेनुसार, त्या त्या व्यक्तीने ती गोष्ट, ईश्वराकडून कशी प्राप्त करून घ्यावी?

श्रीमाताजी : ईश्वराकडे त्याची मागणी करूनसुद्धा जर तुम्ही त्याची याचनाच केली नाहीत, तर ती तुम्हाला कशी मिळेल? तुम्ही ईश्वराकडे वळलात आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवलात आणि त्याच्याकडे याचना केलीत तर, आवश्यक असलेली गोष्ट तुम्हाला निश्चितपणे मिळेल – अर्थात् तुम्हाला जी गोष्ट गरजेची आहे अशी तुमची कल्पना असेल ती नव्हे तर, खरोखरीच तुम्हाला ज्या गोष्टीची आवश्यकता असेल, ती गोष्ट तुम्हाला मिळेल. परंतु त्या गोष्टीची तुम्ही त्याच्याकडे याचना केली पाहिजे. त्यासाठी तुम्ही मन:पूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. आधी स्वत:हूनच एखादी गोष्ट मिळविण्याचे इतर मार्ग अवलंबायचे, धडपड करायची आणि नंतर मग मात्र ईश्वराकडून अपेक्षा बाळगायची की, त्याने तुम्हाला ती द्यावी, आणि तीसुद्धा तुम्ही ती त्याच्याकडे न मागता; असे करता कामा नये.

खरे म्हणजे, दुसऱ्यांकडून जेव्हा तुम्हाला काही हवे असते, तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे ते मागता, आणि ईश्वराच्या बाबतीत मात्र तुम्ही त्याच्याकडे काही न मागता, त्याने ते तुम्हाला द्यावे अशी त्याच्याकडून अपेक्षा का बाळगता?

सामान्य चेतनेच्या स्तरावर मात्र ही प्रक्रिया याउलट घडते. तुम्ही काहीतरी गृहीत धरता आणि म्हणता, “मला अमुक एका गोष्टीची गरज आहे, मला ह्या नात्याची आवश्यकता आहे, मला हे प्रेम, ही ममता हवी आहे, मला हे ज्ञान हवे आहे इ.इ. आणि ईश्वराने ते मला द्यायलाच हवे, नाहीतर तो ईश्वरच नाही” म्हणजेच असे की, तुम्ही समस्या पूर्णपणे उलट करून टाकता.

सर्वात प्रथम तुम्ही म्हणता, “मला गरज आहे.” पण त्या गोष्टीची तुम्हाला खरोखरीच गरज असते का? की, तशी तुमच्या मनात काहीतरी अस्फुट कल्पना असते? की, ती केवळ एक वासना असते? की, ती खरोखरच एक अज्ञानी हालचाल असते? तुम्हाला ह्याविषयी खरंच जाण असते का? पहिला मुद्दा असा की, तुम्हाला त्याविषयी काहीच माहीत नसते.

दुसरा मुद्दा हा की, खरंतर तुम्ही तुमचीच इच्छा ईश्वरावर लादू पाहत असता आणि त्याला म्हणत असता, “मला ह्याची आवश्यकता आहे. परंतु, “मला ते दे”, अशी याचनासुद्धा तुम्ही त्याच्याजवळ करत नाही. तुम्ही म्हणता, “मला ते हवे आहे. आणि ज्याअर्थी मला अमुक एक गोष्ट हवी आहे, त्याअर्थी मला ती मिळालीच पाहिजे, अगदी स्वाभाविकपणे, सहजपणे मला ती मिळालीच पाहिजे, मला जे हवे ते देणे, हे ईश्वराचे कामच आहे.”

पण जेव्हा असे घडते तेव्हा, तुम्हाला खरंच कशाची गरज आहे, हे तुम्हाला माहीत नसते. तो केवळ तुमच्या मनाचा खेळ असतो, आणि त्यात काही तथ्य नसते आणि त्या देवघेवीमध्येही, तुम्ही ती गोष्ट तुमच्या आजूबाजूच्या जीवनाकडून मिळावी अशी अपेक्षा बाळगता आणि त्या ईश्वराकडे वळतसुद्धा नाही, त्याच्यामध्ये व तुमच्यामध्ये कोणतेही नाते निर्माण करत नाही, त्याचा क्षणभरही विचार करत नाही, किंवा तुमच्या दृष्टिकोनात थोडीफारसुद्धा मन:पूर्वकता बाळगत नाही. आणि तुम्ही त्या ईश्वराकडे काहीच मागितलेले नसते त्यामुळे, त्याने तुम्हाला देण्याचे काही कारणच उरत नाही. पण जर तुम्ही ईश्वराकडे याचना केलीत, तर तो ईश्वरच असल्यामुळे, तुम्हाला नेमकी कशाची गरज आहे हे त्याला अधिक चांगले कळत असते आणि त्यामुळे तो ते तुम्हाला देईलच.

आणि तरीही जर तुम्ही हट्ट धराल आणि तुमची इच्छा त्याच्यावर लादू पहाल, तर तुम्हाला जागृत करण्यासाठी, तुमच्या चुकीची तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी आणि खरोखरीच तुम्हाला त्या गोष्टीची काही गरज नव्हती, हे दाखवून देण्यासाठी तो तुम्हाला पाहिजे असलेली गोष्ट कदाचित देईलही. पण नंतर तुम्ही तक्रार करू लागता आणि तुम्ही म्हणू लागता की, “ईश्वराने मला त्रास होईल अशी गोष्ट का दिली?” पण तेव्हा तुम्ही हे पूर्णपणे विसरलेले असता, की ती गोष्ट तुम्हीच मागितलेली होती.

दोन्ही बाबतीत, कसेही असले, तरी तुम्ही तक्रारच करता. तुम्ही जे काही मागितले असेल, ते त्याने तुम्हाला दिले आणि त्यामुळे तुम्हाला उपयोग होण्याऐवजी अपायच झाला, तरी तुम्ही तक्रार करता आणि त्याने ते तुम्हाला दिले नाही तरी, तुम्ही तक्रारच करता. “हे काय ! मी त्याला सांगितले, की मला याची गरज आहे आणि तरी तो मला ते देत का नाही?” दोन्ही बाबतीत तुम्ही तक्रारच करता आणि बिचाऱ्या ईश्वरालाच दोषी ठरवता.

या सर्व गोष्टींपेक्षा, तुमच्या ठिकाणी जीवनाचे परम सत्य शोधून काढण्याची अभीप्सा असेल, उत्कंठा असेल, तीव्र, आर्त इच्छा असेल, ज्याला साधारणत: तुम्ही स्पष्टपणे तुमच्या जीवनाचे सारभूत सत्य समजता, वस्तुजाताचे मूळ उगमस्थान, सर्वोत्तम हितकारक अशी बाब समजता, आपल्या सर्व इच्छांवरील समाधान मानता, आपल्या सर्व समस्यांवरील उपाय मानता, त्याविषयी तीव्र निकड तुम्हाला भासत असेल, ते प्राप्त करून घेण्याची अभीप्सा तुम्ही बाळगत असाल, तर त्यानंतर तुम्ही ईश्वराला असे कधीच म्हणणार नाही, की “मला हे दे, मला ते दे.” किंवा “याची मला गरज आहे, ते मला मिळालेच पाहिजे.” तुम्ही त्याला अशी विनवणी कराल की, “माझ्यासाठी जे गरजेचे आहे ते तू कर आणि माझ्या अस्तित्वाच्या सत्याप्रत तू मला घेऊन चल; हे ईश्वरा, तुझ्या परमप्रज्ञेला जे दिसते की, अमुक एक गोष्ट माझ्यासाठी आवश्यक आहे, ती तू मला प्रदान कर.”

त्यानंतर मात्र, मग तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही, ह्याची तुम्हाला खात्री असेल. आणि ईश्वरही मग तुम्हाला अपायकारक असे काही तुम्हाला देणार नाही.

पुष्कळ धडपड केल्यानंतर, पुष्कळ चुका केल्यानंतर, बऱ्यापैकी दुःखकष्ट सहन केल्यानंतर, आणि खूप नाऊमेद झाल्यानंतर, मग सरतेशेवटी कधीतरी, एखादी व्यक्ती शहाणी, समजदार बनायला सुरुवात होते आणि स्तंभित होऊन, अकुंठित होऊन, जाणू पाहते की, ह्या सगळ्यामधून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग नाही का? म्हणजेच असे की, स्वत:च्या अज्ञानातून बाहेर पडण्याचा एखाद्याला काही तरणोपायच नसतो का? आणि तेव्हा मग, त्या क्षणी ती व्यक्ती बाहू फैलावून असे म्हणू शकते की, “ही मी इथे आहे, माझा स्वीकार कर; मला सत्याच्या मार्गाने घेऊन चल.”

मग सारे काही सुरळीत व्हायला सुरुवात होते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 121-124)

बहुधा कोणतेही दोन मार्ग अगदी एकसारखेच असत नाहीत, प्रत्येकाने स्वत:चा मार्ग स्वत:च शोधावयास हवा. पण याचा अर्थ असा नव्हे की, तो मार्ग बुद्धीने शोधायचा, तो मार्ग अभीप्सेच्या (Aspiration) आधारे शोधावयास हवा; विश्लेषण आणि अभ्यास याद्वारे नव्हे तर, अभीप्सेची तीव्रता आणि आंतरिक उन्मुखतेबद्दलची निष्ठा यांच्या माध्यमातून शोधावयास हवा.

जेव्हा व्यक्ती खरोखर आणि पूर्णपणे त्या आध्यात्मिक सत्यालाच अभिमुख झालेली असते, मग त्याला नाव कोणतेही दिलेले असूदे, जेव्हा बाकी सर्व गोष्टी तिच्या दृष्टीने गौण ठरतात, जेव्हा ते आध्यात्मिक सत्यच तिच्या लेखी अपरिहार्य आणि अटळ गोष्ट बनते, तेव्हा त्याकडून उत्तर मिळण्यासाठी, त्याकडून प्रतिसाद मिळण्यासाठी तीव्र, संपूर्ण एकाग्रतेचा केवळ एक क्षणदेखील पुरेसा असतो.

अशा उदाहरणामध्ये अनुभव आधी येतो, नंतर त्याचा परिणाम आणि स्मृती म्हणून त्या अनुभवाची मांडणी स्पष्ट बनते. ती मांडणी कमी अधिक तंतोतंत असू शकते.

…ती मांडणी तुमच्यासाठी चांगली आहे, हेच केवळ महत्त्वाचे आहे. ती कशीही असू दे, अगदी ती स्वयंपूर्ण असली तरीदेखील जेव्हा तुम्ही ती इतरांवर लादू पाहता तेव्हाच ती मिथ्या बनते…

मार्ग दाखविला पाहिजे, प्रवेशद्वारे खुली केली पाहिजेत पण प्रत्येकाने स्वत:चा मार्ग स्वत:चा आक्रमिला पाहिजे, त्या प्रवेशद्वारांमधून जात, स्वत:च्या वैयक्तिक साक्षात्काराच्या दिशेने स्वत:च वाटचाल करावयास हवी.

अशा वेळी, केवळ एकच मदत मिळू शकते आणि तीच स्वीकारली पाहिजे ती मदत असते ‘ईश्वरी कृपेची’! ही कृपा, प्रत्येकामध्ये ज्याच्या त्याच्या गरजेनुरूप, स्वत:ची अशी योजना करीत असते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 407)

पूर्णयोगाच्या साधकाची ईश्वरप्राप्तीसाठीची जी धडपड चालू असते त्या कक्षेतून, स्वत:च्या जीवनामध्ये तसेच स्वत:च्या अस्तित्वाच्या व विश्वात्मक पुरुषाच्या सर्व गतीविधींद्वारे ईश्वराला भेटणे हेही समाविष्ट असेल. निसर्ग व जीवन हे त्याच्यासाठी ईश्वराला भेटण्याचे संकेतस्थळही असेल आणि त्याचबरोबर ते त्याच्यासाठी त्या ईश्वराचे प्रकटीकरणदेखील असेल.

बौद्धिक, कलात्मक व गतियुक्त व्यवहार, विज्ञान, तत्त्वज्ञान, जीवन, विचार, कला आणि कर्म या गोष्टी ईश्वराच्या अनुमतीने चालतात आणि त्यामध्ये अधिक खोल गर्भितार्थ दडला असल्याचे त्याच्या लक्षात येते. ह्या साऱ्या माध्यमांमधून अभिव्यक्त होणाऱ्या ईश्वराचे तो स्पष्ट दर्शन घेऊ शकतो आणि त्या साऱ्यामध्ये असणाऱ्या ईश्वराचा आनंद त्याला लाभतो म्हणूनच तो त्यांच्या प्राप्तीसाठी धडपड करतो. हा साधक या गोष्टींच्या बाह्य रूपांविषयी आसक्ती धरणार नाही; कारण आसक्ती ही आनंदाच्या मार्गातील धोंड असते. त्याला असा एक शुद्ध, समर्थ आणि परिपूर्ण आनंद मिळत असतो, की ज्या आनंदामध्ये सर्वकाही समाविष्ट असते परंतु तो आनंद दुसऱ्या कशावरच अवलंबून नसतो. आणि त्याला त्या सर्वांमध्ये त्याच्या प्रियकराच्या म्हणजे ईश्वराच्या प्रतिमा, त्याची प्रतीके, त्याचे अस्तित्व, त्याच्या खुणा, त्याच्या कृती सापडतात. केवळ कलेसाठीच कलेची साधना करू पाहणाऱ्या सामान्य मनाला कदापिही मिळणार नाही वा त्याची कल्पनादेखील ते करू शकणार नाही असा व एवढा आनंद या भक्ताला त्या गोष्टींमधून होतो. ते सर्व काही आणि त्याहूनही अधिकचे असे सर्व काही हे त्याच्यासाठी पूर्णयोगाचा आणि समावेशनाचा मार्ग ठरतो.

प्रेम ही ह्या आनंदाची सर्वत्रगत शक्ती असते. आणि त्या प्रेमाचा आनंद जे विशिष्ट रूप धारण करतो ती असते, सौंदर्याची दृष्टी !

ईश्वराचा प्रेमिक हा विश्वाचा प्रेमी असतो आणि तो ‘सर्व-आनंदमया’ला आणि ‘सर्व-सौन्दर्यमया’ला प्रेमाने कवळतो. जेव्हा वैश्विक प्रेम हे साधकाच्या हृदयाचा ताबा घेते तेव्हा, ईश्वराने त्याला कवेत घेतले आहे ह्याची ती निर्णायक खूण असते. आणि जेव्हा साधकाला सर्वत्र सर्व-सौंदर्य पाहण्याची दृष्टी येते आणि सदा सर्वकाळ आनंदाने त्याला कवळून घेतले आहे असा त्याला अनुभव येत राहतो, तेव्हा साधकाने ईश्वराला कवेत घेतले आहे ह्याची ती निर्णायक खूण असते. प्रेमाची परिपूर्ती ऐक्यामध्ये होणे आणि परस्परांनी परस्परांना कवळून घेणे ही एकाच वेळी सर्वोच्च अशी अवस्था पण असते आणि तेव्हाच त्या प्रेमाची तीव्रताही अत्युच्च पातळीवर जाऊन पोहोचलेली असते. आणि हेच ऐक्यातील परमानंदाचे अधिष्ठान असते.

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 591-592)

एकाग्र ध्यान :

इकडेतिकडे धावणाऱ्या मनाला एक विशिष्ट सवय लावणे ही एकाग्रता साधण्यासाठीची पहिली पायरी असली पाहिजे. ही विशिष्ट सवय म्हणजे, इकडेतिकडे न ढळता स्थिरपणे, एकच विषय घेऊन, त्यावर एकाच दिशेने क्रमबद्ध विचार करण्याची सवय होय. मनाने हा विचार करताना सर्व मोह, तसेच त्याला ढळवू पाहणारे सर्व हाकारे कटाक्षाने टाळले पाहिजेत. आपल्या सामान्य जीवनात अशी एकाग्रता वरचेवर पाहावयास मिळते, अनुभवावयास मिळते; मनाला सामान्य जीवनात बाह्य विषय, बाह्य क्रिया यांवर एकाग्र व्हावयाचे असते व ते तसे एकाग्र होतेही; परंतु असा बाह्य विषय नसताना आंतरिक विषयावर एकाग्र होणे हे मनाला फार अवघड जाते; तथापि, ज्ञानाच्या साधकाला अशी ही आंतरिक एकाग्रता प्रत्यक्षात आणणे आवश्यकच आहे.

एकाग्रता ही कल्पनेच्या फलदायी सारतत्त्वावर करावयाची असते. जीवाच्या इच्छेने एकाग्र होऊन तसा आग्रह धरला की, ही कल्पना तिच्यात अंतर्भूत असलेल्या सत्याची सर्व अंगे प्रकट करते. उदाहरणार्थ, जर ‘दिव्य प्रेम’ हे आपल्या एकाग्रतेचा विषय असेल तर, प्रेम म्हणजे ईश्वर ह्या संकल्पनेच्या सारभूत तत्त्वावर एकाग्रतेने चिंतन केले पाहिजे. त्या दिव्य प्रेमाचे बहुविध आविष्करण तेजोमय रीतीने उदित व्हावे अशा पद्धतीने मनाने त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

ही एकाग्रता फक्त विचारांमध्ये नाही तर हृदयात, अस्तित्वात आणि साधकाच्या दृष्टीमध्येही असली पाहिजे. येथे विचार आधी आणि अनुभव नंतर असे होऊ शकते, पण कधीकधी, अनुभव आधी आणि नंतर त्या अनुभवातून ज्ञानाचा उदय असेही होऊ शकते. त्यानंतर मग प्राप्त झालेल्या गोष्टीचे अधिकाधिक चिंतन, मनन केले पाहिजे आणि ती जोवर नित्याचा अनुभव बनत नाही आणि पुढे जाऊन, जीवाचा तो नियमच किंवा धर्मच बनत नाही तोवर ती गोष्ट धरून ठेवली पाहिजे.

निदिध्यास :

एकाग्र ध्यानाची प्रक्रिया वर सांगितली; परंतु ह्या प्रक्रियेहून जोरदार, अधिक कष्टाची प्रक्रिया म्हणजे, समग्र मन हे कल्पनेच्या केवळ सारभूत अंशावरच एकाग्र करणे, त्याचे एकाग्रतेने निदिध्यासन करणे ही आहे. ध्यानविषयाचा फक्त मानसिक अनुभव घेण्यासाठी किंवा फक्त विचारगत ज्ञान मिळविण्यासाठी हा निदिध्यास केला जाऊ नये, तर कल्पनेच्या मागे असणाऱ्या वस्तूचे सार गाठण्यासाठी हा निदिध्यास केला जावा. या प्रक्रियेमध्ये साधकाचा विचार थांबतो आणि साधक तन्मयतेने वस्तूचे आनंदभरे दर्शन घेत राहातो अथवा आंतरिक समाधीच्या द्वारा त्या वस्तूत विलीन होऊन जातो. ही दुसरी प्रक्रिया जर उपयोगात आणली असेल तर नंतर, या प्रक्रियेने ज्या अवस्थेप्रत आपण चढून जातो त्या अवस्थेला खाली बोलावून, आपल्या निम्नतर अस्तित्वाचा ती ताबा घेईल, आपल्या सामान्य जाणिवेला ती प्रकाश, सामर्थ्य, आनंद प्रदान करेल असे करावे लागते. असे न केल्यास, आंतरिक समाधीत किंवा उच्च पातळीवर ती अवस्था आपली असेल पण आपण जागृतीत येऊन जगाच्या संपर्कात उतरलो की, आपल्या पकडीतून ती निसटलेली असेल, असे बरेच जणांचे होते. तेव्हा, हे असे अर्धवट प्रभुत्व हे पूर्णयोगाचे साध्य नाही.

मन निर्विषय करणे :

एकाच विषयावर मन एकाग्र करणे ही एक प्रक्रिया; विचार दृष्टिविषय झालेल्या एकाच वस्तूचा जोरदार निदिध्यास घेणे ही दुसरी प्रक्रिया; ह्या प्रक्रिया वर वर्णिल्या. तिसरी प्रक्रिया मन एकदम शांत, निर्विषय करणे ही आहे. अनेक मार्गांचा वापर करून, मन शांत करता येते. एक मार्ग असा आहे – मन क्रिया करीत असताना त्या क्रियेत साधकाने भाग घेऊ नये तर अगदी तटस्थ राहावे. मनाकडे केवळ पाहत राहावे; असे सारखे तटस्थतेने मनाकडे पाहात राहिले, तर शेवटी मन कंटाळते. त्याच्या उड्या, त्याची धावपळ ही त्याच्या मालकाच्या संमतीशिवाय चालली आहे हे त्याच्या लक्षात येते आणि मग ते अधिकाधिक शांत होत जाते व शेवटी पूर्ण शांत होते. मन शांत करण्याचा दुसरा मार्ग असा – मन जे विचार सुचवील ते साधकाने असंमत करावे. ते मनातून बाहेर फेकून द्यावे. ते जसजसे त्याच्या समोर येत जातील तसतसे त्यांना फेकून देत राहण्याचे कार्य त्याने करीत राहावे; आणि आपल्या अस्तित्वात मनाच्या धांगडधिंग्यामागे जी शांती नेहमीच वसत असते, त्या शांतीला चिकटून राहावे. असे करीत राहिल्याने, अस्तित्वातील गुप्त शांती प्रकट होते; साधकाच्या मनात, सर्व अस्तित्वांत महान शांती प्रकटपणे स्थिर होते आणि या शांतीबरोबर सर्वव्यापी शांत ब्रह्माची अनुभूती साधकाला प्राप्त होते. या महान शांतीच्या पायावर दुसरी सर्व उभारणी करता येते. ही उभारणी, ज्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या आधारावर केली जाते ते ज्ञान वस्तूंविषयीच्या वरवरच्या लक्षणांचे ज्ञान नसते तर, ते ईश्वरी अभिव्यक्तीच्या अति-खोल असणाऱ्या सत्याचे ज्ञान असते.

– श्रीअरविंद

(CWSA 23 : 323-324)

एकाग्रतेच्या तीन शक्ती आहेत. या तीन शक्तींचा उपयोग करून आपल्याला आपले साध्य साधता येते.

ज्ञानविषयक एकाग्रता :
कोणत्याही वस्तूवर आपण एकाग्रतेचा प्रयोग केला की त्या वस्तूचे ज्ञान आपण करून घेऊ शकतो; त्या वस्तूची दडलेली रहस्ये तिला प्रकट करावयास लावू शकतो. ही एकाग्रतेची शक्ती अनेक वस्तूंचे ज्ञान होण्यासाठी नव्हे, तर एकमेव सद्वस्तु जाणून घेण्यासाठी आपण वापरावयाची असते. ही झाली ज्ञानविषयक एकाग्रता ! Read more

प्रत्येक मनुष्य जाणताअजाणता विश्वशक्तीचे साधन असतो; एखाद्याला त्याच्या अंतरंगात विश्वशक्तीची उपस्थिती असल्याचे ज्ञान असते; इतरांच्या ठिकाणी हे ज्ञान नसते; हाच काय तो माणसामाणसांत भेद असतो. कृतीकृतीत वा साधना साधनामध्येही काही सारभूत भेद नसतो, म्हणून साधनत्वाचा अहंकारी अभिमान बाळगणे हा मूर्खपणा आहे. Read more

आमचे सर्व जाणीवयुक्त अस्तित्व ईश्वराशी संपर्क साधेल, ईश्वराशी नाते जुळवेल असे केले पाहिजे; ईश्वराला आम्ही हाक दिली पाहिजे आणि त्याने आमच्यात येऊन आमचे सर्व अस्तित्व रूपांतरित करावे, त्याला स्वत:च्या ईश्वराच्या अस्तित्वाचे रूप द्यावे असे आम्ही त्यास आळवले पाहिजे; याचा अर्थ असा की, आमच्यातील खरा पुरुष जो ईश्वर तोच साधनेचा साधक बनला पाहिजे, आणि योगाचा प्रभु या नात्याने त्याने आमच्या खालच्या व्यक्तितेला दिव्य रूपांतराचे केंद्र, स्वत:च्या व्यक्तितेच्या पूर्णतेचे साधन बनवले पाहिजे. या साधना-पद्धतीचा अभ्यास केला असता, त्याचा योग्य तो परिणाम घडून येतो.

दिव्य प्रकृतीच्या कल्पनेत मग्न असलेल्या आमच्या जाणिवेचे, जाणीवशक्तीचे दडपण, अर्थात आमच्या तपाचे दडपण आमच्या एकंदर अस्तित्वावर पडून, या दडपणाला अनुरूप अशी अभिव्यक्ति, अनुभूति आमच्यात घडून येते. अर्थात आमच्या मर्यादित अंधकारमय अस्तित्वावर दिव्य, सर्वज्ञ, सर्वकारक ईशतत्त्व उतरून, आमच्या सर्व निम्नतर प्रकृतीला क्रमशः अधिकाधिक प्रकाश देऊन, अधिकाधिक समर्थ करते आणि कमी दर्जाचे मानवी ज्ञान व मर्त्य क्रिया सर्वथा बाजूला सारून, त्याच्या जागी आपली स्वत:ची क्रिया चालू करते.

या साधनेच्या कार्याचे मानसशास्त्रीय स्वरूप सांगायचे तर असे म्हणता येईल की, या पद्धतीमुळे अहंभाव त्याच्या सर्व क्षेत्रासह, सर्व साधनसंभारासह क्रमशः अहंभावातीत परमतत्त्वाच्या स्वाधीन होतो. या परमतत्त्वाच्या क्रिया अफाट असतात, त्यांचे मोजमाप करणे अशक्य असते आणि त्या नेहमी अटळ, अपरिहार्य अशा असतात. खचितच, ही साधना सोपी साधना नाही, हा मार्ग जवळचा मार्ग नाही, तेथे प्रचंड श्रद्धेची आवश्यकता असते, पराकोटीचे धैर्य येथे लागते आणि सर्वांहून अधिक, कशानेही विचलित न होणारी सबुरी आवश्यक असते. या मार्गात तीन टप्पे असतात; केवळ शेवटच्या टप्प्यांत वेगाने वाटचाल होते व ही वाटचाल आनंदमय असते.

पहिला टप्पा : या टप्प्यांत आमचा अहंभाव हा ईश्वराशी संपर्क साधावयाचा प्रयत्न करीत असतो;

दुसरा टप्पा : खालच्या प्रकृतीची सर्व तयारी या टप्प्यांत केली जात असते. ही तयारी ईश्वरी कार्याने होत असते, खालच्या प्रकृतीने वरच्या प्रकृतीचे स्वागत करावे व कालांतराने स्वत:च वरची प्रकृती व्हावे ह्यासाठी खालच्या प्रकृतीची व्यापक व परिपूर्ण तयारी करावयाची असते. त्यामुळे हे काम मोठ्या कष्टाचे असते; हा झाला दुसरा टप्पा.

तिसरा टप्पा : खालच्या प्रकृतीचे या टप्प्यांत वरच्या प्रकृतीत अंतिम रूपांतर होत असते. हा शेवटला टप्पा आनंदमय व लवकर चालून संपतो. बाकी दोन टप्प्यांसाठी महान श्रद्धा, धैर्य, सबुरी लागते, हे वर आलेच आहे. तथापि, एक गोष्ट येथे सांगणे योग्य होईल की, वास्तवांत ईश्वरी शक्ती न कळत पडद्याआडून आम्हांकडे बघत असते व ती आमचा दुबळेपणा पाहून स्वत:च पुढे होते आणि आम्हाला आधार देते. आमची श्रद्धा, धैर्य, सबुरी कमी पडेल त्या त्या वेळी आम्हाला आधार देऊन सावरते. ही ईश्वरी शक्ती ‘आंधळ्याला पाहण्याची शक्ती देते, लंगड्याला डोंगर चढण्याची शक्ती देते ‘, असे एका ठिकाणी तिचे वर्णन आहे. आमच्या बुद्धीला ही जाणीव होते की, आम्हाला वर चढण्याचा प्रेमाने आग्रह करणारा असा दिव्य कायदा आमच्या मदतीला आहे, तिला अशीही जाणीव होते की, आम्हाला मदत मिळत आहे व या मदतीमुळेच आम्ही चढण्याचे कष्ट करू शकत आहोत; आमचे हृदय आम्हाला सांगते की, सर्व वस्तुजाताचा स्वामी आम्हा मानवांचा मित्र आहे; ते सांगते की, विश्वमाता आम्हाला हात देत आहे. आम्ही अडखळतो तेथे तेथे हा स्वामी व माता आम्हाला हात देऊन सावरतात. तेव्हा आमच्या बुद्धीची व आमच्या हृदयाची ही जाणीव व हे सांगणे लक्षात घेता, असे म्हणणे भाग आहे की, हा मार्ग अतिशय अवघड, कल्पनातीत अवघड असला तरी, या मार्गाचे परिश्रम आणि या मार्गाने मिळणारे प्राप्तव्य, यांची तुलना केली असता, हा मार्ग अतिशय सोपा व अतिशय खात्रीचा आहे.

– श्रीअरविंद

(CWSA 23-24 : 45-46)

(आश्रमीय जीवनाच्या सुरुवातीच्या काळात, श्रीमाताजींनी धम्मपदातील वचनांचे विवेचन केले होते, त्यातील हे एक वचन.)

धम्मपद : आपण अशा साधुपुरुषाच्या सहवासाची इच्छा बाळगली पाहिजे की, जो आपल्याला आपले दोष दाखवून देतो. तो जणू काही आपला गुप्त खजिनाच आपल्याला दाखवून देतो. अशा व्यक्तीबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करावयास हवेत कारण, तो आपल्याला कोणतीही इजा पोहोचवित नाही. तो आपल्यासाठी हितकारकच ठरतो.

श्रीमाताजी : मानवी प्रगतीसाठी उपयुक्त असणाऱ्या सर्वच धर्मग्रंथांमध्ये नेहमीच असे सांगितलेले आढळते की, जो तुम्हाला तुमचे दोष दाखवून देतो, त्याविषयी तुम्ही कृतज्ञ असले पाहिजे आणि त्याच्या सहवासाची इच्छा बाळगली पाहिजे. पण येथे तीच गोष्ट मोठ्या समर्पकपणे सांगितलेली आहे : एखादा दोष तुम्हाला दाखविण्यात आला तर, जणू काही तुम्हाला खजिनाच दाखविण्यात आला आहे असे समजा. म्हणजेच ह्याचा अर्थ असा की, जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा दोष, अक्षमता, आकलनक्षमतेचा अभाव, दुर्बलता, अप्रामाणिकता, तुम्हाला प्रगतीपासून रोखणारे असे जे काही सापडेल तेव्हा, ते म्हणजे जणू काही तुम्हाला अद्भुत खजिना लाभल्यासारखेच वाटेल.

“अरे देवा, अजून एक दोष !” असे म्हणत न बसता किंवा त्याविषयी खंत बाळगत न बसता, उलट तुम्हाला जणूकाही एखादी अद्भुत उपलब्धी झाली असल्याप्रमाणे आनंद झाला पाहिजे. कारण जी गोष्ट तुम्हाला प्रगत होण्यापासून रोखत होती ती गोष्ट आता तुमच्या पकडीत आली आहे. आणि एकदा का तुमच्या ती गोष्ट पकडीत आली की, तिला खेचून बाहेर काढा. कारण असे मानले जाते की, अमुक एक गोष्ट करण्याजोगी नाही असे योगसाधकाला ज्या क्षणी समजते, त्याच क्षणी, ती दूर सारण्यासाठी, बाद करण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी लागणारी शक्तिही त्याच्या ठायी असते.

दोषाचा शोध लागणे ही एक प्राप्ती आहे, उपलब्धी आहे. जणू काही आत्ताच बाहेर घालवून दिलेल्या धूसतेच्या छोट्या कणाची जागा घेण्यासाठी प्रकाशाचा पूर आत शिरला आहे.

जर तुम्ही योगसाधना करीत असाल, तर तुम्ही दुर्बलता, नीचता, इच्छाशक्तिचा अभाव ह्या गोष्टींचा स्वीकार करता कामा नये. कारण तसे करणे ह्याचा अर्थ ‘ज्ञान झाले पण त्यापाठोपाठ सामर्थ्य आले नाही’ असा होतो. एखादी गोष्ट असता कामा नये ह्याची जाणीव होणे आणि तरीदेखील ती तशीच चालू ठेवणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे; ही दुर्बलता कोणत्याही गंभीर अशा योगसाधनेत स्वीकारली जात नाही, अशा संकल्पशक्तिचा अभाव हा व्यक्तीला अप्रामाणिकतेच्या उंबरठ्यावर आणून सोडतो. तुम्हाला कळते की अमुक एक गोष्ट असता कामा नये, तुम्हाला हे ज्या क्षणी कळते, तेव्हा ती गोष्ट राहता कामा नये, हे ठरविणारे तुम्हीच असता.

कारण ज्ञान आणि सामर्थ्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे असे म्हणता येईल, तुमच्या अस्तित्वाच्या कोणत्याही भागात तुम्ही तुमच्या प्रगतीच्या मध्यवर्ती संकल्पशक्तिला विरोधी असणाऱ्या, वाईट इच्छेच्या छायेला थारा देता कामा नये; कारण तसे केल्याने ज्या अनिष्टाचा तुम्ही नायनाट केला पाहिजे त्याच अनिष्टासमोर तुमची प्रगतीची संकल्पशक्ती पौरुषहीन, दुबळी, धैर्यहीन, सामर्थ्यहीन ठरते.

अज्ञानातून घडलेले पाप हे पाप नसते; तो या जगतातील सर्वसाधारण अशा अनिष्टाचा एक भाग असतो; पण तुम्हाला माहीत असूनदेखील, तुम्ही जेव्हा पाप करता तेव्हा ते अधिक गंभीर असते. ह्याचा अर्थ असा की, फळामध्ये ज्याप्रमाणे एखादा कृमी दडून बसलेला असतो तसा दुरिच्छेचा एखादा घटक तुमच्यामध्ये दडून बसलेला आहे, कसेही करून, त्याला शोधून नष्ट केले पाहिजे, कारण बरेचदा अशा वेळी दाखविलेली दुर्बलता ही पुढे जाऊन, कधीच दुरुस्त न होऊ शकणाऱ्या अडचणींचे कारण बनते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 221)

यामुळे स्वाभाविकपणेच कर्मामध्येही मुक्तता कशी मिळवावयाची या विषयाकडे आपण येतो. कारण कर्मामध्ये मुक्ती मिळवावयाची तर सर्व सामाजिक रूढी आणि सर्व नैतिक पूर्वग्रह यांच्या बंधनांपासून व्यक्तीने मुक्त असले पाहिजे. अर्थात स्वैराचारी, अनिर्बध जीवन जगण्याचा परवाना मिळाल्याप्रमाणेच जीवन जगायचे असा याचा अर्थ नाही. उलट येथे सामाजिक नियमांपेक्षा कितीतरी अधिक कडक असे अनुशासन व्यक्तीने स्वत:वर लादलेले असते. कारण, येथे कोणत्याही प्रकारच्या ढोंगाची मुळीच गय केली जात नाही आणि संपूर्ण, सर्वांगीण खरेपणा त्यात अपेक्षित असतो. Read more