Tag Archive for: साधना

चैत्य पुरुषाचे साधनेमधील योगदान पुढीलप्रमाणे :

१) चैत्य पुरुषाचे साधनेमधील योगदान म्हणजे प्रेम आणि भक्ती होय, पण प्राणिक प्रेम नव्हे, अपेक्षा बाळगणारे, अहंकारी प्रेम नव्हे तर, कोणत्याही अटी, दावे नसलेले, स्वयंभू असे प्रेम.

२) अंतरंगातील दिव्य मातेशी संपर्क किंवा दिव्य मातेची उपस्थिती.

३) अंतरंगातून मिळणारे अचूक मार्गदर्शन.

४) चैत्य पुरुषाच्या प्रभावाचे व मार्गदर्शनाचे अनुसरण केल्याने मन, प्राण व शारीर जाणिवेचे शांत होणे व शुद्धीकरण घडून येणे.

५) उच्चतर आध्यात्मिक चेतनेचे, स्वीकारक्षम झालेल्या प्रकृतीमध्ये अवतरण व्हावे यासाठी, कनिष्ठ जाणिवांचे उच्च आध्यात्मिक चेतनेप्रत खुले होणे – चैत्य जाणिवेमुळे प्रत्येक गोष्टीत योग्य विचार, योग्य आकलन, योग्य भावना, योग्य दृष्टिकोन तयार होतो आणि अशा योग्य दृष्टिकोनानिशी, परिपूर्ण ग्रहणक्षमतेने कनिष्ठ चेतना उच्च चेतनेप्रत खुली होते.

एखादी व्यक्ती मन, प्राण यांच्यामधून स्वत:ची चेतना वर उंचावू शकते आणि उच्च स्तरावरील शक्ती, आनंद, प्रकाश, ज्ञान खाली आणू शकते परंतु, हे खूप अवघड असते आणि त्यातही त्याच्या परिणामांची खात्री देता येत नाही. आणि जर जीव त्यासाठी तयार झालेला नसेल, किंवा त्याचे पुरेसे शुद्धीकरण झालेले नसेल तर ते धोकादायक देखील असते. जाणिवपूर्वकतेने चैत्यपुरुषाच्या माध्यमातून आरोहण करणे, हा सर्वात चांगला मार्ग आहे. अशा प्रकारे जर तुम्ही चैत्य केंद्रातून आरोहण करत असाल तर ते अधिक बरे.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 339)

श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रांमधून –

दिव्य माता भेटावी म्हणून डोळ्यांत अश्रू येणे हे एक प्रकारचे चैत्य दुःख आहे; परंतु चैत्य अश्रू हे दुःखपूर्ण असण्याची आवश्यकता नाही, भावुकता आणि आनंदाचेदेखील अश्रू असू शकतात.

शांतीच्या आणि स्थिरचित्ततेच्या या स्थितीमध्ये हृदयाच्या मागे असणाऱ्या आंतरिक चैत्य पुरुषाचा स्पर्श झाल्याने कदाचित अश्रू आले असतील. जो आत्मा पृष्ठस्तरावर येऊ पाहत आहे त्या आत्म्याच्या अभीप्सेची आणि भक्तीची ही खूण असते. जर चैत्य पुरुष पृष्ठभागावर येऊ शकला, आणि सर्व प्रकृतीमध्ये सुसंवाद प्रस्थापित होऊ शकला, सर्व अस्तित्व ईश्वराभिमुख होऊ शकले तर असे अश्रू येणे कालांतराने नाहीसे होईल.

*

तुम्ही ज्याविषयी बोलत आहात त्या भावनेसहित रडू येणे ही चैत्य दुःखाची खूण आहे; त्यामधून चैत्य पुरुषाची अभीप्साच अभिव्यक्त होते. परंतु त्याबरोबर निराशा किंवा हताशपणा येता कामा नये. उलट, तुम्ही श्रद्धेला अधिकच चिकटून राहिले पाहिजे कारण तुमच्यामध्ये खरीखुरी अभीप्सा आहे – आणि त्याविषयी तीळमात्र शंका असू शकत नाही, बाह्य प्रकृतीमध्ये कितीही अडचणी असल्या तरीही एक ना एक दिवस त्याची परिपूर्ती होणारच. आंतरिक शांती व स्थिरचित्तता या गोष्टी ज्या श्रद्धेमध्ये आहेत ती श्रद्धा तुम्ही पुन्हा प्राप्त करून घेतली पाहिजे. आणि त्याबरोबरच, काय करावयास हवे यासंबंधी स्पष्ट जाणीव कायम राखत, आंतरिक व बाह्य परिवर्तनासाठी एक स्थिर अशी अभीप्सा बाळगली पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 375-376)

ईश्वराशी एकात्म पावण्याची इच्छा, ईश्वरच हवा ह्या भावनेतील खरीखुरी उत्कटता म्हणजे काय असे एकाने विचारले आहे. आणि त्यालाच स्वत:मधील दोन वेगवेगळ्या प्रकारच्या अभीप्सांचा स्वत:मध्ये शोध लागलेला आहे, विशेषत: ईश्वरविषयक उत्कटतेबाबत असणाऱ्या दोन प्रकारांचा शोध लागला आहे. तो म्हणतो, त्यातील एका वेळी एक प्रकारची यातना असते, एक हृदयस्पर्शी वेदना असते, आणि दुसऱ्या वेळी, एक प्रकारची आतुरता आणि त्याच वेळी खूप आनंददेखील असतो. हे त्याचे निरीक्षण अगदी अचूक आहे. आणि आता त्याचा प्रश्न असा आहे की, आपल्याला वेदनामिश्रित अशी उत्कटता कधी जाणवते आणि प्रसन्नतायुक्त उत्कटता कधी जाणवते?

मला माहीत नाही, तुमच्यापैकी किती जणांना ह्याचा किंवा अशासारखा अनुभव आलेला आहे पण हा अगदी दुर्मिळ पण सहजस्फूर्त येणारा असा अनुभव आहे आणि त्याचे उत्तरही अगदी साधे आहे. चैत्य जाणिवेची उपस्थिती त्या अभीप्सेबरोबर संयुक्त झाली की लगेचच, त्या उत्कटतेला एक निराळेच रूप प्राप्त होते, जणु काही अवर्णनीय अशा आनंदाच्या अर्काने ती भरून जाते. हा अशा प्रकारचा आनंद असतो की, तो इतर सर्व गोष्टींमध्ये भरलेला असल्याचे जाणवते. ह्या अभीप्सेचे बाह्य रूप कोणते का असेना, मार्गामध्ये त्याला कितीही अडचणी, अडथळे आले तरी, ही प्रसन्नता तिथे असतेच; जणुकाही ती सर्वत्र भरून राहिलेली असते आणि इतर काहीही असले तरी ती तुम्हाला तिच्याबरोबर घेऊन जाते. चैत्य उपस्थितीचे हे एक खात्रीशीर लक्षण आहे.

ह्याचा अर्थ असा की, तुमच्या चैत्य जाणिवेबरोबर तुमचा संपर्क प्रस्थापित झालेला आहे, तो कमीअधिक परिपूर्ण असेल, सातत्याच्या दृष्टीने तो अधिक-उणा असेल पण तो संपर्क प्रस्थापित झालेला आहे. त्या क्षणी मात्र त्या चैत्य पुरुषामुळे, चैत्य जाणिवेमुळेच तुमची अभीप्सा भरून जाते की, ज्यामुळे तिला तिचे खरे सत्त्व लाभते. आणि तीच गोष्ट प्रसन्नतेच्या रूपाने अभिव्यक्त झालेली असते. आणि जेव्हा ती चैत्य जाणीव तेथे नसते, तेव्हा मग ती अभीप्सा अस्तित्वाच्या भिन्न भिन्न भागांमधूनसुद्धा उदित होऊ शकते; ती मुख्यत: मनातून उदित होऊ शकते, किंवा मुख्यत्वेकरून प्राणामधून किंवा अगदी शरीरामधूनही उदित होऊ शकते किंवा कधीकधी तर ती तिन्हींमधून एकत्रितपणे उदित होऊ शकते – ती सर्व प्रकारच्या संमिश्रणांमधून उदित होऊ शकते.

पण सर्वसाधारणपणे सांगावयाचे झाले तर, जर उत्कटता असेल तर तेथे प्राण आवश्यकच असतो. प्राणामुळे उत्कटता येते आणि प्राण हे जसे उत्कटतेचे केंद्र आहे तसेच ते अडीअडचणी, अडथळे, विरोधाभास यांचे पण स्थान असते आणि अडचणींची तीव्रता व अभीप्सेची तीव्रता यांच्यामध्येच संघर्ष होऊन, ही व्यथा निर्माण होते. परंतु त्यामुळे व्यक्तीने अभीप्सा बाळगणे सोडून देण्याचे काही कारण नाही. तुम्हाला या व्यथावेदनेचे कारण उमगले की झाले.

आणि मग जर का तुम्ही, तुमच्या अभीप्सेमध्ये अजून एका घटकाचा प्रवेश करून देऊ शकलात तर, हा घटक म्हणजे ईश्वरी कृपेवरील तुमचा विश्वास, ईश्वरी प्रतिसादाविषयीची खात्री, ही जर त्या अभीप्सेमध्ये मिसळली तर व्यथावेदना, दुःख या सगळ्या गोष्टी प्रतिसंतुलित होऊन जातात आणि मग तुम्ही कोणत्याही अडथळ्याविना वा भीतिविना अभीप्सा बाळगू शकता.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 248-250)

व्यक्तित्वातील ज्या भेदांविषयी तुम्ही बोलत आहात, ती योगिक विकासातील आणि अनुभूतीतील एक आवश्यक अशी पायरी आहे.

आपण जणू काही दुपदरी अस्तित्व आहोत असे व्यक्तीला जाणवते, एक आंतरिक चैत्य अस्तित्व की, जे सत्य आहे असे वाटते आणि दुसरे अस्तित्व म्हणजे बाह्यवर्ती जीवनासाठी साधनभूत असणारे असे बाह्यवर्ती मानवी अस्तित्व. आंतरिकरित्या चैत्य अस्तित्वामध्ये जीवन जगणे व ईश्वराशी जोडलेले राहणे आणि त्याच वेळी बाह्य अस्तित्व बाह्यवर्ती कार्यामध्ये गुंतलेले असणे, हे जे काही तुम्हाला जाणवत आहे ती कर्मयोगाची पहिली पायरी आहे.

तुमच्या या अनुभवांमध्ये चुकीचे असे काही नाही; ते अनुभव अटळ आहेत आणि या पायरीवर अगदी स्वाभाविक असे आहेत. तुम्हाला या दोन्हीमधील सेतुबंधाची जाणीव होत नाही कारण, कदाचित या दोहोंना जोडणारे असे काय आहे ह्याविषयाची तुम्हाला अद्यापि जाण नाही. आंतरिक मन, आंतरिक प्राण, आंतरिक शरीर ह्या गोष्टी, चैत्य अस्तित्व आणि बाह्यवर्ती अस्तित्व यांना जोडणाऱ्या असतात. आणि त्याविषयी तुम्ही आत्ताच काळजी करण्याचे काही कारण नाही.

महत्त्वाची गोष्ट अशी की, जे आत्ता तुमच्याकडे आहे ते जतन करा, त्याला वाढू द्या, सतत चैत्य अस्तित्वात, तुमच्या सत् अस्तित्वात जगा. मग योग्य वेळी चैत्य जागृत होईल आणि प्रकृतीच्या उर्वरित सर्व घटकांना ईश्वराभिमुख करेल, जेणेकरून ह्या बाह्यवर्ती अस्तित्वाला देखील स्वत:हूनच ईश्वराच्या स्पर्शाची जाणीव होईल आणि ईश्वरच आपला कर्ताकरविता आहे ह्याची जाणीव होईल.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 344-345)

प्रश्न : व्यक्तीने अस्तित्वाचे एकीकरण कसे करावे, हे मला जाणून घ्यावयाचे आहे.

श्रीमाताजी : व्यक्तीच्या एकीकरणाच्या ह्या कार्यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो.
१) व्यक्तीने स्वत:च्या चैत्य पुरुषाविषयी सजग होणे.
२) व्यक्तीला एकदा का आपल्या हालचाली, आवेग, विचार, संकल्पपूर्वक कृती यांविषयीची जाणीव झाली की, त्या सगळ्या गोष्टी चैत्य पुरुषासमोर मांडणे. ह्या हालचाली, आवेग, विचार व संकल्पपूर्वक कृती स्वीकारावी वा नाकारावी हे ठरविण्यासाठी, प्रत्येक गोष्ट चैत्य पुरुषाच्या समोर मांडावयाची असते. त्यापैकी ज्यांचा स्वीकार होईल त्या कायम राखल्या जातील व चालू राहतील आणि ज्या नाकारल्या जातील, त्या पुन्हा कधीही परतून येऊ नयेत ह्यासाठी, जाणिवेच्या बाहेर काढून टाकल्या जातील. हे एक दीर्घकालीन आणि काटेकोरपणे, कसून करण्याचे कार्य आहे, ते योग्य प्रकारे करण्यासाठी वर्षानुवर्षे लागू शकतात.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 414)

“पूर्ण योगामध्ये, शक्यतो हृदयामध्ये लक्ष केंद्रित करून, श्रीमाताजींच्या शक्तीने आपल्या अस्तित्वाला हाती घ्यावे म्हणून त्यांना आवाहन करणे आणि त्यांच्या शक्तिकार्याच्या योगे जाणिवेमध्ये पालट होणे याखेरीज इतर कोणतीही पद्धत नाही. एखादी व्यक्ती मस्तकामध्ये किंवा भ्रूमध्यामध्ये देखील चित्त एकाग्र करू शकते परंतु पुष्कळ जणांना अशा प्रकारे उन्मुख होणे फारच कठीण जाते.” – श्रीअरविंद (CWSA 29 : 107),

प्रश्न : हृदयामध्ये चित्त एकाग्र करणे हे अधिक चांगले, असे का म्हटले आहे?

श्रीमाताजी : श्रीअरविंद येथे सांगत आहेत की, ते अधिक सोपे आहे. पण काही लोकांसाठी मात्र ते जरा कठीण असते, ते ज्याच्या त्याच्या प्रकृतीवर अवलंबून असते. परंतु असे करणे अधिक चांगले असते कारण, जर तुम्ही पुरेशा खोलवर, तेथे चित्त एकाग्र केलेत तर, तुम्ही प्रथम चैत्याच्या संपर्कातच प्रवेश करता. परंतु जर का तुम्ही डोक्यामध्ये चित्त एकाग्र कराल तर तुम्हाला नंतर, चैत्य पुरुषाशी एकत्व पावणे शक्य व्हावे यासाठी, डोक्याकडून हृदयाकडे जावे लागते. आणि तुम्ही तुमच्या शक्ती एकत्र करून चित्ताची एकाग्रता करणार असाल तर, त्या शक्तींचे एकत्रीकरण हृदयामध्येच करणे अधिक बरे; कारण या केंद्रापाशीच, तुमच्या अस्तित्वाच्या या क्षेत्रामध्येच, तुम्हाला प्रगतीची इच्छा, शुद्धीकरणाची शक्ती आणि अगदी उत्कट, परिणामकारी अभीप्सा असल्याचे आढळून येते. डोक्याकडून येणाऱ्या अभीप्सेपेक्षा हृदयातून उदित होणारी अभीप्सा ही कितीतरी अधिक परिणामकारक असते.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 389)

वैयक्तिक प्रयत्नांवर भर :
योगसाधना करण्याच्या नेहमीच दोन पद्धती असतात – पैकी एक पद्धत म्हणजे जागरुक मनाने व प्राणाने कृती करणे. पाहणे, निरीक्षण करणे, विचार करणे आणि अमुक एक गोष्ट करावयाची किंवा नाही ते ठरविणे, ह्या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. अर्थात, त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या ईश्वरी शक्तीच्या साहाय्यानेच त्या कृती केल्या जातात, त्या शक्तीला आवाहन केले जाते किंवा ती शक्ती ग्रहण केली जाते – अन्यथा फारसे काही घडू शकत नाही. परंतु तरीसुद्धा येथे वैयक्तिक प्रयत्नांवरच भर असतो आणि त्याद्वारेच ओझ्याचा बराचसा भाग उचलला जातो.

चैत्य पुरुषाचा मार्ग :
दुसरा मार्ग हा ‘चैत्य पुरुषाचा मार्ग’ आहे. यामध्ये चेतना ही ईश्वराप्रत उन्मुख होते आणि केवळ चेतना वा चैत्य पुरुषच उन्मुख होतो व तो पुढे आणण्यात येतो असे नाही तर, मन, प्राण आणि शरीर देखील ईश्वराप्रत खुले होतात आणि ते प्रकाश ग्रहण करू लागतात, त्याचा परिणाम म्हणून, काय केले पाहिजे ह्याचे आकलन होऊ लागते. जे काही करणे आवश्यक आहे, ते स्वत: ईश्वरी शक्तीच करत आहे ह्याची जाणीव होऊ लागते, ते दिसू लागते. आणि तेव्हा मग, जे दिव्य कार्य चालू आहे त्यासाठी, स्वत:च्या दक्ष व जागरुक आरोहणाच्या द्वारे त्याला आवाहन करणे; हा तो दुसरा मार्ग होय.

जोपर्यंत सर्व कृतींच्या ईश्वरी उगमाशी व्यक्ती पूर्णत: समर्पित होत नाही तोवर सहसा, या दोन पद्धतींचे संमिश्रण आढळून येते. तसे समर्पण झाल्यावर मग मात्र सर्व जबाबदारी नाहीशी होते आणि मग साधकाच्या खांद्यावर कोणतेही वैयक्तिक ओझे शिल्लक राहत नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 82-83)

कोणतेही विचारच मनात उमटू नयेत अशा प्रकारे मन शांत करणे ही गोष्ट सोपी नाही, बहुधा त्याला बराच काळ लागतो. सर्वात आवश्यक गोष्ट कोणती असेल तर ती ही आहे की, एक प्रकारची मनाची शांती तुम्हाला जाणवली पाहिजे. विचार जरी मनात आलेच तरी, त्यामुळे तुम्ही विचलित होता कामा नये किंवा त्यांनी तुमच्या मनाचा ताबा घेता कामा नये किंवा तुम्ही त्यामध्ये वाहवत जाता कामा नये; जरी मनात विचार आले तरी, ते नुसतेच निघून जात आहेत, असे व्हावयास हवे.

येणाऱ्या जाणाऱ्या विचारांचे सुरुवाती सुरुवातीला मन ‘साक्षी’ बनते, ते ‘विचारक’ नसते. नंतरनंतर तर ते विचार पाहणारे साक्षीही राहत नाही. त्या विचारांकडे लक्षही जात नाही, विचार केवळ येऊन जात आहेत, असे ते करु शकते. तेव्हा ते स्वत:वरच किंवा त्याने निवडलेल्या एखाद्या वस्तुवर विनासायास लक्ष केंद्रित करू शकते.

साधनेचा पाया म्हणून दोन मुख्य गोष्टी साध्य करून घ्यावयास हव्यात –
• चैत्य पुरुषाचे खुलेपण आणि
• वर असलेल्या आत्म्याचा साक्षात्कार.

चैत्य पुरुषाचे खुलेपण :
श्रीमाताजींवर चित्ताची एकाग्रता आणि त्यांच्याप्रत आत्मार्पण हे चैत्य पुरुष खुले करण्याचे थेट मार्ग आहेत. भक्ती वाढली असल्याचे तुम्हाला जे जाणवते, ती चैत्य विकसनाची पहिली खूण आहे. श्रीमाताजींच्या उपस्थितीची वा त्यांच्या शक्तीची संवेदना किंवा त्या तुम्हाला साहाय्य करत आहेत, समर्थ बनवीत आहेत ह्याचे स्मरण ही पुढची खूण आहे. सरते शेवटी, आतील आत्मा हा अभीप्सेमध्ये सक्रिय व्हावयास सुरुवात होईल. आणि मनाला योग्य विचारांकडे वळण्यासाठी, प्राणाला योग्य गतिविधी व भावभावना यांच्याकडे वळण्यासाठी, चैत्य बोधाकडून (Psychic Perception) मार्गदर्शन मिळू लागेल; ज्या गोष्टी बाजूला सारण्याची आवश्यकता आहे त्या गोष्टी दाखवून दिल्या जातील आणि त्या बाजूलाही सारल्या जातील आणि अशा प्रकारे व्यक्तीच्या सर्व क्रिया त्या एका ईश्वराकडेच वळविल्या जातील.

आत्मसाक्षात्कार :
आत्मसाक्षात्कारासाठी, मनाची शांती आणि मौन ह्या पहिल्या आवश्यक अटी आहेत. नंतर व्यक्तीला एक प्रकारची सुटका, मुक्तता, व्यापकता जाणवायला सुरुवात होते. व्यक्ती एका शांत, अक्षोभित, कोणत्याच गोष्टीने स्पर्शित नसलेल्या, सर्वत्र आणि सर्वांतर्यामी अस्तित्वात असणाऱ्या, ईश्वराशी एकरूप झालेल्या किंवा ईश्वराशी अभिन्न असलेल्या अशा चेतनेमध्ये जीवन जगू लागते. अंतर्दृष्टी खुली होणे, अंतरंगामध्ये शक्तीचे कार्य चालू असल्याची जाणीव होणे किंवा तिच्या कार्याच्या विविध क्रियाप्रक्रिया किंवा त्या कार्याची लक्षणे इ. इ. जाणवणे ह्यासारखे मार्गातील इतर अनुभव येतील किंवा येऊ शकतील. तसेच व्यक्तीला चेतनेचे आरोहण आणि वरून अवतरित होणारी शक्ती, शांती, आनंद वा प्रकाश ह्यांचीसुद्धा जाणीव होऊ शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 320)

प्रश्न : चैत्य पुरुष मुक्त होतो म्हणजे नेमके काय घडते?

श्रीमाताजी : बरेचदा साधनेच्या सुरुवातीच्या काळात व्यक्तीच्या मनामध्ये एक प्रकारची भावना निर्माण होते. ती भावना अशी असते की, जणु चैत्य पुरुष हा एखाद्या कठीण अशा कवचामध्ये, तुरुंगामध्ये बंदिस्त झालेला आहे आणि हीच गोष्ट त्याच्यातील चैत्य पुरुषाला बाह्यत: आविष्कृत होण्यापासून आणि बाह्यवर्ती चेतनेशी, बाह्य व्यक्तित्वाशी जागृत आणि सातत्यपूर्ण संबंध जोडण्याला प्रतिबंध करते.

एखाद्या पेटीमध्ये आपण बंदिस्त झालो आहोत किंवा ज्याच्या भिंती फोडून बाहेर पडावयास हवे, अशा एखाद्या तुरुंगात आहोत किंवा असे एखादे दार असावे की, ज्याच्या आत प्रवेश करावयाचा तर बलप्रयोग करावा लागेल, अशी काहीशी ही भावना असते. तेव्हा साहजिकच, जर एखादा कोणी ती भिंत पाडू शकला, ते दार उघडू शकला, तर आत बंदिस्त असलेला चैत्य पुरुष मुक्त होतो आणि आता तो बाह्यत: देखील आविष्कृत होऊ शकतो. ह्या सगळ्या प्रतिमा आहेत.

प्रत्येक व्यक्तीची, स्वभावत:, स्वत:ची अशी वैयक्तिक प्रतिमा असते, कमीअधिक फरकाने, तिची स्वत:ची एक वैयक्तिक पद्धत असते. ज्यांनी ज्यांनी ह्याची अनुभूती घेतलेली आहे अशा व्यक्तींच्या बाबतीत, काही प्रतिमा सर्वांनाच समानतेने अनुभवास आलेल्या असतात.

उदाहरणार्थ, जेव्हा एखादी व्यक्ती चैत्य पुरुषाचा शोध घेण्यासाठी, स्वत:च्या चेतनेच्या तळाशी खोल जाऊन पोहोचते, तेव्हा ती जणू काही विहिरीमध्ये खूप खाली, खाली, खाली उतरत आहे आणि जणू काही ती आता त्या विहिरीमध्ये अगदी तळाशी जाणार अशी भावना असते, प्रतिमा असते. हे तर उघडच आहे की या उपमा आहेत; परंतु अनुभवाचा मनावर जो ठसा उमटतो त्याच्याशी साधर्म्य राखणाऱ्या ह्या उपमा आहेत आणि त्यातून त्या अनुभवाची सघन अशी प्रचिती येते आणि त्यातून फार मोठी ताकद मिळते.

उदाहरणार्थ, व्यक्ती जेव्हा स्वत:च्या आंतरिक अस्तित्वाच्या शोधास सुरुवात करते किंवा ती स्वत:च्या विविध अंगांच्या शोधास सुरुवात करते, तेव्हा तिची बरेचदा अशी भावना होते की, ती जणू काही एका हॉलमध्ये किंवा खोलीमध्ये आतवर प्रवेश करते आहे. तेथील रंग, तेथील वातावरण, त्या खोलीमध्ये असणाऱ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टींच्या आधारे व्यक्ती अस्तित्वाच्या कोणत्या अंगाला भेट देत आहे ह्याचे स्पष्ट आकलन होऊ शकते. आणि मग, व्यक्ती एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाते, दरवाजे उघडते आणि अधिकाधिक आतल्या आतल्या खोल्यांमध्ये प्रवेश करत जाते, त्यातील प्रत्येक खोलीचे स्वत:चे असे एक स्वरूप असते. आणि बऱ्याचदा, हा आंतरिक प्रवास, ह्या आंतरिक भेटी रात्रीच्या वेळी घडून येतात. तेव्हा त्याला स्वप्नासारखे, अधिक सघन असे रूप प्राप्त होते आणि व्यक्तीला असे जाणवते की, जणू ती एखाद्या घरामध्ये प्रवेश करत आहे आणि ते घर तिच्या खूप परिचयाचे आहे.

आणि काळ, वेळेनुसार आंतरिक गोष्टी भिन्न भिन्न असतात. कधीकधी तेथे एक प्रकारची अत्यंत अव्यवस्था असते, सावळा गोंधळच असतो म्हणा ना, जेथे सर्व काही एकमेकांत मिसळून गेलेले असते, कधीकधी तोडक्यामोडक्या गोष्टीपण असतात, एकूणातच एक प्रकारचा गोंधळ असतो. तर कधी कधी, सर्व गोष्टी व्यवस्थित असतात, त्यांच्या त्यांच्या जागी ठेवलेल्या असतात, जणू काही कोणीतरी घर नीट आवरलेले असावे, घरातील गोष्टी स्वच्छ केलेल्या असाव्यात, व्यवस्थितपणे ठेवलेल्या असाव्यात. आणि गंमत म्हणजे, घर मात्र नेहमी तेच असते. घर ही तुमच्या आंतरिक अस्तित्वाची एक प्रकारची वस्तुनिष्ठ प्रतिमा आहे. आणि तेथे तुम्ही जे पाहता, तेथे जे काही करता, ते तुमच्या मानसिक कार्याचे प्रतीकात्मक रूप असते. मूर्त रूप येण्यासाठी ह्या गोष्टी उपयुक्त असतात. पण हे माणसामाणसांवर अवलंबून असते.

काही माणसं फक्त बुद्धिवादी असतात आणि त्यांच्या बाबतीत मग प्रत्येक गोष्ट ही संकल्पनांमध्ये व्यक्त होते, प्रतिमांमध्ये नाही. परंतु ते जर जडभौतिक प्रांतामध्ये अधिकाधिक खोलवर जात राहिले तर हा धोका असतो की, ते मूर्त वास्तवाला स्पर्श करू शकत नाहीत आणि केवळ संकल्पनांच्या प्रांतातच राहतात, मनाच्या प्रांतातच वावरतात आणि तेथेच अनंतकाळपर्यंत राहू शकतात. आणि जरी ती काहीशी अनिश्चित, अपरिमित अशी गोष्ट असली तरी त्यांना असे वाटू लागते की, ते प्रगती करत आहेत, मानसिकरित्या त्यांची प्रगती झाली आहे इ. इ. मन हे असे एक अतिविशाल, आणि अपरिमित असे क्षेत्र आहे की, जे सातत्याने नवीकृत (renewed) होत राहते. परंतु जर का एखाद्याला प्राणिक आणि शारीरिक अस्तित्वामध्ये प्रगती करावयाची इच्छा असेल तर, ज्याविषयी आपण आधी बोललो ते प्रतिमात्मक प्रतिनिधित्व कृती निश्चित करण्यासाठी, ती कृती अधिक सघन बनविण्यासाठी खूप उपयोगी ठरते.

अर्थातच ही गोष्ट काही पूर्णत: व्यक्तीच्या इच्छेबरहुकूम होत नाही, ती प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून असते. परंतु ज्या कोणाकडे प्रतिमांवर लक्ष केंद्रित करण्याची शक्ती असते त्यांना अजून एक सुविधा उपलब्ध असते.

ध्यानामध्ये, एका बंद दरवाजासमोर बसावयाचे. जणू काही ते पोलादी भरभक्कम दार असावे – आणि ते दार उघडावे आणि दाराच्या दुसऱ्या बाजूला जावे अशी इच्छा बाळगून त्या दारासमोर बसावयाचे. आणि संपूर्ण लक्ष, संपूर्ण अभीप्सा ही जणू काही एका घणामध्ये एकत्रित होते आणि त्याने दारावर घाव घातले जाताहेत, जाताहेत, आणि अधिकाधिक चढत्या वाढत्या शक्तीने व्यक्ती ते घाव घालत राहते.. जोपर्यंत ते दार एकदम उघडले जात नाही आणि व्यक्तीचा आत प्रवेश होत नाही तोपर्यंत हे चालू राहते. ह्याचा खूप जोरदार ठसा उमटतो.

जणू काही व्यक्ती प्रकाशामध्येच झेप घेते, ती व्यक्ती त्या प्रकाशाने पूर्ण उजळून निघते आणि तिला अचानक, एकाएकी जाणिवेमध्ये परिवर्तन झाल्याचा आनंद लाभतो; आपण कोणी निराळीच व्यक्ती बनलो असल्याचे तिला जाणवू लागते.

स्वत:च्या चैत्य अस्तित्वाशी संबंध प्रस्थापित करण्याचा हा एक अतिशय सघन आणि शक्तिशाली मार्ग आहे.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 266-268)

तासन् तास ध्यानाला बसल्यानंतर तुम्हाला अनुभव येतात की नाही, हे तितकेसे महत्त्वाचे नाही. मी तुम्हाला काय सांगितले ते लक्षात ठेवा, तुमच्यासाठी आत्ता अनुभव नव्हे तर चैत्याची वृद्धी हाच तुमचा मार्ग असावयास हवा.

याचा अर्थ म्हणजे, तीन गोष्टी पाहिजेत – पहिली गोष्ट म्हणजे, प्राणिक अहंकार आणि त्याचे गोंधळ, अस्वस्थता, अशांती यांपासून मागे होऊन, श्रद्धा व समर्पणाचा शांत दृष्टिकोन स्वीकारणे.

दुसरी गोष्ट म्हणजे, अंतरंगामध्ये अशा कोणत्यातरी गोष्टीचा उदय की जी गोष्ट, तुमच्या प्रकृतीमधील काय बदलायला हवे हे पाहते आणि तो बदल घडविण्याचा जोशही देते.

तिसरी गोष्ट म्हणजे, साधनेमधील चैत्य भावना की जी, भक्तीमध्ये वाढ करेल. अशी भावना की जी, ईश्वराचे स्मरण करण्यात, त्याच्या विषयीच्या बोलण्यामध्ये, त्याच्याविषयी लिहिण्यामध्ये, अनुभवण्यामध्ये, ईश्वराचा सतत विचार करण्यामध्ये सहजपणाने आनंद अनुभवेल; अशी भावना ही, बाह्यवर्ती गोष्टींमध्ये रमण्यापेक्षा अधिकाधिक अगदी शांतपणे ईश्वराभिमुख होऊन, आत्म-उन्नतीमध्ये परिपूर्णपणे वृद्धिंगत होत राहील.

जेव्हा जाणीव ही वरील गोष्टींनी ओतप्रोत भरून जाईल म्हणजे, जेव्हा अशा प्रकारे पूर्ण चैत्य स्थिती असेल, चैत्य खुले झालेले असेल, तेव्हा आपोआप अनुभव यायला लागतील. प्रथम चैत्य खुलेपण आणि त्यानंतर उच्चतर जाणीव व तिचे अनुभव !

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 347-348)