Tag Archive for: साधना

विचार शलाका – २५

भावनिक आवेग, भावभावना आणि मानसिक उत्साह यांना मी आता पाया बनवू इच्छित नाही. विशाल आणि मजबूत अशा समतेलाच मी माझ्या योगाचे अधिष्ठान बनवू इच्छितो. समतेवर अधिष्ठित असलेल्या जिवाच्या सर्व तऱ्हेच्या कृतींमध्ये, मला पूर्ण, स्थिर आणि अविचल असे सामर्थ्य हवे आहे आणि या शक्तिसामर्थ्याच्या सागरावर मला ‘ज्ञानसूर्य’ तळपताना हवा आहे आणि त्या तेजोमय विशालतेमध्ये अनंत प्रेमाचा परमानंद आणि आनंद आणि एकत्व सुस्थापित झालेले हवे आहेत.

मला हजारो शिष्यांची आवश्यकता नाही. क्षुद्र अशा अहंकारापासून मुक्त असणारे, ‘ईश्वरा’चे साधन बनलेले असे शंभर जरी शिष्य मला लाभले, तरी ते माझ्यासाठी पुरेसे असतील. नेहमीच्या पद्धतीच्या गुरुबाजीवर माझा विश्वास नाही. मला गुरु बनायचे नाहीये. मला काय हवे आहे तर, कोणीतरी एखादा माझ्या स्पर्शाने किंवा इतर कोणाच्या तरी स्पर्शाने जागृत होईल, त्याच्या सुप्त अशा आंतरिक दिव्यत्वातून तो आविष्कृत होईल आणि दिव्य जीवन प्रत्यक्ष उतरवू पाहील. अशी माणसेच या देशाची उन्नती करतील.

– श्रीअरविंद
(Bengali Writings : 372-373)

विचार शलाका – २३

समर्पण हे संपूर्ण असले पाहिजे आणि त्याने अस्तित्वाच्या प्रत्येक घटकाचा ताबा घेतला पाहिजे. चैत्य (The psychic) प्रतिसाद देत आहे आणि उच्चतर मानसिक अंग स्वीकार करत आहे किंवा अगदी आंतरिक प्राणिक अंग शरणागत होत आहे आणि आंतरिक शारीरिक चेतनेला प्रभाव जाणवत आहे, फक्त एवढेच पुरेसे नाही. अस्तित्वाचा कोणताही घटक असा असता कामा नये, अगदी अत्यंत बाह्यवर्ती भागसुद्धा असा असता कामा नये की जो स्वतःला अलग राखत आहे, शंका, गोंधळ आणि डावपेच यांच्या मागे काहीतरी दडवून ठेवत आहे, किंवा एखादा भाग बंड करत आहे किंवा नकार देत आहे, असे असता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 03)

विचार शलाका – २२

….खालून ऊर्ध्व दिशेप्रत असणारी उन्मुखता आणि वरून अवतरित होणारी सर्वोच्च अतिमानसिक ‘शक्ती’ या दोन गोष्टीच भौतिक प्रकृती आणि तिच्या अडीअडचणी यांना विजयपूर्वक हाताळू शकतील आणि त्यांचा निरास करू शकतील.

समर्पण हे संपूर्ण आणि प्रामाणिक असले पाहिजे; एकमेव दिव्य ‘शक्ती’प्रतच आत्म-उन्मुखता असली पाहिजे; अवतरित होणाऱ्या ‘सत्या’ची सातत्यपूर्ण आणि संपूर्ण निवड केली पाहिजे, मानसिक, प्राणिक आणि शारीरिक ‘शक्ती’ आणि त्यांची ‘रूपे’, जी अजूनही या ‘पृथ्वी-प्रकृती’वर शासन करत आहेत त्यांच्या मिथ्यत्वाला सातत्याने आणि पूर्णतया नकार दिला पाहिजे…

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 03)

विचार शलाका – २१

मानवी स्तरावरील सामान्य प्राणिक मागण्यांच्या विरोधात, साधक जेव्हा स्वतःच्या योगमार्गावर अढळपणे उभा राहतो तेव्हा, ज्यांना त्या साधकाबाबत काही जाण नसते असे लोक नेहमीच (“हा दगडासारखा भावशून्य आहे’’ इ. प्रकारची) निंदा करत राहतात. पण त्यामुळे तुम्ही (साधकाने) अस्वस्थ होता कामा नये. मानवी प्रकृतीच्या सामान्य प्राणिक चिखलाने भरलेल्या मार्गावरील हलकी आणि निःसत्त्व माती बनून राहण्यापेक्षा, दिव्यत्वाकडे जाणाऱ्या मार्गावरील दगड होणे परवडले.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 315)

विचार शलाका – १४

सूर्याच्या ओढीने शेकडो प्रकारची वळणे घेत घेत, फक्त सूर्यप्रकाश मिळावा म्हणून झगडणाऱ्या अगणित वृक्षवेली असलेले जंगल तुम्ही कधी पाहिले नाहीयेत का? भौतिकातील अभीप्सेची भावना, ती आस, ती स्पंदनं, सूर्यप्रकाशाबद्दल असलेली ओढ ती हीच होय. माणसांपेक्षा वनस्पतींच्या शारीर-अस्तित्वामध्ये ती अभीप्सा अधिक असते. त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे प्रकाशपूजाच असते. अर्थातच येथे ‘प्रकाश’ हे ‘ईश्वरा’चे भौतिक प्रतीक आहे आणि भौतिक परिस्थितीमध्ये, सूर्याद्वारे, ‘परम-चेतना’ दर्शविली जाते. वनस्पतींना दृष्टी नसूनसुद्धा, त्यांच्या स्वत:च्या अगदी सहजस्वाभाविक पद्धतीने ती भावना अगदी स्पष्टपणाने जाणवून जाते. तुम्हाला त्यांच्या भावनांविषयी सजग कसे व्हायचे हे जर माहीत असेल तर तुम्हाला कळेल की, त्यांची अभीप्सा किती उत्कट असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 132)

विचार शलाका – ११

‘योगा’च्या ध्येयाप्रत पोहोचणे नेहमीच कठीण असते, पण ‘पूर्णयोग’ इतर कोणत्याही योगांपेक्षा अधिक खडतर आहे, आणि ज्यांना ‘ती’ हाक आलेली आहे, ज्यांच्याजवळ क्षमता आहे, प्रत्येक गोष्टीला व प्रत्येक जोखमीला तोंड देण्याची ज्यांची तयारी आहे, अगदी अपयशाचा धोका पत्करण्याचीही ज्यांची तयारी आहे; आणि पूर्णपणे नि:स्वार्थीपणा, इच्छाविरहितता व समर्पण यांजकडे प्रगत होण्याचा ज्यांचा संकल्प आहे केवळ अशांसाठीच ‘पूर्णयोग’ आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 27)

विचार शलाका – ०४

प्रश्न : चैत्य अग्नी (psychic fire) प्रज्वलित कसा करावा?

श्रीमाताजी : अभीप्सेच्या द्वारे.

प्रगतीसाठीच्या संकल्पाद्वारे आणि आत्मशुद्धीकरणाने हा चैत्य अग्नी चेतवला जातो.

जेव्हा प्रगतीची इच्छा तीव्र असते, व ती इच्छा आध्यात्मिक प्रगती आणि शुद्धीकरण या दिशेने वळविली जाते तेव्हा आपोआप त्या व्यक्तीमधील हा अग्नी प्रदिप्त होतो.

एखाद्याला जर स्वत:मधील एखादा दोष, एखादी त्रुटी दूर करावयाची असेल, त्याच्या प्रकृतीमधील काहीतरी त्याला प्रगत होण्यापासून रोखत असेल, त्याची जर त्याने या चैत्य अग्नी मध्ये आहुती दिला तर तो अग्नी अधिक तीव्रतेने प्रज्वलित होतो. आणि ही केवळ प्रतिमा नाही, ती सूक्ष्म भौतिक पातळीवरील वस्तुस्थिती आहे. कोणी त्या ज्योतीची ऊब अनुभवू शकतो, तर कोणी एखादा सूक्ष्म भौतिक स्तरावर त्या ज्योतीचा प्रकाशदेखील पाहू शकतो.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 251)

विचार शलाका – १९

‘ईश्वराला समर्पण’ या भावाने केलेल्या कार्यामधून चेतनेचा सर्वोत्तम विकास घडून येतो.

*

आळस आणि निष्क्रियता ह्या बाबींचा परिणाम म्हणजे तमस. त्यातून व्यक्ती अचेतनतेमध्ये जाऊन पडते आणि ती गोष्ट प्रगती व प्रकाशाच्या पूर्णपणे विरोधी असते. अहंकारावर मात करणे आणि केवळ ‘ईश्वर’सेवेमध्ये जीवन व्यतीत करणे, हा ‘सत्यचेतना’ प्राप्त करून घेण्याचा निकटतम व आदर्श असा मार्ग आहे.

*

तुमच्यामध्ये जोपर्यंत दुसऱ्यांविषयी आपपर भाव शिल्लक असतो तोवर निश्चितपणे तुम्ही ‘सत्या’च्या परिघाबाहेर असता. तुम्ही तुमच्या हृदयात नित्य सद्भाव आणि प्रेमभाव जतन केला पाहिजे. आणि त्यांचा प्रगाढ शांतीने आणि समतेने सर्वांवर वर्षाव होऊ द्यावा.

*

जोपर्यंत जुन्या सवयी आणि पूर्व-समजुती यांना छेद दिला जात नाही, तोपर्यंत भविष्याप्रत वेगाने पुढे सरसावण्याची फारशी आशा बाळगता येणार नाही.

*

समाधान हे बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसून आंतरिक अवस्थेवर अवलंबून असते.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 211), (CWM 13 : 212), (CWM 13 : 191), (CWM 15 : 197), (CWM 14 : 215)

विचार शलाका – १५

एकदा का तुम्ही योगमार्गामध्ये प्रवेश केलात की, तुम्ही सर्व प्रकारच्या भीतीपासून स्वतःची सुटका करून घेतली पाहिजे. मनामधील, प्राणामधील, शरीरामधील भीती, ही भीती तर शरीराच्या पेशीपेशींमध्ये भिनलेली असते; या सर्व प्रकारच्या भीतीपासून सुटका करून घेतली पाहिजे. तुम्हाला योगमार्गावर जे धक्के खावे लागतात त्याचा एक उपयोग म्हणजे या भीतीपासून तुमची सुटका करणे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या या भीतीच्या कारणांपासून मुक्त, निर्लिप्त, अस्पर्शित आणि शुद्ध असे त्यांच्यासमोर उभे ठाकू शकत नाही तोपर्यंत ही भीतीची कारणे तुमच्यावर पुन्हापुन्हा हल्ला करतच राहतात. एखाद्याला समुद्राची भीती वाटते तर दुसऱ्या एखाद्याला आगीची भीती वाटते. दुसऱ्याला कदाचित असे आढळेल की, त्याला वारंवार वणव्यापाठीमागून वणव्याला सामोरे जावे लागत आहे. त्याच्या शरीरातील एकूण एक पेशीचे भीतीने थरकापणे बंद होण्याइतपत जोवर तो प्रशिक्षित होत नाही, तोपर्यंत हे चालूच राहते. ज्याला तुम्ही घाबरत असता, ती भीती जोवर जात नाही तोवर ती गोष्ट पुन्हा पुन्हा तुमच्यापाशी येत राहते. जो रूपांतरण करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि जो या मार्गाचे अनुसरण करणारा आहे त्याने पूर्णतः निर्भय बनले पाहिजे. त्याच्या प्रकृतीच्या कोणत्याही भागामध्ये भीतीचा लवलेशदेखील राहता कामा नये.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 57)

विचार शलाका – १४

तुम्ही जर ‘दिव्य चेतने’शी एकरूप झालेले असाल तर, जी गोष्ट करायची आहे ती करायला मानवी गणनेनुसार एक वर्ष लागते की हजार वर्षे लागतात, या गोष्टीला फारसे काही महत्त्व नाही; कारण तेव्हा तुम्ही मानवी प्रकृतीच्या सर्व गोष्टी तुमच्या बाहेर ठेवता आणि ‘दिव्य प्रकृती’च्या अनंततेमध्ये आणि शाश्वततेमध्ये प्रवेश करता. तेव्हा मग, घाईगडबडीच्या अतीव उत्सुकतेच्या भावनेपासून तुमची सुटका झालेली असते. माणसं अक्षरशः या भावनेमुळे पछाडलेली असतात कारण त्यांना गोष्टी पूर्ण झालेल्या पाहायच्या असतात. क्षोभ, घाईगडबड, अस्वस्थता या गोष्टीतून काहीच साध्य होत नाही. या गोष्टी समुद्रावरील फेसासारख्या असतात; जर सतत धावपळ करत राहिले नाही आणि कोणत्यातरी कार्यांत स्वतःला झपाटल्यासारखे गुंतवून घेतले नाही तर, आपण काहीच करत नाहीये अशी माणसांची एक समजूत झालेली असते. या सगळ्या तथाकथित हालचालींमुळे गोष्टी बदलतात असे मानणे हा एक भ्रम आहे. जणू एखादा कप घ्यावा आणि त्यामध्ये पाणी ढवळत राहावे तसे हे आहे. ते पाणी हिंदकळताना दिसते पण तुमच्या त्या ढवळण्याने त्या पाण्यामध्ये तीळमात्रही बदल झालेला नसतो. असा कार्यभ्रम हा मानवी प्रकृतीच्या मोठमोठ्या भ्रमांपैकी एक मोठा भ्रम आहे. यामुळे प्रगतीला बाधा पोहोचते कारण त्यामुळे सतत काहीतरी उत्तेजित हालचाली करत राहण्याची घाई करण्याची आवश्यकता तुम्हाला भासत असते. जर तुम्हाला यातील भ्रम कळेल आणि हे किती निरुपयोगी आहे, त्यामुळे कोणतीच गोष्ट बदलत नाही, हे कळेल तर किती बरे होईल! तुम्हाला यामधून काहीच साध्य होत नसते. अशा रीतीने जे घाईगडबडीत असतात ती माणसं शक्तींच्या हातातील साधने असतात, आणि अशा माणसांना त्या शक्ती स्वतःच्या मनोरंजनासाठी नाचायला लावत असतात; आणि या शक्ती चांगल्या नसतात.

या जगामध्ये ज्या कोणत्या चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या अशा व्यक्तींकडून घडलेल्या आहेत की ज्या व्यक्ती कृतींच्या पलीकडे, शांतीमध्ये उभ्या राहू शकतात. कारण या व्यक्ती ‘ईश्वरी शक्ती’ची माध्यमं असतात. अशा व्यक्ती सक्रिय प्रतिनिधी असतात, जागृत साधने असतात. या व्यक्ती अशा शक्तींचे अवतरण घडवितात ज्यामुळे हे विश्व बदलून जाते. गोष्टी अशा प्रकारे घडविल्या जातात, घाईगर्दीच्या कृतीमुळे नाहीत. शांती, शांतता आणि स्थिरतेमध्येच या विश्वाची रचना झाली आणि जेव्हा कधी खरेखुरे असे काही घडवायचे असते, तेव्हा ते शांती, शांतता आणि स्थिरतेमध्येच केले पाहिजे. जगासाठी काही करावयाचे तर सर्व प्रकारच्या निष्फळ गोष्टींवर काम करत सकाळपासून रात्रीपर्यंत धावत राहिले पाहिजे, ही समजूत अज्ञानीपणाची आहे.

एकदा का तुम्ही या गरगर फिरणाऱ्या शक्तींपासून मागे हटून शांत प्रांतामध्ये प्रवेश केलात की, मग तुमच्या लक्षात येईल की, तो केवढा मोठा भ्रम होता. माणसं म्हणजे आंधळ्या प्राण्यांचा एक समूह आहे आणि ते काय करत आहेत, ते का करत आहेत हे काहीही माहीत नसताना उगाच धडपडणाऱ्या, एकमेकांवर आदळणाऱ्या आणि ठोकरा खाणाऱ्या प्राण्यांचा तो समूह आहे, असे तुम्हाला वाटू लागेल. आणि यालाच ते कर्म आणि जीवन असे संबोधत असतात. ही तर फक्त पोकळ खळबळ असते, हे कर्म नव्हे, हे खरे जीवन नाही.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 66-67)