Tag Archive for: साधना

साधनेची मुळाक्षरे – २७

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्ही ‘ध्यान’ कशाला म्हणता? डोळे मिटणे आणि मन एकाग्र करणे याला? सत्य चेतना खाली उतरविण्यासाठी तिला हाक देण्याची ही केवळ एक पद्धत आहे.

सत्यचेतनेशी जोडले जाणे आणि तिचे अवतरण जाणवणे, केवळ हीच गोष्ट महत्त्वाची आहे आणि जर का ती कोणत्याही पारंपरिक पद्धतीविना होत असेल – जसे ते माझ्या बाबतीत नेहमीच होत असे – तर ते अधिक चांगले आहे. ध्यान हे एक केवळ साधन किंवा उपकरण आहे, चालता, बोलता, काम करतानासुद्धा साधनेमध्ये असणे ही खरी प्रक्रिया आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 300)

साधनेची मुळाक्षरे – २६

प्रश्न : ध्यानाची उद्दिष्टे काय असायला हवीत किंवा ध्यानाच्या संकल्पना काय असायला हव्यात?

श्रीअरविंद : जी तुमच्या प्रकृतीशी आणि तुमच्या सर्वोच्च आकांक्षांशी अनुरूप असतील ती! परंतु जर का तुम्ही मला निरपवाद उत्तर विचारत असाल, तर मला असे म्हटले पाहिजे की, ध्यानासाठी म्हणजे मननासाठी किंवा चिंतनासाठी ‘ब्रह्म’ हे नेहमीच सर्वोत्कृष्ट उद्दिष्ट असते आणि सर्वांतर्यामी असणाऱ्या ‘देवा’वर, ‘देवा’मध्ये निवास करणाऱ्या सर्वांवर आणि सर्व काही ‘देव’च आहे या संकल्पनांवर मनाने आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. मग तो ‘देव’ ‘अवैयक्तिक’ आहे की ‘वैयक्तिक’ आहे, की सापेक्ष असा ‘एकमेव आत्मा’ आहे, या गोष्टीने वस्तुतः फारसा काही फरक पडत नाही. पण मला तरी (सर्वं खल्विदं ब्रह्म) ही संकल्पना सर्वोत्तम वाटते. कारण ती सर्वोच्च आहे आणि तिच्यामध्ये, म्हणजे ‘सर्व काही ब्रह्म आहे’ या संकल्पनेमध्ये, इहलौकिक सत्य असो अथवा पारलौकिक सत्य असो, किंवा सर्व अस्तित्वाच्या अतीत असणारे सत्य असो, त्या सर्व सत्यांचा समावेश होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 294-295)

साधनेची मुळाक्षरे – २५

प्रश्न : ध्यानासाठी अगदी आवश्यक असणारी आंतरिक व बाह्य परिस्थिती कोणती?

श्रीअरविंद : मूलभूत अशी काही बाह्य परिस्थिती आवश्यक नाही, परंतु ध्यानाच्या वेळी एकांत व विलगपणा असेल आणि त्याचबरोबर शरीराची स्थिरता असेल, तर ध्यानासाठी या गोष्टींची मदत होते. नवोदितांसाठी या गोष्टी बऱ्याचदा अगदी आवश्यक असतात. परंतु बाह्य परिस्थितीमुळे व्यक्तीवर मर्यादा पडता कामा नयेत. एकदा ध्यानाची सवय झाली की मग, कोणत्याही परिस्थितीत म्हणजे, पहुडलेले असताना, उठता-बसता, चालताना, एकटे असताना किंवा इतर लोकांसमवेत असताना, शांततेमध्ये किंवा गलक्यामध्ये, कोणत्याही परिस्थितीत ध्यान करता आले पाहिजे.

मनाचे सैरावैरा भरकटणे, विस्मरण, झोप, शारीरिक आणि स्नायुगत अधीरता व अशांती या ध्यानाच्या आड येणाऱ्या साऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी ‘संकल्पाची एकाग्रता’ ही आंतरिक परिस्थिती सर्वप्रथम महत्त्वाची आहे.

दुसरी आवश्यक परिस्थिती म्हणजे उत्तरोत्तर वाढणारे पावित्र्य आणि जेथून विचार व भावनांचा उदय होतो, त्या आंतरिक चेतनेची (चित्ताची) स्थिरता. म्हणजे राग, दुःख, निराशा, ऐहिक घटनांविषयीची चिंता या साऱ्या अडथळा निर्माण करणाऱ्या प्रतिक्रियांपासून चित्त मुक्त असले पाहिजे. मानसिक आणि नैतिक पूर्णत्व या दोन्ही गोष्टी एकमेकींशी घनिष्ठपणे जोडलेल्या असतात.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 295)

साधनेची मुळाक्षरे – २४

प्रश्न : ध्यान म्हणजे नक्की काय?

श्रीअरविंद : ‘ध्याना’ची भारतीय संकल्पना स्पष्ट करण्यासाठी इंग्रजीमध्ये Meditation आणि Contemplation हे दोन शब्द वापरले जातात.

मनन –
एकाच विषयाचा वेध घेण्यासाठी म्हणून विचारांच्या एका सलग मालिकेवर मनाचे लक्ष केंद्रित करणे म्हणजे ‘मनन’ (Meditation).

चिंतन –
एकाग्रतेच्या बळावर, वस्तुचे, प्रतिमेचे किंवा संकल्पनेचे ज्ञान, मनामध्ये स्वाभाविकरित्या उदित व्हावे म्हणून, कोणत्यातरी एकाच वस्तुवर, प्रतिमेवर किंवा संकल्पनेवर मन एकाग्र करणे म्हणजे ‘चिंतन’ (Contemplation). हे दोन्ही प्रकार ही ध्यानाचीच दोन रूपं आहेत. कारण विचारावर असू दे, दृश्यावर असू दे किंवा ज्ञानावर असू दे, पण मानसिक एकाग्रता हे ध्यानाचे तत्त्व आहे.

आत्म-निरीक्षणात्मक एकाग्रता –
ध्यानाचे इतरही काही प्रकार आहेत. एके ठिकाणी सामी विवेकानंदांनी तुम्हाला तुमच्या विचारांपासून अलग होऊन मागे उभे राहायला सांगितले आहे. मनात विचार जसे येत आहेत तसे येत राहू देत, तुम्ही नुसते त्यांचे निरीक्षण करत राहायचे आणि ते काय आहेत हे जाणून घ्यायचे. याला ‘आत्म-निरीक्षणात्मक एकाग्रता’ असे म्हणता येईल.

मुक्तिप्रद ध्यान –
आत्म-निरीक्षणात्मक एकाग्रता ही दुसऱ्या एका प्रकाराकडे घेऊन जाते. मनामधून सर्व विचार काढून टाकणे; जेणेकरून, ते मन एक प्रकारची विशुद्ध सावध अशी पोकळी बनले पाहिजे म्हणजे त्यामध्ये दिव्य ज्ञान अवतरू शकेल आणि त्याचा ठसा उमटवू शकेल; त्यामध्ये सामान्य मानवी मनाच्या कनिष्ठ विचारांची लुडबुड असणार नाही आणि काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूने लिहावे तितकी स्पष्टता त्यामध्ये असेल. अशा प्रकारे, सर्व मानसिक विचारांचा त्याग ही योगाची एक पद्धत असल्याचे ‘गीते’मध्ये सांगितले आहे, असे तुम्हाला आढळून येईल आणि या पद्धतीला गीतेने पसंती दिलेली दिसते. ह्याला ‘मुक्तिप्रद ध्यान’ असे म्हणता येईल. कारण या ध्यानामुळे विचारांच्या यांत्रिक पद्धतीच्या गुलामीमधून मनाची मुक्तता होते. वाटले तर विचार करायचा किंवा नाही वाटले तर विचार करायचा नाही, असे करण्यास मनाला या ध्यानामुळे, मुभा मिळते. तसेच, स्वतःच्या विचारांच्या निवडीला मुभा मिळते किंवा वाटले तर, विचारांच्या अतीत होऊन, आपल्या तत्त्वज्ञानामध्ये ज्याला ‘विज्ञान’ असे म्हटले जाते त्या सत्याच्या शुद्ध बोधाप्रत जाण्याची मनाला मुभा मिळते.

‘मनन’ ही मानवी मनाला सर्वाधिक सोपी असणारी प्रक्रिया आहे पण त्याचे परिणाम अल्प असतात. ‘चिंतन’ ही अधिक कठीण पण परिणामांच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. आत्म-निरीक्षण आणि विचारमालिकांपासून मुक्ती (मुक्तिप्रद ध्यान) या गोष्टी सर्वाधिक कठीण आहेत परंतु त्याचे फळ मात्र विशाल आणि महान असे असते. व्यक्ती स्वतःच्या कलानुसार आणि क्षमतेनुसार यापैकी कोणत्याही प्रकाराची निवड करू शकते. योग्य पद्धती म्हणायची झाली तर, ध्यानाच्या या सर्वच प्रकारांचा वापर करावा, प्रत्येक पद्धत तिच्या तिच्या स्थानी आणि तिच्या तिच्या उद्दिष्टांसाठीच वापरण्यात यावी. परंतु यासाठी एका दृढ श्रद्धेची, स्थिर धैर्याची आणि ‘योगा’चे आत्म-उपयोजन (self-application) करण्यासाठी प्रचंड ऊर्जेची आवश्यकता असते.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 293-294)

साधनेची मुळाक्षरे – १८

कोणत्याही वैयक्तिक प्रेरणांशिवाय, प्रसिद्धी किंवा लोकमान्यता किंवा लौकिक मोठेपणा यांच्या इच्छेविना जे कर्म केले जाते; ज्यामध्ये स्वतःच्या मानसिक प्रेरणा किंवा प्राणिक लालसा व मागण्या किंवा शारीरिक पसंती-नापसंती यांचा आग्रह नसतो; जे कर्म कोणत्याही बढाईविना किंवा असंस्कृत स्व-मताग्रहाविना किंवा पद वा प्रतिष्ठेसाठी कोणताही दावा न करता केले जाते; जे केवळ आणि केवळ ‘ईश्वरा’ साठीच आणि ‘ईश्वरी आदेशा’ने केले जाते, केवळ असेच कर्म आध्यात्मिकदृष्ट्या शुद्धिकरण करणारे असते. सर्व कर्मं जी अहंभावात्मक वृत्तीने केली जातात ती, या अज्ञानमय जगातील लोकांच्या दृष्टीने भलेही चांगली असू देत, पण ‘योगसाधना’ करणाऱ्या साधकाच्या दृष्टीने त्यांचा काहीच उपयोग नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 232)

साधनेची मुळाक्षरे – १७

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…)

तुम्ही ज्या सर्व अडचणींचे वर्णन करत आहात त्या गोष्टी बहुतेक सर्वच माणसांच्या बाबतीत अगदी स्वाभाविकपणे येत असतात. एखादी व्यक्ती शांतपणे ध्यानाला बसलेली असते तेव्हा तिला ईश्वराचे स्मरण राखणे आणि ईश्वरी उपस्थितीची जाणीव ठेवणे तुलनेने सोपे असते; पण व्यक्तीला कामामध्ये व्यग्र राहावे लागत असेल तर तसे करणे तिला अधिक कठीण असते. कर्मामधील चेतना आणि स्मरण हे क्रमाक्रमानेच यायला हवे, ते एकदमच एकावेळी होईल अशी अपेक्षा तुम्ही बाळगता कामा नये, कोणालाच ते तसे एकदम साध्य होत नाही. ते दोन मार्गांनी घडते – पहिला मार्ग म्हणजे, व्यक्तीने ‘श्रीमाताजीं’चे स्मरण राखण्याचा सराव केला तर आणि व्यक्ती जेव्हा काहीतरी करते तेव्हा त्या प्रत्येक वेळी ती कृती ‘श्रीमाताजीं’ना अर्पण करण्याचा व्यक्तीने सराव केला तर (कर्म करत असताना सर्वकाळ नाही, तर कर्मारंभी किंवा व्यक्तीला जेव्हा जेव्हा स्मरण होईल तेव्हा) मग ती गोष्ट हळूहळू सोपी आणि प्रकृतीच्या दृष्टीने सवयीची होऊन जाते. दुसरा मार्ग म्हणजे – ध्यानामुळे आंतरिक चेतना विकसित होऊ लागते, जी चेतना एकाएकी किंवा अचानकपणे नाही तर, कालांतराने, आपोआप अधिकाधिक चिरस्थायी बनत जाते. कार्यकारी असणाऱ्या बाह्यवर्ती चेतनेहून विभिन्न असणाऱ्या या चेतनेची व्यक्तीला जाणीव होऊ लागते. कर्म करत असताना व्यक्तीला सुरुवातीला या विभिन्न चेतनेची जाणीव होत नाही, पण जेव्हा कर्म थांबते तेव्हा लगेचच व्यक्तीला असे जाणवते की, ती चेतना पूर्ण वेळ मागून आपल्याकडे लक्ष ठेवून होती; नंतर मग कर्म चालू असतानादेखील तिची जाणीव होऊ लागते, जणू काही आपल्या अस्तित्वाचे दोन भाग आहेत, अशी व्यक्तीला जाणीव होते. एक अस्तित्व निरीक्षण करत आहे आणि मागे राहून आधार पुरवीत आहे तसेच ‘श्रीमाताजीं’चे स्मरण करत आहे आणि दुसरे अस्तित्व कर्म करत आहे, अशी व्यक्तीला जाणीव होते. असे जेव्हा घडते तेव्हा सत्य-चेतनेनिशी कर्म करणे अधिकाधिक सोपे होते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 259)

साधनेची मुळाक्षरे – १३

काम करत असताना ‘ईश्वरी उपस्थिती’ चे स्मरण ठेवणे हे सुरुवातीला सोपे नसते; परंतु काम संपल्यासंपल्या लगेचच जरी त्या उपस्थितीची जाणीव व्यक्तीला पुनरुज्जीवित करता आली तरी ठीक आहे. कालांतराने काम करत असतानाच त्या उपस्थितीची जाणीव आपोआपपणे होऊ लागेल.

*

समर्पणाचा नुसता दृष्टिकोन असून चालणार नाही तर, प्रत्येक कर्मच ‘श्रीमाताजीं’ना अर्पण केले पाहिजे म्हणजे मग तो दृष्टिकोन सदासर्वदा जीवित राहील. काम करत असताना त्या वेळामध्ये ध्यान करता कामा नये, कारण त्यामुळे कर्मामधून लक्ष निघून जाईल, परंतु ज्याच्याप्रत तुम्ही ते कर्म अर्पण करणार आहात त्या ‘एकमेवाद्वितीया’चे स्मरण तुमच्यामध्ये कायम असले पाहिजे. ही केवळ एक पहिली प्रक्रिया आहे; कारण, पृष्ठवर्ती मन कर्म करत असताना, ‘ईश्वरी उपस्थिती’च्या संवेदनेवर तुमच्या अंतरंगातील शांत अस्तित्व एकाग्र असल्याची सातत्यपूर्ण जाणीव जर तुम्हाला असू शकेल, किंवा ‘श्रीमाताजीं’ची शक्तीच कार्य करत आहे आणि तुम्ही केवळ एक माध्यम आहात किंवा एक साधन आहात अशी जाणीव जर तुम्हाला नेहमीच होऊ लागली तर मग, ईश-स्मरणाच्या जागी, ‘योगसाक्षात्कार’ स्वतःहूनच नित्य घडू लागेल तसेच कर्म करत असताना ईश्वराशी ऐक्य होण्यास सुरुवात होईल.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 258-259), (CWSA 32 : 247)

साधनेची मुळाक्षरे – ११

श्रीअरविंद आपल्याला हे सांगण्यासाठी आले आहेत की, ‘सत्या’चा शोध घेण्यासाठी ही पृथ्वी सोडून जाण्याची आवश्यकता नाही; आपला आत्मा शोधण्यासाठी व्यक्तीने जीवनाचा त्याग करण्याची आवश्यकता नाही; ‘ईश्वरा’शी संबंध प्रस्थापित करण्यासाठी व्यक्तीने हे जग सोडून जाण्याची किंवा तेवढ्यापुरताच मर्यादित विश्वास बाळगण्याची आवश्यकता नाही. ‘ईश्वर’ सर्वत्र आहे, सर्व वस्तुमात्रांमध्ये विद्यमान आहे, आणि तो जर गुप्त असेलच तर… त्याचे कारण आपण ‘त्या’ ला शोधण्याचे कष्टच घेत नाही.

आपण केवळ एका प्रामाणिक अभीप्सेद्वारे, आपल्या आतमध्ये असलेला कुलूपबंद दरवाजा उघडू शकतो… ती अशी एक गोष्ट असेल की जी जीवनाचा संपूर्ण अर्थच बदलून टाकेल; आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर ती असेल; ती गोष्ट आपल्या सर्व समस्या सोडवेल आणि आपल्याही नकळतपणे आपण ज्याची अभीप्सा बाळगतो त्या परिपूर्णत्वाप्रत ती आपल्याला घेऊन जाईल; ती गोष्ट आपल्याला अशा एका ‘सत्यत्वा’प्रत घेऊन जाईल की जे सत्यत्वच केवळ आपले समाधान करू शकते आणि आपल्याला चिरस्थायी असा आनंद, संतुलन, सामर्थ्य आणि जीवन प्रदान करते.

…..याचा आरंभबिंदू कोणता? तर त्यासाठी, आपल्याला ती गोष्ट मिळावी अशी इच्छा निर्माण झाली पाहिजे, ती आपल्याला खरोखर हवी असली पाहिजे, आपल्याला तिची निकड भासली पाहिजे. दुसरी पायरी म्हणजे अन्य कोणत्याही गोष्टीचा नाही तर, केवळ त्याच गोष्टीचा विचार केला पाहिजे. एक दिवस असा येतो, अगदी जलदगतीने येतो, जेव्हा व्यक्ती अन्य कोणताच विचार करू शकत नाही.

ही एकच महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग नंतर…

मग व्यक्ती तिच्या अभीप्सेची स्पष्ट शब्दांत मांडणी करते, तिच्या अंतःकरणातून, ज्यामधून त्या निकडीची प्रामाणिकता अभिव्यक्त होईल अशी खरीखुरी प्रार्थना उदयाला येते, आणि मग… मग काय घडून येते ते व्यक्तीला दिसेलच.

काहीतरी घडून येईल. नक्कीच काहीतरी घडेल. प्रत्येक व्यक्तीसाठी ती वेगळेच रूप धारण करेल.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 374-375)

साधनेची मुळाक्षरे – १०

चैत्य रूपांतरणामध्ये तीन मुख्य घटक असतात.

१) निगूढ अशा आंतरिक मन, आंतरिक प्राण आणि आंतरिक शरीराच्या खुलेपणामुळे, पृष्ठवर्ती मन, प्राण आणि शरीर यांच्या पाठीमागे असलेल्या साऱ्याची व्यक्तीला जाणीव होते.

२) चैत्य पुरुषाचे किंवा आत्म्याचे खुलेपण, ज्यामुळे ते पुढे येऊन मन, प्राण आणि शरीर यांचे अनुशासन करतात आणि त्या सर्वांना ‘ईश्वरा’कडे वळवितात.

३) समग्र कनिष्ठ अस्तित्वाचे आध्यात्मिक सत्याप्रत खुले होणे – या अंतिम गोष्टीला परिवर्तनाचा आंतर-आध्यात्मिक भाग (the psycho-spiritual part) असे म्हणता येईल.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 332)

साधनेची मुळाक्षरे – ०९

‘चैत्यीकरण’ (Psychisation) म्हणजे कनिष्ठ प्रकृतीचे परिवर्तन, मनामध्ये योग्य दृष्टी आणणे, प्राणामध्ये योग्य आवेग आणि भावना आणणे, शरीरामध्ये योग्य हालचाली व सवयी आणणे. तसेच या साऱ्या गोष्टी एका ‘ईश्वरा’कडेच वळविणे; या साऱ्या गोष्टी प्रेम, भक्ती यांवर आधारित असणे आणि अंतिमतः ‘श्रीमाताजीं’ची जाणीव व दृष्टी सर्वांमध्ये, सर्वत्र तसेच हृदयामध्ये अनुभवास येणे, त्यांचीच शक्ती आपल्या अस्तित्वामध्ये कार्यकारी आहे इ. जाणवणे, तसेच भक्ती, आत्मनिवेदन आणि समर्पण असणे म्हणजे ‘चैत्यीकरण’

शांती, प्रकाश, ज्ञान, शक्ती आणि आनंद यांचे वरून अवतरण होणे, आत्म्याची आणि ‘ईश्वरा’ची जाणीव होणे आणि उच्चतर वैश्विक चेतना आणि तिच्याप्रत समग्र चेतनेचे परिवर्तन होणे म्हणजे ‘आध्यात्मिक परिवर्तन’ (The spiritual change) होय.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 380)