Tag Archive for: साधना

साधक : आध्यात्मिक मार्ग अनुसरण्यासाठी एखाद्या व्यक्तीची तयारी झाली आहे का, हे ओळखण्याच्या काही खुणा आहेत का? विशेषेकरून, जेव्हा त्या व्यक्तीला आध्यात्मिक गुरु लाभलेला नसतो तेव्हा?

श्रीमाताजी : हो, सर्वात महत्त्वाची खूण म्हणजे, कोणत्याही परिस्थितीमध्ये जीवाची पूर्ण समता. ही शांत, स्थिर, महान शक्तीची एक प्रकारची भावना असते; आणि हा अगदी निरपवादपणे अटळ असा पाया आहे; हा शांतपणा म्हणजे जडत्वातून आलेला शांतपणा नसतो तर, एकाग्र शक्तीमुळे येणारी ती शांतीची संवेदना असते; ती तुम्हाला कायम स्थिर राहायला मदत करते. परिस्थिती कोणती का असेना, अगदी तुमच्या आयुष्यातील सर्वात भयंकर अशी परिस्थिती असली तरी, त्यावेळी देखील ती तुम्हाला अगदी स्थिर ठेवते. ही पहिली खूण आहे.

दुसरी खूण म्हणजे तुमच्या सामान्य, साधारण अशा चेतनेमध्ये तुम्ही पूर्णत: बंदिवान झालेला आहात; प्रचंड कठीण, काहीतरी गुदमरवून टाकणारे, दुःसह, अशा कशामध्ये तरी तुम्ही बंदिवान झाला आहात असे तुम्हाला वाटते; जणू काही एखादी अभेद्य भिंत तुम्हाला पाडायची आहे, असे तुम्हाला वाटते. आणि त्या यातना असह्य होतात, त्या घुसमटवणाऱ्या असतात. त्या यातना भेदून पलीकडे जाण्याचे आंतरिक प्रयत्न चालू असतात पण त्या भेदणे तुम्हाला जमत शक्य होत नाही. ही सुद्धा सुरुवातीच्या काही खुणांपैकी एक खूण आहे. याचा अर्थ असा की, तुमची आंतरिक चेतना अशा एका बिंदूपाशी येऊन पोहोचलेली असते की, आता तिचा बाह्य साचा हा तिच्यासाठी खूपच तोकडा पडू लागतो. सामान्य जीवन, सामान्य उद्योग, सामान्य नाती, या साऱ्या साऱ्या गोष्टी इतक्या लहान, इतक्या किरकोळ वाटू लागतात की, त्या तोडून टाकण्यासाठी आवश्यक असणारी एक शक्ती तुम्हाला तुमच्या आतूनच जाणवू लागते.

अजून एक खूण आहे, ती अशी की, तुमच्यामध्ये एक आस असते, आणि जेव्हा तुम्ही एकाग्र होता, तेव्हा तुम्हाला वरून काहीतरी खाली अवतरित होत आहे, तुम्हाला काही प्रतिसाद मिळत आहे असे जाणवते. एक प्रकाश, एक शांती, एक शक्ती तुमच्यामध्ये अवतरित होत आहे असे तुम्हाला जाणवते आणि तीही अगदी त्वरित – तुम्हाला त्यासाठी खूप वेळ घालवावा लागत नाही किंवा वाट पाहावी लागत नाही – आतून एक अभीप्सा उदित होते, एक हाक येते आणि लगेचच त्याला प्रतिसाद मिळतो. यावरूनही हे लक्षात येते की, (तुमचे ईश्वराबरोबरचे) ‘नाते’ चांगल्या रीतीने प्रस्थापित झाले आहे.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 97-98)

तुम्ही जेव्हा योगमार्गाकडे वळता तेव्हा, तुमच्या सर्व मानसिक रचना आणि तुमचे सर्व प्राणिक मनोरे कोलमडून पडले तरी चालतील अशी स्वत:ची तयारी ठेवली पाहिजे. तुमच्या श्रद्धेखेरीज तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीचा आधार नाही अशा निराधार अवस्थेत हवेत लोंबकळत राहण्याची तुमची तयारी असली पाहिजे. तुम्ही तुमचा भूतकालीन ‘स्व’ आणि त्याला चिकटून असलेले सर्व काही पूर्णांशाने विसरले पाहिजे, तुमच्या चेतनेमधून त्या गोष्टी तुम्ही बाहेर काढून टाकल्या पाहिजेत आणि सर्व प्रकारच्या बंधनांपासून मुक्त अशा स्थितीत नव्याने जन्माला आले पाहिजे.

तुम्ही काय होतात याचा विचार करू नका, तर तुम्ही काय बनण्याची इच्छा बाळगता त्याचाच विचार करा; तुम्ही जे प्रत्यक्षात अनुभवू इच्छित आहात त्या विचारांमध्येच तुम्ही असले पाहिजे. तुमच्या मृत भूतकाळाकडे पाठ फिरवा आणि थेट भविष्याकडे पाहा. ‘ईश्वर’ हाच तुमचा धर्म, ईश्वर हाच तुमचा देश, ईश्वर हेच तुमचे कुटुंब.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 83-84)

धम्मपद : गौतम बुद्धांचे शिष्य हे दक्ष आणि खरोखरच जागृत असतात; रात्रंदिवस ते ध्यानाचा आनंद घेत असतात.

…जो मनुष्य एकांतात अन्नग्रहण करतो, एकांतात निद्रा घेतो, स्वत:च्या आत्म-प्रभुत्वाची वाटचाल अथकपणे एकाकी रीतीने करतो, त्याला अरण्यातील एकांतवासाच्या जीवनाचा आनंद गवसतो.

श्रीमाताजी : बरेचदा असे आढळते की, जे लोक अरण्यामध्ये एकटेच राहतात त्यांची आजूबाजूच्या प्राण्यांशी, झाडांशी मैत्री होते. पण असे एकटे राहण्यानेच, आंतरिक ध्यानामध्ये प्रविष्ट होण्याची वा ‘परमसत्या’शी योगयुक्त होऊन राहण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होते असे मात्र अजिबात नाही. जेव्हा तुम्हाला करण्यासारखे इतर काहीच नसते, अशा परिस्थितीमध्ये कदाचित ते सोपे असेलही पण मला ते काही तितकेसे पटत नाही. कारण माणूस कोणत्याही परिस्थितीत असला तरी काही ना काही उद्योग शोधून काढतो. मला माझ्या जीवनाच्या अनुभवावरून असे वाटते की, सर्व अडीअडचणींच्या धुमश्चक्रीत असतानासुद्धा जी व्यक्ती स्वत:च्या वृत्तीप्रवृत्तींचे दमन करण्यात यशस्वी होते, जी बाह्य परिस्थिती ‘ईश्वरीकृपे’द्वारे आपल्याला बहाल केलेली असते ती तशीच असतानादेखील, जी व्यक्ती आपल्या अंतरंगातील चिरंतन ‘उपस्थिती’सोबत एकांतात राहण्यात यशस्वी होते, अशा वेळी त्या व्यक्तीला जो साक्षात्कार होतो तो अनंतपटीने अधिक खराखुरा, अधिक सखोल व अधिक चिरस्थायी असतो.

अडीअडचणींपासून पलायन करणे हा काही त्यांच्यावर विजय प्राप्त करण्याचा उपाय होऊ शकत नाही. तो नक्कीच आकर्षक आहे. जे लोक आध्यात्मिक जीवन जगू इच्छितात त्यांच्यामध्ये अशी एक मानसिकता असते; ती म्हणते, “झाडाखाली अगदी एकांतात बसणे, ध्यानमग्न होऊन राहणे, बोलण्याची वा कृतीची कोणतीही उर्मी नसणे, हे किती रम्य असेल.” हे असे वाटते कारण त्या दिशेने विचारांची ठाम बैठक तयार झालेली असते पण ती फारच भ्रामक असते.

जे ध्यान अनिवार्य असल्याप्रमाणे एकाएकी तुमचा ताबा घेते, ते ध्यान सर्वोत्तम असते. तुम्हाला कोणता पर्यायच नसतो. एकाग्र होणे, ध्यान लागणे आणि वरकरणी दिसणाऱ्या रूपांच्या पलीकडे जाऊन पाहणे याशिवाय दुसरा कोणता पर्यायच तुमच्यापाशी नसतो. आणि तुम्ही अरण्यात एकांतवासात असताना (ध्यानाकडून) तुमचा असा ताबा घेतला जाईल हे काही अपरिहार्य नसते. जेव्हा तुमच्यातील काहीतरी सज्ज झालेले असते, जेव्हा ती वेळ आलेली असते, जेव्हा तेथे खरी आस लागलेली असते आणि जेव्हा ‘ईश्वरी कृपा’ तुमच्या सोबत असते, तेव्हा हे घडून येते.

मला वाटते की, मानवतेने प्रगतीचा काहीएक टप्पा गाठलेला आहे आणि आता जीवनामध्ये राहूनच खराखुरा विजय प्राप्त करून घेतला पाहिजे.

कोणत्याही प्रकारच्या बाह्य परिस्थितीत असतानादेखील, त्या ‘चिरंतन’, ‘अनंत’ अस्तित्वासोबत एकांतात कसे राहायचे हे तुम्हाला समजले पाहिजे. सर्व व्यवहार करीत असतानादेखील, त्यापासून मुक्त होऊन, त्या ‘परमेश्वराला’ आपला सांगाती बनवून कसे राहायचे हे तुम्हाला समजले पाहिजे. हाच ‘खरा विजय’ होय.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 276)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

साधक : एखाद्या प्रौढ व्यक्तीप्रमाणे लहान बालकदेखील त्याच्या आंतरिक सत्याविषयी सजग होऊ शकते का?

श्रीमाताजी : लहान मुलामध्ये ही जाणीव अगदी सुस्पष्ट असते, कारण सत्य हे त्यांना कोणत्याही विचारांच्या वा शब्दांच्या गुंतागुंतीविना थेट संवेदित होते – हे तेच असते ज्यामुळे त्याला अगदी स्वस्थ वाटते किंवा ज्यामुळे त्याला अस्वस्थ वाटते. आणि हे सगळे प्रौढ माणसांपेक्षा लहान मुलामध्ये अधिक सुस्पष्ट असते कारण प्रौढ व्यक्तीमध्ये या आंतरिक सत्याविषयीची संवेदना मनाच्या कार्यामुळे झाकोळली जाते. मुलांमध्ये एक छोटेसे सत्य दडलेले असते ते म्हणजे त्यांच्या अंतरात्म्यामध्ये (psychic) असणारी दिव्यत्वाची ‘उपस्थिती’. वनस्पती व प्राण्यांमध्येदेखील हे अस्तित्व असते. वनस्पतींमध्ये हे अस्तित्व जागृत नसते, प्राण्यांमध्ये ते जागृत व्हायला सुरुवात झालेली असते आणि लहान मुलांमध्ये ते खूपच जागृत असते. मला अशी मुले माहीत आहेत की, जी त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षीपेक्षा आणि चौदाव्या वर्षी पंचविसाव्या वर्षापेक्षा या आंतरात्मिक अस्तित्वाविषयी, चैत्यपुरुषाविषयी (Psychic being) अधिक जागृत होती. आणि आश्चर्य म्हणजे, ज्या क्षणापासून ती शाळेत जायला सुरुवात करतात, जेथे अस्तित्वाच्या बौद्धिक भागाकडे त्यांचे लक्ष वेधून घेईल असे गहन मानसिक शिक्षण ती घेऊ लागतात, तेव्हापासून या चैत्य पुरुषाबरोबरचा असलेला त्यांचा संपर्क बहुधा ती नेहमीच व जवळजवळ पूर्णपणे हरवून बसतात. तुम्ही जर अनुभवी निरीक्षक असाल, तर तुम्ही व्यक्तीच्या डोळ्यांत पाहूनच त्या व्यक्तीच्या अंतरंगामध्ये काय चालू आहे याविषयी सांगू शकाल…

डोळे हा आत्म्याचा आरसा असतो असे म्हटले जाते. पण जर डोळ्यांमधून अंतरात्मा अभिव्यक्त होत नसेल, तर त्याचे कारण असे असते की, तो खूप मागे गेलेला असतो, बऱ्याच गोष्टींनी झाकला गेलेला असतो. काळजीपूर्वकपणे लहान मुलांच्या डोळ्यांत पाहा, तुम्हाला त्यांच्या डोळ्यांत एक प्रकारचा प्रकाश दिसेल – काही जण त्याला निरागसता असे म्हणतात – लहान मुले इतकी खरी असतात, ती जगाकडे कुतूहलाने टुकूटुकू पाहत असतात. हा कुतूहलाचा भाव चैत्यपुरुषाचा असतो, तो सत्य पाहत असतो पण त्याला या जगाविषयी फारशी काही माहिती नसते; कारण तो त्याच्यापासून फार दूर असतो. लहान मुलांमध्ये हे सारे असते पण जसजशी ती अधिकाधिक शिकत जातात, अधिकाधिक बुद्धिमान, अधिक शिक्षित होतात, तसतसे हे सारे पुसले जाते; आणि मग तुम्हाला त्यांच्या डोळ्यांमध्ये विचार, इच्छा, आवेग, दुष्टपणा – सारे काही दिसू लागते पण ती छोटीशी ज्योत, अत्यंत पवित्र, शुद्ध अशी ज्योत मात्र हरवलेली असते. तेव्हा तुम्ही खात्रीने सांगू शकता की, तेथे मनाचा प्रवेश झाला आहे आणि अंतरात्मा दूर, खूप दूरवर निघून गेलेला आहे.

ज्याचा मेंदू अजून पुरेसा विकसित झालेला नाही अशा मुलाकडे तुम्ही संरक्षणाचे किंवा प्रेमाचे, किंवा तळमळीचे किंवा सांत्वनाचे स्पंदन संक्रमित केलेत तर ते त्याला प्रतिसाद देते, असे तुम्हाला आढळेल. पण जर तुम्ही एखाद्या शाळेत जाणाऱ्या चौदा वर्षाच्या मुलाचे उदाहरण घेतलेत की, ज्याचे आईवडील सामान्य आहेत आणि ज्यांनी त्याला सामान्य पद्धतीने वाढविले आहे, अशा मुलाबाबत त्याचे मन हे खूपच वर, पृष्ठस्तरावर आलेले आढळते; काहीतरी कठीण असे त्याच्या ठिकाणी असते, अंतरात्मा खूप दूर निघून गेलेला असतो. अशी मुले त्या कोणत्याच स्पंदनांना प्रतिसाद देत नाहीत. जणू काही ती प्लास्टर वा लाकडी ओंडक्याची बनलेली असावीत.

– श्रीमाताजी [CWM 04 : 26-27]

जागरुकता (Vigilance) म्हणजे नित्य जागृत असणे, दक्ष असणे, ‘प्रामाणिक’ असणे – तुम्हाला कोणत्याच गोष्टीने आश्चर्याचा धक्का बसता कामा नये. जेव्हा तुम्हाला साधना करायची असते, तेव्हा तुमच्या जीवनात प्रत्येक क्षणाला तुम्हाला निवड करायची असते – ध्येयाप्रत जाणाऱ्या मार्गावर पाऊल टाकायचे की, गाढ झोपी जायचे, किंवा “आत्ताच नको, नंतर पाहू” असे म्हणत, मार्गात मध्येच बसून राहायचे, यांपैकी एकाची प्रत्येक क्षणी निवड करायची असते. तुम्हाला खाली खेचणाऱ्या गोष्टींना प्रतिकार करायचा एवढाच जागरूकतेचा अर्थ नाही; तर एखाद्या दुर्बलतेवर मात करण्याची संधी, प्रलोभनाला बळी पडण्यापासून रोखण्याची संधी, काहीतरी नवीन शिकण्याची संधी, एखाद्या गोष्टीमध्ये सुधारणा करण्याची संधी, कशावर तरी प्रभुत्व मिळविण्याची संधी यांपैकी कोणतीच संधी गमावू द्यायची नाही, म्हणजेच, प्रगतीकडे घेऊन जाणारी एकही संधी गमावू नये यासाठी जागरुक राहायचे हा सुद्धा त्याचा अर्थ आहे. एरवी तुम्हाला जी गोष्ट करायला काही वर्षे लागली असती तीच गोष्ट, तुम्ही जर जागरुक असाल तर, काही दिवसांतच साध्य करून घेऊ शकता. तुम्ही जर जागरूक असाल, दक्ष असाल तर, तुमच्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीला, प्रत्येक कृतीला, प्रत्येक गतिविधींना, तुम्ही तुमच्या ध्येयाच्या निकट जाण्याचे निमित्त बनविता.

– श्रीमाताजी [CWM 03 : 202-203]

तुम्ही जर योगसाधना करत असाल तर, तुम्ही दुर्बलता, नीचता, इच्छाशक्तीचा अभाव या गोष्टींना अनुमती देता कामा नये. कारण तसे करणे याचा अर्थ ‘ज्ञान झाले पण त्यापाठोपाठ सक्षमता आली नाही’ असा होतो. एखादी गोष्ट असता कामा नये याची जाणीव होणे आणि तरीदेखील ती तशीच चालू ठेवणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे; अशा दुर्बलतेस कोणत्याही गंभीर तपस्येमध्ये थारा दिला जात नाही. अशा संकल्पशक्तीचा अभाव हा व्यक्तीला अप्रामाणिकतेच्या उंबरठ्यावर आणून सोडतो. तुम्हाला कळते की अमुक एक गोष्ट असता कामा नये, तुम्हाला हे ज्या क्षणी कळते, तेव्हा ती गोष्ट शिल्लक राहता कामा नये, हे ठरविणारे तुम्हीच असता. कारण ज्ञान आणि क्षमता, शक्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

म्हणजे असे म्हणता येईल, तुमच्या अस्तित्वाच्या कोणत्याही भागात तुम्ही तुमच्या प्रगतीच्या मध्यवर्ती संकल्पशक्तीला विरोधी असणाऱ्या, वाईट इच्छेच्या छायेला थारा देता कामा नये; कारण तसे केल्याने ज्या अनिष्टाचा तुम्ही नायनाट केला पाहिजे त्याच अनिष्टासमोर तुम्ही पौरुषहीन, दुबळे, धैर्यहीन आणि सामर्थ्यहीन ठरता. अज्ञानातून घडलेले पाप हे पाप नसते; तो या जगतातील सर्वसाधारण अशा अनिष्टाचा एक भाग असतो; पण (अमुक एखादी गोष्ट करणे योग्य नाही हे) माहीत असूनदेखील, तुम्ही जेव्हा पाप करता तेव्हा ते अधिक गंभीर असते.

याचा अर्थ असा की, फळामध्ये ज्याप्रमाणे एखादी अळी दडून बसलेली असते तसा दुरिच्छेचा एखादा घटक तुमच्यामध्ये दडून बसलेला आहे, कसेही करून, त्याला शोधून नष्टच केले पाहिजे, कारण बरेचदा अशा वेळी चालवून दिलेली दुर्बलता ही पुढे जाऊन, कधीच सुधारता न येणाऱ्या अडचणींचे कारण ठरते.

– श्रीमाताजी (CWM 03 : 221)

(साधकाने कोणती वृत्ती बाळगावी याचे श्रीरामकृष्ण परमहंस यांनी दोन मार्ग सांगितले आहेत. पहिला मार्ग हा माकडाच्या पिल्लाचा आहे. हा मार्ग वैयक्तिक प्रयत्नांवर आधारित आहे. तर दुसरा मार्ग हा मांजराच्या पिल्लाचा मार्ग. हा समर्पणाचा मार्ग आहे. त्याचा संदर्भ येथे देण्यात आला आहे.)

‘मांजराच्या पिल्लाच्या वृत्तीचे अनुकरण करा,’ हे सांगणे खूप सोपे आहे परंतु ते प्रत्यक्ष कृतीत उतरवणे हे तितकेसे सोपे नाही, हे लक्षात घ्या. एकदा का मांजराच्या पिल्लाची वृत्ती धारण केली की मग कोणतेही व्यक्तिगत प्रयत्न करायला नकोत, असे तुम्ही समजता कामा नये. कारण मनुष्य हा काही मांजरीचे पिल्लू असू शकत नाही. तुमच्यामध्ये असे अगणित घटक असतात की, ज्यांना फक्त स्वतःवरच विश्वास ठेवण्याची सवय झालेली असते, त्यांना त्यांचे स्वतःचे काम करायचे असते. (मांजराच्या पिल्लाप्रमाणे) स्वतःला सर्व परिस्थितीमध्ये ‘ईश्वरा’वर सोपवून देण्याहून अधिक अवघड असते ते याच घटकांवर नियंत्रण ठेवणे! ते खूपच अवघड असते.

मानवी मनाचे अद्भुत कार्य नेहमीच चालू असते; या मनाला निरीक्षण करणे, टिका करणे, विश्लेषण करणे, शंका उपस्थित करणे, समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे, उदाहरणार्थ “हे असे केले तर बरे होईल का?” “तसे केले तर अधिक बरे होईल ना?” इ. इ. गोष्टी खूप आवडत असतात. आणि मग हे असे चालूच राहते, अशावेळी मग तो मांजराच्या पिल्लाचा दृष्टिकोन कुठे जातो? परंतु मांजराचे पिल्लू मात्र विचार करत बसत नाही. ते विचारादी गोष्टींपासून मुक्त असते आणि त्यामुळे त्याला तसे वागणे खूप सोपे असते.

तुम्ही कोणताही मार्ग अनुसरा, परंतु जोपर्यंत तुम्ही ‘ईश्वरा’शी तादात्म्य पावत नाही तोपर्यंत व्यक्तिगत प्रयत्नांची आवश्यकता असतेच असते. त्या तादात्म्याच्या क्षणी मात्र, जीर्ण वस्त्रं गळून पडावीत त्याप्रमाणे सारे प्रयास गळून पडतात, तुम्ही जणू काही एक वेगळीच व्यक्ती बनता. एकेकाळी जे तुम्हाला अशक्यप्राय वाटत असे, ते आता तुम्हाला शक्य होते आणि ते केवळ शक्यच होते असे नाही, तर ते तुमच्यासाठी अपरिहार्य बनते, कारण तुम्ही त्याविना इतर काही करूच शकत नाही. तुम्ही सतर्क, शांत राहिले पाहिजे, आणि आंतरिक प्रेरणेची प्रतीक्षा केली पाहिजे; बाह्य प्रतिक्रियांमधून तुम्ही कोणतीही कृती करता कामा नये; सातत्याने, नियमितपणे, ‘वरून येणाऱ्या’ प्रकाशाद्वारेच तुमचे संचालन झाले पाहिजे. इतर कोणत्याही प्रेरणेने कृती न करता, तुम्ही केवळ त्याच प्रकाशाच्या प्रेरणेने प्रेरित होऊन कृती केली पाहिजे. विचार करायचा नाही, प्रश्न उपस्थित करायचे नाहीत, “मी हे करू की ते करू ?” असे विचारायचे नाही, तर केवळ जाणून घ्यायचे, पाहायचे आणि ऐकायचे. कोणताही प्रतिप्रश्न न करता, कोणतीही शंका उपस्थित न करता, तुम्ही आंतरिक विश्वासाने कृती केली पाहिजे कारण, आता तो निर्णय हा तुमच्याकडून आलेला नसतो, तर तो ‘वरून आलेला’ असतो. ही गोष्ट एखाद्याच्या बाबतीत लवकर घडेल किंवा दुसऱ्या एखाद्याला मात्र यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागेल – ते त्या त्या व्यक्तीच्या पूर्वतयारीवर, तसेच इतर बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते. तोपर्यंत तुम्ही आस बाळगली पाहिजे आणि ती आस चिकाटीने बाळगली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही धीर सोडता कामा नये किंवा धैर्य खचू देता कामा नये. कदाचित हजाराव्या वेळी तुम्हाला परिणाम झालेला आढळून येईल हे जाणून, गरज पडली तर एकच गोष्ट हजार वेळादेखील पुन्हा पुन्हा केली पाहिजे.

– श्रीमाताजी [CWM 04 : 94-95]

‘योगा’चे दोन मार्ग आहेत, एक मार्ग तपस्येचा आणि दुसरा मार्ग समर्पणाचा. तपस्येचा मार्ग खडतर असतो. तेथे तुम्ही पूर्णत: स्वत:वर अवलंबून असता, तुम्ही तुमच्या स्वतःच्या ताकदीनिशी सुरुवात करता. तेथे तुम्ही जे उन्नत होता, जे काही साध्य करून घेता, ते सारे तुमच्या शक्तीच्या प्रमाणात असते. पण तेथे नेहमीच पतन होण्याचा धोका असतो. आणि एकदा का तुमचे पतन झाले तर, तुम्ही खोलवर दरीतच फेकले जाता, तुमच्या चिंधड्या होतात आणि मग त्यावर कोणताच उपाय नसतो.

दुसरा मार्ग ‘समर्पणाचा’, हा सुरक्षित आणि खात्रीचा मार्ग आहे. पण या मार्गाबाबत पाश्चात्त्य लोकांना अडचण जाणवते. त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याला बाधा येईल अशा कोणत्याही गोष्टीला घाबरायला आणि त्या टाळायला त्यांना शिकविण्यात आलेले असते. जणू त्यांच्या आईच्या दुधातूनच त्यांना व्यक्तिस्वातंत्र्याची जाणीव पाजण्यात आलेली असते. आणि समर्पणात तर हे सर्व काही सोडून देणे अभिप्रेत असते.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, रामकृष्ण (परमहंस) म्हणतात त्याप्रमाणे, तुम्ही एकतर ‘माकडाच्या पिल्लाचा’, अन्यथा, ‘मांजराच्या पिल्लाचा’ मार्ग अवलंबू शकता. माकडिणीचे पिल्लू आईने आपल्याला बरोबर घेऊन जावे यासाठी तिला पकडून ठेवते, त्याने तिला घट्ट पकडलेच पाहिजे; नाहीतर त्याची पकड ढिली होऊन ते खाली पडेल. दुसऱ्या बाजूला, मांजराचे पिल्लू! ते त्याच्या आईला धरून ठेवत नाही, तर त्याच्या आईनेच त्याला पकडलेले असते; त्यामुळे त्याला कसलेच भय नसते किंवा त्याच्यावर कोणतीच जबाबदारी नसते; त्याला स्वत:ला काहीच करावे लागत नाही. आईने त्याला धरून ठेवावे म्हणून त्याने फक्त ‘मा’ ‘मा’ असा आकांत करायचा असतो.

तुम्ही जर हा समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे आचरणात आणलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर समस्या निर्माण होणार नाही. प्रश्न असतो फक्त प्रामाणिकपणाचा! तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर ‘योगसाधने’ला प्रारंभच करू नका. मानवी व्यवहार करत असताना तुम्ही फसवणूक केलीत तर त्यात यशस्वी होण्याची थोडीफार शक्यता असू शकते पण ‘ईश्वरा’सोबत वागत असताना मात्र फसवणुकीला यत्किंचितही थारा असू शकत नाही.

तुम्ही विनम्र असाल आणि तुमचा गाभा खुला असेल आणि जर तुमचे साध्य ‘ईश्वरा’चा साक्षात्कार आणि त्याची प्राप्ती हेच असेल आणि तोच तुमचा ‘चालविता धनी’ व्हावा हे जर तुमचे साध्य असेल तर तुम्ही या मार्गावरून सुरक्षितपणे वाटचाल करू शकता.

– श्रीमाताजी [CWM 03 : 04-05]

‘कर्म’ आणि ‘साधना’ यांमध्ये विरोध नसतो. योग्य वृत्तीने केलेले कर्म हीच स्वयमेव साधना असते. ध्यान हाच काही साधनेचा एकमेव मार्ग नाही. कर्म हाही एक मार्ग आहे; प्रेम, भक्ती आणि समर्पण हेही साधनेचे इतर मार्ग आहेत.

*

रूपांतरणाच्या प्रक्रियेत बाह्य चेतनेचा समावेश हा ‘पूर्णयोगा’मध्ये आत्यंतिक महत्त्वाचा असतो. ध्यानामुळे हे शक्य होत नाही. कारण ध्यानाचा संबंध हा केवळ आंतरिक अस्तित्वाशी असतो. त्यामुळे ‘कर्म’ हे येथे मूलभूत महत्त्वाचे ठरते. मात्र ते योग्य चेतनेमध्ये आणि योग्य वृत्तीने केले पाहिजे आणि तसे जर ते केले गेले तर, कोणत्याही ध्यानाने जो परिणाम साध्य होतो तोच परिणाम अशा कर्मानेही साध्य होतो.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 209, 221]

मी नेहमी उर्ध्व दिशेकडे पाहते. तेथे ‘सौंदर्य’, ‘शांती’, ‘प्रकाश’ आहेत, ते खाली येण्यासाठी सज्ज आहेत. ते या पृथ्वीतलावर आविष्कृत व्हावेत म्हणून नेहमी आस बाळगा आणि त्या दिशेने वर पाहा. खाली, या जगातील वाईट गोष्टींकडे पाहू नका. जेव्हा तुम्हाला उदास वाटते तेव्हा माझ्यासमवेत ऊर्ध्व दिशेकडे पाहा.

– श्रीमाताजी [CWM 13 : 68]