Tag Archive for: साधना

साधना, योग आणि रूपांतरण – ४५

सुरुवाती सुरुवातीला एकाग्रता करण्यासाठी, ध्यानाला बसण्यासाठी स्थिरता आणि शांतीपूर्ण अवस्था असणेच आवश्यक असते हे अगदी स्वाभाविक आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा अशी अवस्था असणे आणि ध्यान करण्याची तुम्हाला आवश्यकता वाटणे ही गोष्ट महत्त्वाची असते. परंतु अन्य वेळी मात्र त्याचा परिणाम म्हणून सुरुवातीला फक्त एक प्रकारची मानसिक अविचलता आणि विचारांपासून मुक्तता अनुभवास येईल.

कालांतराने शांतीपूर्ण अवस्था ही आंतरिक अस्तित्वामध्ये काहीशी स्थिर झालेली असते (कारण तुम्ही एकाग्रता करता तेव्हा आंतरिक अस्तित्वामध्येच प्रवेश करत असता,) तेव्हा मग ती शांतीपूर्ण अवस्था तिथून बाह्य व्यक्तित्वामध्ये येऊ लागते आणि बाह्य व्यक्तित्वाचे नियंत्रण करू लागते. आणि त्यामुळे तुम्ही काम करत असताना, इतरांबरोबर मिळूनमिसळून वागत असताना, बोलत असताना किंवा इतर व्यवहार करत असतानासुद्धा ती शांती आणि स्थिरता कायम राहते. कारण तेव्हा बाह्यवर्ती चेतना काहीही करत असली तरी आंतरिक अस्तित्व अंतरंगामध्ये स्थिरशांत असल्याचे व्यक्तीला जाणवते. खरोखर आपले आंतरिक अस्तित्व हेच आपले खरे अस्तित्व आहे आणि बाह्यवर्ती अस्तित्व हे काहीसे पृष्ठवर्ती, वरवरचे अस्तित्व आहे आणि त्याच्या माध्यमातून आंतरिक अस्तित्वच या जीवनामध्ये कार्य करत आहे असे व्यक्तीला जाणवते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 313)

साधना, योग आणि रूपांतरण – ४४

तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा, तुमच्या बाह्यवर्ती मनाची लुडबूड त्यामध्ये असता कामा नये. कशाची अपेक्षा नाही किंवा कशाचा आग्रहही नाही, असे तुम्ही एखाद्या निरागस बालकाप्रमाणे साधेसरळ आणि मनमोकळे असले पाहिजे. एकदा अशी अवस्था प्राप्त झाल्यावर, मग उर्वरित सारेकाही तुमच्या अंतरंगामध्ये खोलवर असणाऱ्या अभीप्सेवर अवलंबून असते. आणि तुम्ही जर ‘ईश्वरा’ला साद दिलीत तर तुम्हाला प्रतिसाद देखील मिळेल.

– श्रीमाताजी (CWM 14 : 52)

साधना, योग आणि रूपांतरण – ४३

साधक : ध्यानासाठी अत्यावश्यक अशी आंतरिक व बाह्य परिस्थिती कोणती?

श्रीअरविंद : मूलभूत अशी कोणतीही बाह्य परिस्थिती आवश्यक नसते, परंतु ध्यानाच्या वेळी एकांत व विलगपणा (solitude and seclusion ) असेल आणि त्याचबरोबर शरीराची स्थिरता असेल, तर ध्यानासाठी या गोष्टींची मदत होते. नवोदितांसाठी या गोष्टी बऱ्याचदा अगदी आवश्यक असतात.

परंतु बाह्य परिस्थितीमुळे तुम्ही बांधले गेले आहात असे होता कामा नये. एकदा ध्यानाची सवय झाली की मग, कोणत्याही परिस्थितीत म्हणजे, पहुडलेले असताना, उठता-बसता, चालताना, एकटे असताना किंवा इतर लोकांसमवेत असताना, शांततेमध्ये किंवा गोंगाटामध्ये, कोणत्याही परिस्थितीत ध्यान करता आले पाहिजे. मनाचे भरकटणे, विस्मरण, निद्रा, शारीरिक आणि नाडीगत अधीरता व अशांती या ध्यानाच्या आड येणाऱ्या साऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी ‘संकल्पाची एकाग्रता’ ही आंतरिक परिस्थिती सर्वप्रथम महत्त्वाची असते.

दुसरी आवश्यक परिस्थिती म्हणजे उत्तरोत्तर वाढणारे पावित्र्य आणि जेथून विचार आणि चित्त-वृत्तींचा उदय होतो, त्या आंतरिक चेतनेची (चित्ताची) स्थिरता. म्हणजे राग, दुःख, निराशा, ऐहिक घटनांविषयीची चिंता या साऱ्या अडथळा निर्माण करणाऱ्या प्रतिक्रियांपासून ‘चित्त’ मुक्त असले पाहिजे. नैतिक आणि मानसिक पूर्णत्व या दोन्ही गोष्टी एकमेकींशी घनिष्ठपणे जोडलेल्या असतात.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 295)

साधना, योग आणि रूपांतरण – ४२

तुम्ही दिव्य ‘शक्ती’प्रत स्वत:ला उन्मुख, खुले करण्यासाठी ध्यान करू शकता, (तुमच्यातील) सामान्य चेतनेचा त्याग करण्यासाठी म्हणूनही तुम्ही ध्यान करू शकता, तुमच्या अस्तित्वामध्ये अधिक खोलवर प्रवेश व्हावा म्हणून तुम्ही ध्यान करू शकता, स्वत:चे पूर्णतया आत्मदान कसे करावे हे शिकण्यासाठी म्हणून तुम्ही ध्यान करू शकता. या अशा सर्व प्रकारच्या गोष्टींसाठी तुम्ही ध्यान करू शकता. तुम्ही शांती, अचंचलता, निश्चल-नीरवता यांमध्ये प्रवेश व्हावा म्हणूनही ध्यान करू शकता. लोक बहुधा यासाठीच ध्यान करतात पण त्यात त्यांना यश मिळत नाही. रूपांतरणाची ‘शक्ती’ प्राप्त व्हावी म्हणूनदेखील तुम्ही ध्यान करू शकता, तुमच्यातील कोणत्या गोष्टींचे रूपांतर व्हायला हवे त्याचा शोध घेण्यासाठी तुम्ही ध्यान करू शकता, प्रगतीची दिशा ठरविण्यासाठी ध्यान करू शकता. अगदी व्यावहारिक कारणांसाठीदेखील तुम्ही ध्यान करू शकता. तुम्हाला एखादी अडचण दूर करायची आहे, त्यावर उपाय शोधायचा आहे, एखाद्या कृतीमध्ये किंवा तत्सम एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला मदतीची आवश्यकता आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ध्यान करू शकता.

– श्रीमाताजी (CWM 08 : 89)

साधना, योग आणि रूपांतरण – ४१

(ध्यानाची उद्दिष्टे काय असतात किंवा काय असावीत यासंबंधीचा विचार आपण येथे समजावून घेत आहोत. त्याचा हा उत्तरार्ध…)

‘योगा’मध्ये एकाग्रतेचा उपयोग अन्य उद्दिष्टासाठीदेखील केला जातो. उदा. आपल्या जाग्रत स्थितीपासून (waking state) म्हणजे चेतनेची जी सीमित आणि पृष्ठवर्ती अवस्था असते त्यापासून निवृत्त होऊन, आपल्या अस्तित्वाच्या अंतरंगामध्ये खोलवर जाण्यासाठीदेखील (‘समाधी’च्या विविध अवस्थांद्वारे ही खोली मोजली जाते) एकाग्रतेचा अवलंब केला जातो. या प्रक्रियेसाठी, विचारमालिकेवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा (ध्यानापेक्षा), कोणत्यातरी एकाच वस्तुवर, संकल्पनेवर किंवा नामावर लक्ष केंद्रित करणे (निदिध्यास) अधिक परिणामकारक असते.

असे असले तरी, ध्यानामुळे ‘पूर्णयोगां’तर्गत अभिप्रेत असलेल्या समाधीची पूर्वतयारी होते. असे ध्यान आपले आपल्या अस्तित्वाच्या खोलवर असणाऱ्या अवस्थांशी अप्रत्यक्षपणे पण जाग्रत सायुज्य (communion) निर्माण करते. काहीही असले तरी, जो विचार ‘पुरुषा’च्या नियंत्रणाखाली (सांख्य तत्त्वज्ञानातील पुरुष) आणला गेला आहे अशा रचनात्मक विचाराची तेजस्वी कृती हा ध्यानाचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग असतो. त्याद्वारे उर्वरित सर्व चेतना नियंत्रित केली जाते, ती उच्चतर आणि विशालतर संकल्पनांनी परिपोषित केली जाते आणि त्या संकल्पनांच्या साच्यामध्ये चेतनेचे त्वरेने परिवर्तन केले जाते आणि अशा प्रकारे चेतना पूर्णत्वाला नेली जाते.

ध्यानाचे इतर आणि महत्तर उपयोग याच्याही पलीकडचे असतात पण ते आत्मविकसनाच्या पुढील टप्प्यांशी संबंधित असतात. ‘भक्तियोगा’मध्ये, या दोन्ही प्रक्रिया (ध्यान आणि निदिध्यासन) समग्र अस्तित्व एकाग्र करण्यासाठी, समानतेने उपयोगात आणल्या जातात. किंवा भक्तीविषयाच्या (आराध्य देवतेच्या) चिंतनाने, त्याच्या रूपाने, त्याच्या सत्त्वाने, त्याच्या गुणवैशिष्ट्यांनी आणि त्याच्याबद्दलच्या भक्तिभावाच्या व ऐक्याच्या आनंदाने समग्र प्रकृती न्हाऊन निघावी यासाठी या दोन्ही प्रक्रिया समानतेने उपयोगात आणल्या जातात. तेव्हा विचार हा ‘दिव्य प्रेमा’चा सेवक, ‘कैवल्य-आनंदा’ची तयारी करून घेणारा असा घडविला जातो.

‘ज्ञानयोगा’मध्येदेखील ध्यानाचा उपयोग, वरकरणी दिसणारे रूप आणि सत्य यांमध्ये, तसेच आत्मा आणि त्याची विविध रूपे यांमध्ये सदसद्विवेक करण्यासाठी केला जातो. व्यक्तिगत चेतनेचा ‘ब्रह्मन्’मध्ये प्रवेश व्हावा आणि नंतर सायुज्य घडावे यासाठी एकाग्र निदिध्यासनाचा अवलंब केला जातो. ‘पूर्णयोगा’मध्ये या सर्वच उद्दिष्टांचा सुमेळ साधला जाईल.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 446-447)

साधना, योग आणि रूपांतरण – ४०

(ध्यानाची उद्दिष्टे काय असावीत यासंबंधीचा विचार आपण येथे समजावून घेत आहोत. त्याचा हा पूर्वार्ध…)

कधीकधी एखाद्या विशिष्ट विषयावर विचारांची एकाग्रतापूर्वक मालिका या स्वरूपात ‘ध्यान’ (meditation) करायला सांगितले जाते; तर कधीकधी एका विशिष्ट प्रतिमेवर, शब्दावर किंवा संकल्पनेवर मनाची अनन्य एकाग्रता स्थिर करण्यास सांगण्यात येते. येथे ‘ध्यान’ म्हणण्यापेक्षा स्थिर असे ‘निदिध्यासन’ (contemplation) अपेक्षित असते. उपरोक्त दोन पद्धतींव्यतिरिक्त, ध्यानाच्या अन्य पद्धतीही असतात. त्यामुळे या दोन किंवा अधिक पद्धतींमधील निवड ही आपण योगामध्ये आपल्यासमोर कोणते उद्दिष्ट ठेवतो यावर अवलंबून असते.

सद्यस्थितीत विचारी मन (thinking mind) हे आपल्या हाती असणारे असे एक साधन आहे की, ज्याच्या साहाय्याने आपण आपल्या आंतरिक अस्तित्वाचे सचेत रीतीने आत्म-व्यवस्थापन करू शकतो. परंतु बहुतांशी व्यक्तींमध्ये, विचार म्हणजे विविध संकल्पना, संवेदना आणि प्रभाव यांचा एक गोंधळलेला प्रवाह असतो….

ज्याप्रमाणे शरीराच्या कार्यप्रणालीवर व प्राणिक क्रियांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि स्वातंत्र्य प्राप्त करून घेण्यासाठी हठयोग्यांकडून स्थिर आसन व सुनियंत्रित श्वसनाच्या प्रक्रिया (प्राणायाम) उपयोगात आणल्या जातात, अगदी त्याचप्रमाणे मनाच्या कार्यप्रणालीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि स्वातंत्र्य प्राप्त करून घेण्यासाठी राजयोग्यांकडून ‘विचारांची एकाग्रता’ ही प्रक्रिया उपयोगात आणली जाते. ध्यानाद्वारे आपण आपल्या चंचल मनाला ताळ्यावर आणतो आणि त्याच्या सर्व ऊर्जांची बचत व्हावी आणि त्या ऊर्जा कोणत्यातरी ईप्सित ज्ञानाच्या प्राप्तीवर किंवा स्वयंशिस्तीवर केंद्रित करता याव्यात यासाठी आपण मनाला एखाद्या व्यायामपटूप्रमाणे प्रशिक्षण देतो. ही गोष्ट माणसं सहसा सामान्य जीवनामध्येही करत असतात परंतु ‘प्रकृती’च्या या उच्चतर कार्यप्रणालीला ‘योग’ आपल्या हाती घेतो आणि तो तिला तिच्या संपूर्ण शक्यतांपर्यंत घेऊन जातो. मन ज्योतिर्मय रीतीने एका विचारवस्तुवर केंद्रित केले असता, आपण सार्वत्रिक ‘चेतने’मधील प्रतिसादाला जाग आणू शकतो आणि त्याच्याद्वारे त्या वस्तुविषयीचे ज्ञान आपल्या मनात ओतले जाऊन, आपल्या मनाचे समाधान केले जाते; किंवा त्याच्याद्वारे, त्या वस्तुचे केंद्रवर्ती किंवा मूलभूत सत्यदेखील आपल्यापाशी उघड केले जाते, योग या तथ्याची दखल घेतो.

(ध्यानाद्वारे) आपण ईश्वरी ‘शक्ती’चा प्रतिसाददेखील जागृत करत असतो, आणि त्यामुळे आपण ज्याचे ध्यान करतो त्याच्या कार्यप्रणालीवर आपल्याला विविध मार्गांनी चढतेवाढते प्रभुत्व मिळविता येते किंवा आपण ज्याचे ध्यान करतो ती गोष्ट आपल्यामध्ये निर्माण करण्यास किंवा आपल्यामध्ये ती सक्रिय करण्यास तो ‘ईश्वरी’ शक्तीचा प्रतिसाद आपल्याला सक्षम बनवितो. (उदाहरणार्थ) अशा प्रकारे, ‘दिव्य प्रेमा’च्या संकल्पनेवर आपण मन केंद्रित केले तर आपल्याला त्याच्या तत्त्वाचे आणि त्याच्या कार्यप्रणालीचे ज्ञान होते, आपण त्याच्याशी सायुज्य पावू शकतो, ते ‘दिव्य प्रेम’ आपल्या स्वतःमध्ये विकसित करू शकतो आणि आपले हृदय व आपली इंद्रिये त्याच्या धर्माचे पालन करतील याकडे आपण लक्ष पुरवू शकतो. (क्रमश:)
– श्रीअरविंद (CWSA 13 : 445-446)

साधना, योग आणि रूपांतरण – ३९

(पूर्णयोगांतर्गत साक्षात्कारामध्ये, स्वत:मधील ईश्वराचे दर्शन, विश्वगत ईश्वराचे दर्शन, विश्वातीत ईश्वराचे दर्शन या तीन साक्षात्कारांचा समावेश होतो. त्यातील ‘विश्वगत ईश्वराचे दर्शन’ घेण्याचा मार्ग श्रीअरविंद येथे सांगत आहेत.
श्रीअरविंदलिखित Synthesis of Yoga या पुस्तकामधील एक उतारा आणि नंतर त्याचे श्रीअरविंदकृत स्पष्टीकरण)

…ही एकाग्रता ‘संकल्पने’वर आधारित असते. कारण या ‘संकल्पने’च्या माध्यमातून मनोमय पुरुष सर्व अभिव्यक्तीच्या अतीत उन्नत होतो; जे अभिव्यक्त झाले आहे त्याच्याप्रत तो उन्नत होतो; खुद्द ती संकल्पना ही ज्याचे केवळ एक साधन आहे अशा ‘सद्वस्तु’प्रत तो उन्नत होतो. ‘संकल्पने’वर एकाग्रता केल्याने, आपण आज जे आहोत ते आपले मानसिक अस्तित्व, आपल्या मानसिकतेच्या कक्षा ओलांडून खुले होते आणि त्या चेतनेच्या एका स्थितीप्रत, जिवाच्या एका स्थितीप्रत, सचेत-पुरुषाच्या शक्तीच्या स्थितीप्रत आणि सचेत-पुरुषाच्या परमानंदाप्रत येऊन पोहोचते. ती संकल्पना ज्याच्याशी संबंधित असते आणि ती संकल्पना ज्याचे प्रतीक असते, ज्याची गतिविधी आणि लय असते अशा सद्वस्तुप्रत ती येऊन पोहोचते.

*

(वरील उताऱ्याचे श्रीअरविंदकृत स्पष्टीकरण…)

येथे वेदान्ती ज्ञानाच्या पद्धतीचे उदाहरण घेता येईल. यामध्ये ‘ब्रह्म सर्वत्र उपस्थित आहे’ या संकल्पनेवर व्यक्ती लक्ष केंद्रित करते आणि झाडाकडे, आजूबाजूच्या वस्तुमात्रांकडे, त्यामध्ये ब्रह्माचा निवास आहे आणि ते झाड किंवा ती वस्तू केवळ एक रूप आहे, या संकल्पनेनिशी पाहते. जर ती एकाग्रता योग्य प्रकारची असेल तर कालांतराने, व्यक्तीला तेथे एका अस्तित्वाची, एका उपस्थितीची जाणीव होऊ लागते आणि तेव्हा मग समोर दिसणारे झाड हे जणू एखाद्या बाह्य आवरणासारखे दिसते आणि त्यामधील अस्तित्व किंवा उपस्थिती हीच एकमेव वस्तुस्थिती असल्याचे व्यक्तीला जाणवू लागते. कालांतराने मग संकल्पना गळून पडते, आणि त्याची जागा त्या वस्तुच्या थेट दर्शनाने घेतली जाते. आता मग संकल्पनेवर लक्ष एकाग्र करण्याची आवश्यकताच उरलेली नसते, कारण व्यक्ती आता त्याकडे गहनतर चेतनेच्या साहाय्याने पाहत असते. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, संकल्पनेवर एकाग्रता करणे म्हणजे काही केवळ विचार करणे नसते, ते केवळ मननही नसते तर ती एकाग्रता म्हणजे त्या संकल्पनेच्या गाभ्यामध्ये केलेला आंतरिक निवास असतो.

– श्रीअरविंद (CWSA 23 : 321), (CWSA 29 : 305-306)

साधना, योग आणि रूपांतरण – ३८

साधक : ध्यानाची उद्दिष्टे काय असली पाहिजेत किंवा ध्यानाच्या संकल्पना काय असायला हव्यात?

श्रीअरविंद : जी संकल्पना तुमच्या प्रकृतीशी आणि तुमच्या सर्वोच्च आकांक्षांशी अनुरूप असेल ती! परंतु जर तुम्ही मला नेमके उत्तर विचारत असाल, तर मी सांगेन की, ध्यानासाठी किंवा निदिध्यासनासाठी ‘ब्रह्म’ हे नेहमीच सर्वोत्कृष्ट उद्दिष्ट असते. त्याचप्रमाणे सर्वांतर्यामी ‘ईश्वर’ आहे व ‘ईश्वरा’मध्ये सर्व आहेत आणि सर्व काही ‘ईश्वर’च आहे या संकल्पनेवर मन स्थिर केले पाहिजे. मग तो ईश्वर ‘अवैयक्तिक’ आहे की ‘वैयक्तिक’ आहे किंवा तो व्यक्तिनिष्ठ असा ‘आत्मा’ आहे, या गोष्टीने मूलतः काही फरक पडत नाही. पण मला तरी (सर्वं खल्विदं ब्रह्म) ही संकल्पना सर्वोत्तम वाटते. कारण ती सर्वोच्च आहे आणि तिच्यामध्ये, म्हणजे ‘सर्व काही ब्रह्म आहे’ या संकल्पनेमध्ये, इहलौकिक सत्य असो किंवा पारलौकिक सत्य असो किंवा सर्व अस्तित्वाच्या अतीत असणारे सत्य असो, या सर्व सत्यांचा समावेश होतो.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 294-295)

साधना, योग आणि रूपांतरण – ३७

कधी हृदय-केंद्रामध्ये तर कधी मस्तकाच्या वर लक्ष एकाग्र करण्यामध्ये काही अपाय नाही. परंतु यापैकी कोणत्याही ठिकाणी लक्ष एकाग्र करायचे म्हणजे एखाद्या विशिष्ट बिंदूवर अवधान केंद्रित करायचे असा याचा अर्थ नाही; तर तुम्ही तुमची चेतना या दोन्हीपैकी कोणत्यातरी एका ठिकाणी स्थिर करायची असते आणि एकाग्रता त्या ठिकाणावर नाही तर ‘ईश्वरा’वर करायची असते. ही गोष्ट तुम्हाला जशी योग्य, सोयीस्कर वाटेल त्यानुसार, म्हणजे डोळे उघडे ठेवून किंवा डोळे मिटून तुम्ही करू शकता. तुम्ही सूर्यावर एकाग्रता करू शकता पण सूर्यावर एकाग्रता करण्यापेक्षा ‘ईश्वरा’वर एकाग्रता करणे हे अधिक चांगले.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 309)

*

(त्राटक करण्याचा दीर्घकालीन अभ्यास नसेल तर) दृष्टी बराच वेळ एका जागी खिळवून ठेवता कामा नये. कारण त्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. डोळे एका जागी खिळवून ठेवण्याची आवश्यकता नसते; दृष्टी सहजस्वाभाविक ठेवणे पुरेसे असते आणि डोळे मिटून ध्यान करताना दृष्टी ध्यानानुसार बदलली पाहिजे.

*

जेव्हा तुम्ही छायाचित्रावर लक्ष केंद्रित करून ध्यान करता तेव्हा डोळे उघडे ठेवून ध्यान करणे अधिक चांगले.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 313)

*

प्रयास म्हणजे ओढूनताणून केलेले प्रयत्न. अशीही एखादी संकल्पपूर्वक केलेली कृती असू शकते की ज्या कृतीमध्ये ओढाताण नसते किंवा प्रयास नसतात. एकाग्रतेसाठी ओढूनताणून केलेले प्रयत्न आणि एकाग्रता या भिन्न गोष्टी आहेत. ओढाताणीमध्ये उतावळेपणा आणि प्रयत्नांचा अट्टहास, जोरजबरदस्ती अध्याहृत असते तर एकाग्रता मुळातच शांत आणि स्थिर असते. ज्यामध्ये अस्वस्थता किंवा उतावळेपणा असतो त्यास ‘एकाग्रता’ म्हणता येणार नाही.

– श्रीअरविंद (SABCL 23 : 730)

साधना, योग आणि रूपांतरण – ३६

श्रीमाताजी : आपल्यामध्ये असणाऱ्या अंतरात्म्याची उपस्थिती आपल्याला जाणवावी आणि सरतेशेवटी त्याच्याशी आपल्याला तादात्म्य पावता यावे यासाठी, आजवर वेगवेगळ्या काळामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्याच पद्धती सांगितल्या गेल्या आहेत. त्यापैकी काही पद्धती या मनोवैज्ञानिक असतात, काही धार्मिक तर काही अगदी यांत्रिकसुद्धा असतात. वास्तविक, प्रत्येक व्यक्तीने तिला सुयोग्य ठरेल अशी पद्धत स्वतः शोधली पाहिजे. आणि जर व्यक्तीकडे अतिशय उत्कट आणि दृढ अभीप्सा असेल, सातत्यपूर्ण आणि गतिमान संकल्प असेल तर, तिला या ना त्या मार्गाने ती पद्धत निश्चितपणे सापडते. बाह्यतः वाचन व अभ्यास, आणि आंतरिकरित्या एकाग्रता, ध्यान, प्रकटीकरण व अनुभूती यांच्या माध्यमातून व्यक्तीला तिच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असणारे साहाय्य मिळतेच.

साधक : यांत्रिक, धार्मिक आणि मनोवैज्ञानिक पद्धतींमध्ये काय फरक असतो?

श्रीमाताजी : विविध धर्मांनी ज्या पद्धतींचा स्वीकार केलेला असतो त्या पद्धती म्हणजे धार्मिक पद्धती. बहुतांशी धर्म आंतरिक सत्याविषयी काही बोलत नाहीत, ‘ईश्वरा’च्या संपर्कात येणे हीच एक गोष्ट त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असते.

ज्या पद्धतींमध्ये चेतनेच्या विविध स्तरांशी संबंध असतो, सर्व क्रियाकलापांमधून बाजूला होत ज्या पद्धतीमध्ये अंतरंगातील आत्म्याचा साक्षात्कार करून घेण्याचा प्रयत्न केला जातो; अलिप्तता, आत्म-तन्मयता (self-abstraction), एकाग्रता, उच्चतर सद्वस्तु, सर्व बाह्य गतिविधींचा परित्याग इत्यादी गोष्टींचा समावेश असलेली आंतरिक अवस्था जाणीवपूर्वकपणे तयार करण्याचा प्रयत्न केला जातो त्या पद्धतींची गणना मनोवैज्ञानिक पद्धतीमध्ये केली जाते. विचार, भावना आणि कृती यांच्यावर कार्य करणारी पद्धत ही मनोवैज्ञानिक पद्धत असते.

पूर्णपणे यांत्रिक साधनांवर आधारित असणाऱ्या पद्धती या यांत्रिक पद्धती असतात. त्यांचा विशिष्ट प्रकारे अवलंब केला तर व्यक्तीला त्यापासून लाभ होऊ शकतो. श्वासावरील नियंत्रणाची पद्धत हे उदाहरण पाहा. ही पद्धत कमीअधिक यांत्रिकपणे कार्य करते. परंतु विवेकानंदांनी त्यांच्या शिकवणुकीत सांगितल्याप्रमाणे, या पद्धतीच्या जोडीला कधीकधी व्यक्तीने विचारांची एकाग्रता करावी किंवा एखाद्या शब्दाचा जप करावा, असे सुचविण्यात येते. काही एका विशिष्ट टप्प्यापर्यंत तिचा उपयोग होतो पण नंतर ती पद्धत निष्प्रभ होते.

हे मानवी प्रयत्न विविध काळामध्ये आणि विविध ठिकाणी कमीअधिक प्रमाणात व्यक्तिगत स्तरावर यशस्वी झालेले आढळतात पण आजवर त्याचा कधीही सामुदायिक परिणाम साध्य झालेला नाही.

तुमच्या कृतींच्या माध्यमातून, तुमच्या अस्तित्वाच्या सत्याखेरीज तुमच्यामधील अन्य काहीही अभिव्यक्त होणार नाही, अशा एका आंतरिक संकल्पाच्या स्थितीमध्ये राहायचे आणि सर्वकाही त्या ‘सत्या’वरच अवलंबून राहील असे करायचे; ही मनोवैज्ञानिक पद्धत अधिक कठीण पण कितीतरी अधिक परिणामकारक असते. अर्थात तुम्ही काहीच करत नसाल तर ही पद्धत सोपी आहे पण या पद्धतीमुळे स्वतःचीच फसवणूक करून घेणे देखील अधिक सोपे असते.

जेव्हा तुम्ही सर्वांपासून दूर होऊन एकटे, पूर्णपणे शांत वातावरणात ध्यानाला बसता, आणि कमीअधिक सौम्य दृष्टीने स्वतःची परीक्षा करता तेव्हा तुम्ही अशी कल्पना करू लागता की, तुम्हाला कोणत्यातरी एखाद्या अद्भुत गोष्टीचा साक्षात्कार झाला आहे. परंतु जेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनात हरघडी परीक्षेला सामोरे जावे लागते, तुमच्यातील अपूर्णता, तुमच्यातील दुर्बलता, दिवसभरातून शंभरवेळा तुमच्या मनात उद्भवणाऱ्या दुरिच्छायुक्त क्षुद्र गतिविधी यांविषयी जागरुक होण्याची संधी तुम्हाला वारंवार मिळते तेव्हा मग तुमचा स्वतःविषयीचा भ्रम मावळतो आणि परिणामतः तुमचे प्रयत्न अधिक प्रामाणिक होतात.

आणि म्हणूनच आपण एखाद्या अत्यंत मनोहारी, अतिशय आरामदायी, या जगापासून खूप दूर, फक्त स्वतःच्या छोट्याशा व्यक्तित्वाकडे लक्ष देता येईल अशा निर्जन अरण्यात आश्रम काढण्याऐवजी उलट, या जीवनातील सर्व कृती हाती घ्यायच्या आणि त्यांना होता होईल तेवढे सचेत बनवायचे आणि आपले इतर माणसांशी जे संबंध असतील त्या संबंधामध्ये असतानासुद्धा आपल्या सर्व आंतरिक गतिविधींविषयी अधिक सुस्पष्टपणे जागरुक राहायचे; हे प्रयत्न आपण येथे (श्रीअरविंद आश्रमात) करत आहोत. अडीअडचणींपासून दूर पळून जाणे हा त्यांच्यावर मात करण्याचा मार्ग कधीच होऊ शकत नाही. तुम्ही जर तुमच्या शत्रूला पाठ दाखवून पळ काढलात तर तुम्ही त्याला पराजित करू शकणार नाही आणि मग तुम्हाला पराजित करण्याची आयती संधीच तुम्ही त्या शत्रूला द्याल. आणि म्हणूनच आपण हिमालयातील कोणत्या गिरीशिखरावर नाही तर येथे पाँडिचेरीमध्ये आहोत. अर्थात हिमालयातील एखादे गिरीशिखर हे अगदी आनंददायी असेल हे मला मान्य आहे, पण कदाचित ते पाँडिचेरीएवढे परिणामकारक नसेल.

– श्रीमाताजी (CWM 15 : 303-305)