Tag Archive for: साधना

साधना, योग आणि रूपांतरण – २९५

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

बहुधा जुन्या स्मृती या अवचेतनामधून (Subconscient) पृष्ठभागावर येतात. जेव्हा अशा स्मृती जाग्या होतात तेव्हा, त्यांचे विलयन (dissolve) करण्यासाठी व त्या काढून टाकण्यासाठीच पृष्ठभागावर आल्या आहेत हे ओळखून त्यांची (योग्य रीतीने) हाताळणी केली पाहिजे. (अवचेतनाच्या प्रभावामुळे व्यक्ती गतकाळाशी संबद्ध राहात असते. ही कर्माची यंत्रणा असते.) अवचेतनामधून आलेल्या स्मृतींचे सातत्याने विलयन केल्यामुळे, व्यक्ती गतकाळाशी संबद्ध राहणार नाही तर, व्यक्ती जिवाच्या भावी बंधमुक्त प्रवासासाठी मुक्त होईल. तुम्हाला जेव्हा यासंबंधी खरे ज्ञान होते, म्हणजे अमुक एक गोष्ट का घडली, त्याचे काय प्रयोजन होते, याचे जेव्हा तुम्हाला ज्ञान होते तेव्हा त्यासंबंधीच्या स्मृती सहजपणे निघून जातात, आणि हा सर्वोत्तम मार्ग आहे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 610)

साधना, योग आणि रूपांतरण – २९४

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

(एका साधकाला अवचेतनामधून वर उफाळून येणाऱ्या गोष्टींमुळे, साधनेमध्ये व्यत्यय येत आहे. त्या साधकाला श्रीअरविंद यांनी केलेले हे मार्गदर्शन…)

हे खरं आहे की, अजून काहीतरी अवचेतनामधून (subconscient) उफाळून वर येईल, पण जे तिथे अजूनही शिल्लक राहिलेले आहे तेच वर येईल. आत्ता ज्यास नकार दिला जात आहे, ते जर नष्ट न होता इतरत्र कोठे गेले, तर ते आता अवचेतनामध्ये जाणार नाही; तर ते व्यक्ती स्वतःभोवती जी चेतना वागवत असते त्या परिसरीय चेतनेमध्ये (surrounding consciousness) जाईल. एकदा का ते तेथे गेले की ते कोणत्याही प्रकारे स्वतःचे असे राहत नाही आणि जरी त्याने परत येण्याचा प्रयत्न केला तरी ते आता एखाद्या परक्या गोष्टीसारखे असते, तेव्हा व्यक्तीने त्याचा स्वीकार करता कामा नये किंवा त्याला वाव देता कामा नये.

व्यक्ती नकाराच्या ज्या दोन अंतिम टप्प्यांद्वारे, प्रकृतीच्या जुन्या गोष्टींपासून सुटका करून घेऊ शकते ते दोन टप्पे असे : जुन्या गोष्टी एकतर अवचेतनामध्ये जाऊन बसतात आणि तेथून त्या काढून टाकाव्या लागतात किंवा मग त्या परिसरीय चेतनेमध्ये जाऊन बसतात आणि मग त्या आपल्या राहत नाहीत. (त्या सार्वत्रिक प्रकृतीचा भाग बनलेल्या असतात.)

अवचेतनामधून जे पृष्ठभागावर येत आहे ते जोवर पूर्णपणे नाहीसे होत नाही तोपर्यंत व्यक्तीने त्यांची पुनरावृत्ती होण्यास मुभा द्यावी, हा विचार योग्य नाही. कारण त्यामुळे ही त्रासदायक अवस्था विनाकारणच लांबेल आणि ती घातकसुद्धा ठरू शकते. जेव्हा या गोष्टी उफाळून येतात तेव्हा त्यांचे निरीक्षण केले पाहिजे आणि त्या तशाच कायम न ठेवता, त्या फेकून दिल्या पाहिजेत.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 602)

साधना, योग आणि रूपांतरण – २९३

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

एखाद्या वाद्यवादकाला ज्याप्रमाणे प्रथम त्याच्या मनाच्या व प्राणाच्या सौंदर्यविषयक आकलनाच्या आणि संकल्पाच्या साहाय्याने, त्याच्या संगीताचे योग्य तत्त्व कोणते आणि त्याचा प्रत्यक्ष उपयोग कसा करायचा हे शिकावे लागते आणि नंतर त्याचे उपयोजन कसे करायचे हे त्याच्या बोटांना शिकवावे लागते; एवढे झाल्यानंतर मग त्याच्या बोटांमधील अवचेतन (subconscient) त्यांचे कार्य शिकेल आणि नंतर ते स्वतःहून योग्य प्रकारे वाद्यवादन करेल. म्हणजे प्रत्यक्षात डोळ्यांनी न पाहतासुद्धा त्याची बोटं योग्य सूरपट्टीवरच पडतील (आणि त्यातून सुंदर सुरावट निर्माण होईल.)

(अगदी त्याचप्रमाणे, परिवर्तन घडण्यासाठी) आधी सचेत भागांचीच तयारी करून घ्यावी लागते. जोपर्यंत ते तयार होत नाहीत तोपर्यंत काही घटकांचा आणि तपशिलांचा अपवाद वगळता, अवचेतनास (subconscient) यशस्वीरितीने हाताळणे शक्य होणार नाही.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 609)

साधना, योग आणि रूपांतरण – २९२

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

(एका साधकाला स्वप्नामध्ये अश्लील दृष्य दिसत असत, तसेच त्याला साधनेमध्ये कामवासनेच्या विकाराचादेखील बराच अडथळा जाणवत असे. त्याच्या या समस्येवर श्रीअरविंदांनी पत्राद्वारे दिलेले उत्तर…)

अश्लील दृष्य वगैरेच्या बाबतीत सांगायचे तर, ज्यामध्ये अशा प्रकारच्या अनेकानेक विचित्र गोष्टी असतात अशा अवचेतन (subconscient) प्रांतामधूनच या गोष्टी तुमच्या पृष्ठभागावर येत असल्या पाहिजेत. किंवा मग तुमच्या कनिष्ठ प्राणिक चेतनेवर त्या चेतनेशी संबंधित असणाऱ्या वैश्विक प्रकृतीमधील प्रतलावरून अशा प्रकारच्या रचनांचा भडिमार होत असेल. या प्रतलावर घाणेरड्या, अश्लील व कुरुप गोष्टींमध्ये आणि सर्व प्रकारच्या विकृतीमध्ये मजा घेणाऱ्या शक्ती असतात. मात्र कारण कोणतेही असले तरी अशा वेळी साधकाने स्थिर, निर्लिप्त नकार हीच प्रतिक्रिया देणे अपेक्षित आहे.

*

एखादा साधक जेव्हा लैंगिक वासनात्मक कृतींचे शमन करू लागतो आणि सचेत मनामधून व प्राणामधून त्या कृतीस नकार देऊ लागतो तेव्हा त्या साधकाला कामवासना छळू लागतात. आणि ही एक अगदी सर्वसाधारणपणे आढळून येणारी गोष्ट आहे. (अशा परिस्थितीत) कामवासना ही जेथे मनाचे प्रत्यक्ष नियंत्रण नसते अशा अवचेतनामध्ये आश्रय घेते आणि ती स्वप्न-रूपाने पृष्ठभागी येऊन, स्वप्नदोष (वीर्यपतन) घडवून आणते. जोपर्यंत अवचेतन स्वतः शुद्ध होत नाही तोपर्यंत ही गोष्ट घडतच राहते.

ही गोष्ट घडू नये यासाठी झोपण्यापूर्वी काम-चक्रावर, जे नाभीच्या खाली असते (sex-centre) त्यावर प्रबळ इच्छाशक्तीचा वापर केल्याने किंवा शक्य झाल्यास, त्यावर सघन असा ‘शक्ती’प्रवाह केंद्रित केल्यामुळे कधीकधी उपयोग होऊ शकतो. यामध्ये लगेचच यश येईल असे नाही, परंतु प्रभावीपणे असे करत राहिल्यास, सुरुवातीला त्या गोष्टीच्या पुनरावृत्तीचे प्रमाण कमी होते आणि सरतेशेवटी ती शमते.

अतिमसालेदार, चमचमीत पदार्थांचे सेवन किंवा लघवी रोखून धरणे यासारख्या गोष्टी स्वप्नदोषांसारख्या गोष्टी घडण्यासाठी कारणीभूत ठरतात. अवचेतनाच्या या प्रेरणेमध्ये बरेचदा एक कालबद्धता असते. म्हणजे ही गोष्ट महिन्यातील एका विशिष्ट वेळी किंवा आठवड्याने, पंधरवड्याने, महिन्याने किंवा सहा महिन्याने एकदा अशा ठरावीक कालावधीनंतर घडताना दिसते.

– श्रीअरविंद (SABCL 24 : 1604)

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

अवचेतनामधील (subconscient) जडत्व दूर करण्यासाठी शरीराचे साहाय्य होऊ शकते याचे कारण असे की, अवचेतन हे शरीराच्या लगेच खाली असते. त्यामुळे प्रकाशित, प्रबुद्ध शरीर हे अवचेतनावर थेटपणे आणि संपूर्णपणे कार्य करू शकते आणि मन व प्राणदेखील करू शकणार नाहीत अशा रीतीने ते कार्य करू शकते. तसेच या थेट कार्यामुळे मन व प्राण मुक्त होण्यासदेखील साहाय्य होऊ शकते.
*
जेव्हा मन, प्राण व शरीर हे संपूर्णपणे दिव्य होतील आणि त्यांचे अतिमानसिकीकरण (supramentalised) घडून येईल तेव्हा ते ‘परिपूर्ण रूपांतरण’ असेल आणि त्या दिशेने घेऊन जाणारी प्रक्रिया हीच रूपांतरणाची खरी प्रक्रिया होय.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 598) (CWSA 28 : 297)

*

केवळ मन आणि प्राणानेच नव्हे तर, शरीराने सुद्धा त्याच्या सर्व पेशींसहित दिव्य रूपांतरणाची आस बाळगली पाहिजे.
– श्रीमाताजी (CWM 15 : 89)

साधना, योग आणि रूपांतरण – २८७

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

आंतरिक अस्तित्व हे अवचेतनावर (subconscient) अवलंबून नसते. परंतु बाह्यवर्ती अस्तित्व मात्र जन्मानुजन्मं अवचेतनावर अवलंबून राहत आले आहे. आणि त्यामुळे बाह्यवर्ती अस्तित्व आणि शारीर-चेतनेची अवचेतनाला प्रतिसाद देण्याची सवय, या गोष्टी साधनेच्या प्रगतीमध्ये एक भयंकर मोठा अडथळा ठरू शकतात आणि बऱ्याच जणांच्या बाबतीत तो तसा अडथळा ठरतो देखील.

अवचेतन हे जुन्या गतिप्रवृत्तींची पुनरावृत्ती साठवून ठेवत असते. ते चेतनेला नेहमी खाली खेचत असते. ते (चेतनेच्या) आरोहण-सातत्याला विरोध करत असते. ते जुन्या प्रकृतीस किंवा मग तामसिकतेस (अ-प्रकाश आणि अ-क्रियता) अवरोहणाच्या (descent) आड आणत असते.

तुम्ही जर समग्रतया आणि गतिशीलपणे, सक्रियपणे आंतरिक अस्तित्वामध्येच जीवन जगत असाल आणि बाह्यवर्ती अस्तित्व हे केवळ एक वरवरची गोष्ट आहे असे तुम्हाला जाणवत असेल, तर तुम्ही (अवचेतनाच्या) या अडथळ्यापासून स्वतःची सुटका करून घेऊ शकता किंवा बाह्यवर्ती चेतनेचे रूपांतरण पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही हा अडथळा निदान कमी तरी करू शकता.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 597)

साधना, योग आणि रूपांतरण – २८३

शरीराचे रूपांतरण

आपण जेव्हा (शरीराच्या) रूपांतरणाबद्दल (transformation) बोलत असतो तेव्हा अजूनही त्याचा काहीसा धूसर अर्थच आपल्या मनामध्ये असतो. आपल्याला असे वाटत असते की, आता काहीतरी घडणार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून सारे काही सुरळीत, चांगले होणार आहे. म्हणजे आपल्याला काही अडचणी भेडसावत असतील तर त्या अडचणी नाहीशा होऊन जातील, जे आजारी असतील ते बरे होतील, शरीर अशक्त आणि अक्षम असेल तर शरीराच्या त्या साऱ्या दुर्बलता आणि अक्षमता नाहीशा होऊन जातील, अशा काहीतरी गोष्टी आपल्या कल्पनेमध्ये असतात. पण मी म्हटले त्याप्रमाणे, हे सारे अगदी धूसर असे आहे, केवळ एक कल्पना आहे.

शारीर-चेतनेच्या (body consciousness) बाबतीत एक उल्लेखनीय बाब अशी असते की, जोपर्यंत तिच्याबाबत एखादी गोष्ट अगदी पूर्ण होण्याच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचत नाही तोपर्यंत तिला (शारीर-चेतनेला) ती गोष्ट अगदी नेमकेपणाने आणि पूर्ण तपशिलवारपणे कळू शकत नाही.

म्हणून, जेव्हा रूपांतरणाची प्रक्रिया अगदी सुस्पष्ट होईल, म्हणजे ती प्रक्रिया कोणत्या टप्प्यांमधून जाणार आहे, त्या संपूर्ण रूपांतरणाच्या दरम्यान कोणकोणते बदल घडून येणार आहेत, म्हणजे त्यांचा क्रम कसा असेल, त्यांचा मार्ग कोणता असेल, त्यातील कोणत्या गोष्टी आधी होतील, त्यानंतर कोणत्या गोष्टी घडतील, इत्यादी सारा तपशील जेव्हा अगदी पूर्णपणे ज्ञात होईल, तेव्हा ते प्रत्यक्षात येण्याची घटिका आता जवळ आली आहे, याची ती निश्चित खूण असेल. कारण ज्या ज्या वेळी तुम्हाला एखाद्या गोष्टीचा इतक्या अचूकपणाने तपशिलवार बोध होतो तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की, आता तुम्ही ती गोष्ट साध्य करण्यासाठी सक्षम झाला आहात. त्या क्षणी तुम्हाला (त्या गोष्टीबाबत) समग्रतेची दृष्टी प्राप्त होऊ शकते.

उदाहरणार्थ, आता हे पूर्ण निश्चितपणे सांगता येऊ शकते की, अतिमानसिक प्रकाशाच्या (supramental light) प्रभावाखाली सर्वप्रथम शारीर-चेतनेचे रूपांतरण होईल; त्याच्या पाठोपाठ, शरीराच्या विविध अवयवांच्या कार्यावर, त्यांच्या सर्व गतिविधींवर नियंत्रण आणि प्रभुत्व निर्माण होईल; त्यांनतर, हे प्रभुत्व क्रमाक्रमाने गतिविधींमध्ये एक प्रकारचे मूलगामी परिवर्तन घडवून आणेल आणि त्यानंतर मग स्वयमेव अवयवांच्या घडणीमध्येच परिवर्तन घडून येईल. जरी या साऱ्याचा बोध अजूनही पुरेसा नेमकेपणाने झालेला नसला तरीही, हे सारे आता निश्चितपणे घडून येणार आहे.

परंतु अंतिमतः हे सारे कसे घडून येईल? तर, जेव्हा विविध अवयवांची जागा विविध शक्तींच्या, विविध गुणधर्मांच्या आणि प्रकृतीच्या एकीकृत केंद्रांद्वारे घेतली जाईल, तेव्हा त्यातील प्रत्येक केंद्र त्याच्या स्वतःच्या विशिष्ट पद्धतीने कार्य करेल. अजूनही या साऱ्या गोष्टी संकल्पनात्मक पातळीवरच आहेत आणि (त्यामुळे) शरीराला या साऱ्याचे चांगल्या रीतीने आकलन होऊ शकत नाही कारण या साऱ्या गोष्टी प्रत्यक्षात यायला अजून पुष्कळ अवकाश आहे. आणि (मी सुरुवातीला म्हटले त्याप्रमाणे) शरीर जेव्हा स्वतः एखादी गोष्ट करू शकते तेव्हाच म्हणजे, त्या टप्प्यावर आल्यावरच शरीराला खऱ्या अर्थाने त्या गोष्टीचे आकलन होऊ शकते.

– श्रीमाताजी (CWM 15 : 280-281)

साधना, योग आणि रूपांतरण – २८२

शरीराचे रूपांतरण

दु:ख येते तेव्हा ते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येते आणि जितक्या लवकर आपण हा धडा घेऊ तितक्या प्रमाणात दु:खाची गरज कमी होते आणि जेव्हा आपल्याला त्याचे रहस्य कळते, तेव्हा दु:खाची शक्यताच मावळून जाते. कारण ते रहस्य आपल्याला कारणाचा उलगडा करून देते; दु:खाचे मूळ, त्याचे ध्येय आणि त्याच्या पलीकडे जाण्याचा मार्ग प्रकट करते.

व्यक्तीने अहंभावाच्या वर उठून, त्याच्या तुरुंगातून बाहेर पडावे, ‘ईश्वरा’शी स्वत:चे ऐक्य साधावे, त्याच्यामध्ये विलीन व्हावे, आपण ‘ईश्वरा’पासून दुरावले जाऊ अशी संधी व्यक्तीने कोणत्याही गोष्टीला देऊ नये; (हे व्यक्तीला उमगावे म्हणून दु:खभोग असतात,) हे ते रहस्य आहे. आणि एकदा का व्यक्तीला हे रहस्य गवसले आणि तिने स्वत:मध्ये त्याची अनुभूती घेतली की, दु:खाचे प्रयोजनच संपून जाते आणि दु:खभोग नाहीसे होतात. हा एक सर्वात शक्तिमान उपाय असून अस्तित्वाच्या केवळ सखोल भागांमध्ये, आत्म्यामध्ये, किंवा आध्यात्मिक चेतनेमध्येच तो शक्तिमान ठरतो असे नव्हे, तर तो उपाय जीवन आणि शरीर यांच्या बाबतीतही उपयोगी असतो. या रहस्याचा जो शोध लागलेला असतो त्यास किंवा ते रहस्य प्रत्यक्षात उतरविण्याच्या कृतीस विरोध करू शकेल असा कोणताच आजार किंवा कोणताच विकार नसतो. म्हणजे असा आजार केवळ व्यक्तीच्या उच्चतर भागांमध्येच नव्हे तर, शरीराच्या पेशींमध्येदेखील असू शकत नाही.

पेशींना त्यांच्या आतमध्ये दडलेल्या वैभवाविषयी शिकविण्याची युक्ती जर व्यक्तीला कळली; तसेच त्या पेशी ज्यामुळे अस्तित्वात आहेत, ज्यामुळे त्यांना जीवन प्राप्त झाले आहे त्या वास्तविकतेची जाण एखादी व्यक्ती जर त्यांना करून देऊ शकली, तर त्या पेशीसुद्धा संपूर्ण सुसंवादी होतात आणि ज्याप्रमाणे व्यक्तीचे इतर सारे विकार नाहीसे होतात अगदी त्याचप्रमाणे शारीरिक विकारही नाहीसे होतात.

परंतु असे व्हायला हवे असेल तर व्यक्तीने भित्रे किंवा भीतीग्रस्त असता कामा नये. जेव्हा एखादी शारीरिक व्याधी येते तेव्हा व्यक्तीने घाबरून जाता कामा नये किंवा तिच्यापासून पळ काढता कामा नये, तर व्यक्तीने त्या व्याधीला धीराने, शांतस्थिरतेने, विश्वासाने आणि खात्रीने सामोरे गेले पाहिजे. त्या व्यक्तीला ही खात्री असली पाहिजे की, आजारपण हे मिथ्यत्व आहे, आणि व्यक्ती जर पूर्णपणे, अगदी पूर्ण विश्वासाने, संपूर्ण अविचलतेने ‘ईश्वरी कृपे’कडे वळली तर ती कृपा, जशी व्यक्तीच्या अंतरंगामध्ये खोलवर प्रस्थापित झालेली असते तशीच ती या पेशींमध्ये स्थिर होईल आणि शाश्वत ‘सत्य’ व ‘आनंदा’मध्ये या पेशीसुद्धा सहभागी होतील.

– श्रीमाताजी (CWM 09 : 42-43)

साधना, योग आणि रूपांतरण – २८१

शरीराचे रूपांतरण

तुमच्या साधनेसाठी पहिली आवश्यक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे तुमच्या शारीरिक अस्तित्वामध्ये (physical being) तुम्ही संपूर्ण खुलेपणा प्रस्थापित केला पाहिजे. आणि त्यामध्ये शांत-स्थिरता, सामर्थ्य, विशुद्धता आणि हर्ष यांचे अवतरण स्थिर केले पाहिजे. तसेच त्याबरोबरच तुमच्यामधील श्रीमाताजींच्या ‘शक्ती’च्या उपस्थितीची आणि कार्याची जाणीवसुद्धा स्थिर केली पाहिजे. या खात्रीशीर आधारावरच व्यक्ती ‘ईश्वरी’ कार्यासाठीचे संपूर्णतया प्रभावी असे साधन (instrument) बनू शकते.

व्यक्ती असे साधन झाली तरीदेखील अजून या साधनभूत व्यक्तीचे गतिमान रूपांतरण (dynamic transformation) साध्य करून घेणे शिल्लक असते. आणि ते रूपांतरण मन, प्राण आणि शरीरामध्ये होणाऱ्या उच्चतर आणि अधिक उच्चतर अशा चेतनाशक्तीच्या अवतरणावर अवलंबून असते. अतिमानसिक ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’ यांच्या जे अधिकाधिक समीप आहे, त्याचा अर्थबोध येथे ‘उच्चतर’ अस्तित्व या शब्दाने होतो.

मी ज्याचा उल्लेख केला त्याच्या आधारावरच या उच्चतर शक्तीचे अवतरण करणे शक्य असते. त्यासाठी चैत्य पुरुष (psychic being) सातत्याने अग्रभागी राहणे तसेच साधनभूत झालेल्या मन, प्राण व शरीर आणि अस्तित्वाच्या या उच्चतर स्तरांच्या दरम्यान त्याने मध्यस्थ म्हणून कार्य करणे आवश्यक असते. म्हणून प्रथम हे पायाभूत स्थिरीकरण (stabilisation) पूर्ण झाले पाहिजे.

*

शारीर-चेतनेमध्ये उच्चतर स्तरावरील समग्र ऊर्जा किंवा अनुभूती खाली उतरविणे शक्य नसते. रूपांतरणकार्यासाठी साहाय्य करण्यासाठी म्हणून त्यांचा फक्त प्रभाव खाली येतो. एकदा का हे रूपांतरण घडून आले की मग, शरीर अधिक सक्षम होईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 362, 362-363)

साधना, योग आणि रूपांतरण – २८०

शरीराचे रूपांतरण

(शरीराच्या एखाद्या भागाचे) रूपांतरण घडविताना, अडचणींना सामोरे जाणे आणि व्यक्तित्वाच्या प्रत्येक भागामध्ये जे काही उद्भवते त्याच्यावर मात करणे किंवा त्यामध्ये परिवर्तन करणे अध्याहृत असते; जेणेकरून तो भाग, उच्चतर गोष्टींना प्रतिसाद देऊ शकेल. परंतु समग्र व्यक्तित्वामध्ये संपूर्ण परिवर्तन हे ‘ऊर्ध्वस्थित’ असणाऱ्या ‘ईश्वरा’प्रत केलेल्या आरोहणाद्वारे आणि ‘ईश्वरा’च्या अवतरणाद्वारे शक्य होते. ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘आत्म्या’चा साक्षात्कार आणि अगदी शारीर-स्तरापर्यंत येत, उच्चतर शांतीचे झालेले संपूर्ण अवतरण ही त्याची पहिली पायरी असते.

*

हो, नक्कीच. आणि म्हणूनच मी, ज्या जडभौतिक भागाने स्वतःला इतके अग्रस्थान देऊ केले आहे, त्या भागामध्ये साक्षात्कार व्हावा यावर एवढा भर देत आहे. व्यक्तीमधील एखादा भाग जेव्हा अशा रीतीने स्वतःचे सारे दोष व मर्यादा दाखवून देत लक्ष वेधून घेतो, तेव्हा त्या गोष्टींवर मात केली जावी या हेतुने तो पृष्ठस्तरावर येत असतो. येथे (तुमच्या उदाहरणामध्ये) जडत्व किंवा अक्षमता (अप्रवृत्ती), अंधकार किंवा विस्मरण (अप्रकाश) या साऱ्या गोष्टी, त्या नीट व्हाव्यात या हेतुने आणि त्यांचे प्रथमतः किंवा प्राथमिक रूपांतरण व्हावे यासाठी पृष्ठस्तरावर आल्या आहेत.

मनामध्ये शांती आणि प्रकाश, हृदयामध्ये प्रेम आणि सहानुभूती, प्राणामध्ये शांतस्थिरता आणि ऊर्जा, शरीरामध्ये स्थायी ग्रहणशीलता व प्रतिसाद (प्रकाश, प्रवृत्ती) या गोष्टी निर्माण होणे म्हणजे आवश्यक असणारे परिवर्तन होय.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 362, 366)