Tag Archive for: साधना

साधना, योग आणि रूपांतरण – ११४

‘ईश्वरा’च्या संपर्कात असणाऱ्या तुमच्या आंतरिक अस्तित्वातून, अंतरंगातूनच नेहमी कृती करण्यास तुम्ही शिकले पाहिजे. बाह्य अस्तित्व हे केवळ एक साधन असले पाहिजे आणि त्याला तुमच्या वाणीवर, विचारावर वा कृतीवर हुकमत गाजविण्यास किंवा सक्ती करण्यास तुम्ही अजिबात मुभा देता कामा नये.
*
योगसाधनेमुळे चेतना विकसित झाली असेल तर, व्यक्ती अभीप्साही बाळगू शकते आणि त्याच वेळी कामाकडेही लक्ष पुरवू शकते आणि त्याच वेळी इतर अनेक गोष्टीही करू शकते.
*
कामामध्ये व्यग्र असताना ‘ईश्वरी उपस्थिती’ चे स्मरण ठेवणे हे सुरुवातीला सोपे नसते; परंतु काम संपल्यासंपल्या लगेचच जरी त्या उपस्थितीची जाणीव व्यक्तीला पुनरुज्जीवित करता आली तरी ठीक आहे. कालांतराने कामामध्ये व्यग्र असतानादेखील असतानाच या उपस्थितीची जाणीव आपोआप होऊ लागेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 254), (CWSA 29 : 256), (CWSA 29 : 258-259)

साधना, योग आणि रूपांतरण – ११३

माणसं सहसा प्राणिक अस्तित्वाच्या सामान्य प्रेरणांनी उद्युक्त होऊन अथवा गरजेपोटी, संपत्ती वा यश किंवा पद वा सत्ता किंवा प्रसिद्धी यांबद्दलच्या इच्छेने प्रेरित होऊन किंवा कार्यरत राहण्याच्या ओढीने, आणि त्यांच्याकडे असलेल्या क्षमतांचे आविष्करण करण्याचा आनंद मिळावा यासाठी काम करतात, जीवनव्यवहार करतात. आणि त्यामध्ये ते त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार, त्यांच्या कार्यशक्तीनुसार आणि त्यांची प्रकृती व त्यांचे ‘कर्म’ यांच्या फलस्वरूप असलेल्या सुदैवानुसार किंवा दुर्दैवानुसार यशस्वी होतात किंवा अपयशी ठरतात.

(परंतु) एखादी व्यक्ती जेव्हा योगमार्ग स्वीकारते आणि स्वतःचे जीवन ‘ईश्वरा’र्पण करू इच्छिते तेव्हा प्राणिक अस्तित्वाच्या या सामान्य प्रेरणांना पुरेसा आणि मुक्त वाव मिळेनासा होतो; अशा वेळी त्यांची जागा इतर प्रेरणांनी घेतली गेली पाहिजे. प्रामुख्याने आंतरात्मिक आणि आध्यात्मिक प्रेरणांनी त्यांची जागा घेतली पाहिजे, त्यामुळे साधकाला पूर्वीच्याच ऊर्जेनिशी कर्म करणे शक्य होऊ शकते. आता ते कर्म त्याने स्वतःसाठी केलेले नसते, तर ते ‘ईश्वरा’साठी केलेले असते.

सामान्य प्राणिक प्रेरणा किंवा प्राणिक शक्ती ही जर मुक्तपणाने कार्यरत होऊ शकली नाही आणि तरीही इतर कोणत्या गोष्टीने तिची जागा घेतली नाही तर, कदाचित त्यानंतर, कर्मामध्ये लावण्यात आलेला जोर किंवा शक्ती कमी होण्याची शक्यता असते किंवा यशप्राप्तीसाठी लागणारी शक्तीही तेथे शिल्लक न राहण्याची शक्यता असते. प्रामाणिक साधकासाठी ही अडचण तात्कालिकच असू शकते; परंतु त्याने त्याच्या आत्मनिवेदनातील किंवा त्याच्या प्रवृत्तीतील दोष शोधून तो काढून टाकला पाहिजे. तेव्हा मग दिव्य ‘शक्ती’ स्वतःहून अशा साधकाच्या माध्यमातून कार्य करू लागेल आणि तिचे साध्य पूर्णत्वास नेण्यासाठी त्या व्यक्तीची क्षमता व प्राणिक शक्ती यांचा उपयोग करून घेईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 233)

साधना, योग आणि रूपांतरण – ११२

चेतनेमधील उन्मुखतेप्रमाणेच कर्मामध्येही उन्मुखता असते. ध्यानाच्या वेळी तुमच्या चेतनेमध्ये जी ‘शक्ती’ कार्य करत असते आणि तुम्ही जेव्हा तिच्याप्रत उन्मुख, खुले होता तेव्हा ती ज्याप्रमाणे शंकांचे आणि गोंधळाचे ढग दूर पळवून लावते अगदी त्याचप्रमाणे ती ‘शक्ती’ तुमच्या कृतीदेखील हाती घेऊ शकते. आणि त्याद्वारे ती तुम्हाला तुमच्यामधील दोषांची जाणीवच करून देऊ शकते असे नाही तर, काय केले पाहिजे यासंबंधी तुम्हाला ती सतर्क बनवू शकते आणि ते करण्यासाठी तुमच्या मनाला आणि हातांना ती मार्गदर्शन करू शकते. तुम्ही कर्म करत असताना तिच्याप्रत उन्मुख, खुले राहाल तर तुम्हाला या मार्गदर्शनाची अधिकाधिक जाणीव होऊ लागेल. आणि एवढेच नव्हे तर नंतर तुम्हाला, तुमच्या सर्व कृतींच्याच पाठीमागे कार्यरत असलेल्या ‘श्रीमाताजींच्या शक्ती’ची जाणीव होईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 262)

साधना, योग आणि रूपांतरण – १११

साधकासाठी बाह्य संघर्ष, अडचणी, संकटे या गोष्टी म्हणजे अहंकार आणि रजोगुणात्मक इच्छा-वासना यांच्यावर मात करण्याची आणि संपूर्ण समर्पण प्राप्त करून घेण्याची केवळ साधने असतात. जोपर्यंत व्यक्ती यशप्राप्तीवर भर देत असते तोपर्यंत ती व्यक्ती अंशतः का होईना पण अहंकारासाठी कर्म करत असते; आणि हे असे आहे, हे दाखवून देण्यासाठी तसेच पूर्ण समता यावी म्हणून अडीअडचणी आणि बाह्य अपयश या गोष्टी येत राहतात. विजयाची शक्ती प्राप्त करून घेऊ नये, असा याचा अर्थ नाही; परंतु केवळ नजीकच्या कार्यातील यश हीच काही सर्वस्वी महत्त्वाची गोष्ट नसते; ग्रहण करण्याची शक्ती आणि एक महत्तर, अधिक महत्तर सुयोग्य दृष्टी प्रक्षेपित करण्याची शक्ती आणि आंतरिक ‘शक्ती’चे विकसन याच गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या असतात. आणि हे सारे अतिशय शांतपणे आणि धीराने, नजीकच्या विजयामुळे उत्तेजित न होता किंवा अपशयाने खचून न जाता केले पाहिजे.
*
कर्माचा एक मोठा उपयोग असा असतो की, कर्म हे प्रकृतीची परीक्षा घेते आणि साधकाला त्याच्या बाह्यवर्ती अस्तित्वाच्या दोषांसमोर उभे करते, अन्यथा ते दोष त्याच्या नजरेतून निसटण्याची शक्यता असते.
*
कर्माच्या माध्यमातून योगसाधना हा पूर्णयोगाच्या साधना-प्रवाहामध्ये प्रवेश करण्याचा सर्वात सोपा आणि सर्वात जास्त प्रभावी मार्ग आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 241-242), (CWSA 29 : 241), (CWSA 32 : 256-257)

साधना, योग आणि रूपांतरण – ११०

अज्ञान आणि अहंभावातून केलेल्या कृतीला, जी कृती अहंकाराच्या तुष्टीसाठी आणि राजसिक इच्छेने प्रेरित होऊन केली जाते त्या कृतीला मी ‘कर्म’ मानत नाही. अज्ञानाचा जणू शिक्काच असणाऱ्या अहंकार, राजसिकता आणि इच्छावासना यांपासून सुटका करून घेण्याचा संकल्प असल्याखेरीज ‘कर्मयोग’ घडूच शकत नाही. परोपकार किंवा मानवतेची सेवा किंवा नैतिक किंवा आदर्शवादी अशा उर्वरित सर्व गोष्टी, ज्या गोष्टी कार्याच्या गहनतर सत्याला पर्यायी आहेत, असे मानवी मन मानते, त्या सुद्धा माझ्या दृष्टीने ‘कर्म’ या संज्ञेला पात्र ठरत नाहीत. जी कृती ‘ईश्वरा’साठी केली जाते, जी कृती ‘ईश्वरा’शी अधिकाधिक एकत्व पावून केली जाते आणि अन्य कशासाठीही नाही तर, केवळ ‘ईश्वरा’साठीच केली जाते अशा कृतीला मी ‘कर्म’ असे संबोधतो. साहजिकच आहे की, ही गोष्ट सुरुवातीला तितकीशी सोपी नसते; गहन ध्यान आणि दीप्तिमान ज्ञान यांच्यापेक्षा ती काही कमी सोपी नसते, किंबहुना त्यामानाने खरेखुरे प्रेम आणि भक्ती या गोष्टी अधिक सोप्या असतात. परंतु इतर गोष्टींप्रमाणेच या गोष्टीची (कर्माची) सुरुवात देखील तुम्ही सुयोग्य वृत्ती आणि दृष्टिकोन बाळगून केली पाहिजे, तुमच्यामधील सुयोग्य संकल्पासहित ही गोष्ट करण्यास तुम्ही सुरुवात केली पाहिजे, अन्य गोष्टी त्यानंतर घडून येतील. अशा वृत्तीने केलेले ‘कर्म’ हे भक्ती किंवा ध्यान यांच्याइतकेच प्रभावी ठरू शकते.

*

कुटुंब, समाज, देश या गोष्टी म्हणजे ‘ईश्वर’ नव्हेत; या गोष्टी म्हणजे अहम् चे व्यापक रूप आहेत. कुटुंब, समाज, देश या उद्दिष्टांसाठी कार्य करावे असा ‘ईश्वरी आदेश’ मिळाला असल्याची जर व्यक्तीला जाणीव असेल किंवा (ते कार्य करत असताना) व्यक्तीला स्वतःच्या अंतरंगामध्ये कार्य करणाऱ्या ‘ईश्वरी शक्ती’ची जाणीव असेल तरच ती व्यक्ती कुटुंब, समाज, देश यांच्यासाठी कार्य करत असूनही, मी ‘ईश्वरा’साठी कार्य करत आहे, असे म्हणू शकते. अन्यथा, देश वगैरे गोष्टी म्हणजे ‘ईश्वर’च आहेत, ही केवळ मनाची एक कल्पना असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 216), (CWSA 28 : 438)

साधना, योग आणि रूपांतरण – १०९

जे कर्म कोणत्याही वैयक्तिक हेतुविना, प्रसिद्धी किंवा लोकमान्यता किंवा लौकिक मोठेपणा यांच्या इच्छेविना केले जाते; ज्यामध्ये स्वतःच्या मानसिक प्रेरणा किंवा प्राणिक लालसा व मागण्या किंवा शारीरिक पसंती-नापसंती यांचा आग्रह नसतो; जे कर्म कोणताही गर्व न बाळगता किंवा असभ्य हेकेखोरपणा न करता केले जाते किंवा कोणत्याही पदासाठी वा प्रतिष्ठेसाठी दावा न करता जे कर्म केले जाते; जे कर्म केवळ आणि केवळ ‘ईश्वरा’साठीच आणि ‘ईश्वरी आदेशा’नेच केले जाते, केवळ तेच कर्म आध्यात्मिकदृष्ट्या शुद्धीकरण करणारे असते. जे जे कर्म अहंभावात्मक वृत्तीने केले जाते ते, या अज्ञानमय जगातील लोकांच्या दृष्टीने भले कितीही चांगले असू दे, पण योगसाधना करणाऱ्या साधकाच्या दृष्टीने त्या कर्माचा काहीच उपयोग नसतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 232)

साधना, योग आणि रूपांतरण – १०८

मन स्थिर करण्यासाठी व आध्यात्मिक अनुभूती येण्यासाठी, प्रकृतीचे शुद्धीकरण होणे आणि तिची तयारी होणे आवश्यक असते. यासाठी कधीकधी अनेक वर्षेसुद्धा लागतात. योग्य वृत्तीने केलेले कर्म हा त्यासाठीचा सर्वांत सोपा मार्ग आहे. इच्छा किंवा अहंकार विरहित कर्म; इच्छा, मागणी किंवा अहंकाराची कोणतीही स्पंदने निर्माण झाली की त्याला लगेच नकार देत केलेले कर्म; ‘दिव्य माते’ला अर्पण म्हणून केलेले कर्म; दिव्य मातेचे स्मरण करत आणि तिच्या शक्तीने आविष्कृत व्हावे आणि सर्व कर्म तिने हाती घ्यावे म्हणून तिची प्रार्थना करून केलेले कर्म, अशा प्रकारे केलेले कर्म म्हणजे योग्य वृत्तीने केलेले कर्म होय. त्यामुळे ‘दिव्य माते’ची उपस्थिती आणि तिचे कार्यकारकत्व तुम्हाला फक्त आंतरिक नीरवतेमध्येच जाणवू शकेल असे नाही तर, कर्म करत असताना देखील ते जाणवू शकेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 226)

साधना, योग आणि रूपांतरण – १०६

तुम्ही ज्या सर्व अडचणींचे वर्णन करत आहात त्या बहुतेक सर्वच माणसांच्या बाबतीत अगदी स्वाभाविक असतात. एखादी व्यक्ती ध्यानाला शांतपणे बसलेली असते तेव्हा ‘ईश्वरा’चे स्मरण राखणे आणि ‘ईश्वरी उपस्थिती’ची जाणीव ठेवणे हे तुलनेने सोपे असते; पण व्यक्तीला कामामध्ये व्यग्र राहावे लागत असेल तर तसे करणे तिला अधिक कठीण असते. कर्मामधील चेतना आणि ईश-स्मरण या गोष्टी टप्प्याटप्यानेच यायला हव्यात, त्या एकदम एकाचवेळी साध्य होतील अशी अपेक्षा तुम्ही बाळगता कामा नये, कोणालाच ते तसे एकदम साध्य होत नाही.

ते दोन मार्गांनी घडते पहिला मार्ग म्हणजे, तुम्ही श्रीमाताजींचे स्मरण ठेवण्याचा आणि तुम्ही जेव्हा काहीतरी काम करत असता तेव्हा प्रत्येक वेळी ते कर्म अर्पण करण्याचा अभ्यास केलात (म्हणजे कर्म करत असताना सर्वकाळ असे नव्हे, पण, कर्मारंभी किंवा तुम्हाला जेव्हा जेव्हा स्मरण होईल तेव्हा असा अभ्यास केला) तर मग ती गोष्ट हळूहळू सोपी आणि प्रकृतीला सवयीची होऊन जाते.

दुसरा मार्ग म्हणजे, ध्यानामुळे आंतरिक चेतना विकसित होऊ लागते. ही चेतना एकाएकी किंवा अचानकपणे चिरस्थायी होत नाही तर ती, कालांतराने, आपोआप अधिकाधिक चिरस्थायी बनत जाते. कार्यकारी असणाऱ्या बाह्यवर्ती चेतनेहून विभिन्न असणाऱ्या या चेतनेची तुम्हाला जाणीव होऊ लागते. प्रथमतः कर्म करत असताना तुम्हाला या विभिन्न चेतनेची जाणीव होत नाही, पण जेव्हा कर्म थांबते तेव्हा लगेचच तुम्हाला असे जाणवते की, ती चेतना पूर्ण वेळ मागून तुमच्याकडे लक्ष ठेवून होती; नंतर मग कर्म चालू असतानादेखील तिची जाणीव होऊ लागते, जणू तुमच्या अस्तित्वाचे दोन भाग आहेत, अशी तुम्हाला जाणीव होते. एक अस्तित्व निरीक्षण करत आहे आणि मागे राहून आधार पुरवीत आहे तसेच श्रीमाताजींचे स्मरण करत आहे आणि दुसरे अस्तित्व कर्म करत आहे, अशी तुम्हाला जाणीव होते. असे जेव्हा घडते तेव्हा खऱ्या चेतनेसह कर्म करणे अधिकाधिक सोपे होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 259)

साधना, योग आणि रूपांतरण – १०५

श्रीमाताजींसाठी जे कोणी पूर्ण प्रामाणिकपणे कार्य करतात त्यांच्या योग्य चेतनेची तयारी त्या कर्मामधूनच होत जाते. अगदी ते ध्यानाला बसले नाहीत किंवा त्यांनी कोणती एखादी योगसाधना केली नाही तरीही त्यांच्या चेतनेची तयारी होत असते.

ध्यान कसे करावे हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जर कर्म करत असताना तसेच सदासर्वकाळ प्रामाणिक असाल आणि जर तुम्ही श्रीमाताजींप्रति उन्मुख राहाल तर जे गरजेचे आहे ते आपोआप घडून येईल.

*

कर्म हा योगसाधनेचा एक भाग आहे आणि प्राण व त्याच्या क्रियांमध्ये ‘ईश्वरी उपस्थिती’, ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’ अवतरित व्हाव्यात म्हणून त्यांना आवाहन करण्यासाठी कर्म हे एक उत्तम संधी प्रदान करते; कर्मामुळे समर्पणाचे क्षेत्रदेखील विस्तारित होते आणि समर्पणाची संधीही वाढीस लागते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 247)

साधना, योग आणि रूपांतरण – १०४

मी नेहमीच असे सांगत आलो आहे की, साधना म्हणून करण्यात आलेले कर्म – करण्यात आलेले कर्म म्हणजे ‘ईश्वरा’कडून आलेला ऊर्जेचा प्रवाह या भूमिकेतून केलेले कर्म, पुन्हा त्या ‘ईश्वरा’ला अर्पण करणे किंवा ‘ईश्वरा’साठी केलेले कर्म किंवा भक्तिभावाने केलेले कर्म हे साधनेचे एक प्रभावी माध्यम असते आणि अशा प्रकारचे कर्म हे विशेषतः पूर्णयोगामध्ये आवश्यक असते. कर्म, भक्ती आणि ध्यान हे योगाचे तीन आधार असतात. तुम्ही या तिन्ही आधारांच्या साहाय्याने योग करू शकता किंवा दोन किंवा एका आधाराच्या साहाय्यानेही योग करू शकता. ज्याला रुढ अर्थाने ‘ध्यान’ असे म्हटले जाते तसे ध्यान करणे काही जणांना जमत नाही, परंतु अशी माणसं कर्माच्या किंवा भक्तीच्या द्वारे किंवा कर्म आणि भक्ती या दोहोंच्या एकत्रित माध्यमातून प्रगती करून घेतात. कर्म आणि भक्ती यांच्याद्वारे चेतनेचा विकास होतो आणि सरतेशेवटी त्या चेतनेमध्ये सहजस्वाभाविक ध्यान आणि साक्षात्कार शक्य होतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 209)