Tag Archive for: श्रद्धा

भारताचे पुनरुत्थान – १४

उत्तरार्ध

इच्छाशक्ती ही सर्वशक्तिमान असते परंतु ती ‘ईश्वरी इच्छा’ असली पाहिजे; म्हणजे ती निःस्वार्थ, स्थिरचित्त आणि परिणामांबाबत निश्चिंत असली पाहिजे. येशू ख्रिस्ताने म्हटले होते की, “तुमच्याकडे मोहरीच्या दाण्याएवढी जरी श्रद्धा असेल तरी तुम्ही एखाद्या पर्वतासमोर उभे राहून त्याला आवाहन करू शकता आणि तुम्ही तसे केल्यावर तो खरोखरच तुमच्यापाशी येईल.” येथे ‘श्रद्धा’ या शब्दाचा अर्थ वास्तविक ‘ईश्वरी इच्छे’सहित परिपूर्ण श्रद्धा असा आहे. श्रद्धा तर्कवितर्क करत बसत नाही, तिला जाण असते. कारण दृष्टीवर तिची सत्ता असल्याने, ईश्वरी इच्छा काय आहे हे त्या दृष्टीला स्पष्ट दिसते आणि तिला हेसुद्धा ज्ञात असते की, जे घडणार आहे ते ईश्वराच्या इच्छेनुसारच घडणार आहे. श्रद्धा अंध नसते; उलट आध्यात्मिक दृष्टी उपयोगात आणल्यामुळे श्रद्धा सर्वज्ञ बनू शकते.

इच्छाशक्ती ही सर्वव्यापीसुद्धा असते. ती ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात येते त्या सर्वांमध्ये स्वतःहून झेपावून प्रवेश करू शकते आणि स्वतःची शक्ती, तिचा विचार, तिचा सळसळता उत्साह तात्पुरत्या किंवा स्थायी स्वरूपात ती त्या सर्वांना प्रदान करू शकते. एकांतवासात राहणाऱ्या एखाद्या माणसाचा विचार हा, निःस्वार्थ व निःशंक संकल्पशक्तीचा अवलंब केल्यामुळे, राष्ट्राचा विचार बनू शकतो. एखाद्या एकट्या वीराची इच्छा ही लाखो भित्र्या लोकांच्या हृदयांमध्येदेखील धैर्य निर्माण करू शकते. ही साधना आपण सिद्धीस नेलीच पाहिजे. आपल्या मुक्तीची ही पूर्वअट आहे.

आपण आजवर अपरिपूर्ण श्रद्धेसहित सदोष व अपूर्ण इच्छा आणि अपरिपूर्ण निरपेक्षता यांचा अवलंब करत आलो आहोत. वास्तविक, आपल्यासमोर असलेले कार्य हे पर्वत हलविण्यापेक्षा काही कमी कठीण आहे असे नाही. ते कार्य करू शकेल अशी शक्ती अस्तित्वात आहे. परंतु ती शक्ती आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या एका गुप्त दालनामध्ये दडून बसलेली आहे. आणि त्या दालनाच्या किल्ल्या ईश्वराच्या हातात आहेत. चला, आपण त्याचा शोध घेऊ या आणि त्याच्याकडे त्या किल्ल्या मागू या.

– श्रीअरविंद (CWSA 01 : 536-537)

भारताचे पुनरुत्थान – १३

पूर्वार्ध

लेखनकाळ : इ.स.१९१०
खरी अडचण ही आपल्या अवतीभोवती नसते; तर ती नेहमी आपल्या स्वत:मध्येच असते. व्यक्तीला अजेय बनविण्यासाठी संकल्पशक्ती, निरपेक्ष वृत्ती (Disinterestedness) आणि श्रद्धा या तीन गोष्टींची आवश्यकता असते. स्वतःला बंधमुक्त करून घेण्याची आपली इच्छा असू शकते, तसा संकल्पही केलेला असू शकतो पण पुरेशा श्रद्धेचा अभाव असू शकतो. आपल्यामध्ये स्वतःच्या परममोक्षाबद्दल श्रद्धा असू शकते पण त्यासाठी आवश्यक असणारी साधने वापरण्यासाठी जी इच्छा लागते त्या इच्छेचा अभाव आपल्याकडे असू शकतो. आणि जरी इच्छा व श्रद्धा या दोन्ही गोष्टी असल्या तरीसुद्धा, त्यांचा अवलंब आपण आपल्या कार्यफलाच्या आसक्तीला चिकटून राहून करत असण्याची शक्यता असते. किंवा तो अवलंब आपण अनिष्टकारक प्रतिक्रिया निर्माण करणाऱ्या द्वेषमूलक आवेगांनी, अंध उत्तेजनेने किंवा घाईघाईने जबरदस्तीने करत असण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच, अशा प्रकारच्या भव्य कार्यामध्ये, (स्वतःला बंधमुक्त करण्यासारख्या कार्यामध्ये) न भूतो न भविष्यति अशा अडथळ्यांवर मात करण्यासाठी म्हणून, मनाच्या आणि शरीराच्या शक्तींहूनही अधिक उच्च असणाऱ्या ‘शक्ती’चा आश्रय घेण्याची आवश्यकता असते. ही साधनेची गरज असते.

ईश्वर आपल्या अंतरंगामध्येच आहे; ‘सर्वशक्तिमान’, ‘सर्वव्यापी’, ‘सर्वज्ञ’ शक्ती’ या रूपामध्ये तो आपल्या अंतरंगामध्ये विराजमान आहे. त्या ईश्वराचे आणि आपले स्वरूप मूलतः एकसमानच आहे. आपण त्याच्या संपर्कात आलो आणि स्वतःला जर त्याच्या हाती सोपविले तर, तो आपल्यामध्ये त्याची स्वतःची शक्ती ओतेल आणि मग, आपल्यामध्येसुद्धा देवत्वाचा अंश आहे, आपल्यामध्ये त्या सर्वशक्तिमानतेचा, सर्वव्यापकत्वाचा आणि सर्वज्ञतेचा काही अंश आहे, ही अनुभूती आपल्याला येईल. मार्ग दीर्घ आहे, पण आत्मसमर्पणामुळे तो जवळचा होतो; मार्ग कठीण आहे पण परिपूर्ण विश्वासामुळे तो सुकर होतो.

– श्रीअरविंद (CWSA 01 : 536-537)

साधना, योग आणि रूपांतरण – २४९

मानसिक रूपांतरण

व्यक्तीकडे श्रद्धा आणि खुलेपणा, उन्मुखता (openness) असणे पुरेसे असते. याशिवाय, दोन प्रकारचे आकलन असते. एक प्रकार म्हणजे बुद्धीद्वारे होणारे आकलन आणि दुसरा प्रकार म्हणजे चेतनेद्वारे होणारे आकलन. बुद्धीद्वारे होणारे आकलन जर अचूक असेल तर ते आकलन असणे चांगले, परंतु असे आकलन अनिवार्यच असते, असे मात्र नाही. श्रद्धा आणि खुलेपणा असेल तर चेतनेमधून आकलन होऊ लागते. अर्थात, असे आकलन क्रमशः आणि अनुभवांच्या पायऱ्या ओलांडल्यानंतरच होण्याची शक्यता असते. मी काही अशा व्यक्ती पाहिलेल्या आहेत की, ज्या फारशा शिकलेल्या नव्हत्या किंवा ज्यांच्यापाशी फारशी बौद्धिकता नव्हती मात्र तरीही त्यांनी चेतनेच्या साहाय्याने, योगमार्गाचे परिपूर्ण आकलन करून घेतले होते. पण बुद्धिवादी माणसं मात्र मोठ्या चुका करतात. उदाहरणार्थ, अशी माणसं विरक्त मानसिक अविचलतेलाच (quietude) आध्यात्मिक शांती समजतात आणि मार्गावर अजून प्रगत होण्यासाठी, त्या अविचल अवस्थेतून बाहेर पडण्यास नकार देतात.
*
मनाद्वारे मिळालेली माहिती (जी नेहमीच अनुभवविरहित असते त्यामुळे तिचे योग्य रीतीने आकलन होत नाही.) ही साहाय्यक ठरण्याऐवजी अपायकारक ठरण्याची शक्यता असते. वास्तविक, या गोष्टींबाबत कोणतेही निश्चित असे मानसिक ज्ञान नसते, त्यामध्ये अगणित प्रकारचे वैविध्य असते. मानसिक माहितीच्या उत्कंठेच्या पलीकडे जायला आणि ज्ञानाच्या खऱ्या मार्गाप्रत खुले व्हायला तुम्ही शिकलेच पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 53, 10)

साधना, योग आणि रूपांतरण – १५६

पूर्णयोगांतर्गत भक्ती

‘देवा’वर श्रद्धा असणे, ‘देवा’वर भरवसा ठेवणे, ‘दिव्य शक्ती’ला समर्पण व आत्मदान करणे या आवश्यक, अनिवार्य गोष्टी आहेत. पण ‘देवा’वरील भरवसा हा, कनिष्ठ प्रकृतीच्या आवेगांच्या अधीन होण्याचे, किंवा दुर्बलता, निरुत्साह यासाठीचे निमित्त ठरता कामा नये. ‘दिव्य सत्या’च्या मार्गामध्ये जे काही आड येईल त्या सर्वांना सातत्याने नकार देत आणि अथक अभीप्सा बाळगत विश्वासाने मार्गक्रमण केले पाहिजे.

‘ईश्वरा’प्रत समर्पण हे, स्वतःच्या इच्छांच्या, कनिष्ठ गती-प्रवृत्तींच्या अधीन होण्याचे, किंवा स्वतःच्या अहंकाराच्या अधीन होण्याचे किंवा ‘ईश्वरा’चे मायावी रूप धारण केलेल्या, अज्ञान व अंधकाराच्या कोणत्यातरी शक्तींच्या अधीन होण्याचे एक कारण, एक निमित्त होता उपयोगाचे नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 87)

साधना, योग आणि रूपांतरण – ६७

नाउमेद न होता किंवा निराशेच्या गर्तेत जाऊन न पडता अडचणींवर मात करण्यासाठी, (तुम्हाला तुमच्यामध्ये असणाऱ्या) सातत्यपूर्ण उत्कट अभीप्सेचे आणि ईश्वराभिमुख झालेल्या अविचल आणि अढळ इच्छेचे साहाय्य लाभते. परंतु अडीअडचणी येतच राहतात कारण त्या मानवी प्रकृतीमध्येच अंतर्भूत असतात. आंतरिक अस्तित्वामध्ये (ईश्वरविषयक) ओढीचा एक प्रकारे अभाव जाणवत आहे, (त्या दृष्टीने) कोणतीच पावले पडत नाहीयेत असे वाटत राहणे, अशा प्रकारचे साधनेमधील विरामाचे कालावधी अगदी उत्तम साधकांबाबत सुद्धा असतात.

(तुमच्यामधील) भौतिक प्रकृतीमध्ये काही अडचण उद्भवली असेल तर तिचे निराकरण करण्यासाठी किंवा पडद्यामागे काही तयारी चाललेली असेल तर त्यासाठी किंवा तशाच काही कारणासाठी अशा प्रकारचे विरामाचे कालावधी येत असतात.

मन आणि प्राण, जे अधिक घडणसुलभ असतात, त्यांच्यामध्ये जेव्हा साधनेचे कार्य चालू असते तेव्हा अशा प्रकारचे कालावधी वारंवार येतात आणि जेथे शरीराचा प्रश्न असतो (साधना जेव्हा शारीर स्तरावर चालू असते तेव्हा) ते अनिवार्यपणे येतातच. आणि तेव्हा ते सहसा कोणत्याही दृश्य संघर्षाद्वारे दिसून येत नाहीत तर, पूर्वी ज्या ऊर्जा कार्यरत असायच्या त्या आता अचल आणि जड झाल्याचे जाणवणे (यामधून त्या विरामाच्या कालावधीची जाणीव होते.) मनाला ही गोष्ट फार त्रासदायक वाटते कारण आता सारेकाही संपले आहे, प्रगतीसाठी आपण अक्षम झालो आहोत, अपात्र ठरलो आहोत असे काहीसे त्याला वाटू लागते. परंतु वस्तुतः ते तसे नसते.

तुम्ही अविचल राहिले पाहिजे आणि (ईश्वरी शक्तीच्या) कार्याप्रति स्वतःला खुले करत गेले पाहिजे किंवा (किमान) तसे करण्याची इच्छा बाळगत राहिली पाहिजे. तसे केल्यास नंतर अधिक प्रगती घडून येईल. अशा कालावधीमध्ये बरेच साधक नैराश्यवृत्तीमध्ये जातात आणि त्यांची भावी (काळा) वरील श्रद्धाच ढळल्यासारखे होते आणि त्यामुळे पुनरूज्जीवनासाठी विलंब होतो, मात्र हे टाळले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 67)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२५)

(भगवद्गीतेमध्ये आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी या चार प्रकारच्या भक्तांचे उल्लेख आले आहेत. त्यातील ‘अर्थार्थी’ भक्ताच्या भक्तीविषयी एका साधकाने श्रीअरविंदांना काही प्रश्न विचारला असावा असे दिसते. त्याला श्रीअरविंद यांनी दिलेले उत्तर…)

‘ईश्वरा’कडून काहीतरी मिळावे म्हणूनच केवळ ईश्वर-प्राप्तीची धडपड करायची हा दृष्टिकोन उचित नाही, हे उघडच आहे; पण (अशा गोष्टी मिळवायच्या असतील तर ‘ईश्वरा’कडे वळूच नका असे सांगून) त्यांना पूर्ण मज्जाव केला तर जगातील बहुतांशी माणसं ‘ईश्वरा’कडे कधीच वळणार नाहीत. माणसांची ईश्वराभिमुख होण्यास किमान सुरूवात तरी व्हावी म्हणून या गोष्टींना मुभा देण्यात आलेली आहे असे मला वाटते – त्यांच्यामध्ये श्रद्धा असल्यास, त्यांनी जे मागितले आहे ते त्यांना मिळू शकेल आणि मग या मार्गाने पुढे जाणे बरे आहे, असे त्यांना वाटू लागेल परंतु पुढे कधीतरी अचानकपणे एके दिवशी, ‘हे असे करणे बरं नाही’, (काहीतरी मागण्यासाठीच ‘ईश्वरा’कडे वळायचे हे बरं नाही) या विचारापाशी ते येऊन पोहोचतील; ‘ईश्वरा’भिमुख होण्याचे अधिक चांगले मार्ग आहेत आणि अधिक चांगल्या वृत्तीने ‘ईश्वरा’कडे वळले पाहिजे, हे त्यांना कळेल.

त्यांना जे हवे होते ते त्यांना मिळाले नाही आणि तरीसुद्धा जर ते ‘ईश्वरा’भिमुख झाले आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तर, आता त्यांची (ईश्वराभिमुख होण्याची) तयारी होत आहे हे दिसून येते. ज्यांची अजूनपर्यंत तयारी झालेली नाही अशा लोकांसाठीची ती (अर्थार्थी दृष्टिकोन ही) बालवाडी आहे, असे समजून आपण त्याकडे पाहूया. पण अर्थातच हे काही आध्यात्मिक जीवन नव्हे, हा केवळ एक अगदी प्राथमिक धार्मिक दृष्टिकोन झाला.

काहीतरी देणे आणि (त्या मोबदल्यात) कशाचीही मागणी न करणे हा आध्यात्मिक जीवनाचा नियम आहे. तथापि साधक, त्याचे आरोग्य उत्तम राहावे किंवा त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी, त्याच्या साधनेचा एक भाग म्हणून, ‘ईश्वरी शक्ती’ची मागणी करू शकतो; जेणेकरून आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी त्याचे शरीर सक्षम होईल, सुयोग्य होईल आणि तो ‘ईश्वरी कार्या’साठी एक सक्षम साधन बनू शकेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 08-09)

अमृतवर्षा २१

व्यक्तीमध्ये श्रद्धा नसेल तर तिला प्रार्थना करणे अवघड जाते. परंतु स्वत:ची श्रद्धा वाढविण्याचेच एक साधन म्हणून व्यक्ती प्रार्थना करू शकली तर…. किंवा श्रद्धा निर्माण व्हावी अशी अभीप्सा ती बाळगू शकली तर… यापैकी बहुतांशी सगळ्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता असते.

व्यक्तीकडे एखादी गोष्ट नसेल आणि ती व्यक्तीला हवी असेल, तर त्यासाठी अतिशय सातत्यपूर्ण प्रयत्नांची, सातत्याने आस बाळगण्याची, दृढ संकल्पाची आणि प्रत्येक क्षणी प्रामाणिक राहण्याची नितांत आवश्यकता असते. तेव्हा मग एक ना एक दिवस, ती गोष्ट घडून येईल अशी खात्री व्यक्तीला बाळगता येईल – कधीकधी ती गोष्ट अगदी क्षणार्धातदेखील घडून येऊ शकते.

अशी काही माणसं असतात की, त्यांच्यापाशी श्रद्धा असते पण अशा काही वेळा असतात की, जेव्हा त्यांच्यामध्ये असणारी विरोधी स्पंदनं (पृष्ठभागावर) येतात आणि त्यांच्यावर हल्ला करतात. (परंतु) जर त्यांची इच्छा प्रामाणिक असेल तर अशी माणसं या हल्ल्यांपासून त्यांच्या श्रद्धेचा बचाव करू शकतात, अशा हल्ल्यांना परतवून लावू शकतात.

काही जण असे असतात की, जे शंका जोपासतात कारण त्यामध्ये त्यांना एक प्रकारची मजा वाटते – परंतु त्याच्या इतके भयानक दुसरे काही नाही. असे करणे म्हणजे किटकाला फळामध्ये खुशाल राहू देण्यासारखे आहे, त्याची परिणती ते फळ संपून जाण्यात होणार. अशा प्रकारचे कोणतेही स्पंदन हे सहसा प्रथम मनात निर्माण होते – अशा वेळी व्यक्तीने पहिली कोणती गोष्ट केली पाहिजे तर, ती म्हणजे तिने ठाम राहिले पाहिजे आणि त्या शंकेला नकार दिला पाहिजे. आता काय घडते ते पाहू या, असे म्हणून त्याकडे पाहत राहणे टाळले पाहिजे कारण अशा प्रकारचे कुतूहल हे अतिशय घातक असते.

जे सरळ, साधे आहेत, प्रांजळ आहेत, सरळमार्गी आहेत, कोणतीही बौद्धिक जटिलता ज्यांच्यामध्ये नाही अशा माणसांपेक्षा बुद्धिवादी व्यक्तींना श्रद्धा बाळगणे हे कदाचित अधिक कठीण असते. परंतु मला वाटते, एखाद्या बुद्धिवादी माणसाकडे जर श्रद्धा असेल तर ती एक अतिशय शक्तिशाली गोष्ट ठरते, ज्यामधून चमत्कारदेखील घडून येऊ शकतात.

– श्रीमाताजी [CWM 06 : 121]

तुम्ही जेव्हा योगमार्गाकडे वळता तेव्हा, तुमच्या सर्व मानसिक रचना आणि तुमचे सर्व प्राणिक मनोरे कोलमडून पडले तरी चालतील अशी स्वत:ची तयारी ठेवली पाहिजे. तुमच्या श्रद्धेखेरीज तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीचा आधार नाही अशा निराधार अवस्थेत हवेत लोंबकळत राहण्याची तुमची तयारी असली पाहिजे. तुम्ही तुमचा भूतकालीन ‘स्व’ आणि त्याला चिकटून असलेले सर्व काही पूर्णांशाने विसरले पाहिजे, तुमच्या चेतनेमधून त्या गोष्टी तुम्ही बाहेर काढून टाकल्या पाहिजेत आणि सर्व प्रकारच्या बंधनांपासून मुक्त अशा स्थितीत नव्याने जन्माला आले पाहिजे.

तुम्ही काय होतात याचा विचार करू नका, तर तुम्ही काय बनण्याची इच्छा बाळगता त्याचाच विचार करा; तुम्ही जे प्रत्यक्षात अनुभवू इच्छित आहात त्या विचारांमध्येच तुम्ही असले पाहिजे. तुमच्या मृत भूतकाळाकडे पाठ फिरवा आणि थेट भविष्याकडे पाहा. ‘ईश्वर’ हाच तुमचा धर्म, ईश्वर हाच तुमचा देश, ईश्वर हेच तुमचे कुटुंब.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 83-84)

व्यक्तीच्या अंतरंगात ईश्वरी कृपेविषयी जर अशी श्रद्धा असेल की, ‘ईश्वरी कृपा’ माझ्याकडे लक्ष ठेवून आहे आणि काहीही झाले तरी ईश्वरी कृपा आहेच, आणि ती माझ्यावर लक्ष ठेवून आहे तर, तिच्या साहाय्याने व्यक्ती कोणत्याही संकटामधून पार होऊ शकते, व्यक्ती अशी श्रद्धा नेहमीच, आयुष्यभर बाळगू शकते. या श्रद्धेच्या साहाय्याने व्यक्ती सर्व अडचणींना सामोरी जाऊ शकते, अशा व्यक्तीला कोणतीही गोष्ट विचलित करू शकत नाही कारण तिच्यापाशी श्रद्धा असते आणि ईश्वरी कृपादेखील तिच्यासोबत असते.

श्रद्धा अनंतपटीने शक्तिशाली, अधिक सचेत, दीर्घायू अशी शक्ती असते; …ती ईश्वरी कृपेखेरीज अन्य कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नसते आणि म्हणून ती ‘सत्या’वरच विसंबून असते आणि त्यामुळे तिला कोणतीही गोष्ट विचलित करू शकत नाही.

– श्रीमाताजी [CWM 05 : 297]

आपण भलेही अज्ञानी असलो, चुका करत असलो, दुर्बल असलो आणि आपल्यावर विरोधी शक्तींचे हल्ले होत असले तरी, आणि बाह्यतः तत्काळ अपयश आलेले दिसत असले तरीही, तो ‘ईश्वरी संकल्प’ आपल्याला मार्गदर्शन करत आहे, तो आपल्याला सर्व प्रकारच्या परिस्थितीमधून, त्या अंतिम साक्षात्काराकडेच घेऊन जात आहे, अशी श्रद्धा आपण बाळगली पाहिजे. ही श्रद्धा आपल्याला समत्व प्रदान करेल; आणि ही श्रद्धाच, जे काही घडते ते अंतिम स्वरूपाचे नसून, मार्गावर वाटचाल करत असताना, या सर्व गोष्टींमधून जावेच लागते, या गोष्टीचा स्वीकार करते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 91)