Tag Archive for: शांती

नैराश्यापासून सुटका – २२

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

प्राणिक अस्वस्थतेमध्ये आणि उदासीनतेमध्ये रममाण होण्याची तुमची वृत्ती पुन्हा एकदा उफाळून आली आहे, असे तुम्ही लिहिलेल्या पत्रावरून दिसते. त्यासाठी तिला विशेष असे काही कारण लागत नाही, पण स्वतःचे पोषण व्हावे म्हणून ती प्रत्येक गोष्टीचाच ताबा घेते; वस्तुतः ही मज्जातंतूंच्या दुर्बलतेची केवळ जुनाट अशी सवय आहे. व्यक्ती जेवढी अधिक कुढत बसते, तेवढी उदासीनता अधिकच वाढत राहते.

त्यावर मात करण्याचे तीन मार्ग आहेत. स्वतःमध्ये रमण्यापेक्षा अन्य कोणत्यातरी गोष्टीमध्ये रस घेणे आणि त्यात स्वतःला गुंतवून ठेवणे तसेच तुमच्या मन:स्थितीचा शक्य तितका कमीत कमी विचार करणे, हा पहिला मार्ग आहे.

दुसरा मार्ग म्हणजे या प्राणिक अस्वस्थतेपासून आणि उदासीनतेपासून स्वतःला शक्य तितके विलग करणे आणि त्यांना (धीराने) सामोरे जाणे. जसे तुम्ही आत्ता करत आहात त्याप्रमाणे, त्यांचा स्वीकार करण्यास जोमाने आणि निर्धारपूर्वक नकार देणे.

तिसरा मार्ग म्हणजे ‘श्रीमाताजीं’च्या शांतीला आवाहन करण्यासाठी, मनाला ऊर्ध्वमुख करण्याची सवय लावून घेणे. ती शांती ऊर्ध्वस्थित आहे आणि तुम्ही जर स्वतःला खुले केलेत तर, ती खाली अवतरित होण्याची प्रतीक्षा करत आहे. ती शांती जर अवतरली तर, ती तुमची या दुःखभोगापासून, त्रासापासून कायमची सुटका करेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 180-181)

जीवन जगण्याचे शास्त्र – २३

आपली (कनिष्ठ) प्रकृती ही गोंधळाच्या, अव्यवस्थेच्या आधारे कार्य करत असते. तिला कृती करणे जणू भागच असते म्हणून ती अस्वस्थपणे कृती करत राहते. पण ईश्वर मात्र अगाध स्थिरतेच्या, शांतीच्या आधारे मुक्तपणे कार्य करत असतो. आपल्या आत्म्यावरील कनिष्ठ प्रकृतीची पकड आपल्याला नाहीशी करायची असेल तर, आपण प्रगाढ शांतीच्या खोल दरीत झेप घेतली पाहिजे आणि आपण त्या ईश्वराप्रमाणेच झाले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 23 : 365)

जीवन जगण्याचे शास्त्र – १६

तुम्ही जर ईश्वरी शक्तीप्रत आत्मदान करू शकत नसाल आणि तिच्या कार्यावर तुमचा विश्वास नसेल तर, तुम्हाला पूर्णयोग करता येणे शक्यच होणार नाही. तुम्ही जर केवळ मनामध्ये आणि मनाच्या शंकाकुशंका व कल्पना यांच्यामध्येच जीवन जगत असाल तर, तुमच्याबाबतीत पूर्णयोगाची शक्यताच निर्माण होत नाही. त्यासाठी मन शांत करण्याची क्षमता तसेच श्रीमाताजींची शक्ती म्हणजे महत्तर ईश्वरी शक्ती तुमच्यामध्ये कार्य करत आहे यावर विश्वास ठेवण्याची आणि त्याचा अनुभव घेण्याची क्षमता तुमच्याकडे असणे महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे तुमच्या प्रकृतीमध्ये त्या कार्याच्या आड येणारे जे जे काही असते त्यास नकार देत, त्या कार्याला साहाय्यभूत होण्याची क्षमता तुमच्याकडे असणे आवश्यक असते. या गोष्टी म्हणजे तुमच्यामध्ये पूर्णयोग करण्याची क्षमता आहे याची कसोटी असते.
*
तुम्हाला अस्वस्थ करणाऱ्या गोष्टींचा विचार करणे थांबविणे आणि शांती व शक्ती यांना स्वतःहून आविष्कृत होण्यास आणि तुमच्यामध्ये कार्य करू देण्यास वाव देणे याचा अर्थ ‘मन स्थिर-शांत करणे’ असा होतो. असे असेल तर ‘अंतरंगामध्ये राहणे’ (living inside) ही गोष्ट आपोआप घडून येईल. मग, त्याच्या बरोबरीने येणारी आंतरिक शांती आणि चेतना म्हणजेच तुम्ही स्वतः आहात असे तुम्हाला अधिकाधिक जाणवू लागेल आणि अन्य सर्व गोष्टी बाह्यवर्ती, वरवरच्या, उथळ असल्याचे देखील जाणवू लागेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 27-28)

जीवन जगण्याचे शास्त्र – १२

पूर्णयोगाची साधना करताना नेहमी गंभीर चेहऱ्याने वावरण्याची किंवा शांत शांत राहण्याची आवश्यकता नसते, पण योगसाधना मात्र गांभीर्याने घेणे आवश्यक असते. शांती आणि अंतर्मुख एकाग्रता या गोष्टींना या योगामध्ये फार मोठे स्थान आहे. अंतरंगात वळणे आणि तेथे ईश्वराला भेटणे हे जर व्यक्तीचे ध्येय असेल तर तिने स्वतःला सदासर्वकाळ बहिर्मुख ठेवून चालत नाही. पण म्हणून व्यक्तीने सदासर्वकाळ किंवा बहुतांश काळ गंभीर आणि उदास असले पाहिजे, असाही त्याचा अर्थ होत नाही.

…‘क्ष’मध्ये (एका साधकाचा येथे निर्देश आहे.) दोन व्यक्तिमत्त्वं दडलेली आहेत. त्यातील एकाला जीवनामध्ये (बहिर्मुखी) प्राणिक विस्तार हवाहवासा वाटतो तर त्यातील दुसऱ्याला आंतरिक जीवन हवेसे वाटते. त्यातील पहिले व्यक्तिमत्त्व अस्वस्थ होते कारण आंतरिक जीवन हे काही बहिर्मुख विस्ताराचे जीवन नसते. तर (आंतरिक ओढ असलेले) दुसरे व्यक्तिमत्त्व दुःखीकष्टी होते कारण त्याचे ध्येय प्रत्यक्षात उतरत नाही.

पूर्णयोगामध्ये दोहोंपैकी (आंतरिक आणि बाह्य) कोणतेच व्यक्तिमत्त्व सोडून देण्याची आवश्यकता नसते. परंतु बाह्य प्राणिक अस्तित्वाने, आधी आंतरिक अस्तित्व प्रस्थापित होण्यासाठी वाव दिला पाहिजे, त्याला प्राधान्य दिले पाहिजे आणि त्याने (बाह्य प्राणिक अस्तित्वाने) आत्म्याचे साधन बनण्यासाठी व आंतरिक जीवनाचे कायदे पाळण्यासाठी संमती दिली पाहिजे.

ही गोष्ट मान्य करण्यास ‘क्ष’चे मन अजूनही नकार देत आहे. त्याला असे वाटते की, व्यक्तीने एकतर पूर्ण उदास, थंड आणि गंभीर असले पाहिजे; नाही तर, आंतरिक जीवनामध्ये भावनिक उकळ्या फुटल्या पाहिजेत आणि (उत्साहाचे) उधाण आणले पाहिजे. आंतरिक अस्तित्वाद्वारे प्राणिक अस्तित्वाचे शांत, आनंदी आणि प्रसन्नचित्त नियमन करणे ही गोष्ट काही अजून त्याच्या पचनी पडत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 175)

आत्मसाक्षात्कार – ०५

साधक : पूर्णयोगामध्ये ‘साक्षात्कारा’चे स्वरूप काय असते?

श्रीअरविंद : या योगामध्ये आपण सत्य-चेतना’ (Truth-consciousness) समग्र अस्तित्वामध्ये उतरवू इच्छित आहोत. अस्तित्वाचा कोणताही भाग त्याविना रिक्त राहता कामा नये. हे कार्य स्वयमेव ‘उच्चतर शक्ती’द्वारेच केले जाऊ शकते. मग तुम्ही काय करणे आवश्यक असते? तर, तुम्ही स्वतःला तिच्याप्रत खुले करायचे असते.

साधक : उच्चतर शक्तीच जर कार्य करणार असेल तर मग ती सर्व माणसांमध्येच ते का करत नाही?

श्रीअरविंद : कारण, सद्यस्थितीत, मनुष्य त्याच्या मनोमय अस्तित्वामध्ये, त्याच्या प्राणिक प्रकृतीमध्ये आणि त्याच्या शारीर-चेतनेमध्ये आणि त्यांच्या मर्यादांमध्ये बंदिस्त आहे. तुम्ही स्वतःला खुले केले पाहिजे. खुले करणे (an opening) म्हणजे मला असे म्हणायचे आहे की, ऊर्ध्वस्थित असणारी ‘शक्ती’ खाली अवतरित व्हावी म्हणून हृदयामध्ये अभीप्सा (Aspiration) बाळगली पाहिजे आणि ‘मना’मध्ये किंवा ‘मना’च्या वर असणाऱ्या पातळ्यांमध्ये त्या शक्तीप्रत खुले होण्याची इच्छा बाळगली पाहिजे.

उच्चतर शक्ती कार्य करू लागल्यावर प्रथम ती अस्तित्वाच्या सर्व भागांमध्ये शांती प्रस्थापित करते आणि ऊर्ध्वमुख खुलेपणा आणते. ही शांती म्हणजे केवळ मानसिक शांती नसते तर, ती शक्तीने ओतप्रोत भरलेली असते आणि त्यामुळे अस्तित्वामध्ये कोणतीही क्रिया घडली तरी समता, समत्व हा तिचा पाया असतो आणि शांती व समता कधीही विचलित होत नाहीत. ऊर्ध्वदिशेकडून शांती, शक्ती व हर्ष या गोष्टी अवतरित होतात. त्याचबरोबरीने उच्चतर शक्ती, आपल्या प्रकृतीच्या विविध भागांमध्ये परिवर्तन घडवून आणते, जेणेकरून हे भाग उच्चतर शक्तीचा दबाव सहन करू शकतील.

टप्प्याटप्प्याने आपल्यामध्ये ज्ञानदेखील विकसित व्हायला लागते आणि ते आपल्या अस्तित्वामधील कोणत्या गोष्टी काढून टाकणे आवश्यक आहे आणि कोणत्या गोष्टी जपून ठेवणे आवश्यक आहे हे आपल्याला दाखवून देते. खरंतर, ज्ञान आणि मार्गदर्शन दोन्ही गोष्टी एकत्रितपणे येतात. आणि त्यासाठी तुम्ही त्या मार्गदर्शनाला सातत्याने संमती देणे आवश्यक असते. एका बाजूपेक्षा दुसऱ्या बाजूने होणारी प्रगती काहीशी अधिक होत आहे, असे असू शकते. परंतु काहीही असले तरी, उच्चतर शक्तीच कार्य करत असते. बाकी सर्व गोष्टी या अनुभव आणि शक्तीच्या गतिविधीशी संबंधित असतात.

– श्रीअरविंद (Evening talks with Sri Aurobindo : 34-35)

श्रीमाताजी आणि समीपता – १०

व्यक्ती जोपर्यंत अंतरंगामध्ये जीवन जगत नाही तोपर्यंत व्यक्तीला चिरकाळ टिकेल अशा स्वरूपाचा आनंद मिळणे शक्य नाही. आपले कर्म, आपल्या कृती या श्रीमाताजींना अर्पण केल्याच पाहिजेत, त्या त्यांच्यासाठी म्हणूनच केल्या गेल्या पाहिजेत, त्यामध्ये तुमचा स्वतःसाठीचा विचार, तुमच्या स्वतःच्या कल्पना, तुमचे अग्रक्रम, तुमच्या भावना, पसंती-नापसंती या गोष्टी असता कामा नयेत. आणि जर अशा गोष्टींवर व्यक्तीची नजर असेल तर तिला प्रत्येक पावलागणिक मन किंवा प्राणामध्ये संघर्षाचा सामना करावा लागतो. तसेच समजा जरी व्यक्तीचे मन व प्राण तुलनेने शांत झालेले असले तरीही शरीरामधील आणि मज्जातंतूमधील संघर्षाला तिने सामोरे जाणे अजून बाकी असते. व्यक्ती जेव्हा अंतरंगातून श्रीमाताजींपाशी राहते तेव्हाच फक्त शांती आणि आनंद स्थिर राहू शकतात.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 460)

साधना, योग आणि रूपांतरण – २२९

इच्छा, राजसिकता आणि अहंकार यांना दिलेल्या नकारामुळे व्यक्तीला अशी अचंचलता आणि शुद्धता प्राप्त होते की, ज्यामध्ये अनिर्वचनीय ‘शांती’ अवतरू शकते. व्यक्तीने स्वतःची इच्छा ‘ईश्वरा’प्रत अर्पण केली, तिने स्वतःची इच्छा ही ‘ईश्वरी ‘संकल्पा’मध्ये मेळविली (merging) तर व्यक्तीच्या अहंकाराचा अंत होतो आणि व्यक्तीला वैश्विक चेतनेमध्ये व्यापकता प्राप्त होते किंवा विश्वातीत असलेल्या गोष्टीमध्ये तिचे उन्नयन होते. व्यक्तीला ‘प्रकृती’पासून ‘पुरुषा’चे विलगीकरण अनुभवास येते आणि बाह्य प्रकृतीच्या बेड्यांपासून व्यक्तीची सुटका होते. व्यक्तीला तिच्या आंतरिक अस्तित्वाची जाणीव होते आणि बाह्यवर्ती अस्तित्व हे साधन असल्याचे जाणवते; ‘विश्वशक्ती’च व्यक्तीचे कार्य करत असल्याची आणि ‘आत्मा’ किंवा ‘पुरुष’ त्याकडे पाहात असल्याची किंवा तो साक्षी असून, मुक्त असल्याचे व्यक्तीला जाणवते. आपले कर्म हाती घेऊन, विश्व‘माता’ किंवा परम‘माता’च ते करत असल्याचे, किंवा हृदयापाठीमागून एक ‘दिव्य शक्ती’ त्या कर्माचे नियंत्रण करत आहे, किंवा ते कर्म करत आहे, असे व्यक्तीला जाणवते.

व्यक्तीने स्वतःची इच्छा आणि कर्म अशा रीतीने सतत ‘ईश्वरा’प्रत निवेदित केली तर, प्रेम आणि भक्ती वृद्धिंगत होते, चैत्य पुरुष पुढे येतो. ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘शक्ती’प्रत निवेदन केल्यामुळे, ती शक्ती आपल्या ऊर्ध्वस्थित असल्याचा अनुभव आपल्याला येऊ शकतो. आणि तिच्या अवतरणाची आणि उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या चेतनेप्रत व ज्ञानाप्रत आपण उन्मुख होत आहोत अशी जाणीव आपल्याला होऊ शकते.

सरतेशेवटी कर्म, भक्ती आणि ज्ञान एकत्रित येतात आणि आत्मपरिपूर्णत्व शक्य होते; त्यालाच आम्ही ‘प्रकृतीचे रूपांतरण’ असे संबोधतो. अर्थातच हे परिणाम काही एकाएकी होत नाहीत, व्यक्तीची परिस्थिती आणि तिचा विकास यांनुसार, ते कमीअधिक धीमेपणाने, कमीअधिक समग्रतेने दिसून येतात.

ईश्वरी साक्षात्कारासाठी कोणताही सोपा राजमार्ग नाही. सर्वंकष आध्यात्मिक जीवनासाठी ‘गीता’प्रणीत ‘कर्मयोग’ मी अशा रीतीने विकसित केला आहे. तो कोणत्याही अनुमानावर आणि तर्कावर आधारलेला नाही तर, तो अनुभूतीवर आधारलेला आहे. त्यामधून ध्यान वगळण्यात आलेले नाही आणि त्यातून भक्तीदेखील नक्कीच वगळण्यात आलेली नाही. कारण ‘ईश्वरा’प्रत आत्मार्पण, ‘ईश्वरा’प्रत स्वतःच्या सर्वस्वाचे निवेदन हा जो ‘कर्मयोगा’चा गाभा आहे, तोच मूलतः भक्तीचा देखील एक मार्ग आहे.

एवढेच की, जीवनापासून पलायन करू पाहणाऱ्या एकांतिक अशा ध्यानाला तसेच, स्वतःच्याच आंतरिक स्वप्नामध्ये बंदिस्त होऊन राहणाऱ्या भावनाप्रधान भक्तीला मात्र पूर्णयोगाची समग्र प्रक्रिया म्हणून स्वीकारण्यात आलेले नाही. एखादी व्यक्ती तास न् तास ध्यानामध्ये पूर्णपणे गढून जात असेल किंवा आंतरिक अविचल आराधना आणि परमानंदामध्ये तास न् तास निमग्न होत असेल, तरीसुद्धा या गोष्टी म्हणजे समग्र पूर्णयोग नव्हे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 216-218)

साधना, योग आणि रूपांतरण – २१८

उत्तरार्ध

योगसाधना करताना पुष्कळजण मन, प्राण, शरीरात स्थित असतात, अधूनमधून अथवा काही प्रमाणात उच्च मनाने आणि प्रदीप्त मनाने उजळून जातात. पण ‘अतिमानसिक परिवर्तना’च्या (supramental change) तयारीसाठी, ‘अंतर्ज्ञान’ (Intuition) आणि ‘अधिमानस’ (Overmind) यांप्रत (शक्य तितक्या लवकर, व्यक्तिश: तशी वेळ येताच) उन्मुख होणे आवश्यक असते. कारण त्यामुळे समग्र अस्तित्व आणि समग्र प्रकृती अतिमानसिक परिवर्तनासाठी सुसज्ज बनवता येऊ शकेल. शांतपणे विकसित होण्यासाठी व विशाल होण्यासाठी चेतनेला मुभा द्या आणि मग हळूहळू या गोष्टींचे ज्ञान होत जाईल.

शांती, विवेक, अलिप्तता (पण उदासीनता किंवा अनुत्साह नव्हे) या बाबी फार महत्त्वाच्या आहेत, कारण त्यांच्या विरोधी असणाऱ्या गोष्टी रूपांतर-क्रियेत खूपच अडथळा निर्माण करतात. अभीप्सेची उत्कटता असली पाहिजे पण ती शांती, विवेक, अलिप्तता या सर्वांच्या बरोबरीने असायला हवी. घाई नको, आळस नको, राजसिक अति-उत्कंठा नको आणि तामसिक नाउमेदीचा हतोत्साहदेखील नको. तर स्थिर आणि सातत्यपूर्ण पण शांत आवाहन व कार्य हवे. साक्षात्कार झालाच पाहिजे असा अट्टाहास असता कामा नये, तर अंतरंगातून आणि वरून येण्यास त्याला मुभा दिली पाहिजे. त्याचे क्षेत्र, त्याचे स्वरूप, त्याच्या मर्यादा यांचे अचूक निरीक्षण केले पाहिजे. श्रीमाताजींची शक्ती तुमच्यात कार्य करू दे, मात्र त्यामध्ये कोणत्याही निम्न गोष्टींची मिसळण होऊ नये यासाठी सावध राहा. पुष्ट झालेल्या अहंभावाच्या कृती किंवा सत्याचा वेश धारण केलेली अज्ञानाची शक्ती या गोष्टी तर तिची जागा घेत नाही ना याची काळजी घ्या. विशेषत: प्रकृतीमधील सर्व अंधकार आणि अचेतनता यांचा निरास होवो अशी अभीप्सा बाळगा. अतिमानसिक परिवर्तनाच्या तयारीसाठी आवश्यक असणाऱ्या या मुख्य अटी आहेत; पण त्यांपैकी एकही गोष्ट सोपी नाही, आणि प्रकृती सज्ज झाली आहे असे म्हणण्यासाठी, त्यापूर्वी या अटींची परिपूर्ती होणे आवश्यक असते.

जर योग्य दृष्टिकोन प्रस्थापित करता आला (आत्मिक, निरहंकारी आणि केवळ दिव्य शक्तीलाच उन्मुख असणारी वृत्ती) प्रस्थापित करता आली तर ही प्रक्रिया पुष्कळ जलद गतीने होऊ शकते. योग्य वृत्ती स्वीकारणे आणि ती टिकवून ठेवणे, तसेच पुढे जाऊन स्वत:मध्ये बदल घडविणे अशा प्रकारचा हातभार तुम्ही लावू शकता. सर्वसाधारण बदल घडून येण्यासाठी साहाय्यकारी ठरेल अशी ही एक गोष्ट आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 333-334)

साधना, योग आणि रूपांतरण – १८९

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०५

ऊर्ध्वगामी उन्मुखता (upward opening) ही अपरिहार्यपणे फक्त शांती, नीरवता आणि ‘निर्वाणा’कडेच घेऊन जाते असे नाही. साधकाला आपल्या वरच्या दिशेस, जणूकाही आपल्या मस्तकाच्या वरच्या बाजूस असणाऱ्या व्यापकतेची आणि सर्व भौतिक व अतिभौतिक प्रदेश व्यापून टाकणाऱ्या एका महान, अंतिमत: एक प्रकारच्या अनंत शांतीची, नीरवतेचीच जाणीव होते असे नाही तर, त्याला इतर गोष्टींचीही जाणीव होते. सर्व ऊर्जा ज्यामध्ये सामावलेली असते अशा एका महान ‘शक्ती’ची, सर्व ज्ञान ज्यामध्ये सामावलेले असते अशा एका महा‘प्रकाशा’ची, सर्व आनंद आणि हर्ष ज्यामध्ये सामावलेला असतो अशा एका अपार ‘आनंदा’ची साधकाला जाणीव होते. सुरूवातीला या गोष्टी अनिवार्य आवश्यक, अनिश्चित, निरपवाद, साध्या, केवल अशा स्वरूपात त्याच्या समोर येतात. निर्वाणामध्ये उपरोक्त साऱ्या गोष्टी शक्य असल्याचे त्याला वाटते.

परंतु पुढे त्याला हेही आढळते की, या ‘दिव्य शक्ती’मध्ये अन्य शक्ती सामावलेल्या आहेत, या ‘दिव्य प्रकाशा’मध्ये अन्य सारे प्रकाश, या ‘दिव्य आनंदा’मध्ये शक्य असणारे सारे हर्ष आणि आनंद सामावलेले आहेत. आणि या साऱ्या गोष्टी आपल्यामध्येही अवतरित होऊ शकतात, हेही त्याला उमगू लागते. फक्त शांतीच नव्हे तर यांपैकी कोणतीही एक किंवा सर्व गोष्टी अवतरित होऊ शकतात. एवढेच की परिपूर्ण स्थिरता आणि शांती यांचे अवतरण घडवणे हे सर्वाधिक सुरक्षित असते कारण त्यामुळे इतर सर्व गोष्टींचे अवतरण हे अधिक निर्धोक होते. अन्यथा, बाह्य प्रकृतीला एवढी ‘शक्ती’, ‘प्रकाश’, ‘ज्ञान’ किंवा ‘आनंद’ धारण करणे किंवा तो पेलणे अवघड जाऊ शकते. आपण जिला ‘उच्चतर, आध्यात्मिक किंवा दिव्य चेतना’ असे म्हणतो, तिच्यामध्ये वरील सर्व गोष्टींचा अंतर्भाव होतो.

हृदय-चक्राच्या माध्यमातून येणारा आंतरात्मिक खुलेपणा (Psychic opening) आपल्याला मूलतः व्यक्तिगत ‘ईश्वरा’च्या, आपल्याशी असलेल्या ‘ईश्वरा’च्या आंतरिक नात्याच्या संपर्कात आणतो. हा विशेषतः प्रेम आणि भक्तीचा मूलस्रोत असतो. ऊर्ध्वमुखी उन्मुखता (Upward opening) थेटपणे आपले नाते समग्र ‘ईश्वरा’शी जोडून देते आणि ती उन्मुखता आपल्यामध्ये दिव्य चेतना निर्माण करू शकते, ती आपल्या आत्म्याचे एक किंवा अनेक नवजन्म घडवून आणू शकते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 326-327)

साधना, योग आणि रूपांतरण – ७३

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)
चेतना अंतरंगामध्ये प्रविष्ट झाल्याचा तुम्हाला आलेला हा अनुभव म्हणजे ज्याला सामान्यत: ‘समाधी’ असे संबोधले जाते तो अनुभव होता. वास्तविक त्यातील सर्वाधिक महत्त्वाचा भाग म्हणजे मन आणि प्राणामध्ये (तुम्हाला) आलेला निश्चल-नीरवतेचा अनुभव, की जी नीरवता अगदी शरीरापर्यंत पूर्णपणे विस्तारित झाली होती.

निश्चल-नीरवतेची (silence) आणि शांतीची (peace) क्षमता प्राप्त होणे ही साधनेमधील सर्वाधिक महत्त्वाची पायरी असते. ती प्रथमतः ध्यानामध्ये प्राप्त होते आणि ती निश्चल-नीरवता चेतनेस अंतर्मुख करून, तिला समाधी-अवस्थेकडे नेण्याची शक्यता असते. परंतु नंतर ही क्षमता जाग्रतावस्थेमध्ये सुद्धा प्राप्त होणे आवश्यक असते आणि समग्र जीवन व कार्य यासाठी तिने एक स्थायी पाया म्हणून स्वतःला प्रस्थापित करणे आवश्यक असते. ही स्थिती ‘आत्म’साक्षात्कारासाठी आणि प्रकृतीच्या आध्यात्मिक रूपांतरणासाठी आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 248)