Tag Archive for: पृथ्वी

साधना, योग आणि रूपांतरण – ३१२

भव्य आणि गौरवशाली रूपांतरण

मानवाची महानता तो काय आहे यामध्ये नसून, तो काय करू शकतो यामध्ये सामावलेली आहे. मानव ही अशी एक बंदिस्त जागा आहे आणि जिवंत परिश्रमांची ती अशी एक गुप्त कार्यशाळा आहे की, ज्यामध्ये त्या ‘दिव्य कारागीरा’कडून ‘अतिमानवता’ घडवली जात आहे आणि हेच मानवाचे खरेखुरे वैभव आहे.

पण यापेक्षाही एका अधिक महानतेमध्ये त्याचा प्रवेश झाला आहे. ती महानता अशी की, कोणत्याही कनिष्ठ प्रजातींना मिळाली नाही अशी एक संधी त्याला मिळालेली आहे. मानवामध्ये होणाऱ्या दिव्य परिवर्तनाचा जाणीवसंपन्न ‘कारागीर’ होण्याची, त्या परिवर्तनामध्ये थोड्याफार प्रमाणात सहभागी होण्याची परवानगी त्याला मिळालेली आहे.

मात्र त्याच्या देहामध्ये ही महानता प्रत्यक्षात उतरावी याकरिता, म्हणजेच मानवी देहाचे अतिमानवामध्ये रूपांतर शक्य व्हावे याकरिता, मानवाची स्वेच्छापूर्वक संमती, त्याची एकदिश झालेली इच्छाशक्ती आणि त्याचा सहभाग यांची आवश्यकता आहे. त्याची ‘अभीप्सा’ ही पृथ्वीने त्या अतिमानसिक निर्मिकाला (Creator) दिलेली हाक आहे.

पृथ्वी आवाहन करेल आणि ‘परमेश्वर’ जर त्यास प्रतिसाद देईल तर, त्या भव्य आणि गौरवशाली रूपांतरणाची घटिका अगदी आत्तादेखील असू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 160)

(ही मालिका येथे समाप्त होत आहे.)

साधना, योग आणि रूपांतरण – ३०१

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

साधक : व्यक्ती ज्याप्रमाणे स्वतःचे सचेत (conscious) विचार नियंत्रित करू शकते त्याप्रमाणे ती स्वतःच्या अवचेतनावर (subconscient) नियंत्रण मिळविण्यास शिकू शकते का?

श्रीमाताजी : विशेषतः शरीर जेव्हा निद्रिस्त असते तेव्हा व्यक्ती अवचेतनाच्या संपर्कात येते. स्वतःच्या रात्रींविषयी सचेत झाल्यामुळे अवचेतनावर नियंत्रण मिळविणे अधिक सोपे होते. पेशी जेव्हा त्यांच्यामधील ‘ईश्वरा’विषयी सचेत होतात आणि त्या स्वेच्छेने ‘त्याच्या’ प्रभावाप्रत खुल्या होतात तेव्हा हे नियंत्रण सर्वांगीण होऊ शकते. गेल्या वर्षी (१९६९) या पृथ्वीवर जी चेतना अवतरित झाली होती ती चेतना या गोष्टीसाठीच कार्य करत आहे. हळूहळू शरीराच्या अवचेतनाच्या यांत्रिकतेची जागा ‘ईश्वरी उपस्थिती’च्या चेतनेने घेतली जात आहे आणि ती चेतना आता शरीराच्या संपूर्ण क्रियाकलापांवर शासन करू लागली आहे.

– श्रीमाताजी (CWM 14 : 365)

साधना, योग आणि रूपांतरण – १८३

(श्रीअरविंद येथे पारंपरिक योग व पूर्णयोग यातील फरक स्पष्ट करत आहेत.)

प्राचीन योगांच्या तुलनेत पूर्णयोग पुढील बाबतीत नावीन्यपूर्ण आहे.

१) जगापासून किंवा जीवनापासून निवृत्त होऊन स्वर्ग, निर्वाण यांच्याकडे प्रयाण करणे हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट नाही. उलट, हा योग जीवनामध्ये आणि अस्तित्वामध्ये परिवर्तन करण्याचे उद्दिष्ट बाळगतो. ते उद्दिष्ट गौण आणि अनुषंगिक आहे, असे पूर्णयोग मानत नाही तर तो त्यास वैशिष्ट्यपूर्ण आणि केंद्रवर्ती उद्दिष्ट मानतो.

अन्य योगांमध्ये ‘अवतरण’ (descent) असलेच तर, आरोहणाच्या (ascent) मार्गावरील एक घटना म्हणून किंवा आरोहणाचा परिणाम म्हणून ते घडून आलेले असते. अन्य योगांमध्ये ‘आरोहण’ हीच सत्य गोष्ट असते. पूर्णयोगात आरोहण हे अनिवार्य आहे परंतु त्याचा परिणाम म्हणून घडून येणारे ‘अवतरण’ हीच गोष्ट येथे निर्णायक असते आणि अवतरण हेच येथे आरोहणाचे अंतिम उद्दिष्ट मानण्यात आलेले आहे. आरोहणाद्वारे नवीन चेतनेचे अवतरण घडून येणे ही या साधनेनी उमटवलेली मोहोर आहे. ‘तंत्रयोग’ आणि ‘वैष्णव’ या संप्रदायांची परिसमाप्तीसुद्धा जीवनापासून सुटका करून घेण्यामध्ये होते; तर ‘जीवनाची दिव्य परिपूर्ती’ हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट आहे.

(२) व्यक्तीने केवळ स्वतःसाठी, स्वतःपुरता ‘ईश्वरा’चा साक्षात्कार करून घेऊन, व्यक्तिगत सिद्धी प्राप्त करून घ्यावी, हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट नाही. व्यक्तीने केवळ पारलौकिक उपलब्धीच नव्हे तर येथील पृथ्वीचेतनेसाठी, वैश्विक अशी काही प्राप्ती करून घ्यावी हेदेखील येथे अपेक्षित आहे. आजवर या पृथ्वी-चेतनेमध्ये, अगदी आध्यात्मिक जीवनामध्येसुद्धा सक्रिय नसलेली किंवा सुसंघटित नसलेली अतिमानसिक चेतनेची (supramental consciousness) शक्ती येथे आणणे आणि ती शक्ती सुसंघटित करणे आणि ती थेटपणे सक्रिय होईल हे पाहणे, ही गोष्टसुद्धा साध्य करून घ्यायची आहे.

(३) चेतनेचे आणि प्रकृतीचे संपूर्ण व समग्र परिवर्तन हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट आहे. ते जेवढे संपूर्ण व समग्र आहे तेवढीच त्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी पूर्वनिर्धारित करण्यात आलेली साधनापद्धतीदेखील तितकीच संपूर्ण व समग्र आहे. पूर्णयोगामध्ये जुन्या पद्धतींचा स्वीकार हा केवळ एक आंशिक क्रिया म्हणूनच केला जातो आणि त्या जुन्या साधनापद्धती त्याहूनही अधिक वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या साधनापद्धतींपर्यंत नेण्यात येतात.

अशी पद्धती पूर्णतः किंवा तिच्यासारखे काही, पूर्वीच्या योगांमध्ये समग्रतया प्रस्तावित केले आहे किंवा अशी काही पद्धती पूर्वीच्या योगांमध्ये अंमलात आणली गेली आहे असे, मला आढळले नाही. मला जर तशी पद्धती आढळली असती तर, मी हा (पूर्णयोगाचा) मार्ग निर्माण करण्यामध्ये माझा वेळ व्यर्थ दवडला नसता. जर हा मार्ग अगोदरच अस्तित्वात असता, निर्धारित करण्यात आलेला असता, अगोदरच त्याचा आराखडा पूर्णतः रेखाटलेला असता, तो चांगला उजळलेला असता, सुरक्षित आणि सर्वांसाठी खुला करण्यात आलेला असता तर मी सुखाने मार्गस्थ होऊन, माझ्या उद्दिष्ट-धामापर्यंत सुरक्षितपणे, त्वरेने पोहोचलो असतो. या शोधामध्ये आणि आंतरिक निर्मितीमध्ये मला तीस वर्षे खर्च करावी लागली नसती. जुन्याच मार्गांवरून पुन्हा एकवार वाटचाल हे आमच्या योगाचे स्वरूप नाही तर आमचा योग म्हणजे एक ‘आध्यात्मिक साहस’ आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 400 – 401)

विचारशलाका ४३

मानवाची महानता तो काय आहे यामध्ये नसून, तो काय करू शकतो यामध्ये सामावलेली आहे. मानव ही अशी एक बंदिस्त जागा आहे आणि जिवंत परिश्रमांची ती अशी एक गुप्त कार्यशाळा आहे की, ज्यामध्ये त्या दिव्य ‘शिल्पकारा’कडून ‘अतिमानवता’ (supermanhood) घडवली जात आहे आणि हेच मानवाचे खरेखुरे वैभव आहे.

पण यापेक्षाही एका अधिक महानतेमध्ये मानवाचा प्रवेश झाला आहे. ती महानता अशी की, कोणत्याही कनिष्ठ प्रजातींना मिळालेली नाही अशी एक संधी त्याला मिळालेली आहे. मानवामध्ये होणाऱ्या दिव्य परिवर्तनाचा जाणीवसंपन्न व सचेत कारागीर बनण्याची आणि त्या परिवर्तनामध्ये थोड्याफार प्रमाणात सहभागी होण्याची अनुमती त्याला मिळालेली आहे.

मात्र त्याच्या देहामध्ये ही महानता प्रत्यक्षात उतरावी याकरिता, म्हणजेच मानवी देहाचे अतिमानवामध्ये रूपांतरण शक्य व्हावे याकरता, मानवाची स्वेच्छापूर्वक संमती, त्याची पवित्र (consecrated) इच्छाशक्ती आणि त्याचा सहभाग यांची आवश्यकता आहे. मानवाची ‘अभीप्सा’ म्हणजे पृथ्वीने त्या ‘अतिमानसिक’ ‘सृष्टी-निर्माणकर्त्या’ला दिलेली हाक आहे.

पृथ्वी जर आवाहन करेल आणि तो ‘परमश्रेष्ठ’ (Supreme) त्याला प्रतिसाद देईल तर, त्या भव्य आणि गौरवशाली रूपांतरणाची घटिका अगदी आत्तादेखील असू शकते.

 

– श्रीअरविंद [CWSA 12 : 160]

विचारशलाका १६

ज्या क्षणी तुम्ही समाधान पावून, अभीप्सा बाळगेनासे होता, तेव्हापासून तुम्ही मरणपंथाला लागलेले असता. जीवन ही एक वाटचाल आहे, जीवन हा एक प्रयास आहे; जीवन म्हणजे पुढे चालत राहणे, भावी प्रकटीकरण आणि साक्षात्काराप्रत उन्नत होणे. विश्रांती घेण्याची इच्छा बाळगणे याइतकी दुसरी कोणतीच भयानक गोष्ट नाही.

*

प्रगती हेच पृथ्वीवरील जीवनाचे प्रयोजन आहे. तुम्ही जर प्रगत होत राहणे थांबविलेत तर तुम्ही मृत्युमुखी पडाल. प्रगत न होता जो कोणता क्षण तुम्ही व्यतीत करता, तो प्रत्येक क्षण तुम्हाला स्मशानाच्या एक पाऊल जवळ घेऊन जाणारा असतो.

– श्रीमाताजी [CWM 15 : 75]

आध्यात्मिकता ४५

(चेतना विशाल कशी करावी, या प्रश्नावर उत्तर देताना श्रीमाताजींनी आधी काही मार्ग सांगितले आणि त्या आता येथे त्याचा बौद्धिक मार्ग सांगत आहेत…)

तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टीचा कंटाळा आलेला असतो, तुम्हाला एखादी गोष्ट वेदनादायी किंवा अगदी असुखद वाटत असते, अशा वेळी जर तुम्ही काळाच्या (time) अनंततेचा आणि अवकाशाच्या (space) असीमतेचा विचार करायला सुरुवात केलीत, आजवर जे काही घडून गेले आहे आणि येथून पुढे जे घडणार आहे, त्याचा तुम्ही विचार केलात आणि आत्ताचा क्षण हा अनंत काळामधील खरोखरच एका उच्छ्वासाइतकाच आहे असा तुम्ही विचार केलात तर, काळाच्या अनंततेमध्ये असणाऱ्या या एका एवढ्याशा क्षणामुळे अस्वस्थ होणे हे तुम्हाला अगदीच हास्यास्पद वाटू लागेल. …खरोखरच, काळाच्या अनंततेमध्ये एका क्षणाचे मोल ते काय? खरोखरच व्यक्तीला हे प्रत्यक्षात उतरवता आले तर….

डोळ्यांसमोर दृश्य उभे करा, ज्या इवल्याशा पृथ्वीवर आपण वावरत असतो, ते आपण म्हणजे एक किती किरकोळ व्यक्ती आहोत, आणि त्यामध्ये चेतनेचा हा एक चिमुकला क्षण, जो आत्ता तुम्हाला त्रासदायक ठरतो आहे किंवा तुम्हाला तो असुखद वाटत आहे तो डोळ्यांसमोर आणा. वास्तविक, हा क्षण तुमच्या अस्तित्वाचा देखील एक अगदी छोटासा क्षण आहे. आणि खुद्द तुम्हीसुद्धा यापूर्वी अनेक जीवयोनींमधून येथवर आलेला असता आणि यापुढेही अनेक गोष्टी घडायच्या असतात. तेव्हा ज्या गोष्टी आत्ता तुमच्यावर एवढा परिणाम करत आहेत त्या अजून दहा वर्षांनी तुम्ही कदाचित पूर्णपणे विसरून गेला असाल किंवा जरी अगदी त्या आठवल्याच तर तुम्ही स्वतःच म्हणाल की, “मी या गोष्टीला इतके महत्त्व का दिले होते बरे?”

तुम्हाला खरोखरच जाणवू लागते… आपल्या जीवनाला, स्वतःला आणि आपल्याबाबतीत जे घडते आहे त्याला इतके महत्त्व देणे, हे किती हास्यास्पद आहे हे तुम्हाला जाणवू लागते. आणि तुम्ही जर ही गोष्ट अगदी सुयोग्य रीतीने केलीत तर, अगदी तीन मिनिटांच्या अवधीमध्ये, सारे दुःख नाहीसे होईल. इतकेच काय पण एखादी अगदी तीव्र वेदनासुद्धा या पद्धतीने नाहीशी होईल. आत्ता सांगितले त्याप्रमाणे एकाग्रता करायची आणि स्वतःला अनंताच्या आणि काळाच्या पटलावर ठेवायचे. सारे काही निघून जाते. आणि व्यक्ती शुद्ध होऊन बाहेर पडते. ही गोष्ट योग्य पद्धतीने कशी करायची हे माहीत असेल तर, व्यक्ती सर्व आसक्तीपासून, आणि अगदी निरतिशय दुःखामधून, सर्व गोष्टींमधून अशा पद्धतीने बाहेर पडू शकते. ही पद्धत तुम्हाला तुमच्या क्षुद्र अहंकारामधूनसुद्धा त्वरित बाहेर काढते.

– श्रीमाताजी [CWM 06 : 345-346]

आध्यात्मिकता २२

मनुष्य एकदा जरी स्वत:च्या आध्यात्मिकीकरणासाठी संमती देऊ शकला तरी सारेकाही बदलून जाईल; परंतु त्याची शारीरिक, प्राणिक आणि मानसिक प्रकृती ही उच्चतर कायद्याबाबत बंडखोर असते. मनुष्य स्वत:च्या अपूर्णतेवर प्रेम करतो.

‘आत्मा’ हे आपल्या अस्तित्वाचे सत्य आहे; अपूर्ण दशेमध्ये असताना मन, प्राण आणि शरीर हे त्याचे केवळ मुखवटे असतात, पण त्यांच्या परिपूर्ण दशेमध्ये तेच त्या आत्म्याचे साचे बनले पाहिजेत.

केवळ आध्यात्मिक असणे पुरेसे नाही; त्यामुळे स्वर्ग-गमनासाठी कित्येक जीव तयार होतात, परंतु ते पृथ्वीला मात्र, ती जिथे होती तिथेच सोडून जातात.

– श्रीअरविंद [CWSA 13 : 210]

मानव जे जे काही साध्य करू शकतो ते सर्व काही ज्यांनी साध्य केले आहे, पण तरीही जे समाधानी नाहीत कारण, या जीवनात कधीच गवसू शकणार नाहीत अशा उच्चतर गोष्टींची ते या जीवनाकडून अपेक्षा करतात; अशाच लोकांसाठी ‘पूर्णयोग’ आहे.

ज्यांनी अज्ञाताचा ध्यास घेतलेला आहे आणि जे पूर्णत्वाची आस बाळगतात, भंडावून सोडणारे प्रश्न जे स्वत:ला विचारत राहतात आणि तरीही ज्यांच्या प्रश्नांची तड लागत नाही, कोणतीही निश्चित अशी उत्तरे त्यांना गवसत नाहीत, अशा लोकांचीच ‘पूर्णयोगा’साठी तयारी झालेली असते.

मानवजातीच्या भवितव्याची ज्यांना काळजी आहे आणि विद्यमान व्यवस्थेबाबत जे समाधानी नाहीत अशा लोकांना हमखासपणे जे प्रश्न पडत राहतात, अशा मूलगामी प्रश्नांची एक मालिकाच असते. ते प्रश्न साधारणपणे असे असतात :

मरायचेच असेल तर व्यक्ती जन्मालाच का येते?

दु:खभोग सहन करण्यासाठीच का व्यक्ती जीवन जगत असते?

जर वियोग होणारच असेल तर व्यक्ती प्रेमच का करते?

चुका करण्यासाठीच व्यक्ती विचार करते का?

चुका करण्यासाठीच का व्यक्ती कृती करते?

याचे स्वीकारार्ह असे एकमेव उत्तर आहे की, गोष्टी जशा असायला हव्यात तशा त्या नाहीत. मात्र हे विरोधाभास अटळ आहेत असे नाही, तर ते सुधारता येण्यासारखे आहेत आणि एक ना एक दिवस ते विरोधाभास नाहीसे होतीलच. जग आज जसे आहे त्यावर काही उपायच नाही असेही नाही.

ही पृथ्वी अशा एका संक्रमणकाळात आहे की, जो काळ मानवाच्या तोकड्या चेतनेला खूप दीर्घ भासतो पण शाश्वत चेतनेच्या दृष्टीने तो एखाद्या परमाणु इतका अल्प असतो. एवढेच नव्हे तर, अतिमानसिक चेतनेच्या अवतरणाबरोबर हा संक्रमणकाळसुद्धा संपुष्टात येईल. त्यावेळी विरोधाभास सुसंवादामध्ये आणि विरोध हा समन्वयामध्ये परिवर्तित होईल.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 98-99)

 

साधक : माताजी, तुम्ही या छायाचित्रामध्ये प्रणाम का करत आहात ? का ? आणि कोणाला ?

श्रीमाताजी : मी ‘सत्या’चे स्वागत करत आहे. त्यासाठी ही आवश्यक अशी मुद्रा आहे. हा भक्तीचा आणि विनम्रतेचा भाव आहे. जेव्हा ‘सत्य’ हेच एकमेव मार्गदर्शक असेल अशा दिवसाची मी अगदी धीराने वाट पाहत आहे. हा भाव महत्त्वाचा आहे. येथे ‘दिव्य सत्य’ समग्रपणे स्थापित व्हावे अशी जर पृथ्वीची इच्छा असेल तर, हा भाव तिने बाळगला पाहिजे. ही एकच गोष्ट आहे की जी या पृथ्वीला वाचवू शकेल. या भूमिकेमध्ये राहायचे आणि ऊर्ध्वगामी अभीप्सा बाळगायची. या वृत्तीने ‘सत्या’समोर नतमस्तक व्हायला या पृथ्वीने शिकलेच पाहिजे. हीच आराधनाही आहे आणि तोच प्रणामही आहे. पृथ्वीने हे शिकलेच पाहिजे, या (प्रणामाच्या) मुद्रेमधून अजूनही अधिक काही, म्हणजे गहनगभीर आणि उदात्त असे काही अभिव्यक्त होते.

[Sweet Mother – Harmonises of Light, Part 01 : 15]

माणसांना स्वतःच्या क्षुद्र अशा वैयक्तिक अहंकारावर मात करण्यास भाग पाडावे आणि त्याकरता साहाय्य व प्रकाश मिळविण्यासाठी, माणसं पूर्णतः केवळ ईश्वराकडेच वळावीत म्हणून पृथ्वीवर ‘कठीण समय’ येतो. माणसांची दृष्टी ही अज्ञानी असते; केवळ ईश्वरच सर्वकाही जाणतो.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 425)