Posts

पृथ्वी ही जडभौतिक विश्वाचे केंद्र आहे. ज्या शक्तीद्वारे ‘जडभौतिका’चे रूपांतरण घडून येणार आहे त्या शक्तीच्या एककेंद्रीकरणासाठी पृथ्वीची निर्मिती झालेली आहे. ‘जडभौतिका’मधील ईश्वरी क्षमतेचे ती प्रतीक आहे. …‘ईश्वरी चेतने’च्या थेट हस्तक्षेपामुळे या पृथ्वीची निर्मिती झाली आहे आणि त्यामुळे फक्त या पृथ्वीवरच ‘ईश्वरा’शी थेट संपर्क होऊ शकतो आणि तसा तो होतो देखील. पृथ्वी दिव्य प्रकाश शोषून घेते, विकसित करते आणि त्याचा किरणोत्सर्ग करते. हा किरणोत्सर्ग स्थलाच्या कक्षा ओलांडून पलीकडे जातो आणि जेथे जेथे ‘जडभौतिकता’ आहे तेथे तेथे तो पसरतो. ‘ईश्वरी चेतने’ची सुसंवादिता आणि प्रकाशाची जी देणगी पृथ्वी घेऊन येते ती देणगी, हे जडभौतिक विश्व काही प्रमाणात वाटून घेते. परंतु त्या चेतनेचे परिपूर्ण आणि अंतिम विकसन हे या ‘पृथ्वी’वरच शक्य असते. चैत्य पुरुष (Psychic being) हा फक्त या पृथ्वीवरच आढळून येतो, कारण तो पृथ्वीचीच निर्मिती आहे. तो ‘जडभौतिका’ ला झालेला ‘ईश्वरी’ स्पर्श आहे. चैत्य पुरुष हा ‘पृथ्वी’ चे अपत्य असते; तो या ‘पृथ्वी’वरच जन्माला येतो आणि येथेच विकसित होतो. तो ‘पृथ्वी’खेरीज अन्य कोणत्याच ठिकाणचा रहिवासी नाही.

– श्रीअरविंद
(The Yoga of Sri Aurobindo : Part 06 by Nolini Kant Gupta : 23)

साधनेची मुळाक्षरे – ०६

प्रश्न : पण ईश्वराला या गोंधळामध्ये, या पृथ्वीवर आविष्कृत व्हायची इच्छा का असते?

श्रीमाताजी : पृथ्वी म्हणजे त्या ईश्वराचेच विरूप (deformation) आहे आणि ‘तो’ त्याचे सत्य पुन्हा एकदा या पृथ्वीवर प्रस्थापित करू इच्छितो. त्याचसाठी त्याने ही पृथ्वी निर्माण केली आहे ; त्यामागे अन्य कोणताही हेतू नाही. पृथ्वी ही ‘त्याच्या’पासून विलग झालेली गोष्ट नाही किंवा ‘त्याला’ परकी नाही. पृथ्वी म्हणजे ‘ईश्वरा’चे विरूपीकरण आहे; ही पृथ्वी तिच्या साररूपात जशी होती तशीच, म्हणजे ‘ईश्वरस्वरूप’ बनण्याची पुन्हा एकदा आवश्यकता आहे.

प्रश्न : पण मग तो ‘ईश्वर’ आपल्यासाठी इतका अनोळखी का आहे?

श्रीमाताजी : बाळा, तो काही अनोळखी नाही. तो अनोळखी आहे, अशी तुम्ही कल्पना करता पण तो तसा नाही, तो अजिबात तसा नाही. तो तुमच्या अस्तित्वाचे सार आहे – तो काही अनोळखी नाही. तुम्ही ‘त्याला’ ओळखत नसलात तरीही तो अनोळखी नाही; तो तुमच्या अस्तित्वाचे अगदी मूळ सार-सर्वस्व आहे. ‘ईश्वरा’खेरीज तुम्ही अस्तित्वातच राहू शकणार नाही. ईश्वराखेरीज सेकंदाच्या एक दशलक्षाव्या भागाइतका काळदेखील तुम्ही जिवंत राहू शकणार नाही. याचे कारणच असे आहे की तुम्ही एक प्रकारच्या भ्रमामध्ये व विरूपामध्ये जगत असता, तुम्हाला त्याची जाणीव नसते. तुम्ही स्वतःच्या मूळ स्वरूपाविषयी सजग नसता, तर तुम्ही जे आहात, असे तुम्हाला वाटत असते, त्याच्याविषयीच फक्त तुम्हाला जाणीव असते; पण वस्तुतः तुम्ही ते नसता.

प्रश्न : माताजी, मग मी स्वतः कोण आहे?

श्रीमाताजी : ईश्वर!

– श्रीमाताजी
(CWM 07 : 191-192)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १३

मानवाने आध्यात्मिकीकरणासाठी एकदा जरी संमती दिली तरी हे अवघे विश्व बदलून जाईल परंतु मानवाची शारीरिक, प्राणिक आणि मानसिक प्रकृती ही या उच्चतर कायद्याबाबत बंडखोर असते. मानवाला स्वत:च्या अपूर्णतेविषयीच प्रेम असते.

आत्मा हे आपल्या अस्तित्वाचे सत्य आहे; अपूर्ण दशेमध्ये असताना मन, प्राण आणि शरीर हे त्याचे केवळ मुखवटे असतात, पण तेच त्यांच्या पूर्ण दशेमध्ये त्या आत्म्याचे साचे बनले पाहिजेत. केवळ आध्यात्मिक असणे पुरेसे नाही; त्यामधून स्वर्ग-गमनासाठी कित्येक आत्मे तयार होतात पण ही पृथ्वी मात्र जशी आहे तिथे व तशीच राहते. कोणतीही तडजोड हा मुक्तीचा मार्ग असू शकत नाही.

विश्वाला तीन प्रकारच्या क्रांती ज्ञात आहेत. भौतिक क्रांतीचे ठाशीव परिणाम दिसून येतात; नैतिक आणि बौद्धिक क्रांतीची फळे ही अधिक समृद्ध असतात आणि त्या क्रांतीचे क्षेत्रदेखील अनंतपटीने व्यापक असते; परंतु आध्यात्मिक क्रांतीमध्ये महान बीजे दडलेली असतात.

हा तिहेरी बदल या परस्परांचा सुयोग्य संयोग घडवू शकला तर निर्दोष कार्य आकारास येऊ शकते; परंतु मानवजातीचे शरीर आणि मन हे, जोरकस असणारा आध्यात्मिक प्रवाह परिपूर्ण रीतीने धारण करू शकत नाहीत; त्यातील बहुतांश विखरून जातो, बाकी जे शिल्लक असते ते दूषित होऊन जाते. आपल्या या भूमितून पुष्कळशा अध्यात्म-बीजांमधून थोडासातरी परिणाम साध्य व्हावा म्हणून असंख्य बौद्धिक आणि शारीरिक सुधारणांची आवश्यकता आहे.

…आज आपण या विश्वामध्ये जे बदल पाहत आहोत ते त्यांच्या आदर्शाच्या आणि प्रयोजनाच्या बाबतीत बौद्धिक, नैतिक, आणि भौतिक आहेत. आध्यात्मिक क्रांती आपली वेळ येण्याची वाट पाहात थांबली आहे आणि तोपर्यंत तिच्या केवळ लाटाच इथे-तिथे प्रस्फुटित होत आहेत. इतरांना जोवर ह्याचा बोध होत नाही तोपर्यंत त्या क्रांतीचे आकलन होणार नाही आणि तोपर्यंत सद्यस्थितीतील घडामोडींची सर्व स्पष्टीकरणे आणि मानवाच्या भवितव्याविषयीची सर्व भाकिते ह्या गोष्टी फोल आहेत. कारण त्या आध्यात्मिक क्रांतीचे स्वरूप, तिचे सामर्थ्य, तिच्या घडामोडी याद्वारेच आपल्या मानवतेचे पुढील चक्र निर्धारित व्हावयाचे आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 210-211)

परमोच्चाकडून पृथ्वी ज्या कोणत्या महत्तम गोष्टीची अपेक्षा करू शकेल, ते वरदान आम्ही परमश्रेष्ठाकडे मागितलेले आहे ; आम्ही असे परिवर्तन मागितले आहे की, जे प्रत्यक्षात उतरविणे खूप कठीण आहे; ज्याच्या अटी, शर्ती ह्या खूप कष्टप्रद असणार आहेत. परमसत्य आणि त्याच्या शक्तीचे जडामध्ये अवतरण; जडाच्या पातळीवर, जडचेतनेमध्ये, भौतिक विश्वामध्ये अतिमानसाची प्रस्थापना आणि जडतत्त्वाच्या अगदी मूळापर्यंत झालेले संपूर्ण रुपांतरण, ह्यापेक्षा कोणतीही निम्नतर गोष्ट आम्ही मागितलेली नाही. केवळ परमोच्च कृपेद्वारेच हा चमत्कार घडून येऊ शकतो.

ती परमशक्ती अगदी जडचेतनेमध्येदेखील अवतरलेली आहे; पण तिचे आविष्करण होण्यापूर्वी, तिच्या महान कार्याला उघडपणाने सुरुवात होण्यापूर्वी, प्रभावशाली, परमश्रेष्ठाची कृपा असलेली परिस्थिती येथे असावी अशी तिची मागणी आहे; आणि त्याची वाट पाहत, ती जडभौतिकाच्या घनदाट पडद्याआड उभी आहे. या प्रकृतीमध्ये आणि जडभौतिक अस्तित्वामध्ये त्याचे आविष्करण होण्यासाठीची पहिली अट ही आहे की, सत्य हे तुमच्यामध्ये संपूर्णतया आणि काहीही हातचे राखून न ठेवता स्वीकारले गेले पाहिजे.

संपूर्ण समर्पण; केवळ दिव्य प्रभावासाठीच स्व-चे उन्मीलन; सातत्याने व संपूर्णपणे सत्याची निवड आणि असत्याचा त्याग, केवळ ह्याच अटी आहेत. पूर्णतया, कोणताही अंगचोरपणा न करता, कोणतीही कुचराई व ढोंगीपणा न करता; जडभौतिक जाणिवेच्या आणि तिच्या कार्याच्या अगदी खोलवरपर्यंत ह्या अटींचे पालन प्रामाणिकपणे केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 372-373)

मानवाची महानता तो काय आहे ह्यामध्ये नसून, तो काय करू शकतो ह्यामध्ये सामावलेली आहे. मानव ही बंदिस्त अशी एक जागा आहे आणि जिवंत परिश्रमांची ती अशी एक गुप्त कार्यशाळा आहे की, ज्यामध्ये त्या ‘दिव्य कारागीरा’कडून अतिमानवता घडवली जात आहे आणि हेच मानवाचे खरेखुरे वैभव आहे.

पण यापेक्षाही एका अधिक महानतेमध्ये त्याचा प्रवेश झाला आहे. ती महानता अशी की, कोणत्याही कनिष्ठ प्रजातींना मिळाली नाही अशी एक परवानगी त्याला मिळालेली आहे. मानवामध्ये होणाऱ्या दिव्य परिवर्तनाचा जाणीवसंपन्न कारागीर बनण्याची, त्या परिवर्तनामध्ये थोड्याफार प्रमाणात सहभागी होण्याची परवानगी त्याला मिळालेली आहे. मात्र ही महानता त्याच्या देहामध्ये प्रत्यक्षात उतरावी याकरिता, म्हणजेच मानवी देहाचे अतिमानवामध्ये रूपांतर शक्य व्हावे याकरिता, मानवाची स्वेच्छापूर्वक संमती, त्याची एकदिश झालेली इच्छाशक्ती आणि त्याचा सहभाग यांची आवश्यकता आहे. मानवाची अभीप्सा ही पृथ्वीने त्या अतिमानसिक निर्मिकाला दिलेली हाक आहे.

जर पृथ्वी साद घालेल आणि तो परमश्रेष्ठ त्यास प्रतिसाद देईल तर, त्या भव्य आणि गौरवशाली रूपांतरणाची घटिका अगदी आत्तादेखील असू शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 160)