Posts

साधना, योग आणि रूपांतरण – २३९

(आपल्या व्यक्तित्वामध्ये दोन प्रणाली कार्यरत असतात. एक अध-ऊर्ध्व म्हणजे जडभौतिकापासून ते सच्चिदानंदापर्यंत असणारी प्रणाली आणि दुसरी बाहेरून आत जाणारी म्हणजे बाह्य व्यक्तित्व ते चैत्य पुरुष अशी असणारी केंद्रानुगामी प्रणाली. या दोन्ही प्रणालींचा येथे संदर्भ आहे.)

रूपांतरणासाठी ‘संपूर्ण’ आणि ‘समग्र’ ईश्वराधीनतेची (consecration) आवश्य कता असते. सर्वच प्रामाणिक साधकांची तीच आस असते, नाही का?

‘संपूर्ण’ ईश्वराधीनता म्हणजे ऊर्ध्व-अधर (vertically) अशा पद्धतीने ईश्वराधीन होणे. येथे व्यक्ती सर्व अवस्थांमध्ये, म्हणजे अगदी जडभौतिक अवस्थांपासून ते अगदी सूक्ष्म अशा सर्व अवस्थांपर्यंत, सर्वत्र ईश्वराधीन असते.

आणि ‘समग्र’ ईश्वराधीनता म्हणजे क्षितिजसमांतर (horizontally) पद्धतीने ईश्वराधीन होणे. शरीर, प्राण, मन यांनी मिळून ज्या बाह्यवर्ती व्यक्तित्वाची घडण झालेली असते त्या व्यक्तित्वाच्या विभिन्न आणि बरेचदा परस्परविरोधी असणाऱ्या सर्व घटकांमध्ये ईश्वराधीनता असणे म्हणजे समग्र ईश्वराधीन असणे.

– श्रीमाताजी (CWM 15 : 88)

साधना, योग आणि रूपांतरण – २३८

फक्त ‘रूपांतरणा’मुळेच पृथ्वीवरील परिस्थितीमध्ये परिवर्तन घडू शकते. एक उच्चतर समतोल आणि एक नूतन प्रकाश घेऊन या पृथ्वीवर अवतरणारी एक नवचेतना, एक नवीन शक्ती, एक नवीन ऊर्जा हीच केवळ या ‘रूपांतरणा’चा चमत्कार साध्य करू शकेल. परंतु त्यासाठी व्यक्तीने पशुवत जगणे थांबविले पाहिजे आणि दिव्य मनुष्य झाले पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 20)

साधना, योग आणि रूपांतरण – २३७

तुम्ही जर मानवी प्रकृतीचे रूपांतरण (transformation) गतिमान दिव्य प्रकृतीमध्ये करू इच्छित असाल तर, कोणतीही कुरबूर न करता, किंवा कोणताही प्रतिकार न करता, स्वत:ला श्रीमाताजींच्या व त्यांच्या शक्तींच्या हाती सोपवा आणि त्यांना त्यांचे कार्य तुमच्यामध्ये कोणत्याही अडथळ्याविना करू द्या. चेतना, घडणसुलभता (plasticity) आणि नि:शेष समर्पण या तीन गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजेत.

श्रीमाताजी आणि त्यांच्या शक्ती व त्यांचे कार्य याविषयी तुमचे मन, आत्मा, हृदय, प्राण इतकेच काय पण, तुमच्या शरीरातील पेशीसुद्धा सजग असल्या पाहिजेत. कारण, श्रीमाताजी तुमच्यातील अंधकारामध्ये आणि तुमच्या अचेतन भागांमध्ये, अचेतन क्षणांमध्ये देखील कार्य करू शकतात आणि तशा त्या करतात देखील, परंतु जेव्हा तुम्ही जागृत असता आणि त्यांच्याशी चैतन्यमय संपर्क राखून असता तेव्हाची गोष्ट निराळी असते.

तुमची समग्र प्रकृतीच श्रीमाताजींच्या स्पर्शाला घडणसुलभ असली पाहिजे, म्हणजे –
१) स्वयंपर्याप्त (self-sufficient) अज्ञानी मन जसे प्रश्नह विचारत राहते, शंका घेत राहते, विवाद करत बसते आणि ते जसे प्रबोधनाचे व परिवर्तनाचे शत्रू असते, तशी तुमची प्रकृती असता कामा नये.
२) ज्याप्रमाणे माणसातील प्राण स्वत:च्याच वृत्तीप्रवृत्तींवर भर देत राहतो आणि तो जसा आपल्या हट्टाग्रही इच्छा व दुरिच्छेमुळे, प्रत्येक दिव्य प्रभावाला सातत्याने विरोध करत राहतो, तशी तुमची प्रकृती स्वत:च्याच वृत्तीप्रवृत्तींवर भर देणारी असता कामा नये.
३) माणसाची शारीरिक चेतना जशी अडथळा निर्माण करत राहते आणि ती जशी शरीराच्या अंधकारमय गोष्टींमधील किरकोळ सुखाला चिकटून राहते तशी तुमची प्रकृती ही अडथळा निर्माण करणारी असता कामा नये. तसेच शरीराच्या कंटाळवाण्या दिनचर्येला, आळसाला किंवा त्याच्या जड निद्रेला धक्का पोहोचविणाऱ्या कोणत्याही स्पर्शाच्या विरोधात शारीरिक चेतना जशी आकांडतांडव करते; तशी तुमची प्रकृती ही स्वत:च्या अक्षमतेला, जडतेला आणि तामसिकतेला हटवादीपणे चिकटून राहणारी असता कामा नये.

नि:शेष समर्पण आणि तुमच्या आंतरिक व बाह्य अस्तित्वाचे समर्पण हे तुमच्या प्रकृतीच्या सर्व भागांमध्ये ही घडणसुलभता घडवून आणेल. वरून प्रवाहित होणाऱ्या प्रज्ञा आणि प्रकाश, शक्ती, सुसंवाद आणि सौंदर्य, पूर्णता या साऱ्या गोष्टींप्रत तुम्ही सातत्याने खुले राहिलात तर, तुमच्यामधील सर्व घटकांमध्ये चेतना जागृत होईल. इतकेच काय पण तुमचे शरीरसुद्धा जागृत होईल आणि सरतेशेवटी, त्याची चेतना ही त्यानंतर अर्धचेतन चेतनेशी एकत्व न पावता, अतिमानसिक अतिचेतन शक्तीशी एकत्व पावेल; आणि तिची ऊर्जा ही वरून, खालून, चोहोबाजूंनी शरीराला अनुभवास येईल आणि एका परमप्रेमाने व आनंदाने ते शरीर पुलकित होऊन जाईल.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 24-25)

साधना, योग आणि रूपांतरण – २३६

फक्त उच्चतर चेतनेचे अनुभव आल्यामुळे, प्रकृतीमध्ये परिवर्तन होणार नाही. ज्यांद्वारे हे परिवर्तन घडून येऊ शकते असे पुढील चार मार्ग असतात :
१) एकतर, उच्चतर चेतनेने समग्र अस्तित्वामध्ये गतिशील अवतरण करून, त्या अस्तित्वाचे परिवर्तन केले पाहिजे.
२) किंवा मग, उच्चतर चेतनेने आंतरिक शरीरापर्यंत खाली उतरून, स्वतःला आंतरिक अस्तित्वामध्ये प्रस्थापित केले पाहिजे त्यामुळे आपण बाह्य (स्थूल) शरीरापासून विलग आहोत असा अनुभव आंतरिक शरीराला येऊ शकेल आणि ते बाह्य शरीरावर मुक्तपणे कार्य करू शकेल.
३) किंवा अंतरात्मा अग्रस्थानी आला पाहिजे आणि त्याने प्रकृतीचे परिवर्तन घडविले पाहिजे;
४) किंवा मग, आंतरिक इच्छा जागृत होऊन तिने प्रकृतीस परिवर्तन करण्यास भाग पाडले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 23)

साधना, योग आणि रूपांतरण – २३५

व्यक्ती आणि तिचे घटक यांच्या व्यवस्थेमध्ये एकाचवेळी दोन प्रणाली कार्यरत असतात. त्यातील एक केंद्रानुगामी असते. या प्रणालीमध्ये वर्तुळांची किंवा कोशांची एक मालिका असते, आणि तिच्या केंद्रस्थानी अंतरात्मा असतो. दुसरी प्रणाली ऊर्ध्व-अधर (vertical) अशी असते. म्हणजे यामध्ये आरोहण आणि अवरोहण असते, पायऱ्या-पायऱ्यांची एक शिडी असावी तशी ती असते. मनुष्याकडून ‘ईश्वरा’कडे होत जाणाऱ्या संक्रमणामध्ये, एकावर एक रचलेल्या स्तरांची जणू ही मालिकाच असते आणि त्यामध्ये अधिमानस (Overmind) व अतिमानस (Supermind) हे महत्त्वाचे टप्पे असतात.

हे संक्रमण घडून यायचे असेल तर आणि त्याच वेळी ते रूपांतरण देखील ठरावे असेही अपेक्षित असेल तर त्यासाठी, केवळ एकच मार्ग असतो. प्रथम, अंतर्मुखी परिवर्तन झाले पाहिजे, व्यक्तीने आंतरतम असणाऱ्या चैत्य पुरुषाचा (psychic being) शोध घेण्यासाठी अंतरंगात शिरले पाहिजे आणि त्यास अग्रस्थानी आणले पाहिजे. आणि त्याचवेळी प्रकृतीचे आंतरिक मन, आंतरिक प्राण व आंतरिक शरीराचे घटक उघड केले पाहिजेत. नंतर, आरोहणाची प्रक्रिया केली पाहिजे. म्हणजे ऊर्ध्वगामी परिवर्तनाची एक मालिकाच तेथे असली पाहिजे आणि निम्न स्तरावरील घटकांचे परिवर्तन करण्यासाठी चेतनेने पुन्हा खाली उतरून आले पाहिजे. व्यक्तीने जेव्हा अंतर्मुखी परिवर्तन घडवून आणलेले असते तेव्हा समग्र कनिष्ठ प्रकृती दिव्य परिवर्तनासाठी सुसज्ज व्हावी यासाठी व्यक्ती त्या प्रकृतीचे आंतरात्मिकीकरण घडवते. ऊर्ध्वगामी होत असताना, व्यक्ती मानवी मनाच्या अतीत जाते आणि आरोहणाच्या प्रत्येक टप्प्यावर व्यक्तीचे एका नवीन चेतनेमध्ये परिवर्तन होते आणि त्याचवेळी या नवीन चेतनेचा व्यक्तीच्या समग्र प्रकृतीमध्ये संचार होतो.

अशा रीतीने जेव्हा आपण बुद्धीच्या पलीकडे आरोहण करत, प्रकाशित उच्च मनाच्या (illuminated higher mind) माध्यमातून अंतःस्फूर्त (intuitive) चेतनेमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण सर्व गोष्टींकडे बौद्धिक श्रेणीतून नाही किंवा बुद्धी या साधनाच्या माध्यमाद्वारे नाही तर अधिक महान अशा अंतःस्फूर्त उंचीवरून आणि अंतःस्फूर्तिमय झालेल्या इच्छा, भावभावना, संवेदना आणि शारीरिक संपर्काच्या माध्यमाद्वारे पाहू लागतो. म्हणून, अंतःस्फूर्त मनाकडून त्यापेक्षाही महान असलेल्या अधिमानसिक उंचीवर जाताना, एक नवीन परिवर्तन होते आणि आपण प्रत्येक गोष्ट अधिमानसिक चेतनेमधून आणि अधिमानसिक विचार, दृष्टी, इच्छा, भावना, संवेदना, शक्तीक्रीडा आणि संपर्काने प्रभावित झालेल्या मन, हृदय, प्राण आणि शरीर यांच्याद्वारे पाहू लागतो, अनुभवू लागतो. परंतु अंतिम परिवर्तन हे अतिमानसिक असते, कारण एकदा का आपण तेथे पोहोचलो, एकदा का प्रकृतीचे अतिमानसिकीकरण झाले की मग आपण ‘अज्ञान’दशेच्या पलीकडे जाऊन पोहोचलेलो असतो आणि मग चेतनेचे परिवर्तन गरजेचे राहत नाही. अर्थात त्यापुढेही दिव्य प्रगती, किंबहुना अनंत विकसन होणे अजूनही शक्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 84-85)

साधना, योग आणि रूपांतरण – २३४

(एका साधकाने श्रीअरविंदांना असे सांगितले की, काही जणांना असे वाटते की, ‘आध्यात्मिक’ आणि ‘अतिमानसिक’ या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. त्यावर श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

तसे जर असते तर, आजवर युगानुयुगे होऊन गेलेले ऋषीमुनी, भक्त, योगी, साधक हे सारे ‘अतिमानसिक जीव’ होते असे म्हणावे लागेल आणि मग अतिमानसाविषयी मी आजवर जे काही लिहिले आहे ते अगदी उथळ, निरुपयोगी, आणि अनावश्यक ठरेल. आध्यात्मिक आणि अतिमानसिक या दोन्ही गोष्टी समानच असतील तर मग ज्या ज्या कोणाला आध्यात्मिक अनुभव आलेले असतील ते सारेजण म्हणजे अतिमानसिक जीव आहेत असे होईल. आणि मग हा आश्रम (श्रीअरविंद-आश्रम) किंवा भारतातील प्रत्येक आश्रमच अतिमानसिक जिवांनी ओसंडून वाहत आहेत, असे म्हणावे लागेल.

व्यक्तीची इच्छा असेल तर आध्यात्मिक अनुभव हे आंतरिक चेतनेमध्ये स्थिरस्थावर होऊ शकतात; आणि त्यानंतर ते तिच्यामध्ये बदल घडवून, तिचे रूपांतरण करू शकतात. सर्वत्र ‘ईश्वर’च असल्याचा साक्षात्कार व्यक्तीला होऊ शकतो, सर्वांमध्ये ‘आत्मा’ आणि ‘आत्म्या’मध्ये सर्वकाही असल्याचा अनुभव तिला येऊ शकतो. विश्वात्मक ‘शक्ती’ या साऱ्या गोष्टी घडवीत आहे; आपण ‘ब्रह्मांडगत आत्म्यामध्ये किंवा आनंदमय भक्तीमध्ये किंवा ‘आनंदा’मध्ये विलीन होत आहोत अशी व्यक्तीला प्रचिती येऊ शकते.

मात्र, व्यक्ती ‘प्रकृती’च्या बाह्य सक्रिय भागांमधील जीवन बुद्धीच्या साहाय्याने किंवा फारफार तर अंतःस्फूर्त मनाच्या (intuitive mind) साहाय्याने विचार करत, मानसिक इच्छेच्या साहाय्याने संकल्प करत, प्राणाच्या पृष्ठवर्ती स्तरावर हर्ष व शोकाचा अनुभव घेत, शरीरात राहून शारीरिक आजारपणं आणि वेदना भोगत, जीवनसंघर्ष करत, शेवटी आजार व मृत्यु असे जीवन कंठत राहू शकते आणि सहसा हे असेच चालू राहते. यामध्ये जर का काही परिवर्तन होणे शक्य असेल तर ते फारफार तर एवढेच असू शकते की, व्यक्ती ‘प्रकृती’मधून बाहेर पडून पूर्णपणे ‘आत्म्या’मध्ये विलीन होत नाही तोपर्यंत तरी, उपरोक्त सर्व गोष्टी म्हणजे ‘प्रकृती’चा अपरिहार्य भाग आहे असे मानून, ‘अंतरात्मा’ या सगळ्याकडे विचलित न होता किंवा भांबावून न जाता, परिपूर्ण समत्वाने पाहू शकतो.

परंतु हे म्हणजे मला अभिप्रेत असणारे ‘रूपांतरण’ नव्हे. मला अभिप्रेत असणारे रूपांतरण म्हणजे ज्ञानाची एक निराळीच शक्ती आहे, ती निराळीच इच्छाशक्ती आहे, भावभावना आणि सौंदर्याचे ते एक आगळेवेगळे प्रकाशमान परिमाण आहे, शारीरिक चेतनेची ती एक निराळीच घडण आहे. आणि या साऱ्या गोष्टी अतिमानसिक परिवर्तनानेच (supramental change) घडून येणे आवश्यक आहे.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 273-274)

भारत हाच जगातील असा एकमेव देश आहे…

श्रीअरविंदांच्या जन्मापूर्वी, धर्म आणि आध्यात्मिकता या गोष्टी भूतकाळातील व्यक्तींभोवती केंद्रित झालेल्या होत्या. आणि त्या व्यक्ती ‘पृथ्वीवरील जीवनाला नकार हे (जीवनाचे) उद्दिष्ट’ असले पाहिजे असे सांगत असत. तेव्हा त्याकाळी तुमच्यापुढे दोन पर्याय ठेवले जात :

किरकोळ आनंद किंवा यातना, सुख किंवा दु:ख यांच्या चक्रामध्ये फिरत राहणारे हे इहलोकातील जीवन जगत असताना जर तुम्ही चुकीचे वर्तन केलेत (तुमच्याकडून पापाचरण घडले) तर तुम्हाला नरकाची भीती दाखविली जात असे. हा पहिला पर्याय असे.

दुसरा पर्याय म्हणजे, ऐहिक जीवनाचा त्याग करून स्वर्ग, निर्वाण, मोक्ष इत्यादी गोष्टींच्या प्राप्तीसाठी कोणत्यातरी दुसऱ्याच जगामध्ये पलायन करायचे.

तुम्हाला या दोन्हीपैकी एका पर्यायाची निवड करावी लागत असे, खरंतर त्यामध्ये निवड करण्यासारखे काहीच नसे कारण दोन्ही पर्याय एकसारखेच अयोग्य, सदोष आहेत.

श्रीअरविंदांनी आपल्याला असे सांगितले आहे की, अशा प्रकारचा विचार करणे हीच मूलभूत चूक होती; कारण त्यातूनच भारताची अवनती घडून आली आणि या गोष्टीच भारताच्या दुर्बलतेला कारणीभूत झाल्या…

मात्र, हेही तितकेच खरे आहे की, भारत हाच जगातील असा एकमेव देश आहे की, ज्याला आजही, जडभौतिकाच्या पलीकडेही काही असते याची जाणीव आहे. युरोप, अमेरिका आणि इतर देशांना याचा विसर पडलेला आहे. आणि म्हणूनच जतन करण्यायोग्य आणि विश्वाला देण्यायोग्य एक संदेश आजही भारताकडे आहे.

श्रीअरविंदांनी आम्हाला हे दाखवून दिले की, या भौतिक जीवनापासून पळ काढण्यामध्ये सत्य सामावलेले नाही; तर या भौतिक जीवनात राहूनच, त्याचे रूपांतरण करायचे आहे. या भौतिक जीवनाचे रूपांतरण ‘दिव्यत्वा’मध्ये केल्यामुळे, ‘ईश्वर’ या ‘इथे’च, या ‘जडभौतिक विश्वा’मध्ये आविष्कृत होऊ शकेल.

– श्रीमाताजी (CWM 12 : 210-211)

साधना, योग आणि रूपांतरण – २३२

साधक : ‘अपरिवर्तनीय रूपांतरण’ म्हणजे काय?

श्रीमाताजी : तुम्ही तुमच्या आधीच्या स्थितीमध्ये परत जाऊ शकत नाही असे रूपांतरण जेव्हा तुमच्या चेतनेमध्ये घडते, तेव्हा त्या रूपांतरणास ‘अपरिवर्तनीय रूपांतरण’ असे म्हटले जाते. एक क्षण असा येतो की हे परिवर्तन इतके परिपूर्ण झालेले असते की अशा वेळी मग तुम्ही पूर्वी जसे होतात तसे पुन्हा होणे अशक्यप्राय होऊन जाते.

साधक : परंतु रूपांतरण या शब्दातच अपरिवर्तनीय हा अर्थ सूचित होत नाही का?

श्रीमाताजी : रूपांतरण आंशिकसुद्धा असू शकते. श्रीअरविंद ज्या रूपांतरणाबद्दल सांगत आहेत ते आहे चेतनेचे प्रत्युत्क्रमण (reversal). म्हणजे येथे व्यक्ती स्वतःच्या वैयक्तिक सुखसमाधानांकडे वळलेली असण्याऐवजी आणि अहंकारी असण्याऐवजी, तिची चेतना समर्पित होऊन ‘ईश्वरा’भिमुख झालेली असते. आणि त्यांनी इथे हे स्पष्टपणे सांगितले आहे की सुरुवातीला समर्पण हे आंशिक असू शकते, म्हणजे (अस्तित्वाचे) काही भाग समर्पित आहेत आणि काही भाग समर्पित नाहीत, असे असू शकते. आणि म्हणून जेव्हा समग्र अस्तित्वाने, समग्रपणे, त्याच्या सर्व गतिविधींनिशी, स्वतःचे समर्पण केलेले असते तेव्हा ते समर्पण अपरिवर्तनीय असे असते. तेव्हा ते ‘दृष्टिकोनाचे अपरिवर्तनीय रूपांतरण’ असते.

– श्रीमाताजी (CWM 04 : 356)

साधना, योग आणि रूपांतरण – २२९

इच्छा, राजसिकता आणि अहंकार यांना दिलेल्या नकारामुळे व्यक्तीला अशी अचंचलता आणि शुद्धता प्राप्त होते की, ज्यामध्ये अनिर्वचनीय ‘शांती’ अवतरू शकते. व्यक्तीने स्वतःची इच्छा ‘ईश्वरा’प्रत अर्पण केली, तिने स्वतःची इच्छा ही ‘ईश्वरी ‘संकल्पा’मध्ये मेळविली (merging) तर व्यक्तीच्या अहंकाराचा अंत होतो आणि व्यक्तीला वैश्विक चेतनेमध्ये व्यापकता प्राप्त होते किंवा विश्वातीत असलेल्या गोष्टीमध्ये तिचे उन्नयन होते. व्यक्तीला ‘प्रकृती’पासून ‘पुरुषा’चे विलगीकरण अनुभवास येते आणि बाह्य प्रकृतीच्या बेड्यांपासून व्यक्तीची सुटका होते. व्यक्तीला तिच्या आंतरिक अस्तित्वाची जाणीव होते आणि बाह्यवर्ती अस्तित्व हे साधन असल्याचे जाणवते; ‘विश्वशक्ती’च व्यक्तीचे कार्य करत असल्याची आणि ‘आत्मा’ किंवा ‘पुरुष’ त्याकडे पाहात असल्याची किंवा तो साक्षी असून, मुक्त असल्याचे व्यक्तीला जाणवते. आपले कर्म हाती घेऊन, विश्व‘माता’ किंवा परम‘माता’च ते करत असल्याचे, किंवा हृदयापाठीमागून एक ‘दिव्य शक्ती’ त्या कर्माचे नियंत्रण करत आहे, किंवा ते कर्म करत आहे, असे व्यक्तीला जाणवते.

व्यक्तीने स्वतःची इच्छा आणि कर्म अशा रीतीने सतत ‘ईश्वरा’प्रत निवेदित केली तर, प्रेम आणि भक्ती वृद्धिंगत होते, चैत्य पुरुष पुढे येतो. ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘शक्ती’प्रत निवेदन केल्यामुळे, ती शक्ती आपल्या ऊर्ध्वस्थित असल्याचा अनुभव आपल्याला येऊ शकतो. आणि तिच्या अवतरणाची आणि उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या चेतनेप्रत व ज्ञानाप्रत आपण उन्मुख होत आहोत अशी जाणीव आपल्याला होऊ शकते.

सरतेशेवटी कर्म, भक्ती आणि ज्ञान एकत्रित येतात आणि आत्मपरिपूर्णत्व शक्य होते; त्यालाच आम्ही ‘प्रकृतीचे रूपांतरण’ असे संबोधतो. अर्थातच हे परिणाम काही एकाएकी होत नाहीत, व्यक्तीची परिस्थिती आणि तिचा विकास यांनुसार, ते कमीअधिक धीमेपणाने, कमीअधिक समग्रतेने दिसून येतात.

ईश्वरी साक्षात्कारासाठी कोणताही सोपा राजमार्ग नाही. सर्वंकष आध्यात्मिक जीवनासाठी ‘गीता’प्रणीत ‘कर्मयोग’ मी अशा रीतीने विकसित केला आहे. तो कोणत्याही अनुमानावर आणि तर्कावर आधारलेला नाही तर, तो अनुभूतीवर आधारलेला आहे. त्यामधून ध्यान वगळण्यात आलेले नाही आणि त्यातून भक्तीदेखील नक्कीच वगळण्यात आलेली नाही. कारण ‘ईश्वरा’प्रत आत्मार्पण, ‘ईश्वरा’प्रत स्वतःच्या सर्वस्वाचे निवेदन हा जो ‘कर्मयोगा’चा गाभा आहे, तोच मूलतः भक्तीचा देखील एक मार्ग आहे.

एवढेच की, जीवनापासून पलायन करू पाहणाऱ्या एकांतिक अशा ध्यानाला तसेच, स्वतःच्याच आंतरिक स्वप्नामध्ये बंदिस्त होऊन राहणाऱ्या भावनाप्रधान भक्तीला मात्र पूर्णयोगाची समग्र प्रक्रिया म्हणून स्वीकारण्यात आलेले नाही. एखादी व्यक्ती तास न् तास ध्यानामध्ये पूर्णपणे गढून जात असेल किंवा आंतरिक अविचल आराधना आणि परमानंदामध्ये तास न् तास निमग्न होत असेल, तरीसुद्धा या गोष्टी म्हणजे समग्र पूर्णयोग नव्हे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 216-218)

साधना, योग आणि रूपांतरण – २२८

अज्ञान आणि अहंभावातून केलेल्या कृतीला म्हणजे, जी कृती अहंकाराच्या तुष्टीसाठी आणि राजसिक इच्छेने प्रेरित होऊन केली जाते त्या कृतीला मी ‘कर्म’ मानत नाही.

अज्ञानाचा जणू शिक्काच असणाऱ्या अहंकार, राजसिकता आणि इच्छावासना यांपासून सुटका करून घेण्याचा संकल्प असल्याखेरीज ‘कर्मयोग’ घडूच शकत नाही.

परोपकार किंवा मानवतेची सेवा किंवा नैतिक किंवा आदर्शवादी अशा उर्वरित सर्व गोष्टी, ज्या गोष्टी कार्याच्या गहनतर सत्याला पर्यायी आहेत, असे मानवी मन मानते, त्या सुद्धा माझ्या दृष्टीने ‘कर्म’ या संज्ञेला पात्र ठरत नाहीत.

जी कृती ‘ईश्वरा’साठी केली जाते, जी कृती ‘ईश्वरा’शी अधिकाधिक एकत्व पावून केली जाते आणि अन्य कशासाठीही नाही तर, केवळ ’ईश्वरा’साठीच केली जाते अशा कृतीला मी ’कर्म’ असे संबोधतो.

साहजिकच आहे की, ही गोष्ट सुरुवातीला तितकीशी सोपी नसते; गहन ध्यान आणि दीप्तिमान ज्ञान यांच्यापेक्षा ती काही कमी सोपी नसते, एवढेच काय पण, अगदी खरेखुरे प्रेम आणि भक्ती यांच्याहूनही ती गोष्ट काही कमी सोपी नसते. परंतु इतर गोष्टींप्रमाणेच या गोष्टीची (कर्माची) सुरुवात देखील तुम्ही सुयोग्य वृत्ती आणि दृष्टिकोन बाळगून केली पाहिजे, तुमच्यामधील सुयोग्य संकल्पासहित ही गोष्ट करण्यास तुम्ही सुरुवात केली पाहिजे, अशा वृत्तीने केलेले ‘कर्म’ हे भक्ती किंवा ध्यान यांच्याइतकेच प्रभावी ठरू शकते. अन्य गोष्टी त्यानंतर घडून येतील. (उत्तरार्ध उद्या)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 216-218)