व्यक्ती तरुण असो किंवा वृद्ध असो, तिने जर प्रगती केली नाही तर तिला कंटाळा येतो. प्रगती करण्यासाठीच आपण या पृथ्वीवर आलो आहोत. प्रगतीविना हे जीवन किती कंटाळवाणे होऊन जाईल! बरेचदा जीवन एकसुरी, नीरस असते. त्यामध्ये काही मजाच नसते. ते बरेचदा सुंदरही नसते. परंतु तुम्ही त्या जीवनाकडे जर प्रगती करण्याचे क्षेत्र म्हणून पाहिलेत तर मग मात्र प्रत्येक गोष्ट बदलून जाते, प्रत्येक गोष्ट स्वारस्यपूर्ण बनते आणि मग कंटाळा या गोष्टीला जागाच राहत नाही.
पुढच्या वेळी जेव्हा कधी तुम्हाला कंटाळा येईल तेव्हा काहीच न करता वेळ वाया घालवण्यापेक्षा हा कंटाळा कशामुळे येत आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यातही तुमच्याकडे जर निरीक्षण क्षमता असेल आणि तुम्ही खरोखरच (कंटाळा म्हणजे नक्की काय हे) समजून घ्यायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला लवकरच असे लक्षात येईल की, जणू एक प्रकारचा चमत्कार झाला आहे आणि आता तुम्हाला कंटाळवाणे वाटत नाहीये. हा उपाय प्रत्येक गोष्टीबाबतच लागू पडतो.
कधीकधी काही विशिष्ट परिस्थितीमध्ये, प्रत्येक गोष्टच उदासवाणी, कंटाळवाणी, वेडेपणाची वाटू लागते. त्याचा अर्थ असा की तुम्हीदेखील त्या परिस्थितीइतकेच कंटाळवाणे झाला आहात आणि त्यातून हे दर्शविले जाते की, तुम्ही तेव्हा प्रगती करत नसता. ही कंटाळवाणेपणाची जणू एक लाट असते. या कंटाळवाणेपणासारखी, आपल्या जीवनाच्या प्रयोजनाशी विरोधी असणारी अशी अन्य कोणतीच गोष्ट असू शकत नाही. अशा वेळी तुम्ही प्रयत्नपूर्वक स्वतःला असे सांगितले पाहिजे की, “मला आलेल्या या कंटाळ्याचा अर्थ असा आहे की, मला काहीतरी नवीन शिकले पाहिजे, मी माझ्यामध्ये काहीतरी प्रगती केली पाहिजे, माझ्यामधील जडत्वावर विजय मिळविला पाहिजे, माझ्यातील एखाद्या दुर्बलतेवर मी मात केली पाहिजे.”
कंटाळा ही चेतनेची सुस्ती असते. त्यावरील उपाय तुम्ही तुमच्या स्वतःमध्येच शोधण्याचा प्रयत्न केलात तर, तो कंटाळा त्वरित नाहीसा होऊन जाईल. बरेचदा लोकांना जेव्हा कंटाळवाणे वाटते तेव्हा चेतनेमध्ये एक पायरी उन्नत होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, ते एक पायरी खाली घसरतात. ते आधी जिथे होते त्यापेक्षाही अजून एक पायरी खाली उतरतात आणि मूर्खपणाच्या गोष्टी करत राहतात, त्यांचा कंटाळवाणेपणा घालविण्यासाठी ते काहीतरी अचकटविचकट गोष्टी करत राहतात. आपले मनोरंजन करण्याच्या नावाखाली ते स्वतःला एका धुंदीमध्ये, नशेमध्ये बुडवून टाकतात; स्वतःची तब्येत बिघडवून घेतात आणि मेंदू मृतवत करून टाकतात; विचारशक्ती गमावून बसतात. स्वतःचे असे पतन करण्याऐवजी जर त्यांनी स्वतःचे उन्नयन केले तर, त्यांनी प्रगती करण्याच्या या संधीचा सदुपयोग केला असे म्हणता येईल.
(उत्तरार्ध उद्या…)
– श्रीमाताजी (CWM 12 : 74)






