Tag Archive for: कर्म

साधना, योग आणि रूपांतरण – १०९

जे कर्म कोणत्याही वैयक्तिक हेतुविना, प्रसिद्धी किंवा लोकमान्यता किंवा लौकिक मोठेपणा यांच्या इच्छेविना केले जाते; ज्यामध्ये स्वतःच्या मानसिक प्रेरणा किंवा प्राणिक लालसा व मागण्या किंवा शारीरिक पसंती-नापसंती यांचा आग्रह नसतो; जे कर्म कोणताही गर्व न बाळगता किंवा असभ्य हेकेखोरपणा न करता केले जाते किंवा कोणत्याही पदासाठी वा प्रतिष्ठेसाठी दावा न करता जे कर्म केले जाते; जे कर्म केवळ आणि केवळ ‘ईश्वरा’साठीच आणि ‘ईश्वरी आदेशा’नेच केले जाते, केवळ तेच कर्म आध्यात्मिकदृष्ट्या शुद्धीकरण करणारे असते. जे जे कर्म अहंभावात्मक वृत्तीने केले जाते ते, या अज्ञानमय जगातील लोकांच्या दृष्टीने भले कितीही चांगले असू दे, पण योगसाधना करणाऱ्या साधकाच्या दृष्टीने त्या कर्माचा काहीच उपयोग नसतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 232)

साधना, योग आणि रूपांतरण – १०८

मन स्थिर करण्यासाठी व आध्यात्मिक अनुभूती येण्यासाठी, प्रकृतीचे शुद्धीकरण होणे आणि तिची तयारी होणे आवश्यक असते. यासाठी कधीकधी अनेक वर्षेसुद्धा लागतात. योग्य वृत्तीने केलेले कर्म हा त्यासाठीचा सर्वांत सोपा मार्ग आहे. इच्छा किंवा अहंकार विरहित कर्म; इच्छा, मागणी किंवा अहंकाराची कोणतीही स्पंदने निर्माण झाली की त्याला लगेच नकार देत केलेले कर्म; ‘दिव्य माते’ला अर्पण म्हणून केलेले कर्म; दिव्य मातेचे स्मरण करत आणि तिच्या शक्तीने आविष्कृत व्हावे आणि सर्व कर्म तिने हाती घ्यावे म्हणून तिची प्रार्थना करून केलेले कर्म, अशा प्रकारे केलेले कर्म म्हणजे योग्य वृत्तीने केलेले कर्म होय. त्यामुळे ‘दिव्य माते’ची उपस्थिती आणि तिचे कार्यकारकत्व तुम्हाला फक्त आंतरिक नीरवतेमध्येच जाणवू शकेल असे नाही तर, कर्म करत असताना देखील ते जाणवू शकेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 226)

साधना, योग आणि रूपांतरण – १०७

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

…कर्म करत असताना ध्यान करता कामा नये, कारण त्यामुळे तुमचे कामातील लक्ष विचलित होते, मात्र ज्याला तुम्ही ते कर्म अर्पण करणार आहात त्या एकमेवाद्वितीय ‘ईश्वरा’चे स्मरण तुमच्यामध्ये कायम असले पाहिजे. ही झाली केवळ एक पहिली प्रक्रिया; कारण, पृष्ठवर्ती मन कर्म करत असताना, ‘दिव्य उपस्थिती’च्या संवेदनेवर तुमच्या अंतरंगातील शांत अस्तित्व एकाग्र असल्याची सातत्यपूर्ण जाणीव जर तुम्हाला होऊ शकली असेल, किंवा श्रीमाताजींची शक्तीच कर्म करत आहे आणि तुम्ही केवळ एक माध्यम आहात किंवा एक साधन आहात अशी जाणीव जर तुम्हाला नेहमीच होऊ लागली असेल तर मग, कर्म करत असताना ईश-स्मरणाऐवजी, आपोआप ईश्वराशी नित्य एकत्व पावण्यास तसेच योग-साक्षात्कारास सुरुवात झाली आहे असे समजा.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 247)

साधना, योग आणि रूपांतरण – १०६

तुम्ही ज्या सर्व अडचणींचे वर्णन करत आहात त्या बहुतेक सर्वच माणसांच्या बाबतीत अगदी स्वाभाविक असतात. एखादी व्यक्ती ध्यानाला शांतपणे बसलेली असते तेव्हा ‘ईश्वरा’चे स्मरण राखणे आणि ‘ईश्वरी उपस्थिती’ची जाणीव ठेवणे हे तुलनेने सोपे असते; पण व्यक्तीला कामामध्ये व्यग्र राहावे लागत असेल तर तसे करणे तिला अधिक कठीण असते. कर्मामधील चेतना आणि ईश-स्मरण या गोष्टी टप्प्याटप्यानेच यायला हव्यात, त्या एकदम एकाचवेळी साध्य होतील अशी अपेक्षा तुम्ही बाळगता कामा नये, कोणालाच ते तसे एकदम साध्य होत नाही.

ते दोन मार्गांनी घडते पहिला मार्ग म्हणजे, तुम्ही श्रीमाताजींचे स्मरण ठेवण्याचा आणि तुम्ही जेव्हा काहीतरी काम करत असता तेव्हा प्रत्येक वेळी ते कर्म अर्पण करण्याचा अभ्यास केलात (म्हणजे कर्म करत असताना सर्वकाळ असे नव्हे, पण, कर्मारंभी किंवा तुम्हाला जेव्हा जेव्हा स्मरण होईल तेव्हा असा अभ्यास केला) तर मग ती गोष्ट हळूहळू सोपी आणि प्रकृतीला सवयीची होऊन जाते.

दुसरा मार्ग म्हणजे, ध्यानामुळे आंतरिक चेतना विकसित होऊ लागते. ही चेतना एकाएकी किंवा अचानकपणे चिरस्थायी होत नाही तर ती, कालांतराने, आपोआप अधिकाधिक चिरस्थायी बनत जाते. कार्यकारी असणाऱ्या बाह्यवर्ती चेतनेहून विभिन्न असणाऱ्या या चेतनेची तुम्हाला जाणीव होऊ लागते. प्रथमतः कर्म करत असताना तुम्हाला या विभिन्न चेतनेची जाणीव होत नाही, पण जेव्हा कर्म थांबते तेव्हा लगेचच तुम्हाला असे जाणवते की, ती चेतना पूर्ण वेळ मागून तुमच्याकडे लक्ष ठेवून होती; नंतर मग कर्म चालू असतानादेखील तिची जाणीव होऊ लागते, जणू तुमच्या अस्तित्वाचे दोन भाग आहेत, अशी तुम्हाला जाणीव होते. एक अस्तित्व निरीक्षण करत आहे आणि मागे राहून आधार पुरवीत आहे तसेच श्रीमाताजींचे स्मरण करत आहे आणि दुसरे अस्तित्व कर्म करत आहे, अशी तुम्हाला जाणीव होते. असे जेव्हा घडते तेव्हा खऱ्या चेतनेसह कर्म करणे अधिकाधिक सोपे होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 259)

साधना, योग आणि रूपांतरण – १०५

श्रीमाताजींसाठी जे कोणी पूर्ण प्रामाणिकपणे कार्य करतात त्यांच्या योग्य चेतनेची तयारी त्या कर्मामधूनच होत जाते. अगदी ते ध्यानाला बसले नाहीत किंवा त्यांनी कोणती एखादी योगसाधना केली नाही तरीही त्यांच्या चेतनेची तयारी होत असते.

ध्यान कसे करावे हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जर कर्म करत असताना तसेच सदासर्वकाळ प्रामाणिक असाल आणि जर तुम्ही श्रीमाताजींप्रति उन्मुख राहाल तर जे गरजेचे आहे ते आपोआप घडून येईल.

*

कर्म हा योगसाधनेचा एक भाग आहे आणि प्राण व त्याच्या क्रियांमध्ये ‘ईश्वरी उपस्थिती’, ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’ अवतरित व्हाव्यात म्हणून त्यांना आवाहन करण्यासाठी कर्म हे एक उत्तम संधी प्रदान करते; कर्मामुळे समर्पणाचे क्षेत्रदेखील विस्तारित होते आणि समर्पणाची संधीही वाढीस लागते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 247)

साधना, योग आणि रूपांतरण – १०४

मी नेहमीच असे सांगत आलो आहे की, साधना म्हणून करण्यात आलेले कर्म – करण्यात आलेले कर्म म्हणजे ‘ईश्वरा’कडून आलेला ऊर्जेचा प्रवाह या भूमिकेतून केलेले कर्म, पुन्हा त्या ‘ईश्वरा’ला अर्पण करणे किंवा ‘ईश्वरा’साठी केलेले कर्म किंवा भक्तिभावाने केलेले कर्म हे साधनेचे एक प्रभावी माध्यम असते आणि अशा प्रकारचे कर्म हे विशेषतः पूर्णयोगामध्ये आवश्यक असते. कर्म, भक्ती आणि ध्यान हे योगाचे तीन आधार असतात. तुम्ही या तिन्ही आधारांच्या साहाय्याने योग करू शकता किंवा दोन किंवा एका आधाराच्या साहाय्यानेही योग करू शकता. ज्याला रुढ अर्थाने ‘ध्यान’ असे म्हटले जाते तसे ध्यान करणे काही जणांना जमत नाही, परंतु अशी माणसं कर्माच्या किंवा भक्तीच्या द्वारे किंवा कर्म आणि भक्ती या दोहोंच्या एकत्रित माध्यमातून प्रगती करून घेतात. कर्म आणि भक्ती यांच्याद्वारे चेतनेचा विकास होतो आणि सरतेशेवटी त्या चेतनेमध्ये सहजस्वाभाविक ध्यान आणि साक्षात्कार शक्य होतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 209)

साधना, योग आणि रूपांतरण – १०२

चेतना ‘ईश्वरा’प्रत खुली करणे आणि प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवून आणणे हे साधनेचे उद्दिष्ट असते. ध्यान किंवा निदिध्यासन हा एक साधन आहे मात्र केवळ एक साधन, भक्ती हे दुसरे एक साधन आहे, तर कर्म हे आणखी एक साधन आहे. साक्षात्काराच्या दिशेने अवलंबण्यात आलेले पहिले साधन म्हणून योग्यांकडून ‘चित्तशुद्धीची साधना’ केली जात असे आणि त्यातून त्यांना संतांच्या संतत्वाची आणि ऋषीमुनींच्या निश्चलतेची, अचंचलतेची प्राप्ती होत असे. पण आम्ही प्रकृतीच्या ज्या रूपांतरणाविषयी सांगतो, ते यापेक्षाही काहीतरी अधिक आहे; आणि हे रूपांतरण केवळ निदिध्यासनाने (contemplation) साध्य होत नाही, त्यासाठी कर्म आवश्यक असते, कर्मामधील योग अनिवार्य असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 208)

साधना, योग आणि रूपांतरण – १०१

आजपर्यंत आपण ‘साधना, योग आणि रूपांतरण’ या मालिकेमध्ये ध्यान म्हणजे काय, एकाग्रता म्हणजे काय, या दोन्हीमध्ये काय फरक आहे, एकाग्रतेच्या विविध पद्धती कोणत्या, ध्यानामध्ये येणारे अडथळे कोणते आणि त्यावर कोणत्या मार्गांनी मात करता येते, समाधी – अवस्था म्हणजे काय, पारंपरिक योगमार्गातील समाधी आणि पूर्णयोगांतर्गत समाधी यामधील फरक, आत्मसाक्षात्कार म्हणजे काय इत्यादी विविध गोष्टी, त्यांचे बारकावे समजावून घेतले.

ध्यानाच्या मार्गाने उन्नत होत होत, समाधी-अवस्थेपर्यंत पोहोचणे हा साधनेचा केवळ एक मार्ग झाला. तो महत्त्वाचा असला तरी एकमेव नाही. पूर्णयोगांतर्गत साधना ही फक्त ध्यानापुरती सीमित नाही. तर ध्यानावस्थेत प्राप्त झालेली शांती, प्रेम, प्रकाश, ज्ञान, आनंद या साऱ्या गोष्टी बाह्य व्यवहारामध्येही उतरविणे येथे अभिप्रेत असते. आणि येथेच महत्त्वाची भूमिका असते ती कर्माची!

ध्यानासाठी दिवसाकाठी आपण किती वेळ देऊ शकतो ? फारफार तर तास-दोन तास. पण उरलेला सर्व वेळ आपण काही ना काही कर्म करत असतो. दैनंदिन व्यवहार करत असतो, उपजीविकेसाठी कामकाज करत असतो. ते करत असताना आपली वृत्ती कशी असते, आपली भूमिका कशी असते, आपण कोणत्या भावनेने कर्म करतो, कर्मफलाबाबत आपला दृष्टिकोन काय असतो, या व यासारख्या गोष्टींवरच कर्म हे ‘कर्मबंधन’ ठरणार की त्याचे पर्यवसान ‘कर्मयोगा’ मध्ये होणार हे अवलंबून असते.

पूर्णयोगामध्ये तर कर्माला विशेषच महत्त्व दिलेले आढळते. कारण या पार्थिव जीवनाचे ‘दिव्य जीवना’मध्ये रूपांतरण घडविणे हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट असते. या दृष्टीने, पूर्णयोगाच्या प्रकाशात, एक साधनामार्ग या दृष्टिकोनातून ‘कर्म-व्यवहारा’कडे पाहण्याचा प्रयत्न आपण येथून पुढच्या भागांमध्ये करणार आहोत.

संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक

साधना, योग आणि रूपांतरण – ७४

(एका साधकाने ‘ध्याना’मध्ये त्याला जो साक्षात्कार झाला त्यासंबंधी श्रीअरविंद यांना लिहून कळविले आहे, असे दिसते. त्यावर श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

वास्तविक, हा साक्षात्कार जाग्रतावस्थेमध्ये होणे आवश्यक आहे आणि तो जीवनाची वास्तविकता व्हावी यासाठी टिकून राहणेदेखील आवश्यक आहे. केवळ समाधी अवस्थेमध्येच जर त्याचा अनुभव आला तर तो अतिचेतन (superconscient) स्थितीचा, आंतरिक अस्तित्वाच्या फक्त काही भागांसाठीच खरा असणारा अनुभव असेल; मात्र तो संपूर्ण चेतनेला खरा वाटणार नाही.

समाधी अवस्थेमधील अनुभवांचा उपयोग व्यक्तित्व खुले होण्यासाठी आणि त्याच्या तयारीसाठी होतो. परंतु (ध्यानामधील) साक्षात्कार जेव्हा जाग्रतावस्थेमध्येही नित्य टिकून राहतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने प्राप्त झालेला असतो. त्यामुळे ‘पूर्णयोगा’मध्ये जाग्रतावस्थेतील अनुभवाला आणि साक्षात्काराला सर्वाधिक महत्त्व दिले जाते.

‘स्थिरचित्त नित्य-विस्तारत जाणाऱ्या या चेतनमध्ये कर्म करणे ही एकाच वेळी साधना असते आणि तीच सिद्धीही असते,’ हे जे तुम्ही कर्माबाबत लिहिले आहे ते योग्य आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 253)

साधना, योग आणि रूपांतरण – ४९

तुम्ही मनाने अगदी खंबीर नसाल तर, तुम्ही सदासर्वकाळ किंवा दिवसातील बराचसा काळ ध्यानामध्ये व्यतीत करता कामा नये. कारण मग तुम्हाला पूर्णतः आंतरिक जगतामध्ये राहायची सवय लागू शकते आणि त्यामुळे तुमचा बाह्य वास्तवांशी असणारा संपर्क तुटू शकतो. यामुळे एककल्ली आणि विसंवादी वाटचाल होते आणि त्यामुळे संतुलन ढळण्याची शक्यता असते. ध्यान आणि कर्म दोन्ही करावे आणि या दोन्ही गोष्टी श्रीमाताजींना अर्पण कराव्यात हे सर्वात उत्तम.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 251)