Posts

साधना, योग आणि रूपांतरण – २३३

फक्त ध्यानामुळेच प्रकृतीमध्ये परिवर्तन होऊ शकते असा आमचा अनुभव नाही किंवा दैनंदिन कर्मव्यवहार आणि बाह्य व्यापार यांच्यापासून निवृत्त होऊन जे परिवर्तन घडवून आणू पाहत आहेत त्यांनाही त्यापासून फार लाभ झाला आहे असे नाही. किंबहुना अनेक उदाहरणांमध्ये तर ते घातकच ठरले आहे.

काही विशिष्ट प्रमाणात ध्यान-एकाग्रता, हृदयामध्ये आंतरिक अभीप्सा आणि श्रीमाताजींच्या उपस्थितीप्रत चेतनेचे खुलेपण आणि ऊर्ध्वस्थित शक्तीकडून होणारे अवतरण या गोष्टी आवश्यक असतात. परंतु कर्माविना, कोणतेही कार्य न करता प्रकृतीचे खऱ्या अर्थाने परिवर्तन होऊ शकत नाही. परिवर्तन झाले आणि त्यानंतर जर व्यक्ती लोकांच्या संपर्कामध्ये आली तरच त्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये परिवर्तन झाले आहे की नाही याची खरी कसोटी लागते.

व्यक्ती कोणत्याही प्रकारचे काम करत असली तर, त्यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असे काहीही नसते. सर्व कर्मं जी श्रीमाताजींना अर्पण केली जातात आणि जी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या शक्तिनिशी केली जातात ती सर्व कर्मं एकसमान असतात.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 252)

साधना, योग आणि रूपांतरण – २३१

रूपांतरणाच्या प्रक्रियेत बाह्य चेतनेचा समावेश असणे हे ‘पूर्णयोगा’मध्ये आत्यंतिक महत्त्वाचे असते. केवळ ध्यानाद्वारे हे रूपांतरण शक्य होत नाही. कारण ध्यानाचा संबंध हा केवळ आंतरिक अस्तित्वाशी असतो. त्यामुळे कर्म हे येथे अनन्यसाधारण महत्त्वाचे ठरते. फक्त ते योग्य वृत्तीने आणि योग्य जाणिवेने केले पाहिजे. आणि तसे जर ते केले गेले तर, कोणत्याही ध्यानाने जो परिणाम साध्य होतो तोच परिणाम अशा कर्मानेदेखील साध्य होतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 221)

साधना, योग आणि रूपांतरण – २३०

चेतना ‘ईश्वरा’प्रत खुली करणे आणि प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवून आणणे हे साधनेचे उद्दिष्ट आहे. ध्यान किंवा निदिध्यासन हा यांतील एक मार्ग आहे पण ते केवळ एक साधन आहे, भक्ती हे दुसरे साधन, तर कर्म हे आणखी एक साधन आहे.

साक्षात्काराच्या दिशेने पहिले साधन म्हणून योग्यांकडून चित्तशुद्धीची साधना केली जात असे आणि त्यातून त्यांना संतांच्या संतत्वाची आणि ऋषीमुनींच्या अचंचलतेची प्राप्ती होत असे. पण आम्ही प्रकृतीच्या ज्या रूपांतरणाविषयी बोलतो, ते यापेक्षा काहीतरी अधिक आहे; आणि हे रूपांतरण केवळ ध्यानसमाधीने होत नाही, त्यासाठी कर्म आवश्यक असते. कर्मातील ‘योग’ हा अनिवार्य असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 208)

साधना, योग आणि रूपांतरण – २२८

अज्ञान आणि अहंभावातून केलेल्या कृतीला म्हणजे, जी कृती अहंकाराच्या तुष्टीसाठी आणि राजसिक इच्छेने प्रेरित होऊन केली जाते त्या कृतीला मी ‘कर्म’ मानत नाही.

अज्ञानाचा जणू शिक्काच असणाऱ्या अहंकार, राजसिकता आणि इच्छावासना यांपासून सुटका करून घेण्याचा संकल्प असल्याखेरीज ‘कर्मयोग’ घडूच शकत नाही.

परोपकार किंवा मानवतेची सेवा किंवा नैतिक किंवा आदर्शवादी अशा उर्वरित सर्व गोष्टी, ज्या गोष्टी कार्याच्या गहनतर सत्याला पर्यायी आहेत, असे मानवी मन मानते, त्या सुद्धा माझ्या दृष्टीने ‘कर्म’ या संज्ञेला पात्र ठरत नाहीत.

जी कृती ‘ईश्वरा’साठी केली जाते, जी कृती ‘ईश्वरा’शी अधिकाधिक एकत्व पावून केली जाते आणि अन्य कशासाठीही नाही तर, केवळ ’ईश्वरा’साठीच केली जाते अशा कृतीला मी ’कर्म’ असे संबोधतो.

साहजिकच आहे की, ही गोष्ट सुरुवातीला तितकीशी सोपी नसते; गहन ध्यान आणि दीप्तिमान ज्ञान यांच्यापेक्षा ती काही कमी सोपी नसते, एवढेच काय पण, अगदी खरेखुरे प्रेम आणि भक्ती यांच्याहूनही ती गोष्ट काही कमी सोपी नसते. परंतु इतर गोष्टींप्रमाणेच या गोष्टीची (कर्माची) सुरुवात देखील तुम्ही सुयोग्य वृत्ती आणि दृष्टिकोन बाळगून केली पाहिजे, तुमच्यामधील सुयोग्य संकल्पासहित ही गोष्ट करण्यास तुम्ही सुरुवात केली पाहिजे, अशा वृत्तीने केलेले ‘कर्म’ हे भक्ती किंवा ध्यान यांच्याइतकेच प्रभावी ठरू शकते. अन्य गोष्टी त्यानंतर घडून येतील. (उत्तरार्ध उद्या)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 216-218)

साधना, योग आणि रूपांतरण – १२९

एक क्षण असा येईल की, जेव्हा तुम्ही कर्ते नसून फक्त एक साधन आहात, हे तुम्हाला अधिकाधिक जाणवू लागेल. सुरुवातीला तुमच्या भक्तीच्या शक्तीने ‘दिव्य माते’बरोबर असलेला तुमचा संपर्क इतका प्रगाढ होईल की, तिचे मार्गदर्शन मिळावे, तिची थेट आज्ञा किंवा प्रेरणा मिळावी, नेमकी कोणती गोष्ट केली पाहिजे याबाबत खात्रीशीर संकेत मिळावा, ती गोष्ट करण्याचा मार्ग सापडावा आणि त्याचा परिणाम दिसून यावा, म्हणून तुम्ही सदा सर्वकाळ फक्त एकाग्रता करणे आणि सारे काही तिच्या हाती सोपविणे पुरेसे ठरेल. आणि मग कालांतराने तुमच्या हे लक्षात येईल की, दिव्य ‘शक्ती’ आपल्याला केवळ प्रेरणा देते किंवा मार्गदर्शनच करते असे नाही तर ती आपल्या कर्माचा आरंभही करते आणि तीच ते कर्म घडवते देखील! तेव्हा तुम्हाला तुमच्या साऱ्या गतिविधी, हालचाली, कृती या तिच्यापासूनच उगम पावत आहेत, तुमच्या साऱ्या शक्ती या तिच्याच आहेत; तुमचे मन, प्राण, शरीर यांना तिच्या कार्याचे सचेत आणि आनंदी साधन बनले असल्याची, तिच्या लीलेचे माध्यम बनले असल्याची जाणीव होईल; या जडभौतिक विश्वामध्ये आपण तिच्या आविष्करणाचे साचे बनलो आहोत अशी जाणीव तुम्हाला होईल. एकत्वाच्या आणि अवलंबित्वाच्या अवस्थेएवढी दुसरी कोणतीही आनंदी अवस्था असू शकत नाही; कारण ही पायरी तुम्हाला तुमच्या अज्ञानजन्य दुःखपूर्ण व तणावपूर्ण जीवनाच्या सीमारेषेच्या पलीकडे, तुमच्या आध्यात्मिक अस्तित्वाच्या सत्यामध्ये, सखोल शांतीमध्ये आणि त्याच्या उत्कट आनंदामध्ये घेऊन जाते.

हे रूपांतरण होत असताना, अहंकारात्मक विकृतीच्या सर्व कलंकापासून तुम्ही स्वतःला अ-बाधित ठेवण्याची नेहमीपेक्षाही अधिक आवश्यकता असते. तसेच आत्म-दानाच्या आणि त्यागाच्या शुद्धतेला कलंक लागेल अशी कोणतीही मागणी वा कोणताही आग्रहदेखील तुम्ही धरता कामा नये. कर्म किंवा त्याचे फळ यासंबंधी कोणतीही आसक्ती तुमच्यामध्ये असता कामा नये, तुम्ही कोणत्याही अटी त्या दिव्य शक्तीवर लादता कामा नयेत. मी त्या दिव्य शक्तीचे साधन बनलो आहे असा कोणताही ताठा, घमेंड किंवा अहंकार तुम्हाला असता कामा नये. त्या दिव्य शक्तींचा वापर तुमच्या मनाच्या, प्राणाच्या किंवा शरीराच्या वैयक्तिक समाधानासाठी किंवा वापरासाठी करून, तुमच्या माध्यमाद्वारे कार्यरत असणाऱ्या त्या शक्तींची महानता तुम्ही विकृत करता कामा नये. तुमची श्रद्धा, तुमचा प्रामाणिकपणा, तुमच्या अभीप्सेची शुद्धता तुमच्या अस्तित्वाच्या साऱ्या स्तरांना, साऱ्या प्रतलांना व्यापणारी असली पाहिजे, ती निरपेक्ष असली पाहिजे; तेव्हा मग अस्वस्थ करणारा प्रत्येक घटक, विकृत करणारा प्रत्येक प्रभाव तुमच्या प्रकृतीमधून एकेक करून निघून जाईल. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 32 : 12-13)

साधना, योग आणि रूपांतरण – १२८

तुम्हाला जर ईश्वरी कार्य करणारा सच्चा कार्यकर्ता व्हायचे असेल तर, सर्व इच्छा- वासनांपासून आणि स्व-केंद्रित अहंकारापासून पूर्णतः मुक्त असणे हे तुमचे पहिले उद्दिष्ट असले पाहिजे. तुमचे संपूर्ण जीवन म्हणजे ‘परमेश्वरा’प्रत केलेले एक अर्पण असले पाहिजे, एक यज्ञ असला पाहिजे. कर्म करण्यामागचे तुमचे एकमेव उद्दिष्ट (ईश्वराची) सेवा करणे, (दिव्य शक्ती) ग्रहण करणे, परिपूर्ण होणे आणि ‘दिव्य शक्ती’च्या कार्यामध्ये तिचे आविष्करण करणारे एक साधन बनणे हेच असले पाहिजे. तुम्ही दिव्य चेतनेमध्ये अशा रीतीने वृद्धिंगत होत राहिले पाहिजे की, एक दिवस तुमची इच्छा आणि तिचा संकल्प यामध्ये कोणताही भेद शिल्लक राहणार नाही. तिच्या ऊर्मीखेरीज अन्य कोणतीही प्रेरणा तुमच्यामध्ये असता कामा नये, तुमच्यामध्ये आणि तुमच्या माध्यमातून घडणाऱ्या तिच्या सचेत कार्याशिवाय अन्य कोणतेही कर्म (तुमच्यामध्ये शिल्लक) असता कामा नये. अशा प्रकारचे गतिमान एकत्व साधण्याची क्षमता जोवर तुमच्यामध्ये येत नाही तोपर्यंत, आपण स्वतः म्हणजे दिव्य शक्तीच्या सेवेसाठी तयार करण्यात आलेला, सारी कर्मे तिच्यासाठीच करणारा एक देह आणि आत्मा आहोत, असे तुम्ही स्वतःला समजले पाहिजे.

स्वतंत्र कर्तेपणाची भावना तुमच्यामध्ये अजूनही खूप प्रभावी असली आणि कर्म करणारा मीच आहे, अशी तुमची भावना असली तरीसुद्धा तुम्ही ते कर्म त्या दिव्य शक्तीसाठीच केले पाहिजे. अहंकारी निवडीवरील भर व त्याचा सर्व ताणतणाव, वैयक्तिक लाभासाठीची सर्व लालसा, स्वार्थी इच्छांच्या सर्व अटी या (तुमच्या) प्रकृतीमधून तुम्ही काढून टाकल्या पाहिजेत. तेथे फळाची कोणतीही मागणी असता कामा नये, तसेच काहीतरी बक्षीस मिळावे म्हणून धडपड असता कामा नये. ‘दिव्य माते’चा संतोष आणि तिच्या कार्याची परिपूर्ती हेच तुमचे एकमेव फळ आणि दिव्य चेतनेमध्ये सातत्यपूर्ण प्रगती आणि स्थिरता, सामर्थ्य, आणि आनंद हेच तुमचे पारितोषिक! सेवेचा आनंद आणि कर्मामधून मिळणारा आंतरिक विकासाचा आनंद हा निःस्वार्थी कार्यकर्त्यासाठी पुरेसा मोबदला असतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 32 : 12)

साधना, योग आणि रूपांतरण – १२७

कर्मासाठी केलेले कर्म किंवा परतफेडीची, पारितोषिकाची किंवा कोणत्याही वैयक्तिक फळाची वा मोबदल्याची अपेक्षा न करता, इतरांसाठी केलेले कर्म असा सर्वसाधारणपणे, निरपेक्ष कर्माचा अर्थ होतो. परंतु ‘योगा’मध्ये मात्र ‘ईश्वरा’साठी केलेले इच्छाविरहित कर्म, हे कोणत्याही अटीविना वा मागणीविना एक अर्पण म्हणून केले जाते; केवळ ‘ईश्वरेच्छा’ म्हणूनच केले जाते अथवा ‘ईश्वरा’च्या प्रेमापोटी ते केले जाते, असा त्याचा अर्थ होतो.

*

स्वतःची आंतरिक प्रगती आणि परिपूर्णता यासाठी योगसाधना करणे हेच केवळ तुमचे उद्दिष्ट असता कामा नये तर, ‘ईश्वरा’साठी कार्य करायचे हेदेखील तुमचे उद्दिष्ट असले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 231)

साधना, योग आणि रूपांतरण – १२५

कर्माची आध्यात्मिक परिणामकारकता ही अर्थातच आंतरिक दृष्टिकोनावर अवलंबून असते. कर्मामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला अर्पण-भाव हा महत्त्वाचा असतो. याच्या जोडीला, एखादी व्यक्ती जर कर्म करताना श्रीमाताजींचे स्मरण करू शकत असेल किंवा एका विशिष्ट प्रकारच्या एकाग्रतेद्वारे श्रीमाताजींच्या उपस्थितीची तिला जाणीव होत असेल किंवा एक शक्ती हे कार्य करत आहे, हे कार्य सांभाळत आहे, याची जर व्यक्तीला जाण असेल तर त्यामुळे आध्यात्मिक परिणामकारकता अधिकच वाढीला लागते. पण मनावर मळभ आलेले असताना, नैराश्य आलेले असताना किंवा संघर्षाच्या प्रसंगी व्यक्ती जरी या गोष्टी करू शकली नाही तरी, त्या कर्माची प्रारंभिक प्रेरकशक्ती असणारे प्रेम वा भक्ती या साऱ्याच्या पाठीमागे तशीच टिकून राहू शकते; ही शक्ती त्या मळभाच्या मागे उपस्थित राहू शकते आणि अंधकारानंतर पुन्हा सूर्यासारखी पूर्ववत उदय पावू शकते.

सर्व साधना ही अशीच असते आणि म्हणूनच या अंधकारमय क्षणांमुळे व्यक्तीने नाउमेद होता कामा नये, तर (ईश्वरविषयक) मूळ उत्कट आस (urge) आपल्या अंतरंगामध्ये तशीच टिकून आहे आणि हे अंधकारमय क्षण हा प्रवासामधील केवळ एक टप्पा आहे, तो टप्पा ओलांडल्यानंतर तो स्वतःच आपल्याला एका महत्तर प्रगतीकडे घेऊन जाणार आहे, याची व्यक्तीला जाणीव असली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 242)

साधना, योग आणि रूपांतरण – ११८

(पूर्वार्ध – “कर्म करणे हा साधनेचा एक चांगला मार्ग आहे, कारण तुम्हाला एखादे कर्म जर योग्य प्रकारे करायची इच्छा असेल तर तुम्ही म्हणजे ते ‘कर्म’च बनला पाहिजेत, ती ‘कर्म करणारी व्यक्ती’ नव्हे. अन्यथा तुम्हाला ते कधीच योग्य रीतीने करता येणार नाही”, असे श्रीमाताजींनी सांगितले.)

उत्तरार्ध –

तुम्ही (कर्मरूप न बनता) केवळ एक ‘कर्म करणारी व्यक्ती’ असे बनून राहिलात; तसेच जर तुमचे विचारही भरकटत राहिले तर निश्चितपणे असे होईल की, जर तुम्ही कोणत्या नाजूक वस्तू हाताळत असाल तर त्या मोडतील, तुटतील; तुम्ही स्वयंपाक करत असाल तर तुमच्या हातून एखादा पदार्थ करपून जाईल, तुम्ही जर खेळत असाल तर त्यात तुम्ही पराभूत व्हाल. म्हणून कर्म ही एक उत्तम साधना असते हे लक्षात घ्या आणि तुम्हाला ती साधना चांगल्या रीतीने करायची असेल तर (कर्म करत असताना स्वत: कर्मरूप होणे) हाच एक मार्ग आहे.

…अगदी सगळ्या गोष्टींबाबत हे असेच असते. कोणतीही गोष्ट जर योग्य प्रकारे केली तर ती योग-साधनेचा भाग बनू शकते. आणि योग्य प्रकारे केली नाही तर अगदी (तुम्ही करत असलेल्या) तपस्येचा देखील काही उपयोग होऊ शकणार नाही आणि परिणामी तुमची प्रगतीसुद्धा होणार नाही. कारण परत तेच! तुम्ही जर तपस्या करत असाल आणि ती करत असताना सदासर्वकाळ स्वत:कडे पाहात असाल आणि स्वत:च्या मनाशी असे विचार करत असाल असाल की, ”माझी प्रगती होत आहे ना? माझे भले होईल ना? मी यशस्वी होईन ना?” तर तेव्हा तो तुमचा अहंकार असतो, तो हळूहळू वाढत जातो आणि सर्व जागा व्यापून टाकतो, मग तो अन्य कशालाच जागा शिल्लक ठेवत नाही. आध्यात्मिक अहंकार हा तर सर्वात वाईट असतो कारण तो त्याच्या स्वत:च्या हीनपणाबद्दल पूर्णपणे बेसावध असतो. ‘मी पूर्णपणे दिव्य नसलो तरी मी खूप श्रेष्ठ आहे,’ अशी त्याची समजूत असते.

…(वर उल्लेख केल्याप्रमाणे, व्यक्ती स्वत: कर्मरूप बनून न जाता, कर्म करणारी आणि ते करताना सातत्याने स्वत:कडेच बघत राहणारी व्यक्ती बनून राहिली आणि) पुन्हापुन्हा स्वत:कडे मागे वळून बघत राहिली, म्हणजेच ती स्वत:ला सूक्ष्म अहंकाराच्या मर्यादांमध्ये कोंडून घेत राहिली तर त्यातून न्यूनगंड, मर्यादा, क्षुद्रपणा, अक्षमता या सर्व गोष्टी निर्माण होतात. व्यक्तीने आपली दारे खुली केली पाहिजेत, स्वत:ला व्यापक केले पाहिजे. आणि त्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वत:वर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा, तुम्ही जे काही कर्म करत आहात त्या कर्मावरच लक्ष केंद्रित करणे तुम्हाला जमले पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 04 : 362-364)

साधना, योग आणि रूपांतरण – ११७

(कर्म हे साधनेचा भाग कसा होऊ शकते हे श्रीमाताजी येथे सांगत आहेत.)

व्यक्तीने कर्मामध्ये अधिकाधिक गढून जाण्याचा आणि परिणामतः स्वतःला विसरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते कर्म आपण ‘ईश्वरा’ला अर्पण करत आहोत या भावनेने केले पाहिजे; अगदी निरलसपणे, विपुल प्रमाणात, स्वत:ला पूर्णपणे विसरून, स्वत:मधील सर्व काही देऊ करण्याच्या भावनेने केले पाहिजे. व्यक्तीने स्वत:बद्दल विचार न करता, फक्त करत असलेल्या कर्माचाच विचार केला पाहिजे.

…तुम्हाला जर एखादी गोष्ट उत्तम रीतीने करायची असेल, मग ती कोणतीही का असेना, एखादा खेळ खेळणे, पुस्तक लिहिणे, चित्र काढणे, गायनवादन करणे किंवा अगदी एखादी शर्यत जिंकणे अशी ती कोणतीही गोष्ट असू शकते. ती जर तुम्हाला उत्तम रीतीने करायची असेल तर तुम्ही ती गोष्टच बनले पाहिजे; ते कर्म करताना स्वतःकडे पाहणारी तुमच्यातील ती क्षुद्र व्यक्ती शिल्लक राहता कामा नये. कारण व्यक्ती जर कर्म करताना स्वत:कडे पाहू लागली… तर ती व्यक्ती अजूनही अहंकारामध्ये गुंतलेली आहे असा त्याचा अर्थ होईल. व्यक्ती जे कर्म करत आहे ते कर्मच जर ती झाली, तर ती एक मोठी प्रगती ठरते.

कर्म करताना अगदी बारीकसारीक गोष्टींमध्येही व्यक्तीने असे करायला शिकले पाहिजे. एक मजेशीर उदाहरण पाहा : समजा, तुम्हाला एका बाटलीतून दुसऱ्या बाटलीत पाणी ओतायचे असेल; तर तेव्हा तुम्ही एकाग्र होता (एक शिस्त, एक प्रकारचा व्यायाम म्हणून तुम्ही तसा प्रयत्न केला पाहिजे.) जोपर्यंत ज्या बाटलीत पाणी भरायचे असते ती बाटली तुम्ही असता, ज्या बाटलीतून पाणी भरायचे ती बाटलीही तुम्ही असता आणि ती पाणी ओतण्याची प्रक्रियाही तुम्हीच असता, जोपर्यंत तुम्ही केवळ तेच असता तोवर सगळे काही नीट चालू असते. पण चुकून तुम्ही एक क्षणभर जरी विचार केलात : ”अरे वा! पाणी न सांडता भरलं जातंय, अरे मला जमतंय की!” त्याच क्षणी पाणी सांडतं. (कारण असा कोणताही विचार येताक्षणी व्यक्ती त्या कर्मापासून विभक्त झालेली असते.) प्रत्येक गोष्टीमध्ये, अगदी सर्वच गोष्टींमध्ये हे असेच घडते.

आणि म्हणूनच, कर्म करणे हा साधनेचा एक चांगला मार्ग आहे, कारण तुम्हाला एखादे कर्म जर योग्य प्रकारे करायची इच्छा असेल तर तुम्ही म्हणजे ते ‘कर्म’च बनला पाहिजेत, ती ‘कर्म करणारी व्यक्ती’ नव्हे. अन्यथा तुम्हाला ते कधीच योग्य रीतीने करता येणार नाही. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 04 : 362)