Posts

संन्यासवादी जीवनपद्धती ही आध्यात्मिक पूर्णतेसाठी अगदी अनिवार्यपणे आवश्यकच असते किंवा आध्यात्मिक मार्ग म्हणजे संन्यासवादी मार्गच असतो, असे मी मानत नाही.

एखाद्या कार्यामध्ये किंवा कोणत्याही कर्मामध्ये, किंवा ‘ईश्वरा’ला आपल्याकडून ज्या कर्माची अपेक्षा आहे त्या सर्व प्रकारच्या कर्मांमध्येसुद्धा अहंकार आणि कर्मफलाच्या इच्छेचा त्याग करून, ‘ईश्वरा’प्रत समर्पण करण्याचा, आध्यात्मिक आत्मदान करण्याचा आणि आध्यात्मिक आत्म-प्रभुत्वाचा आणखी एक मार्गदेखील आहे.

तसे नसते तर, भारतामध्ये ‘जनक’ किंवा ‘विदुरा’सारख्या थोर आध्यात्मिक व्यक्ती आढळल्या नसत्या; इतकेच काय ‘श्रीकृष्ण’देखील आढळला नसता; किंवा अगदी असताच तर तो ‘श्रीकृष्ण’ वृंदावन, मथुरा, द्वारका यांचा ‘अधिपती’ झाला नसता; तो राजपुत्र आणि योद्धा किंवा ‘कुरूक्षेत्रा’तील सारथी झाला नसता; तर तो फक्त एक थोर तपस्वीच बनून राहिला असता.

‘महाभारता’मध्ये किंवा अन्यत्र, ‘भारतीय धर्मशास्त्रा’मध्ये आणि ‘भारतीय परंपरे’मध्ये, जीवनाच्या परित्यागावर आधारित आध्यात्मिकतेला आणि कर्मप्रधान आध्यात्मिक जीवनाला एकसारखेच स्थान देण्यात आलेले आहे. जीवनाच्या परित्यागावर भर देणारा संन्यासवादी मार्ग हाच तेवढा ‘भारतीय परंपरे’तून आलेला आहे, आणि ‘सर्वकर्माणि’, सर्व प्रकारच्या कर्मांचा आणि जीवनाचा स्वीकार हा मार्ग ‘युरोपियन किंवा पाश्चात्त्य’ आहे, तो आध्यात्मिक नाही, किंवा तो ‘भारतीय’ नाही असे म्हणता येत नाही.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 250]

(श्रीअरविंद येथे साधकांना सांगत आहेत की, एखादी गोष्ट कोणत्या वृत्तीने केली जाते, तिची उभारणी कोणत्या तत्त्वाच्या आधारावर केली जाते आणि तिचा उपयोग कोणत्या कारणासाठी केला जातो, यावर सारे काही अवलंबून असते.)

राजकारण हा काही नेहमीच चांगला स्वच्छ कारभार असतो असे नाही, किंबहुना बरेचदा तो तसा नसतोच. असे असूनही मी राजकारण केले आणि अगदी सर्वात जहाल असे क्रांतिकारी राजकारण, ज्याला ‘घोर कर्म’ म्हणता येईल असे राजकारण केले.

युद्धालादेखील आध्यात्मिक प्रकारचे कृत्य असे म्हणता येणार नाही तरीही मी युद्धाला साहाय्य केले आणि माणसांना युद्धावर पाठविले. ‘श्रीकृष्णा’ने ‘अर्जुना’ला अत्यंत भयानक प्रकारचे युद्ध करण्याचे आवाहन केले आणि त्याच्या उदाहरणाद्वारे, माणसांनी सर्व प्रकारची मानवी कर्मे, ‘सर्वकर्माणि’ करावीत म्हणून त्यांना प्रोत्साहन दिले आहे. आता, ‘श्रीकृष्ण हा आध्यात्मिक मनुष्य नव्हता किंवा त्याने अर्जुनाला दिलेला सल्ला चुकीचा होता किंवा तो तत्त्वतः गैरलागू होता’ असे म्हणून तुम्ही वाद घालत बसणार का? श्रीकृष्ण तर याही पुढे जात उद्घोषित करतो की, एखाद्या मनुष्यास त्याच्या मूलभूत प्रकृतिधर्मानुसार, त्याच्या स्वभावानुसार आणि त्याच्या क्षमतेनुसार जे कर्म करण्यास सांगण्यात आले आहे, ते कर्म जर त्याने त्याच्या आणि त्या कर्माच्या धर्मानुसार केले आणि योग्य प्रकारे आणि योग्य वृत्तीने केले तर, तसे कर्म केल्याने तो ‘ईश्वरा’प्रत जाऊ शकतो.

‘ब्राह्मण’, ‘क्षत्रिय’ यांच्याप्रमाणेच श्रीकृष्ण ‘वैश्य’ धर्माला आणि त्याच्या कर्मालाही मान्यता देतो. श्रीकृष्णाच्या भूमिकेतून पाहायचे झाले तर, एखाद्या व्यक्तीने व्यापारउदिम करणे, पैसे मिळविणे, नफा मिळविणे आणि तरीसुद्धा तो आध्यात्मिक असणे, त्याने ‘योगसाधना’ करणे, त्याला आंतरिक जीवन असणे शक्य आहे.

‘भगवद्गीता’ आध्यात्मिक मुक्तीचे साधन म्हणून सातत्याने कर्माचे समर्थन करते. ‘भक्ती’ आणि ‘ज्ञानमार्गा’प्रमाणेच ‘कर्ममार्गा’चे महत्त्वही प्रतिपादन करत आहे. श्रीकृष्ण कर्माला एक अधिक उच्चतर नियम (law) लावू पाहत आहे. कर्म निरपेक्षपणे केले पाहिजे, बक्षिसाच्या किंवा फलाच्या आसक्तीविना, निरहंकारी भूमिकेतून वा वृत्तीने, ‘ईश्वरा’प्रत केलेले अर्पण किंवा अर्पण केलेली समिधा या स्वरूपात कर्म केले गेले पाहिजे असे त्याचे सांगणे आहे.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 249]

साधकाने सर्व कामधाम सोडून द्यावे आणि फक्त वाचन व ध्यान करावे, हे श्रीमाताजींना अपेक्षित नाही. कर्म हा योगसाधनेचा एक भाग आहे आणि प्राण व त्याच्या क्रियांमध्ये ईश्वरी उपस्थिती’, ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’ खाली अवतरित व्हाव्यात म्हणून त्यांना आवाहन करण्यासाठी कर्म एक उत्तम संधी प्रदान करते; कर्मामुळे समर्पणाचे क्षेत्रदेखील विस्तारित होते आणि समर्पणाची संधीही वाढीस लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 247)

…कर्म हे पूर्णयोगाचे आवश्यक अंग आहे. तुम्ही कर्म केले नाहीत आणि सगळा वेळ जर ‘ध्याना’मध्येच व्यतीत केलात तर तुमची साधना व तुम्ही वास्तवावरील पकड गमावून बसाल; आणि तुम्ही स्वतःला अनियंत्रित अशा वैयक्तिक कल्पनांमध्ये गमावून बसाल…

-श्रीअरविंद
(CWSA 32 : 248)

(जे ईश्वराची सेवा करू इच्छितात त्यांनी ही प्रार्थना जरूर करावी…)

सर्व अडथळ्यांवर मात करून विजयी होणाऱ्या हे ‘ईश्वरा’, हे ‘प्रभू’ तुझा जयजयकार असो.

असे वरदान दे की, आमच्यातील कोणतीही गोष्ट ‘तुझ्या’ कार्यात अडसर ठरू नये.

असे वरदान दे की, कशामुळेही ‘तुझ्या’ आविष्करणामध्ये विलंब होऊ नये.

असे वरदान दे की, सर्व गोष्टींमध्ये आणि प्रत्येक क्षणी ‘तुझी’च इच्छा कार्यरत राहील.

‘तुझा’ मानस आमच्यामध्ये परिपूर्ण व्हावा, आमच्या प्रत्येक तत्त्वामध्ये, आमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक क्रियेमध्ये, आमच्या सर्वोच्च उंचीपासून ते आमच्या देहाच्या अगदी सूक्ष्मतम अशा पेशींपर्यंत तुझीच इच्छा पूर्णत्वाला जावी म्हणून, आम्ही ‘तुझ्या’समोर उभे आहोत.

असे वरदान दे की, आम्ही ‘तुझ्या’प्रत पूर्णपणे आणि सदोदित एकनिष्ठ राहू. इतर कोणत्याही प्रभावाविना आम्ही पूर्णत: ‘तुझ्या’च प्रभावाला खुले राहू, असे वरदान दे.

असे वरदान दे की, आम्ही ‘तुझ्या’प्रत एक प्रगाढ आणि उत्कट कृतज्ञता बाळगण्यास कधीही विसरणार नाही.

असे वरदान दे की, ‘तुझ्या’कडून प्रसादरूपाने, हरघडी मिळालेल्या अद्भुत गोष्टींचा आमच्याकडून कधीही अपव्यय होणार नाही.

असे वरदान दे की, आमच्यातील सर्वकाही ‘तुझ्या’ कार्यात सहभागी होईल आणि ‘तुझ्या’ साक्षात्कारासाठी सज्ज होईल.

हे ‘ईश्वरा’, हे ‘प्रभू’ सर्व साक्षात्कारांच्या परमोच्च स्वामी, तुझा जयजयकार असो. आम्हाला ‘तुझ्या विजया’बद्दलची सक्रिय आणि उत्कट, संपूर्ण आणि अविचल अशी श्रद्धा प्रदान कर.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 382)

हे ‘दिव्य’ प्रेमा, ‘परमप्रज्ञे’, परिपूर्ण ‘एकत्वा’, मी अन्य कोणी नाही तर, मी केवळ ‘तू’च व्हावे यासाठी दिवसातील प्रत्येक क्षणाला मी ‘तुला’ आवाहन करते.

या देहाद्वारे ‘तुझी’ सेवा घडू दे, ते तुझे साधन (Instrument) असल्याची जाणीव त्याला होऊ दे आणि माझी सर्व चेतना ‘तुझ्या’ चेतनेमध्ये विलीन होऊ दे. आणि त्या चेतनेद्वारे, ‘तुझ्या’ दिव्य दृष्टीने मला सर्व वस्तुमात्रांचे चिंतन करता येऊ दे.

हे ‘प्रभू’, हे ईश्वरा, ‘तुझी’ सार्वभौम ‘शक्ती’ आविष्कृत होईल असे वरदान दे; ‘तुझे’ कार्य सिद्धीस जाईल असे वरदान दे; आणि ‘तुझी’ सेविका निःशेषतया ‘तुझ्या’ सेवेमध्ये स्वतःला झोकून देऊ शकेल, असे वरदान दे.

माझ्यातील ‘मी’ कायमचा नाहीसा होऊ दे आणि केवळ साधन तेवढे शिल्लक राहू दे.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 134)

कर्म आराधना – ५३

कर्म हा योगसाधनेचा एक भाग आहे आणि प्राण व त्याच्या क्रियांमध्ये ‘ईश्वरी उपस्थिती’, ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’ अवतरित व्हाव्यात म्हणून त्यांना आवाहन करण्यासाठी कर्म ही एक उत्तम संधी प्रदान करते; कर्मामुळे समर्पणाचे क्षेत्रदेखील विस्तारित होते आणि समर्पणाची संधीही वाढीस लागते.
*
कर्माच्या माध्यमातून योगसाधना हा पूर्णयोगाच्या साधनेच्या प्रवाहामध्ये प्रवेश करण्याचा सर्वांत सोपा आणि सर्वांत अधिक प्रभावी मार्ग आहे.

– श्रीअरविंद
[CWSA 32 : 247], [CWSA 32 : 256-257]

कर्म आराधना – ४८

कर्म करत असताना तुम्ही फक्त तुमच्या कर्माचा विचार करा, कर्माच्या आधीही नको किंवा त्यानंतरही त्या कर्माचा विचार करू नका.

जे कर्म पूर्ण झाले आहे त्याकडे तुमच्या मनाला परत वळू देऊ नका. कारण ते भूतकाळाचा भाग झालेले असते आणि ते मनामध्ये पुन्हापुन्हा घोळवत ठेवणे हा शक्तीचा अपव्यय असतो.

जे कर्म करायचे आहे त्याच्या पूर्वकल्पनेने तुमच्या मनाला कष्ट होऊ देऊ नका. तुमच्यामध्ये कार्यरत असणारी ‘शक्ती’ योग्यवेळी त्या कर्माकडे लक्ष पुरवेल.

मनाच्या या दोन सवयी त्याच्या गतकालीन कार्यप्रणालीचा भाग आहेत, या सवयी काढून टाकण्यासाठी रूपांतरकारी ‘शक्ती’ दबाव टाकत आहे; परंतु शारीर-मनाने अजूनही त्या सवयींना चिकटून राहणे हे तुमच्या ताणतणावाचे आणि थकव्याचे कारण आहे. मनाच्या कार्याची आवश्यकता असेल तेव्हाच तुमच्या मनाला त्याचे कर्म करू द्यायचे हे जर का तुम्ही लक्षात ठेवू शकलात तर, ताण हलका होईल आणि (कालांतराने) निघून जाईल. वास्तविक, अतिमानसिक कार्याने शारीर-मनाचा ताबा घेऊन, त्यामध्ये दिव्य ‘प्रकाशा’ची उत्स्फूर्त कृती आणण्यापूर्वीची ही संक्रमणशील अवस्था असते.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 287]

कर्म आराधना – ४७

सुव्यवस्था आणि तालबद्धता यांच्याविना भौतिक जीवन अस्तित्वात असू शकत नाही. जेव्हा ही व्यवस्था बदलली जाते तेव्हा व्यवस्थेतील बदल हा आंतरिक वृद्धीच्या अनुषंगानेच असला पाहिजे; केवळ काहीतरी वरवरची नूतनता हवी म्हणून तो बदल करता कामा नये. पृष्ठवर्ती कनिष्ठ प्राणिक प्रकृतीच्या एका विशिष्ट भागाची फक्त बदलासाठी बदल आणि नूतनतेसाठी नूतनता मिळविण्याची ही नेहमीची धडपड असते.

सातत्याने होणाऱ्या आतंरिक विकासामुळेच व्यक्तीला जीवनामध्ये नित्यनूतनता आणि अविरत रस आढळून येणे शक्य असते. याखेरीज दुसरा कोणताही समाधानकारक मार्ग नाही.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 276]

कर्म आराधना – ४६

तुम्हाला न आवडणारे काम तुम्हाला करावे लागेलच असे नाही, तर तुम्ही आवड-निवडच सोडून दिली पाहिजे. तुम्हाला आवडते तेवढेच काम करणे म्हणजे प्राणाचे (vital) चोचले पुरवण्यासारखे आणि त्याचे प्रकृतीवर वर्चस्व चालवू देण्यासारखे आहे. कारण जीवन प्राणिक आवडी-निवडीच्या अधीन असणे, हेच तर अरूपांतरित प्रकृतीचे तत्त्व आहे. कोणतीही गोष्ट समत्वाने करता येणे हे कर्मयोगाचे तत्त्व आहे आणि ते कर्म श्रीमाताजींसाठी करायचे असल्याने, ते आनंदाने करणे ही पूर्णयोगामधील खरी आंतरात्मिक आणि प्राणिक अवस्था असते.

– श्रीअरविंद
[CWSA 29 : 248]