Tag Archive for: कर्म

नैराश्यापासून सुटका – ०५

सत्कृत्य करणे; न्यायाने, सरळपणाने, प्रामाणिकपणाने वागणे हा शांत व समाधानी जीवन जगण्याचा आणि स्वत:च्या चिंता, काळज्या कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे. अगदी पूर्ण स्वार्थी हेतुने पाहिले तरीसुद्धा ही गोष्ट खरी असल्याचे दिसते. याशिवाय खरोखरच, एखादी व्यक्ती जर नि:स्वार्थी, निरपेक्ष असेल आणि कोणत्याही वैयक्तिक आशाआकांक्षा वा अहंकारापासून मुक्त असेल तर, ती व्यक्ती खऱ्या अर्थाने सुखी होणे शक्य आहे.

तुमच्या कर्मांमुळे तयार झालेले वातावरण तुम्ही तुमच्याबरोबर, तुमच्या सभोवती आणि तुमच्यामध्ये वागवीत असता. तुम्ही केलेली कर्मे ही जर सत्कर्मे असतील, ती सुंदर, हितकर आणि सुसंवादी असतील, तर तुमच्या आजूबाजूचे वातावरणही तसेच सुंदर, हितकर व सुसंवादी राहील. पण या उलट तुमचे जीवन क्षुद्र आपमतलबीपणाने, अविचारी स्वार्थी भावनेने आणि घोर दुष्ट इच्छेने भरलेले असेल तर, तशाच वातावरणात तुम्हाला तुमचा प्रत्येक श्वास घ्यावा लागणार; म्हणजे सतत दु:ख, सततचा असंतोषच तुमच्या वाट्यास येणार; म्हणजे अंतिमत: तुमच्या पदरी नैराश्यच पडणार.

तुम्ही देह-त्याग केलात तर तुमची या वातावरणापासून सुटका होईल असे तुम्ही मानता कामा नये; उलट, देह हा एक प्रकारे अचेतनाचा (unconsciousness) पडदा असल्यासारखा असतो, जो दुःखभोगाची तीव्रता कमी करतो. जडभौतिक प्राणिक जीवनामध्ये (vital life) वावरत असताना जर तुम्ही देहाच्या संरक्षणाविना असाल तर, दुःखभोग हे अधिक तीव्र होतात आणि ज्यामध्ये बदल घडविणेच आवश्यक असते त्यामध्ये बदल घडविण्याची, ज्यामध्ये सुधारणा घडविणे आवश्यक असते त्यामध्ये सुधारणा घडविण्याची, आणि अधिक उच्चतर, अधिक आनंदी व अधिक प्रकाशमय जीवन व चेतना यांच्याप्रत स्वतःला खुले करण्याची संधीही (देह नसल्याने) आता तुमच्यापाशी नसते.

म्हणून तुम्ही तुमचे कार्य येथेच (या पृथ्वीवर असतानाच) करण्याची त्वरा केली पाहिजे; कारण तुम्ही तुमचे कार्य इथेच खऱ्या अर्थाने करू शकता. मृत्युकडून कोणतीही अपेक्षा बाळगू नका. जीवन हीच तुमची मुक्ती आहे. या जीवनात राहूनच तुम्ही स्वतःचे रूपांतरण केले पाहिजे. पृथ्वीवरच तुमची प्रगती होऊ शकते आणि पृथ्वीवरच तुम्हाला साक्षात्कार होऊ शकतो. या देहामध्ये असतानाच तुम्ही विजय संपादन करू शकता.

– श्रीमाताजी (CWM 03 : 197-198)

जीवन जगण्याचे शास्त्र – २८

तुम्ही जे कोणते कर्म कराल ते शक्य तेवढे परिपूर्णपणे करण्याचा प्रयत्न करा. मनुष्याच्या अंतर्यामी असणाऱ्या ईश्वराची ही सर्वोत्तम सेवा असते.

– श्रीमाताजी (CWM 14 : 306)

*

कर्म हा योगसाधनेचा एक भाग आहे. प्राण व त्याच्या क्रियांमध्ये ईश्वरी ‘उपस्थिती’, ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’ अवतरित व्हाव्यात म्हणून त्यांना आवाहन करण्यासाठी कर्म एक उत्तम संधी प्राप्त करून देते; कर्मामुळे समर्पणाचे क्षेत्रदेखील विस्तारित होते आणि समर्पणाची संधीही वाढीस लागते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 247)

जीवन जगण्याचे शास्त्र – २४

साधक : “सर्व कर्मं म्हणजे अनुभवाची पाठशाळा असते,” असे श्रीअरविंदांनी का म्हटले आहे?

श्रीमाताजी : तुम्ही जर कोणतेही कर्मच केले नाही, तर तुम्हाला कोणताच अनुभव येणार नाही. समग्र जीवन हे अनुभवाचे क्षेत्र आहे. तुम्ही केलेली प्रत्येक हालचाल, तुमच्या मनात उमटलेला प्रत्येक विचारतरंग, तुम्ही केलेले प्रत्येक कर्म हा एक अनुभव असू शकतो आणि तो अनुभव असलाच पाहिजे. आणि विशेषतः तुमचे कार्यक्षेत्र हे तर तुमचे अनुभवाचे क्षेत्र असते; तुम्ही जी प्रगती करण्यासाठी आंतरिकरित्या प्रयत्न करत असता ती सर्व प्रगती, त्या (बाह्य) क्षेत्रामध्येसुद्धा उपयोगात आणली गेली पाहिजे.

तुम्ही कोणतेही काम न करता केवळ ध्यानामध्ये किंवा निदिध्यासनामध्ये राहिलात, तर तुम्ही प्रगती केली आहे किंवा नाही, हे तुम्हाला कळणार नाही. आणि मग तुमची प्रगती झाली आहे अशा भ्रमात तुम्ही राहाल. उलट, जेव्हा तुम्ही एखादे काम करायला सुरुवात करता, तेव्हा तुमच्या कामाच्या ठिकाणची परिस्थिती, तुमचे इतरांशी येणारे संबंध, तुमचा नोकरीव्यवसाय या सर्व गोष्टी म्हणजे अनुभवाचे असे एक क्षेत्र असते की, जेथे तुम्हाला तुम्ही केलेल्या प्रगतीची जाणीव तर होतेच; पण अजून जी कोणती प्रगती करून घ्यायची राहिली आहे, त्याचीही जाणीव तुम्हाला होते.

तुम्ही जर काहीही काम न करता, स्वतःमध्येच बंदिस्त होऊन राहिलात तर, कदाचित पूर्णपणे व्यक्तिगत भ्रमामध्ये तुम्ही तुमचे जीवन व्यतीत कराल, अशी शक्यता असते. परंतु ज्याक्षणी तुम्ही बाह्य जगात कृती करू लागता आणि इतरांच्या संपर्कात येता; विविध प्रकारच्या परिस्थितीच्या आणि जीवनामधील विविध वस्तुंच्या संपर्कात येता, तेव्हा तुम्हाला तुम्ही प्रगती केली आहे किंवा नाही; तुम्ही अधिक स्थिर, शांत झाला आहात की नाही; अधिक सचेत, अधिक सशक्त, अधिक निःस्वार्थी झाला आहात की नाही; तुमच्यामध्ये इच्छावासना शिल्लक आहेत की नाहीत; काही अग्रक्रम, काही दुर्बलता, काही अविश्वासूपणा शिल्लक तर नाही ना, इत्यादी सर्व गोष्टींची कर्म करत असताना तुम्हाला पूर्णतया वस्तुनिष्ठपणे जाणीव होऊ लागते.

परंतु तुम्ही जर फक्त ध्यानामध्येच स्वतःला बंदिस्त करून घेतलेत तर ते पूर्णपणे वैयक्तिक असते, आणि मग तुम्ही पूर्णपणे एका भ्रमामध्ये जाण्याची आणि त्यामधून कधीही बाहेर न पडण्याची शक्यता असते. आणि मग तुम्हाला असे वाटू शकते की, तुम्हाला काही असामान्य गोष्टींचा साक्षात्कार झाला आहे. प्रत्यक्षात मात्र तुम्हाला तशी प्रचिती आली असल्याचा किंवा तुम्ही प्रगती केली असल्याचा एक आभास, एक भ्रम तुमच्यापाशी असतो. श्रीअरविंद येथे हेच सांगू इच्छित आहेत.

– श्रीमाताजी (CWM 07 : 287-288)

साधना, योग आणि रूपांतरण – २३३

फक्त ध्यानामुळेच प्रकृतीमध्ये परिवर्तन होऊ शकते असा आमचा अनुभव नाही किंवा दैनंदिन कर्मव्यवहार आणि बाह्य व्यापार यांच्यापासून निवृत्त होऊन जे परिवर्तन घडवून आणू पाहत आहेत त्यांनाही त्यापासून फार लाभ झाला आहे असे नाही. किंबहुना अनेक उदाहरणांमध्ये तर ते घातकच ठरले आहे.

काही विशिष्ट प्रमाणात ध्यान-एकाग्रता, हृदयामध्ये आंतरिक अभीप्सा आणि श्रीमाताजींच्या उपस्थितीप्रत चेतनेचे खुलेपण आणि ऊर्ध्वस्थित शक्तीकडून होणारे अवतरण या गोष्टी आवश्यक असतात. परंतु कर्माविना, कोणतेही कार्य न करता प्रकृतीचे खऱ्या अर्थाने परिवर्तन होऊ शकत नाही. परिवर्तन झाले आणि त्यानंतर जर व्यक्ती लोकांच्या संपर्कामध्ये आली तरच त्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये परिवर्तन झाले आहे की नाही याची खरी कसोटी लागते.

व्यक्ती कोणत्याही प्रकारचे काम करत असली तर, त्यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असे काहीही नसते. सर्व कर्मं जी श्रीमाताजींना अर्पण केली जातात आणि जी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या शक्तिनिशी केली जातात ती सर्व कर्मं एकसमान असतात.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 252)

साधना, योग आणि रूपांतरण – २३१

रूपांतरणाच्या प्रक्रियेत बाह्य चेतनेचा समावेश असणे हे ‘पूर्णयोगा’मध्ये आत्यंतिक महत्त्वाचे असते. केवळ ध्यानाद्वारे हे रूपांतरण शक्य होत नाही. कारण ध्यानाचा संबंध हा केवळ आंतरिक अस्तित्वाशी असतो. त्यामुळे कर्म हे येथे अनन्यसाधारण महत्त्वाचे ठरते. फक्त ते योग्य वृत्तीने आणि योग्य जाणिवेने केले पाहिजे. आणि तसे जर ते केले गेले तर, कोणत्याही ध्यानाने जो परिणाम साध्य होतो तोच परिणाम अशा कर्मानेदेखील साध्य होतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 221)

साधना, योग आणि रूपांतरण – २३०

चेतना ‘ईश्वरा’प्रत खुली करणे आणि प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवून आणणे हे साधनेचे उद्दिष्ट आहे. ध्यान किंवा निदिध्यासन हा यांतील एक मार्ग आहे पण ते केवळ एक साधन आहे, भक्ती हे दुसरे साधन, तर कर्म हे आणखी एक साधन आहे.

साक्षात्काराच्या दिशेने पहिले साधन म्हणून योग्यांकडून चित्तशुद्धीची साधना केली जात असे आणि त्यातून त्यांना संतांच्या संतत्वाची आणि ऋषीमुनींच्या अचंचलतेची प्राप्ती होत असे. पण आम्ही प्रकृतीच्या ज्या रूपांतरणाविषयी बोलतो, ते यापेक्षा काहीतरी अधिक आहे; आणि हे रूपांतरण केवळ ध्यानसमाधीने होत नाही, त्यासाठी कर्म आवश्यक असते. कर्मातील ‘योग’ हा अनिवार्य असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 208)

साधना, योग आणि रूपांतरण – २२८

अज्ञान आणि अहंभावातून केलेल्या कृतीला म्हणजे, जी कृती अहंकाराच्या तुष्टीसाठी आणि राजसिक इच्छेने प्रेरित होऊन केली जाते त्या कृतीला मी ‘कर्म’ मानत नाही.

अज्ञानाचा जणू शिक्काच असणाऱ्या अहंकार, राजसिकता आणि इच्छावासना यांपासून सुटका करून घेण्याचा संकल्प असल्याखेरीज ‘कर्मयोग’ घडूच शकत नाही.

परोपकार किंवा मानवतेची सेवा किंवा नैतिक किंवा आदर्शवादी अशा उर्वरित सर्व गोष्टी, ज्या गोष्टी कार्याच्या गहनतर सत्याला पर्यायी आहेत, असे मानवी मन मानते, त्या सुद्धा माझ्या दृष्टीने ‘कर्म’ या संज्ञेला पात्र ठरत नाहीत.

जी कृती ‘ईश्वरा’साठी केली जाते, जी कृती ‘ईश्वरा’शी अधिकाधिक एकत्व पावून केली जाते आणि अन्य कशासाठीही नाही तर, केवळ ’ईश्वरा’साठीच केली जाते अशा कृतीला मी ’कर्म’ असे संबोधतो.

साहजिकच आहे की, ही गोष्ट सुरुवातीला तितकीशी सोपी नसते; गहन ध्यान आणि दीप्तिमान ज्ञान यांच्यापेक्षा ती काही कमी सोपी नसते, एवढेच काय पण, अगदी खरेखुरे प्रेम आणि भक्ती यांच्याहूनही ती गोष्ट काही कमी सोपी नसते. परंतु इतर गोष्टींप्रमाणेच या गोष्टीची (कर्माची) सुरुवात देखील तुम्ही सुयोग्य वृत्ती आणि दृष्टिकोन बाळगून केली पाहिजे, तुमच्यामधील सुयोग्य संकल्पासहित ही गोष्ट करण्यास तुम्ही सुरुवात केली पाहिजे, अशा वृत्तीने केलेले ‘कर्म’ हे भक्ती किंवा ध्यान यांच्याइतकेच प्रभावी ठरू शकते. अन्य गोष्टी त्यानंतर घडून येतील. (उत्तरार्ध उद्या)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 216-218)

साधना, योग आणि रूपांतरण – १२९

एक क्षण असा येईल की, जेव्हा तुम्ही कर्ते नसून फक्त एक साधन आहात, हे तुम्हाला अधिकाधिक जाणवू लागेल. सुरुवातीला तुमच्या भक्तीच्या शक्तीने ‘दिव्य माते’बरोबर असलेला तुमचा संपर्क इतका प्रगाढ होईल की, तिचे मार्गदर्शन मिळावे, तिची थेट आज्ञा किंवा प्रेरणा मिळावी, नेमकी कोणती गोष्ट केली पाहिजे याबाबत खात्रीशीर संकेत मिळावा, ती गोष्ट करण्याचा मार्ग सापडावा आणि त्याचा परिणाम दिसून यावा, म्हणून तुम्ही सदा सर्वकाळ फक्त एकाग्रता करणे आणि सारे काही तिच्या हाती सोपविणे पुरेसे ठरेल. आणि मग कालांतराने तुमच्या हे लक्षात येईल की, दिव्य ‘शक्ती’ आपल्याला केवळ प्रेरणा देते किंवा मार्गदर्शनच करते असे नाही तर ती आपल्या कर्माचा आरंभही करते आणि तीच ते कर्म घडवते देखील! तेव्हा तुम्हाला तुमच्या साऱ्या गतिविधी, हालचाली, कृती या तिच्यापासूनच उगम पावत आहेत, तुमच्या साऱ्या शक्ती या तिच्याच आहेत; तुमचे मन, प्राण, शरीर यांना तिच्या कार्याचे सचेत आणि आनंदी साधन बनले असल्याची, तिच्या लीलेचे माध्यम बनले असल्याची जाणीव होईल; या जडभौतिक विश्वामध्ये आपण तिच्या आविष्करणाचे साचे बनलो आहोत अशी जाणीव तुम्हाला होईल. एकत्वाच्या आणि अवलंबित्वाच्या अवस्थेएवढी दुसरी कोणतीही आनंदी अवस्था असू शकत नाही; कारण ही पायरी तुम्हाला तुमच्या अज्ञानजन्य दुःखपूर्ण व तणावपूर्ण जीवनाच्या सीमारेषेच्या पलीकडे, तुमच्या आध्यात्मिक अस्तित्वाच्या सत्यामध्ये, सखोल शांतीमध्ये आणि त्याच्या उत्कट आनंदामध्ये घेऊन जाते.

हे रूपांतरण होत असताना, अहंकारात्मक विकृतीच्या सर्व कलंकापासून तुम्ही स्वतःला अ-बाधित ठेवण्याची नेहमीपेक्षाही अधिक आवश्यकता असते. तसेच आत्म-दानाच्या आणि त्यागाच्या शुद्धतेला कलंक लागेल अशी कोणतीही मागणी वा कोणताही आग्रहदेखील तुम्ही धरता कामा नये. कर्म किंवा त्याचे फळ यासंबंधी कोणतीही आसक्ती तुमच्यामध्ये असता कामा नये, तुम्ही कोणत्याही अटी त्या दिव्य शक्तीवर लादता कामा नयेत. मी त्या दिव्य शक्तीचे साधन बनलो आहे असा कोणताही ताठा, घमेंड किंवा अहंकार तुम्हाला असता कामा नये. त्या दिव्य शक्तींचा वापर तुमच्या मनाच्या, प्राणाच्या किंवा शरीराच्या वैयक्तिक समाधानासाठी किंवा वापरासाठी करून, तुमच्या माध्यमाद्वारे कार्यरत असणाऱ्या त्या शक्तींची महानता तुम्ही विकृत करता कामा नये. तुमची श्रद्धा, तुमचा प्रामाणिकपणा, तुमच्या अभीप्सेची शुद्धता तुमच्या अस्तित्वाच्या साऱ्या स्तरांना, साऱ्या प्रतलांना व्यापणारी असली पाहिजे, ती निरपेक्ष असली पाहिजे; तेव्हा मग अस्वस्थ करणारा प्रत्येक घटक, विकृत करणारा प्रत्येक प्रभाव तुमच्या प्रकृतीमधून एकेक करून निघून जाईल. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 32 : 12-13)

साधना, योग आणि रूपांतरण – १२८

तुम्हाला जर ईश्वरी कार्य करणारा सच्चा कार्यकर्ता व्हायचे असेल तर, सर्व इच्छा- वासनांपासून आणि स्व-केंद्रित अहंकारापासून पूर्णतः मुक्त असणे हे तुमचे पहिले उद्दिष्ट असले पाहिजे. तुमचे संपूर्ण जीवन म्हणजे ‘परमेश्वरा’प्रत केलेले एक अर्पण असले पाहिजे, एक यज्ञ असला पाहिजे. कर्म करण्यामागचे तुमचे एकमेव उद्दिष्ट (ईश्वराची) सेवा करणे, (दिव्य शक्ती) ग्रहण करणे, परिपूर्ण होणे आणि ‘दिव्य शक्ती’च्या कार्यामध्ये तिचे आविष्करण करणारे एक साधन बनणे हेच असले पाहिजे. तुम्ही दिव्य चेतनेमध्ये अशा रीतीने वृद्धिंगत होत राहिले पाहिजे की, एक दिवस तुमची इच्छा आणि तिचा संकल्प यामध्ये कोणताही भेद शिल्लक राहणार नाही. तिच्या ऊर्मीखेरीज अन्य कोणतीही प्रेरणा तुमच्यामध्ये असता कामा नये, तुमच्यामध्ये आणि तुमच्या माध्यमातून घडणाऱ्या तिच्या सचेत कार्याशिवाय अन्य कोणतेही कर्म (तुमच्यामध्ये शिल्लक) असता कामा नये. अशा प्रकारचे गतिमान एकत्व साधण्याची क्षमता जोवर तुमच्यामध्ये येत नाही तोपर्यंत, आपण स्वतः म्हणजे दिव्य शक्तीच्या सेवेसाठी तयार करण्यात आलेला, सारी कर्मे तिच्यासाठीच करणारा एक देह आणि आत्मा आहोत, असे तुम्ही स्वतःला समजले पाहिजे.

स्वतंत्र कर्तेपणाची भावना तुमच्यामध्ये अजूनही खूप प्रभावी असली आणि कर्म करणारा मीच आहे, अशी तुमची भावना असली तरीसुद्धा तुम्ही ते कर्म त्या दिव्य शक्तीसाठीच केले पाहिजे. अहंकारी निवडीवरील भर व त्याचा सर्व ताणतणाव, वैयक्तिक लाभासाठीची सर्व लालसा, स्वार्थी इच्छांच्या सर्व अटी या (तुमच्या) प्रकृतीमधून तुम्ही काढून टाकल्या पाहिजेत. तेथे फळाची कोणतीही मागणी असता कामा नये, तसेच काहीतरी बक्षीस मिळावे म्हणून धडपड असता कामा नये. ‘दिव्य माते’चा संतोष आणि तिच्या कार्याची परिपूर्ती हेच तुमचे एकमेव फळ आणि दिव्य चेतनेमध्ये सातत्यपूर्ण प्रगती आणि स्थिरता, सामर्थ्य, आणि आनंद हेच तुमचे पारितोषिक! सेवेचा आनंद आणि कर्मामधून मिळणारा आंतरिक विकासाचा आनंद हा निःस्वार्थी कार्यकर्त्यासाठी पुरेसा मोबदला असतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 32 : 12)

साधना, योग आणि रूपांतरण – १२७

कर्मासाठी केलेले कर्म किंवा परतफेडीची, पारितोषिकाची किंवा कोणत्याही वैयक्तिक फळाची वा मोबदल्याची अपेक्षा न करता, इतरांसाठी केलेले कर्म असा सर्वसाधारणपणे, निरपेक्ष कर्माचा अर्थ होतो. परंतु ‘योगा’मध्ये मात्र ‘ईश्वरा’साठी केलेले इच्छाविरहित कर्म, हे कोणत्याही अटीविना वा मागणीविना एक अर्पण म्हणून केले जाते; केवळ ‘ईश्वरेच्छा’ म्हणूनच केले जाते अथवा ‘ईश्वरा’च्या प्रेमापोटी ते केले जाते, असा त्याचा अर्थ होतो.

*

स्वतःची आंतरिक प्रगती आणि परिपूर्णता यासाठी योगसाधना करणे हेच केवळ तुमचे उद्दिष्ट असता कामा नये तर, ‘ईश्वरा’साठी कार्य करायचे हेदेखील तुमचे उद्दिष्ट असले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 231)