Posts

साधनेची मुळाक्षरे – २९

अज्ञान आणि अहंभावातून केलेल्या कृतीला, जी कृती अहंकाराच्या समाधानासाठी आणि राजसिक इच्छेच्या प्रेरणेपोटी केली जाते त्या कृतीला मी ‘कर्म’ असे संबोधत नाही. अज्ञानाचा जणू शिक्काच असणाऱ्या अहंकार, राजसिकता आणि इच्छावासना यांपासून सुटका करून घेण्याचा संकल्प असल्याखेरीज ‘कर्मयोग’ घडूच शकत नाही. परोपकार किंवा मानवतेची सेवा किंवा तत्सम नैतिक वा आदर्शवादी अशा ज्या ज्या गोष्टी कार्याच्या गहनतर सत्याला पर्यायी असल्याचे मानवी मन मानते, त्या गोष्टीसुद्धा माझ्या दृष्टीने ‘कर्म’ या संज्ञेला पात्र ठरत नाही.

जी कृती ‘ईश्वरा’ साठी केली जाते, जी ‘ईश्वरा’शी अधिकाधिक एकत्व पावून केली जाते आणि अन्य कशासाठीही नाही तर, केवळ ‘ईश्वरा’साठीच केली जाते अशा कृतीला मी ‘कर्म’ असे संबोधतो. साहजिकच आहे की, ही गोष्ट प्रारंभी तितकीशी सोपी नसते; गहन ध्यान आणि प्रदीप्त ज्ञान यांच्यापेक्षा ते काही कमी सोपे नसते, किंबहुना खरेखुरे प्रेम आणि भक्ती या गोष्टी अधिक सोप्या असतात. पण इतर गोष्टींप्रमाणेच या गोष्टीची सुरुवातदेखील तुम्ही सुयोग्य वृत्ती आणि दृष्टिकोन बाळगून केली पाहिजे, तुमच्यामधील सुयोग्य इच्छेनिशी ही गोष्ट करण्यास तुम्ही प्रारंभ केला पाहिजे, अन्य गोष्टी त्यानंतर घडून येतील.

या वृत्तीने केलेले कर्म हे भक्ती किंवा ध्यान यांच्याइतकेच प्रभावी ठरू शकते. इच्छा, राजसिकता आणि अहंकार यांना दिलेल्या नकारामुळे व्यक्तीला अशी अचंचलता आणि शुद्धता प्राप्त होते की, ज्यामध्ये शब्दातीत ‘शांती’ अवतरू शकते. व्यक्तीने स्वतःची इच्छा ‘ईश्वरा’प्रत अर्पण केली, तिने स्वतःची इच्छा ही ‘ईश्वरी इच्छे’मध्ये मेळविली (merging) तर व्यक्तीच्या अहंकाराचा अंत होतो आणि व्यक्तीला वैश्विक चेतनेमध्ये व्यापकता प्राप्त होते किंवा विश्वातीत असलेल्या गोष्टीमध्ये तिचे उन्नयन होते. व्यक्तीला ‘प्रकृती’ पासून ‘पुरुषा’चे विलगीकरण अनुभवास येते आणि बाह्य प्रकृतीच्या बेड्यांपासून व्यक्तीची सुटका होते. व्यक्तीला तिच्या आंतरिक अस्तित्वाची जाणीव होते आणि बाह्यवर्ती अस्तित्व हे साधन असल्याचे जाणवते; व्यक्तीचे कार्य ‘विश्वशक्ती’च करत असल्याची आणि ‘आत्मा’ किंवा ‘पुरुष’ त्याकडे पाहत असल्याची किंवा तो साक्षीदार असून, मुक्त असल्याचे व्यक्तीला जाणवते. आपले कर्म हाती घेऊन, विश्वमाता किंवा परम-‘माता’च ते करत असल्याचे, किंवा हृदयापाठीमागून एक ‘दिव्य शक्ती’ त्या कर्माचे नियंत्रण करत आहे, किंवा ते कर्म करत आहे, असे व्यक्तीला जाणवते.

व्यक्तीने स्वतःची इच्छा आणि कर्म अशा रीतीने ‘ईश्वरा’प्रत सतत निवेदित केली तर, प्रेम आणि भक्ती वृद्धिंगत होते, चैत्य पुरुष पुढे येतो. ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘शक्ती’प्रत निवेदित केल्यामुळे, ती शक्ती आपल्या ऊर्ध्वस्थित असल्याचा अनुभव आपल्याला येऊ शकतो. आणि तिच्या अवतरणाची आणि उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या चेतनेप्रत व ज्ञानाप्रत खुले होत असल्याची जाणीव आपल्याला होऊ शकते. अंतिमतः कर्म, भक्ती आणि ज्ञान एकत्रित येतात आणि आत्मपरिपूर्णत्व शक्य होते – त्यालाच आपण ‘प्रकृतीचे रूपांतरण’ (Transformation of the nature) असे संबोधतो.

अर्थातच हे परिणाम काही एकाएकी होत नाहीत, व्यक्तीची परिस्थिती आणि तिचा विकास यांनुसार, ते कमीअधिक धीमेपणाने, कमीअधिक समग्रतेने दिसून येतात. ईश्वरी साक्षात्कारासाठी कोणताही राजमार्ग नाही.

सर्वंकष आध्यात्मिक जीवनासाठी ‘गीता’प्रणीत ‘कर्मयोग’ मी अशा रीतीने विकसित केला आहे. तो कोणत्याही अनुमानावर आणि तर्कावर आधारलेला नाही तर, तो अनुभूतीवर आधारलेला आहे. त्यामधून ध्यान वगळण्यात आलेले नाही आणि त्यातून भक्तीही निश्चितच वगळण्यात आलेली नाही, कारण ‘ईश्वरा’प्रत आत्मार्पण, ‘ईश्वरा’प्रत स्वतःच्या सर्वस्वाचे निवेदन हा जो ‘कर्मयोगा’चा गाभा आहे, त्याच गोष्टी म्हणजे अनिवार्यपणे भक्तीचीही एक प्रक्रिया आहे…

एवढेच की, जीवनापासून पलायनवादी एकांतिक अशा ध्यानाला तसेच, स्वतःच्याच आंतरिक स्वप्नामध्ये बंदिस्त होऊन राहणाऱ्या भावनाप्रधान भक्तीला मात्र योगाची संपूर्ण प्रक्रिया म्हणून येथे स्वीकारण्यात आलेले नाही. एखादी व्यक्ती विशुद्ध ध्यानमग्न अशा रीतीने तासन् तास बसत असेल किंवा आंतरिक अविचल आराधना आणि परमानंदामध्ये तास न् तास निमग्न असेल, तरीसुद्धा या गोष्टी म्हणजे समग्र ‘पूर्णयोग’ नव्हे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 216-218)

साधनेची मुळाक्षरे – १८

कोणत्याही वैयक्तिक प्रेरणांशिवाय, प्रसिद्धी किंवा लोकमान्यता किंवा लौकिक मोठेपणा यांच्या इच्छेविना जे कर्म केले जाते; ज्यामध्ये स्वतःच्या मानसिक प्रेरणा किंवा प्राणिक लालसा व मागण्या किंवा शारीरिक पसंती-नापसंती यांचा आग्रह नसतो; जे कर्म कोणत्याही बढाईविना किंवा असंस्कृत स्व-मताग्रहाविना किंवा पद वा प्रतिष्ठेसाठी कोणताही दावा न करता केले जाते; जे केवळ आणि केवळ ‘ईश्वरा’ साठीच आणि ‘ईश्वरी आदेशा’ने केले जाते, केवळ असेच कर्म आध्यात्मिकदृष्ट्या शुद्धिकरण करणारे असते. सर्व कर्मं जी अहंभावात्मक वृत्तीने केली जातात ती, या अज्ञानमय जगातील लोकांच्या दृष्टीने भलेही चांगली असू देत, पण ‘योगसाधना’ करणाऱ्या साधकाच्या दृष्टीने त्यांचा काहीच उपयोग नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 232)

साधनेची मुळाक्षरे – १३

काम करत असताना ‘ईश्वरी उपस्थिती’ चे स्मरण ठेवणे हे सुरुवातीला सोपे नसते; परंतु काम संपल्यासंपल्या लगेचच जरी त्या उपस्थितीची जाणीव व्यक्तीला पुनरुज्जीवित करता आली तरी ठीक आहे. कालांतराने काम करत असतानाच त्या उपस्थितीची जाणीव आपोआपपणे होऊ लागेल.

*

समर्पणाचा नुसता दृष्टिकोन असून चालणार नाही तर, प्रत्येक कर्मच ‘श्रीमाताजीं’ना अर्पण केले पाहिजे म्हणजे मग तो दृष्टिकोन सदासर्वदा जीवित राहील. काम करत असताना त्या वेळामध्ये ध्यान करता कामा नये, कारण त्यामुळे कर्मामधून लक्ष निघून जाईल, परंतु ज्याच्याप्रत तुम्ही ते कर्म अर्पण करणार आहात त्या ‘एकमेवाद्वितीया’चे स्मरण तुमच्यामध्ये कायम असले पाहिजे. ही केवळ एक पहिली प्रक्रिया आहे; कारण, पृष्ठवर्ती मन कर्म करत असताना, ‘ईश्वरी उपस्थिती’च्या संवेदनेवर तुमच्या अंतरंगातील शांत अस्तित्व एकाग्र असल्याची सातत्यपूर्ण जाणीव जर तुम्हाला असू शकेल, किंवा ‘श्रीमाताजीं’ची शक्तीच कार्य करत आहे आणि तुम्ही केवळ एक माध्यम आहात किंवा एक साधन आहात अशी जाणीव जर तुम्हाला नेहमीच होऊ लागली तर मग, ईश-स्मरणाच्या जागी, ‘योगसाक्षात्कार’ स्वतःहूनच नित्य घडू लागेल तसेच कर्म करत असताना ईश्वराशी ऐक्य होण्यास सुरुवात होईल.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 258-259), (CWSA 32 : 247)

साधनेची मुळाक्षरे – १२

कर्म हा योगसाधनेचा एक भाग आहे आणि प्राण व त्याच्या क्रियांमध्ये ‘ईश्वरी उपस्थिती’, ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’ अवतरित व्हाव्यात म्हणून त्यांना आवाहन करण्यासाठी कर्म ही एक उत्तम संधी प्रदान करते; कर्मामुळे समर्पणाचे क्षेत्रदेखील विस्तारित होते आणि समर्पणाची संधीही वाढीस लागते.

*

कर्माच्या माध्यमातून योगसाधना हा पूर्णयोगाच्या साधनेच्या प्रवाहामध्ये प्रवेश करण्याचा सर्वांत सोपा आणि सर्वांत अधिक प्रभावी मार्ग आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 247), (CWSA 32 : 256-257)

साधनेची मुळाक्षरे – ०६

सारे काही शांतपणे अंतरंगातूनच केले पाहिजे – कर्म करणे, बोलणे, वाचणे, लिहिणे या साऱ्या गोष्टी वास्तव (real) चेतनेचा एक भाग म्हणूनच केल्या पाहिजेत – सामान्य चेतनेच्या विखुरलेल्या आणि अशांत हालचालींनिशी त्या करता कामा नयेत.

*

‘ईश्वरा’च्या संपर्कात असणाऱ्या तुमच्या आंतरिक अस्तित्वातून, अंतरंगातूनच कृती करायला तुम्ही नेहमी शिकले पाहिजे. बाह्य अस्तित्व हे केवळ एक साधन असले पाहिजे आणि त्याला तुमच्या वाणीवर, विचारावर वा कृतीवर हुकमत गाजविण्यास किंवा सक्ती करण्यास तुम्ही अजिबात मुभा देता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 254)

साधनेची मुळाक्षरे – ०५

मन स्थिर करण्यासाठी व आध्यात्मिक अनुभूती मिळविण्यासाठी, प्रकृतीचे शुद्धिकरण होणे आणि तिची तयारी होणे आवश्यक असते. यासाठी कधीकधी अनेक वर्षेसुद्धा लागतात. योग्य वृत्तीने केलेले कर्म हा यासाठी सर्वांत सोपा मार्ग आहे – म्हणजेच इच्छा किंवा अहंकारविरहित असलेले कर्म; इच्छा, मागणी किंवा अहंकाराची कोणतीही स्पंदने निर्माण झाली की त्याला लगेच नकार देत केलेले कर्म; ‘दिव्य माते’ प्रत अर्पण म्हणून केलेले कर्म; ‘दिव्य माते’चे स्मरण करत आणि तिच्या शक्तीने आविष्कृत व्हावे आणि कार्य हाती घ्यावे म्हणून केलेली तिची प्रार्थना, की ज्यामुळे केवळ आंतरिक शांततेतच तुम्हाला तिची (दिव्य मातेची) उपस्थिती आणि तिचे कार्यकारकत्व जाणवू शकेल असे नव्हे तर, कर्मामध्येदेखील ते तुम्हाला जाणवू शकेल.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 226)

साधनेची मुळाक्षरे – ०४

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्हाला तुमच्या कर्मव्यवहारामध्ये सदा सर्वकाळ जरी अजून ‘ईश्वरा’चे स्मरण ठेवता आले नाही, तरी फार काळजी करू नका, त्याने फारसा फरक पडत नाही. कोणतेही कर्म करताना सुरूवातीस ‘ईश्वरा’चे स्मरण करणे व ते कर्म त्याला अर्पण करणे आणि कर्म संपल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करणे हे सद्यस्थितीत पुरेसे आहे. किंवा जर कामाच्या मध्ये थोडा वेळ मिळाला तर तेव्हाही त्याचे स्मरण ठेवणे पुरेसे आहे. तुमची पद्धत मात्र मला काहीशी वेदनादायी आणि अवघड असल्याचे दिसते, – कारण तुम्ही मनाच्या ज्या भागाने कर्म करता, त्याच भागाने, त्याचवेळी स्मरण ठेवण्याचा प्रयत्न करता असे दिसते. तसे करणे शक्य आहे किंवा नाही, याची मला कल्पना नाही. जेव्हा लोक कर्म करताना सदोदित स्मरण राखतात (असे करता येणे शक्य असते) तेव्हा, सहसा ते त्यांच्या मनाच्या पार्श्वभागी असते किंवा त्यांच्यामध्ये हळूहळू दुहेरी विचारांची किंवा दुहेरी चेतनेची एक क्षमता निर्माण झालेली असते – एक चेतना पृष्ठभागी कार्यरत असते आणि दुसरी चेतना ही साक्षी असते आणि स्मरण राखत असते.

आणखीही एक मार्ग असतो, दीर्घकाळपर्यंत तो माझा मार्ग होता – अशी एक अवस्था असते की, ज्यामध्ये कर्म हे वैयक्तिक विचार किंवा मानसिक कृतीच्या हस्तक्षेपाविना, आपोआपपणे घडत राहते आणि त्याचवेळी चेतना ही ‘ईश्वरा’मध्ये शांतपणे स्थित असते. खरेतर, ही गोष्ट जेवढी साध्या सातत्यपूर्ण अभीप्सेने आणि आत्मनिवेदनाच्या संकल्पाने घडून येते किंवा साधनभूत अस्तित्वापासून आंतरिक अस्तित्वाला अलग करणाऱ्या चेतनेच्या प्रक्रियेमुळे घडून येते, तेवढी ती अनेकदा प्रयत्न करूनदेखील घडून येत नाही. अभीप्सा आणि कर्म करण्यासाठी महत्तर शक्तीला आवाहन करत, आत्मनिवेदनाचा संकल्प करणे ही एक अशी पद्धती आहे की ज्यामुळे महान परिणाम घडून येतात. काही जणांना या गोष्टीसाठी जरी बराच वेळ लागत असला तरीदेखील होणारे परिणाम महान असतात. सर्व गोष्टी मनाच्या प्रयासांनीच करण्यापेक्षा, पाठीशी असणाऱ्या किंवा ऊर्ध्वस्थित असणाऱ्या शक्तीद्वारे कर्म कशी घडवून घ्यायची हे जाणणे, हे साधनेचे महान रहस्य आहे.

मानसिक प्रयत्न हे अनावश्यक आहेत किंवा त्याचे काहीच परिणाम दिसत नाहीत, असे मला म्हणायचे नाही – एवढेच की साऱ्या गोष्टी एखाद्याने स्वतःहून करण्याचा प्रयत्न केला तर अध्यात्मात पारंगत असणाऱ्या व्यक्तींखेरीज (spiritual athletes) इतरांसाठी मात्र त्या गोष्टी कष्टदायक प्रयत्न ठरतात. अन्य पद्धत ही जवळच्या मार्गाचा हव्यास बाळगणारी आहे, असेही मला म्हणायचे नाही. एवढेच की, मी म्हणालो त्याप्रमाणे, त्या पद्धतीचे परिणाम दिसण्यास अधिक वेळ लागतो. धीर आणि दृढ निश्चय या गोष्टी साधनेच्या प्रत्येक पद्धतीमध्ये आवश्यक असतात. बालावानांसाठी सामर्थ्य असणे ठीक आहे पण – अभीप्सा आणि तिला ईश्वरी ‘कृपे’कडून मिळणारा प्रतिसाद या गोष्टी म्हणजे काही सर्वस्वी आख्यायिका आहेत, असे नाही; या गोष्टी म्हणजे आध्यात्मिक जीवनाची महान तथ्यं आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 214-215)

विचार शलाका – ०८

सर्वसामान्य सिद्धान्त हे खूपच यांत्रिक असतात – पाप आणि पुण्याच्या कल्पनांच्या बाबतीत आणि पुढील आयुष्यातील त्यांच्या फलाबाबतीत देखील तसेच आहे. गतजन्मामध्ये ज्या ऊर्जा उपयोगात आणल्या गेल्या होत्या त्यांचे परिणाम नक्कीच होतात पण इतक्या बाळबोध तत्त्वानुसार ते होत नाहीत. पारंपरिक सिद्धान्तानुसार चांगल्या माणसाच्या वाट्याला आलेले दु:खभोग म्हणजे तो मनुष्य गत जन्मात फार मोठा दुर्जन असला पाहिजे ह्याचा पुरावाच समजला जातो आणि एखाद्या खलपुरुषाच्या वाट्याला जर समृद्धी आली असेल तर त्याच्या गतजन्मामध्ये तो पृथ्वीवर जणूकाही देवदूतासमान असावा आणि त्याने तेव्हा सद्गुणांचे आणि सत्कृत्यांचे खूप धान्य पेरले असावे आणि त्यामुळे त्याला असे हे सद्भाग्याचे पुष्कळ पीक हाती लागले आहे, ह्याचा पुरावा समजला जातो. हे इतके एकसारखे, सममित (symmetrical) आहे की हे खरे असणे शक्य नाही. जन्माचे प्रयोजन हे अनुभवाद्वारे जीवाची वाढ हे होय, गतकर्मांचे परिणाम, प्रतिक्रिया म्हणून जे काही येईल त्याद्वारे जिवाने शिकावे आणि वाढावे असे त्याचे प्रयोजन आहे. वर्गातील चांगल्या मुलांना लॉलीपॉप आणि वाईट मुलांना छडी मारण्यासारखे हे नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 533)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १५

ईश्वराप्रत जाण्याचा ध्यान हा एक मार्ग आहे, तो महान मार्ग आहे; पण तो जवळचा मार्ग आहे, असे म्हणता येणार नाही. कारण तो खूप उच्च स्तरावर घेऊन जाणारा असला, तरीही तो बहुतेकांसाठी खूप लांबचा आणि अवघड मार्ग असतो. जर त्यामुळे (ईश्वराचे)अवतरण घडून आले नाही तर, तो जवळचा मार्ग आहे असे कदापिही म्हणता येणार नाही…

कर्म हा तुलनेने बराच साधासरळ मार्ग आहे. परंतु, त्यामध्ये व्यक्तीचे मन ईश्वराला वगळून, फक्त कर्मावरच खिळलेले असता कामा नये. ईश्वर हेच साध्य असले पाहिजे आणि कर्म हे केवळ एक साधन होऊ शकते.

…प्रेम आणि भक्ती ह्या गोष्टी जर अधिक प्राणप्रधान (Vital) असतील तर, हर्षभरित अपेक्षा आणि विरह, अभिमान आणि नैराश्य या गोष्टींमध्ये दोलायमान स्थिती होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे प्रेम आणि भक्तीचा मार्ग जवळचा न राहता, दूरवरचा, वळणावळणाचा होतो. ईश्वराकडे धाव घेण्याऐवजी, थेट झेपावण्याऐवजी, एखादा स्वतःच्या अहंकाराच्या भोवती भोवती घोटाळत राहण्याची शक्यता असते.

*

पूर्णयोगामध्ये ध्यान, कर्म, भक्ती या सर्व गोष्टींचाच समावेश होतो; परिपूर्तीच्या दिशेने जाण्यासाठी पूर्वतयारी म्हणून साहाय्यभूत होणारे हे प्रत्येक साधन आहे. जर व्यक्ती कर्माच्या माध्यमातून समर्पित होऊ शकत असेल तर आत्म-दानासाठी असलेल्या अत्यंत प्रभावी साधनांपैकी ते एक साधन असते; आणि स्वयमेव आत्म-दानदेखील साधनेचे एक अत्यंत शक्तिशाली आणि अपरिहार्य तत्त्व असते.

पूर्णयोग हा, समग्र अस्तित्वाचे त्याच्या सर्व घटकांनिशी आत्मार्पण करण्याचा, विचारी मनाचे आणि हृदयाचे, इच्छेचे आणि कृतींचे, आंतरिक व बाह्य साधनभूत घटकांचे अर्पण करण्याचा मार्ग आहे; ज्यामुळे व्यक्ती ईश्वराच्या अनुभूतीपर्यंत, आंतरिक उपस्थितीपर्यंत येऊन पोहोचते, आंतरात्मिक आणि आध्यात्मिक परिवर्तनापर्यंत येऊन पोहोचते. (उपरोक्त) सर्वच मार्गांनी व्यक्ती जितके आत्म-दान करेल तेवढे ते साधनेसाठी चांगलेच असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 212), (CWSA 29 : 213-214)

मानसिक परिपूर्णत्व – १९

 

ईश्वराप्रत जाण्याचा ध्यान हा एक मार्ग आहे, तो महान मार्ग आहे; पण तो जवळचा मार्ग आहे, असे म्हणता येणार नाही. कारण तो खूप उच्च स्तरावर घेऊन जाणारा असला, तरीही तो बहुतेकांसाठी खूप लांबचा आणि अवघड मार्ग असतो. जर त्यामुळे अवतरण घडून आले नाही तर, तो जवळचा मार्ग आहे असे कदापिही म्हणता येणार नाही आणि तेव्हासुद्धा, म्हणजे अवतरण घडून येते तेव्हासुद्धा लवकर होते ती फक्त पायाभरणीच! नंतर त्या पायावर ध्यानाच्या आधारे, मोठ्या परिश्रमाने एक भली मोठी इमारत उभारावी लागते. हे अगदी अनिवार्य आहे, पण ह्याला जवळचा मार्ग असे म्हणता येईल, असे त्यात काही नाही.

कर्म हा तुलनेने बराच साधासरळ मार्ग आहे – परंतु, त्यामध्ये व्यक्तीचे मन ईश्वराला वगळून, फक्त कर्मावरच खिळलेले असता कामा नये. ईश्वर हे साध्य असले पाहिजे आणि कर्म हे केवळ एक साधन असले पाहिजे. काव्यादींचा उपयोग आपल्या आंतरिक अस्तित्वाच्या संपर्कात येण्यासाठी असतो आणि त्या संपर्काचा उपयोग आपल्या आंतरतम अस्तित्वाच्या थेट संपर्कात येण्यासाठी तयारी म्हणून होतो, पण व्यक्तीने तेथेच थांबता कामा नये, व्यक्तीने सद्वस्तुपर्यंत जाऊन पोहोचायला हवे. जर व्यक्ती स्वतःला साहित्यिक किंवा कवी, चित्रकार समजत असेल आणि साहित्य साहित्यासाठी, कला कलेसाठीच असे मानत असेल तर, ही काही योगिक वृत्ती नाही. आणि म्हणूनच मी कधीकधी असे म्हणत असतो की, आपले काम हे योगी बनणे आहे; केवळ कवी, चित्रकार बनणे हे नाही.

प्रेम, भक्ती, समर्पण, चैत्य खुलेपणा हे ईश्वराप्रत पोहोचण्याचे सर्वात जवळचे मार्ग आहेत किंवा असू शकतात. कारण प्रेम आणि भक्ती ह्या गोष्टी जर जास्त प्राणप्रधान असतील तर, हर्षभरित अपेक्षा आणि विरह, अभिमान आणि नैराश्य या गोष्टींमध्ये दोलायमान स्थिती होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे हा मार्ग जवळचा न राहता, दूरवरचा, वळणावळणाचा होतो. ईश्वराकडे धाव घेण्याऐवजी, थेट झेपावण्याऐवजी, एखादा स्वतःच्या अहंकाराच्या भोवती भोवती घोटाळत राहण्याची शक्यता असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 212)