Tag Archive for: एकाग्रता

साधना, योग आणि रूपांतरण – १३

साधक : ध्यान (meditation) आणि एकाग्रता (concentration) यांमध्ये काय फरक आहे?

श्रीमाताजी : ध्यान ही फक्त मानसिक कृती असते, त्यामध्ये फक्त मनोमय पुरुषाला स्वारस्य असते. ध्यान करताना तुम्ही एकाग्रही होऊ शकता पण ती एकाग्रता मानसिक असते; तुम्हाला त्यातून शांती लाभू शकते पण ती फक्त मानसिक शांती असते आणि त्यावेळी तुमच्या अस्तित्वाच्या इतर घटकांनी (प्राण व शरीर) तुमच्या ध्यानामध्ये अडथळा उत्पन्न करू नये म्हणून, ते घटक अचल आणि अक्रिय ठेवले जातात. तुम्ही दिवसातील वीस तास ध्यानामध्ये व्यतीत करू शकता आणि तरीदेखील उरलेल्या चार तासांमध्ये तुम्ही अगदी अतिसामान्य व्यक्तीच राहू शकता; कारण ध्यानावस्थेमध्ये फक्त तुमचे मनच व्यस्त असते – तेव्हा तुमच्या उर्वरित अस्तित्वाने म्हणजे तुमच्या प्राणाने आणि शरीराने ध्यानामध्ये काही अडथळा आणू नये म्हणून, त्यांना एका दबावाखाली ठेवले जाते. ध्यानामध्ये अस्तित्वाच्या या (मनाव्यतिरिक्त) घटकांसाठी थेटपणे काहीच केले जात नाही.

या अप्रत्यक्ष कृतीचा निश्चितपणे काही परिणाम होऊ शकतो, पण… मला अशी काही माणसं माहीत आहेत की ज्यांची ध्यान करण्याची क्षमता लक्षणीय होती पण जेव्हा ते ध्यानावस्थेमध्ये नसत तेव्हा ते अगदीच सामान्य असत, एवढेच काय पण कधीकधी ती माणसं दुष्प्रवृत्तीची देखील असत. आणि त्यांच्या ध्यानामध्ये जर का कोणी अडथळा आणला तर ती माणसं संतप्त होत असत. कारण फक्त मनावरच प्रभुत्व संपादन करायला ते शिकलेले होते, अस्तित्वाच्या उरलेल्या घटकांवर प्रभुत्व मिळवायला ते शिकलेले नव्हते.

एकाग्रता ही अधिक सक्रिय स्थिती असते. तुम्ही मानसिक रीतीने एकाग्रता करू शकता; तुम्ही प्राणिक, आंतरात्मिक, शारीरिकरित्या एकाग्र होऊ शकता तसेच तुम्ही सर्वांगीण रीतीने सुद्धा एकाग्रता साधू शकता. एकाग्रता किंवा स्वतःच्या सर्व घटकांना एका बिंदुवर एकत्रित करण्याची क्षमता ही ध्यानापेक्षा अधिक कठीण असते. तुम्ही तुमच्या अस्तित्वाचा किंवा चेतनेचा एखादाच भाग एकत्रित करू शकता किंवा तुम्ही तुमची चेतना समग्रतया एकत्रित करू शकता किंवा तिचे काही अंशभाग एकत्र करू शकता; म्हणजेच एकाग्रता ही आंशिक, संपूर्ण किंवा सर्वांगीण असू शकते आणि त्या प्रत्येक प्रकारामध्ये तिचे परिणाम भिन्न भिन्न असतात.

तुमच्यापाशी जर एकाग्रता करण्याची क्षमता असेल तर, तुमचे ध्यान हे अधिक सहज आणि स्वारस्यपूर्ण होईल. परंतु तुम्ही एकाग्रता न करतादेखील ध्यान करू शकता. बरेचजण ध्यानामध्ये संकल्पनांच्या साखळीचा मागोवा घेत जातात. मात्र हे ‘ध्यान’ असते, याला ‘एकाग्रता’ म्हणता येत नाही.

– श्रीमाताजी (CWM 04 : 07-08)

साधना, योग आणि रूपांतरण – १२

(येथे श्रीअरविंद concentration – एकाग्रता आणि meditation – ध्यान यामधील फरक स्पष्ट करून सांगत आहेत.)

चेतना जेव्हा एका विशिष्ट स्थितीमध्ये (उदा. शांतीच्या) किंवा विशिष्ट स्पंदनावर, विशिष्ट प्रयत्नावर (उदा. अभीप्सा, संकल्प, श्रीमाताजींच्या संपर्कात येणे, श्रीमाताजींच्या नामाचा जप करणे यांवर) केंद्रित केली जाते तेव्हा आपल्या योगाच्या दृष्टीने ती ‘एकाग्रता’ असते. आणि जेव्हा अंतर्मन योग्य ज्ञान मिळविण्यासाठी गोष्टींकडे पाहत असते तेव्हा ते ‘ध्यान’ असते.
*
आपल्या चेतनेचे सर्व धागे एकत्र गोळा करणे आणि ते एका बिंदुवर एककेंद्रित करणे किंवा एखाद्या उद्दिष्टाकडे, उदा. ‘ईश्वरा’कडे, आपल्या चेतनेचे सर्व धागे वळविणे म्हणजे ‘एकाग्रता.’ (एकाग्रतेमध्ये) एखाद्या बिंदुवरच लक्ष केंद्रित न करता, व्यक्तीच्या समग्र अस्तित्वामध्ये एकीकृत केलेली (gathered) अशी स्थितीदेखील असू शकते. ‘ध्याना’मध्ये मात्र अशा रीतीने चेतनेचे एकत्रीकरण करणे अनिवार्य असतेच असे नाही; तुम्ही शांतस्थिर मनाने एखाद्या विषयाचा विचार करत राहू शकता किंवा तुम्ही तुमच्या चेतनेमध्ये कशाचा प्रवेश होत आहे आणि त्याची हाताळणी कशा रीतीने केली जात आहे, याचे निरीक्षण करत राहू शकता.
*
‘ध्यान’ म्हणजे एखाद्या विषयाचा एकाग्रतेने विचार करणे. ज्याला आपण ‘एकाग्रता’ असे म्हणतो, त्या एकाग्रतेमध्ये विचारमालिका नसते तर मन हे एखाद्या वस्तुवर, नामावर, कल्पनेवर, किंवा एखाद्या स्थानी शांतपणे केंद्रित केलेले असते. एकाग्रतेचे आणखीही काही प्रकार असतात. उदा. समग्र चेतना एका विशिष्ट स्थानी म्हणजे भ्रूमध्यामध्ये किंवा हृदयामध्ये एकीकृत करायची इत्यादी. तुम्ही विचारांपासून पूर्णतः सुटका करून घेण्यासाठीदेखील एकाग्रतेचा अवलंब करू शकता आणि संपूर्ण शांतीमध्ये राहू शकता.

– श्रीअरविंद (CWSA 29: 297)

विचारशलाका ०९

साधक : आम्हाला ‘योगा’संबंधी काही सांगाल का?

श्रीमाताजी : ‘योग’ तुम्हाला कशासाठी हवा आहे? शक्ती प्राप्त व्हावी म्हणून? मन:शांती, शांतचित्तता लाभावी म्हणून? का मानवतेची सेवा करायची आहे म्हणून? तुम्ही योगमार्ग स्वीकारण्यास पात्र आहात हे दर्शविण्यासाठी वरीलपैकी कोणतेही उद्दिष्ट पुरेसे नाही.

त्याकरता तुम्हाला पुढील काही प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत :

तुम्हाला ‘ईश्वरा’साठी ‘योगमार्गा’चे आचरण करावेसे वाटते का?

‘ईश्वर’ हाच तुमच्या जीविताचे परमोच्च सत्य आहे का?

म्हणजे ‘ईश्वरा’वाचून जगणेच आता अगदी अशक्य झाले आहे, अशी तुमची अवस्था आहे का?

तुम्हाला असे वाटते का की, ‘ईश्वर’ हेच तुमच्या अस्तित्वाचे एकमेव कारण आहे आणि ‘ईश्वरा’विना तुमच्या जीवनास काहीच अर्थ नाही?

तसे असेल तरच तुम्हाला ‘योगमार्ग’ स्वीकारण्याविषयी आंतरिक हाक आली आहे असे म्हणता येईल.

‘ईश्वरा’विषयीची तळमळ, अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या अभीप्सेचे संगोपन करायचे; ती सतत जागृत, सावध व जिवंत ठेवायची. आणि त्यासाठी जर कशाची गरज असेल तर ती असते एकाग्रतेची! ‘ईश्वरा’वरील एकाग्रतेची – ईश्वरी संकल्प व उद्दिष्ट यांच्याप्रत समग्रपणे व नि:शेषतया वाहून घेता यावे या दृष्टिकोनातून ‘ईश्वरा’वर एकाग्रता करणे आवश्यक असते.

स्वत:च्या हृदयामध्ये एकाग्रता करा. त्यात प्रवेश करा, जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढे आत खोल खोल, अगदी आत जा. तुमच्या चेतनेचे बाहेर दूरवर पसरलेले सारे धागे एकत्रित करून, ते सारे गुंडाळून घ्या आणि आत बुडी मारा, आत खोल खोल जा. तुम्हाला आढळेल की, हृदयाच्या त्या निवांत प्रशांत गाभाऱ्यांत एक ज्योत तेवत आहे. तेच तुमच्या अंतरीचे ‘ईश्वरत्व’, तेच तुमचे खरेखुरे अस्तित्व. त्याचा आदेश ऐका, त्याच्या आज्ञेचे अनुसरण करा.

एकाग्रता करण्याची इतरही केंद्र आहेत – एक असते मस्तकाच्या वर (सह्स्त्रार), दुसरे असते दोन भुवयांच्या मध्यभागी (भ्रूमध्यामध्ये, आज्ञाचक्र)! प्रत्येक केंद्राची स्वतंत्र अशी उपयुक्तता असते आणि त्यातून तुम्हाला वेगवेगळे विशिष्ट असे परिणामही अनुभवास येतात. पण मध्यवर्ती अस्तित्व (central being) हे हृदयामध्येच असते आणि सर्व मुख्य प्रवृत्ती हृदयामध्येच उत्पन्न होतात – रूपांतरणास आवश्यक असलेली प्रेरणा व उत्कटता आणि साक्षात्कार करून घेण्याची शक्ती या सुद्धा तेथूनच निर्माण होतात.

– श्रीमाताजी [CWM 03 : 01]

विचारशलाका ०८

‘ईश्वरी प्रभावा’प्रत स्वत:ला खुले करणे, उन्मुख करणे हे ‘पूर्णयोगा’चे समग्रतत्त्व आहे. हा प्रभाव तुमच्या उर्ध्वस्थित असतो आणि तुम्ही जर त्याबाबत सचेत झालात तर, त्याने तुमच्यामध्ये प्रवेश करावा म्हणून तुम्ही त्यास आवाहन करायचे असते. तो ईश्वरी प्रभाव तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये ‘शांती’च्या रूपाने, ‘प्रकाशा’च्या रूपाने, कार्यकारी ‘शक्ती’च्या रूपाने अवतरतो; ‘आनंद’रूपाने अवतरतो; तो साकार किंवा निराकार रूपातील ‘ईश्वरी उपस्थिती’ म्हणून अवतरतो.

व्यक्तीला जोपर्यंत ही चेतना लाभत नाही तोपर्यंत तिने श्रद्धा बाळगली पाहिजे आणि खुलेपणासाठी आस बाळगली पाहिजे. अभीप्सा, आवाहन, प्रार्थना या सगळ्या गोष्टी म्हणजे एकाचीच विविध रूपे असतात आणि या साऱ्याच गोष्टी सारख्याच प्रभावी असतात. यांपैकी, तुमच्यापाशी जी कोणती गोष्ट येते किंवा जी तुम्हाला अगदी सहजसोपी, स्वाभाविक वाटते ती गोष्ट तुम्ही अवलंबावी.

दुसरा मार्ग एकाग्रतेचा. तुम्ही तुमची चेतना तुमच्या हृदयामध्ये एकाग्र करायची (काहीजण मस्तकामध्ये वा मस्तकाच्या वर एकाग्र करतात.) आणि अंत:करणामध्ये श्रीमाताजींचे ध्यान करायचे आणि तेथे त्यांना आवाहन करायचे. व्यक्ती यांपैकी कोणतीही गोष्ट करू शकते किंवा वेगवेगळ्या वेळी (आलटून-पालटून) या दोन्ही गोष्टी करू शकते – जी गोष्ट तुम्हाला सहजस्वाभाविक वाटेल किंवा ज्या क्षणी तुम्ही जी गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त व्हाल ती गोष्ट तुम्ही करावी.

विशेषत: सुरुवातीला एक गोष्ट आत्यंतिक निकडीची असते ती म्हणजे, मन निश्चल करायचे आणि ध्यानाच्या वेळी, साधनाबाह्य असे सारे विचार, स्पंदने हद्दपार करायची. अशा शांत मनामध्ये, अनुभूती येण्यासाठीची प्रगतीशील तयारी चालू होते. परंतु हे सारे जरी एकदम जमले नाही तरी त्यामुळे तुम्ही अधीर, अस्वस्थ होता कामा नये. कारण मनामध्ये संपूर्ण निश्चलता येण्यासाठी पुष्कळ काळ लागतो; तुमच्या चेतनेची तयारी होईपर्यंत तुम्हाला वाटचाल करत राहावी लागते.

श्रीअरविंद [CWSA 29 : 106]

विचारशलाका – ०३

आंतरिक एकाग्रतेच्या साधनेमध्ये पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो –

१) हृदयामध्ये चेतना स्थिर करणे आणि तिथे ‘दिव्य माते’चे नाम, प्रतिमा किंवा संकल्पना, यांपैकी जे तुमच्यासाठी सहजस्वाभाविक असेल त्यावर, चित्त एकाग्र करणे.

२) हृदयातील या एकाग्रतेच्या साहाय्याने मन हळूहळू आणि क्रमश: शांत शांत करत नेणे.

३) हृदयामध्ये ‘श्रीमाताजीं’ची उपस्थिती असावी आणि त्यांनी मन, प्राण आणि कृती यांचे नियंत्रण करावे यासाठी आस बाळगणे.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 225]

आध्यात्मिकता ४८

माणसं बाह्य गोष्टींमध्येच गुंतलेली असतात. म्हणजे असे की, त्यांची चेतना, अधिक गहन सत्य, ईश्वयरी ‘उपस्थिती’ यांच्या शोधासाठी अंतर्मुख होण्याऐवजी, बाह्य गोष्टींकडेच वळलेली असते – म्हणजे व्यक्ती जीवनात ज्या गोष्टी बघते, जाणते, करते त्या गोष्टींकडेच तिची चेतना वळलेली असते. तुम्ही जे काही करत असता त्यामध्ये व्यग्र असता, तुमच्या अवतीभोवती वावरणाऱ्या माणसांमध्ये, तुम्ही ज्या वस्तू वापरता त्या वस्तुंमध्ये, त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये, म्हणजे झोपणे, खाणे, गप्पा मारणे, थोडेसे काम, थोडीशी मौजमजा यांमध्ये व्यग्र असता आणि मग पुन्हा एकदा तीच सुरुवात होते – परत झोपणे, खाणे इ. इ. आणि पुन्हा तेच चालू राहते. आणि मग, हा काय म्हणाला, तो काय म्हणाला, त्याने काय केले पाहिजे, मी बरी आहे ना, माझी तब्येत चांगली आहे ना, इ. इ. अशा गोष्टींचा व्यक्ती सहसा विचार करत असते.

या साऱ्या गोष्टी मागे सोडून द्यायच्या आणि चेतनेसमोर व चेतनेत फक्त एकच गोष्ट येऊ द्यायची आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या अस्तित्वाच्या आणि जीवनाच्या मूळ हेतुचा शोध घेणे, आपण कोण आहोत, आपण का जगतो, या साऱ्याच्या मागे काय आहे याचा शोध घ्यायचा. ही पहिली पायरी असते आणि ती काही इतकी सोपी नसते. प्रत्यक्षात काय आविष्कृत झाले आहे यापेक्षा, त्यामागील कारणामध्ये आणि त्याच्या ध्येयामध्ये असणारे स्वारस्य ही पहिली पायरी असते. म्हणजे, वरकरणी आणि बाह्यवर्ती गोष्टींशी असणाऱ्या पूर्ण तादात्म्यापासून स्वतःची चेतना काढून घेऊन ती आत वळविणे आणि आपल्याला ज्याचा शोध घ्यायचा आहे, जे ‘सत्य’ आपण शोधू पाहत आहोत त्यावर एक प्रकारची आंतरिक एकाग्रता करणे, ही असते पहिली प्रक्रिया.

आणि म्हणून, व्यक्तीने प्रथम स्वत:चा आत्मा आणि त्यावर स्वामित्व असणाऱ्या ईश्वराचा केवळ शोधच घेतला पाहिजे असे नाही तर, व्यक्ती त्याच्याशी तादात्म्य पावली पाहिजे. त्यानंतर मग ती व्यक्ती पुन्हा एकदा बाह्यवर्ती गोष्टींकडे वळण्यास आणि त्यांचे रुपांतर करण्यास आरंभ करू शकते. कारण तेव्हाच त्या गोष्टींना कोणत्या दिशेला वळवायचे आणि त्यांचे रुपांतर कशात करायचे याची व्यक्तीला जाण येते. ही पायरी सोडून एकदम पुढे उडी मारता येत नाही. आपण आधी स्वतःचा आत्मा शोधला पाहिजे, आणि त्याच्याशी एकत्व पावले पाहिजे ही अगदी अपरिहार्य गोष्ट आहे. आणि नंतर मग आपण रूपांतराकडे वळू शकतो.

श्रीअरविंदांनी एके ठिकाणी लिहिले आहे की, “जिथे इतरांच्या योगाची परिसमाप्ती होते तेथे आमच्या योगाचा (पूर्णयोगाचा) प्रारंभ होतो.” सहसा योग हा आत्म्याशी होणाऱ्या सायुज्याप्रत, ईश्वणराशी होणाऱ्या एकत्वाप्रत घेऊन जातो; खरं तर म्हणूनच त्याला ‘योग’ असे म्हणतात. आणि जेव्हा लोकं हे साध्य करतात तेव्हा त्यांच्या दृष्टीने ते मार्गाच्या अखेरीस येऊन पोहोचलेले असतात आणि त्यावरच ते समाधानी असतात. परंतु येथे श्रीअरविंदांनी असे लिहिले आहे की, “जेव्हा इतरांच्या दृष्टीने मार्ग पूर्णत्वाला पोहोचलेला असतो तेव्हा आपला मार्ग सुरू होतो.” तुम्हाला आता ईश्वूराचा शोध लागलेला असतो पण निरुपयोगी झालेल्या देहामधून ईश्वराने तुम्हाला बाहेर काढावे म्हणून वाट पाहत ध्यानाला बसून राहण्याऐवजी, उलट, आता या चेतनेनिशी तुम्ही तुमच्या शरीराकडे, जीवनाकडे वळता आणि रूपांतरणाच्या कार्याला सुरुवात करता, की जे अत्यंत कठीण परिश्रमाचे काम असते. इथेच श्रीअरविंदांनी या कार्याची तुलना, निबिड अरण्यामधून स्वतःचा मार्ग स्वतःच शोधत जाण्याशी केली आहे. कारण अशा प्रकारचे कार्य याआधी इतर कोणीही केलेले नाही, अशावेळी, म्हणजे आजवर ज्या मार्गाने कोणीच वाटचाल केलेली नाही, तो मार्ग प्रत्येकाने स्वतःचा स्वतःच तयार करणे आवश्यक असते.

– श्रीमाताजी [CWM 07 : 349-351]

आध्यात्मिकता ३९ (उत्तरार्ध)

तुम्ही कोणतीही गोष्ट करत असा – अभ्यास असो, खेळ असो, कोणतेही काम असो – कोणत्याही गोष्टीसाठी एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे व्यक्तीने आपली एकाग्रतेची शक्ती वाढविणे. आणि जेव्हा तुम्ही अशी एकाग्रता साध्य करता, तेव्हा मग ती एकाग्रता तुम्हाला थकवणारी नसते. साहजिकच आहे की, सुरुवाती-सुरुवातीला त्यामुळे काहीसा ताण निर्माण होतो पण तुम्हाला एकाग्रतेचा अवलंब करण्याची सवय झाली की तो ताण नाहीसा होतो आणि मग एक वेळ अशी येते की जेव्हा तुम्ही अशा रीतीने एकाग्र नसता, जेव्हा तुम्ही विखुरलेले असता, अनेकानेक गोष्टींनी तुम्हाला गिळंकृत केले तरी चालेल अशी मुभा जेव्हा तुम्ही त्यांना देता, म्हणजेच तुम्ही जे करत आहात त्याकडेच तुम्ही लक्ष एकाग्र केलेले नसते, तेव्हाच तुम्हाला थकवा येतो.

एकाग्रताशक्तीमुळे व्यक्ती कोणत्याही गोष्टी अधिक चांगल्या रीतीने आणि अधिक वेगाने करण्यामध्ये यशस्वी होते. आणि अशा प्रकारे, तुम्ही विकसनाचे एक साधन म्हणून दैनंदिन कामाचा उपयोग करू शकता…

(उत्तरार्ध समाप्त)

श्रीमाताजी [CWM 04 : 138]

आध्यात्मिकता ३८

(पूर्वार्ध)

 

साधक : आम्ही जेव्हा एखादे काम करत असतो आणि ते काम आम्ही सर्वोत्तम करू इच्छित असतो, तेव्हा ते करण्यासाठी आम्हाला अधिक वेळ आवश्यक असतो. पण सर्वसाधारणपणे आपल्याकडे तेवढा वेळ नसतो, आपण घाईत असतो. मग घाईगडबडीत असतानादेखील सर्वोत्तमप्रकारे काम कसे करावे ?

श्रीमाताजी : हा अतिशय रोचक विषय आहे आणि एक ना एक दिवस मला तुमच्याशी या विषयाबाबतीत सविस्तर बोलायचेच होते. सहसा, माणसं जेव्हा घाईगडबडीत असतात तेव्हा, जे काम करायचे असते ते काम, ते पूर्णपणे करत नाहीत; अथवा, त्यांनी जर ते काम केलेच तर ते काम अगदी वाईट पद्धतीने करतात. खरंतर आणखीही एक मार्ग असतो, तो मार्ग म्हणजे व्यक्तीने आपली एकाग्रता अधिक तीव्र करायची. तुम्ही जर एकाग्रता वाढवलीत तर, तुम्ही निम्मा वेळ वाचविलेला असतो, तोही अगदी कमीत कमी वेळामध्ये! एक अगदी साधे उदाहरण घ्या. स्नान करून, कपडे घालून तयार व्हायला लागणारा वेळ प्रत्येक व्यक्तिगणिक भिन्नभिन्न असतो, नाही का? पण असे गृहीत धरूया की, वेळेचा अपव्यय न करता, किंवा अजिबात घाईगडबड न करता, व्यक्तीला या साऱ्या गोष्टी करण्यासाठी सर्वसाधारणपणे अर्धा तास लागतो. तुम्ही जर गडबडीत असाल तर दोनपैकी एक गोष्ट हमखास घडते – एकतर तुम्ही स्नान नीट करत नाही किंवा मग तुम्ही कपडे वगैरे नीट आवरत नाही.

पण अन्यही एक मार्ग असतो – व्यक्तीने आपले अवधान आणि आपली सर्व ऊर्जा एकवटली पाहिजे. आपण जे काही करत आहोत फक्त त्याच गोष्टीचा विचार करायचा, अन्य कोणत्याही गोष्टीचा विचार करायचा नाही, घाईघाईने खूप हालचाली करायच्या नाहीत, अचूक तेवढ्याच गोष्टी अगदी अचूक रीतीने करायच्या, (हा अनुभवाचा भाग आहे.) त्यामुळे तुम्हाला पूर्वी जी गोष्ट करायला अर्धा तास लागत होता तीच गोष्ट आता तुम्ही पंधरा मिनिटांमध्ये करू शकता आणि ती सुद्धा अगदी उत्तम रीतीने, कधीकधी तर अधिक चांगल्या रीतीने तुम्ही ती करता, कोणतीही गोष्ट न विसरता, करायचे काहीही शिल्लक न ठेवता, केवळ एकाग्रतेच्या तीव्रतेमुळे तुम्ही ही गोष्ट साध्य करू शकता.

(उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी [CWM 04 : 137-138]

साधनेची मुळाक्षरे – १२

‘ईश्वरी’ प्रभावाप्रत स्वत:ला खुले करणे हे या (पूर्ण)योगाचे संपूर्ण तत्त्व आहे. ईश्वर तुमच्या उर्ध्वदिशेस विद्यमान असतो आणि जर तुम्हाला त्याची जाणीव झाली तर, त्याने तुमच्यामध्ये प्रवेश करावा म्हणून तुम्ही केवळ त्यास आवाहन करायचे असते. ते ईश्वरीतत्त्व तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये ‘शांती’च्या, ‘प्रकाशा’च्या, कार्यकारी ‘शक्ती’च्या रूपाने अवतरते; ‘आनंद’रूपाने अवतरते; साकार किंवा निराकार रूपात ते ‘दिव्य अस्तित्व’ अवतरते. व्यक्तीला जोपर्यंत याची जाणीव होत नाही तोपर्यंत, तिने श्रद्धा बाळगली पाहिजे आणि खुलेपणासाठी आस बाळगली पाहिजे. अभीप्सा, धावा, प्रार्थना ह्या सगळ्या गोष्टी एकाच गोष्टीची विविध रूपे आहेत आणि या साऱ्याच गोष्टी सारख्याच प्रभावी आहेत. यांपैकी, तुमच्यापाशी जी कोणती गोष्ट येते वा जी तुम्हाला अगदी सहजसोपी, स्वाभाविक वाटते ती गोष्ट तुम्ही अवलंबावी.

दुसरा मार्ग एकाग्रतेचा. तुम्ही तुमची चेतना तुमच्या हृदयामध्ये एकाग्र करायची (काहीजण डोक्यामध्ये वा डोक्याच्या वर एकाग्र करतात.) आणि अंत:करणामध्ये श्रीमाताजींचे ध्यान करायचे आणि तेथे त्यांना आवाहन करायचे. व्यक्ती यांपैकी कोणतीही गोष्ट करू शकते किंवा वेगवेगळ्या वेळी दोन्ही गोष्टी करू शकते – जे तुम्हाला सहजस्वाभाविक वाटेल किंवा ज्या क्षणी तुम्ही जे करण्यासाठी प्रवृत्त व्हाल ते करावे. विशेषत: सुरुवातीला एक गोष्ट आत्यंतिक निकडीची असते ती म्हणजे, मन निश्चल करायचे आणि ध्यानाच्या वेळी, साधनाबाह्य असे सारे विचार, मनाच्या हालचाली हद्दपार करायच्या. अशा शांत मनामध्ये, अनुभूती येण्यासाठीची प्रगतिशील तयारी सुरू होते. परंतु लगेचच कोणती अनुभूती आली नाही तरी तुम्ही उतावीळ होता कामा नये. कारण मनामध्ये संपूर्ण निश्चलता येण्यासाठी बराच वेळ लागतो; तुमची चेतना सज्ज होईपर्यंत तुम्हाला वाटचाल करत राहावी लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 106)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०२

प्रश्न : आम्हाला योगासंबंधी काही सांगाल काय?

श्रीमाताजी : योग तुम्हाला कशासाठी हवा आहे? सामर्थ्य लाभावे म्हणून ? मन:शांती, शांतचित्तता प्राप्त व्हावी म्हणून ? का मानवतेची सेवा करायची आहे म्हणून?

परंतु, योगमार्ग स्वीकारण्यास तुम्ही पात्र आहात का हे लक्षात येण्यासाठी यांपैकी कोणतेही उद्दिष्ट पुरेसे नाही.

त्यासाठी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत : तुम्हाला ईश्वराकरता योगसाधना करायची आहे का? ईश्वर हेच तुमच्या जीविताचे परमोच्च सत्य आहे का ? ईश्वरावाचून जगणेच आता अगदी अशक्य झाले आहे, अशी तुमची स्थिती आहे का? ईश्वर हेच तुमच्या अस्तित्वाचे एकमेव कारण आहे आणि ईश्वराविना तुमच्या जीवनास काहीच अर्थ नाही, असे तुम्हाला वाटते का? असे असेल तरच तुम्हाला योगमार्ग स्वीकारण्याविषयी आंतरिक हाक आली आहे असे म्हणता येईल.

ईश्वराविषयीची तळमळ, अभीप्सा (Aspiration) हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे.

पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या अभीप्सेचे संगोपन करावयाचे; ती सतत जागृत, सावध व जिवंत राखायची. आणि त्यासाठी आवश्यकता असते एकाग्रतेची, ईश्वरावरील एकाग्रतेची ! ईश्वरी संकल्प व उद्दिष्ट यांसाठी समग्रपणे व नि:शेषतया वाहून घेता यावे या दृष्टिकोनातून ईश्वराच्या ठिकाणी एकाग्रता करणे आवश्यक असते.

हृदयामध्ये एकाग्रता करा. त्यात प्रवेश करा, जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढे आत खोल खोल, अगदी आत जा. तुमच्या जाणिवेचे बाहेर दूरवर पसरलेले सारे धागे एकत्रित करून, ते सारे गुंडाळून घ्या आणि आत बुडी मारा, अगदी तळाशी जाऊन बसा.

तुम्हाला आढळेल की, हृदयाच्या त्या निवांत प्रशांत गाभाऱ्यात एक अग्नी तेवत आहे. तोच तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व, तोच तुमचे खरेखुरे अस्तित्व. त्याचा आदेश ऐका, त्याच्या आज्ञेचे अनुसरण करा.

एकाग्रता करण्याची अन्य केंद्रदेखील आहेत, उदाहरणार्थ, एक असते मस्तकाच्या वर, दुसरे असते दोन भुवयांच्या मध्यभागी (भ्रूमध्यामध्ये)! प्रत्येक केंद्राचा स्वतंत्र असा प्रभाव असतो आणि त्यातून तुम्हाला वेगवेगळे विशिष्ट परिणामही अनुभवास येतात. पण मध्यवर्ती अस्तित्व (पुरुष) हे हृदयामध्येच असते आणि सर्व मुख्य प्रवृत्ती हृदयामधूनच उत्पन्न होतात – रूपांतरासाठी आवश्यक असलेली प्रेरणा व उत्कटता आणि साक्षात्कार करून घेण्याची शक्ती या गोष्टीसुद्धा तेथूनच निर्माण होतात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 01)