Posts

साधना, योग आणि रूपांतरण – २३३

फक्त ध्यानामुळेच प्रकृतीमध्ये परिवर्तन होऊ शकते असा आमचा अनुभव नाही किंवा दैनंदिन कर्मव्यवहार आणि बाह्य व्यापार यांच्यापासून निवृत्त होऊन जे परिवर्तन घडवून आणू पाहत आहेत त्यांनाही त्यापासून फार लाभ झाला आहे असे नाही. किंबहुना अनेक उदाहरणांमध्ये तर ते घातकच ठरले आहे.

काही विशिष्ट प्रमाणात ध्यान-एकाग्रता, हृदयामध्ये आंतरिक अभीप्सा आणि श्रीमाताजींच्या उपस्थितीप्रत चेतनेचे खुलेपण आणि ऊर्ध्वस्थित शक्तीकडून होणारे अवतरण या गोष्टी आवश्यक असतात. परंतु कर्माविना, कोणतेही कार्य न करता प्रकृतीचे खऱ्या अर्थाने परिवर्तन होऊ शकत नाही. परिवर्तन झाले आणि त्यानंतर जर व्यक्ती लोकांच्या संपर्कामध्ये आली तरच त्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये परिवर्तन झाले आहे की नाही याची खरी कसोटी लागते.

व्यक्ती कोणत्याही प्रकारचे काम करत असली तर, त्यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असे काहीही नसते. सर्व कर्मं जी श्रीमाताजींना अर्पण केली जातात आणि जी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या शक्तिनिशी केली जातात ती सर्व कर्मं एकसमान असतात.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 252)

साधना, योग आणि रूपांतरण – १९२

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०८

एकाग्रतेचा परिणाम सहसा अगदी त्वरेने घडून येत नाही; मात्र काही जणांमध्ये तो एकदम वेगवान आणि अचानकपणे घडून येतो; परंतु बहुतेकांना मात्र पूर्वतयारीसाठी आणि समायोजनासाठी कमीअधिक कालावधी लागतो. विशेषतः अभीप्सा आणि तपस्येद्वारे, जिथे प्रकृतीची काही प्रमाणात का होईना पण पूर्वतयारी झालेली नसते, तिथे अधिक कालावधी लागतो.

ज्ञानमार्गाची एक ‘अद्वैती’ प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती स्वतःच्या मन, प्राण आणि शरीराशी असलेल्या तादात्म्याला नकार देते, ती सातत्याने असे म्हणत राहते की, “मी मन नाही”, “मी प्राण नाही”, “मी शरीर नाही.” या गोष्टींना ती स्वतःच्या खऱ्या ‘स्व’पासून अलग करून पाहते आणि कालांतराने व्यक्तीला साऱ्या मानसिक, प्राणिक, शारीरिक क्रिया-प्रक्रिया आणि मन, प्राण व शरीराच्या स्वयमेव जाणिवासुद्धा बाह्य व बहिवर्ती क्रिया बनत चालल्याचे जाणवू लागते. त्याचवेळी अंतरंगामध्ये, त्यांच्यापासून निर्लिप्त अशी अलग स्वयंभू अस्तित्वाची जाणीव वाढीस लागते, जी जाणीव वैश्विक आणि परात्पर चैतन्याच्या साक्षात्कारामध्ये खुली होते.

अशीच आणखी एक अतिशय शक्तिशाली पद्धत आहे ती म्हणजे सांख्य दर्शनाची पद्धत. या पद्धतीमध्ये ‘पुरुष’ आणि ‘प्रकृती’चे विलगीकरण केले जाते. यामध्ये मनावर ‘साक्षित्वा’ची भूमिका लादली जाते म्हणजे मन, प्राण, शरीराच्या सर्व कृती या ‘मी’ आणि ‘माझे’ यांपासून वेगळ्या असतात, त्या बाह्य क्रिया बनलेल्या असतात, पण ‘प्रकृती’शी संबंधित असतात आणि ‘मी’च्या बाह्य व्यक्तित्वावर लादल्या जातात. या कोणत्याही गोष्टींनी ‘मी’ बांधला जात नाही, ‘मी’ हा त्यांपासून निर्लिप्त असतो; शांत, साक्षी ‘पुरुष’ असतो. परिणामतः व्यक्तीमध्ये एक प्रकारचे विभाजन वाढीस लागते. साधकाला स्वतःच्या अंतरंगामध्ये एका स्थिर, शांत, स्वतंत्र चेतनेच्या वाढीची जाणीव होते, ज्या चेतनेला पृष्ठवर्ती मन, प्राण आणि शारीरिक प्रकृतीच्या खेळापासून आपण स्वतः दूरस्थ आहोत याची जाणीव होते.

सहसा जेव्हा असे घडून येते तेव्हा उच्चतर ‘चेतने’ची शांती, उच्चतर ‘शक्ती’चे कार्य अगदी त्वरेने खाली आणणे शक्य असते, आणि त्यामुळे ‘योगा’ची संपूर्ण वाटचाल वेगाने घडून येऊ शकते. परंतु बरेचदा, आवाहन (call) आणि एकाग्रतेला प्रतिसाद म्हणून ‘शक्ती’च स्वतःहून खाली अवतरित होते आणि मग, उपरोक्त गोष्टी आवश्यक असतील तर ती त्या करते आणि साहाय्यकारी व अनिवार्य अशा इतर मार्गांचा किंवा प्रक्रियांचा उपयोग करते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 328-329)

साधना, योग आणि रूपांतरण – १०१

आजपर्यंत आपण ‘साधना, योग आणि रूपांतरण’ या मालिकेमध्ये ध्यान म्हणजे काय, एकाग्रता म्हणजे काय, या दोन्हीमध्ये काय फरक आहे, एकाग्रतेच्या विविध पद्धती कोणत्या, ध्यानामध्ये येणारे अडथळे कोणते आणि त्यावर कोणत्या मार्गांनी मात करता येते, समाधी – अवस्था म्हणजे काय, पारंपरिक योगमार्गातील समाधी आणि पूर्णयोगांतर्गत समाधी यामधील फरक, आत्मसाक्षात्कार म्हणजे काय इत्यादी विविध गोष्टी, त्यांचे बारकावे समजावून घेतले.

ध्यानाच्या मार्गाने उन्नत होत होत, समाधी-अवस्थेपर्यंत पोहोचणे हा साधनेचा केवळ एक मार्ग झाला. तो महत्त्वाचा असला तरी एकमेव नाही. पूर्णयोगांतर्गत साधना ही फक्त ध्यानापुरती सीमित नाही. तर ध्यानावस्थेत प्राप्त झालेली शांती, प्रेम, प्रकाश, ज्ञान, आनंद या साऱ्या गोष्टी बाह्य व्यवहारामध्येही उतरविणे येथे अभिप्रेत असते. आणि येथेच महत्त्वाची भूमिका असते ती कर्माची!

ध्यानासाठी दिवसाकाठी आपण किती वेळ देऊ शकतो ? फारफार तर तास-दोन तास. पण उरलेला सर्व वेळ आपण काही ना काही कर्म करत असतो. दैनंदिन व्यवहार करत असतो, उपजीविकेसाठी कामकाज करत असतो. ते करत असताना आपली वृत्ती कशी असते, आपली भूमिका कशी असते, आपण कोणत्या भावनेने कर्म करतो, कर्मफलाबाबत आपला दृष्टिकोन काय असतो, या व यासारख्या गोष्टींवरच कर्म हे ‘कर्मबंधन’ ठरणार की त्याचे पर्यवसान ‘कर्मयोगा’ मध्ये होणार हे अवलंबून असते.

पूर्णयोगामध्ये तर कर्माला विशेषच महत्त्व दिलेले आढळते. कारण या पार्थिव जीवनाचे ‘दिव्य जीवना’मध्ये रूपांतरण घडविणे हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट असते. या दृष्टीने, पूर्णयोगाच्या प्रकाशात, एक साधनामार्ग या दृष्टिकोनातून ‘कर्म-व्यवहारा’कडे पाहण्याचा प्रयत्न आपण येथून पुढच्या भागांमध्ये करणार आहोत.

संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक

साधना, योग आणि रूपांतरण – ८०

अंतरंगामध्ये खूप खोलवर आणि दूर गेल्यावर सौख्य आणि शांती यांचा अनुभव येतो कारण या गोष्टी अंतरात्म्यामध्ये (psychic) असतात आणि अंतरात्मा हा आपल्या अंतरंगामध्ये खूप खोलवर, मन आणि प्राण यांनी झाकलेला असतो. तुम्ही जेव्हा ध्यान करता तेव्हा तुम्ही या अंतरात्म्याप्रत खुले होता, उन्मुख होता, आणि तेव्हा तुम्हाला अंतरंगामध्ये खोलवर असणाऱ्या आंतरात्मिक चेतनेची जाणीव होते आणि मग तुम्हाला सौख्य, शांती या गोष्टी जाणवतात. सौख्य, शांती आणि आनंद या गोष्टी अधिक समर्थ व स्थिर व्हाव्यात आणि त्यांचा अनुभव तुमच्या सर्व व्यक्तित्वामध्ये, आणि अगदी शरीरामध्येदेखील यावा यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये अधिक खोलवर गेले पाहिजे आणि अंतरात्म्याची पूर्ण शक्ती शारीरिक अस्तित्वामध्ये आणली पाहिजे.

खऱ्या चेतनेसाठी अभीप्सा बाळगून, नियमित एकाग्रता आणि ध्यान केल्याने, हे सर्वाधिक सहजतेने शक्य होते. हे कर्माद्वारे, निष्ठेद्वारेसुद्धा शक्य होते; स्वतःसंबंधी विचार न करता, हृदयामध्ये श्रीमाताजींप्रति सातत्याने आत्मनिवेदन (consecration) करत राहण्याच्या संकल्पनेवर नेहमी लक्ष केंद्रित करून, ‘ईश्वरा’साठीच कर्म करत राहिल्यानेसुद्धा हे शक्य होते. परंतु हे परिपूर्णपणे सुयोग्य रीतीने करणे सोपे नसते.

*

‘ईश्वरा’च्या संपर्कात असण्यासाठी समाधीमध्येच असले पाहिजे असे नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 299), (CWSA 30 : 250)

साधना, योग आणि रूपांतरण – ५८

जिथे कोणी येणार जाणार नाही अशा एका अगदी शांत कोपऱ्यामध्ये बसले पाहिजे, जिथे तुम्ही अगदी सुयोग्य अशा स्थितीत असाल आणि अगदी नि:श्चल बसलेले असाल आणि (असे असेल तरच) तुम्हाला ध्यान करणे शक्य होईल असे समजण्याची सार्वत्रिक चूक करू नका. यामध्ये काही तथ्य नाही. वास्तविक, कोणत्याही परिस्थितीमध्ये यशस्वीरित्या ध्यान करता येणे ही आवश्यक गोष्ट आहे. डोकं रिकामं करणे याला मी ‘ध्यान’ म्हणत नाही तर ‘ईश्वरा’च्या निदिध्यासनामध्ये स्वत:चे लक्ष एकाग्र करणे याला मी ‘ध्यान’ म्हणते. आणि असे निदिध्यासन तुम्ही करू शकलात तर, तुम्ही जे काही कराल त्याची गुणवत्ता बदलून जाईल. त्याचे रंगरूप बदलणार नाही, कारण बाह्यतः ती गोष्ट तशीच दिसेल पण त्याची गुणवत्ता मात्र बदललेली असेल. जीवनाची गुणवत्ताच बदलून जाईल आणि तुम्ही जे काही होतात त्यापेक्षा तुम्ही काहीसे निराळेच झाले असल्याचे तुम्हाला जाणवेल. एक प्रकारची शांती, एक प्रकारचा दृढ विश्वास, आंतरिक स्थिरता, अढळ अशी निश्चल शक्ती तुम्हाला जाणवेल.

अशा स्थितीमध्ये तुम्हाला कोणी बाधा पोहोचविणे अवघड असते. हे जगत अनेक विरोधी शक्तींनी भरलेले आहे; त्या शक्ती सर्व काही बिघडवून टाकू पाहत असतात; त्यासाठी विविध शक्ती नेहमीच प्रयत्नशील असतात. …पण त्यामध्ये त्या काही प्रमाणातच यशस्वी होतात. तुम्ही प्रगती करण्यास प्रवृत्त व्हावे यासाठी जेवढ्या प्रमाणात बाधा पोहोचविणे आवश्यक असेल तेवढ्याच प्रमाणात त्या तुम्हाला बाधा पोहोचवितात. जेव्हा कधी तुमच्यावर जीवनाकडून आघात होतो तेव्हा तुम्ही लगेचच स्वत:ला सांगितले पाहिजे, “अरेच्चा, याचा अर्थ आता मला सुधारणा केलीच पाहिजे.” आणि मग तेव्हा तोच आघात हा आशीर्वाद ठरतो. अशावेळी तोंड पाडून बसण्यापेक्षा, तुम्ही ताठ मानेने आनंदाने म्हणता, “मला काय शिकले पाहिजे? ते मला समजून घ्यायचे आहे. मला माझ्यामध्ये काय सुधारणा केली पाहिजे? ते मला समजून घ्यायचे आहे”… अशी तुमची वृत्ती असली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 04 : 121-122)

साधना, योग आणि रूपांतरण – ५७

(कालच्या भागामध्ये आपण मन निश्चल-नीरव करण्याच्या विविध पद्धती समजावून घेतल्या. विचारांना अनुमती न देणे, विचारांकडे साक्षी पुरुषाप्रमाणे अलिप्तपणे पाहणे आणि मनात येणाऱ्या विचारांना ते आत प्रवेश करण्यापूर्वीच अडविणे यासारख्या पद्धतींचा अवलंब करूनही, जर मन निश्चल-नीरव झाले नाही तर काय करावे, असा प्रश्न येथे साधकाने विचारला असावा असे दिसते. त्यास श्रीअरविंदांनी दिलेले हे उत्तर…)

यापैकी कोणतीच गोष्ट घडली नाही तर अशा वेळी (विचारांना) नकार देण्याची सातत्यपूर्ण सवय ही आवश्यक ठरते. येथे तुम्ही त्या विचारांशी दोन हात करता कामा नयेत किंवा त्यांच्याशी संघर्षही करता कामा नये. फक्त एक अविचल आत्म-विलगीकरण (self-separation) आणि विचारांना नकार देत राहणे आवश्यक असते. सुरुवातीला लगेच यश येते असे नाही, पण तुम्ही त्या विचारांना अनुमती देणे सातत्याने रोखून ठेवलेत, तर अखेरीस विचारांचे हे यंत्रवत गरगर फिरणे कमीकमी होत जाईल आणि नंतर ते बंद होईल. तेव्हा मग तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार आंतरिक अविचलता (quietude) किंवा निश्चल-नीरवता (silence) प्राप्त होईल.

येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, काही अगदी अपवादात्मक उदाहरणे वगळता, योगिक प्रक्रियांचे परिणाम हे त्वरित दिसून येत नाहीत आणि म्हणून, परिणाम दिसून येत नाहीत तोपर्यंत तुम्ही या प्रक्रिया अगदी धीराने अवलंबल्या पाहिजेत. व्यक्तीची बाह्य प्रकृती (मन, प्राण आणि शरीर) खूप विरोध करत असेल तर, हे परिणाम दिसून येण्यास कधीकधी बराच कालावधी लागू शकतो.

जोपर्यंत तुम्हाला उच्चतर ‘आत्म्या’ची चेतना गवसलेली नाही किंवा तिचा अनुभवच जर तुम्हाला आलेला नाही, तर तुम्ही तुमचे मन त्या उच्चतर आत्म्यावर कसे काय स्थिर करू शकता? तुम्ही ‘आत्म्या’च्या संकल्पनेवरच लक्ष एकाग्र करू शकता किंवा मग तुम्ही ‘ईश्वरा’च्या किंवा ‘दिव्य माते’च्या संकल्पनेवर लक्ष एकाग्र करू शकता किंवा त्यांच्या मूर्तीवर, चित्रावर किंवा भक्तीच्या भावनेवर लक्ष एकाग्र करू शकता; ‘ईश्वरा’ने किंवा ‘दिव्य माते’ने तुमच्या हृदयात प्रविष्ट व्हावे म्हणून त्यांच्या उपस्थितीला तुम्ही आवाहन करू शकता किंवा तुमच्या शरीर, हृदय आणि मनामध्ये ‘दिव्य शक्ती’ने कार्य करावे म्हणून, तसेच तुमची चेतना मुक्त करून, तुम्हाला तिने आत्म-साक्षात्कार प्रदान करावा म्हणून, तुम्ही ‘दिव्य शक्ती’ला आवाहन करू शकता.

तुम्ही जर ‘आत्म्या’च्या संकल्पनेवर लक्ष एकाग्र करू इच्छित असाल तर ती संकल्पना मन आणि त्याचे विचार, प्राण आणि त्याची भावभावना, शरीर आणि त्याच्या कृती यांपासून काहीशी भिन्न असलीच पाहिजे; या सर्वापासून अलिप्त असली पाहिजे, ‘आत्मा’ म्हणजे एक ‘अस्तित्व’ किंवा ‘चेतना’ आहे अशा सघन जाणिवेपर्यंत तुम्ही जाऊन पोहोचला पाहिजेत. म्हणजे आजवर मन, प्राण, शरीर यांच्या गतिविधींमध्ये मुक्तपणे समाविष्ट असूनही त्यांच्यापासून अलिप्त असणारा ‘आत्मा’ अशा सघन जाणिवेपर्यंत तुम्ही जाऊन पोहोचला पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 303-304)

साधना, योग आणि रूपांतरण – ५६

ध्यानाला बसल्यावर मनामध्ये सर्व प्रकारचे विचार येऊन गर्दी करतात, ही जर तुमची अडचण असेल तर ती अडचण विरोधी शक्तींमुळे येत नाही, तर मानवी मनाच्या सर्वसाधारण प्रकृतीमुळे ती अडचण येते. सर्वच साधकांना ही अडचण येते आणि काहींच्या बाबतीत तर ती खूप दीर्घ काळपर्यंत टिकून राहते. त्यापासून सुटका करून घेण्याचे अनेक मार्ग आहेत. मनात जे विचार येतात त्यांच्याकडे पाहायचे, ते मानवी मनाच्या प्रकृतीचे जे दर्शन घडवीत असतात ते काय आहे याचे निरीक्षण करायचे पण त्या विचारांना कोणतीही अनुमती द्यायची नाही आणि ते अगदी निःस्तब्ध होत नाहीत तोवर त्यांना तसेच प्रवाहित होत राहू द्यायचे, हा एक मार्ग आहे. विवेकानंदांनी त्यांच्या ‘राजयोगा’मध्ये याच मार्गाची शिफारस केली आहे.

दुसरा मार्ग असा की, विचारांकडे ते आपले विचार आहेत असे समजून पाहायचे नाही, तर साक्षी पुरुषाप्रमाणे त्यांच्याकडे अलिप्त राहून पाहायचे आणि त्यांना अनुमती द्यायची नाही. हे विचार म्हणजे जणू काही बाहेरून, प्रकृतीकडून येणाऱ्या गोष्टी आहेत असे समजून त्यांच्याकडे पाहायचे. मनाचा प्रदेश ओलांडून पलीकडे जाणाऱ्या वाटसरूंप्रमाणे ते विचार आहेत अशी जाणीव मात्र तुम्हाला अवश्य झाली पाहिजे. ज्यांच्याशी तुमचा कोणताही संबंध असत नाही आणि ज्यांच्यामध्ये तुम्ही स्वारस्यही दाखवीत नाही अशा वाटसरुंप्रमाणे ते आहेत अशा रीतीने तुम्ही त्यांच्याकडे पाहिले पाहिजे.

अशा प्रकारे या मार्गाचा अवलंब केला असता, सहसा असे घडते की, कालांतराने मन दोन गोष्टींमध्ये विभागले जाते. मनाचा एक भाग म्हणजे प्रकृतीचा जो भाग असतो आणि जो निरीक्षणाचा विषय असतो, त्यामध्ये विचार इतस्ततः ये-जा करत असतात, भरकटत असतात. आणि दुसरा भाग, मनोमय साक्षी होऊन पाहत राहतो आणि तो पूर्णपणे अविचल व शांत असतो. कालांतराने मग तुम्ही निश्चल-नीरवतेकडे (silence) प्रगत होऊ शकता किंवा प्रकृतीच्या त्या भागालासुद्धा अविचल (quiet) करू शकता.

आणखी एक तिसरी पद्धतदेखील आहे. ती सक्रिय पद्धत आहे. यामध्ये विचार कोठून येत आहेत ते तुम्ही पाहायला सुरुवात करता आणि तुम्हाला असे आढळते की, ते विचार तुमच्यामधून येत नाहीयेत तर, ते विचार बाहेरून तुमच्या मस्तकामध्ये प्रवेश करत आहेत. अशा वेळी, म्हणजे तुम्हाला ते विचार आत येत असल्याचे लक्षात आले तर, त्यांनी आत प्रवेश करण्यापूर्वीच त्यांना पूर्णपणे बाजूला फेकून दिले पाहिजे.

कदाचित हा सर्वात कठीण मार्ग आहे आणि सर्वच त्याचा अवलंब करू शकतील असे नाही. पण जर या मार्गाचा अवलंब करता आला तर निश्चल-नीरवतेकडे घेऊन जाणारा तो सर्वात नजीकचा आणि परिणामकारक मार्ग आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 301-302)

साधना, योग आणि रूपांतरण – ५५

किरकोळ बारीकसारीक विचार मनामध्ये सातत्याने घोळत राहणे हे यांत्रिक मनाचे स्वरूप असते, मनाची संवेदनशीलता हे त्याचे कारण नसते. तुमच्या मनाचे इतर भाग हे अधिक शांत आणि नियंत्रणाखाली आले आहेत, आणि त्यामुळेच यांत्रिक मनाची ही खळबळ तुम्हाला अधिक ठळकपणे लक्षात येत आहे आणि ती मनाचा अधिकांश प्रदेशदेखील व्याप्त करत आहे. तुम्ही त्यांना सातत्याने नकार देत गेलात तर ते विचार सहसा आपोआप निघून जातात.

*

यांत्रिक मनाच्या मनोव्यापारापासून स्वतःला विलग करता येणे ही पहिली आवश्यक गोष्ट आहे. तसे करता आले तर यांत्रिक मनाचे ते किरकोळ विचार जणू रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या गोंगाटाप्रमाणे वाटू लागतील आणि मग तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकाल. आणि मग ते विचार पुन्हापुन्हा जरी मनात उद्भवत राहिले तरी आता मनाची अविचलता आणि शांती न ढळता तशीच कायम राहू शकेल. वरून शांती आणि निश्चल-नीरवता या गोष्टी अवतरित होत राहिल्या तर त्या बहुतेक वेळी इतक्या प्रबळ होतात की, कालांतराने त्या शारीर-मनावर नियंत्रण मिळवितात.

*

कदाचित तुम्ही या यंत्रवत विचारांकडे फारच लक्ष देत आहात. यंत्रवत चाललेल्या त्या कृतीकडे दुर्लक्ष करून तिला तशीच पुढे निघून जाऊ देणे आणि एकाग्रता साधणे हे सहज शक्य असते.

*

बाह्यवर्ती अस्तित्वामध्ये अंतरात्म्याचा प्रभाव जसजसा अधिकाधिक विस्तारत जाईल तसतशा अवचेतन मनाच्या यंत्रवत गतिविधी शांत होत जातील. हा सर्वोत्तम मार्ग आहे. मन शांत करण्यासाठी थेट प्रयत्न करणे ही काहीशी अवघड पद्धत आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 314), (CWSA 29 : 314-315), (CWSA 29 : 315), (CWSA 29 : 315)

साधना, योग आणि रूपांतरण – ५४

(आपण ‘साधना, योग आणि रूपांतरण’ या मालिकेमध्ये आजवर ध्यान म्हणजे काय, ध्यान आणि एकाग्रता यांमध्ये काय फरक आहे, हे श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या साहित्याच्या आधारे समजावून घेतले. ध्यान कसे करायचे या बाबतीतले अनेक बारकावेदेखील समजावून घेतले. श्रीअरविंद आणि श्रीमाताजींना, साधकांनी ध्यानात येणाऱ्या अडचणींविषयी वेळोवेळी विचारले आहे आणि त्यांनी त्यांची उत्तरे दिली आहेत, त्या अडचणींचे निराकरण करण्याचे मार्ग सुचविले आहेत, ते आपण आजपासून विचारात घेणार आहोत.)

साधक : कधीकधी मी माझे मन शांत करण्याचा तर कधीकधी समर्पण करण्याचा प्रयत्न करतो, आणि कधी माझा चैत्य पुरुष (psychic being) शोधण्याचा मी प्रयत्न करतो. परंतु अशा प्रकारे मी कोणत्याच एका गोष्टीवर माझे अवधान (attention) केंद्रित करू शकत नाही. यांपैकी कोणती गोष्ट मी सर्वप्रथम केली पाहिजे?

श्रीमाताजी : सर्व गोष्टी केल्या पाहिजेत आणि जी गोष्ट ज्यावेळी उत्स्फूर्तपणे करावीशी वाटेल त्यावेळी ती केली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 14 : 51)

साधना, योग आणि रूपांतरण – ५३

तुम्ही अंतरंगामध्ये खोलवर आणि अविचल स्थितीमध्ये प्रवेश केलेला असतो. पण जर व्यक्ती अशा स्थितीमधून अगदी अचानकपणे बाहेर सामान्य चेतनेमध्ये आली तर, तुम्ही म्हणता तसा मज्जातंतुला किंचितसा धक्का बसू शकतो किंवा थोड्या वेळासाठी हृदयाची धडधड वाढू शकते. आंतरिक स्थितीमधून डोळे उघडून बाहेर येताना, काही क्षणांसाठी शांत-स्थिर, अविचल राहणे हे नेहमीच उत्तम असते.

*

ध्यानानंतर काही कालावधीसाठी शांत, निश्चल-नीरव आणि एकाग्रचित्त राहणे हे निश्चितपणे अधिक चांगले. ध्यान गांभीर्याने न घेणे ही चूक आहे कारण तसे केल्याने व्यक्ती ध्यानामध्ये काही ग्रहण करू शकत नाही किंवा तिने जे ग्रहण केलेले असते ते सर्व किंवा त्यातील बहुतांश भाग वाया जातो.

*

तुमचे ध्यान व्यवस्थित चालू असते पण जेव्हा तुम्ही ध्यानातून बाहेर येता तेव्हा लगेच सामान्य चेतनेमध्ये जाऊन पडता आणि हीच अडचण आहे. कामकाजामध्ये गढलेले असतानादेखील, तुमची खरी चेतना कायम ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. असे केलेत तर मग साधना सदासर्वकाळ चालू राहील आणि मग तुमची अडचण नाहीशी होईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 313-314)