Posts

साधना, योग आणि रूपांतरण – १८१

पूर्णयोगाची साधना दुहेरी असते. चेतनेने अधिक उच्च स्तरांवर आरोहण करणे ही या साधनेची एक बाजू आहे आणि अज्ञान व अंधकार यांच्या ‘शक्तीं’चा निरास करता यावा व प्रकृतीचे रूपांतरण करता यावे यासाठी, उच्चतर स्तरांवरील शक्तीचे पृथ्वी-चेतनेमध्ये अवतरण घडविणे ही या साधनेची दुसरी बाजू आहे.

*

पूर्णयोगाच्या साधनेचे सूत्र म्हणून एकमेव मंत्र उपयोगात आणला जातो, तो म्हणजे एकतर ‘श्रीमाताजीं’चे नाम किंवा ‘श्रीअरविंदां’चे व ‘श्रीमाताजीं’चे नाम! हृदयकेंद्रामध्ये एकाग्रता आणि मस्तिष्कामध्ये एकाग्रता या दोन्ही पद्धती पूर्णयोगामध्ये उपयोगात आणल्या जाऊ शकतात; त्या प्रत्येक पद्धतीचे स्वतःचे असे परिणाम असतात.

हृदयकेंद्रावर एकाग्रता केली असता, चैत्य पुरुष (psychic being) खुला होतो तसेच त्यामुळे भक्ती, प्रेम उदित होते. हृदयकेंद्रावरील एकाग्रतेमुळे हृदयामध्ये श्रीमाताजींच्या उपस्थितीची जाणीव होते आणि त्यांच्याशी एकत्व घडून येते; तसेच प्रकृतीमध्ये त्यांच्या ‘शक्ती’चे कार्य घडून येते.

मस्तिष्ककेंद्रावर एकाग्रता साधली असता, मनाच्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या चेतनेप्रत आणि आत्म-साक्षात्काराप्रत मन खुले होते; तसेच ते देहाच्या बाहेर असणाऱ्या चेतनेच्या आरोहणाप्रत आणि उच्चतर चेतनेच्या देहामधील अवतरणाप्रत खुले होते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 416) (CWSA 29 : 326)

साधना, योग आणि रूपांतरण – १०३

तुम्ही ‘ध्यान’ कशाला म्हणता? डोळे मिटणे आणि मन एकाग्र करणे याला तुम्ही ‘ध्यान’ म्हणता? खरी चेतना अवतरित करण्यासाठी तिला आवाहन करण्याची ही केवळ एक पद्धत आहे. खऱ्या चेतनेशी जोडले जाणे आणि तिचे अवतरण जाणवणे, हीच गोष्ट फक्त महत्त्वाची असते आणि जर ते अवतरण कोणत्याही पारंपरिक पद्धतीविना होत असेल, जसे ते माझ्या बाबतीत नेहमीच होत असे, तर ते अधिक चांगले! ध्यान हे केवळ एक साधन आहे, उपकरण आहे. चालताना, बोलताना, काम करतानासुद्धा साधनेमध्ये असणे ही खरी योग-प्रक्रिया आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 300)

शिष्य : एका विधानाची सध्या इथे चर्चा आहे. त्यात असे म्हटले आहे की, “नुकतेच ह्या विजयाच्या बरोबरीने जे काही घडले आहे, ते केवळ अवतरण नव्हते तर ते आविष्करण होते. आणि एखाद्या व्यक्तिगत घटनेपेक्षा त्याचे मोल अधिक आहे : कारण अतिमनाचा वैश्विक लीलेमध्ये उदय झालेला आहे.”

श्रीमाताजी : हो, हो. खरंतर मीच हे सारे म्हटले होते.

शिष्य : ते म्हणतात की, अतिमानस तत्त्व आता कार्यरत झाले आहे…

श्रीमाताजी : ….प्रथम जाणिवेचे आरोहण होते, नंतर जाणीव तेथील ‘सद्वस्तु’ ग्रहण करते आणि तिला घेऊन खाली येते. ही ‘व्यक्तिगत’ घटना असते. मी ह्याला ‘अवतरण’ म्हणते.

परंतु, हीच व्यक्तिगत घटना जेव्हा अशा रीतीने घडून येते की, ज्यामुळे सार्वत्रिक स्तरावरील शक्यता निर्माण होण्यास ती पुरेशी आहे असे सिद्ध होते, तेव्हा ते केवळ ‘अवतरण’ नसते तर ते ‘आविष्करण’ असते.

ज्याला मी अवतरण म्हणते ती व्यक्तीच्या जाणिवेमध्ये घडून आलेली, व्यक्तिगत क्रिया असते. पण जर उदाहरणच द्यावयाचे झाले तर, जेव्हा मन या पृथ्वीतलावर प्रसृत झाले होते त्याप्रमाणे, या जुन्या विश्वामध्ये, एखादे नवीनच विश्व आविष्कृत होते, तेव्हा त्याला मी ‘आविष्करण’ म्हणते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 133)

मी आंतरिक सत्य, प्रकाश, सुमेळ आणि शांती यांचे काहीएक तत्त्व, पृथ्वीचेतनेमध्ये आणू पाहत आहे. मला ते वर दिसत आहे आणि ते काय आहे हे मला माहीत आहे. जाणिवेमध्ये उतरू पाहणारी त्याची तेज:प्रभा मी सातत्याने अनुभवत आहे. आज मानवाची प्रकृती अर्धप्रकाश, अर्धअंधकार अशा दशेत आहे; त्याने त्याच दशेमध्ये राहण्यापेक्षा, मानवाचे समग्र अस्तित्वच, त्या सत्य-तत्त्वाने स्वत:च्या अंगभूत शक्तीमध्ये सामावून घ्यावे, हे त्या सत्य-तत्त्वाला शक्य व्हावे म्हणून मी झटत आहे. या पृथ्वीवरील अंतिम उत्क्रांती असे जिला म्हणता येईल, अशी उत्क्रांती म्हणजे दिव्य चेतनेचा विकास; तो विकास घडून येण्यासाठीचा मार्ग या सत्य-तत्त्वाच्या अवतरणाने खुला होईल, अशी मला खात्री आहे.

-श्रीअरविंद
(CWSA 35 : 281)