साधनेची मुळाक्षरे – ३३
(श्रीअरविंदलिखित पत्रामधून…)
हा ‘योग’ म्हणजे केवळ ‘भक्तियोग’ नाही; हा ‘पूर्णयोग’ आहे किंवा किमान तसा त्याचा दावा तरी आहे, म्हणजे असे की, यामध्ये, संपूर्ण जीवच त्याच्या सर्व अंगांनिशी ‘ईश्वरा’कडे वळणे अभिप्रेत आहे.
याचा अर्थ असा की, तेथे ज्ञान, कर्म तसेच ‘भक्ती’देखील असली पाहिजे. त्यात अधिकची भर म्हणजे, त्यामध्ये प्रकृतीच्या पूर्ण परिवर्तनाचा, परिपूर्णत्वाच्या ध्यासाचा समावेश होतो, ज्यामुळे प्रकृती ही ‘ईश्वरा’च्या प्रकृतीशी एकात्म होईल. केवळ हृदयच ईश्वराकडे वळले आणि त्याचे परिवर्तन झाले, असे होऊन चालणार नाही, तर मनसुद्धा ईश्वराकडे वळले पाहिजे आणि म्हणून ज्ञानसुद्धा गरजेचे आहे; त्याचबरोबर इच्छाशक्ती, कर्मशक्ती आणि सृजनशक्तीसुद्धा ईश्वराकडे वळली पाहिजे म्हणून कर्मसुद्धा आवश्यक आहे.
या ‘योगा’मध्ये इतर ‘योगमार्गां’च्या पद्धतींचाही समावेश करण्यात आला आहे – उदा. ‘पुरुष-प्रकृती’ची पद्धत, परंतु अंतिम उद्दिष्टाबाबत मात्र फरक आहे. ‘पुरुषा’चे ‘प्रकृती’पासून विलगीकरण येथेही आहे, पण ते तिचा त्याग करण्यासाठी नाही तर, पुरुषाने स्वतःला आणि प्रकृतीला जाणावे या हेतूने आहे. पुरुष हा प्रकृतीचे खेळणे म्हणून नव्हे तर प्रकृतीचा ज्ञाता म्हणून, स्वामी म्हणून आणि पालनकर्ता म्हणून असावा, या हेतुने हे विलगीकरण आहे; आणि हे असे घडत असताना किंवा झाल्यानंतर, व्यक्ती स्वतःचे सर्वस्व ईश्वरार्पण करते.
व्यक्ती ज्ञानापासून किंवा कर्मापासून किंवा ‘भक्ती’पासून वा परिपूर्णत्वासाठी (प्रकृतीचे परिवर्तन) आत्म-शुद्धिकरणाच्या ‘तपस्ये’पासून प्रारंभ करू शकते आणि उर्वरित गोष्टी या त्या पाठोपाठ येणाऱ्या प्रक्रिया म्हणून विकसित करू शकते किंवा व्यक्ती या साऱ्या गोष्टी एकाच प्रक्रियेमध्येदेखील समाविष्ट करू शकते. सर्वांसाठी एकच एक असा नियम नाही, ते व्यक्ती आणि तिच्या प्रकृतीवर अवलंबून असते.
समर्पण ही या ‘योगा’ची मुख्य ताकद आहे, परंतु समर्पण हे प्रगमनशील (Progressive) असले पाहिजे, प्रारंभीच संपूर्ण समर्पण शक्य नसते, तर प्रारंभी, त्या संपूर्णतेची जिवामध्ये असलेली ती एक इच्छाच असते – वस्तुतः या साऱ्याला वेळ लागतो. आणि जेव्हा समर्पण परिपूर्ण होते तेव्हाच साधनेचा पूर्ण बहर शक्य असतो. तोपर्यंत, समर्पणाच्या चढत्यावाढत्या वास्तवानिशी वैयक्तिक प्रयत्न असणे देखील आवश्यक असते. व्यक्ती ‘ईश्वरी शक्ती’च्या सामर्थ्याला आवाहन करते आणि एकदा का ती शक्ती त्या जिवामध्ये अवतरित व्हायला सुरुवात झाली की, मग ती सर्वप्रथम व्यक्तीच्या व्यक्तिगत प्रयत्नांना आधार पुरविते, नंतर ती हळूहळू व्यक्तीची समग्र कृतीच हाती घेते, अर्थात यासाठी साधकाची संमती असणे ही बाब नेहमीच गरजेची असते.
एकदा ‘शक्ती’ने कार्य हाती घेतले की, साधकाच्या दृष्टीने ज्या ज्या विभिन्न प्रक्रिया आवश्यक असतात, त्या साऱ्या प्रक्रिया ती घडवून आणते. म्हणजे उदाहरणार्थ, ज्ञानाच्या, ‘भक्ती’च्या, आध्यात्मिक कर्माच्या प्रक्रिया, प्रकृतीच्या रूपांतरणाच्या प्रक्रिया ती घडवून आणते. या साऱ्या प्रक्रिया एकत्र केल्या जाऊ शकत नाहीत, ही कल्पना दोषपूर्ण आहे.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 207-208)