साधना, योग आणि रूपांतरण – ९२

साधक : समाधी-अवस्था ही प्रगतीची खूण आहे का?

श्रीमाताजी : ही अतिशय उच्च अवस्था आहे असे प्राचीन काळी मानले जात असे. एवढेच नव्हे तर, ती महान साक्षात्काराची खूण आहे, असे समजले जात असे. आणि त्यामुळे जे कोणी योगसाधना करू इच्छित असत ते नेहमीच या अवस्थेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असत. या अवस्थेसंबंधी आजवर सर्व तऱ्हेच्या अद्भुत गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. ज्याला जे वाटेल ते त्याने सांगावे असा काहीसा प्रकार याबाबतीत आढळतो कारण समाधीतून बाहेर आल्यावर व्यक्तीला काहीच आठवत नसते. जे जे कोणी या अवस्थेमध्ये प्रविष्ट झाले होते त्यांच्याबाबतीत त्या अवस्थेमध्ये नेमके काय घडले होते हे काही ते सांगू शकत नसत. आणि त्यामुळे व्यक्तीला जे वाटते ते ती सांगू शकते.

मी तुम्हाला एक प्रसंग सांगते, सर्व तथाकथित आध्यात्मिक साहित्यामध्ये या समाधी अवस्थेसंबंधी अनेक अद्भुत गोष्टी सांगितलेल्या असायच्या आणि त्या नेहमीच माझ्या वाचनात यायच्या आणि मला तर तशा प्रकारचा अनुभव कधीच आलेला नव्हता. आणि त्यामुळे ही काही कमतरता आहे की काय असे मला वाटायचे.

आणि मी जेव्हा येथे (पाँडिचेरीला) आले, तेव्हा श्रीअरविंदांना मी ज्या शंका विचारल्या होत्या त्यातील ही एक शंका होती. मी त्यांना विचारले होते, “ज्या समाधी अवस्थेमध्ये गेल्यावर (त्या स्थितीतून परत आल्यावर) व्यक्तीला कशाचेच स्मरण राहत नाही अशा अवस्थेबद्दल तुमचे काय मत आहे? म्हणजे व्यक्ती आनंदमय वाटेल अशा एका स्थितीमध्ये प्रवेश करते परंतु जेव्हा ती त्या स्थितीमधून बाहेर येते तेव्हा तिथे काय घडले ते तिला काहीच माहीत नसते.’’

मी काय म्हणू इच्छित आहे, हे त्यांनी जाणले आणि मग ते म्हणाले, “ही चेतनाविहीनता (unconsciousness) आहे.”

मी (आश्चर्याने) विचारले, “काय?” आणि म्हणाले, “अधिक खुलासेवार सांगाल का?”

ते मला सांगू लागले की, “जेव्हा व्यक्ती स्वतःच्या सचेत अस्तित्वाच्या बाहेर जाते तेव्हा, ज्याला ‘समाधी’ असे म्हटले जाते त्या समाधी अवस्थेमध्ये ती प्रवेश करते आणि तेव्हा व्यक्ती तिच्या अस्तित्वाच्या पूर्णतः चेतनाविहीन असलेल्या एका भागामध्ये प्रवेश करते. किंवा अशा एका प्रांतामध्ये ती प्रवेश करते की तेथील चेतनेशी संबंधित असणारी चेतना तिच्यापाशी नसते. म्हणजे तिच्या चेतनेचे जे क्षेत्र असते त्या क्षेत्राच्या ती पलीकडे जाते आणि जेथे ती सचेत राहू शकत नाही अशा एका प्रांतात प्रवेश करते. तेव्हा ती व्यक्ती अवैयक्तिक (impersonal) स्थितीमध्ये असते, म्हणजे ती व्यक्ती चेतनाविहीन अशा एका अवस्थेत जाते आणि म्हणूनच, साहजिकपणे, तिला तेथील काहीच आठवत नाही, कारण तेव्हा ती कशाविषयीही सचेत नसते.”

हे ऐकल्यावर मी काहीशी आश्वस्त (reassured) झाले आणि त्यांना म्हणाले, “परंतु हा असा अनुभव मला कधीच आलेला नाही.”

ते म्हणाले, “मलाही असा अनुभव कधी आलेला नाही!”

आणि तेव्हापासून, लोकं जेव्हा मला समाधीविषयी विचारतात तेव्हा मी त्यांना सांगते की, “तुम्ही तुमचे आंतरिक व्यक्तित्व विकसित करा म्हणजे मग तुम्ही याच प्रांतांमध्ये पूर्ण जाणिवपूर्वकपणे, सचेत रीतीने प्रवेश करू शकाल. आणि उच्चतर प्रांतांशी सायुज्य झाल्याचा आनंद तुम्हाला अनुभवास येईल आणि तेव्हा तुमची चेतनाही तुम्ही गमावलेली नसेल तसेच अनुभूतीऐवजी हाती शून्य घेऊन तुम्ही परतलेले नसाल.” समाधी ही प्रगतीची खूण आहे का, असे विचारणाऱ्या व्यक्तीस माझे हे उत्तर आहे.

समाधी-अवस्थेमध्ये प्रविष्ट न होतादेखील, व्यक्ती जेथे चेतनाविहीनता नावाला सुद्धा शिल्लक नसते, अशा प्रांतात जाऊ शकते तेव्हा ती प्रगतीची खूण असते.

– श्रीमाताजी (CWM 08 : 274-275)

साधना, योग आणि रूपांतरण – ९१

(अनुभव आणि साक्षात्कार या दोन्हीमध्ये काय फरक आहे असा प्रश्न एका साधकाने विचारला असावा असे दिसते तेव्हा श्रीअरविंद यांनी त्यास दिलेले हे उत्तर…)

योगमार्गामध्ये घडणाऱ्या गोष्टींचे अनुभव, अनुभूती (experiences) आणि साक्षात्कार (realizations) हे दोन प्रकार असतात. ‘ईश्वरा’चे मूलभूत सत्य, ‘उच्चतर’ किंवा ‘दिव्य प्रकृती’, जगत-चेतना आणि तिच्या विविध शक्तींची लीला, स्वतःचा आत्मा व खरी प्रकृती आणि वस्तुमात्रांची आंतरिक प्रकृती या गोष्टी चेतनेमध्ये ग्रहण करणे आणि त्यांची तेथे प्रस्थापना करणे म्हणजे साक्षात्कार! जोपर्यंत या सर्व गोष्टी तुमच्या आंतरिक जीवनाचा आणि अस्तित्वाचा एक भाग बनत नाहीत तोपर्यंत या सर्व गोष्टींची शक्ती तुमच्यामध्ये वृद्धिंगत होत राहते. उदाहरणार्थ, ‘ईश्वरी उपस्थिती’चा साक्षात्कार, उच्चतर ‘शांती’, ‘प्रकाश’, ‘शक्ती’, ‘आनंद’ यांचे चेतनेमध्ये अवरोहण (descent) आणि अधिवसन (settling), त्यांचे चेतनेमध्ये चालणारे कार्य, ईश्वरी किंवा आध्यात्मिक प्रेमाचा साक्षात्कार, स्वतःच्या चैत्य पुरुषाचे होणारे प्रत्यक्षबोधन (perception), स्वतःच्या खऱ्या मनोमय पुरुषाचा, खऱ्या प्राणमय पुरुषाचा, खऱ्या अन्नमय पुरुषाचा शोध, अधिमानसिक किंवा अतिमानसिक चेतनेचा साक्षात्कार, या सर्व गोष्टींचे आपल्याशी असलेले जे नाते आहे त्याची आपल्या सद्यस्थितीतील गौण प्रकृतीला होणारी सुस्पष्ट जाणीव आणि कनिष्ठ प्रकृतीमध्ये परिवर्तन व्हावे म्हणून त्यावर चाललेले त्यांचे कार्य. (अर्थातच ही यादी अजून कितीही वाढविता येण्यासारखी आहे.)

या गोष्टी जेव्हा वीजेप्रमाणे क्षणभर चमकून जातात, झपाट्याने येतात आणि निघून जातात किंवा अवचित पावसाची सर येऊन जावी तशा येऊन जातात तेव्हा या गोष्टींना बरेचदा ‘अनुभव’ असे संबोधले जाते. जेव्हा या गोष्टी अतिशय सकारात्मक असतात किंवा वारंवार घडतात किंवा सातत्याने घडतात किंवा त्या स्वाभाविक बनलेल्या असतात तेव्हाच त्यांचा ‘पूर्ण साक्षात्कार’ झाला, असे म्हटले जाते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 38)

साधना, योग आणि रूपांतरण – ९०

तुम्ही बाह्यवर्ती व्यक्तित्वाबद्दल जे म्हणत आहात ते योग्य आहे. तुमच्या आंतरिक प्रकृतीच्या अंतरंगामध्ये जे आहे तेच तुमच्या बाह्य व्यक्तित्वाद्वारे आविष्कृत झाले पाहिजे आणि (त्यानुसार) त्याच्यामध्ये परिवर्तन झाले पाहिजे. परंतु त्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या आंतरिक प्रकृतीचे अनुभव आले पाहिजेत आणि मग, त्यांच्याद्वारे आंतरिक प्रकृतीची शक्ती वृद्धिंगत होते. आंतरिक प्रकृती बाह्यवर्ती व्यक्तित्वावर पूर्णतः प्रभाव टाकू शकेल आणि त्याचा ताबा घेऊ शकेल, अशी स्थिती येईपर्यंत ती वृद्धिंगत होत राहते. आंतरिक चेतना विकसित न होताच, बाह्यवर्ती चेतनेमध्ये पूर्णतः परिवर्तन घडविणे हे खूपच अवघड असते. आणि म्हणूनच हे आंतरिक अनुभव आंतरिक चेतनेच्या विकसनाची तयारी करत राहतात.

(आपल्यामध्ये) एक आंतरिक मन, आंतरिक प्राण, आंतरिक शारीर-चेतना असते; ती बाह्यवर्ती चेतनेपेक्षा अधिक सहजतेने ऊर्ध्वस्थित असणाऱ्या उच्चतर चेतनेचे ग्रहण करू शकते तसेच ती स्वतःला चैत्य पुरुषाशी सुसंवादी करू शकते. असे घडून येते तेव्हा बाह्यवर्ती प्रकृती म्हणजे आपण स्वतः नसून, ती पृष्ठभागावरील केवळ एक किनार आहे असे तुम्हाला जाणवू लागते आणि मग बाह्यवर्ती प्रकृतीचे संपूर्णपणे रूपांतरण करणे अधिक सोपे होते. बाह्यवर्ती प्रकृतीमध्ये कितीही अडचणी असल्या तरीही त्यामुळे ज्या तथ्याला बाधा येऊ शकत नाही, ते तथ्य असे की, तुम्ही आता अंतरंगामध्ये जागृत झाला आहात, श्रीमाताजींची शक्ती तुमच्यामध्ये कार्य करत आहे आणि तुम्ही त्यांचे खरे बालक असल्याने, तुम्ही सर्व प्रकारे त्यांचे परिपूर्ण बालक होऊन राहणार आहात हे निश्चित आहे. तुम्ही तुमचे विचार आणि तुमची श्रद्धा समग्रतया श्रीमाताजींवर एकाग्र करा म्हणजे मग तुम्ही साऱ्यातून सुरक्षितपणे पार होऊ शकाल.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 211)

साधना, योग आणि रूपांतरण – ८९

तुम्ही तुमच्या अंतरंगामध्ये, स्वतःचे (म्हणजे तुमच्या बाह्यवर्ती प्रकृतीच्या विविध घटकांचे) एकीकरण अधिक दृढपणे केले पाहिजे. तुम्ही जर स्वतःला सतत विखुरत (disperse) राहिलात, आंतरिक वर्तुळ ओलांडून पलीकडे गेलात, तर सामान्य बाह्यवर्ती प्रकृतीच्या क्षुद्रतेमध्ये आणि ती प्रकृती ज्याप्रत खुली आहे अशा गोष्टींच्या प्रभावाखाली तुम्ही सतत वावरत राहाल. अंतरंगामध्ये जीवन जगायला शिका. नेहमी अंतरंगात राहून कृती करायला आणि श्रीमाताजींशी सतत आंतरिक संपर्क ठेवायला शिका. ही गोष्ट नेहमी आणि पूर्णांशाने करणे सुरुवातीला काहीसे कठीण वाटू शकेल, परंतु तुम्ही जर तसे चिकाटीने करत राहिलात तर ते करता येणे शक्य असते, आणि असे केले तरच, व्यक्तीला योगमार्गात सिद्धी मिळविणे शक्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 227)

साधना, योग आणि रूपांतरण – ८८

(ध्यानावस्थेत प्रकाश दिसल्याचे एका साधकाने श्रीअरविंद यांना कळविले तेव्हा त्यांनी दिलेले हे उत्तर….)

प्रकाश अनेक प्रकारचे असतात. अतिमानसिक, मानसिक, प्राणिक, शारीरिक, दिव्य किंवा असुरी असे सर्व प्रकारचे प्रकाश असतात. त्यांच्याकडे तुम्ही लक्षपूर्वक पाहिले पाहिजे, अनुभवांच्या आधारे प्रगल्भ होत गेले पाहिजे आणि त्या प्रत्येकामधील फरक ओळखायला शिकले पाहिजे. खऱ्या प्रकाशांच्या ठायी स्पष्टता आणि सौंदर्य असते आणि त्यामुळे ते ओळखणे हे तितकेसे कठीण नसते.

*

(ध्यानावस्थेमध्ये एका साधकाला काही ध्वनी ऐकू येत असल्याचे त्याने श्रीअरविंदांना पत्राने लिहून कळविले असावे, तेव्हा त्या साधकाला श्रीअरविंदांनी दिलेले हे उत्तर… )

शारीरिक दृष्टीशिवाय जशी आणखी एक वेगळी अंतर्दृष्टी असते, त्याप्रमाणेच बाह्य श्रवणाप्रमाणेच आंतरिक श्रवणही (inner hearing) असते. आणि ते आंतरिक श्रवण इतर जगतांमधील, इतर स्थळकाळातील किंवा अतिभौतिक जिवांकडून येणारे आवाज, ध्वनी आणि शब्द ऐकू शकते. पण इथे तुम्ही काळजी घेतली पाहिजे.

काय करावे आणि काय करू नये, यासंबंधी परस्परविरोधी आवाजात जर तुम्हाला कोणी काही सांगायचा प्रयत्न करत असेल, तर तुम्ही त्यांचे म्हणणे ऐकता कामा नये किंवा त्यांना प्रत्युत्तरदेखील देता कामा नये. तुम्ही काय करावे किंवा काय करू नये यासंबंधी केवळ मी आणि श्रीमाताजीच तुम्हाला सांगू शकतो किंवा मार्गदर्शन करू शकतो किंवा तुम्हाला सल्ला देऊ शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 304-305, 112)

साधना, योग आणि रूपांतरण – ८७

(बाह्यवर्ती चेतना आणि आंतरिक अस्तित्व यांच्यामधील अडथळा भेदला गेला की काय होते याचा काहीसा विचार आपण कालच्या भागात केला.)

कोणत्या न् कोणत्या पद्धतीने एकदा का तो अडथळा मोडून पडला की मग तुम्हाला असे आढळू लागते की, योगासाठी आवश्यक असणाऱ्या प्रक्रिया आणि गतिविधी या गोष्टी तुमच्या बाह्य मनाला जितक्या कठीण किंवा अशक्यप्राय वाटत होत्या तेवढ्या त्या कठीण नाहीत. त्या तुमच्या आवाक्यातील आहेत. तुमच्या आंतरतम चैत्य पुरुषामध्ये अगोदरपासूनच एक योगी आणि एक भक्त अस्तित्वात आहे आणि तो जर पूर्णपणे उदयाला आला आणि त्याने पुढाकार घेतला तर, तुमच्या बाह्य जीवनाला आध्यात्मिक वळण लागणे हे पूर्वनियोजित आणि अपरिहार्य आहे.

प्रारंभापासूनच जे साधक यशस्वी होतात त्यांच्याबाबतीत योगमय आणि आध्यात्मिक अशा सखोल आंतरिक जीवनाची घडण आधीपासूनच झालेली असते. एवढेच की, त्यांच्या विचारी मनाला आणि कनिष्ठ प्राणिक भागांना शिक्षण आणि गतकालीन कृतींमुळे बलशाली बाह्य वळण दिले गेलेले असते आणि त्यामुळे त्यांचे आंतरिक जीवन पडद्याआड गेलेले असते. मनाला लागलेल्या बाह्यवर्ती वळणामध्ये सुधारणा घडविणे आणि तो पडदा भेदणे यासाठीच त्या साधकाला परिश्रमपूर्वक योगसाधना करण्याची आवश्यकता असते.

एकदा हा आंतरिक पुरुष प्रभावीपणे आविष्कृत झाला, भले मग तो अंतराभिमुख जाण्याने असेल किंवा बाह्याभिमुख येण्याने असेल, त्याचा दबाव पुन्हा प्रस्थापित होणार आणि मार्ग मोकळा होऊन तो त्याचे साम्राज्य पुन्हा प्रस्थापित करणार हे निश्चित! आत्ता जे घडते आहे ते, येथून पुढे मोठ्या प्रमाणावर जे घडणार आहे त्याची नांदी आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 218-219)

साधना, योग आणि रूपांतरण – ८६

(रूपांतरण करू इच्छिणाऱ्या साधकासाठी आपल्या आंतरिक प्रांतांविषयी सजग होणे कसे महत्त्वाचे असते हे आपण कालच्या भागात पाहिले.)

तुम्ही जर तुमच्या बाह्य ‘स्व’ शीच जखडून राहिलात, तुमच्या शारीर-मनाशी आणि त्याच्या क्षुल्लक हालचालींशी स्वतःला बांधून ठेवलेत, तर तुमची अभीप्सा कधीच प्रत्यक्षात उतरू शकणार नाही. बाह्य अस्तित्व हे आध्यात्मिक प्रेरणेचा स्रोत नसते, तर ते केवळ पडद्याआडून, अंतरंगामधून आलेल्या प्रेरणांचे अनुसरण करत असते. तुमच्यामधील आंतरिक चैत्य पुरुष हा भक्त आहे, तो आनंदाचा आणि (ईश्वराच्या) सायुज्याचा शोध घेत आहे. बाह्य प्रकृती जशी आहे तशीच तिला सोडून दिली तर ती जे कधीच करू शकली नसती ते परिपूर्णतेने करणे तिला, तो अडथळा मोडून पडल्यावर आणि अंतरात्मा अग्रस्थानी आल्यावर शक्य होते. कारण ज्या क्षणी अंतरात्मा प्रभावीपणे अग्रस्थानी येतो किंवा तो जेव्हा चेतना स्वतःमध्ये सबळपणे ओढून घेतो तेव्हापासून शांती, आनंद, मुक्तता, विशालता, प्रकाशाप्रति उन्मुखता, उच्चतर ज्ञान या गोष्टी स्वाभाविक, सहजस्फूर्त होण्यास सुरुवात होते; बऱ्याचदा त्यांचा उदय अगदी त्वरेने होतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 218)

साधना, योग आणि रूपांतरण – ८५

(चेतना अंतराभिमुख झाल्यावर साधकाला कोणकोणते अनुभव येतात हे कालच्या भागात आपण समजावून घेतले.)

साधकाने हे समजून घेतले पाहिजे की, हे अनुभव म्हणजे नुसत्या कल्पना नसतात किंवा स्वप्नं नसतात, तर त्या वास्तव घटना असतात. आणि जसे बऱ्याचदा घडते त्याप्रमाणे जरी त्या गोष्टी म्हणजे अगदी, नुसत्या मनोरचना असल्या, जरी त्या अगदी चुकीच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या किंवा विरोधी प्रकृतीच्या असल्या तरीही त्यांच्यामध्ये रचनांची म्हणून त्यांची स्वतःची अशी एक शक्ती असते. आणि म्हणून त्या रचनांना नकार देण्यापूर्वी किंवा त्या नाहीशा करण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात घेतली गेली पाहिजे.

प्रत्येक अनुभवाच्या मूल्यामध्ये जरी पुष्कळ फरक असला तरीही प्रत्येक आंतरिक अनुभव हा त्याच्या स्वतःच्या पद्धतीने पूर्णपणे खरा असतो, अंतरात्मा आणि आंतरिक स्तरांच्या वास्तविकतेच्या साहाय्याने तो खरा ठरतो. आपण फक्त शरीरानेच जीवन जगत असतो किंवा केवळ बाह्य मन आणि प्राण यांच्या साहाय्यानेच जीवन जगत असतो असा विचार करणे चूक आहे. आपण सदासर्वकाळ चेतनेच्या इतर स्तरांमध्ये राहत असतो, तेथे कृती करत असतो, तेथे इतरांना भेटत असतो आणि त्यांच्यावर क्रिया करत असतो आणि आपण तेथे जे काही करतो, अनुभवतो आणि विचार करतो, तेथे ज्या शक्ती आपण गोळा करतो, तेथे ज्या परिणामांची आपण तयारी करतो त्या सगळ्याचे आपल्याला ज्ञात नसलेले, अगणित परिणाम आपल्या बाह्य जीवनावर होत असतात, त्यांचे मोल अमाप असते. त्यापैकी सर्वच अनुभव (ते सर्व प्रांत ओलांडून आपल्यापर्यंत) येत नाहीत आणि ते जरी येथवर आलेच तर ते जडभौतिकामध्ये येताना वेगळाच रूपाकार धारण करतात. कधीकधी त्यांच्यामध्ये अगदी तंतोतंत साम्य असते परंतु हे अल्पस्वल्प साम्य हा आपल्या बाह्यवर्ती अस्तित्वाचा पाया असतो. आपण या भौतिक, शारीरिक जीवनामध्ये जे काही करतो, जे काही धारण करतो, जे बनतो त्याची तयारी आपल्या अंतरंगामध्ये पडद्यामागे सुरू असते. आणि म्हणूनच जो योग जीवनाचे रूपांतरण हे आपले ध्येय म्हणून डोळ्यासमोर ठेवतो त्या योगामध्ये, या प्रांतांमध्ये काय सुरू असते याविषयी जागरूक होणे, आणि आपली नियती निर्धारित करणाऱ्या, तसेच आपली आंतरिक आणि बाह्य वृद्धी किंवा विनाश निर्धारित करणाऱ्या गुप्त शक्तींची जाणीव होण्यासाठी, त्यांचे ज्ञान होण्यासाठी आणि त्यांच्याशी व्यवहार करण्यासाठी सक्षम होणे, आणि तेथे प्रभुत्व संपादन करणे या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. जे ईश्वराशी सायुज्यता संपादन करू इच्छितात त्यांच्यासाठी देखील या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात, (कारण) त्यांच्याविना रूपांतरण अशक्य असते. (क्रमशः)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 217-218)

साधना, योग आणि रूपांतरण – ८४

(आरोहण आणि अवरोहण प्रक्रियेचे परिणाम काय घडून येतात हे कालच्या भागात आपण पाहिले.)

एकदा हे अवरोहण स्वाभाविक झाले की, श्रीमाताजींची ‘दिव्य शक्ती’ आणि त्यांची ‘ऊर्जा’ कार्य करू लागते, आणि आता ती केवळ वरून किंवा पडद्याआडूनच कार्य करते असे नव्हे तर ती खुद्द ‘आधारा’मध्येच सचेतरितीने कार्यरत होते आणि आधाराच्या अडीअडचणी, त्याच्या संभाव्यता या गोष्टी हाताळू लागते आणि ती ‘दिव्य शक्ती’च तुमची योगसाधना करू लागते.

आणि मग सरतेशेवटी, सीमा ओलांडण्याची वेळ येते. तेथे चेतना निद्रिस्त नसते किंवा तिच्यात घट झालेली नसते. कारण चेतना ही सदासर्वकाळ तेथे असतेच; फक्त आता ती चेतना बाह्यवर्ती आणि भौतिकातून निघून, बाह्यवर्ती गोष्टींना आपली द्वारे बंद करून घेते आणि अस्तित्वाचा भाग असणाऱ्या आंतरिक आत्म्यामध्ये आणि प्राणामध्ये प्रवेश करण्यासाठी काहीशी मागे सरकते. आणि तेथे चेतना अनेकानेक अनुभवांमधून प्रवास करते. यामधील काही अनुभव हे जागृतावस्थेमध्ये सुद्धा जाणवले पाहिजेत, आणि तसे ते जाणवू शकतात. कारण, आंतरिक अस्तित्व अग्रभागी येणे आणि आंतरिक अस्तित्वाची आणि प्रकृतीची जाणीव होण्यासाठी चेतनेने अंतरंगामध्ये प्रविष्ट होणे, या दोन्हीही प्रक्रिया आवश्यक असतात.

अनेक कारणांसाठी चेतनेची ही अंतराभिमुख प्रक्रिया अपरिहार्य असते. अभिव्यक्त होण्यासाठी अगदी अंशतः प्रयत्नशील असणारे आंतरिक अस्तित्व आणि बाह्य साधनभूत चेतना यांच्यामधला जो अडथळा आहे तो अडथळा मोडून पडण्यामध्ये किंवा किमान तो दूर होऊन, त्यातून पलीकडे जात येण्यामध्ये तिचा (अंतराभिमुख प्रक्रियेचा) प्रभाव दिसून येतो. त्यामुळे अनंत समृद्ध संभाव्यतेबाबत आणि अनुभूतीबाबत एक सचेत जाणीव भविष्यामध्ये निर्माण व्हावी आणि लोकं ज्याला चुकीने स्वतःचे संपूर्ण अस्तित्वच मानतात, त्या छोट्या, अगदी अंध आणि मर्यादित शारीरिक व्यक्तिमत्त्वाच्या पडद्याआड अलक्षितपणे पहुडलेल्या नवीन अस्तित्वाची आणि नव्या जीवनाची जाणीव (त्या लोकांना) भविष्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी तिचा प्रभाव कृतिशील असतो. (चेतनेने) अंतराभिमुख होत घेतलेली बुडी आणि या आंतरिक जगतामधून पुन्हा जागृतावस्थेमध्ये येणे या दरम्यान गहनतर, संपूर्ण आणि समृद्ध असणाऱ्या जाणिवेचा प्रारंभ होतो आणि ती जाणीव निरंतर विस्तार पावू लागते. (क्रमशः)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 217)

साधना, योग आणि रूपांतरण – ८३

(साधकाला चेतनेच्या आरोहणाचा आणि अवरोहणाचा अनुभव कसा प्रतीत होतो, हे कालच्या भागात आपण पाहिले.)

आरोहण प्रक्रियेचे (ascension) विविध परिणाम आढळून येतात. ही प्रक्रिया चेतनेला मुक्त करू शकते त्यामुळे तुम्ही शरीरामध्ये बंदिस्त नाही किंवा शरीराच्या वर आहात असा अनुभव तुम्हाला येतो, किंवा तुम्ही शरीरासह इतके विशाल होता की जणूकाही तुमचे शारीर-अस्तित्व उरतच नाही. किंवा तुम्ही म्हणजे तुमच्या मुक्त विशालतेमधील केवळ एक बिंदू आहात असा तो अनुभव असतो. त्यामुळे व्यक्तीला किंवा तिच्या एखाद्या घटकाला शरीरातून बाहेर पडता येते आणि तो घटक इतरत्र जाऊ शकतो. शरीरातून बाहेर पडून इतरत्र जाण्याच्या या कृतीसोबतच सहसा एक प्रकारच्या आंशिक समाधीची अन्यथा संपूर्ण योगतंद्रीची अवस्था येते. किंवा त्यामुळे चेतना सशक्त होऊ शकते. आता ती चेतना शरीरापुरतीच किंवा बाह्यवर्ती प्रकृतीच्या सवयींपुरतीच मर्यादित राहत नाही. त्याची परिणती चेतना अंतरंगामध्ये शिरण्यामध्ये, आंतरिक मानसिक गहनतांमध्ये प्रवेश करण्यामध्ये, तसेच चेतना आतंरिक प्राणामध्ये, आंतरिक सूक्ष्म देहामध्ये, अंतरात्म्यामध्ये प्रवेश करण्यामध्ये होते. त्यामुळे व्यक्ती स्वतःच्या अगदी आंतरतम चैत्य अस्तित्वाविषयी किंवा आंतरिक मानसिक, प्राणिक आणि सूक्ष्म शारीर अस्तित्वाविषयी सजग होते. त्यामुळे व्यक्ती प्रकृतीच्या घटकांशी संबंधित असणाऱ्या त्या त्या क्षेत्रांमध्ये, त्या स्तरांमध्ये, त्या जगतांमध्ये वास्तव्य करण्यास आणि तेथे वावरण्यास सक्षम होते.

कनिष्ठ चेतनेच्या या पुनःपुन्हा आणि नित्य होणाऱ्या आरोहणामुळे मन, प्राण आणि शरीर हे घटक अतिमानसिक स्तरापर्यंतच्या उच्चतर स्तरांच्या संपर्कात येण्यासाठी सक्षम होतात आणि त्या उच्चतर स्तरांच्या प्रकाशामुळे, त्यांच्या शक्तीमुळे आणि त्यांच्या प्रभावामुळे भारित होतात. आणि पुनःपुन्हा व नित्य होणारे ‘दिव्य चेतने’चे आणि तिच्या ‘ऊर्जे’चे हे अवरोहण हेच समग्र अस्तित्वाच्या आणि समग्र प्रकृतीच्या रूपांतरणाचे साधन असते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 216)