साधना, योग आणि रूपांतरण – १०२

चेतना ‘ईश्वरा’प्रत खुली करणे आणि प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवून आणणे हे साधनेचे उद्दिष्ट असते. ध्यान किंवा निदिध्यासन हा एक साधन आहे मात्र केवळ एक साधन, भक्ती हे दुसरे एक साधन आहे, तर कर्म हे आणखी एक साधन आहे. साक्षात्काराच्या दिशेने अवलंबण्यात आलेले पहिले साधन म्हणून योग्यांकडून ‘चित्तशुद्धीची साधना’ केली जात असे आणि त्यातून त्यांना संतांच्या संतत्वाची आणि ऋषीमुनींच्या निश्चलतेची, अचंचलतेची प्राप्ती होत असे. पण आम्ही प्रकृतीच्या ज्या रूपांतरणाविषयी सांगतो, ते यापेक्षाही काहीतरी अधिक आहे; आणि हे रूपांतरण केवळ निदिध्यासनाने (contemplation) साध्य होत नाही, त्यासाठी कर्म आवश्यक असते, कर्मामधील योग अनिवार्य असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 208)

साधना, योग आणि रूपांतरण – १०१

आजपर्यंत आपण ‘साधना, योग आणि रूपांतरण’ या मालिकेमध्ये ध्यान म्हणजे काय, एकाग्रता म्हणजे काय, या दोन्हीमध्ये काय फरक आहे, एकाग्रतेच्या विविध पद्धती कोणत्या, ध्यानामध्ये येणारे अडथळे कोणते आणि त्यावर कोणत्या मार्गांनी मात करता येते, समाधी – अवस्था म्हणजे काय, पारंपरिक योगमार्गातील समाधी आणि पूर्णयोगांतर्गत समाधी यामधील फरक, आत्मसाक्षात्कार म्हणजे काय इत्यादी विविध गोष्टी, त्यांचे बारकावे समजावून घेतले.

ध्यानाच्या मार्गाने उन्नत होत होत, समाधी-अवस्थेपर्यंत पोहोचणे हा साधनेचा केवळ एक मार्ग झाला. तो महत्त्वाचा असला तरी एकमेव नाही. पूर्णयोगांतर्गत साधना ही फक्त ध्यानापुरती सीमित नाही. तर ध्यानावस्थेत प्राप्त झालेली शांती, प्रेम, प्रकाश, ज्ञान, आनंद या साऱ्या गोष्टी बाह्य व्यवहारामध्येही उतरविणे येथे अभिप्रेत असते. आणि येथेच महत्त्वाची भूमिका असते ती कर्माची!

ध्यानासाठी दिवसाकाठी आपण किती वेळ देऊ शकतो ? फारफार तर तास-दोन तास. पण उरलेला सर्व वेळ आपण काही ना काही कर्म करत असतो. दैनंदिन व्यवहार करत असतो, उपजीविकेसाठी कामकाज करत असतो. ते करत असताना आपली वृत्ती कशी असते, आपली भूमिका कशी असते, आपण कोणत्या भावनेने कर्म करतो, कर्मफलाबाबत आपला दृष्टिकोन काय असतो, या व यासारख्या गोष्टींवरच कर्म हे ‘कर्मबंधन’ ठरणार की त्याचे पर्यवसान ‘कर्मयोगा’ मध्ये होणार हे अवलंबून असते.

पूर्णयोगामध्ये तर कर्माला विशेषच महत्त्व दिलेले आढळते. कारण या पार्थिव जीवनाचे ‘दिव्य जीवना’मध्ये रूपांतरण घडविणे हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट असते. या दृष्टीने, पूर्णयोगाच्या प्रकाशात, एक साधनामार्ग या दृष्टिकोनातून ‘कर्म-व्यवहारा’कडे पाहण्याचा प्रयत्न आपण येथून पुढच्या भागांमध्ये करणार आहोत.

संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक

साधना, योग आणि रूपांतरण – १००

पूर्णयोगाचा जो साधक ‘अवैयक्तिक, निर्गुण ब्रह्मा’पाशीच थांबतो तो त्यानंतर मात्र ‘पूर्णयोगाचा साधक’ असू शकत नाही. ‘अवैयक्तिक, निर्गुण साक्षात्कार’ हा स्वयमेव शांत ‘आत्म्याचा’, विशुद्ध ‘सत् चित् – आनंदा’चा साक्षात्कार असतो, ज्यामध्ये ‘सत्यमया’ची, ‘चैतन्यमया’ची, ‘आनंदमया’ची कोणतीही जाणीव नसते. हा साक्षात्कार ‘निर्वाणा’ कडे घेऊन जातो. आत्मसाक्षात्कार आणि निर्गुण सच्चिदानंदाचा साक्षात्कार ही जरी एक अत्यंत महत्त्वाची पायरी असली किंवा समग्र ज्ञानाचा तो जरी एक महत्त्वाचा भाग असला तरी समग्र ज्ञानाचा तो केवळ प्रारंभ असतो, सर्वोच्च साक्षात्काराचे ते अंतिम साध्य नसते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 393)

साधना, योग आणि रूपांतरण – ९९

ज्या विस्तीर्णतेमध्ये, नितांत स्थिर-प्रशांततेमध्ये आणि निरवतेमध्ये विलीन झाल्याची जाणीव तुम्हाला होत आहे त्यालाच ‘आत्मा’ किंवा ‘शांत-ब्रह्म’ असे संबोधले जाते. या आत्म्याचा किंवा शांत-ब्रह्माचा साक्षात्कार करून घेणे आणि त्यामध्ये जीवन व्यतीत करणे हेच अनेक योगमार्गांचे संपूर्ण ध्येय असते. परंतु ‘ईश्वर’-साक्षात्काराची आणि जिवाचे उच्चतर किंवा दिव्य ‘चेतने’मध्ये वृद्धिंगत होत जाणे, ज्याला आम्ही पूर्णयोगामध्ये ‘रूपांतरण’ असे संबोधतो त्याची, ही केवळ पहिली पायरी असते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 393)

साधना, योग आणि रूपांतरण – ९८

‘अधिमानस’ (overmind) किंवा ‘अतिमानसा’च्या (supermind) विकसनाच्या कितीतरी आधी ‘चैतन्या’चा साक्षात्कार होतो. प्रत्येक काळातल्या शेकडो साधकांना आजवर उच्चतर मानसिक पातळ्यांवर (बुद्धेः परत:) ‘आत्म’साक्षात्कार झालेला आहे पण त्यांना अतिमानसिक साक्षात्कार झालेला नाही. व्यक्तीला ‘आत्म्या’चा किंवा ‘चैतन्याचा किंवा ‘ईश्वरा’चा मानसिक, प्राणिक किंवा अगदी शारीरिक पातळीवरही ‘आंशिक’ साक्षात्कार होऊ शकतो आणि व्यक्ती जेव्हा मनुष्याच्या सामान्य मानसिक पातळीच्या वर उच्चतर आणि विशालतर मनामध्ये उन्नत होते तेव्हा, ‘आत्मा’ त्याच्या सर्व सचेत व्यापकतेनिशी प्रकट होऊ लागतो.

‘आत्म्या’च्या या व्यापकतेमध्ये संपूर्णतया प्रवेश केल्यामुळे मानसिक कृतींचा निरास होणे शक्य होते आणि व्यक्तीला आंतरिक ‘निश्चल-नीरवता’ लाभते. आणि मग त्यानंतर, व्यक्ती कोणत्याही प्रकारची कृती करत असली तरी तिच्यामधील ही आंतरिक ‘निश्चल-नीरवता’ तशीच टिकून राहते; व्यक्ती अंतरंगांतून निश्चलच राहते, साधनभूत अस्तित्वामध्ये कृती चालू राहते आणि मग भलेही ती कृती मानसिक असो, प्राणिक असो किंवा शारीरिक असो, या कृतीच्या अंमलबजावणीसाठी, आवश्यक असणाऱ्या सर्व चालना, प्रेरणा ‘आत्म्या’च्या या मूलभूत शांतीला आणि स्थिरतेला बाधा न आणता, उच्चतर स्त्रोताकडून व्यक्तीला मिळत राहतात.

‘अधिमानसिक’ आणि ‘अतिमानसिक’ अवस्था वर वर्णन केलेल्या अवस्थांपेक्षाही अधिक उच्च स्तरावरील असतात. परंतु तुम्हाला त्यांचे आकलन व्हायला हवे असेल तर, तुम्हाला आधी आत्म-साक्षात्कार झालेला असला पाहिजे, आध्यात्मिकीकरण झालेल्या मनाची आणि हृदयाची पूर्ण कृती तुमच्याकडून होत असली पाहिजे; चैत्य जागृती, बंदिस्त असलेल्या चेतनेची मुक्ती, आधाराचे शुद्धीकरण आणि त्याचे संपूर्ण उन्मीलन झालेले असले पाहिजे.

‘अधिमानस’, ‘अतिमानस’ या उच्चकोटीच्या गोष्टींचा आत्ताच विचार करू नका. तर मुक्त झालेल्या प्रकृतीमध्ये उपरोक्त अधिष्ठान निर्माण करण्याचा प्रयत्न करा.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 413)

साधना, योग आणि रूपांतरण – ९७

मन, प्राण आणि शरीर यांचे रूपांतरण करणारी शक्ती ही अतिमानसिक ‘शक्ती’ असते. ‘सच्चिदानंद’ चेतना – (विशुद्ध सत्-चित्-आनंद) जी सर्वच गोष्टींना निःपक्षपातीपणे आधार पुरवीत असते ती शक्ती रूपांतरण घडवीत नाही. परंतु ‘सच्चिदानंदा’ची अनुभूती आल्यानंतरच (बऱ्याच नंतरच्या टप्प्यावर) अतिमानसाप्रत आरोहण (ascent) आणि अतिमानसाचे अवरोहण (descent) शक्य होते. त्यासाठी प्रथम तुम्ही मानसिक, प्राणिक आणि शारीरिक रचनांच्या सर्वसामान्य मर्यादांपासून मुक्त झाले पाहिजे आणि मग ‘सच्चिदानंद’ शांती, स्थिरता, विशुद्धता आणि व्यापकता यांच्या अनुभूतीमुळे तुम्हाला ही मुक्ती लाभते.

शून्यावस्थेत (blank) निघून जाणे याच्याशी अतिमानसाचा काहीही संबंध नसतो. ‘मन’ आपल्या स्वतःच्या मर्यादा ओलांडून पलीकडे जात असताना आणि ते करण्यासाठी नकारात्मक व अचंचलतेचा मार्ग अनुसरत असताना, ते महाशून्यापर्यंत जाऊन पोहोचते. ‘मन’ हे अज्ञानी असल्यामुळे, परम’सत्या’मध्ये प्रवेश करण्यासाठी त्याला स्वतःचा निरास करावा लागतो, अथवा किमानपक्षी, तसे त्याला वाटते. मात्र अतिमानस हेच ‘सत्य-चेतना’ आणि ‘दिव्य-ज्ञान’ असल्यामुळे, परम ‘सत्या’मध्ये प्रवेश करण्यासाठी अतिमानसाला स्वतःचा निरास करावा लागत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 136)

साधना, योग आणि रूपांतरण – ९६

‘ईश्वरा’चा वैयक्तिक साक्षात्कार हा कधी ‘साकार’ असू शकतो तर कधी तो ‘निराकार’ असू शकतो. ‘निराकार’ साक्षात्कारात, चैतन्यमय ‘दिव्य पुरुषा’ ची ‘उपस्थिती’ सर्वत्र अनुभवास येते. तर ‘साकार’ साक्षात्कारामध्ये, उपासना ज्याला समर्पित केली जाते ‘त्या’च्या प्रतिमेनिशी तो साक्षात्कार होत असतो. भक्तासाठी किंवा साधकासाठी ‘ईश्वर’ नेहमीच स्वतःला सगुणसाकार रूपात आविष्कृत करू शकतो. तुम्ही ज्या रूपामध्ये त्याची उपासना करता किंवा ज्या रूपामध्ये त्याला शोधायचा प्रयत्न करता त्या रूपामध्ये तुम्हाला त्याचे दर्शन घडते किंवा तुमच्या आराधनेचे उद्दिष्ट असलेल्या ‘दिव्य व्यक्तिमत्त्वा’ला सुयोग्य असणाऱ्या अशा एखाद्या रूपामध्ये तुम्हाला त्याचे दर्शन घडू शकते.

‘ईश्वर’ कसा आविष्कृत होईल हे अनेकविध गोष्टींवर अवलंबून असते आणि त्यामध्ये इतकी विविधता असल्यामुळे कोणत्याही एकाच नियमामध्ये ते बसविता येत नाही. कधीकधी हृदयामध्ये तर कधी अन्य एखाद्या चक्रामध्ये साकार रूपातील ईश्वराचे दर्शन होऊ शकते, कधीकधी ईश्वर वर राहून तेथून तुम्हाला मार्गदर्शन करत आहे, अशा प्रकारे दर्शन घडू शकते. तर कधीकधी ‘ईश्वरा’चे दर्शन बाहेरच्या बाजूस, म्हणजे तुमच्या समोर जणू एखादी देहधारी व्यक्ती असावी तशा रूपात घडू शकते.

त्याचा फायदा असा की त्यामुळे तुमचा त्याच्याशी अगदी जिव्हाळ्याचा संबंध निर्माण होतो आणि तुम्हाला त्याचे नित्य मार्गदर्शन लाभू शकते. किंवा तुम्हाला जर अंतरंगामध्ये त्याचे दर्शन झाले किंवा त्याचा अनुभव आला तर, तुम्हाला त्याच्या नित्य ‘उपस्थिती’चा अगदी सशक्त आणि सघन साक्षात्कार होतो. परंतु यासाठी तुम्हाला तुमच्या आराधनेच्या आणि उपासनेच्या विशुद्धतेची पक्की खात्री असली पाहिजे. कारण देहधारी नातेसंबंधाच्या प्रकाराचा एक तोटाही असतो. तो असा की, इतर ‘शक्ती’ त्या रूपाचे सोंग घेऊ शकतात आणि त्याच्या आवाजाची, त्याच्या मार्गदर्शनाची नक्कल करू शकतात आणि जर त्याला रचलेल्या प्रतिमेची जोड दिली गेली (की जी खरी नसते,) तर त्याला अधिकच बळ मिळते. अनेक जणांची यामुळे दिशाभूल झालेली आहे. असे होण्याचे कारण म्हणजे त्यांच्यामध्ये अभिमान, प्रौढी आणि इच्छावासना प्रबळ होती. त्यामुळे त्यांच्यापासून अतिशय सूक्ष्म असा आंतरात्मिक अनुभव हिरावून घेण्यात आला, तो अनुभव मनोमय नव्हता. अशा वेळी एका क्षणात (तुम्हाला दिसलेल्या) श्रीमाताजींच्या प्रकाशाला या दिशाभूलीचे किंवा त्रुटींचे वळण लागू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 135-136)

साधना, योग आणि रूपांतरण – ९५

पूर्वीच्या प्रचलित योगमार्गांद्वारे जे आत्मशोध घेण्यासाठी प्रयत्नरत असतात ते स्वतःला मन, प्राण आणि शरीर यांपासून वेगळे करतात आणि त्या गोष्टींपासून वेगळे राहून, आत्म्याचा साक्षात्कार करून घेतात. मन, प्राण आणि शरीर यांना परस्परांपासून अलग करणे हे अगदीच सोपे असते, त्यासाठी अतिमानसाची गरज नाही. ते सर्वसाधारण योगमार्गांद्वारे केले गेले आहे. म्हणजे ते योग अक्षम आहेत किंवा या गोष्टी ते करू शकत नाहीत, असे नाही. ते या गोष्टी अतिशय परिपूर्ण रितीने करू शकतात. पण पूर्वीचे योगमार्ग आणि पूर्णयोग यामध्ये हा फरक आहे की, आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर पूर्वीचे योगमार्ग निर्वाण-स्थितीकडे किंवा कोणत्यातरी स्वर्गाकडे जातात आणि जीवनाचा त्याग करतात, परंतु पूर्णयोग मात्र जीवनाचा त्याग करत नाही.

आत्म्याप्रत पोहोचण्यासाठी अतिमानसाची आवश्यकता नसते, तर या पार्थिव अस्तित्वाचे आणि जीवनाचे रूपांतरण करण्यासाठी त्याची आवश्यकता असते. व्यक्तीने प्रथम आत्मसाक्षात्कार करून घेतला पाहिजे. तेव्हाच तिला अतिमानसाचा साक्षात्कार होऊ शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 35 : 305)

साधना, योग आणि रूपांतरण – ९४

अतिमानसामध्ये ‘ईश्वरा’शी जाणीवपूर्वक, सचेत रितीने एकत्व पावणे आणि प्रकृतीचे रूपांतरण करणे हे पूर्णयोगाचे ध्येय आहे.

सर्वसाधारण योगमार्ग ‘मना’कडून वैश्विक ‘नीरवते’च्या एखाद्या अलक्षण (featureless) स्थितीमध्ये थेट निघून जातात आणि त्याच्या माध्यमातून ऊर्ध्वमुख होत, ते ‘सर्वोच्च’ स्थितीमध्ये विलीन होण्याचा प्रयत्न करतात.

मनाच्या अतीत होणे आणि ‘सच्चिदानंदा’च्या ‘दिव्य सत्या’मध्ये, म्हणजे जे केवळ अचल, निर्गुण (static) नाही, तर जे गतिशील, सगुणदेखील (dynamic) आहे अशा सत्यामध्ये प्रविष्ट होणे आणि त्या ‘सत्या’मध्ये स्वतःचे समग्र अस्तित्व उन्नत करणे, हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 412)

साधना, योग आणि रूपांतरण – ९३

“व्यक्तीने नेहमी तिच्या अनुभवांपेक्षा अधिक महान असले पाहिजे.”

म्हणजे मला असे म्हणायचे आहे की, तुम्हाला आलेल्या अनुभवाचे स्वरूप कोणतेही असले, त्याचे सामर्थ्य किंवा त्याची अद्भुतता कितीही असली तरी, त्या अनुभवाचा तुमच्यावर वरचष्मा असता कामा नये. म्हणजे त्यामुळे तुमचा तोल ढळता कामा नये आणि तुमच्या योग्य आणि स्थिरशांत दृष्टिकोनाबरोबर असलेला तुमचा संपर्कही ढळता कामा नये. म्हणजे, त्याने तुमच्या समग्र अस्तित्वाचे नियंत्रण करता कामा नये. इतके तुम्ही त्याच्या आधीन होता कामा नये.

म्हणजे असे की, जेव्हा तुम्ही तुमच्यापेक्षा अधिक बलवान असलेल्या एखाद्या शक्तीच्या किंवा चेतनेच्या संपर्कात येता तेव्हा, या चेतनेचे किंवा त्या शक्तीचे तुमच्यावर पूर्णपणे वर्चस्व चालवू देण्याऐवजी, तुम्ही स्वतःला नेहमी याची आठवण करून दिली पाहिजे की, शेकडो-हजारो अनुभवांमधील हा केवळ एक अनुभव आहे आणि परिणामी, त्याचे स्वरूप परिपूर्ण नाही, तर ते सापेक्ष आहे. (त्यामुळे) आलेला अनुभव कितीही सुंदर असला तरी, तुम्हाला त्याहूनही सुंदर असे अनुभव येऊ शकतात आणि आलेही पाहिजेत. तो अनुभव कितीही अपवादात्मक असेना का, त्याहूनही अधिक उत्कृष्ट अनुभव असतात. तुम्हाला आलेला तो अनुभव कितीही उच्च असेना का, तुम्ही भविष्यामध्ये नेहमीच त्याहून अधिक उच्चतर अनुभवाप्रत पोहोचू शकता. आणि अशा प्रकारे, त्याचा अहंकार होऊ न देता, तो अनुभव म्हणजे विकसनाच्या साखळीतील एक अनुभव आहे, या दृष्टीने तुम्ही त्याच्याकडे पाहता आणि एक निरामय शारीरिक संतुलन कायम ठेवू शकता. आणि त्यामुळे सामान्य जीवनाबरोबर असलेली सापेक्षतेची जाणीवही तुम्ही गमावत नाही. तुम्ही अशा प्रकारे वागलात, तर मग कोणताही धोका असत नाही. हे कसे करायचे असते हे ज्याला माहीत असते त्याला तसे करणे नेहमीच अगदी सोपे वाटते, परंतु हे कसे करायचे असते हे ज्याला माहीत नसते त्याला ते काहीसे अवघड वाटू शकते. हे करण्याचा एक मार्ग आहे.

ईश्वरी कृपा म्हणजे परमेश्वराची अभिव्यक्ती आहे. त्या कृपेप्रति संपूर्ण आत्मदान ही जी संकल्पना आहे ती कधीही विस्मरणात जाता कामा नये. तुम्ही जेव्हा स्वतःला ईश्वराप्रति देऊ करता, तुम्ही जेव्हा समर्पित होता; सर्वातीत, सर्व निर्मितीच्या अतीत असणाऱ्या त्या ईश्वराच्या हाती जेव्हा तुम्ही स्वतःला संपूर्णपणे सोपविता, आणि त्या अनुभवापासून काही वैयक्तिक लाभ मिळवू पाहण्याऐवजी, तुम्ही ईश्वरी कृपेला तो अनुभव अर्पण करता आणि तो अनुभव हा ईश्वराकडून आलेला आहे आणि त्याचे फल तुम्ही त्यालाच परत केले पाहिजे हे जाणता तेव्हा, तुम्ही बऱ्यापैकी सुरक्षित असता.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, कोणतीही महत्त्वाकांक्षा नको, प्रौढी नको, किंवा अभिमानदेखील नको. तुमच्यापाशी प्रामाणिक आत्मदान, प्रामाणिक विनम्रता असेल तर तुम्ही सर्व संकटांपासून सुरक्षित असता. “व्यक्तीने तिच्या अनुभवांपेक्षा अधिक महान असले पाहिजे” असे मी जेव्हा म्हणते तेव्हा मला हा अर्थ अभिप्रेत असतो.

– श्रीमाताजी (CWM 08 : 277-278)