साधना, योग आणि रूपांतरण – १५
प्रश्न : एखादी व्यक्ती जितके अधिक तास ध्यान करेल, तेवढ्या प्रमाणात तिची प्रगती अधिक होईल, हे खरे आहे ना?
श्रीमाताजी : ध्यानामध्ये व्यतीत केलेले तास हा काही आध्यात्मिक प्रगतीचा पुरावा होऊ शकत नाही. परंतु ध्यान करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागत नसेल तर ती मात्र तुमच्या आध्यात्मिक प्रगतीची खूण असते.
(खरी प्रगती होते तेव्हा,) खरंतर तुम्हाला ध्यान थांबविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात; ध्यान थांबविणे अवघड असते; ‘ईश्वरा’संबंधीचे विचार थांबविणेही अवघड असते; सामान्य चेतनेमध्ये उतरणेदेखील अवघड असते. आणि असे तुमच्याबाबतीत घडत असेल तर तेव्हा तुम्ही प्रगतीची खात्री बाळगू शकता.
‘ईश्वरा’वर एकाग्रता करणे ही जेव्हा तुमच्यासाठी जीवनावश्यक गोष्ट झालेली असेल, आणि तुम्ही त्याशिवाय जगू शकणार नाही (अशी तुमची अवस्था झाली असेल तर आणि), तुम्ही कशामध्येही गुंतलेले असाल तरीही जर ती अवस्था रात्रंदिन सातत्याने टिकून राहत असेल तर, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने प्रगती केली आहे, असे म्हणता येईल. तुम्ही ध्यान करत असाल किंवा इकडेतिकडे फिरत असाल, काही करत असाल, काही काम करत असाल, तेव्हा तुम्हाला आवश्यकता असते ती ‘चेतने’ची. ‘ईश्वरा’ची सातत्याने जाणीव असणे हीच एकमेव आवश्यक गोष्ट असते.
– श्रीमाताजी (CWM 03 : 19-20)
- संपूर्ण आणि समग्र ईश्वराधीनता - February 1, 2025
- भारत हाच जगातील असा एकमेव देश आहे… - January 26, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २३२ - January 24, 2025