साधना, योग आणि रूपांतरण – १६३

पूर्णयोगांतर्गत भक्ती

पूर्णयोगांतर्गत भक्तिमार्ग सात अवस्थांमधून प्रगत होत राहतो. आधीच्या अवस्थेतून पुढच्या अवस्थेत अशा रीतीने तो प्रगत होतो.

त्या सात अवस्था पुढीलप्रमाणे – अभीप्सा आणि आत्म-निवेदन ही पहिली अवस्था. दुसरी अवस्था म्हणजे भक्ती. पूजाअर्चा व आराधना ही तिसरी अवस्था. प्रेम ही चौथी अवस्था. ‘ईश्वरा’कडून व्यक्तीच्या समग्र अस्तित्वाचा आणि जीवनाचा ताबा घेतला जाणे ही पाचवी अवस्था. ‘ईश्वरी प्रेमा’चा हर्ष आणि ‘ईश्वरा’चे सौंदर्य व माधुर्य ही सहावी पायरी आणि ‘परमेश्वरा’चा ‘परम आनंद’ ही सातवी अवस्था.

श्रद्धा ही आपली पहिली गरज असते. कारण ‘ईश्वरा’वरील श्रद्धेविना, जीवनावरील श्रद्धेविना आणि ‘ईश्वरी अस्तित्वा’च्या सर्व-महत्तेवरील श्रद्धेविना, अभीप्सा बाळगणे किंवा समर्पित होणे याला कारणच उरत नाही. श्रद्धा नसेल तर त्या अभीप्सेमध्ये कोणतीही ताकद किंवा समर्पणाच्या पाठीशी कोणतीही शक्ती असू शकणार नाही. व्यक्तीकडे जर मध्यवर्ती आणि मूलभूत स्वरूपाची दृढ श्रद्धा असेल तर तिच्या मनात शंका असल्या तरी त्याने फारसा फरक पडत नाही. शंका येऊ शकतात पण अस्तित्वाच्या केंद्रस्थानी असलेल्या श्रद्धारूपी शिळेपुढे त्यांचा टिकाव लागू शकत नाही. श्रद्धारूपी ही शिळा कदाचित शंकारूपी आणि निराशारूपी कल्लोळांमुळे, लाटांमुळे काही काळासाठी झाकल्यासारखी होईल पण (त्या लाटा ओसरल्या की मग) ती शिळा जशीच्या तशी अचल आणि अभेद्य रूपात उभी असल्याचे आढळून येईल.

हृदयामध्ये, जेथे चैत्य पुरुषाचा निवास असतो तेथे म्हणजे आंतरिक हृदयामध्ये ही श्रद्धा असते. बाह्य हृदय हे प्राणिक अस्तित्वाचे, जीवनामधील व्यक्तिमत्त्वाचे स्थान असते. शंका या मनामधून, प्राणामधून आणि शारीरिक चेतनेमधून निर्माण होतात. मनाप्रमाणेच प्राणिक अस्तित्वाचादेखील ‘ईश्वरा’वर विश्वास बसू शकतो किंवा उडू शकतो. आंतरात्मिक अग्नी जितका प्रखर असेल तेवढ्या प्रमाणात मन, प्राण आणि शारीर-चेतनेला मलीन आणि अंधकारमय करून टाकण्याऱ्या शंकेची तीव्रता कमी असेल.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 347-348)

साधना, योग आणि रूपांतरण – १६२

पूर्णयोगांतर्गत भक्ती

पूजाअर्चा करणे हे भक्तिमार्गावरील केवळ पहिले पाऊल आहे. जेव्हा बाह्य पूजाअर्चा ही आंतरिक आराधनेमध्ये परिवर्तित होते तेव्हा खऱ्या भक्तीचा आरंभ होतो. ती अधिक सखोल होते आणि दिव्य प्रेमाच्या उत्कटतेमध्ये तिचे परिवर्तन होते. त्या प्रेमामधून आपल्याला ‘ईश्वरा’शी असलेल्या आपल्या जिव्हाळ्याच्या नात्यातील हर्षाचा अनुभव येऊ लागतो आणि हा समीपतेचा हर्ष नंतर एकत्वाच्या आनंदामध्ये रूपांतरित होतो.
*
भक्तिमार्गाची पहिली अवस्था सारांशरूपाने सांगायची झाली तर तीन शब्दांत तिचे वर्णन करता येईल. श्रद्धा, पूजाअर्चा, आज्ञापालन.
आराधना, आनंद, आत्मदान या तीन शब्दांत भक्तिमार्गाच्या दुसऱ्या अवस्थेचे वर्णन सारांशरूपाने करता येईल.
प्रेम, परमानंद, समर्पण या तीन शब्दांत भक्तिमार्गाच्या तिसऱ्या अवस्थेचे वर्णन सारांशरूपाने करता येईल.

– श्रीअरविंद (CWSA 24 : 549) & (CWSA 12 : 348)

साधना, योग आणि रूपांतरण – १६१

पूर्णयोगांतर्गत भक्ती

कार्यासाठी प्राणिक ऊर्जा आवश्यक असते. अर्थात योगासाठी तिचा पूर्णत: उपयोग करून घेण्यासाठी आणि तिच्या शक्तीचा कृतीसाठी उपयोग करून घेण्यासाठी, अहंकार हळूहळू नाहीसा झाला पाहिजे आणि प्राणिक आसक्ती व आवेग यांची जागा आध्यात्मिक प्रेरणांनी घेतली गेली पाहिजे. या परिवर्तनास कारणीभूत ठरणाऱ्या साधनांपैकी भक्ती, ईश्वराची आराधना आणि ईश्वराबद्दलचा सेवाभाव या साधनांची गणना सर्वाधिक प्रभावी साधनांमध्ये होते.
*
अहंकारापासून मुक्ती ही आध्यात्मिकदृष्ट्या मौलिक गोष्ट आहे. कारण त्यामुळे व्यक्ती स्वतःच्या वैयक्तिक ‘स्व’मध्येच केंद्रित न होता, ‘ईश्वरा’मध्ये केंद्रित होते आणि भक्तीसाठी ही आवश्यक अशी स्थिती असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 245–246 & 95)

साधना, योग आणि रूपांतरण – १६०

पूर्णयोगांतर्गत भक्ती

(एखाद्या समस्येवर अंतरंगातून उत्तर कसे मिळवावे हा प्रश्न श्रीअरविंदांना विचारला आहे, असे दिसते. त्याला श्रीअरविंदांनी दिलेले उत्तर…)

आंतरिक जाणिवेबद्दल सांगायचे तर, व्यक्ती अंतरंगामध्ये किती खोलवर शिरू शकते यावर ती जाणीव अवलंबून असते. कधीकधी भक्तीमुळे किंवा अन्य काही कारणामुळे चेतना जसजशी सखोल, गभीर होत जाते तसतशी आंतरिक जाणीव स्वतःहून निर्माण होते. कधीकधी ती सरावाने वा अभ्यासाने निर्माण होते. म्हणजे, प्रत्येक गोष्ट अंतरंगामध्ये निवेदित करायची आणि त्याला मिळणारे उत्तर ऐकायची सवय करायची. अशी सवय केल्यामुळे, अशा प्रकारच्या सरावामुळेसुद्धा कधीकधी आंतरिक जाणीव निर्माण होते. ‘ऐकायचे’ असे मी म्हणालो, पण अर्थातच हे एक रूपक आहे; पण अन्यथा त्याविना हे शब्दांत व्यक्त करणे अवघड आहे. म्हणजे अंतरंगातून येणारे उत्तर हे शब्दरूपात किंवा ध्वनीरूपातच मिळेल असे नाही. अर्थात, काहींच्या बाबतीत आणि कधीकधी ते शब्दरूपातही मिळू शकते, ती जाणीव कोणतेही रूप घेऊ शकते.

योग्य उत्तर कोणते याची निश्चिती कशी करायची ही अनेकांच्या बाबतीत मुख्य अडचण असते. यासाठी सद्गुरूच्या चेतनेशी आंतरिक संपर्क साधता आला पाहिजे आणि ही गोष्ट भक्तीद्वारे उत्तम रीतीने साध्य होते. अन्यथा, अभ्यासाद्वारे अंतरंगामधून योग्य उत्तराची जाणीव करून घेण्याचा प्रयत्न करणे ही एक अतिशय नाजूक व कठीण बाब होऊन बसते. त्यामध्ये पुढील अडथळे येऊ शकतात.

१) प्रत्येक गोष्टीसाठी केवळ बाह्य साधनांवर विसंबून राहण्याची (व्यक्तीची) सामान्य सवय.
२) अहंकार! हा अहंकार योग्य उत्तराच्या ऐवजी स्वतःचे (स्वतःस अनुकूल असे) पर्याय सुचवितो.
३) मानसिक कृती.
४) (आपल्यामध्ये) शिरू पाहणाऱ्या अनिष्ट गोष्टी.

मला वाटते याबाबतीत तुम्ही अधीर होण्याची गरज नाही. आंतरिक चेतनेच्या प्रगतीवर विश्वास ठेवा.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 261)

साधना, योग आणि रूपांतरण – १५९

पूर्णयोगांतर्गत भक्ती

(मानवी स्तरावरील सामान्य प्रेम आणि दिव्य प्रेम यातील फरक येथे स्पष्ट केला आहे.)

प्रेम हे शुष्क, भावनारहित असू शकत नाही. कारण अशा प्रकारचे प्रेम अस्तित्वातच नसते, आणि श्रीमाताजी ज्या प्रेमाविषयी सांगतात ते प्रेम ही एक अगदी विशुद्ध, अचल आणि नित्य गोष्ट असते. …ते प्रेम सूर्यप्रकाशासारखे स्थिर, सर्वसमावेशक, स्वयंभू असते.

वैयक्तिक असे दिव्य प्रेम सुद्धा असते. परंतु ते व्यक्तिगत मानवी प्रेमाप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीकडून मिळणाऱ्या परतफेडीवर अवलंबून नसते. ते वैयक्तिक असते पण अहंभावात्मक नसते. एका सत् अस्तित्वाकडून (real being) दुसऱ्या सत् अस्तित्वाकडे ते प्रवाहित होत असते. पण तसे प्रेम लाभण्यासाठी, (व्यक्ती) सामान्य मानवी दृष्टिकोनातून मुक्त होणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 344-345)

साधना, योग आणि रूपांतरण – १५८

पूर्णयोगांतर्गत भक्ती

भक्तीने व्याकुळ होऊन अश्रुधारा वाहू लागतात त्याविषयी श्रीअरविंद एका पत्रात लिहितात की, आंतरिक अभीप्सेमुळे जेव्हा अश्रू येतात तेव्हा त्या अश्रूंना रोखून धरण्याची काहीही आवश्यकता नाही. परंतु जर ते प्राणिक असतील, वरपांगी असतील, अगदी वरवरचे असतील तर तेव्हा मात्र ते अश्रू म्हणजे भावनिक अव्यवस्थेची आणि क्षोभाची कृती ठरते. प्रार्थनेच्या उत्कटतेला अजिबात नकार देऊ नये; अशाप्रकारची प्रार्थना ही योगसाधनेच्या सर्वात शक्तिशाली माध्यमांपैकी एक असते.
*
फक्त सामान्य प्राणिक भावनांमुळेच (vital emotions) शक्तिव्यय होतो आणि त्यामुळे तुमची एकाग्रता आणि शांती भंग पावते, म्हणून अशा प्राणिक भावनांना प्रोत्साहन देता कामा नये. मुळात भावना ही काही वाईट गोष्ट नाही; भावना म्हणजे प्रकृतीचा एक आवश्यक भाग आहे आणि आंतरात्मिक भावना (psychic emotion) ही तर साधनेला साहाय्यकारी होणाऱ्या गोष्टींमधील एक सर्वात प्रभावशाली गोष्ट आहे. आंतरात्मिक भावनेमुळे ‘ईश्वरा’ बद्दलच्या प्रेमामुळे अश्रू येतात किंवा कधी आनंदाश्रू येतात; असे अश्रू अडवता कामा नयेत. त्यामध्ये प्राणिक भावनांची भेसळ झाली तर मात्र साधनेमध्ये अडथळा निर्माण होतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 362), (CWSA 29 : 351)

साधना, योग आणि रूपांतरण – १५७

पूर्णयोगांतर्गत भक्ती

…प्रेम आणि भक्ती या गोष्टी जर अधिक प्राणप्रधान (Vital) असतील तर, आनंददायी आशा-अपेक्षा आणि विरह, अभिमान आणि नैराश्य या गोष्टींमध्ये दोलायमान परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रेम आणि भक्तीचा मार्ग जवळचा न राहता, प्रदीर्घ आणि वळणावळणाचा होतो. ईश्वराकडे धाव घेण्याऐवजी, त्याच्याकडे थेट झेपावण्याऐवजी, व्यक्ती स्वतःच्या अहंकाराच्याच भोवती घुटमळत राहण्याची शक्यता असते.
*
प्रेम, शोक, दुःख, निराशा, भावनिक आनंद इत्यादी भावनांमध्ये गुंतून पडणे आणि त्यावर एक प्रकारचा मानसिक-प्राणिक अतिरिक्त भर देणे याला ‘भावनाविवशता’ असे म्हटले जाते. अगदी उत्कट अशा भावनेमध्येही एक प्रकारची स्थिरशांतता, एक नियंत्रण, शुद्धीकारक संयम आणि मर्यादा असली पाहिजे. व्यक्तीने स्वतःच्या भावना, संवेदना यांच्या अधीन असता कामा नये; तर नेहमीच स्वतःचे स्वामी असले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 212), (CWSA 29 : 351)

साधना, योग आणि रूपांतरण – १५६

पूर्णयोगांतर्गत भक्ती

‘देवा’वर श्रद्धा असणे, ‘देवा’वर भरवसा ठेवणे, ‘दिव्य शक्ती’ला समर्पण व आत्मदान करणे या आवश्यक, अनिवार्य गोष्टी आहेत. पण ‘देवा’वरील भरवसा हा, कनिष्ठ प्रकृतीच्या आवेगांच्या अधीन होण्याचे, किंवा दुर्बलता, निरुत्साह यासाठीचे निमित्त ठरता कामा नये. ‘दिव्य सत्या’च्या मार्गामध्ये जे काही आड येईल त्या सर्वांना सातत्याने नकार देत आणि अथक अभीप्सा बाळगत विश्वासाने मार्गक्रमण केले पाहिजे.

‘ईश्वरा’प्रत समर्पण हे, स्वतःच्या इच्छांच्या, कनिष्ठ गती-प्रवृत्तींच्या अधीन होण्याचे, किंवा स्वतःच्या अहंकाराच्या अधीन होण्याचे किंवा ‘ईश्वरा’चे मायावी रूप धारण केलेल्या, अज्ञान व अंधकाराच्या कोणत्यातरी शक्तींच्या अधीन होण्याचे एक कारण, एक निमित्त होता उपयोगाचे नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 87)

साधना, योग आणि रूपांतरण – १५५

पूर्णयोगांतर्गत भक्ती

माणसं ज्याला ‘प्रेम’ समजतात त्या प्रेमामध्ये सहसा प्राणिक भावना मिसळलेल्या असतात. ‘ईश्वरा’भिमुख झालेले प्रेम हे तशा प्रकारचे प्रेम असता कामा नये. कारण ते प्रेम हे प्रेमच नसते; तर ती केवळ एक प्राणिक कामना, वासना असते; एक प्रकारची स्वीकृतीची सहजवृत्ती असते; ती मालकीची आणि एकाधिकाराची प्रेरणा असते. असे प्रेम हे दिव्य प्रेम तर नसतेच; पण एवढेच नव्हे तर, योगमार्गामध्ये त्याच्या अंशभागाचीही भेसळ होऊ देता कामा नये.

‘ईश्वरा’बद्दल वाटणाऱ्या प्रेमामध्ये आत्मदान असते, ते कोणत्याही मागणीपासून मुक्त असते; ते शरणागती आणि समर्पणाने परिपूर्ण असते; ते कोणतेही हक्क गाजवत नाही; ते कोणत्याही अटी लादत नाही; ते कोणताही सौदा करत नाही; मत्सर, अभिमान वा राग यांच्या उद्रेकामध्ये ते गुंतून पडत नाही, कारण या गोष्टी त्याच्या घडणीतच नसतात. परिणामतः ‘दिव्य माता’ देखील (अशा प्रेमाखातर) स्वतःलाच देऊ करते, अगदी मुक्तहस्ते! आणि आंतरिक वरदानामध्ये ती गोष्ट प्रतिबिंबित होत असते. ‘दिव्य माते’ चे अस्तित्व तुमच्या मनामध्ये, तुमच्या प्राणामध्ये, तुमच्या शारीरिक चेतनेमध्ये प्रतिबिंबित झालेले दिसते. तिची शक्ती तुमच्या अस्तित्वाच्या सर्व गतिविधी हाती घेऊन, त्यांना पूर्णत्व आणि परिपूर्तीच्या दिशेने घेऊन जात, दिव्य प्रकृतीमध्ये तुमची पुनर्घडण करते. (तेव्हा) तिच्या प्रेमाने तुम्हाला कवळून घेतले आहे आणि ती स्वतः तुम्हाला तिच्या बाहुंमध्ये घेऊन, ‘ईश्वरा’कडे घेऊन जात आहे असे तुम्हाला जाणवते. अगदी तुमच्या जडभौतिक अंगांमध्येसुद्धा तुम्हाला याची जाणीव व्हावी आणि तिने त्यांना आपलेसे करावे अशी अभीप्सा तुम्ही बाळगली पाहिजे. आणि इथे मात्र कोणतीही मर्यादा असत नाही, ना काळाची ना समग्रतेची!

जर व्यक्तीने खरोखर अशी अभीप्सा बाळगली आणि जर ती तिला साध्य झाली तर, इतर कोणत्याही मागण्यांना किंवा अपूर्ण राहिलेल्या इच्छावासनांना जागाच असता कामा नये. आणि व्यक्तीने खरोखरच जर अशी अभीप्सा बाळगली तर, आणि व्यक्ती जसजशी अधिकाधिक शुद्ध, पवित्र होत जाईल, तसतशी निश्चितपणे व्यक्तीला ती गोष्ट अधिकाधिक साध्य होईलच. आणि आवश्यक असणारा बदल तिच्या प्रकृतीमध्ये घडून येईलच. कोणतेही स्वार्थी हक्क आणि इच्छा यांच्यापासून मुक्त असे तुमचे प्रेम असू द्या; मग जेवढी तुमची क्षमता आहे, जेवढे तुम्ही ग्रहण करू शकता, तेवढे सर्व प्रेम प्रतिसादरूपाने तुम्हाला मिळत आहे; असे तुम्हाला आढळेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 338-339)

साधना, योग आणि रूपांतरण – १५४

पूर्णयोगांतर्गत भक्ती

साधक : श्रीअरविंदांनी असे सांगितले आहे की, व्यक्ती मानवी प्रेमाकडून दिव्य प्रेमाकडे वळू शकते.

श्रीमाताजी : जे मानवी प्रेम ‘भक्ती’ म्हणून, ‘ईश्वर’विषयक भक्तीची ‘शक्ती’ म्हणून आविष्कृत होते त्या प्रेमाविषयी श्रीअरविंद सांगत होते. ते म्हणतात, सुरुवातीला ईश्वराबद्दलचे प्रेम हे अगदी मानवी स्तरावरील प्रेम असते, आणि त्यामध्ये मानवी प्रेमाची सर्व गुणवैशिष्ट्यं दिसून येतात. ती गुणवैशिष्ट्यंसुद्धा श्रीअरविंदांनी खूप चांगल्या रीतीने स्पष्ट केली आहेत. (भलेही तुमचे प्रेम सुरुवातीला मानवी स्तरावरील असेल पण जर) तुम्ही चिकाटी बाळगलीत आणि आवश्यक ते प्रयत्न केलेत तर, तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्याशी एकात्म पावून त्यायोगे, मानवी स्तरावरील प्रेमाचे दिव्य प्रेमामध्ये रूपांतर करणे अशक्य मात्र नाही. दोन व्यक्तींमधील प्रेमाचे परिवर्तन ईश्वरी प्रेमामध्ये होऊ शकते, असे श्रीअरविंदांनी म्हटलेले नाही.

कोणा एका व्यक्तीने त्यांना भक्तीसंबंधी, साधकाला ‘ईश्वरा’बद्दल जे प्रेम असते त्याविषयी एकदा काही विचारले होते तेव्हा त्यांनी असे सांगितले होते की, सुरुवातीला तुमचे प्रेम हे पूर्णपणे मानवी स्तरावरील असते. ते तर असेही म्हणाले होते की, कधीकधी तर ते प्रेम अगदी व्यावहारिक देवाणघेवाण या प्रकारचेसुद्धा असते. परंतु तुम्ही जर प्रगती केलीत तर, तुमच्या प्रेमाचे ‘दिव्य’ प्रेमामध्ये, खऱ्या भक्तीमध्ये परिवर्तन होऊ शकते.

– श्रीमाताजी (CWM 06 : 174-175)