साधना, योग आणि रूपांतरण – १७२

मूलत: सर्व प्रकारचे योग म्हणजे आपली चेतना उन्नत करणे किंवा अधिक सखोल करणे होय. असे केल्यामुळे आपली चेतना ही, आपल्या सामान्य चेतनेच्या आणि आपल्या सामान्य ‘प्रकृती’च्या अतीत असणाऱ्या गोष्टींसाठी सक्षम होऊ शकेल.

योग म्हणजे आपल्या आंतरिक सखोलतेमध्ये प्रवेश करणे, आपल्या वर असणाऱ्या उत्तुंगतेप्रत आरोहण करणे, (आपल्या सीमित चेतनेच्या) पलीकडे असलेली चेतना व्यापक करणे. किंवा आपल्या आंतरिक सखोलतेशी, आपल्या वर असणाऱ्या उत्तुंगतेशी, आपल्या अतीत असणाऱ्या व्यापकतेशी ‘संपर्क साधणे’ म्हणजे योग. त्यांच्या महान प्रभावाप्रत, महान अस्तित्वांप्रत, त्यांच्या गतिप्रवृत्तींबाबत ‘खुले असणे’ किंवा आपल्या पृष्ठवर्ती चेतनेमध्ये आणि आपल्या अस्तित्वामध्ये त्यांचा ‘स्वीकार करणे’ म्हणजे योग. त्यामुळे आपल्या बाह्य अस्तित्वाचे परिवर्तन होईल, आपल्या अस्तित्वाला तो आत्मा कवळून घेईल आणि त्याची सत्ता आपल्या बाह्य अस्तित्वावरील देखील प्रस्थापित होऊ लागेल.

आपण ज्या ब्रह्माचा (Reality) शोध घेऊ इच्छितो ते ब्रह्म आपल्या पृष्ठभागावर नसते किंवा जर ते तिथे असलेच तर ते अवगुंठित झालेले असते, झाकलेले (Concealed) असते. आपल्या आवाक्यात असलेल्या चेतनेपेक्षा अधिक गहनतर, उच्चतर किंवा व्यापकतर चेतनाच तेथे पोहोचू शकते, त्याला स्पर्श करू शकते, त्याचे ज्ञान करून घेऊ शकते आणि ते ब्रह्म प्राप्त करून घेऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 327-328)

साधना, योग आणि रूपांतरण – १७१

योग हे असे एक माध्यम आहे की, ज्याद्वारे व्यक्ती आंतरिक साधनेच्या माध्यमातून, वस्तुमात्रांमागील ‘सत्या’च्या एकत्वापर्यंत येऊन पोहोचते; त्याद्वारे आपल्याला, बहिर्वर्ती आणि वरपांगी चेतनेकडून आंतरिक आणि खऱ्याखुऱ्या चेतनेप्रत नेले जाते. योग-चेतना ही बाह्य, व्यक्त विश्वाचे ज्ञान वर्ज्य करत नाही तर उलट, ती विश्वाकडे अंतर्दृष्टीने पाहते. ती त्याकडे बाह्य दृष्टीने पाहत नाही किंवा त्याचा बाह्यात्कारी अनुभवही घेत नाही; तर ती योग-चेतना आंतरिक, सखोल, महत्तर, सत्यतर चेतनेच्या प्रकाशात बाह्य विश्वाला त्याचे योग्य ते मूल्य प्रदान करते, त्यात बदल घडविते. आणि त्याला ‘सद्वस्तुचा कायदा’ (Law of the reality) लागू करते; प्राणिमात्रांच्या ‘अज्ञाना’च्या कायद्याच्या जागी दिव्य ‘संकल्पा’चा आणि ‘ज्ञाना’चा कायदा प्रस्थापित करते. चेतनेमधील बदल हाच योगप्रक्रियेचा समग्र अर्थ आहे.

*

योग हे एक शास्त्र आहे, ती एक प्रक्रिया आहे; योग हा असा प्रयत्न आणि अशी कृती आहे की ज्यायोगे, मनुष्य त्याच्या सामान्य मानसिक जाणिवेच्या मर्यादा उल्लंघून, महत्तर अशा आध्यात्मिक चेतनेप्रत जाण्याचा प्रयत्न करतो.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 327)

साधना, योग आणि रूपांतरण – १७०

सर्व प्रकारचे योगमार्ग ही मूलतः माध्यमे आहेत. ती आपल्याला आपल्या अज्ञानी व सीमित पृष्ठवर्ती चेतनेतून – तिने आत्ता आपल्यापासून झाकून ठेवलेल्या – आपल्या अधिक विशाल व सखोल ब्रह्मामध्ये आणि जगतामध्ये प्रविष्ट होण्यासाठी तसेच परम व समग्र ‘सत्’मध्ये प्रविष्ट होण्यासाठी उपयुक्त ठरतात.

प्रत्येक वस्तुच्या मुळाशी ‘ब्रह्म’ आहे, किंबहुना ते प्रत्येक वस्तुला व्यापून आहे. किंबहुना, आपण ज्या पद्धतीने या जगाकडे पाहतो त्यापेक्षा काहीशा निराळ्या पद्धतीने पाहिल्यास सर्वकाही ‘ब्रह्म’ आहे; आपल्या विचारांच्या, जीवनाच्या आणि कृतींच्या द्वारे आपण चाचपडत त्या ब्रह्माच्या दिशेने वाटचाल करत असतो; आपल्या धर्माच्या आणि तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून त्याचे आकलन करून घेण्याचा, त्याच्याप्रत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि अंतिमत: आपण थेटपणे एखाद्या आंशिक किंवा एखाद्या संपूर्ण आध्यात्मिक अनुभूतीला स्पर्श करतो.

हा आध्यात्मिक अनुभव, (त्या अनुभवाप्रत पोहोचण्याची) पद्धत, साक्षात्कार-प्राप्ती यांनाच आपण ‘योग’ असे संबोधतो.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 361)

नमस्कार वाचकहो,

‘साधना, योग आणि रूपांतरण’ या मालिकेअंतर्गत आपण आजपर्यंत ‘साधना’ या भागाचा विचार पूर्ण केला. साधनेच्या तीन प्रमुख पद्धती म्हणजे ध्यानमार्ग, कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग. या तीनही पद्धतींचा आपण सांगोपांग विचार केला, त्यातील अनेक बारकावे जाणून घेतले.

उद्यापासून आपण श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या साहित्याच्या आधारे ‘योग’ यासंबंधी जाणून घेणार आहोत. योगासंबंधीची सर्वसाधारण मान्यता काय आहे, पूर्णयोग म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये कोणती, इतर योगांपेक्षा त्याचे असलेले वेगळेपण काय, पूर्णयोगाचे ध्येय कोणते इत्यादी गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. धन्यवाद!

संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक

साधना, योग आणि रूपांतरण – १६९

पूर्णयोगांतर्गत भक्ती

आपल्या सर्व संकल्पांचा कर्मांचा उगम जेथून होतो आणि जेथून त्यासाठी ऊर्जा पुरवली जाते आणि त्या उर्जेची परिपूर्ती पुन्हा जेथे होते त्या सर्वान्तर्यामी असणाऱ्या ईश्वराशी आपण आपल्या संकल्पाने व कर्माने एकरूप होऊ शकतो. आणि या ऐक्याचा कळस म्हणजे प्रेम, भक्ती होय. कारण ज्या ‘ईश्वरा’च्या उदरामध्ये आपण राहतो, कर्म करतो, हालचाल करतो; ज्याच्या आश्रयाने आपण अस्तित्वात आहोत; केवळ त्या ‘ईश्वरा’साठीच कर्म करावे, केवळ ‘ईश्वरा’साठीच जगावे हे आपण अंतिमत: शिकतो. अशा ‘ईश्वरा’शी जाणीवपुर:सर एकरूप होण्याचा आनंद हेच प्रेमाचे, भक्तीचे स्वरूप आहे. असे असल्याने या प्रेमाला, भक्तीला ईश्वराशी घडणाऱ्या ऐक्याचा मुकुटमणी असे म्हटले जाते.

*

उच्चतर आध्यात्मिक स्तरावर, भक्ती आणि समर्पण या गोष्टी असू शकतात पण या गोष्टी अंतरात्म्यामध्ये जशा अपरिहार्य असतात तशा त्या उच्चतर आध्यात्मिक स्तरावर अपरिहार्य असत नाहीत. उच्चतर मनामध्ये व्यक्ती ‘ब्रह्मन्’बरोबरील एकत्वाबाबत इतकी सचेत असू शकते की तिच्या ठायी, भक्ती अथवा समर्पण असे वेगळे काही शिल्लकच उरलेले नसते.

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 545) (CWSA 29 : 78)

साधना, योग आणि रूपांतरण – १६८

पूर्णयोगांतर्गत भक्ती

भक्तिपूर्ण मनाच्या द्वारा ईश्वरप्राप्तीसाठी जी साधना केली जाते, तिच्या तीन अवस्था असतात, असे भक्तिमार्गाची व्यवस्था लावू पाहणारे मानतात. पहिली अवस्था म्हणजे श्रवण. ईश्वराच्या नावाचे, त्याच्या गुणांचे आणि या गुणांशी संबंधित असणाऱ्या अशा गोष्टींचे नित्य श्रवण. दुसरी अवस्था म्हणजे ईश्वराच्या गुणांचा, त्याच्या व्यक्तिरूपाचा, ईश्वराचा नित्य विचार. तिसरी अवस्था म्हणजे ईश्वरावर मन एकाग्र करून स्थिरचित्त करणे. त्यांतून ईश्वराचा पूर्ण साक्षात्कार होतो.

उपरोक्त तिन्ही गोष्टी असतील आणि त्याबरोबरच मनोभाव उत्कट असेल, एकाग्रता तीव्र असेल तर, समाधीचाही अनुभव येतो. अशा वेळी मग बाह्य विषयांपासून जाणीव दूर निघून गेलेली असते. परंतु या सर्व गोष्टीदेखील वस्तुतः प्रासंगिक आहेत; मनातील विचार हे आराध्याकडे (object of adoration) उत्कट भक्तीने वळले पाहिजेत, हीच एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.

*

निष्ठा, भक्ती, आत्मदान, निःस्वार्थीपणाने केलेले कर्म व सेवा, सातत्यपूर्ण अभीप्सा ही सारी जीवाची सिद्धता करून घेण्याची आणि ‘ईश्वरा’च्या सन्निध राहण्याची पात्रता अंगी बाणवण्याची साधीसोपी आणि सर्वाधिक प्रभावी माध्यमं आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 574), (CWSA 35 : 841)

साधना, योग आणि रूपांतरण – १६७

पूर्णयोगांतर्गत भक्ती

समर्पण आणि प्रेम-भक्ती या काही परस्परविरोधी गोष्टी नाहीत, त्या एकमेकींसोबत वाटचाल करतात. हे खरे आहे की, प्रथमतः मनाद्वारे ज्ञानाच्या माध्यमातून समर्पण करणे शक्य असते परंतु त्यामध्ये मानसिक भक्ती अंतर्भूत असते आणि ज्या क्षणी समर्पण हृदयापर्यंत जाऊन पोहोचते, त्या क्षणापासून भक्ती ही भावना बनून आविष्कृत होते आणि भक्तिभावनेबरोबर प्रेम येतेच.
*
प्रारंभी आत्म-समर्पण आत्मज्ञानापेक्षा अधिक प्रेम आणि भक्ती यांच्या माध्यमातून घडून येते. परंतु आत्मज्ञानामुळे संपूर्ण समर्पण करणे अधिक शक्य होते, हे देखील खरे आहे.
*
पूर्ण प्रेम आणि भक्ती यांद्वारे निःशेष समर्पण सर्वोत्तमरित्या घडून येऊ शकते. भक्तीचा प्रारंभ समर्पणाविना होऊ शकतो; मात्र ती स्वत:ला घडवत, स्वाभाविकपणे समर्पणाच्या दिशेनेच जाते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 78, 78), (CWSA 30 : 57)

साधना, योग आणि रूपांतरण – १६६

पूर्णयोगांतर्गत भक्ती

‘ईश्वरी प्रेम’ हे असे प्रेम असते की, ज्यामध्ये ‘ईश्वरी एकत्व’ आणि त्याच्या ‘आनंदा’तून, ‘ईश्वरा’च्या प्रेमाचा व्यक्तीवर वर्षाव होतो. मानवी चेतनेच्या आवश्यकतेनुसार आणि संभाव्यतांनुसार, दिव्य प्रेम जेव्हा मानवी व्यक्तिरूप धारण करून, मूर्त रूपात येते तेव्हा ते ‘आंतरात्मिक प्रेम’ (psychic love) असते.
*
आध्यात्मिक (spiritual planes) स्तरांवरील प्रेम हे एक वेगळ्या प्रकारचे प्रेम असते; हे उच्चतर किंवा आध्यात्मिक मनामधील प्रेम अधिक वैश्विक आणि अ-वैयक्तिक असते. तर, अंतरात्म्यापाशी (psychic) स्वतःचे असे एक अधिक वैयक्तिक समर्पण, भक्ती, प्रेम असते. सर्वोच्च दिव्य प्रेमासाठी (आध्यात्मिक स्तरावरील प्रेम व आंतरात्मिक प्रेम) प्रेमाचे हे दोन्ही प्रकार एकत्रित येण्याची आवश्यकता असते.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 336 & 337)

साधना, योग आणि रूपांतरण – १६५

पूर्णयोगांतर्गत भक्ती

(एका साधकाने श्रीअरविंद यांना दिव्य प्रेमासंबंधी काही प्रश्न विचारला असावा असे दिसते. त्या साधकाला श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

‘दिव्य प्रेम’ हे मानवी प्रेमाप्रमाणे नसते, तर ते गहन, व्यापक आणि प्रशांत असते. त्याची जाणीव होण्यासाठी आणि त्याला प्रतिसाद देण्यासाठी व्यक्तीने अविचल आणि विशाल झाले पाहिजे. जे गरजेचे आहे (असे त्या व्यक्तीला वाटते) त्याची पूर्ती करायची किंवा नाही हा निर्णय व्यक्तीने ‘दिव्य प्रज्ञे’वर आणि ‘दिव्य प्रेमा’वर सोपविला पाहिजे. आणि ‘दिव्य प्रेमा’प्रत समर्पित होणे हेच व्यक्तीचे समग्र उद्दिष्ट असले पाहिजे; जेणेकरून ती व्यक्ती धारकपात्र आणि साधन बनू शकेल.

“अमुक एका कालावधीमध्येच माझी प्रगती झाली पाहिजे, माझा विकास झाला पाहिजे आणि मला साक्षात्कार झाला पाहिजे,” अशा गोष्टींचा व्यक्तीने आग्रह धरता कामा नये, या गोष्टीची तिने मनामध्ये पक्की खूणगाठ बांधली पाहिजे. या सर्व गोष्टींसाठी कितीही कालावधी लागला तरी, त्यासाठी थांबण्याची आणि चिकाटीने प्रयत्न करत राहण्याची व्यक्तीची तयारी असली पाहिजे. तिने तिचे संपूर्ण जीवन हे त्या एकमेव गोष्टीप्रत म्हणजे ‘ईश्वरा’प्रत असलेली उन्मुखता आणि अभीप्सा, यांसाठी वाहून घेतले पाहिजे.

कशाची तरी मागणी करणे आणि काहीतरी संपादन करणे हे नव्हे तर, स्वतःला अर्पण करणे हे साधनेचे रहस्य असते. व्यक्ती जेवढे आत्मदान करते तेवढ्या प्रमाणात तिची ग्रहणक्षमता वृद्धिंगत होते. परंतु त्यासाठी (तिच्या स्वभावातील) अधीरता आणि बंडखोर वृत्ती नाहीशी झाली पाहिजे. “मला काही साध्यच होत नाहीये, मला कोणाचे साहाय्य मिळत नाहीये, माझ्यावर कोणाचे प्रेमच नाहीये, आता मी निघून जातो, आता मी अध्यात्मसाधनेचा किंवा या जीवनाचाच त्याग करतो,” (आतून उमटणाऱ्या) अशा प्रकारच्या सर्व सूचनांना त्या व्यक्तीने धुडकावून दिले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 345)

साधना, योग आणि रूपांतरण – १६४

पूर्णयोगांतर्गत भक्ती

‘दिव्य प्रेम’ दोन प्रकारचे असते. ‘ईश्वरा’ला या सृष्टीबद्दल, आणि स्वतःचाच एक भाग असणाऱ्या जिवांबद्दल असणारे ‘प्रेम’ हा झाला या प्रेमाचा एक प्रकार आणि दुसरा प्रकार म्हणजे साधकाचे प्रेम, ‘दिव्य प्रियकरा’वर (‘ईश्वरा’वर) असणारे प्रेम. या प्रेमामध्ये वैयक्तिक आणि अ-वैयक्तिक अशी दोन्ही तत्त्वं असतात. परंतु येथे वैयक्तिक प्रेम हे प्राणिक व शारीरिक उपजत प्रेरणांच्या बंधनांपासून आणि सर्व प्रकारच्या कनिष्ठ घटकांपासून मुक्त असते.
*
एक प्रेम असे असते की, ज्या प्रेमामध्ये भावना चढत्यावाढत्या ग्रहणशीलतेनिशी आणि वाढत्या एकात्मतेनिशी ‘ईश्वराभिमुख’ झालेल्या असतात. हे प्रेम ‘ईश्वरा’कडून जे काही प्राप्त होत असते त्याचा इतरांवर वर्षाव करत असते, पण तो वर्षाव कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता, अगदी मुक्तपणे करत असते. तुम्ही तसे करण्यास सक्षम झालात तर, तो (तुमच्या) प्रेमाचा सर्वोच्च आणि सर्वाधिक समाधान देणारा मार्ग असेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 346), (CWSA 31 : 291)