साधना, योग आणि रूपांतरण – २१२

आंतरात्मिकीकरण (psychisation) आणि आध्यात्मिकीकरण (spiritualisation) या दोन्हींमध्ये फरक आहे. आध्यात्मिकीकरणामध्ये होणारे परिवर्तन हे वरून अवतरित होते, तर आंतरात्मिकीकरणामध्ये होणारे परिवर्तन हे अंतरंगामधून घडून येते. आंतरात्मिकीकरणामध्ये मन, प्राण आणि शरीर यांच्यावर अंतरात्म्याचे वर्चस्व निर्माण होते आणि त्यातून हे परिवर्तन घडून येते.

*

तुम्ही पत्रामध्ये वर्णन केलेल्या दोन्ही भावना योग्य आहेत. त्यातून साधनेमधील दोन आवश्यकतांचे सूचन होते.

त्यातील एक आवश्यकता म्हणजे अंतरंगात प्रवेश करायचा आणि चैत्य पुरुष (psychic being) व बाह्यवर्ती प्रकृती यांच्यामधील अनुबंध पूर्णत: खुला करायचा.

दुसरी आवश्यकता म्हणजे ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘दिव्य शांती, शक्ती, प्रकाश, आनंद’ यांच्याप्रत उन्मुख व्हायचे आणि त्यांच्यामध्ये आरोहण करायचे आणि प्रकृतीमध्ये व शरीरामध्ये त्यांचे अवतरण घडवून आणायचे.

वरील दोन्ही प्रक्रियांपैकी, म्हणजे आंतरात्मिक किंवा आध्यात्मिक प्रक्रियांपैकी कोणतीच प्रक्रिया एकमेकींशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही. आध्यात्मिक आरोहण आणि अवतरण घडून आले नाही तर प्रकृतीचे आध्यात्मिक रूपांतरण होऊ शकणार नाही. आणि संपूर्ण आंतरात्मिक खुलेपण आले नाही आणि चैत्य पुरुष व बाह्यवर्ती प्रकृती यांच्यामध्ये अनुबंध निर्माण करण्यात आला नाही तर ‘रूपांतरण’ परिपूर्ण होऊ शकणार नाही.

या दोन प्रक्रियांमध्ये विसंगती नाही. काही जण आंतरात्मिक (चैत्य) रूपांतरणापासून सुरुवात करतात तर काहीजण आध्यात्मिक रूपांतरणापासून सुरुवात करतात. तर काही जण दोन्ही रूपांतरणास एकत्रितपणे सुरुवात करतात. दोन्हीसाठी आस बाळगायची आणि गरजेनुसार आणि प्रकृतीच्या कलानुसार श्रीमाताजींच्या शक्तीला कार्य करू द्यायचे हा सर्वोत्तम मार्ग आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 380, 383)

साधना, योग आणि रूपांतरण – २११

मी ‘चैत्य पुरुषाच्या रूपांतरणा’विषयी कधीही काही सांगितलेले नाही तर मी नेहमीच, ‘प्रकृतीच्या आंतरात्मिक रूपांतरणा’विषयी (psychic transformation) लिहिले आहे की जी अगदी भिन्न गोष्ट आहे. मी कधीकधी प्रकृतीच्या आंतरात्मिकीकरणाविषयी (psychisation) लिहिले आहे. चैत्य अस्तित्व हा उत्क्रांतीमधील, मनुष्यामध्ये असणारा ‘ईश्वरा’चा अंश असतो. आणि म्हणून चैत्य अस्तित्वाचे आंतरात्मिकीकरण (psychisation) हे व्यक्तीला सद्यकालीन उत्क्रांतीच्या अतीत घेऊन जाणार नाही मात्र ‘ईश्वरा’कडून किंवा ‘उच्चतर प्रकृती’कडून जे काही येते त्याला प्रतिसाद देण्यास ते व्यक्तीला सक्षम बनवेल. आणि असुर, राक्षस, पिशाच्च किंवा व्यक्तीमधील पशुता किंवा दिव्य परिवर्तनाच्या मार्गामध्ये अडथळा बनून उभ्या ठाकणाऱ्या कनिष्ठ प्रकृतीच्या कोणत्याही अट्टहासाला प्रतिसाद देण्यापासून ते व्यक्तीला परावृत्त करेल.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 380-381)

साधना, योग आणि रूपांतरण – २१०

चैत्य पुरुषाचे, अंतरात्म्याचे स्थान हृदयामध्ये खोलवर असते, अगदी खोलवर असते. सामान्य भावभावना, ज्या पृष्ठवर्ती स्तरावर असतात; त्या स्तरावर चैत्य पुरुषाचे स्थान नसते. परंतु चैत्य पुरुष अग्रस्थानी येऊ शकतो आणि अंतरंगामध्ये स्थित असतानादेखील तो पृष्ठवर्ती स्तराला (मन, प्राण व शरीर) व्यापून राहू शकतो. त्यानंतर स्वयमेव भावभावना या प्राणिक गोष्टी म्हणून शिल्लक राहात नाहीत तर त्या आंतरात्मिक भावभावना आणि जाणिवा बनतात. अग्रस्थानी आलेला चैत्य पुरुष त्याचा प्रभाव सर्वत्र पसरवू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ, मनाच्या संकल्पनांमध्ये रूपांतरण घडविण्यासाठी तो मनाला प्रभावित करू शकतो किंवा शरीराच्या सवयी व त्याच्या प्रतिक्रियांमध्ये रूपांतर घडविण्यासाठी शरीराला देखील प्रभावित करू शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 340-341)

साधना, योग आणि रूपांतरण – २०९

मनाला योग्य दृष्टी देऊन, प्राणिक आवेग व भावना यांना योग्य वळण लावून, आणि शारीरिक हालचालींना योग्य वळण लावून तसेच शरीराला योग्य सवयी लावून, कनिष्ठ प्रकृतीचे परिवर्तन घडविणे म्हणजे आंतरात्मिकीकरण (Psychisation). वरील सर्व गोष्टींना योग्य वळण लावणे म्हणजे त्या सर्व गोष्टी एका ‘ईश्ववरा’कडेच वळविणे, तसेच या सर्व गोष्टी प्रेम, भक्ती यांवर आधारित असणे; तसेच श्रद्धा, आत्मनिवेदन आणि समर्पण असणे आणि अंतिमतः श्रीमाताजींची जाणीव व दृष्टी सर्वांमध्ये, सर्वत्र तसेच हृदयामध्ये अनुभवास येणे, त्यांचीच ‘शक्ती’ आपल्या अस्तित्वामध्ये कार्यकारी आहे असे जाणवणे, या गोष्टींचाही समावेश आंतरात्मिकीकरणामध्ये होतो.

शांती, प्रकाश, ज्ञान, शक्ती आणि आनंद यांचे वरून अवतरण होणे, आत्म्याची व ‘ईश्व,रा’ची जाणीव होणे तसेच उच्चतर वैश्विवक चेतनेची जाणीव होणे आणि समग्र चेतना तिच्यामध्ये परिवर्तित होणे म्हणजे ‘आध्यात्मिक परिवर्तन’ (The spiritual change) होय.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 380)

साधना, योग आणि रूपांतरण – २०८

चैत्य पुरुष (psychic being) जेव्हा अग्रस्थानी येतो तेव्हा सारे काही आनंदमय होऊन जाते. वस्तुमात्रांकडे पाहण्याची योग्य दृष्टी, योग्य दृष्टिकोन प्राप्त होतो. अर्थात एक प्रकारे, हा चैत्य पुरुष म्हणजे तोच ‘स्व’ असतो की, जो त्याचे विविध घटक (मन, प्राण, शरीर) अग्रभागी ठेवत असतो. परंतु जेव्हा हे विविध घटक चैत्य पुरुषाच्या नियंत्रणाखाली येतात आणि ते चैत्य पुरुषाद्वारे उच्चतर चेतना ग्रहण करण्यासाठी तिच्या दिशेने वळविले जातात, तेव्हा सर्व घटकांमध्ये सुसंवाद निर्माण व्हायला सुरुवात होते. उच्चतर चेतनेच्या साच्यांमध्ये त्यांची क्रमाक्रमाने पुनर्रचना व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे ते घटक शांती, प्रकाश, शक्ती, प्रेम, ज्ञान आणि आनंदामध्ये वृद्धिंगत होऊ लागतात. त्यालाच आम्ही ‘रूपांतरण’ असे संबोधतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 355)

साधना, योग आणि रूपांतरण – २०७

श्रीमाताजींवर चित्ताची एकाग्रता आणि त्यांच्याप्रति आत्मार्पण हे चैत्य पुरुष (psychic being) खुले करण्याचे थेट मार्ग आहेत. भक्तीमध्ये वाढ झाली असल्याचे तुम्हाला जे जाणवते, ती चैत्य विकसनाची पहिली खूण आहे.

श्रीमाताजींच्या उपस्थितीची वा त्यांच्या शक्तीची जाणीव होणे किंवा त्या तुम्हाला साहाय्य करत आहेत, समर्थ करत आहेत याचे स्मरण होणे ही पुढची खूण आहे.

सरतेशेवटी, अंतरंगातील आत्मा हा अभीप्सेमध्ये सक्रिय व्हायला सुरुवात होईल. आणि मनाला योग्य विचारांकडे वळण्यासाठी, प्राणाला योग्य गतिप्रवृत्ती व भावभावना यांच्याकडे वळण्यासाठी चैत्य बोधाकडून (psychic perception) मार्गदर्शन मिळू लागेल. ज्या गोष्टी बाजूला सारण्याची आवश्यकता असेल त्या गोष्टी दाखवून दिल्या जातील आणि त्यांना नकारही दिला जाईल आणि अशा प्रकारे व्यक्तीचे समग्र अस्तित्व, त्याच्या सर्व गतीविधींसहित त्या एकमेवाद्वितीय ‘ईश्वरा’कडेच वळविले जाईल.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 321)

साधना, योग आणि रूपांतरण – २०६

(आंतरात्मिक रूपांतरणासाठी ‘चैत्य पुरुष’ खुला होऊन तो अग्रभागी येणे आवश्यक असते. तो संपूर्णपणे प्रकट व्हावा यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात हे श्रीअरविंदांनी येथे सांगितले आहे.)

साधनेमध्ये होणाऱ्या प्राणिक आवेगांच्या गुंतागुंतीतून साधक जेव्हा मुक्त होईल आणि तो जेव्हा श्रीमाताजींप्रति साधेसुधे आणि प्रामाणिक आत्मार्पण करण्यास सक्षम होईल तेव्हाच त्या साधकातील ‘चैत्य पुरुष’ (psychic being) संपूर्णत: खुला होईल.

तेथे जर कोणताही अहंकारी पीळ असेल किंवा हेतुमध्ये अप्रामाणिकता असेल, प्राणिक मागण्यांच्या दबावाखाली येऊन योगसाधना केली जात असेल, किंवा पूर्णपणे वा अंशत: कोणत्यातरी आध्यात्मिक वा इतर आकांक्षा पूर्ण करण्यासाठी साधना केली जात असेल; अभिमान, प्रौढी, किंवा सत्तापिपासा, पद मिळविण्यासाठी किंवा इतरांवर प्रभाव पडावा म्हणून किंवा ‘योग’-शक्तीच्या साहाय्याने कोणतीतरी प्राणिक इच्छा भागवण्याची उर्मी म्हणून साधना केली जात असेल तर, चैत्य अस्तित्व खुले होणार नाही. आणि ते जर खुले झालेच तर अंशत:च खुले होईल किंवा फक्त काही काळासाठीच खुले होईल आणि परत बंदिस्त होऊन जाईल कारण ते प्राणिक कृतींनी झाकले जाईल. चैत्य अग्नी, आंतरात्मिक अग्नी प्राणिक धुरामुळे घुसमटून, विझून जातो. तसेच अंतरात्म्याला मागे ठेवून, मन जर फक्त योगसाधनेमध्येच अधिक रमत असेल किंवा भक्ती वा साधनेतील इतर क्रिया या चैत्य रूप धारण करण्याऐवजी अधिक प्राणिक बनत असतील, तरीदेखील तशीच अ-क्षमता निर्माण होते.

शुद्धता, साधासरळ प्रामाणिकपणा आणि कोणत्याही ढोंगाविना वा मागणीविना, भेसळयुक्त नसलेली अहंकारशून्य आत्मार्पण-क्षमता या चैत्य पुरुषाच्या संपूर्ण प्रकटीकरणासाठी असणाऱ्या आवश्यक अटी आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 349)

साधना, योग आणि रूपांतरण – २०५

पूर्णयोगाच्या परिभाषेत चैत्य (psychic) याचा अर्थ प्रकृतीमधील आत्मतत्त्व, आत्म्याचा अंश असा होतो. मन, प्राण आणि शरीर यांच्या पाठीमागे स्थित असणारे ते शुद्ध चैत्य किंवा दिव्य केंद्र असते; (हा आत्मा म्हणजे अहं नव्हे.) परंतु आपल्याला त्याविषयी अगदी पुसटशीच जाणीव असते. हे चैत्य अस्तित्व म्हणजे ‘ईश्वरा’चा अंश असते. आणि हे अस्तित्व त्याच्या बाह्यवर्ती साधनांच्या (मन, प्राण आणि शरीर यांच्या) माध्यमातून जीवनाचे अनुभव घेत असताना, जन्मानुजन्म शाश्वत असते. जसजसा हा जीवनानुभव वृद्धिंगत होत जातो तसतसे ते अस्तित्व एक विकसनशील चैत्य व्यक्तिमत्त्व, चैत्य पुरुष म्हणून आविष्कृत होऊ लागते. ते नेहमी सत्य, शिव आणि सुंदर यांच्यावर भर देत असते आणि सरतेशेवटी ते अस्तित्व प्रकृतीस ‘ईश्वरा’भिमुख करण्याइतके पुरेसे प्रबळ, सक्षम आणि तयार होते. त्यानंतर मानसिक, प्राणिक आणि शारीरिक पडदे भेदून, तो (चैत्य पुरुष) संपूर्णतया अग्रस्थानी येऊ शकतो आणि उपजत प्रेरणांचे नियमन करून तो प्रकृतीचे ‘रूपांतरण’ घडवू शकतो. तेव्हा आता प्रकृती आत्म्यावर वर्चस्व गाजवत नाही तर आता पुरुष, आत्मा त्याची सत्ता प्रकृतीवर चालवू लागतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 337)

साधना, योग आणि रूपांतरण – २०४

आत्मा, चैत्य पुरुष हा ईश्वरी ‘सत्या’च्या थेट संपर्कात असतो परंतु मनुष्यामध्ये मात्र तो मन, प्राण आणि शारीर प्रकृती यांच्यामुळे झाकलेला असतो. मनुष्य योगसाधना करून मन व तर्कबुद्धीच्या द्वारे ज्ञानप्रकाश मिळवू शकतो; प्राणामध्ये तो शक्तीवर विजय प्राप्त करून घेऊ शकतो, सर्व प्रकारच्या अनुभवांचा आनंद उपभोगू शकतो. तो अगदी आश्चर्यकारक अशा भौतिक सिद्धीसुद्धा प्राप्त करून घेऊ शकतो परंतु या सर्वांमागे असणारी जर खरी आत्मशक्ती अभिव्यक्त झाली नाही, जर चैत्य प्रकृती पृष्ठभागी आली नाही तर, कोणतीही मूलभूत गोष्ट घडणार नाही.

पूर्णयोगामध्ये, चैत्य पुरुषच ऊर्वरित सर्व प्रकृतीचे दरवाजे खऱ्या अतिमानस प्रकाशाप्रत आणि अंतत: परम ‘आनंदा’प्रत खुले करतो. मन हे स्वत:हून स्वत:च्या उच्चतर प्रांतांप्रत खुले होऊ शकते; ते स्वत:च स्वत:ला स्थिर करू शकते आणि निर्गुणामध्ये (Impersonal) स्वत:ला व्यापक बनवू शकते; स्थिर मुक्ती किंवा निर्वाणामध्ये ते स्वत:चे आध्यात्मिकीकरणदेखील करून घेऊ शकते. परंतु, फक्त अशा आध्यात्मिक मनामध्ये अतिमानसाला पुरेसा आधार सापडत नाही.

जर अंतरात्मा जागृत करण्यात आला; केवळ मन, प्राण आणि शरीर यांच्यातून बाहेर पडून, व्यक्तीचा आंतरात्मिक चेतनेमध्ये (psychic consciousness) नवजन्म झाला तरच हा पूर्णयोग करता येणे शक्य असते. अन्यथा (केवळ मनाच्या किंवा इतर कोणत्या भागाच्या शक्तीनिशी) हा योग करता येणे शक्य नाही. कोणत्याही प्राणिक वासनांमुळे किंवा कोणत्याही मानसिक संकल्पनांमुळे किंवा बौद्धिक ज्ञानाला चिकटून राहिल्यामुळे, ‘दिव्य माते’चे नवजात बालक होण्यासाठी जर (साधकाकडून) नकार दिला गेला, चैत्य अस्तित्वाच्या नवजन्मासाठी जर नकार देण्यात आला तर साधनेमध्ये अपयश येईल.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 337-338)

साधना, योग आणि रूपांतरण – २०३

तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या हृदयामध्ये तुम्ही चैत्य अग्नी विकसित केला पाहिजे आणि चैत्य पुरुष अग्रस्थानी यावा ही अभीप्सा तुमच्या साधनेची अग्रणी झाली पाहिजे. जेव्हा चैत्य पुरुष (psychic being) अग्रभागी येईल तेव्हा, तो तुम्हाला (तुमच्या) ‘अहंकाराच्या अलक्षित गाठी’ दाखवून देईल आणि त्या सैल करेल किंवा चैत्य अग्नीमध्ये त्या जाळून टाकेल. आंतरात्मिक किंवा चैत्य विकास आणि मानसिक, प्राणिक व शारीरिक चेतनेचे आंतरात्मिक परिवर्तन (psychic change) ही गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची असते. कारण, त्यामुळे उच्चतर चेतनेचे अवतरण आणि आध्यात्मिक रूपांतरण (spiritual transformation) सुरक्षित आणि सुकर होते. त्याविना अतिमानस (supramental) हे कायमच खूप दूर राहील. सिद्धी, शक्ती इ. गोष्टींना त्यांचे त्यांचे स्थान असते पण उपरोक्त गोष्टी झाल्या नाहीत तर त्यांचे स्थान अगदीच गौण असते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 381)