(कामात गुंतलेले असताना, शांती, स्थिरता टिकून राहत नाही याबाबतची खंत एका साधकाने श्रीअरविंद यांच्यापाशी व्यक्त केली आहे, असे दिसते. त्याला श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

ज्ञान, सामर्थ्य आणि आनंद या गोष्टी येण्यासाठी स्थिरतेचे, शांतीचे आणि समर्पणाचे पोषक वातावरण आवश्य क असते. तुम्ही कामामध्ये गुंतलेले असताना ते वातावरण टिकून राहत नाही कारण तुमच्या मनाला ही निश्चल-निरवतेची (silence) देणगी अलीकडेच प्राप्त झाली आहे; आणि ती देणगी अजूनपर्यंत तरी फक्त मनापुरतीच सीमित आहे. (आत्ता तुमच्या प्राणाला त्या निश्चल-निरवतेचा फक्त स्पर्श झाला आहे किंवा तिचा प्रभाव जाणवू लागला आहे पण त्या निरवतेने प्राणाचा अजूनपर्यंत ताबा घेतलेला नाही.) जेव्हा नवीन चेतना पूर्णतः तयार झालेली असेल आणि ती जेव्हा तुमच्या प्राणिक प्रकृतीचा आणि शारीरिक अस्तित्वाचा संपूर्ण ताबा घेईल तेव्हा (तुम्ही म्हणत आहात) तो दोष निघून जाईल.

तुमच्या मनाला लाभलेली ही शांतीची अविचल चेतना केवळ स्थिर होणे पुरेसे नाही, तर ती व्यापकही झाली पाहिजे. तुम्हाला ती सर्वत्र जाणवली पाहिजे. म्हणजे, तुम्ही स्वतः आणि इतर सर्वकाही त्या चेतनेमध्येच आहे, असे तुम्हाला जाणवले पाहिजे. तुमच्या कर्मामध्ये स्थिरतेचा पाया निर्माण करण्यासाठीसुद्धा तुम्हाला त्या चेतनेची मदत होईल. तुमची चेतना जेवढी अधिक व्यापक होईल तेवढ्या अधिक प्रमाणात तुम्ही वरून येणाऱ्या गोष्टी (ज्ञान, प्रकाश, प्रेम इ.) ग्रहण करू शकाल. (आणि तसे झाल्यावर मग) दिव्य शक्ती तुमच्या अस्तित्वामध्ये अवतरू शकेल आणि ती त्यामध्ये सामर्थ्य, प्रकाश आणि शांती ओतू शकेल.

तुम्हाला कोंडल्यासारखे, मर्यादित असे जे काही जाणवत आहे ते तुमचे शारीरिक मन (physical mind) आहे; उपरोक्त व्यापक चेतना आणि हा प्रकाश खाली अवतरला आणि त्याने तुमच्या प्रकृतीचा ताबा घेतला तरच, हे मन व्यापक होऊ शकते. तुमच्या देहप्रणालीमध्ये जेव्हा वरून सामर्थ्य अवतरेल तेव्हाच, तुम्हाला ज्याचा त्रास होत आहे ते शारीरिक जडत्व कमी होऊन नाहीसे होण्याची शक्यता आहे.

अविचल राहा, स्वतःला खुले करा आणि स्थिरता व शांती दृढ करण्यासाठी, चेतना व्यापक करण्यासाठी दिव्य शक्तीला आवाहन करा. सद्यस्थितीत जेवढे ग्रहण करण्याची तसेच आत्मसात करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे तेवढा प्रकाश व तेवढी शक्ती लाभावी यासाठी दिव्य शक्तीला आवाहन करा. तुम्ही उतावीळ होणार नाही याची काळजी घ्या, कारण त्यामुळे, तुमच्या प्राणिक प्रकृतीमध्ये अगोदरच प्रस्थापित झालेल्या अविचलता आणि समतोल या गोष्टींना पुन्हा धक्का लागण्याची शक्यता आहे. अंतिम परिणामाबाबत विश्वातस बाळगा आणि त्या दिव्य शक्तीला तिचे कार्य करू देण्यास पुरेसा अवधी द्या.

श्रीअरविंद (CWSA 29 : 124-125)

सर्व परिस्थितीमध्ये, अस्तित्वाच्या सर्व भागांमध्ये समता आणि शांती असणे हा योगस्थितीचा पहिला मुख्य आधार आहे. (तो दृढ झाला की मग) व्यक्तीचा कल जसा असेल त्यानुसार मग एकतर (ज्ञानासहित) प्रकाश येईल किंवा (सामर्थ्य आणि अनेक प्रकारची गतिमानता घेऊन) शक्ती अवतरेल किंवा (प्रेम आणि अस्तित्वाचा मोद घेऊन) आनंद येईल. परंतु पहिली आवश्यक स्थिती म्हणजे शांती! तिच्याविना (उपरोक्त) कोणतीच गोष्ट स्थिर होऊ शकत नाही.

श्रीअरविंद (CWSA 29 : 123)

अविचलता (quietude) कायम ठेवा आणि ती काही काळासाठी रिक्त असली तरी काळजी करू नका. चेतना ही बरेचदा एखाद्या पात्रासारखी असते, त्यामधील मिश्रित आणि अनिष्ट गोष्टी काढून ते पात्र रिकामे करावे लागते; योग्य आणि विशुद्ध गोष्टींनी ते पात्र भरले जाईपर्यंत, काही काळासाठी ते पात्र तसेच रिकामे ठेवावे लागते. ते पात्र जुन्याच गढूळ गोष्टींमुळे पुन्हा भरले जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

त्या दरम्यानच्या कालावधीत थोडे थांबा, वाट पाहा, ऊर्ध्व दिशेस स्वतःला खुले करा. शांती (peace) ही निश्चल-निरवतेमध्ये (silence) परिणत व्हावी म्हणून, अतिशय अविचलपणे आणि स्थिरपणे आवाहन करा, त्यामध्ये अस्वस्थ आतुरता असता कामा नये. आणि शांती निश्चल-निरवतेमध्ये परिणत झाली की मग, आनंद आणि ईश्वरी उपस्थितीसाठी आवाहन करा.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 145)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ६२

उत्स्फूर्त निश्चल-निरव (silent) स्थिती ही (साधनेच्या सुरुवातीच्या काळात) नेहमी एकदमच टिकून राहणे शक्य नसते, पण आंतरिक निश्चल-निरवता नित्य स्वरूपात टिकून राहीपर्यंत ही स्थिती वृद्धिंगत झाली पाहिजे. ही अशी निरवता असते की जी कोणत्याही बाह्य कृतीने विचलित होऊ शकत नाही. इतकेच नव्हे तर, (कोणत्याही अनिष्ट वृत्तींनी किंवा शक्तींनी) गडबड-गोंधळ करण्याचा किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तरीदेखील ती विचलित होऊ शकत नाही… सरतेशेवटी हीच स्थिती, सर्व आध्यात्मिक अनुभूतींचा आणि कृतींचा आधार म्हणून स्थिर करण्याची आवश्यकता असते. या निश्चल-निरवतेच्या पाठीमागे अंतरंगामध्ये काय चालू आहे हे व्यक्तीला ज्ञात झाले नाही तरी त्यामुळे फारसे काही बिघडत नाही.

कारण योगामध्ये दोन स्थिती असतात. एक स्थिती अशी असते की, जिच्यामध्ये सारे काही निश्चल-निरव असते आणि व्यक्ती बाह्यतः इतरांप्रमाणेच वावरताना दिसत असली, कृती करताना दिसत असली तरी, तिच्यामध्ये कोणताही विचार, भावना, गतीविधी नसते. आणि दुसऱ्या स्थितीमध्ये एक नवीनच चेतना (consciousness) सक्रिय झालेली असते. ती स्वतःसोबत ज्ञान, मोद, प्रेम आणि तत्सम इतर आध्यात्मिक भावना आणि आंतरिक कृती घेऊन येते, परंतु असे असून देखील, त्याचवेळी तेथे एक मूलभूत निश्चल-निरवता (silence) किंवा अविचलता (quietude) असते.

आंतरिक अस्तित्वाच्या विकसनासाठी या दोन्हींची आवश्यकता असते. परिपूर्ण निश्चल-निरवतेची म्हणजे तरलता, रिक्तता आणि मुक्ती यांची जी स्थिती असते, ती दुसऱ्या स्थितीची तयारी करून देत असते आणि जेव्हा दुसरी स्थिती येते तेव्हा निश्चल-निरवतेची स्थिती तिला आधार पुरवीत असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 162-163)

जेव्हा मन निश्चल-निरव (silent) असते तेव्हा तेथे शांती असते आणि ज्या ज्या गोष्टी दिव्य असतात त्या शांतीमध्ये अवतरू शकतात. जेथे मनाचे मनपण शिल्लक उरत नाही तेव्हा, तेथे मनाहून महत्तर असणारा आत्मा असतो.

*

मन निश्चल-निरव होणे, निर्विचार होणे, अचल होणे (still) ही काही अनिष्ट गोष्ट नाही, कारण बरेचदा जेव्हा मन अशा रितीने निरव होते तेव्हा, ऊर्ध्वस्थित व्यापक शांतीचे पूर्ण अवतरण घडून येते आणि त्या तशा व्यापक अचलतेमध्ये मनाच्या वर असणाऱ्या शांत ‘आत्म्या’चा साक्षात्कार त्याच्या विशालतेसह सर्वत्र पसरतो.

एवढेच की, शांती आणि मानसिक निश्चल-निरवता जेव्हा तेथे असते तेव्हा प्राणिक मन (vital mind) घाईने आत शिरून, ती जागा व्यापून टाकण्याची धडपड करते किंवा मग त्याच उद्देशाने, यांत्रिक मन (mechanical mind) स्वतःच्या क्षुल्लक सवयींचे विचार-चक्र पुन्हा एकदा वर काढण्याचा प्रयत्न करते.

अशा वेळी साधकाने काय केले पाहिजे? तर, या बाहेरच्यांना नकार देण्याबाबत आणि त्यांना गप्प करण्याबाबत साधकाने सतर्क असले पाहिजे, म्हणजे मग निदान ध्यानाच्या वेळी तरी मन व प्राणाची शांती आणि अविचलता टिकून राहील. तुम्ही जर एक दृढ आणि शांत संकल्प बाळगू शकलात तर हे उत्तम रितीने करता येऊ शकते.

हा संकल्प, मनाच्या पाठीमागे असणाऱ्या ‘पुरुषा‌’चा संकल्प असतो. मन जेव्हा शांतिपूर्ण अवस्थेत असते, ते जेव्हा निश्चल-निरव असते तेव्हा व्यक्तीला या (सक्रिय) ‘पुरुषा‌’ची, तसेच प्रकृतीच्या कार्यापासून अलग असलेल्या अक्रिय ‘पुरुषा’चीसुद्धा जाणीव होऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 162 & 160)

व्यक्तीच्या अस्तित्वामध्ये जेव्हा सर्वत्र पूर्णतः शांती प्रस्थापित झालेली असते तेव्हा, कनिष्ठ प्राणाच्या प्रतिक्रिया त्या शांतीला विचलित करू शकत नाहीत. सुरुवातीला त्या प्रतिक्रिया, पृष्ठभागावर तरंग असावेत त्याप्रमाणे येऊ शकतात, नंतर त्या फक्त सूचनांच्या स्वरूपात येऊ शकतात. त्यांच्याकडे व्यक्ती लक्ष देईल किंवा देणारही नाही, परंतु काहीही असले तरी त्या आत शिरकाव करणार नाहीत, त्या अंतरंगातील शांतीवर परिणाम करणार नाहीत किंवा यत्किंचितही अस्वस्थता निर्माण करणार नाहीत.

या अवस्थेचे शब्दांत वर्णन करणे कठीण आहे, पण तरीही सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, एखाद्या पर्वतावर कोणी दगड फेकून मारावेत आणि त्या पर्वताला जाणीव असेलच तर, फार फार त्याला त्या दगडांचा स्पर्श जाणवेल. पण तो स्पर्श इतका किरकोळ आणि वरवरचा असेल की, त्याचा त्या पर्वतावर काहीच परिणाम होणार नाही, तशी ही अवस्था असते. सरतेशेवटी ही प्रतिक्रियासुद्धा नाहीशी होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 150-151)

शांतीमध्ये स्थिरतेच्या जाणिवेबरोबरच एक सुसंवादाची जाणीवदेखील असते आणि या जाणिवेमुळे मुक्तीची आणि परिपूर्ण तृप्तीची भावना निर्माण होते.

*

पृष्ठभागावर अशांतता असतानासुद्धा, आंतरिक अस्तित्वामध्ये प्रस्थापित शांतीचा अनुभव येणे ही नित्याची गोष्ट आहे. वास्तविक, समग्र अस्तित्वामध्ये परिपूर्ण समता साध्य होण्यापूर्वीची कोणत्याही योग्याची ती नित्याची अवस्था असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 148 & 153)

(श्रीअरविंद येथे सकारात्मक आणि अभावात्मक स्थिरता म्हणजे काय ते सांगत आहेत. तसेच स्थिरता आणि शांती यामधील फरक देखील ते उलगडवून दाखवत आहेत.)

स्थिरतेपेक्षा (calm) शांती (peace) अधिक सकारात्मक असते. जिथे अस्वस्थता, अशांतता किंवा त्रास नाही अशी एक अभावात्मक (negative) स्थिरतासुद्धा असू शकते. परंतु शांतीमध्ये नेहमीच काहीतरी सकारात्मक असते. स्थिरतेप्रमाणे शांतीमध्ये केवळ सुटकाच नसते तर; शांती येताना स्वतःसोबत एक विशिष्ट आनंद किंवा स्वतःचा आनंद घेऊन येत असते.

(अभावात्मक स्थिरतेप्रमाणेच) एक सकारात्मक स्थिरतादेखील असते; त्रास देऊ पाहणाऱ्या सर्व गोष्टींच्या विरोधात ती ठामपणाने उभी राहते, ती अभावात्मक स्थिरतेसारखी क्षीण आणि तटस्थ नसते तर ती सशक्त आणि भव्य असते.

बरेचदा शांती आणि स्थिरता हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जातात पण वर सांगितल्यानुसार, दोन्हीच्या खऱ्या अर्थाच्या आधारे, व्यक्तीला त्या दोन्हीमधील फरक लक्षात येऊ शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 148)

रिक्त मन (vacant mind) आणि स्थिर मन (calm mind) यामध्ये फरक आहे. तो असा की, मन जेव्हा रिक्त असते तेव्हा त्यामध्ये कोणताही विचार नसतो, धारणा नसते, कोणत्याच प्रकारची कोणतीही मानसिक कृती तेथे नसते, कोणत्याही रचलेल्या कल्पना नसतात, तर गोष्टींचा एक मूलभूत बोध तेथे असतो. मात्र स्थिर मनामध्ये, मानसिक अस्तित्वाचे द्रव्य (substance) स्थिर झालेले असते; ते इतके स्थिर झालेले असते की त्यास कोणीही विचलित करू शकत नाही.

काही विचार आलेच किंवा काही कृती उदयाला आल्याच तर, त्या आता मनामधून उगम पावलेल्या नसतात; त्या बाहेरून आलेल्या असतात आणि निर्वात हवेमध्ये आकाशामधून पक्ष्यांचा थवा इकडून तिकडे भरारी घेऊन जावा त्याप्रमाणे ते विचार किंवा कृती मनामध्ये प्रवेश करतात आणि तशाच बाहेर निघून जातात. या गोष्टी (स्थिर) मनात फक्त येऊन जातात, त्या कशालाही धक्का लावत नाहीत किंवा त्या स्वतःची कोणती खूणही मागे सोडून जात नाहीत. अशा मनामध्ये अगदी हजारो प्रतिमा तरळून गेल्या किंवा प्रचंड उलथापालथ झाल्याच्या घटना जरी मनासमोरून तरळून गेल्या तरी ही स्थिर-अचलता तशीच टिकून राहते, जणू काही त्या मनाचा पोतच शाश्वत आणि अविनाशी शांतीच्या द्रव्याचा बनलेला असतो.

अशा प्रकारची स्थिरता प्राप्त झालेल्या मनाकडून कर्म करायला सुरुवात केली जाऊ शकते, अगदी अविरतपणे आणि जोरकसपणेही त्या कर्माचा प्रारंभ केला जाऊ शकतो, परंतु त्या परिस्थितीमध्येदेखील असे मन स्वतःची मूलभूत स्थिरता टिकवून ठेवते. (आता) त्या कर्माचा उगम हा त्या मनामधून होत नसतो तर असे मन फक्त, जे ऊर्ध्वस्थित आहे ते त्याच्याकडून ग्रहण करत असते आणि त्यामध्ये स्वतःचे असे काही न मिसळता, स्थिरचित्ताने, निरपेक्षपणे, पण तरीही सत्याच्या आनंदानिशी, त्यांना मानसिक रूप देत असते. मनाच्या माध्यमातून पुढे जात असताना त्या मार्गाचा प्रकाश आणि आनंदी शक्तीदेखील त्याच्या सोबत असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 145)

मन किंवा प्राण हे जेव्हा विचारांमुळे आणि भावनांमुळे त्रस्त झालेले नसतात, अस्वस्थ नसतात किंवा ते विचार व भावनांमध्ये गुंतून पडलेले नसतात, तसेच जेव्हा त्यांच्यामध्ये विचार व भावनांचा कल्लोळ नसतो, तेव्हा तेथे ‘अविचलता’ (Quietness) असते. प्रामुख्याने मन जर अलिप्त असेल आणि विचार व भावनांकडे ते पृष्ठवर्तीय गतीविधी म्हणून पाहत असेल तर, ‘मन अविचल आहे’ असे आपण म्हणतो. तसेच प्राणाबाबतही म्हणता येते.

अस्वस्थतेचा तसेच अस्वस्थपणे केलेल्या हालचालींचा किंवा अशांततेचा अभाव असणे म्हणजेच स्थिरता (Calmness) नव्हे, तर स्थिरता ही त्याहूनही एक अधिक सकारात्मक अवस्था असते.

कोणतीही गोष्ट जिला अशांत करत नाही किंवा करू शकत नाही अशी महान आणि सघन प्रशांतता असल्याची सुस्पष्ट जाणीव जेव्हा मनाला किंवा प्राणाला असते; तेव्हा आपण म्हणतो की, तेथे ‘स्थिरता‌’ प्रस्थापित झालेली आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 137-138)