पूर्णयोगाचे अधिष्ठान – २९

‘ईश्वरी शक्ती’ नेहमीच अस्तित्वात असते, तुम्हाला तिची जाणीवही झाली होती आणि तुमच्या चेतनेतून जरी ती तुम्हाला काही काळ हरवल्यासारखी किंवा दूरस्थ झाल्यासारखी भासली तरीदेखील, ती तिथेच आहे आणि तीच प्रबळ ठरणार हे निश्चित, याची तुम्ही स्वतःला सतत आठवण करून देत जा. कारण ती ‘ईश्वरी शक्ती’ ज्या कोणाला स्पर्श करते आणि जवळ घेते, ते सारे जण तेव्हापासून त्या ‘ईश्वरी शक्ती’चेच होऊन जातात.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 189)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २८

(इच्छावासनांचा किंवा रागलोभादी विकारांचा आघात झाल्यास काय करावे असा प्रश्न एका साधकाने विचारलेला आहे. त्यावर उपाय म्हणून आधी साधकाने स्वत:ची संकल्पशक्ती उपयोगात आणावी, असे श्रीअरविंद यांनी त्याला सांगितले असावे. पण तसे करता नाही आले तर काय करावे, हे श्रीअरविंद त्या साधकाला लिहीत आहेत…)

तुम्ही तुमची संकल्पशक्ती उपयोगात आणू शकत नसाल तर मग एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे ‘दिव्य शक्ती’ला आवाहन करणे. एखाद्या आघातापुढे हार पत्करणे आणि काहीच न करणे यापेक्षा, त्या शक्तीला आवाहन करणे अधिक बरे. मग ते आवाहन केवळ मनाने केलेले असो किंवा मानसिक शब्दांनी केलेले असो! या आवाहनाचा अगदी त्वरित परिणाम घडून आला नाही तरी, चेतना पुन्हा एकदा (चैत्य पुरुषाप्रत) खुली होण्यामध्ये आणि ‘दिव्य शक्ती’चे आगमन होण्यामध्ये त्याची परिणती होऊ शकते. कारण प्रत्येक गोष्ट त्यावरच अवलंबून असते.

बहिर्मुख झालेल्या चेतनेमध्ये (externalised consciousness) नेहमीच अंधकार आणि दुःखभोग असू शकतात; मात्र (तुमच्यामध्ये) आंतरिक चेतनेची सत्ता जितकी वाढत जाईल तेवढ्या प्रमाणात दुःखभोगादी गोष्टी मागे सारल्या जातील आणि (कालांतराने) त्या निघून जातील. कारण पूर्णतया आंतरिकीकरण झालेल्या चेतनेपुढे (internalised consciousness) त्यांचा टिकाव लागू शकत नाही. आणि समजा दुःखभोगादी गोष्टी अगदी आल्याच तर, त्या गोष्टी बाह्यवर्ती स्पर्शाप्रमाणे (वरवरच्या) असतात, त्या तुमच्या अस्तित्वामध्ये घर करू शकत नाहीत.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 721-722)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २७

ज्या ऊर्जेमुळे व्यक्तीला सत्कृत्य करण्याची प्रेरणा मिळते आणि जी ऊर्जा व्यक्तीला दुष्कृत्य करण्यापासून रोखते ती ऊर्जा म्हणजे ‘संकल्पशक्ती’ होय.

*

संकल्प हा चेतनेचाच एक भाग असतो आणि मनुष्यामध्ये तो (कनिष्ठ) प्रकृतीच्या गतीविधींचे नियंत्रण करणारा मुख्य घटक असलाच पाहिजे.

*

आपण जर सातत्याने संकल्पाचा उपयोग करत राहिलो तर आपल्या अस्तित्वाचे इतर घटकदेखील हळूहळू त्या संकल्पाची आज्ञा प्रमाण मानू लागतात आणि मग आपल्या कृतीदेखील प्राणिक भावना वा इच्छावासनांनुसार न होता, त्या संकल्पाच्या बरहुकूम होऊ लागतात. उर्वरित सर्व गोष्टी (भावना, इच्छा इ. स्वयमेव) जर कल्पनेमध्ये किंवा कृतीमध्ये आणल्या गेल्या नाहीत आणि त्यांना जर संकल्पाची जोड दिली गेली नाही आणि त्या मनात उमटतील तेव्हा नुसते त्यांचे अवलोकन केले आणि त्यांना नकार दिला तर, थोड्याशा संघर्षानंतर त्या गोष्टी क्षीण होत जातात आणि कालांतराने नाहीशा होतात.

*

साधकामध्ये जोवर ध्येय साध्य करून घेण्याची इच्छा आणि दृढ संकल्प नसतो तोवर ती ‘दिव्य शक्ती’सुद्धा निश्चित आणि चिरस्थायी परिणाम निर्माण करू शकत नाही.

*

साधकामध्ये जोपर्यंत वरून होणारे ‘दिव्य शक्ती’चे कार्य किंवा अंतरंगातील गहनतर ‘दिव्य संकल्पा’चे कार्य सातत्यपूर्ण रितीने घडून येत नाही तोपर्यंत मानसिक इच्छेची आवश्यकता असतेच.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 718, 716, 716, 720, 720)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २६

‘ईश्वरी कृपा’ आणि ‘ईश्वरी शक्ती’ (साधकाच्या बाबतीत) सर्व काही करू शकते, पण ते ती साधकाच्या पूर्ण सहमतीनेच (assent) करू शकते. अशी पूर्ण सहमती द्यायला शिकणे हाच साधनेचा समग्र अर्थ आहे. अशा सहमतीसाठी मनामधील कल्पना, प्राणामधील इच्छावासना किंवा शारीरिक चेतनेमधील जडत्वामुळे, तामसिकतेमुळे कदाचित वेळ लागेल परंतु, या गोष्टी दूर केल्याच पाहिजेत आणि ते शक्य असते. ईश्वरी शक्तीने कार्य करावे यासाठी तिला आवाहन केल्याने आणि ईश्वरी शक्तीच्या साहाय्याने त्या गोष्टी दूर करता येऊ शकतात.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 171)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २५

विश्वाची समस्त लीला व्यक्तीच्या विशिष्ट अशा सापेक्ष मुक्त इच्छेवर आधारलेली आहे. ती मुक्त इच्छा साधनेमध्येसुद्धा शिल्लक असते आणि (म्हणूनच) व्यक्तीची सहमती ही प्रत्येक पावलागणिक आवश्यक असते. ईश्वराला समर्पित झाल्यामुळे व्यक्ती अज्ञान, विभक्तपणा आणि अहंकारापासून मुक्त होते परंतु त्यासाठी ते समर्पण प्रत्येक पावलागणिक ‘मुक्त समर्पण’ असणे आवश्यक असते. (मुक्त समर्पण म्हणजे समर्पित व्हायचे की नाही याचे स्वातंत्र्य व्यक्तीला असते.)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 68)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २४

साधकाकडून अभीप्सा, नकार आणि समर्पण (aspiration, rejection and surrender) या तीन गोष्टींबाबत प्रयत्नांची अपेक्षा असते. या गोष्टी जर साधकाने केल्या तर उर्वरित गोष्टी स्वतःहूनच श्रीमाताजींच्या कृपेमुळे आणि त्यांचे तुमच्यामध्ये जे कार्य चालू असते त्यामुळे घडून येतात. या तिन्हीपैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ‘समर्पण’. विश्वास, भरवसा आणि अडीअडचणींमध्ये देखील धैर्य टिकवून ठेवणे हे या समर्पणाचे पहिले आवश्यक रूप असते.

अभीप्सा असेल तरच विश्वास आणि भरवसा असतो असा काही नियम नाही. उलट, अगदी अभीप्सा नसतानासुद्धा, जडत्वाच्या, तामासिकतेच्या दबावामुळे भरवसा, विश्वास आणि धैर्यसुद्धा टिकून राहू शकते. अभीप्सा झाकोळलेली असताना, जर विश्वास आणि धैर्य अपयशी ठरले तर, तेव्हा साधक स्वतःच्या प्रयत्नांवरच निर्भर आहे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे असा साधक म्हणत असतो की, “अरेरे, माझी अभीप्सा असफल ठरली, तेव्हा आता मला आशेला काही जागाच नाही. माझी अभीप्साच जिथे कुचकामी ठरली, तेथे आता श्रीमाताजी तरी काय करू शकतील?”

पण याच्या उलट, साधकाला असे वाटले पाहिजे की, “काही हरकत नाही, माझी अभीप्सा पुन्हा पूर्ववत होईल. आत्ता जरी मला श्रीमाताजींची उपस्थिती जाणवत नसली तरीही त्या माझ्या सोबतच आहेत; त्या मला घनांधकारामधूनही पार घेऊन जातील.” हा अगदी पूर्णपणे सुयोग्य असा दृष्टिकोन तुम्ही बाळगला पाहिजे. ज्यांनी असा दृष्टिकोन अंगीकारलेला असतो त्यांच्यावर नैराश्याचादेखील काही परिणाम होऊ शकत नाही; पण समजा अगदी नैराश्य आलेच तर त्या नैराश्यालाच अपयशी होऊन परतावे लागते. हे काही ‘तामसिक समर्पण’ नव्हे.

पण “मी काहीच करणार नाही. श्रीमाताजींनीच सर्वकाही करावे; अगदी अभीप्सा, नकार, समर्पण या गोष्टीदेखील आवश्यक नाहीत. त्या गोष्टीसुद्धा त्यांनीच माझ्यामध्ये घडवून आणाव्यात,” असे जेव्हा व्यक्ती म्हणते, तेव्हा ते ‘तामसिक समर्पण’ असते. हा जो दृष्टिकोन असतो तो काहीही न करणाऱ्या कामचुकार माणसाचा असतो आणि दुसरा दृष्टिकोन असतो साधकाचा. या दोन दृष्टिकोनांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो.

असा साधक जे जे सर्वोत्तम असते ते ते सारे काही करतो, परंतु जेव्हा गोष्टी प्रतिकूल असतात आणि साधक काही काळासाठी अक्रिय होतो तेव्हा असा साधक श्रीमाताजींच्या शक्तीवर विश्वास ठेवून असतो आणि (बऱ्यावाईट) साऱ्या गोष्टींमागे त्यांचीच उपस्थिती आहे असा विश्वास बाळगतो. त्याच्या या विश्वासामुळेच तो विरोधी शक्तीवर मात करतो आणि पुन्हा एकदा साधना करू लागतो.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 139-140)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २३

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

योग हा एक प्रयत्न असतो, ती तपस्या असते. व्यक्ती जेव्हा अतीव प्रामाणिकपणाने उच्चतर शक्तीच्या कार्याप्रत स्वतःचे समर्पण करते; ते समर्पण सतत जागते ठेवते आणि ते परिपूर्ण करत राहते तेव्हाच मग योगाचे तपस्यापण (म्हणजे त्यातील खडतरता) संपुष्टात येते.

योग म्हणजे सुसंगती नसलेली, तर्कहीन अशी काही एक कविकल्पना नाही किंवा योग म्हणजे निव्वळ चमत्कारही नाही. योगाचे स्वतःचे असे काही नियम असतात, काही अटी असतात आणि असे असताना, (स्वत: काहीही प्रयत्न न करता) कोणत्यातरी एखाद्या जबरदस्त चमत्काराद्वारे ईश्वरानेच सारे काही घडवून आणावे अशी तुम्ही त्याच्याकडून अपेक्षा कशी काय करू शकता, हेच मला समजत नाही.

‘पूर्णयोग’ निर्धोक आहे असे मी कधीही म्हटलेले नाही, कोणताच योग निर्धोक नसतो. मानवी जीवनातील कोणत्याही महान उद्यमामध्ये असतात त्याप्रमाणेच, प्रत्येक योगमार्गाचे त्याचे त्याचे स्वतःचे असे काही धोके असतात. मात्र व्यक्तीमध्ये केंद्रवर्ती प्रामाणिकपणा आणि ईश्वराबद्दल निष्ठा असेल तर त्या धोक्यांमधून सहीसलामत पार पडता येते. (केंद्रवर्ती प्रामाणिकपणा आणि ईश्वराबद्दल निष्ठा) या दोन आवश्यक अटी आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 81, 43)

सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक

आमच्या AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

 

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २२

साधनेच्या सुरुवातीच्या काळात प्रयत्न करणे अपरिहार्यच असते. सुरूवातीच्या काळात असे म्हणत असताना, अगदी थोड्या कालावधीसाठी असे मला म्हणायचे नाही; हे लक्षात घ्या. अर्थातच समर्पणसुद्धा आवश्यकच असते, पण समर्पण ही काही एका दिवसात घडून येणारी गोष्ट नाही. मनाच्या स्वतःच्या अशा काही कल्पना असतात आणि मन त्यांना चिकटून बसते. मानवी प्राण समर्पित होण्यास विरोध करतो, कारण सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये तो ज्याला ‘समर्पण’ असे संबोधत असतो ते म्हणजे एक प्रकारचे साशंकपणे केलेले आत्मदान असते आणि त्यासोबत एक मागणीदेखील असते. जडभौतिक चेतना ही जणू काही एखाद्या दगडासारखी असते आणि ती चेतना ज्याला ‘समर्पण’ असे संबोधते ते समर्पण म्हणजे बरेचदा जडत्व असते. समर्पण कसे करायचे हे केवळ चैत्य अस्तित्वालाच (psychic) माहीत असते आणि प्रारंभी हे चैत्य अस्तित्व सहसा बरेचसे झाकलेले असते. जेव्हा साधक चैत्य अस्तित्वाविषयी जागृत होतो तेव्हा ते संपूर्ण अस्तित्वाचे एकाएकी आणि खरेखुरे समर्पण घडवून आणू शकते, कारण उर्वरित भागांच्या अडचणी त्वरेने सोडविल्या जातात आणि त्या नाहीशा होतात. परंतु तोपर्यंत प्रयत्न हे अपरिहार्यच असतात.

अन्यथा, जोपर्यंत व्यक्तीमध्ये ‘दिव्य शक्ती‌’ (जल) प्रपाताप्रमाणे वरून खाली अवतरित होत नाही आणि त्या शक्तीकडून जोपर्यंत साधना हाती घेतली जात नाही, आणि व्यक्तीच्या व्यक्तिगत प्रयत्नांवर विसंबून न राहता, ती शक्ती जोपर्यंत स्वतःच अधिकाधिक साधना घडवून आणत नाही तोपर्यंत आणि अगदी तेव्हासुद्धा, म्हणजे ‘ईश्वरी शक्ती’कडून मन, इच्छा, प्राण आणि शरीर यांचा पूर्णपणे ताबा घेतला जात नाही तोपर्यंत तरी, अगदी प्रयत्न नाही तरी किमान, अभीप्सा आणि सतकर्ता या गोष्टी आवश्यकच असतात.

दुसऱ्या बाजूला असे काही लोक असतात की, जे संपूर्ण समर्पणाविषयीच्या एका खऱ्याखुऱ्या आणि कृतिशील इच्छेने आरंभ करतात. ज्या व्यक्तींवर चैत्य अस्तित्वाची किंवा सुस्पष्ट, प्रबुद्ध मानसिक इच्छेची सत्ता चालते त्यांनी ‘समर्पण हा साधनेचा नियम आहे’, ही गोष्ट एकदा का स्वीकारली की मग, ते त्याबाबतीत कोणताही उणे-अधिकपणा खपवून घेत नाहीत आणि अस्तित्वाच्या इतर घटकांनीदेखील चैत्य अस्तित्वाने दाखविलेल्या दिशेचेच अनुसरण केले पाहिजे, असा आग्रह ते धरतात. इथेसुद्धा प्रयत्न असतातच पण ते इतके सिद्ध आणि उत्स्फूर्त असतात आणि त्यांना त्यांच्या पाठीशी असणाऱ्या महत्तर शक्तीची इतकी ठाम जाणीव असते की, त्या साधकाला आपण काही सायास करत आहोत, प्रयत्न करत आहोत असे मुळी जाणवतच नाही.

उलट दुसऱ्या एखाद्या उदाहरणामध्ये, व्यक्तीला स्वतःच्या स्वतंत्र गतिविधी सोडून द्यायच्या नसतात आणि जेथे मन किंवा प्राण स्व-इच्छा टिकवून ठेवू इच्छित असतात अशा उदाहरणांबाबत पृष्ठवर्ती साधन आणि त्या साधनाच्या पाठीशी किंवा वर असणारे दिव्यत्व यांच्यामधील भिंत ढासळेपर्यंत संघर्ष आणि प्रयत्न क्रमप्राप्तच असतात. या बाबतीत निरपवादपणे सर्वांनाच लागू पडेल असा एकच एक नियम सांगता येणे अवघड आहे. मानवी प्रकृतीमध्ये इतकी प्रचंड विविधता आहे की, कोणत्याही एकाच परिणामकारक नियमामध्ये सारी मानवी प्रकृती बसविता येत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 83-84)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २१

व्यक्ती ईश्वराप्रति जर विश्वासाने आणि खात्रीपूर्वक स्वत:स अर्पण करेल तर ईश्वराकडून व्यक्तीसाठी सारे काही केले जाईल. तिची आंतरिक चेतना जागृत केली जाईल, हृदय आणि प्रकृती शुद्ध केली जाईल, (आंतरिक व बाह्य चेतना यामधील तसेच कनिष्ठ चेतना व उच्चतर चेतना यामधील) पडदे हटवले जातील. व्यक्तीला हे आत्मार्पण जरी अगदी एकदम पूर्णत्वाने करता आले नाही तरी, व्यक्ती जेवढे ते अधिकाधिक प्रमाणात करेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात तिला आंतरिक साहाय्य व मार्गदर्शन मिळत राहील आणि अंतरंगामध्ये ईश्वराचा संपर्क व त्याची अनुभूती वाढत राहील. शंकेखोर मनाची लुडबुड कमी झाली आणि तुमच्यामध्ये विनम्रता व समर्पणाची इच्छा जर वाढीला लागली तर, हे घडून येणे निश्चितपणे शक्य आहे. तेव्हा मग त्यासाठी या व्यतिरिक्त, दुसऱ्या कोणत्याच तपस्येची आणि बळाची आवश्यकता उरणार नाही.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 69)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २०

(आपण समर्पण म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते आणि आंतरिक समर्पण हा साधनेचा गाभा कसा असतो, हे अगोदरच्या दोन भागात समजावून घेतले. आता या भागात पूर्णयोगाचा मार्ग व इतर योग यातील फरक स्पष्ट केला आहे.)

समर्पण हाच साधनेचा एकमेव मार्ग आहे आणि अन्य कोणत्या मार्गाने साधना करताच येऊ शकत नाही, असे म्हणण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. व्यक्तीने ईश्वराप्रति पोहोचावे यासाठी अनेकानेक मार्ग उपलब्ध आहेत. मात्र मला ज्ञात असलेली ही अशी एकमेव साधना आहे की जिच्यामध्ये, प्रकृतीची तयारी होण्यापूर्वीच, ईश्वराकडून साधना हाती घेतली जाणे, ही गोष्ट एक संवेद्य (sensible) वास्तविकता बनते. इतर साधनापद्धतींमध्ये ईश्वरी कृती आणि तिचे साहाय्य हे वेळोवेळी जाणवू शकते पण बहुतांश वेळा, म्हणजे जोवर सर्व सिद्धता होत नाही तोपर्यंत ते साहाय्य पडद्याआडूनच मिळत राहते. मात्र काही साधनापद्धतींमध्ये सारे काही तपस्येद्वारेच करावे लागते. त्यामध्ये ईश्वरी कृती ग्राह्य मानली जात नाही. बहुतेक सर्व पद्धतींमध्ये या दोन्हींचे मिश्रण असते, तपस्या अंतिमतः ईश्वराच्या थेट साहाय्यासाठी आणि हस्तक्षेपासाठी आवाहन करते. ‘ईश्वरच सारे काही करत असतो‌’ ही संकल्पना आणि त्याची अनुभूती या गोष्टी समर्पणावर आधारित योगमार्गांमध्येच आढळतात.

मार्ग कोणताही अनुसरला, तरी एक गोष्ट करणे आवश्यकच असते आणि ती गोष्ट म्हणजे एकनिष्ठ असणे आणि लक्षपूर्तीपर्यंत वाटचाल करणे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 71)