आत्मसाक्षात्कार – ०८

(‘ईश्वरामध्ये आपला अहंकार विलीन करायचा असेल तर, तो कसा करावा, असा प्रश्न एका साधकाने विचारला आहे. त्यावर श्रीमाताजींनी खूप विस्तृत उत्तर दिले आहे.

अहंकार विलीन करण्यापूर्वी आधी व्यक्तीचे स्वत:चे स्वतंत्र असे व्यक्तित्व, एक पृथगात्म व्यक्तित्व, (individualised) निर्माण व्हावे लागते, व्यक्तीचे असे स्वतंत्र व्यक्तित्व नसते तेव्हा तिची अवस्था कशी असते, त्याची आवश्यकता का असते; इत्यादी सर्व गोष्टी श्रीमाताजी येथे तपशिलवार सांगत आहेत. हा भाग विस्तृत असल्याने तो क्रमश: देत आहोत. पण नंतर हे सर्व भाग एकत्रितपणे वाचल्यास सर्व विषय अधिक नेमकेपणाने लक्षात येईल, हे येथे नमूद करावेसे वाटते.)

श्रीमाताजी : ‘ईश्वरा’मध्ये व्यक्तीने आपला अहंकार कसा विलीन करायचा, असे तुम्हाला विचारायचे आहे का? अहंकार विलीन करायचा असेल तर, त्यासाठी व्यक्ती आधी, पूर्णपणे स्वतंत्र, पृथगात्म (individualised) झाली पाहिजे. अन्यथा, अहंकाराचे ईश्वरामध्ये विलीनीकरण करणे शक्य होणार नाही. पूर्णपणे पृथगात्म होणे म्हणजे काय? आणि बाहेरच्या सर्व प्रभावांना प्रतिकार करण्याची क्षमता असणे म्हणजे काय, हे तुम्हाला माहीत आहे का?

काही दिवसांपूर्वी मला एक पत्र आले होते. त्यात त्या पत्रलेखकाने लिहिले होते की, (आध्यात्मिक ग्रंथांव्यतिरिक्त) सामान्य साहित्य उदा. कादंबऱ्या, नाटके इ. पुस्तके वाचण्याबाबत तो जरा नाखूष असतो. कारण त्या पुस्तकामध्ये ज्या व्यक्तिरेखा रंगविलेल्या असतात त्यांचे प्रभाव ग्रहण करण्याची आणि त्या व्यक्तिरेखांच्या भावना, त्यांचे विचार यानुसार, आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे जगायला सुरुवात करण्याची न टाळता येण्याजोगी एक प्रवृत्ती त्याच्या प्रकृतीमध्ये आहे.

तुम्हाला कल्पना नाहीये, पण तुम्हाला वाटते त्यापेक्षा अनेक जणं या पत्रलेखकासारखी असतात. अशा व्यक्ती जेव्हा एखादे पुस्तक वाचतात तेव्हा ते वाचताना, स्वत:मध्ये तशा प्रकारच्या (पुस्तकात वर्णन केल्यासारख्या) भावना, विचार, इच्छा, हेतू, वेगवेगळ्या योजना त्यांना जाणवू लागतात; इतकेच काय पण त्या पुस्तकामध्ये वर्णन करण्यात आलेले आदर्शसुद्धा अशा व्यक्ती मानू लागतात. ते जणूकाही त्या पुस्तकाच्या वाचनात वाहवत जातात. आणि त्याची त्यांना जाणीवसुद्धा नसते, कारण अशा व्यक्तींचा नव्याण्णव टक्के स्वभाव हा जणू मऊ लोण्याने बनलेला असतो. त्याच्यावर अंगठ्याने थोडा जरी दाब दिला तर, त्याच्यावर त्या अंगठ्याचा ठसा उमटतो.

आणि (त्यांच्या बाबतीत) प्रत्येक गोष्टच ही त्या ‘अंगठ्या’सारखी असते. म्हणजे एखादा अभिव्यक्त झालेला विचार असेल, एखादे वाचलेले वाक्य असेल, एखादी पाहिलेली वस्तू असेल किंवा दुसरी एखादी व्यक्ती काय करत आहे याचे निरीक्षण करणे असेल किंवा शेजाऱ्याच्या इच्छेचे निरीक्षण करणे असेल, अशा साऱ्या गोष्टीच जणू त्या ‘अंगठ्यासारख्या’ ठसा उमटविणाऱ्या असतात. आणि मग व्यक्ती जेव्हा त्यांच्याकडे पाहते तेव्हा त्या साऱ्या इच्छा तिथेच (व्यक्तीच्या आतमध्येच) असतात, एकमेकांमध्ये अगदी मिसळून गेलेल्या असतात, (श्रीमाताजी हाताची बोटे एकमेकांत गुंफून दाखवितात) त्यातील प्रत्येक इच्छाच दुसऱ्या इच्छेवर वरचढ होण्याचा प्रयत्न करत असते आणि परिणामतः अंतरंगामध्ये आणि बाहेर एक प्रकारचा सततचा झगडा चालू असतो. जणू विद्युतप्रवाह बाहेर पडावा तसा तो माणसांमधून बाहेर पडत असतो आणि आत जात असतो; आले लक्षात?

व्यक्तीला या सगळ्याची जाणीवदेखील नसते. त्या सर्वच इच्छा स्वतःला अभिव्यक्त करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांचा परस्परांमध्ये अखंड झगडा चालू असतो आणि त्यामध्ये जी इच्छा सर्वात प्रबळ असते, ती यशस्वी होते. परंतु या इच्छा अनेकविध असल्याने आणि त्या सगळ्यांशी व्यक्तीला एकाकी झुंज द्यावी लागत असल्याने, हा झगडा सोपा नसतो. त्यामुळे समुद्राच्या लाटांवर एखादा लाकडाचा तुकडा जसा खालीवर हेलकावे खात असतो तशी व्यक्तीची अवस्था होते (व्यक्तीचे स्वतंत्र, पृथगात्म व्यक्तित्व नसते तेव्हा व्यक्तीची अशी अवस्था असते.)… (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 256-257)

आत्मसाक्षात्कार – ०७

(श्रीमाताजी सांगत आहेत की, व्यक्ती ईश्वर-साक्षात्कारासाठी प्रयत्न करू लागली की, आत्मदान करण्याऐवजी सहसा ईश्वरालाच स्वत:कडे ओढू पाहते. आणि त्यामुळेच ती त्यात यशस्वी होत नाही. कारण असे केल्यामुळे व्यक्ती स्वत:च्या अहंमध्येच बंदिस्त होऊन राहते आणि ईश्वर व स्वत:मध्ये एक प्रकारची भिंत उभी करते. यावर उपाय म्हणजे आत्मदान. स्वत:ला शक्य तितके ईश्वराप्रत अर्पण करायला शिका, असे श्रीमाताजींनी सांगितले आहे, त्यावर एका साधकाने पुढील प्रश्न विचारला आहे.)

साधक : ‘ईश्वर’च अस्तित्वात आहे आणि व्यक्तीला स्वत:चे असे काही अस्तित्वच नाही, अशी जाणीव बाळगण्याचा प्रयत्न केला तर, तो अहंकारातून बाहेर पडण्याचा मार्ग असू शकतो का?

श्रीमाताजी : म्हणजे व्यक्तीचे अस्तित्वच नाही, असे तुम्हाला म्हणायचे आहे का? अशा रितीने केवळ मनाने विचार करून काही साध्य होईल असे मला वाटत नाही, कारण हा एक प्रकारचा मानसिक प्रयत्न झाला. व्यक्ती अशा प्रकारच्या मानसिक रचना करत राहते आणि त्याद्वारे तिला फारसे काही साध्य होत नाही. अभीप्सेची एक उत्स्फूर्त, उत्कट अशी ज्योत, असे काहीतरी व्यक्तीच्या अंतरंगामध्ये अखंड प्रज्वलित असले पाहिजे…

परंतु (ईश्वर-साक्षात्कार) ही गोष्ट जर केवळ डोक्यामध्येच चालू असेल, म्हणजे ती केवळ मानसिक पातळीवरची असेल तर त्यातून फारसे काहीच साध्य होत नाही.

– श्रीमाताजी (CWM 06 : 138)

आत्मसाक्षात्कार – ०६

बरेचदा असे आढळून येते की, जे लोक अरण्यामध्ये एकटेच राहतात त्यांची आजूबाजूच्या प्राण्यांशी, झाडांशी मैत्री होते. पण केवळ असे एकटे राहिल्यामुळे, आंतरिक ध्यानामध्ये प्रविष्ट होण्याची वा ‘परमसत्या’शी ऐक्य साधून राहण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होते असे मात्र अजिबात नाही. जेव्हा तुम्हाला करण्यासारखे इतर काहीच नसते, अशा परिस्थितीमध्ये कदाचित ते सोपे असेलही पण मला ते काही तितकेसे पटत नाही.

व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत काही ना काही उद्योग शोधून काढू शकते. मला माझ्या अनुभवावरून असे वाटते की, सर्व अडीअडचणींच्या धुमश्चक्रीत असतानासुद्धा जी व्यक्ती स्वत:च्या वृत्तीप्रवृत्तींचे दमन करण्यात यशस्वी होते; ‘ईश्वरी कृपे’द्वारे व्यक्तीला ज्या कोणत्या परिस्थितीत ठेवण्यात आलेले असते ती परिस्थिती तशीच असतानादेखील, जी व्यक्ती आपल्या अंतरंगातील चिरंतन ‘उपस्थिती’सोबत एकांतात राहण्यात यशस्वी होते; अशा वेळी त्या व्यक्तीला जो साक्षात्कार होतो तो अनंतपटीने अधिक खरा, अधिक गहन व अधिक चिरस्थायी असतो.

अडीअडचणींपासून पलायन करणे हा काही त्यांच्यावर विजय प्राप्त करण्याचा उपाय होऊ शकत नाही. तो आकर्षक नक्कीच आहे. जे लोक आध्यात्मिक जीवन जगू इच्छितात त्यांच्यामध्ये अशी एक मानसिकता असते; ते म्हणतात, “झाडाखाली अगदी एकांतात, एकटे बसणे, ध्यानमग्न होऊन राहणे, बोलण्याची वा कृतीची कोणतीही उर्मी नसणे, हे किती रम्य असेल!” त्यांना हे असे वाटते याचे कारण त्या दिशेने त्यांच्या विचारांची ठाम बैठक तयार झालेली असते पण ती फारच भ्रामक असते.

ज्या ध्यानामध्ये एकाएकी तुमचे अनुसंधान साधले जाते ते ध्यान सर्वोत्तम असते. अशावेळी एकाग्र होणे, ध्यान लागणे आणि वरकरणी दिसणाऱ्या रूपांच्या पलीकडे जाऊन पाहणे याव्यतिरिक्त तुम्ही काही करूच शकत नाही, इतकी त्या क्षणी ध्यानाला बसण्याची अनिवार्य निकड तुम्हाला जाणवत असते. आणि त्यासाठी अरण्यामध्ये एकांतवासात जाण्याची गरज नसते; जेव्हा तुमच्यातील काहीतरी सज्ज झालेले असते, जेव्हा ती वेळ आलेली असते, जेव्हा खरी आस लागलेली असते आणि जेव्हा ‘ईश्वरी कृपा’ तुमच्यासोबत असते, तेव्हा हे घडून येते.

मला वाटते की, मानवतेने प्रगतीचा थोडा टप्पा गाठलेला आहे आणि आता जीवनामध्ये राहूनच खरा विजय प्राप्त करून घेतला पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या बाह्य परिस्थितीत असतानादेखील, त्या ‘चिरंतन’, ‘अनंत’ अस्तित्वासोबत एकांतात कसे राहायचे हे तुम्हाला समजले पाहिजे. सर्व व्यवहारांमध्ये व्यग्र असतानादेखील, त्यांपासून मुक्त होऊन, त्या ‘परमेश्वरा’ला आपला सांगाती बनवून कसे राहायचे हे तुम्हाला समजले पाहिजे. हाच खरा विजय!

– श्रीमाताजी (CWM 03 : 276)

आत्मसाक्षात्कार – ०५

साधक : पूर्णयोगामध्ये ‘साक्षात्कारा’चे स्वरूप काय असते?

श्रीअरविंद : या योगामध्ये आपण सत्य-चेतना’ (Truth-consciousness) समग्र अस्तित्वामध्ये उतरवू इच्छित आहोत. अस्तित्वाचा कोणताही भाग त्याविना रिक्त राहता कामा नये. हे कार्य स्वयमेव ‘उच्चतर शक्ती’द्वारेच केले जाऊ शकते. मग तुम्ही काय करणे आवश्यक असते? तर, तुम्ही स्वतःला तिच्याप्रत खुले करायचे असते.

साधक : उच्चतर शक्तीच जर कार्य करणार असेल तर मग ती सर्व माणसांमध्येच ते का करत नाही?

श्रीअरविंद : कारण, सद्यस्थितीत, मनुष्य त्याच्या मनोमय अस्तित्वामध्ये, त्याच्या प्राणिक प्रकृतीमध्ये आणि त्याच्या शारीर-चेतनेमध्ये आणि त्यांच्या मर्यादांमध्ये बंदिस्त आहे. तुम्ही स्वतःला खुले केले पाहिजे. खुले करणे (an opening) म्हणजे मला असे म्हणायचे आहे की, ऊर्ध्वस्थित असणारी ‘शक्ती’ खाली अवतरित व्हावी म्हणून हृदयामध्ये अभीप्सा (Aspiration) बाळगली पाहिजे आणि ‘मना’मध्ये किंवा ‘मना’च्या वर असणाऱ्या पातळ्यांमध्ये त्या शक्तीप्रत खुले होण्याची इच्छा बाळगली पाहिजे.

उच्चतर शक्ती कार्य करू लागल्यावर प्रथम ती अस्तित्वाच्या सर्व भागांमध्ये शांती प्रस्थापित करते आणि ऊर्ध्वमुख खुलेपणा आणते. ही शांती म्हणजे केवळ मानसिक शांती नसते तर, ती शक्तीने ओतप्रोत भरलेली असते आणि त्यामुळे अस्तित्वामध्ये कोणतीही क्रिया घडली तरी समता, समत्व हा तिचा पाया असतो आणि शांती व समता कधीही विचलित होत नाहीत. ऊर्ध्वदिशेकडून शांती, शक्ती व हर्ष या गोष्टी अवतरित होतात. त्याचबरोबरीने उच्चतर शक्ती, आपल्या प्रकृतीच्या विविध भागांमध्ये परिवर्तन घडवून आणते, जेणेकरून हे भाग उच्चतर शक्तीचा दबाव सहन करू शकतील.

टप्प्याटप्प्याने आपल्यामध्ये ज्ञानदेखील विकसित व्हायला लागते आणि ते आपल्या अस्तित्वामधील कोणत्या गोष्टी काढून टाकणे आवश्यक आहे आणि कोणत्या गोष्टी जपून ठेवणे आवश्यक आहे हे आपल्याला दाखवून देते. खरंतर, ज्ञान आणि मार्गदर्शन दोन्ही गोष्टी एकत्रितपणे येतात. आणि त्यासाठी तुम्ही त्या मार्गदर्शनाला सातत्याने संमती देणे आवश्यक असते. एका बाजूपेक्षा दुसऱ्या बाजूने होणारी प्रगती काहीशी अधिक होत आहे, असे असू शकते. परंतु काहीही असले तरी, उच्चतर शक्तीच कार्य करत असते. बाकी सर्व गोष्टी या अनुभव आणि शक्तीच्या गतिविधीशी संबंधित असतात.

– श्रीअरविंद (Evening talks with Sri Aurobindo : 34-35)

आत्मसाक्षात्कार – ०४

साधक : माताजी, ‘ईश्वराचा साक्षात्कार होणे’ याचा नेमका काय अर्थ आहे ?

श्रीमाताजी : स्वत:च्या अंतरंगात असणाऱ्या किंवा आध्यात्मिक शिखरावर असणाऱ्या ‘ईश्वरी उपस्थिती’बाबत सजग होणे, सचेत होणे आणि एकदा का तुम्ही त्या ईश्वरी उपस्थितीबाबत सचेत झालात की, ईश्वराच्या इच्छेव्यतिरिक्त, तुमची स्वतःची अशी कोणतीही स्वतंत्र इच्छा शिल्लक राहणार नाही, इतक्या पूर्णपणे त्याला समर्पित होणे आणि अंतिमतः स्वत:ची चेतना ही त्याच्या चेतनेशी एकरूप करणे, याला म्हणतात ‘ईश्वराचा साक्षात्कार’!

*

‘ईश्वराचा साक्षात्कार’ होणे अशक्य आहे असा या जगात कोणीही नाही. मात्र काही जणांना त्यासाठी अनेक जन्म लागतील, तर काहीजण अगदी याच जन्मामध्ये तो साध्य करून घेऊ शकतील. हा इच्छाशक्तीचा प्रश्न आहे. इथे निवड तुम्ही करायची असते. पण मी हे निश्चितपणे सांगेन की, सद्यकालीन परिस्थिती त्यासाठी विशेष अनुकूल आहे.

– श्रीमाताजी (CWM 16 : 409-410)

आत्मसाक्षात्कार – ०३

अधिक गहन व आध्यात्मिक अर्थाने सांगायचे झाले तर, ज्या गोष्टीचा साक्षात्कार झाला आहे ती गोष्ट, जेव्हा इतर कोणत्याही भौतिक गोष्टीपेक्षाही अधिक वास्तव व गतिशील आणि चेतनेच्या दृष्टीने अधिक निकट असल्याचे जाणवते, तेव्हा अशा साक्षात्काराला ‘सघन साक्षात्कार’ म्हणतात. अशा प्रकारे वैयक्तिक, सगुण ईश्वराचा (personal Divine) किंवा निर्व्यक्तिक, निर्गुण ब्रह्माचा (impersonal Brahman) किंवा आत्म्याचा (Self) साक्षात्कार हा सहसा, साधनेच्या प्रारंभीच किंवा साधनेच्या पहिल्या काही वर्षांत होत नाही किंवा साधनेला खूप वर्ष झाली तरीही होत नाही. साधनेच्या प्रारंभीच साक्षात्कार होणे ही गोष्ट फारच थोड्या जणांच्या बाबतीत घडते. कोणतीही योगसाधना न करतानासुद्धा, लंडनमध्ये मला आलेल्या अनुभवानंतर, पंधरा वर्षांनी म्हणजे, मी योगसाधनेला सुरुवात केल्यानंतर, पाचव्या वर्षी मला तो अनुभव आला. आणि तो सुद्धा माझ्या दृष्टीने खूप असाधारणरित्या लवकरच आलेला आहे, जणू जलदगती आगगाडीचा वेगच. अर्थात, यापेक्षाही अधिक लवकर काही उपलब्धी घडून आल्या आहेत, यात शंका नाही.

पण इतक्या लवकर त्याची अपेक्षा बाळगणे आणि त्याची मागणी करणे आणि अनुभव आला नाही म्हणून हताश होणे आणि युगामध्ये दोन तीन व्यक्तींचा अपवाद वगळता, इतरांना हा योग करता येणे अशक्य आहे असे म्हणणे, ही गोष्ट एखाद्या अनुभवी योग्याच्या किंवा साधकाच्या दृष्टीने पाहता, उतावळ्या आणि विकृत अधीरतेमध्ये गणली जाईल. बहुतेक जण हेच सांगतील की, पहिल्या काही वर्षांमध्ये धीम्या गतीने प्रगतीची आशा बाळगणे हे चांगले. आणि जेव्हा प्रकृती तयार होते आणि जेव्हा ती पूर्णपणे ईश्वराभिमुख होते, तेव्हाच असे परिपक्व अनुभव येऊ शकतात.

काही जणांच्या बाबतीत तुलनेने अगदी सुरुवातीच्या काळात असतानादेखील, काही पूर्वतयारी करून घेणारे अनुभव अपेक्षेपेक्षा लवकर येऊ शकतात, पण तेथेही चेतनयुक्त प्रयत्न करावेच लागतात, त्यापासून त्यांची सुटका नसते; या प्रयत्नांमुळे मग पुढे, अशा अनुभवांची, चिरस्थायी आणि परिपूर्ण अशा साक्षात्कारामध्ये परिणती होते…

वास्तविक, जी माणसं कृतज्ञ असतात, आनंदी असतात; आवश्यकता पडली तर, अगदी छोटी छोटी पावले का असेनात, पण एकेक पाऊल टाकण्याची ज्यांची तयारी असते, अशी माणसं खरंतर अधिक वेगाने वाटचाल करतात आणि आणि जे प्रत्येक पावलागणिक निराश होतात, कुरकुर करत राहतात अशा अधीर, उतावळ्या लोकांपेक्षा ही माणसं अधिक खात्रीने वाटचाल करतात. मला तरी नेहमी असेच आढळून आले आहे; याला विरोधी अशीही काही उदाहरणे असतील देखील, पण मला एवढेच सांगायचे आहे की, जर तुम्ही ‘आशा, उत्साह आणि श्रद्धा’ कायम बाळगू शकलात तर, अधिक मोठ्या शक्यतेला वाव असेल, इतकेच.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 112)

आत्मसाक्षात्कार – ०२

आपल्यासाठी ‘ईश्वरा’चे तीन पैलू असतात.

१) सर्व वस्तुंच्या व व्यक्तींच्या अंतरंगामध्ये व पाठीमागे असणारे ‘चैतन्य’ आणि ‘विश्वात्मा’ म्हणजे ‘ईश्वर’. ज्याच्यापासून आणि ज्याच्यामध्ये विश्वातील सर्वाचे आविष्करण झाले आहे तो म्हणजे ईश्वर. सद्यस्थितीत हे आविष्करण अज्ञानगत असले तरीसुद्धा ते ईश्वराचेच आविष्करण आहे.

२) आपल्या अंतरंगातील, आपल्या अस्तित्वाचा ‘स्वामी’ व ‘चैतन्य’ म्हणजे ‘ईश्वर’. आपण त्याची सेवा केली पाहिजे; आपण आपल्या सर्व वर्तनामधून त्याची इच्छा अभिव्यक्त करायला शिकले पाहिजे, तसे केल्यामुळे आपल्याला अज्ञानामधून प्रकाशाकडे उन्नत होता येईल.

३) परात्पर ‘अस्तित्व’ आणि ‘चैतन्य’ म्हणजे ‘ईश्वर’. तो सर्व आनंद, प्रकाश, दिव्य ज्ञान आणि शक्ती आहे. त्या सर्वोच्च ईश्वरी अस्तित्वाकडे व त्याच्या प्रकाशाकडे आपण उन्नत झाले पाहिजे; तसेच त्याची सत्यता आपण आपल्या चेतनेमध्ये व आपल्या जीवनामध्ये अधिकाधिक उतरविली पाहिजे.

सर्वसाधारण जीवनात आपण अज्ञानामध्ये जगत असतो आणि आपल्याला ईश्वर काय आहे हे माहीत नसते. सामान्य प्रकृतीच्या शक्ती या अदिव्य शक्ती (undivine forces) असतात कारण त्या अहंकार, इच्छावासना व अचेतनेचा एक पडदा विणतात आणि त्यामुळे ईश्वर आपल्यापासून झाकलेला राहतो.

जी चेतना, ‘ईश्वर’ म्हणजे काय हे जाणते आणि त्यामध्ये जाणिवपूर्वक निवास करते, अशा उच्चतर व सखोल चेतनेमध्ये प्रविष्ट व्हायचे असेल तर, आपण कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींपासून आपली सुटका करून घेतली पाहिजे आणि दिव्य शक्तीच्या क्रियेसाठी आपण स्वत:ला खुले केले पाहिजे. तसे केल्याने ती दिव्य शक्ती, आपल्या चेतनेचे दिव्य प्रकृतीमध्ये रूपांतर घडवून आणेल.

ही आहे ‘ईश्वरा’ची, ‘दिव्यत्वा’ची संकल्पना आणि तिच्यापासून आपण प्रारंभ केला पाहिजे. दिव्यत्वाच्या सत्याचा साक्षात्कार, चेतना खुली होण्याने आणि तिच्या परिवर्तनामुळेच होणे शक्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 07-08)

आत्मसाक्षात्कार – ०१

‘अध्यात्म’ हा शब्द उच्चारला की त्याला जोडूनच साधना, अनुभव, अनुभूती, साक्षात्कार इत्यादी शब्द येतात. हे शब्द उपयोजिले जातात खरे, पण बरेचदा त्या शब्दांचा गर्भितार्थ काय, त्याची खोली किती आहे याची आपल्याला क्वचितच जाण असते. ‘आत्मसाक्षात्कार’ हादेखील असाच एक शब्द आहे.

आत्मसाक्षात्कार म्हणजे काय, त्याचे स्वरूप कसे असते, काय केले असता आत्मसाक्षात्कार होऊ शकतो, त्यामध्ये वैयक्तिक प्रयत्नांचे स्थान काय व किती असते आणि त्यामध्ये ईश्वरी शक्तीचे व ईश्वरी कृपेचे महत्त्व किती असते, ‘पूर्णयोगा’मध्ये आत्मसाक्षात्कार हा अंतिम टप्पा मानला जातो का, अधिमानस (Overmind) व अतिमानस (Supermind) आणि साक्षात्कार यामध्ये काय संबंध असतो, इत्यादी सर्व मुद्द्यांचा सखोल विचार आपण उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘आत्मसाक्षात्कार’ या मालिकेद्वारे करणार आहोत. वाचकांचा या मालिकेलाही नेहमीप्रमाणेच उदंड प्रतिसाद लाभेल असा विश्वास वाटतो.

धन्यवाद!
डॉ. केतकी मोडक
संपादक, अभीप्सा मराठी मासिक

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (३०)

(एका साधकाच्या प्रश्नाला उत्तर देताना, आद्य शंकराचार्य, भगवान बुद्ध यांच्या तत्त्वज्ञानाचा परामर्श घेऊन झाल्यावर मग, श्रीअरविंद त्यांनी स्वतः मांडलेल्या तत्त्वज्ञानाविषयी थोडे अधिक स्पष्टीकरण येथे करत आहेत.)

विश्वाचे मी जे स्पष्टीकरण केले आहे त्यामध्ये, येथे (पृथ्वीवर) असलेल्या आपल्या अस्तित्वाचा अर्थ म्हणून आध्यात्मिक उत्क्रांतीचे मूलभूत तथ्य मी समोर ठेवले आहे. ही आध्यात्मिक उत्क्रांती म्हणजे आरोहणांची एक मालिकाच असते. त्यामध्ये शारीरिक अस्तित्व आणि चेतना यांपासून प्राणमय पुरुषाकडे, म्हणजे ज्या अस्तित्वावर जीवन-शक्तीचे वर्चस्व असते त्या अस्तित्वाकडे आरोहण होत असते. तेथून पुढे, पूर्ण विकसित मनुष्यामधील मनोमय पुरुषाकडे आरोहण होत असते. त्यानंतर, मानसिक चेतनेच्या अतीत असणाऱ्या परिपूर्ण चेतनेकडे म्हणजे ‘अतिमानसिक’ चेतनेकडे, आणि ‘विज्ञानमय’ पुरुषाकडे, म्हणजे आध्यात्मिक अस्तित्वाची संपूर्ण चेतना असणाऱ्या ‘सत्य-चेतने’ कडे (Truth-Consciousness) आरोहण होत राहते.

‘मन’ ही काही आपली अंतिम सचेत अभिव्यक्ती असू शकत नाही कारण मन म्हणजे मूलतः अज्ञान असते, की जे ज्ञान मिळविण्यासाठी धडपडत असते; केवळ ‘अतिमानसिक सत्य-चेतना’च आपल्याला शुद्ध आणि समग्र ‘आत्म-ज्ञान’ आणि ‘जगत-ज्ञान’ प्रदान करू शकते; त्या चेतनेच्या माध्यमातूनच आपल्याला आपल्या खऱ्या, सत् अस्तित्वाची प्राप्ती होऊ शकते आणि आपली आध्यात्मिक उत्क्रांती परिपूर्णतेला जाऊन पोहोचू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 396-397)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२९)

महत्तर चेतना जर मनाच्या अतीत असेल आणि त्या चेतनेप्रत आपण पोहोचू शकलो तरच आपण त्या ‘परब्रह्मा’ला जाणू शकतो आणि त्यामध्ये प्रवेश करू शकतो. अशा प्रकारची महत्तर चेतना असते किंवा नाही यासंबंधीची कोणतीही बौद्धिक अटकळ, तार्किक विचार यांच्या आधारे आपण प्रगतिपथावर फार दूरवर जाऊन पोहोचू शकत नाही. परब्रह्माची अनुभूती मिळविण्यासाठी, तेथपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यामध्ये प्रवेश करण्यासाठी, आणि त्यामध्येच जीवन जगण्यासाठी आपल्याला एका मार्गाची आवश्यकता असते. आपल्याला जर तो मार्ग सापडला तर, बौद्धिक अटकळ आणि तर्क हे अपरिहार्यपणे अगदी दुय्यम स्थानी जाऊन पडले पाहिजेत आणि (तसे झाल्यास) त्यांच्या असण्याचे प्रयोजनच शिल्लक राहणार नाही. तरीही तत्त्वज्ञान, ‘सत्या’ची बौद्धिक अभिव्यक्ती या गोष्टी शिल्लक राहू शकतील. आणि प्रामुख्याने, या महान शोधाला अभिव्यक्त करण्याचे साधन म्हणूनच त्या गोष्टी असतील आणि ती परब्रह्माची अनुभूती मानसिक परिभाषेमध्ये मांडता येत असेल, आणि शक्य असेल तेवढ्या प्रमाणात ती मांडली तर, आशय तेवढा शिल्लक राहील आणि तोही अशा लोकांसाठी शिल्लक राहील की जे अजूनही मानसिक बौद्धिक स्तरावरच जीवन जगत आहेत.

(बुद्धीच्या आधारे ‘परतत्त्वा’चे, ‘सत्या’चे आकलन करून घेण्याच्या भारतीय किंवा पाश्चात्त्य चिंतनांबद्दल विस्ताराने ऊहापोह करून झाल्यानंतर, हे प्रयत्न कसे अपुरेच ठरतात, यासंबंधी श्रीअरविंद यांनी आधी सांगितले आहे. आणि आता, ‘पूर्णयोगा’च्या परिभाषेत ‘सत्य’ कशाला म्हणायचे हे श्रीअरविंद येथे सांगत आहेत…)

अखिल ब्रह्माचा ‘बुद्धिपूर्वक विचार’ केल्याने नव्हे तर, चेतनेच्या परिवर्तनामुळे व्यक्ती अज्ञानातून ‘ज्ञाना’कडे जाऊ शकते. हे ‘ज्ञान’ अशा प्रकारचे असते की, आपण जे जाणतो ते आपण स्वतः बनतो. बाह्यवर्ती चेतनेमधून थेट आणि सखोल आंतरिक चेतनेमध्ये प्रवेश करणे, अहंकार आणि शरीराच्या कक्षा ओलांडून चेतना विशाल करणे, आंतरिक संकल्प आणि अभीप्सेद्वारा चेतना उन्नत करणे आणि मनाच्या अतीत होईपर्यंत चेतनेचे आरोहण करत करत, तिला ‘प्रकाशा’प्रत खुली करणे, आत्मदान आणि समर्पणाच्या माध्यमातून अतिमानसिक ‘ईश्वरा’चे अवतरण घडविणे आणि परिणामतः मन, प्राण आणि शरीराचे रूपांतर घडविणे हा ‘सत्या’प्रत जाण्याचा ‘पूर्णयोगा’चा मार्ग आहे. याला इथे आम्ही ‘सत्य’ असे संबोधतो आणि आमच्या ‘योगा’मध्ये (‘पूर्णयोगा’मध्ये) तेच आमचे ध्येय असते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 352 and 355)