आत्मसाक्षात्कार – १८

‘केवळ ईश्वराचा साक्षात्कार पुरेसा नाही’, असे जेव्हा मी म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की, असा साक्षात्कार चेतनेमध्ये चिरस्थायी परिवर्तन घडवून आणण्यासाठी पुरेसा नसतो. मानवी प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवायचे असेल तर, त्यासाठी ‘ईश्वराच्या गतिशील शक्ती’च्या कार्याची आवश्यकता असते.

…‘ईश्वरी चेतना’ धारण करण्याची क्षमता सर्वच आधारांमध्ये, म्हणजे प्राकृतिक रचनांमध्ये नसते, हे खरे आहे आणि या प्राकृतिक साधनाची क्षमता वृद्धिंगत करण्याचा ते कोणता प्रयत्नही करत नाहीत. एकदा का तुम्ही त्या ईश्वरी चेतनेमधून खाली उतरलात की मग, तुम्ही अगदी एखाद्या सामान्य माणसासारखेच होऊन जाता. आणि म्हणून, जेव्हा ईश्वराचे अवतरण होते तेव्हा ते धारण करण्यासाठी म्हणून, व्यक्तीने स्वतःच्या प्राकृतिक साधनाच्या क्षमता, त्याच्या जटिलतेनिशी आणि बहुअंगांनिशी वृद्धिंगत करत नेण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे.

– श्रीअरविंद (Evening Talks with Sri Aurobindo : 349-350)

आत्मसाक्षात्कार – १७

(अहंकारापासून मुक्त होण्याचा एक मार्ग म्हणजे वासना-मुक्ती. परंतु हा मार्ग काहीसा कोरडा, रुक्ष आणि दूरवरचा आहे, अशी टिपण्णी श्रीमाताजींनी केली आहे आणि त्याच्या तुलनेत अधिक वेगवान मार्ग कोणता तो त्या सांगत आहेत.)

अहंकारापासून मुक्त होण्याची समस्या जर शारीरिकरित्या सोडवायची असेल तर धैर्य आणि निश्चय बाळगून (स्वत:ला) झोकून द्या. वासनांच्या मागे धावण्याचा दूरचा, दुष्कर, कष्टदायक आणि निराशाजनक मार्ग सोडून, व्यक्तीने साधेपणाने, संपूर्णतया, कोणत्याही अटी न लादता जर त्या ‘परमोच्च सत्या’प्रत, ‘परमोच्च संकल्पशक्ती’प्रत, ‘परमपुरुषा’प्रत स्वत:ला समर्पित केले; अस्तित्वाच्या सर्व अंगांनिशी जर स्वत:चे संपूर्ण अस्तित्व, संपूर्णतया ‘त्या’च्या हाती सोपविले, तर अहंकारापासून सुटका करून घेण्याचा तो सर्वात वेगवान आणि क्रांतिकारी मार्ग आहे.

लोकं म्हणतील की, हा मार्ग आचरणात आणणे खूप अवघड आहे. परंतु या मार्गात एक प्रकारची ऊब आहे, उत्कटता आहे, उत्साह आहे, प्रकाश आहे, सौंदर्य आहे, उत्कट आणि सर्जनशील जीवन आहे.

…संपूर्ण, समग्र, परिपूर्ण, नि:शेष आणि कोणत्याही अटीविना जे आत्मदान केले जाते, त्यालाच मी सकारात्मक मार्ग (positive way) म्हणते.

फक्त स्वत:साठी न जगता, स्वत:शी निगडित असे काहीही न ठेवता आणि स्वत:चा विचार न करता, सर्वाधिक सुंदर, तेजोमय, आनंदमय, शक्तिवान, करुणामय, अनंत असे जे काही आहे केवळ त्याचाच विचार करणे, त्या विचारांमध्ये निमग्न राहणे यामध्ये इतका अगाध आनंद आहे की, त्याची तुलना दुसऱ्या कशाशीच करता येऊ शकत नाही. ही एकच गोष्ट अर्थपूर्ण आहे, प्रयत्न करून पाहण्यायोग्य आहे. इतर सर्व गोष्टी म्हणजे निव्वळ कालापव्यय असतो. वळणावळणाच्या रस्त्याने, धीम्या गतीने, कष्टपूर्वक, टप्याटप्प्याने वर्षानुवर्षे पर्वत चढत जाणे (पिपीलिका मार्ग) आणि अदृश्य पंख पसरवून, थेट शिखराकडे झेपावणे (विहंगम मार्ग) यामध्ये जो फरक आहे तो येथे आहे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 268-269)

आत्मसाक्षात्कार – १६

(जडभौतिक विश्व आणि आंतरात्मिक व आध्यात्मिक विश्व यांच्या अतीत असणाऱ्या ‘परमसत्या’च्या, ‘परमज्ञाना’च्या विश्वाबद्दल येथे संवाद चालू आहे. श्रीमाताजी असे सांगत आहेत की, “हे विश्व उदयाला आले आहे; पण ते अजून संपूर्णपणे अस्तित्वात यायचे आहे. आणि त्यासाठी केवळ एकटा अवतार पुरेसा नाही तर, त्यासाठी ईश्व रप्राप्तीची अभीप्सा बाळगणाऱ्या अनेक माणसांची आवश्यकता आहे.’’ हे ऐकल्यानंतर, एका साधकाने त्यांना प्रश्न विचारला आहे की, आम्ही त्यामध्ये सहभागी होण्यासाठी काय केले पाहिजे?)

श्रीमाताजी : त्यासाठी व्यक्तीने स्वतःच्या अस्तित्वाचा, ‘पुरुषा’चा, ‘आत्म्या’चा साक्षात्कार करून घेतला पाहिजे; स्वतःच्या अस्तित्वाचे जे परम‘सत्य’ आहे, त्याच्याशी सचेत (conscious) नाते जोडले पाहिजे; ते नाते कोणत्याही रूपातील असले, ते कोणत्याही मार्गाने जोडलेले असले, तरी त्याने काही फरक पडत नाही, परंतु हाच एकमेव मार्ग आहे.

प्रत्येक व्यक्ती आपल्या अंतरंगामध्ये एक सत्य वागवत असते आणि त्या सत्याशीच व्यक्तीने ऐक्य साधले पाहिजे, तेच सत्य ती जगली पाहिजे. या सत्याप्रत पोहोचण्यासाठी आणि त्याचा साक्षात्कार करून घेण्यासाठी व्यक्तीला जो मार्ग अनुसरावा लागेल तोच मार्ग व्यक्तीला त्या (उपरोक्त) परम‘ज्ञाना’च्या अधिकाधिक निकट घेऊन जाईल. म्हणजे असे म्हणता येईल की, (अंतिमतः) वैयक्तिक साक्षात्कार आणि परम‘ज्ञान’ या दोन्ही गोष्टी अगदी एकच आहेत.

– श्रीमाताजी (CWM 10 : 136)

आत्मसाक्षात्कार – १५

साधक : आम्ही जेव्हा कोणताही एखादा प्रयत्न करतो, तेव्हा आमच्यामध्ये असे काहीतरी असते की, ते लगेचच स्वत:वर खूष होऊन जाते, बढाया मारू लागते आणि एवढ्या-तेवढ्या प्रयत्नांनीच संतुष्ट होऊन जाते आणि परिणामी सारे काही बिघडून जाते. तेव्हा यापासून सुटका कशी करून घ्यायची?

श्रीमाताजी : आपण जेव्हा काहीतरी करत असतो तेव्हा आपल्यातीलच कोणीतरी त्यावर सदोदित लक्ष ठेवत असतो, निरीक्षण करत असतो. आणि मग कधीकधी तो गर्वाने फुलून जातो. तेव्हा साहजिकच, आपल्या प्रयत्नांमधील सामर्थ्य पुष्कळ प्रमाणात कमी होते.

काम करत असताना, जीवन जगत असताना व्यक्तीला स्वत:चे निरीक्षण करण्याची सवय असते. स्वत:चे निरीक्षण केलेच पाहिजे; परंतु त्याहूनही अधिक आवश्यक असते ते संपूर्णपणे प्रामाणिक राहण्याचा व सहजस्वाभाविक असण्याचा प्रयत्न करणे. व्यक्ती जे काही करत असते त्याबाबत ती अगदी सहजस्वाभाविक असली पाहिजे; म्हणजे व्यक्तीने सतत स्वत:चे निरीक्षण करत राहणे, स्वत:ला जोखत राहणे, स्वत:चे मूल्यमापन करत राहणे, कधीकधी तर खूपच कठोरपणे मूल्यमापन करणे, असे करू नये. खरेतर, स्वत:वरच खुश होऊन स्वत:चीच पाठ थोपटून घेणे जितके वाईट, तितकीच ही गोष्टदेखील वाईट असते; या दोन्हीही गोष्टी सारख्याच घातक असतात.

व्यक्ती अभीप्सेबाबत (aspiration) इतकी प्रामाणिक असली पाहिजे की, तिला आपण अभीप्सा बाळगत आहोत हेदेखील कळता कामा नये; जणू काही ती स्वत:च अभीप्सा बनून राहिली पाहिजे. जेव्हा हे खरोखर प्रत्यक्षात उतरेल तेव्हा व्यक्तीने खऱ्या अर्थाने काही असामान्य शक्ती प्राप्त केलेली असेल.

…व्यक्ती जेव्हा स्व-केंद्रित राहात नाही, ती म्हणजे काम करत असताना स्वत:कडे पाहणारा अहंकार असत नाही, तर व्यक्ती स्वत: ती कृतीच बनून जाते, त्याही पलीकडे जात, ती स्वत:च एक अभीप्सा बनून जाते तेव्हा, ते खरोखर चांगले असते. म्हणजे जेव्हा अभीप्सा बाळगणारी व्यक्ती म्हणूनसुद्धा ती शिल्लक राहत नाही, तर ती व्यक्ती म्हणजे स्वयमेव अभीप्साच बनून जाते आणि जेव्हा अशी व्यक्ती संपूर्ण एकाग्र अशा आवेगाने (ईश्वराप्रत) झेपावते तेव्हा ती खरोखरच खूप प्रगत होते. अन्यथा, नेहमीच एक प्रकारची क्षुद्र स्व-संतुष्टता, क्षुद्र आत्मप्रौढी आणि स्वत:बद्दलची कीव अशा सर्व प्रकारच्या गोष्टींचा व्यक्तीमध्ये शिरकाव होतो आणि सारे काही बिघडून जाते. अवघड असते हे सारे!

– श्रीमाताजी (CWM 06 : 402)

आत्मसाक्षात्कार – १४

(अहंची आवश्यकता का असते ते कालच्या भागात आपण पाहिले. आता व्यक्तीचे स्वतंत्र, पृथगात्म व्यक्तित्व निर्माण झाल्यावर काय होते त्याबद्दल आणि अहंच्या विलीनीकरणाबद्दल त्या येथे सांगत आहेत.
या मालिकेतील भाग ०८ ते १४ सलग वाचल्यास हा विषय अधिक नेमकेपणाने लक्षात येईल, असे वाटते.)

तुम्ही व्यक्ती म्हणून स्वतंत्र, पृथगात्म (individualised) झाला आहात आणि आता योग्य वेळ आली आहे, असे ईश्वराला जेव्हा वाटते, तेव्हा मग ईश्वर तुमचा अहं त्याच्यामध्ये विलीन करण्याची आणि इथून पुढचे तुमचे सर्व जीवन केवळ ईश्वरासाठी व्यतीत करण्याची तुम्हाला अनुमती देतो. हा निर्णय ईश्वर घेत असतो. मात्र त्याआधी तुम्ही हे सगळे काम पूर्ण केले पाहिजे, तुम्ही स्वतः आधी एक सचेत व्यक्ती बनले पाहिजे. तुमच्या अस्तित्वाचे तुम्ही पूर्णपणे, अगदी अनन्यपणे केवळ ईश्वराभोवतीच केंद्रीकरण केले पाहिजे आणि ईश्वर हाच तुमचा चालविता धनी असला पाहिजे. पण एवढे सगळे झाल्यावरही, अहं शिल्लक असतोच. कारण त्या अहंनेच तर आजवर तुम्हाला एक व्यक्ती म्हणून घडवण्यामध्ये योगदान दिलेले असते.

परंतु एकदा का (स्वतंत्र व्यक्ती म्हणून घडण होण्याचे) ते काम पूर्ण झाले, ते निर्दोष, परिपूर्ण झाले की मग, त्या क्षणी तुम्ही ईश्वराला म्हणू शकता की, “हा मी इथे उभा आहे, मी तयार आहे. माझा तू स्वीकार करशील का?” आणि तेव्हा ईश्वर बहुधा नेहमीच ‘हो’ म्हणतो. तेव्हा सारे काही पूर्ण झालेले असते, सारे काही सिद्धीस गेलेले असते. आणि अशा वेळी मग तुम्ही ईश्वरी कार्य करण्यासाठी ‘खरे साधन’ बनलेले असता.

(सारांश : सरमिसळ अशा सामूहिक अस्तित्वामधून, अहंच्या सहाय्याने व्यक्तीची स्वतंत्र, पृथगात्म अशी घडण – व्यक्तीच्या सर्व घटकांचे ईश्वराभोवती केंद्रीकरण – ईश्वराप्रत आत्मदान – अहंचा विलय करण्यास ईश्वराची अनुमती – अहंचा विलय – आणि व्यक्ती ईश्वरी कार्याचे साधन बनते.)

– श्रीमाताजी (CWM 06 : 260-261)

आत्मसाक्षात्कार – १३

(मनाच्या पृथगात्मतेविषयी (individualised) श्रीमाताजींनी काय सांगितले होते ते आपण काल पाहिले. अहंची आवश्यकता काय असते, हे त्या आता समजावून सांगत आहेत.)

मला तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की, ईश्वरामध्ये आपला अहंकार विलीन करण्यापूर्वी आपण काय आहोत, हे आधी व्यक्तीने थोडेतरी जाणून घेतले पाहिजे. व्यक्तीमध्ये अहंकार असतो. तुम्ही जागृत, स्वतंत्र, पृथगात्म (individual) व्यक्ती म्हणून तयार होण्यासाठी अहं आवश्यक असतो. म्हणजे पृथगात्मकतेची जाणीव आवश्यक असते, असे मला म्हणायचे आहे. म्हणजे जिथे सर्व गोष्टी एकमेकांवर येऊन आदळतात असा एखादा चव्हाटा तुम्ही असता कामा नये. तुमचे स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्व असले पाहिजे आणि त्यासाठी अहं आवश्यक असतो.

…नंतर, व्यक्ती हे सारे काही ईश्वराला अर्पण करते. पण त्यापूर्वी अनेक वर्षं प्रयत्न करावे लागतात. म्हणजे तुम्ही केवळ, स्वतःविषयी, अगदी प्रत्येक तपशिलामध्ये शिरून सचेत होणे एवढेच पुरेसे नसते, तर तुम्ही ज्याला ‘अहं, मी’ असे संबोधता त्याचे तुमच्या चैत्य केंद्राभोवती (psychic centre), म्हणजे तुमच्या अस्तित्वाच्या दिव्य केंद्राभोवती संघटन करावे लागते, जेणेकरून, तुमचे एकच एक, एकसंध असे, सुसंगत, पूर्णपणे जागृत असे व्यक्तित्व तयार होईल.

आणि हे दिव्य केंद्र आधीपासून ईश्वराशी पूर्णतया समर्पित असल्याने, (श्रीमाताजी अर्पण केल्याप्रमाणे हातांची ओंजळ करून दाखवितात.) त्याभोवती जर प्रत्येक गोष्टीची सुव्यवस्थित बांधणी झाली असेल तर, आपोआपच ती प्रत्येक गोष्ट ईश्वराप्रत समर्पित होते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 260)

आत्मसाक्षात्कार – १२

(प्राणाच्या पृथगात्मतेविषयीचा (individualised) विचार आपण काल केला. आज आपण मनाच्या पृथगात्मतेविषयी श्रीमाताजी काय सांगत आहेत ते समजावून घेऊ.)

तुम्हाला जर स्वयमेव तुमच्या शारीर-मनाची (physical mind) जाणीव झाली तर… बरेच जणं त्याला ‘चव्हाटा’ (public square) असे संबोधतात, कारण तेथे प्रत्येक गोष्ट असते, तेथून प्रत्येक गोष्ट जात असते, पुन्हा परतून येत असते… सर्व संकल्पना तेथे (मनामध्ये) जातात, त्या एका जागी प्रवेश करतात, दुसरीकडून बाहेर पडतात. काही इथे असतात, काही तिथे असतात. अशा रितीने मन म्हणजे जणू एक चव्हाटाच असतो. त्यामध्ये कोणतीही सुव्यवस्था नसते आणि त्यामुळे बहुधा संकल्पना तिथे एकत्र येतात, एकमेकांवर आदळतात आणि मग सर्व तऱ्हेचे गोंधळ उडतात.

परंतु मग कधीतरी एखाद्या दिवशी व्यक्ती सजग होते आणि विचार करू लागते की, ‘माझं मन’ असे मी कशाला बरं म्हणू शकेन? किंवा ‘माझं मन’ म्हणजे काय? व्यक्तीला स्वतःच्या पद्धतीने विचार करायलादेखील अनेक वर्षं लागतात. ही एक साधीशी गोष्ट करण्यामध्ये यशस्वी होण्यासाठी अनेक वर्षं सजगतेने, अतिशय काळजीपूर्वक, अगदी सयुक्तिक, अतिशय सुसंगत असे काम करावे लागते; सुव्यवस्था लावावी लागते, निवड करावी लागते, घडण करावी लागते. व्यक्तीला असे वाटत असते की, माझी माझी स्वतःची अशी एक विचारसरणी आहे, पण असे अजिबात नसते.

व्यक्ती ज्या लोकांशी संवाद साधत असते, ती जी पुस्तके वाचत असते आणि तिची जी काही मनोवस्था (mood) असते त्यावर ती पूर्णतः अवलंबून असते. तुमचे पचन व्यवस्थित झाले आहे की तुम्हाला अपचन झाले आहे; खुली हवा नसलेल्या एका खोलीत तुम्ही स्वतःला बंदिस्त करून घेतले आहे की, तुम्ही स्वच्छ मोकळ्या हवेत आहात; तुमच्या नजरेसमोर एखादे सुंदर दृश्य आहे, स्वच्छ सूर्यप्रकाश आहे की पाऊस पडत आहे, अशा सगळ्या गोष्टींवर तुमचे त्या त्या वेळचे विचार अवलंबून असतात. आणि तुम्हाला त्याची जाणीवसुद्धा नसते. तुमच्याशी संबद्ध नसलेल्या, पूर्णपणे असंबद्ध अशा ढिगभर गोष्टींचा तुम्ही विचार करत राहता. मात्र एक सुव्यवस्थित, सुसंगत, तर्कसंगत विचारसरणी तयार होण्यासाठी बारकाईने तपशिलवार, प्रदीर्घ काम करण्याची आवश्यकता असते.

यामधील गमतीचा भाग असा की, जेव्हा तुम्ही अशा तऱ्हेची एक सुंदर, सुरचित, सशक्त, शक्तिशाली मानसिक रचना घडविण्यामध्ये यशस्वी होता, नेमकी तेव्हाच तुम्हाला पहिली गोष्ट सांगण्यात येते ती अशी की, “तुम्हाला ईश्वराशी ऐक्य पावण्यासाठी सक्षम व्हायचे असेल तर, या सर्व मानसिक रचना तुम्ही मोडून काढल्या पाहिजेत.” (अर्थात हेही तितकेच सत्य आहे की,) जोपर्यंत तुम्ही ती रचना घडवलेली नसते, तोपर्यंत तुम्ही ईश्वराशी एकरूपही होऊ शकत नाही कारण तोपर्यंत तुम्ही म्हणजे नुसता एक वस्तुंचा ढिगारा असता, तुम्ही ‘तुम्ही’ नसता आणि त्यामुळे त्या वस्तुंच्या ढिगाऱ्याखेरीज ईश्वराला देण्यासारखे तुमच्यापाशी काहीच नसते. आत्मदान करता येण्यापूर्वी व्यक्ती आधी स्वतंत्रपणे अस्तित्वात असली पाहिजे. मी (प्राणाबाबतीत) जे सांगितले तेच मी आत्ता पुन्हा येथे (मनाबाबत) सांगितले. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 258-259)

आत्मसाक्षात्कार – ११

(कालच्या भागात श्रीमाताजींनी शरीराच्या पृथगात्मतेविषयी (individualisation) सांगितले होते. आज आता आपण प्राणाच्या पृथगात्मतेविषयी त्या काय सांगत आहेत ते समजावून घेऊ.)

तुम्ही जर सहजपणे तुमच्या शरीरातून बाहेर पडलात आणि प्राणिक विश्वामध्ये (vital world) प्रवेश केलात तर, (तुमच्यापैकी बहुतेकांना हे जमत नाही कारण बहुधा शरीराप्रमाणेच प्राणिक अस्तित्वदेखील फारसे व्यक्तिविशिष्ट झालेले नसते.) तेथे तुम्हाला सर्व गोष्टींची एकमेकांमध्ये सरमिसळ झालेली आहे आणि त्या गोष्टी एकमेकांमध्ये मिसळलेल्या आहेत, विभागलेल्या आहेत असे आढळेल. तिथे सर्व प्रकारची स्पंदनं, शक्तींचे प्रवाह असतात; ते येत असतात, जात असतात; एक-दुसऱ्याशी भांडत असतात; ते एकमेकांना नष्ट करू पाहत असतात, एक दुसऱ्याचा ताबा घेऊ पाहत असतात; एकमेकांना शोषून घेत असतात आणि परस्परांना बाहेर हाकलून देत असतात… आणि तिथे हे असेच चालत राहते. परंतु या सगळयामधून स्वतःचे खरे व्यक्तिमत्त्व शोधणे हे अतिशय कठीण काम असते.

कारण या सगळ्या गोष्टी म्हणजे विविध शक्ती असतात, गतिविधी असतात, इच्छावासना असतात, स्पंदने असतात. अर्थात तिथे स्वतंत्र व्यक्तित्व, व्यक्तिविशिष्टता, पृथगात्मकता (individualised) लाभलेल्या काही व्यक्तीसुद्धा असतात, व्यक्तिमत्त्वं असतात. परंतु त्या व्यक्ती म्हणजे एक प्रकारच्या शक्ती असतात. ज्यांना त्या प्राणिक विश्वामध्ये असे स्वतंत्र, पृथगात्म व्यक्तित्व असते ते एकतर शूरवीर असतात किंवा दानव असतात. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 258)

आत्मसाक्षात्कार – १०

(कालच्या भागात आपण स्वतंत्र, पृथगात्म (individualised) व्यक्तित्व म्हणजे काय ते पाहिले. येथे आता श्रीमाताजी शरीराच्या पृथगात्मतेविषयी सांगत आहेत.)

(ईश्वरापासून) विभक्त करणारा अहंकार नाहीसा होण्यासाठी, व्यक्तीला स्वतःचे समग्रतया, पूर्णतया, हातचे काहीही राखून न ठेवता आत्मदान करता आले पाहिजे. आणि असे आत्मदान करण्यासाठी, व्यक्तीची ‘व्यक्ती’ म्हणून घडण झालेली असली पाहिजे. त्यासाठी, ती स्वतंत्र, पृथगात्म (individualized) होणे आवश्यक असते.

तुमचे शरीर जर आत्ता आहे त्याप्रमाणे ताठर, कडक, (rigid) नसते, (आत्ता ते फारच अलवचीक आहे.) समजा, ते तसे नसते आणि (श्रीमाताजी निर्देश करून दाखवितात) तुम्हाला जर अशी सघन त्वचाच नसती तर, काय झाले असते? ज्याप्रमाणे तुम्ही प्राणिक व मानसिक क्षेत्रामध्ये असता (म्हणजे स्वतंत्र अस्तित्व नसलेले आणि एकमेकांमध्ये मिसळलेले असे) जर तुम्ही शरीराने असता, म्हणजे प्राणिक व मानसिक क्षेत्रामधील तुमच्या अस्तित्वाचे केवळ प्रतिबिंबच म्हणता येईल असे जर तुम्ही (शरीराने) बाह्यतःदेखील असता तर काय झाले असते? तसे असते तर, तुमची अवस्था एखाद्या जेलीफिशपेक्षासुद्धा वाईट झाली असती. प्रत्येक गोष्टच दुसऱ्या प्रत्येक गोष्टीत मिसळत राहिली असती, विरघळत राहिली असती… आणि मग केवढा मोठा गोंधळ उडाला असता बघा! आणि म्हणून सुरुवातीला असा अगदी जड, कठीण, सघन देहाकार असण्याची आवश्यकता होती.

आता मात्र आपण त्याच्याबद्दल तक्रार करत राहतो. आपण म्हणतो, “हे शरीर किती बद्ध, जखडबंद आहे. किती त्रासदायक आहे हे! ते घडणसुलभ नाही, ते लवचीक नाही. ईश्वरामध्ये विलीन होण्यासाठी लागणारी तरलता, प्रवाहीपणा त्याच्यामध्ये नाही.”

परंतु शरीर तसेच असणे आवश्यक होते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 257-258)

आत्मसाक्षात्कार – ०९

(व्यक्तीचे जेव्हा स्वतंत्र, पृथगात्म (individualised) व्यक्तित्व निर्माण झालेले नसते तेव्हा तिची अवस्था कशी असते हे आपण कालच्या भागात पाहिले. येथे आता श्रीमाताजी पृथगात्म अस्तित्व (individualised being) म्हणजे काय ते समजावून सांगत आहेत.)

व्यक्तीला एखाद्या दिवशी अमुक एक गोष्ट हवी असते तर दुसऱ्याच दिवशी दुसरेच काहीतरी हवे असते. व्यक्ती एका क्षणी या बाजूला तर दुसऱ्याच क्षणी दुसऱ्या बाजूला ढकलल्यासारखी होत असते. आत्ता व्यक्ती आकाशाकडे पाहत असते (आशावादी असते) तर दुसऱ्या क्षणी जणू ती खाली खोलवर कोठेतरी एका खड्ड्यात जाऊन पडलेली असते (निराशेच्या गर्तेत पडलेली असते). व्यक्तीचे अस्तित्व अशा प्रकारचे असते.

सर्वप्रथम व्यक्तीची सचेत, व्यवस्थित घडण झालेली असली पाहिजे, व्यक्तीला स्वत:चे स्वतंत्र असे, पृथगात्म अस्तित्व असले पाहिजे. असे अस्तित्व की, जे स्वतःमध्ये राहून स्वतःचे जीवन स्वतंत्रपणे जगू शकेल, कोणत्याही बाह्य परिस्थितीमध्ये ते अस्तित्व स्वतंत्र राहू शकेल. म्हणजे असे की, त्याने काहीही ऐकले, काहीही वाचले, काहीही पाहिले तरी त्यामुळे ते अस्तित्व विचलित होता कामा नये. व्यक्तीला बाहेरून जे स्वीकारायचे आहे तेच ती स्वीकारते; तिच्या नियोजनामध्ये जे बसत नाही अशा सर्व गोष्टींना अशी व्यक्ती आपोआपच नकार देते. आपण अमुक एका गोष्टीचा प्रभाव स्वीकारायचा असे व्यक्ती स्वत:हून ठरवीत नाही तोपर्यंत, तिच्यावर कोणत्याच गोष्टीचा ठसा उमटू शकणार नाही. असे जेव्हा घडून येते तेव्हा, व्यक्ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र बनायला लागते; तिला व्यक्तिविशिष्टता, पृथगात्मकता (individuality) लाभायला सुरुवात होते. आणि व्यक्तीला जेव्हा अशी व्यक्तिविशिष्टता लाभते तेव्हाच ती त्याचे अर्पण करू शकते. कारण, स्वतःकडेच काही नसेल तर ती व्यक्ती देणार तरी काय आणि कशी? त्यामुळे प्रथम व्यक्तीची, ‘व्यक्ती’ म्हणून घडण झाली पाहिजे त्यानंतरच ती आत्मदान करू शकेल. जोपर्यंत व्यक्तीचे स्वतंत्र, पृथगात्म अस्तित्वच तयार होत नाही, तोपर्यंत ती काहीच अर्पण करू शकत नाही. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 257)