कोणीतरी मला एका आठ वर्षाच्या मुलीने फ्रेंचमध्ये लिहिलेले पुस्तक आणून दिले.(त्या मुलीचे नाव मिनू डुओट) आठ वर्षाच्या मुलीच्या मानाने ते पुस्तक खरंच खूप विलक्षण आहे. त्या पुस्तकात खूप चांगली चांगली वाक्यं तिने लिहिली आहेत. उदा. चेहऱ्यावर वांग (गोऱ्या रंगावर दिसणारे तपकिरी ठिपके) असलेल्या एका मुलाविषयी ती लिहिते, “तू खूप सुंदर आहेस, तुझ्या चेहऱ्यावरील वांगसुद्धा छान आहेत, जणू काही कोणी देवदूताने तुझ्या चेहऱ्यावर गव्हाचे दाणे पेरले आहेत, ज्यामुळे आकाशातील पक्षी आकर्षित व्हावेत.” खरंच, हे खूप काव्यमय आहे. (श्रीमाताजींनी अशीच उदाहरणे पुढेही दिली.)

ही सारी उदाहरणे पाहून मला मेटरलिंकची (नोबेल पारितोषिक विजेता साहित्यिक) आठवण येते. ज्या प्रतिभावान साहित्यिकांनी त्यांचे सारे आयुष्यच या साहित्यिक कामासाठी वाहिलेले असते, त्यांच्यामध्ये एक सुव्यवस्थित मानसिक अस्तित्व तयार होते, या अस्तित्वाला स्वत:चे असे जीवन असते; असे साहित्यिक जेव्हा निधन पावतात तेव्हाही हे मानसिक अस्तित्व स्वतंत्रपणे, स्वायत्तपणे शिल्लक राहते; त्याला अभिव्यक्त होण्याची सवय असल्याने ते आविष्कारासाठी इतरत्र माध्यम शोधते.

आणि त्याचवेळी जर असे एखादे मूल असेल की, जे अनुकूल अशा परिस्थितीत जन्माला आले असेल, जसे की येथे त्या मुलीची आई कवयित्री आहे; कदाचित तिची अशी इच्छा असेल की, तिचे मूल असे असामान्य असावे; अशावेळी ते मानसिक अस्तित्व या बाळाच्या जन्माच्यावेळी त्यामध्ये प्रवेश करू शकते आणि स्वत:ला अभिव्यक्त करावयाचा प्रयत्न करते. आणि मग अशा वेळी, त्या बालकामध्ये अशी मानसिक परिपक्वता, अशा असामान्य गोष्टी करण्याच्या क्षमता येतात. या मुलीमध्ये मेटरलिंकच्या मानसिक अस्तित्वाचा पुनर्जन्म झाला आहे आणि त्याद्वारे तो अभिव्यक्त होत आहे असे म्हणता येईल.

– श्रीमाताजी (CWM 08:316-318)

बडोद्यामध्ये आल्यानंतरही श्रीअरविंदांवर काही काळ पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव टिकून होता. मुंबई व कलकत्त्याहून मागविलेल्या पेटाऱ्यातील पुस्तके ते वाचत असत. श्रीअरविंदांना बंगाली शिकविणारे जे शिक्षक होते ते सांगतात, “अरविंद त्यांच्या टेबलाजवळ बसून तेलाच्या दिव्याच्या प्रकाशात, डासांचे असह्य दंश रात्रभर सोसत, अगदी सकाळ होईपर्यंत वाचत बसत असत. ध्यानावस्थेत मग्न असलेल्या योग्याला जसे आजूबाजूच्या घटनांचे काही भान नसते त्याप्रमाणे, पुस्तकावर डोळे खिळलेल्या अशा स्थितीत तासन्तास बसून त्यांचे वाचन चालत असे. आगीने घर वेढले जरी गेले असते तरी त्यांची एकाग्रता भंग पावली नसती.”

इंग्रजी, रशियन, जर्मन, फ्रेंच भाषेतील कादंबऱ्या ते वाचत असत. त्याचबरोबर ते भारतातील धर्मग्रंथांचे, उपनिषद, भगवद्गीता, रामायण, महाभारत या ग्रंथांचे वाचन करीत असत.

श्रीअरविंदांच्या एका मित्राने ही हकिकत सांगितली आहे : “श्रीअरविंद कॉलेजमधून परतले आणि आल्या आल्या लगेच तेथे पडलेले एक पुस्तक उघडून त्यांनी वाचायला सुरुवात केली. तेव्हा तेथे आम्ही सर्व मित्र बुद्धिबळाचा डाव मांडून जोरजोराने हसतखिदळत बसलो होतो. सुमारे अर्ध्या तासाने श्रीअरविंदांनी पुस्तक वाचून संपविले. आम्ही त्यांना असे करताना बरेचदा बघितले होते. ते पुस्तक अथपासून इतिपर्यंत वाचून काढतात की, केवळ वरवर चाळतात हे आम्हाला बरेच दिवसांपासून जाणून घ्यायचे होते. आत्ता ती कसोटी घेण्याची वेळ आली. आमच्यातील एकाने पुस्तकातील एक ओळ वाचून दाखविली आणि नंतर त्यापुढची ओळ कोणती असे श्रीअरविंदांना विचारले. श्रीअरविंदांनी क्षणभर मन एकाग्र केले आणि नंतर ती ओळ ज्या पानावर होती त्या पानावरील संपूर्ण मजकूर, एकही चूक न करता जसाच्या तसा सांगितला. जर ते अशा प्रकारे अर्ध्या तासात शंभरेक पाने वाचू शकत असतील तर त्यांनी अल्पावधीतच त्या पेटाऱ्यातील सगळी पुस्तके वाचून संपवली ह्यात नवल ते काय?”

(Sri Aurobindo or The Adventure of Consciousness)

१९१४ मध्ये जेव्हा श्रीअरविंदांनी ‘आर्य’ मासिकासाठी लिखाण करावयास सुरुवात केली तेव्हाची ही गोष्ट. ते जे लिखाण करीत असत त्याला मानसिक ज्ञान किंवा मनोनिर्मिती असे म्हणता येणार नाही.

श्रीअरविंद मन निश्चल करून, टंकलेखनयंत्रासमोर बसत असत. आणि उच्च स्तरावरून जे त्यांच्यामध्ये प्रवाहित होत असे ते त्यांच्या टंकलेखन करणाऱ्या बोटांच्या माध्यमातून थेट कागदावर उमटत असे. अशा मानसिक निश्चल स्थितीमध्ये ‘आर्य’साठी ते पानेच्या पाने एकटाकी पद्धतीने टंकलिखित करीत असत.

अशा रीतीने १९१४ ते १९२१ या कालावधीत श्रीअरविंदांनी टंकलिखित केलेले सर्व प्रमुख लिखाण ‘आर्य’ या मासिकाच्या माध्यमातून प्रकाशित झाले आहे. The Life Divine, The Human Cycle, The Ideal of Human Unity, Essays on the Gita, The Secret of the Veda, The foundation of Indian Culture ग्रंथसंपदा त्यांनी ह्याच काळात लिहिलेली आहे. ‘Synthesis of Yoga’ हा ग्रंथही ‘आर्य’ मधूनच प्रथम क्रमश: प्रकाशित झाला.

(Stories told by the Mother 11: Page 31)

*

[या काळात मीरा रिचर्ड्स (श्रीमाताजी) व त्यांचे पती पॉल रिचर्ड्स असे दोघे मिळून आर्य मासिकाच्या फ्रेंच आवृत्तीचा कार्यभार सांभाळत असत. मीरा रिचर्ड्स या मासिकाची व्यवस्थापकीय जबाबदारीदेखील सांभाळत असत.]

योगाचा अर्थ

 

श्रीमाताजींनी एका लहान मुलाला योगाचा अर्थ समजावून सांगण्यासाठी एका चित्राचे रेखाटन केले आहे.

खालील बाजूस माणूस दर्शविला आहे आणि वरील बाजूस ईश्वर आहे.

नागमोडी वळणे असलेली रेषा ही सामान्य जीवनमार्गाचे प्रतीक आहे तर, मधोमध असलेली सरळ रेषा हे योगमार्गाचे प्रतीक आहे.

(Stories told by the Mother : Part II)

(श्रीअरविंद यांना त्यांच्या शिष्याने एक प्रश्न विचारला, त्याला श्रीअरविंद यांनी जे उत्तर दिले आहे ते उद्बोधक आहे.)

चंपकलाल : काही दिवसांपूर्वी मला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात मला असे दिसले की, मी ज्या मार्गाने चाललो होतो तो मार्ग खूप लांबचा आणि खडतर होता. त्या मार्गाला अनेक फाटे फुटले होते आणि त्यामुळे मी गोंधळून गेलो होतो. खूप प्रयत्न करूनदेखील मला माझा मार्ग सापडत नव्हता. शेवटी मी वर पाहिले. मला तेथे खूप उंचावर श्रीमाताजी दिसल्या. त्यांनी तेथून माझ्याकडे एक दोरी पाठविली. कालांतराने माझ्या असे लक्षात आले की, ती दोरी नाही तर ऊर्ध्व दिशेने थेट जाणारा एक धवलशुभ्र, तेजोमय प्रकाश आहे. तेव्हा मला जाणीव झाली की, इकडे तिकडे धडपड करत बसण्यापेक्षा मी सरळ वरच पाहायला हवे होते कारण तेथून तो रस्ता सरळ वरच जात होता. या स्वप्नाचा अर्थ काय?

श्रीअरविंद : व्यक्ती उच्चतर चेतनेकडे वळण्यापूर्वी आणि तिने श्रीमाताजींचा धवलशुभ्र प्रकाशाचा मार्ग अनुसरण्यापूर्वी तिची मनाच्या, प्राणाच्या आणि शरीराच्यादवारे जी अवघड अशी धडपड चालू असते त्याचे ते प्रतीक आहे – नंतर मात्र (श्रीमाताजींच्या धवलशुभ्र प्रकाशाकडे वळल्यानंतर) मार्ग सरळ आणि तेजोमय बनतो.

(Champaklal Speaks: 361-362)

श्री अरविंद घोष यांना क्रांतिकार्यासाठी अटक करण्यात आली. तेव्हा ते काहीसे विचलित झाले. पुढील तीन दिवस तसेच निघून गेले; तेव्हा त्यांच्या अंतरंगातून आवाज आला, “थांब आणि काय होते ते पाहा.” मग ते काहीसे शांत, स्थिरचित्त झाले.

त्यांना तेथून अलीपूरच्या तुरुंंगात नेण्यात आले. त्यांना आठवले की, सुमारे महिन्याभरापूर्वीच त्यांना हातातील सर्व कामे बाजूला ठेवून एकांतवासात जाण्याचा आदेश मिळाला होता. पण प्राणप्रिय असलेल्या देशकार्यापासून ते स्वत:ला दूर करू शकले नव्हते. तेव्हा देवाने त्यांना सांगितले, “जी बंधने तोडण्याचे तुझ्यामध्ये सामर्थ्य नव्हते, ती बंधने मी तुझ्यासाठी तोडली आहेत. मला तू काही अन्य कार्य करणे अपेक्षित आहे.” श्रीअरविंदांच्या हाती भगवद्गीता देण्यात आली.

पुढे तुरुंगात फिरण्यासाठी म्हणून त्यांना सकाळी व संध्याकाळी अर्धा तास कोठडीबाहेर सोडण्यात येऊ लागले. ते जेव्हा त्या तुरुंगाच्या उंच भिंतीकडे पाहू लागले तेव्हा, तिच्या जागी त्यांना वासुदेवाचे दर्शन झाले, कोठडीच्या बाहेर ते ज्या झाडाखाली फिरत असत तेथेही त्यांना जाणीव झाली की, ते झाड नसून वासुदेवच आहे. ते झोपत असत त्या कांबळ्यामध्ये तसेच तुरुंगाच्या गजांमध्येदेखील त्यांना वासुदेवाचे दर्शन झाले. तुरुंग, त्यातील चोर, दरोडेखोर, खुनी या साऱ्यासाऱ्यांंमध्येही त्यांना त्याच एकमेवाद्वितीय वासुदेवाचे दर्शन घडले. त्यांच्या खटल्याची सुनावणी करण्यासाठी त्यांना मॅजिस्ट्रेटपुढे उभे करण्यात आले तेव्हा, तेथेही त्यांची तीच जाणीव टिकून होती. त्या मॅजिस्ट्रेटमध्येही त्यांना वासुदेवाचे दर्शन झाले.

भगवान श्रीकृष्ण त्यांना म्हणत होते, “सर्व माणसांमध्ये माझा निवास असतो आणि त्यांच्या कृतीचे नियमन मी करतो. माझे संरक्षण अजूनही तुझ्यासोबत आहे, या खटल्याची सारी जबाबदारी माझ्यावर सोपव.”

…… श्री.अरविंद घोष यांना आलेला ‘वासुदेवः सर्वम् इति’ हा अनुभव त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला.

आधार : (CWSA-08:05)

श्रीमती सविता हिंदोचा नावाच्या एक साधिका तेव्हा केनियामध्ये राहत असत. त्यांच्या घरी श्रीअरविंद आणि श्रीमाताजी ह्यांचे काही साधक एकत्र जमले होते. त्यांनी प्रार्थना, ध्यान आणि वाचन सुरु केले. तेव्हा ते श्रीअरविंदांच्या ‘सावित्री’ या महाकाव्यातील उताऱ्याचे वाचन करत होते.

सविता म्हणतात, “मी भारावून गेले होते आणि मला असे जाणवू लागले की, मला ते काव्य समजावे म्हणून खुद्द माताजीच मला ते वाचून दाखवत आहेत…” आणि ह्या अनुभवानंतर पुढे एके दिवशी हिंदोचा यांनी सर्वसामान्य जीवन मागे सोडून द्यावयाचे असा निश्चय केला. आणि मग सुरु झाली प्रार्थनांची मालिका!

श्रीमाताजींना भेटण्यासाठी त्या व्याकुळ झाल्या. त्यांची खात्री पटली की, संपत्ती, कुटुंब, भौतिक आनंद, समृद्धी ह्या कशाकशातूनच दिव्य शांती आणि समाधान त्यांना मिळू शकणार नाही, आणि मग एक दिवस त्या आश्रमात येऊन दाखल झाल्या. श्रीमाताजींनी त्यांना हुता (सर्वस्व-दान केलेली) असे नाव दिले.

आश्रमात राहू लागल्यावर त्यांनी एकदा श्रीमाताजींना विचारले, “मी कोणत्या वेळी प्रार्थना करू म्हणजे मी तुमच्या सोबत प्रार्थना करू शकेन?” तेव्हा श्रीमाताजींनी त्यांना उत्तर दिले,

“प्रार्थना किंवा ध्यानासाठी माझी ठरावीक अशी कोणती वेळ नाही. वरवर पाहता हा देह काहीतरी काम करताना दिसत असला तरी मी दिवसरात्र सातत्याने परमपुरुषाला आवाहन करत असते. या असत्यमय जगामध्ये ते परमसत्य आणि ह्या बेबनावाने भरलेल्या जगामध्ये परमप्रेम आविष्कृत व्हावे म्हणून प्रार्थना करत असते. तेव्हा तुला जेव्हा प्रार्थना करावीशी वाटेल तेव्हा तू कर; तुला आढळेल की, तुझी प्रार्थना माझ्यासमवेतच झालेली आहे.”

– आधार : (On The Mother by K.R.Srinivasa lyengar)

क्रांतिकारक श्री अरविंद घोष यांच्या जीवनातील ही कहाणी.

ब्रिटिशविरोधी कारवाईमध्ये सहभागी झाल्याच्या संशयावरून त्यांना दि. ०२ मे १९०८ रोजी अटक करण्यात आली. अलिपूरच्या तुरुंगात त्यांना एक वर्षभर राहावे लागणार होते. बळजबरीच्या ह्या एकांतवासामध्ये, दिवस घालविण्यासाठी कोणतेच साधन तेव्हा त्यांच्या हाताशी नव्हते. बाहेर असताना एक क्षणही न दवडता, अखंड कार्यरत असणारे अरविंद घोष, स्थानबद्ध झाल्यावर एकदम निर्माण झालेल्या पोकळीने मात्र काहीसे अस्वस्थ झाले होते.

काही दिवस अशा रीतीने अस्वस्थतेमध्ये घालविल्यानंतर, एके दिवशी दुपारी ते विचार करत बसले असताना, विचारांचा ओघ अनिर्बंधपणे वाहू लागला आणि त्यांना जाणीव झाली की, हे विचार अनियंत्रितपणे, असुसंगत रीतीने येऊन आदळत आहेत. हे प्रमाण इतके वाढले की, त्यांना वाटू लागले की, मनाची नियंत्रणक्षमताच जणू नाहीशी झाली आहे. आता भ्रमिष्टच होतो की काय अशी भीती त्यांना वाटू लागली.

श्रीअरविंद म्हणतात, “माझी बुद्धी गमावण्यापासून माझे रक्षण कर, अशी मी त्यावेळी अगदी उत्कटतेने, आर्ततेने ईश्वराची प्रार्थना केली, त्याची करूणा भाकली. त्याच क्षणी माझ्या सर्वांगावरून एक अतिशय हळूवार, थंडगार झुळूक वाहत गेली, माझे भणाणलेले मस्तक विश्रांत पावले. एखादे तान्हे मूल जसे त्याच्या आईच्या कुशीत निश्चित, निर्धास्तपणे झोपी जावे, तसा मी देखील मग विश्वमातेच्या कुशीत निर्धास्तपणे झोपी गेलो.

संपूर्ण जीवननाट्याकडे एखाद्या प्रेक्षकाच्या भूमिकेतून कसे पाहावयाचे हेच माझ्या बुद्धिला या प्रसंगातून त्या ईश्वराने शिकविले होते. त्या दिवसापासून कारावासातील माझे सर्व त्रास संपूनच गेले.

या प्रसंगामधून मला प्रार्थनेची परिणामकारकता आणि प्रार्थनेची असामान्य शक्ती ह्यांची जाणीव झाली.”

-आधार : (Tales of Prison Life)

श्रीअरविंद भारतात आल्यानंतर, त्यांना तत्कालीन काँग्रेसची मवाळ भूमिका मानवली नाही. ‘इंदुप्रकाश’मध्ये त्यावर टीका करणारी “New Lamps for Old” ही लेखमाला त्यांनी लिहिली होती. कोणत्याही भारतीयाने आजवर इतक्या उत्तम इंग्रजीमध्ये, इतके ओजस्वी लिखाण तोपर्यंत केलेले नव्हते; त्यामुळे जेव्हा हे लिखाण प्रकाशित होऊ लागले तेव्हा सर्वांचेच लक्ष त्याकडे वेधले गेले. विशेषतः इंग्रज सरकारचे!

तेव्हा ह्याच पार्श्वभूमीवर तत्कालीन समाजधुरिण न्या. महादेव गोविंद रानडे यांनी “असे जहाल लिखाण लिहू नये,”असे संपादकांना सांगितले. तसे प्रसिद्ध केल्यास लेखकाला अटक होण्याची शक्यता आहे, अशी आशंका त्यांनी व्यक्त केली. तेव्हा श्रीअरविंदांनी राजकारणाच्या तत्त्वज्ञानाविषयी लिखाण करावयास सुरुवात केली. तरीही शासनाची त्यांच्यावर वक्र दृष्टी राहिलीच.

‘वंदे मातरम्’ ह्या वृत्तपत्राच्या लेखनामध्ये श्रीअरविंदांचा हात आहे असा ब्रिटिश सरकारला संशय होता आणि त्यामुळे राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यासाठी ब्रिटिश सरकार अगदी उत्सुक होते. श्रीअरविंदांच्या नावाने अटक वॉरंट निघाले, तेव्हा ते स्वतःच पोलिसांना शरण गेले.

या घटनेने आजवर गुप्तपणे कार्यरत असलेले श्रीअरविंद एका रात्रीत नेते म्हणून प्रसिद्धीस आले. तेव्हा भारतभरातून वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी या घटनेची दखल घेतली. ‘मराठा’ वृत्तपत्रात लो.टिळकांनी लिहिले, “कोणी सांगावे जे कृत्य आज राजद्रोह म्हणून गणले जात आहे, ते उद्या दैवी सत्य म्हणून गणले जाईल.”

दि.०८ सप्टेंबर १९०७ च्या अंकात रवीन्द्रनाथ टागोरांनी श्रीअरविंदांना अभिवादन करणारी कविता बंगालीतून लिहिली.

श्रीअरविंदांच्या विरुद्ध कोणताही आरोप सिद्ध होऊ न शकल्यामुळे पुढे, त्यांची निर्दोष सुटका झाली. तेव्हा रवीन्द्रनाथ टागोर त्यांना भेटण्यास गेले आणि चेष्टेत म्हणाले, “काय हे? तुम्ही तर आम्हाला फसविलेत.”

तेव्हा श्रीअरविंद हसून म्हणाले, “तुम्हाला त्यासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही.” आणि खरोखर, पुढे लवकरच म्हणजे ०२ मे १९०८ मध्ये श्रीअरविंदांना परत अटक करण्यात आली.

(Sri Aurobindo-a biography and a history by K.R.Srinivasa Iyengar)

श्रीमाताजी मुलांना गोष्टी सांगतानाचे छायाचित्र

 

 

जुनून नावाचे कोणी एक महात्मा होऊन गेले. त्यांच्याकडे खूप विद्यार्थी दीक्षा घेण्यासाठी येत असत. एके दिवशी युसूफ हुसेन नावाचा कोणी एक जण त्यांच्याकडे आला. त्या महात्म्याने युसूफला चार वर्षे आपल्या गुरुकुलात ठेवून घेतले.

एके दिवशी महात्म्याने विचारले,”तू इथे का आला आहेस?”

क्षणाचाही विलंब न लावता युसूफ म्हणाला, “तुमच्याकडून ज्ञानदीक्षा मिळावी म्हणून.”

महात्मा जुनूनने एक छोटीशी सुंदर डबी युसूफच्या हाती दिली आणि त्याला सांगितले, “ही डबी घेऊन जा आणि नीला नदीच्या किनाऱ्यावर माझा एक मित्र राहतो त्याला अशीच्या अशी नेऊन दे. तेथून तू परत आलास की, मी तुला शिकवण देईन.” युसूफ तातडीने निघाला.

दुपारी विसावा घ्यावा म्हणून तो एका झाडाखाली थांबला. त्याचे लक्ष त्या सुंदर डबीकडे गेले. तो विचार करू लागला,’ह्या डबीत काय असेल? उघडून पाहायला काय हरकत आहे.’

तो डबी उघडणार इतक्यात त्याच्या मनात विचार आला, ‘गुरुजींनी डबी जशीच्या तशी न्यावयास सांगितली आहे, ती उघडणे बरोबर नाही.’

परत थोड्या वेळाने त्याला वाटले, ‘एक क्षणभरच उघडून बघू आणि नंतर परत होती तशी ती बंद करून ठेवू’

…त्याने डबी उघडली आणि झटक्यात बंदही केली. पण तेवढ्या वेळात त्या डबीतील उंदीर बाहेर पळाला होता. त्याने त्याला शोधायचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ !

तो तसाच त्या महात्म्याच्या मित्राकडे जाऊन पोहोचला. ती डबी युसूफने त्यांच्या हाती दिली. ते देखील संत होते. त्यांनी झाला प्रकार ओळखला. ते युसूफला म्हणाले, “म्हणजे असे घडले तर, आता काही तुला जुनून शिकवण देणार नाही, परमज्ञान प्राप्त करून घ्यावयाचे तर मनावर खूप संयम हवा. तुझ्याविषयी जुनूनला शंका वाटली म्हणूनच तुला त्याने माझ्याकडे पाठविलेले दिसते. तुझ्या गुरुकडे परत जा.”

…खजील होऊन युसूफ गुरुकडे परतला. तेव्हा ते म्हणाले, “तू एक अनमोल संधी गमावली आहेस. मी साधा एक उंदीर तुला सांभाळायला दिला होता, तो सुद्धा तू नीट सांभाळू शकला नाहीस. मग तू परमज्ञान, दिव्य सत्य कसे सांभाळशील? जा, मनावर संयम मिळवण्याचा प्रयत्न कर आणि मग परत ये.”

युसूफ नंतर खरोखर स्वत:वर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू लागला. वर्षानुवर्षे गेली. त्याची स्वत:ची जेव्हा खात्री पटली तेव्हा, तो परत महात्मा जुनून यांच्याकडे आला. युसूफचे बदललेले रूप पाहून तेही प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला ज्ञानदीक्षा दिली. कालांतराने युसूफ इस्लाममधील एक महान संत बनले.

– श्रीमाताजी

(CWM 09 : 67-71)