श्रीमाताजी : मी जेव्हा जपानहून परत येत होते तेव्हा एक घटना घडली. मी समुद्रामध्ये बोटीवर होते आणि असे काही घडेल अशी अपेक्षाही नव्हती. (मी माझ्या आंतरिक जीवनामध्ये व्यस्त होते, परंतु शरीराने मी बोटीवर राहात होते.) तेव्हा एकदम, एकाएकी, पाँडिचेरीपासून समुद्रामध्ये दोन मैलावर असताना, हवेतील वातावरण अचानकपणे बदलले आणि मला जाणवले की, आम्ही श्रीअरविंदांच्या प्रभावक्षेत्रामध्ये प्रवेश करत आहोत. तो अगदी भौतिक, सघन असा अनुभव होता.

पाँडिचेरीमध्ये मला ह्याच्या अगदी बरोबर उलट अनुभवसुद्धा आलेला आहे. अनेक वर्षांनंतर मी जेव्हा प्रथमच मोटरकारने बाहेर पडले होते, तेव्हाचा हा अनुभव आहे. मी त्या तलावाच्या पलीकडे थोडीशीच गेले असेन, अचानक मला वातावरणातील बदल जाणवला. इथे जी समृद्धी, ऊर्जा, प्रकाश, शक्ती होती ती अचानक सर्वच्या सर्व कमी कमी होत गेली आणि नंतर तर ती नाहीशीच झाली होती. मी तेव्हा मानसिक किंवा प्राणिक चेतनेमध्ये नव्हते तर, मी तेव्हा पूर्णपणे भौतिक चेतनेमध्ये होते. जे कोणी शारीरिक चेतनेबाबत संवेदनशील असतात त्यांना हा फरक खूप स्पष्टपणे जाणवतो. आणि मी तुम्हाला खात्री देते की, ज्याला आपण आश्रम असे म्हणतो तेथे शक्तीचे जे संघनीकरण झालेले आहे, तसे संघनीकरण शहरात किंवा परिघवर्ती गावांमध्येसुद्धा कोठेही नाहीये.

– श्रीमाताजी

तुम्हाला आठवते का, ती प्रचंड वादळाची रात्र ? विजांचा, ढगांचा मोठाच गडगडाट चालू होता, पावसाच्या माऱ्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. मला वाटले की, श्रीअरविंदांच्या खोलीत जावे आणि खिडक्या बंद करण्यास त्यांना मदत करावी. मी दार उघडून आत गेले तेव्हा पाहते तो काय? श्रीअरविंद अगदी शांतपणे त्यांच्या टेबलावर काहीतरी लिहीत बसले होते. तिथे त्या खोलीमध्ये एवढी सघन शांती होती की, बाहेर एवढे वादळ घोंघावत आहे याची कोणी कल्पनाही करू शकले नसते.

– श्रीमाताजी

एखादी चूक घडली आणि त्याची प्रांजळ कबुली गुरुपाशी दिली तर, ती चूक पुन्हा न करण्याचा तुमचा निर्धार हा फक्त तुमचाच राहात नाही कारण जर तुम्ही प्रामाणिक असाल तर, ईश्वरी व्यवस्थाच तुम्हास अनुकूल अशा पद्धतीने कार्यकारी होते.

मी प्रथम पाँडिचेरी येथे श्रीअरविंदांना भेटले तेव्हाचा हा प्रसंग आहे. मी गाढ ध्यानावस्थेत होते, अतिमानसातील गोष्टी मी पाहात होते. त्या गोष्टी जशा असावयास हव्यात तशाच होत्या, पण काही कारणाने त्या आविष्कृत होत नव्हत्या. जे काही मी पाहिले, ते मी श्रीअरविंदांना सांगितले आणि विचारले त्या गोष्टी आविष्कृत होतील का? ते फक्त एवढेच म्हणाले, ‘हो.” आणि त्याक्षणी मला असे दिसले की, अतिमानसाने या पृथ्वीला स्पर्श केला आहे आणि ते प्रत्यक्षीभूत होण्यास प्रारंभ झाला आहे. जे सत्य आहे ते वास्तवात उतरविण्याची ताकद काय असते, ह्याचा पहिला अनुभव मला येथे पाहावयास मिळाला.

तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे येऊन असे म्हणाल की, “मला या मिथ्यत्वापासून सुटका करून घ्यावयाची आहे” आणि जर तुम्हाला ‘हो’ असे उत्तर मिळाले तर, तुमच्यामध्येही ते सत्य प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तीच शक्ती कार्यकारी होईल.

– श्रीमाताजी

श्रीमाताजींना त्यांच्या एका निकटवर्ती शिष्याने विचारले, ”माताजी, तुमच्या जीवनाचे संपूर्णतया नियमन तुमचा चैत्य पुरुष करत आहे, असा अनुभव तुम्हाला पहिल्यांदा कधी आला?”

श्रीमाताजी म्हणाल्या, ”ही खूप जुनी गोष्ट आहे. मला वाटते ते बहुधा १९०४ साल असावे. एके दिवशी माझ्या भावाच्या मित्रामुळे माझी मिस्टर मार्क थिऑन यांच्याशी भेट झाली. मी जरी थिऑन ह्यांना ओळखत नव्हते तरीही, ते मात्र मला ओळखत होते, ह्याचे मला आश्चर्य वाटले. थिऑन हे गूढवादाचे मोठे अभ्यासक होते. त्यांनी मला त्यांच्या गावी येण्याचे निमंत्रण दिले.

पुढे मग मी गूढवादाचा अभ्यास करण्यासाठी, त्यांच्या गावी अल्जेरियामध्ये थ्लेमसेन येथे गेले. तेव्हा मी २७-२८ वर्षांची होते आणि आयुष्यात प्रथमच एकटीने एवढ्या लांबचा प्रवास करत होते.

मी तेथे पोहोचले तेव्हा, मार्क थिऑन मला न्यायला आले होते. अॅटलास पर्वतराजींच्या उतरंडीवर त्यांचे घर होते. त्यांची मोठी इस्टेट होती. त्यामध्ये शेकडो वर्षांपूर्वीची ऑलिव्हची, अंजीरांची झाडे होती. त्या सगळ्या वृक्षराजींमधून आम्ही वर वर चाललो होतो. त्यांचे घर खूप दूरवर, उंचावर होते. एका टप्प्यावर आल्यावर दूरवर निर्देश करत त्यांनी मला लाल रंगाचे एक घर दाखविले आणि म्हणाले ते माझे घर ! त्या घराच्या लाल रंगावरून काही गमतीदार किस्सा पण त्यांनी मला ऐकविला.

मी शांतपणेच चालत होते. आणि मध्येच ते एकदम थांबले आणि माझ्याकडे गर्रकन वळून म्हणाले, “आता तू माझ्या ताब्यात आहेस, तुला माझी भीती नाही वाटत?” मी ताबडतोब त्यांना उत्तर दिले की, ”माझा चैत्य पुरुष माझ्या जीवनाचे नियमन करतो, मी कोणालाच घाबरत नाही.” श्रीमाताजी पुढे सांगू लागल्या, ”हे उत्तर ऐकल्यावर, ते थक्कच झाले. खरोखर, थ्लेमसेनला जाण्यापूर्वी मला चैत्य जाणिवेची (Psychic Consciousness) प्राप्ती झालेली होती.” त्यामधूनच ती निर्भयता आलेली होती.

आधारित : Conversation with a Disciple Vol 13 : April 15, 1972
& Mother or The Divine Materialism : Pg 159-160

*

 

अतिमानस चेतनेचे आविष्करण घडवून आणण्याची प्रक्रिया अधिक त्वरेने व्हावे ह्यासाठी श्रीमाताजींवर आश्रमाचा सर्व कार्यभार सोपवून श्रीअरविंद एकांतवासामध्ये निघून गेले. श्रीअरविंदांनी काही मोजक्या लोकांना बोलावून सांगितले की, आता येथून पुढे लोकांना मार्गदर्शन करणे, मदत करणे हे सगळे काम श्रीमाताजी बघतील आणि त्यांच्या माध्यमातूनच लोक श्रीअरविंदांशी संपर्क ठेवू शकतील. त्यानंतर लगेचच, अचानकपणे गोष्टींना वैशिष्ट्यूपर्ण आकार प्राप्त झाला : एक अतिशय प्रकाशमय निर्मिती, तिच्या अगदी बारीकसारीक तपशीलानिशी तयार झाली; तेव्हा ईश्वरीय अस्तित्वांशी संपर्क प्रस्थापित होऊ लागले, अनेक अदभुत अनुभव आले; अतिशय विलक्षण असा अनुभव होता तो. त्या सुमारास घडलेल्या एका घटनेविषयी श्रीमाताजी सांगत आहेत. एके दिवशी मी नेहमीप्रमाणेच, काय घडत आहे ते सांगण्यासाठी श्रीअरविंदांकडे गेले. आणि कदाचित जे घडले होते त्याविषयी मी जरा जास्तच उत्साहाने सांगू लागले.

तेव्हा श्री अरविंदांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हटले, “हो. ही अधिमानस निर्मिती आहे. खूप चांगल्या रीतीने तुम्ही कार्य केले आहे. ज्यामुळे तुम्ही जगप्रसिद्ध होऊ शकाल: असे अनेक चमत्कार तुम्ही घडवून आणू शकाल; तुम्ही या पृथ्वीवरील सर्व घटनांमध्ये उलथापालथ घडवून आणू शकाल…. पुढे ते हसतच म्हणाले, “ते एक फार मोठे यश असेल. पण ही ‘अधिमानसिक’ निर्मिती आहे. आणि आपल्याला पाहिजे असलेले यश ते हे नव्हे; आपल्याला ह्या पृथ्वीवर ‘अतिमानसा’ची प्रस्थापना करावयाची आहे. एका नवीन जगताच्या निर्मितीसाठी आत्ताचे मिळालेले हे यश कसे त्यागावयाचे हे समजायला हवे.”

त्यांनी असे सांगितल्यावर, माझ्या आंतरिक जाणिवेमुळे मला ते लगेच समजले. आणि अवघ्या काही तासांतच ती अधिमानसिक निर्मिती निघून गेली. आणि त्या क्षणानंतर आम्ही पुन्हा एका नव्या पायावर निर्मिती करण्यासाठी कंबर कसली.

– आधार : (Stories told by the Mother ll : 119-120) *

१९१६ ते १९१९ या काळात मीरा अल्फांसा (श्रीमाताजी) जपानमध्ये वास्तव्यास होत्या. त्या काळातील त्यांची जिवश्चकंठश्च मैत्रीण कोबायाशी यांनी श्रीमाताजींविषयी सांगितलेल्या आठवणी.

जपानी भाषा शिकण्यासाठी आणि आमच्यातील एक होऊन जाण्यासाठी त्या आमच्याकडे आल्या; पण त्यांच्या मोहक आणि नावीन्यपूर्ण वागणुकीतून आम्हालाच कितीतरी शिकायला मिळाले. मोठी गोड मैत्रीण होती ती. फार हुशार, अत्यंत तल्लख, उत्तम कलावंत, तिच्या बोटांवर कला नाचत होती. माझे रंगीत चित्र तिने काढले होते; अजूनही ते मी माझ्याजवळ जपून ठेवले आहे. आम्ही दोघी मनोहर निसर्गदृश्य टिपण्यासाठी आणि अधिक नीलिम आकाश न्याहाळण्यासाठी उत्सुक असायचो. बुद्धाची जन्मभूमी असलेल्या प्राचीन देशातील एका गुरूंना (श्रीअरविंद) ती पूजनीय मानत होती. तिचा दृढ विश्वास होता की, उद्याच्या जगाला तेच सत्यमंत्र देणार आहेत. त्यांच्याबद्दल जेव्हा ती माझ्याशी बोलत असे तेव्हा तिच्या डोळ्यांत नवीन आनंद आणि आश्चर्य तरळत असलेले मला दिसे…

नारा येथील मंदिराच्या छपरावरून खाली लोंबत असलेली व्हिस्टेरिया वेलीची सुंदर फुले तिला फार आवडत असत. आम्ही त्या फुलांना ‘हुजी’ म्हणतो. ती त्या फुलांशी एकरूप होई. तिने स्वत:साठी एक जपानी नाव निवडले होते – हुजीको. आणि माझे नाव न्योबूको कोबायाशी.

(The Mother’s Light : 82)

(०१ जानेवारी १९६९ रोजी अतिमानस चेतनेचे पृथ्वीवर आविष्करण झाले; त्याचा प्रारंभच एक प्रकारे १९५६ साली घडलेल्या खालील प्रसंगामध्ये झाला होता. त्या दिवशी अतिमानस चेतनेने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला.)

ती २९ फेब्रुवारी १९५६ ची संध्याकाळ होती. श्रीमाताजी प्लेग्राऊंडवर उपस्थित होत्या. त्यांनी ‘Synthesis of Yoga’ मधील एक उतारा वाचून दाखविला, त्यावरील प्रश्नोत्तरांनंतर सारे ध्यानस्थ झाले. ध्यानामध्ये जे घडले त्याविषयी श्रीमाताजींनी सांगितले की, “या संध्याकाळी दिव्य अस्तित्व, अगदी सघन, मूर्त स्वरूपात तुमच्यामध्ये उपस्थित होते. मी जणू सजीव असा सुवर्णाकार धारण केला होता; या विश्वापेक्षा मी विशाल झाले होते. मी एका भल्या मोठ्या प्रचंड सुवर्णदरवाज्यासमोर उभी होते, ह्या दरवाजाने विश्वाला ईश्वरापासून अलग केले होते. मी त्या दरवाजाकडे पाहिले आणि निमिषार्धात मला जाणवले, ‘वेळ आली आहे’.माझ्या दोन्ही हातांनी मी एक भली मोठी सुवर्ण हातोडी उचलली आणि जोरात त्या दरवाजावर मारली आणि एका झटक्यात त्या दरवाजाचे तुकडेतुकडे झाले. तेव्हापासून अतिमानसाचा प्रकाश, त्याची शक्ती, त्याची चेतना यांचा लोंढा या पृथ्वीवर अखंडितपणे वाहू लागला.”

ध्यान संपल्यानंतर परत जेव्हा दिवे लागले तेव्हा बसलेले सगळे उठले आणि उठून रोजच्याप्रमाणे जाऊ लागले, जणू काही घडलेच नव्हते… श्रीमाताजी म्हणतात.”या शक्तीच्या अवतरणाची जाणीव फक्त पाच जणांनाच झाली होती, त्यावेळी त्यातील दोघं जण आश्रमात होते आणि तिघे जण बाहेर होते.”

यानंतर दोन महिन्यांनी श्रीमाताजींनी एक संदेश दिला : “हे ईश्वरा, तू संकल्प केलास आणि मी तो कृतीत उतरविला. ह्या पृथ्वीवर एक नूतन प्रकाश फाकला आहे; एक नूतन विश्व जन्माला आले आहे. ज्या गोष्टींचे वचन देण्यात आले होते त्यांची परिपूर्ती झाली आहे.”

– आधार :

(Beyond Man by Georges Van Vrekhem:317-318)

*

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. अरेबियाच्या वाळवंटी प्रदेशामध्ये एक दिव्य जीव जन्माला आला.या पृथ्वीतलावर लोकांमध्ये ईश्वरी प्रेमभावना जागृत करावी, ह्या हेतूने त्याने जन्म घेतला होता. पण लोकांना त्याच्या पाठीमागची उदात्त भावना समजू शकली नाही, लोकांचा गैरसमज झाला, त्यांनी त्याच्यावर संशय घेतला, ते हात धुऊन त्याच्या पाठीमागे लागले. लोकांनी त्याच्यावर अनैतिकतेचे आरोप केले. सरतेशेवटी, यासर्वांपासून दूर जाऊन, शांतपणे दुसरीकडे कोठेतरी आपले इच्छित कार्य करीत, मृत्यू स्वीकारावा असे त्याच्या मनाने घेतले. तरीही लोकांनी त्याचा पिच्छा पुरविला, शेवटी त्याला तेथून पळ काढावा लागला…

अचानकपणे, त्या विस्तीर्ण वाळवंटामध्ये त्याला एक छोटेसे डाळिंबाचे झाड दिसले. त्या झाडाच्या फांद्यांच्या छायेमध्ये अखेरचा विसावा घ्यावा म्हणून तो तेथे विसावला… थेंबाथेंबाने त्याचे रक्त त्या मातीमध्ये मिसळत गेले. ती भूमी सुपीक होत गेली. काही दिवसांतच ते झाड आश्चर्यकारकरित्या मोठे झाले. ते उंच, मोठे, दाट झाले. ते इतके विशाल झाले की येणारेजाणारे प्रवासी त्याच्या छायेत सुखाने विसावू लागले. ते झाड लालकेशरी, भरगच्च पाकळ्या असणाऱ्या सुंदर फुलांनी बहरून गेले. लोकांना समजले देखील नाही की, ज्याच्या मागे ते हात धुऊन लागले होते तोच येथे कायमचा विसावला आहे. या नाहीतर त्या रूपात, त्या दिव्य जीवाने आपले ईश्वरीय प्रेम लोकांमध्ये प्रसृत करण्याचे कार्य चालूच ठेवले…

कालांतराने डाळिंबाची फुले “दिव्य प्रेम’ या नावाने ओळखली जाऊ लागली. (महाशक्तीच्या सर्व रूपांपैकी कालीमाता हे तिचे सर्वात प्रेमळ रूप आहे असे श्रीमाताजी सांगतात. कालीपूजेच्या दिवशी हीच डाळिंबाची फुले श्रीमाताजी दर्शनार्थीना वितरित करीत असत.)

-श्रीमाताजी

(CWM 153 192)

‘ल्हासा’ या गावामध्ये प्रवेश करणाऱ्या श्रीमती अलेक्झांड्रा डेव्हिड नील ह्या पहिल्या युरोपियन बुद्धमार्गी महिला होत्या. त्यांचा तिबेटचा प्रवास खूप कष्टप्रद होता. नील जेव्हा एका जथ्याबरोबर तिबेटकडे जायला निघाल्या होत्या. तेव्हाची ही गोष्ट आहे. त्याकाळात इंडो-चायना मार्गे तिबेटमध्ये जाणे तुलनेने सोपे असल्याने नील त्या मार्गाने निघाल्या होत्या. नरभक्षक वाघांची वस्ती असलेल्या जंगलातून त्यांची वाट जात होती. नील रोजच्या रोज ठरावीक वेळी ध्यानास बसत असत. एक दिवसाचाही कधी खंड पडू देत नसत. जेव्हा त्या घनदाट अरण्यातून चालल्या होत्या, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, त्यांची रोजची ध्यानाची वेळ झाली आहे.

म्हणून त्यांनी त्यांच्या सोबत्यांना सांगितले,”तुम्ही पुढे व्हा, माझे ध्यान आटोपले की मी येतेच.”

त्यांच्या काळजीने त्यांचे सहप्रवासी घाबरून गेले. त्यांनी नीलला खूप समजावून पाहिले, “येथे थांबणे धोकादायक आहे. तुम्ही आमच्याबरोबर चला.”

त्यांनी असे वारंवार सांगून पाहिले पण व्यर्थ ! त्या आपल्या निर्णयावर अडिग होत्या.

शेवटी नाईलाजाने सहप्रवासी पुढे निघून गेले. त्या ध्यानाला बसल्या. थोड्या वेळाने त्यांना एका अस्तित्वाची जाणीव झाली. त्यांनी डोळे उघडून पाहिले तो त्यांना काय दिसले? एक नरभक्षक वाघ त्यांना गिळंकृत करण्याच्या तयारीत अगदी तीनचार टप्प्यांच्या अंतरावर उभा होता.

तेव्हा एखाद्या सिद्ध अशा बुद्धवाद्याप्रमाणे त्यांनी विचार केला,”मला जर अशाच मार्गाने निर्वाण मिळणार असेल, तर ठीक आहे. मी तयार आहे. मला आता माझा देह फक्त योग्य प्रकारे, योग्य वृत्तीने सोडावयाचा आहे इतकेच.” असे मनाशी म्हणत त्या ध्यानाला बसल्या. पाच मिनिटे, दहा मिनिटे, अर्धा तास निघून गेला. त्यांनी ध्यानातून बाहेर आल्यावर डोळे उघडून पाहिले… वाघ निघून गेला होता. नील मग शांतपणे पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन पोहोचल्या आणि सहप्रवाशांना म्हणाल्या,”ही मी आले आहे.”

-श्रीमाताजी

(CWM 9:53-54)

श्रीमाताजींना त्यांच्या एका निकटवर्ती शिष्याने विचारले, “माताजी, तुमचा चैत्य पुरुष तुमच्या जीवनाचे संपूर्णतया नियमन करत आहे, असा अनुभव तुम्हाला पहिल्यांदा कधी आला?”

श्रीमाताजी म्हणाल्या, “ही खूप जुनी गोष्ट आहे. मला वाटते ते बहुधा १९०४ साल असावे. एके दिवशी माझ्या भावाच्या मित्रामुळे माझी मार्क थिऑन यांच्याशी भेट झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा मी त्यांना भेटले तेव्हा, मी जरी थिऑन ह्यांना ओळखत नव्हते तरीही, त्यांनी मात्र मला ओळखले. थिऑन हे गूढवादाचे मोठे अभ्यासक होते. त्यांनी मला त्यांच्या गावी येण्याचे निमंत्रण दिले.

पुढे मग मी गूढवादाचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या गावी अल्जेरियामध्ये थ्लेमसेन येथे गेले. तेव्हा मी २७-२८ वर्षांची होते आणि आयुष्यात प्रथमच एकटीने एवढ्या लांबचा प्रवास करत होते. मी तेथे पोहोचले तेव्हा मार्क थिऑन मला न्यायला आले होते.

अॅटलास पर्वतराजींच्या उतरंडीवर त्यांचे घर होते. त्यांची मोठी इस्टेट होती. त्यामध्ये शेकडो वर्षांपूर्वीची ऑलिव्हची, अंजीरांची झाडे होती. त्या सगळ्या वृक्षराजीमधून आम्ही वर वर चाललो होतो. त्यांचे घर खूप दूरवर, उंचावर होते. एका टप्प्यावर आल्यावर दूरवर निर्देश करत त्यांनी मला लाल रंगाचे एक घर दाखविले आणि म्हणाले ते माझे घर ! त्या घराच्या लाल रंगावरून काही गमतीदार किस्सा पण त्यांनी मला ऐकविला.

मी शांतपणेच चालत होते. आणि मध्येच ते एकदम थांबले आणि माझ्याकडे गर्रकन वळून म्हणाले, “आता तू माझ्या ताब्यात आहेस, तुला भीती नाही वाटत?”

आपली तर्जनी उंचावून दाखवीत, मी त्यांना सांगितले की, “माझा चैत्य पुरुष माझे नियमन करतो, मी कोणालाच घाबरत नाही.”

माताजी पुढे सांगू लागल्या, “हे उत्तर ऐकल्यावर, ते थक्कच झाले. खरोखर, थ्लेमसेनला जाण्यापूर्वी मला चैत्य जाणिवेची (Psychic Consciousness) प्राप्ती झालेली होती.” त्यामधूनच ती निर्भयता आलेली होती.

 

आधारित : (Mother’s Agenda vol 13 : April 15,1972 & Mother or The Divine Materialism : Pg 159-160)