शांतीचे अवतरण

 

‘शांतीचे अवतरण’ हा बरेचदा साधनेमधील काही महत्त्वाच्या पहिल्या सकारात्मक अनुभवांपैकी एक अनुभव असतो. शांतीच्या या स्थितीमध्ये असताना, सामान्यतः जिला ‘बुद्धी’ असे म्हटले जाते ती बुद्धी शांत होते किंवा तिचे बरेचसे मनोव्यापार विराम पावतात, हे योग्यच असते. त्यावेळी व्यक्ती सतर्क नसेल तर, तिथे बऱ्याच वेळा एकतर प्राणिक मन (vital mind) शिरकाव करते; अन्यथा एक प्रकारे यांत्रिक शारीर-मनातील (mechanical physical mind) किंवा अवचेतन मनातील (subconscient mind) काही गोष्टी कशाही रितीने पृष्ठभागावर येऊन, कृती करण्याची शक्यता असते. निश्चल-नीरवतेमध्ये (silence) अडथळे आणणारे हे मुख्य घटक असतात. अन्यथा, कनिष्ठ प्राणिक मन अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकते. आणि त्यामुळे अहंकार व भावावेग उफाळून येतो आणि त्यांचा खेळ सुरू होतो.

साधकाने ज्या घटकांपासून स्वतःची सुटका करून घेतली पाहिजे, त्या घटकांच्या या सगळ्या खुणा आहेत. कारण जर या गोष्टी तशाच शिल्लक राहिल्या आणि त्याच वेळी जर दिव्य ऊर्जा, दिव्य शक्ती, दिव्य ज्ञान, दिव्य प्रेम किंवा दिव्य आनंद यांसारख्या उच्चतर शक्ती अवतरित होऊ लागल्या तर, उपरोक्त कनिष्ठ गोष्टी त्यांच्या आड येऊ शकतात. आणि त्याचा परिणाम म्हणून एकतर उच्चतर चेतना त्यातून मागे सरते किंवा मग तिचे अवतरण झाकोळले जाते किंवा त्यातून मिळालेल्या चालनेचा कनिष्ठ प्रकृतीच्या हेतुंसाठी गैरवापर केला जाऊ शकतो.

मोठमोठे आध्यात्मिक अनुभव येऊन गेल्यानंतरही बरेचसे साधक पुष्ट झालेला अहंकार, भावभावनांची खळबळ, महत्त्वाकांक्षा, अतिरेकी कामवासना किंवा त्यासारख्या इतर प्राणिक आवेगांच्या किंवा विकारांच्या कचाट्यात सापडलेले दिसतात, त्याचे हेच कारण असते. आणि म्हणूनच किमान ज्यांच्यामध्ये प्राण अतिशय सक्रिय असतो अशा प्रकृतीच्या व्यक्तींनी तरी, सकारात्मक अनुभवाच्या गतीशी प्राणाची गती मिळतीजुळती ठेवली पाहिजे किंवा आधी स्वतःच्या प्राणाचे संपूर्ण शुद्धीकरण केले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 180-181)

श्रीअरविंद