खराखुरा प्रामाणिकपणा तुम्ही साध्य केला आहे का?

 

तुम्ही जेव्हा पूर्णपणे प्रामाणिक असता तेव्हा, तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या सर्वोच्च ध्येयाशी, तुमच्या अस्तित्वाच्या सत्याशी सुसंवाद राखून जगण्याचा सतत प्रयत्न करत असता.

प्रत्येक क्षणी – म्हणजे तुम्ही जो काही विचार करता, जे काही तुम्हाला भावते किंवा जे जे काही तुम्ही करता, त्या प्रत्येक वेळी – शक्य तितक्या संपूर्णपणे, शक्य तितक्या सर्वांगीण रितीने तुमच्या सर्वोच्च ध्येयाशी (highest ideal) सुसंवादी राहण्याचा प्रयत्न जर तुम्ही करत असाल किंवा तुम्ही जर तुमच्या अस्तित्वाच्या सत्याविषयी (truth of your being) जागृत झालेले असाल तर, त्यावेळी खराखुरा प्रामाणिकपणा तुम्ही साध्य केला आहे असे म्हणता येईल.

आणि जर तुम्ही तसे असाल, म्हणजे खरोखरच तुम्ही कधीही अहंभावात्मक वृत्तीने किंवा वैयक्तिक कारणासाठी कोणतीही कृती करत नसाल; तुमच्या आंतरिक सत्याकडून तुम्हाला जे मार्गदर्शन लाभते त्याच्या आधारे तुम्ही कृती करत असाल, म्हणजेच जर तुम्ही संपूर्णत: प्रामाणिक आणि प्रांजळ असाल तर, जगाने तुमच्याबद्दल काहीही म्हटले; तुमच्याबद्दल चांगला, वाईट काहीही ग्रह करून घेतला; काहीही मत बनविले, तरी तुम्हाला त्याबद्दल काहीच वाटणार नाही; तुम्ही त्याविषयी संपूर्ण उदासीन, संपूर्ण समवृत्तीने राहाल. त्या संपूर्ण प्रामाणिकपणाच्या स्थितीत असताना, चांगले ‘दिसण्याची’ किंवा इतरांनी तुम्हाला चांगले म्हणावे याची तुम्हाला आवश्यकता वाटणार नाही. कारण तुमच्या आंतरिक खऱ्या चेतनेशी जेव्हा तुम्ही सुसंवादी असता, तेव्हा पहिली गोष्ट ही घडते की, तुम्ही कसे ‘दिसता’, कसे भासता याची तुम्ही चिंता करत बसत नाही. लोक तुम्हाला काहीही समजत असले; उदासीन, भावनाशून्य, दूरस्थ किंवा अहंकारी म्हणत असले तरी, त्याला तुमच्या दृष्टीने काही महत्त्वच उरत नाही. अर्थात, मी पुन्हा सांगते की, त्यासाठी तुम्ही संपूर्ण प्रामाणिक, प्रांजळ असले पाहिजे. म्हणजेच, तुम्ही तुमचे आंतरिक, मध्यवर्ती सत्य व्यक्त करण्यासाठी, प्रकट करण्यासाठी जीवन जगत आहात, हे तुम्ही कधीही विसरता कामा नये.

– श्रीमाताजी (CWM 04 : 16-17)

श्रीमाताजी