निद्राविषयक विधिनिषेध
कोणत्याही परिस्थितीमध्ये, म्हणजे मूल काहीही करत असले तरी त्याला पुरेशी झोप मिळालीच पाहिजे. वयानुसार झोपेचे तास कमीअधिक होतील. बाळ पाळण्यात असताना, ते जितका वेळ जागे असते त्याच्यापेक्षा अधिक वेळ त्याने झोपले पाहिजे. जसजसे ते मूल मोठे होत जाईल तसतसे त्याच्या झोपेचे प्रमाण कमीकमी होत जाईल. परंतु मुलाची वाढ पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याने किमान आठ तास तरी झोपलेच पाहिजे. जिथे शांतता आहे आणि जिथे खेळती हवा आहे अशा जागी त्याने झोपले पाहिजे.
लहान मुलांना विनाकारण उशिरापर्यंत जागे राहायला लावता कामा नये. मज्जातंतूंना विश्रांती मिळण्याच्या दृष्टीने मध्यरात्रीपूर्वीचे तास हे सर्वात उत्तम असतात. एवढेच काय पण ज्यांना मज्जागत संतुलन (nervous balance) कायम ठेवायचे आहे त्यांनी दिवसासुद्धा थोडी विश्रांती घेणे आवश्यक असते. मुलं लहान असतात तेव्हाच त्यांना स्नायूंना आणि मज्जातंतूंना आराम कसा द्यायचा याची कला शिकविली पाहिजे.
पण बरेच पालक असेही असतात की, जे मुलांना कोणती ना कोणती तरी कृती करण्यास भाग पाडत असतात. जेव्हा मूल शांत असते तेव्हा पालकांना असे वाटते की, जणू ते आजारी आहे. मुलांना आराम करू न देता किंवा त्यांना थोडीही विश्रांती घेऊ न देता, कामामध्ये गुंतवून ठेवण्याची वाईट खोडसुद्धा काही पालकांना असते. …आपल्या कुटुंबाला मदत करण्याचे जर मुलाने स्वतःहून ठरविले असेल आणि काम करण्याची त्याला आवड असेल तरच त्याला तशा प्रकारचे काम करू दिले पाहिजे. मात्र त्यामध्ये एक खबरदारी घेतली गेली पाहिजे. आणि ती अशी की, त्याच्या शरीराचे कार्य व्यवस्थितपपणे चालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विश्रांतीचे तास त्यामुळे कमी होता कामा नयेत.
* श्रीमाताजी (CWM 12 : 15-16)
- एक अनोखा ऊर्जास्रोत - June 25, 2026
- तारुण्य आणि वार्धक्य - June 24, 2026
- शाश्वत तारुण्याचा आश्रय - June 23, 2026





