(आंतरिक धर्माचे पालन न करणाऱ्या व्यक्तीचे जीवन म्हणजे यातनाघरच कसे असते, ते श्रीमाताजींनी सांगितले. आपण तो मुद्दा कालच्या भागात विचारात घेतला. आता, अशा दुराचारी व्यक्तीच्या बाबतीत प्रामाणिकपणाचा काय उपयोग होतो, ते श्रीमाताजी स्पष्ट करत आहेत.)
आंतरिक धर्माचे पालन न करणारा मनुष्य जी कोणती गोष्ट करू पाहील त्यात त्याला यश मिळणारच नाही, असे नाही. तो ज्या गोष्टीची इच्छा बाळगेल ती गोष्ट संपादन करणे त्याला शक्यच होणार नाही, असेही नाही. पण यदाकदाचित, त्याच्या वाट्याला दुर्दैव आलेच तर, त्याच्या आंतरतम अस्तित्वामध्ये प्रामाणिकपणाची एक धुगधुगी अजूनही कुठेतरी शिल्लक आहे, याचे ते द्योतक असते. (त्या दुर्दैवाच्या माध्यमातून जीवन त्याला जो बोध देऊ पाहत असते त्या बोधास तो त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रामाणिकपणामुळे पात्र ठरतो.) तेव्हा अगोदर त्याला यश, इच्छावासनांची परिपूर्ती इत्यादी गोष्टींचे जे बाह्य लाभ होत होते ते आता मिळेनासे होतात.
आणि म्हणूनच, जेव्हा एखाद्या दुर्वर्तनी मनुष्याच्या वाट्याला दुर्दैव येते आणि त्यामुळे तो जेव्हा दुःखीकष्टी होतो; त्याला जेव्हा पश्चात्ताप होतो तेव्हा, (तुम्ही त्याच्या दुःखकष्टावर उपहासाने न हसता) त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे. त्याच्या अंतरंगातील प्रामाणिकपणाची ज्योत अजून पूर्णपणे विझलेली नाही आणि त्याच्या वाईट कृत्यांबद्दल अजूनही त्याच्या अंतरंगातील कोणीतरी त्याला समज देऊ पाहत आहे, असा त्याच्या वाट्याला आलेल्या दुर्दैवाचा अर्थ होतो. अंतिमतः पुन्हा आपण त्याच मुद्द्यापाशी येतो की, तुम्ही व्यक्तीच्या बाह्य रंगरूपाकडे पाहून, कधीही त्या व्यक्तीविषयीचे अडाखे बांधता कामा नयेत. तुम्ही बाह्य परिस्थिती पाहून काही निष्कर्ष काढाल तर, तुमचा तो अंदाज नेहमीच निश्चितपणे खोटा ठरेल, या निरीक्षणापाशीच आपण येतो.
सत्याची एक झलक मिळण्यासाठी, व्यक्तीने स्वतःच्या चेतनेमध्ये किमान थोडेसे तरी वळले पाहिजे; तिने स्वतःच्या अंतरंगात थोडेतरी डोकावून पहिले पाहिजे आणि वरकरणी दिसणाऱ्या दृश्यांच्या पाठीमागे असणाऱ्या शक्तींच्या खेळाकडे आणि त्या खेळाच्याही पाठीमागे असणाऱ्या ईश्वरी उपस्थितीकडे लक्ष दिले पाहिजे आणि ती समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
– श्रीमाताजी (CWM 03 : 279)
(आंतरिक धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनावर त्याचा सकारात्मक परिणाम कसा होतो हे आपण कालच्या…
मनुष्यामध्ये असणारी ईश्वरी उपस्थिती हे प्रत्येक व्यक्तीचे सत्य असते, तो व्यक्तीचा आंतरिक धर्म (inner law)…
(आपल्या चेतनेमधील वेगवेगळे घटक आणि त्यांच्यामधील विसंवाद याची आपल्याला जाणीव नसते याविषयी श्रीमाताजींनी काही सांगितले…
(तुमच्यामध्ये काही बदल घडवावा असे तुम्हाला वाटत असेल तर नेमके काय केले पाहिजे हे श्रीमाताजींनी…
तुमच्या सचेत अस्तित्वामधील (conscious being) कोणत्या तरी एखाद्या घटकाला तुमच्यामधीलच अमुक एक अडचण (वाईट सवय,…
(बदलाची इच्छा असणाऱ्या व्यक्तीमध्ये, बदलास नाखूष असणारा एक घटक कसा दडलेला असतो हे श्रीमाताजींनी…