(तुमच्यामध्ये काही बदल घडवावा असे तुम्हाला वाटत असेल तर नेमके काय केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे. ते कालच्या भागात आपण समजावून घेतले.)
तुमच्यामध्ये समजा एखादा दोष आहे आणि तो तुम्ही दूर करू इच्छित आहात पण तरीही तो जर टिकून राहिला आणि तुम्ही म्हणालात की, “मला जेवढे करता येणे शक्य होते तेवढे सगळे मी केले आहे,” तेव्हा तुम्ही निश्चितपणे असे समजा की, जे जे करणे आवश्यक होते ते सारे तुम्ही केलेले नाही. तुम्ही जर खरंच तसा प्रयत्न केला असता तर, तुम्हाला नक्कीच विजय प्राप्त झाला असता. कारण तुमच्या वाट्याला ज्या अडचणी येतात त्या तुमच्या सामर्थ्याच्या प्रमाणातच असतात. तुमच्या चेतनेशी संबंधित नसलेली अशी कोणतीच गोष्ट तुमच्या बाबतीत घडू शकत नाही आणि ज्या गोष्टी तुमच्या चेतनेशी संबंधित असतात त्यावर तुम्ही निश्चितपणे प्रभुत्व मिळवू शकता.
बाहेरून येणाऱ्या गोष्टी किंवा सूचना यासुद्धा तेवढ्या प्रमाणातच तुम्हाला स्पर्श करू शकतात जेवढ्या प्रमाणात तुमच्या चेतनेने त्यांना संमती दिलेली असते. तुम्ही तुमच्या चेतनेचे स्वामी व्हावे यासाठीच तुमची जडणघडण झालेली असते.
तुम्ही जर असे म्हणाल की, “मला जे करणे शक्य होते ते सारे मी केले आहे आणि सगळ्या गोष्टी करूनसुद्धा तो दोष तसाच कायम राहिला, म्हणून मी प्रयत्न करणे सोडून दिले,” तर तुम्ही हे निश्चित समजा की, तुम्हाला जे जे काही करणे शक्य होते ते तुम्ही केलेले नाही. ‘सगळे करून सुद्धा’, जेव्हा कोणतीही त्रुटी शिल्लक राहते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, तुमच्या अस्तित्वात दडी मारून बसलेली एखादी गोष्ट ‘जॅक इन द बॉक्स’ या खेळातल्याप्रमाणे अचानक उसळी मारून वर येते आणि तुमच्या जीवनाचा ताबा घेते.
म्हणून, तुम्ही एकच गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे, तुमच्या आतमध्ये दडी मारून बसलेले सर्व छोटे-छोटे अंधारे कानेकोपरे शोधून काढले पाहिजेत. त्या अंधाऱ्या भागावर सद्भावनेचा एक छोटासा कवडसा जरी तुम्ही टाकलात तर, तो अंधारा कोपरा शरण येईल, तो नाहीसा होऊन जाईल. आणि एके काळी तुम्हाला जी गोष्ट अशक्य वाटली होती ती गोष्ट करणे तुम्हाला शक्य होईल. ती फक्त व्यवहार्यच होईल असे नाही, तर ती पूर्णदेखील झालेली असेल.
तुम्हाला अनेक वर्षे सतावणारी अशी एखादी अडचण तुम्ही अशा रितीने एका क्षणात दूर करू शकता. मी तुम्हाला खात्री देते. ते फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून असते आणि ती गोष्ट म्हणजे, तुम्हाला त्या दोषापासून, त्या त्रुटीपासून अगदी खरोखर, प्रामाणिकपणे सुटका करून घ्यायची इच्छा असली पाहिजे. आणि ही गोष्ट सर्वच बाबतीत लागू पडते. म्हणजे अगदी शारीरिक आजारपणापासून ते सर्वोच्च मानसिक अडचणींपर्यंत ही गोष्ट सर्वत्र सारखीच लागू पडते. (क्रमश:)
– श्रीमाताजी (CWM 04 : 74)
जो मनुष्य सत्याच्या शोधासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि सातत्याने परिपूर्ण सत्याच्या अधिकाधिक निकट जावे…
मनुष्यप्राणी, सामान्यतः जसे जीवन जगतो त्या त्याच्या जीवनाची घडण अर्ध-स्थिर, अर्ध-तरल अशा अतिशय अपरिपूर्णतेने…
मनुष्य आणि ईश्वर यांच्या भेटीचा अर्थ नेहमीच, मनुष्यामध्ये ईश्वरत्वाचा प्रवेश आणि अंतर्भाव तसेच मनुष्याचे…
जग ही जिवाची आत्मवंचना (self-delusion) आहे किंवा जग ही सैतानाची निर्मिती आहे असे आम्ही…
(अंतिमत: नेहमी सत्याचाच विजय होतो असे म्हटले जाते पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती विपरीत दिसते,…
साधक : सृष्टीला निश्चित असे ध्येय आहे का? असे एखादे अंतिम गंतव्यस्थान आहे का…