ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

बालकाने नेहमी काय लक्षात ठेवले पाहिजे? – भाग ०३

 

(श्रीमाताजींनी बालकांना प्रामाणिकपणाचे महत्त्व कसे समजावून सांगितले, ते आपण कालच्या भागात समजावून घेतले.)

मुलांना एक गोष्ट अवश्य शिकवावी असे माझे पालकांना आणि शिक्षकांना सांगणे आहे. मुलांना असे सांगावे की, ‘’मुलांनी ते चांगले आहेत असे ‘दाखविणे‌’, जणू काही ते फार आज्ञाधारक आहेत असे ‘दाखविणे‌’ किंवा ते खूप उत्तम रितीने अभ्यास करत आहेत असे ‘दाखविणे‌’ हे अजिबात उपयोगाचे नाही.” (तशा प्रकारची कोणतीही गोष्ट मुळात नसताना केवळ ‘दाखविणे‌’ काहीच उपयोगाचे नसते, हे मुलांना शिकवावे.) पण बरेचदा आपली मुले अशी ‘दिसावीत’ यासाठी पालक आणि शिक्षकच मुलांना प्रोत्साहन देत असतात.

बरेचदा असेही घडते की, एखादे मूल अगदी सहजस्वाभाविकपणे, अगदी प्रांजळपणे त्याची चूक कबूल करण्यासाठी पालकांकडे किंवा शिक्षकांकडे जाते; पण तेव्हा त्याला ओरडा खावा लागतो. पालकांची ही सर्वात मोठी चूक असते. मुलाला कधीही रागवता कामा नये आणि त्यासाठी स्वतः पालकांकडे पुरेसा संयम असावा लागतो. अगदी त्या मुलाने कितीही किमती किंवा अतिशय मौल्यवान अशी वस्तू मोडलेली असेल तरीही त्याला रागावता कामा नये. त्याला फक्त असे विचारावे की, “हे असे कसे झाले? नक्की काय झाले?” असे केल्यामुळे, नक्की काय घडले व ते तसे का घडले हे मुलाला समजेल, म्हणजे मग पुढच्या वेळी तो अधिक काळजी घेऊ शकेल. बस इतकेच. तुम्ही असे वागलात तर, ते मूल तुम्हाला फसविण्याचा प्रयत्न करणार नाही, तर ते तुमच्यापाशी प्रांजळपणे चूक कबूल करेल. ढोंगीपणा ही स्वतःच्या व्यक्तित्वाच्या रूपांतरणातील सर्वात मोठी अडचण असते. तुम्ही तुमच्या मुलाबरोबर वागताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवलीत तर तुम्ही त्याचे खूप भले करू शकाल. अर्थात, तुम्ही त्याला उपदेशाचे डोस पाजत बसता कामा नये किंवा भाषणबाजीसुद्धा करता कामा नये.

व्यक्तीमध्ये एक प्रकारचा उदात्तपणा असतो, एक महान विशुद्धता असते, सौंदर्याविषयी निरतिशय प्रेम असते आणि या सगळ्या गोष्टी इतक्या शक्तिशाली असतात की, अगदी अत्यंत दुष्ट आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा मनुष्यसुद्धा अशा खऱ्याखुऱ्या सौंदर्यपूर्ण कृतीसमोर किंवा वीरवृत्तीच्या किंवा निःस्वार्थी कृतीसमोर नतमस्तक होतो. म्हणजे तो तसे वागण्यास प्रवृत्त होतो इतकी तो गोष्ट शक्तिशाली असते, ही गोष्ट मुलांना समजावून सांगितली पाहिजे.

कारण (सर्वच) मनुष्यमात्रांमध्ये एक ईश्वरी उपस्थिती असते, या पृथ्वीवरील ती सर्वात अद्भुत अशी उपस्थिती असते. ती उपस्थिती हृदयामध्ये सुप्त स्वरूपात असते. हृदयामध्ये म्हणजे शारीर-हृदयामध्ये नाही, तर सर्व मनुष्यमात्रांच्या चैत्य केंद्रामध्ये (psychic centre) ती उपस्थिती असते. आणि एखाद्या व्यक्तीमध्ये जेव्हा त्या ईश्वरी उपस्थितीचे वैभव पुरेशा विशुद्धपणे आविष्कृत होते तेव्हा, त्या उपस्थितीचा पडसाद हा सर्व जीवमात्रांमध्ये सुप्त असणाऱ्या त्या ईश्वरी उपस्थितीला जाग आणतो.

– श्रीमाताजी (CWM 15 : 298-299)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

उच्चतर सत्यासाठी कनिष्ठ सत्याचा परित्याग

  जो मनुष्य सत्याच्या शोधासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि सातत्याने परिपूर्ण सत्याच्या अधिकाधिक निकट जावे…

4 hours ago

मानवी अस्तित्वाचा संपूर्ण अर्थ

  मनुष्यप्राणी, सामान्यतः जसे जीवन जगतो त्या त्याच्या जीवनाची घडण अर्ध-स्थिर, अर्ध-तरल अशा अतिशय अपरिपूर्णतेने…

1 day ago

‘परमानंद‌’ हे विश्वाचे रहस्य

  मनुष्य‌ आणि ईश्वर‌ यांच्या भेटीचा अर्थ नेहमीच, मनुष्यामध्ये ईश्वरत्वा‌चा प्रवेश आणि अंतर्भाव तसेच मनुष्याचे…

2 days ago

जग – ईश्वराचे आविष्करण‌

  जग ही जिवाची आत्मवंचना (self-delusion) आहे किंवा जग ही सैतानाची निर्मिती आहे असे आम्ही…

3 days ago

आविष्करण‌ आणि अभिव्यक्ती

  (अंतिमत: नेहमी सत्याचाच विजय होतो असे म्हटले जाते पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती विपरीत दिसते,…

4 days ago

विश्वाचे गंतव्यस्थान?

  साधक : सृष्टीला निश्चित असे ध्येय आहे का? असे एखादे अंतिम गंतव्यस्थान आहे का…

5 days ago