ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

बालकाने नेहमी काय लक्षात ठेवले पाहिजे? – भाग ०३

 

(श्रीमाताजींनी बालकांना प्रामाणिकपणाचे महत्त्व कसे समजावून सांगितले, ते आपण कालच्या भागात समजावून घेतले.)

मुलांना एक गोष्ट अवश्य शिकवावी असे माझे पालकांना आणि शिक्षकांना सांगणे आहे. मुलांना असे सांगावे की, ‘’मुलांनी ते चांगले आहेत असे ‘दाखविणे‌’, जणू काही ते फार आज्ञाधारक आहेत असे ‘दाखविणे‌’ किंवा ते खूप उत्तम रितीने अभ्यास करत आहेत असे ‘दाखविणे‌’ हे अजिबात उपयोगाचे नाही.” (तशा प्रकारची कोणतीही गोष्ट मुळात नसताना केवळ ‘दाखविणे‌’ काहीच उपयोगाचे नसते, हे मुलांना शिकवावे.) पण बरेचदा आपली मुले अशी ‘दिसावीत’ यासाठी पालक आणि शिक्षकच मुलांना प्रोत्साहन देत असतात.

बरेचदा असेही घडते की, एखादे मूल अगदी सहजस्वाभाविकपणे, अगदी प्रांजळपणे त्याची चूक कबूल करण्यासाठी पालकांकडे किंवा शिक्षकांकडे जाते; पण तेव्हा त्याला ओरडा खावा लागतो. पालकांची ही सर्वात मोठी चूक असते. मुलाला कधीही रागवता कामा नये आणि त्यासाठी स्वतः पालकांकडे पुरेसा संयम असावा लागतो. अगदी त्या मुलाने कितीही किमती किंवा अतिशय मौल्यवान अशी वस्तू मोडलेली असेल तरीही त्याला रागावता कामा नये. त्याला फक्त असे विचारावे की, “हे असे कसे झाले? नक्की काय झाले?” असे केल्यामुळे, नक्की काय घडले व ते तसे का घडले हे मुलाला समजेल, म्हणजे मग पुढच्या वेळी तो अधिक काळजी घेऊ शकेल. बस इतकेच. तुम्ही असे वागलात तर, ते मूल तुम्हाला फसविण्याचा प्रयत्न करणार नाही, तर ते तुमच्यापाशी प्रांजळपणे चूक कबूल करेल. ढोंगीपणा ही स्वतःच्या व्यक्तित्वाच्या रूपांतरणातील सर्वात मोठी अडचण असते. तुम्ही तुमच्या मुलाबरोबर वागताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवलीत तर तुम्ही त्याचे खूप भले करू शकाल. अर्थात, तुम्ही त्याला उपदेशाचे डोस पाजत बसता कामा नये किंवा भाषणबाजीसुद्धा करता कामा नये.

व्यक्तीमध्ये एक प्रकारचा उदात्तपणा असतो, एक महान विशुद्धता असते, सौंदर्याविषयी निरतिशय प्रेम असते आणि या सगळ्या गोष्टी इतक्या शक्तिशाली असतात की, अगदी अत्यंत दुष्ट आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा मनुष्यसुद्धा अशा खऱ्याखुऱ्या सौंदर्यपूर्ण कृतीसमोर किंवा वीरवृत्तीच्या किंवा निःस्वार्थी कृतीसमोर नतमस्तक होतो. म्हणजे तो तसे वागण्यास प्रवृत्त होतो इतकी तो गोष्ट शक्तिशाली असते, ही गोष्ट मुलांना समजावून सांगितली पाहिजे.

कारण (सर्वच) मनुष्यमात्रांमध्ये एक ईश्वरी उपस्थिती असते, या पृथ्वीवरील ती सर्वात अद्भुत अशी उपस्थिती असते. ती उपस्थिती हृदयामध्ये सुप्त स्वरूपात असते. हृदयामध्ये म्हणजे शारीर-हृदयामध्ये नाही, तर सर्व मनुष्यमात्रांच्या चैत्य केंद्रामध्ये (psychic centre) ती उपस्थिती असते. आणि एखाद्या व्यक्तीमध्ये जेव्हा त्या ईश्वरी उपस्थितीचे वैभव पुरेशा विशुद्धपणे आविष्कृत होते तेव्हा, त्या उपस्थितीचा पडसाद हा सर्व जीवमात्रांमध्ये सुप्त असणाऱ्या त्या ईश्वरी उपस्थितीला जाग आणतो.

– श्रीमाताजी (CWM 15 : 298-299)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

संकटे येण्याचे कारण

(एखाद्या व्यक्तीमध्ये प्रगती करण्याची प्रामाणिक आस असेल तर तिच्या प्रगतीसाठी, वेळप्रसंगी महाकालीकडून तिच्यावर प्रहारदेखील केले…

22 hours ago

प्रामाणिकपणाने केलेले आत्मदान

(श्रीमाताजीकृत प्रार्थना...) हे ईश्वरा, तू परिपूर्ण ज्ञान आहेस, परम चेतना आहेस. जो तुझ्याशी सायुज्य पावतो…

2 days ago

समर्पणासाठी संपूर्ण प्रामाणिकपणाची आवश्यकता

(फक्त कर्मफलच नव्हे तर, संपूर्ण कर्मच ईश्वराला समर्पित केले पाहिजे. किंबहुना आपल्या माध्यमातून ती ईश्वरी…

3 days ago

प्रामाणिक शरणागती

साधक : प्रसन्नचित्ताने ईश्वराला शरण कसे जायचे, ते आम्हाला सांगाल का? श्रीमाताजी : ती शरणागती…

4 days ago

अहंकार निर्मूलनासाठी प्रामाणिकपणाची आवश्यकता

व्यक्तित्वाची घडण व्हावी यासाठी अहंकाराची आवश्यकता होती. पण म्हणूनच त्याचा विनाश हा तितकाच अवघड असतो.…

5 days ago

वासनामुक्तीची प्रामाणिक आस

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) श्रीमाताजींच्या दिशेने अभिमुख झालेले असणे आणि त्यांना आवाहन करणे हे…

6 days ago